Friday, 31 October 2025


विंदा, पाडगावकर आणि बापट हे पूर्वी एक कवितेचा कार्यक्रम करायचे. कधी बघण्याचा योग आला नाही पण खूप लोकप्रिय होता असं ऐकून आहे. थोडं अवघडच काम आहे, कवितेच्या माध्यमातून तीन तास लोकांना खिळवून ठेवणं. वीस एक वर्षापूर्वी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी आणलेला आयुष्यावर बोलू काही हा आगळावेगळा कार्यक्रम तुफान यशस्वी झाला. सौमित्र आणि अजून काही समकालीन कवीनी या फॉर्म मधे प्रयोग केले आणि रंगत आणली. 

याच पठडीतील पण बहुधा असा प्रयोग पहिल्यांदाच केला असावा की बासरी आणि काव्य यांचं फ्युजन. वैभव जोशी आणि अमर ओक यांचा "ऋतू बरवा". एखादा कार्यक्रम सुरू झाल्यापासून पहिल्या मिनिटाला तुमच्या मनाची पकड घेतो ती तीन तासाने "आता विश्वात्मके देवे" ने शेवट झाला की सैलावते. मधल्या काळात वैभव आणि अमर ओक आपल्याला वेगवेगळ्या प्रवाहातून नेत राहतात. एकही सादरीकरण टाळ्यांच्या कडकडाटाशिवाय संपलं नाही आणि अंगावर काटा यावेत असे अनेक क्षण कार्यक्रमात येतात. 

अमर ओक यांना अनेक वेळा टीव्ही वर बघितलं आहे. प्रत्यक्ष पहिल्यांदाच ऐकलं. आपल्या वाद्याचा आब राखत, आदर ठेवत ज्या वेगवेगळ्या गाण्याच्या धून त्यांनी बासरीद्वारे ऐकवल्या त्या केवळ लाजवाब. सगळ्यात कहर केला जेव्हा त्यांनी "युवती मना" जेव्हा सादर केलं. शब्द तर कळत होतेच पण अनेक ठिकाणी मधल्या जागा सुद्धा त्यांनी अशा नजाकतीने पेश केल्या की क्या बात है. असे विस्मयचकित करणारे अनेक क्षण आपल्या जादुई कलेतून देत राहतात. 

बाकी वैभव जोशींबद्दल मी काय लिहावं? शब्द तर त्यांना वश आहेतच पण त्यामागचा भाव जेव्हा ते उलगडून सांगतात, त्यामागच्या विचारधारे बद्दल सांगतात, तेव्हा ती कविता आपल्यात भिनत जाते. वैभव स्वतःच्या च नव्हे तर इतर कवींच्या कवितेबद्दल फार आत्मियतेने बोलतात हे सुद्धा कार्यक्रमात ओघाने येतं, तेव्हा आपल्याला कळतंच. (कधी वेळ झाला तर त्यांचा स्पृहा जोशी बरोबरचा एक व्हिडिओ आहे, बालकवींची औदुंबर कविता समजावून सांगताना. कमाल आहे). 

या निरुपणाचं महत्व कळतं ते भरतीचा माज नाय आणि ओहटीची लाज नाय हे ऐकताना. या कवितेचा इतका भडिमार झाला आहे की ती ऐकताना आता बोअर होईल की काय अशी शंका येते. पण वैभव त्या मागचा भाव सांगतात आणि ती मग आपल्याला नव्याने कळत जाते. पुरिया धन "श्री" ओक सादर करतात आणि त्याला जोडून वैभव मग सौ रागाची जेव्हा "आज कुठली भाजी आहे" वर गाडी नेतात तेव्हा बहार येते. मनाला उभारी देणारी "उजाडलेला दिवस पहिला, याहून मोठे सुख ते काय" याद्वारे अंतर्मुख करून जातात.  बरं ते सगळं सादर करताना कधी तात्विक वाटतं तर कधी सात्विक वाटतं. 

या दोघांशिवाय चार वादक आहेत. तबला, ढोलकी, ऑक्टपॅड आणि की बोर्ड. 

Saturday, 25 October 2025

स्पार्क

काल जे एन इ सी, छत्रपती संभाजीनगर इथे झालेलं भाषण अनेक अर्थाने लक्षात राहील. 

ज्या हॉल मध्ये भाषण झालं ते रुक्मिणी सभागृह, माझ्या मते मी आतापर्यंत जिथे भाषणं दिली, त्यापैकी सगळ्यात भव्यदिव्य आणि नेत्रदीपक सभागृह होतं. तिथली लाईट आणि साउंड सिस्टम, सीटिंग अरेंजमेंट, व्यासपीठाची साईझ हे एकूणच अव्वल दर्जाचं. 

त्या "स्पार्क" कार्यक्रमाची मॅनेजमेंट सुद्धा वाखाणण्याजोगी. अनेक कॉलेजेस मध्ये अशा कार्यक्रमाला मुलं मुली गोळा करण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ करावी लागते. पण इथं दिसत होतं की कार्यक्रमासाठी आधी रजिस्ट्रेशन प्रोसेस केली होती आणि त्यानुसार मुलं मुली हजर होती. अनेक ठिकाणी कार्यक्रमाला दिलेली वेळ आणि सुरु होण्याची वेळ यात कमालीची तफावत असते. काल मात्र साडेदहा ची दिलेली वेळ बरोबर पाळली गेली. अँकर्स ने पूर्ण तयारी केली होती. त्यांनी बोलायचं कसं, चालायचं कसं यात कमालीची प्रोफिशियंसी दिसत होती. अतिशय थोडक्यात ओळख करून देऊन, इतर नेहमीच्या बोरिंग सोपस्कारांना टाळत मला बसल्यापासून पुढील पाच मिनिटात स्टेज वर बोलावलं सुद्धा. आणि सरते शेवटी कार्यक्रमाची संपण्याची वेळ बारा होती, त्या वेळेला बरोबर कार्यक्रम संपला. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलामुलींनी विचारलेले प्रश्न. अनेक कॉलेजेस मध्ये मुलं मुली प्रश्नच विचारत नाहीत, कारण बहुधा त्यांना जबरदस्तीने तिथे बसवलं असतं. पण इथे मी प्रश्न विचारा असं आवाहन केल्या केल्या दोन हात वर गेले होते. (याची कल्पना मला प्रो पवार यांनी दिली होती). पहिला प्रश्न मला इथे सांगावासा वाटतो 

"तुम्ही कॉलेज मध्ये स्टुडंट म्हणून कसे होता?" कदाचित हा प्रश्न मला याआधी कधीही विचारला गेला नव्हता. यावरून तुम्हाला कल्पना येईल की नंतरच्या आठ दहा प्रश्नाची लेव्हल किती चांगली होती ते. 

सगळ्यात शेवटी सांगावंसं वाटतं की महात्मा गांधी मिशनने उभे केलेल्या या विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कमालीचं सुबक आणि सर्वांगीण विचार केलेलं जाणवतं. त्या परिसरात वावरताना ज्या पॉझिटिव्ह वाईब्ज चा आपण नेहमी उल्लेख करतो, तिचा ठायी ठायी अनुभव येतो. तिथले विद्यार्थी/विधार्थिनी आणि प्रोफेसर्स हे जेव्हा त्यांच्या डिपार्टमेंट ची माहिती सांगतात, तेव्हा त्यांच्या आवाजातील अभिमान आणि चमक ही जाणवत राहते. इंजिनियरिंग डिपार्टमेंट मध्ये त्यांनी मशिन्स, रोबोट्स, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इ व्ही यांच्या मॉडेल्स वर चांगलीच इन्व्हेस्टमेंट केली आहे. लॅब अद्यावत आहेत. आणि याबरोबरच स्विमिंग पूल, स्टेडियम, काही मोठा कर्यक्रम झाला तर डेलिगेट्स च्या राहण्यासाठी सुविधा यावर विचारपूर्वक डेव्हलपमेंट केली आहे. 

ज्या शहरात माझा डिप्लोमा झाला, त्याच शहरात इंजिनियरिंग कॉलेजमधील दुसरं भाषण. पहिलं इन्फॉर्मल पद्धतीने झालं होतं. पण कालच्या जे एन इ सी च्या "स्पार्क" कार्यक्रमामुळे मनात एक वेगळाच वरचा बेंचमार्क तयार केला आहे. यापुढे अशा कारणासाठी जेव्हा कधी बोलावणं येईल तेव्हा त्याची तुलना कालच्या स्पार्क कार्यक्रमाशी केली जाईल हे नक्की. 

ज्यांनी मला या कार्यक्रमात आमंत्रित केलं ते जे एन इ सी चे श्री पवार सर, प्रिन्सिपल डॉ मुसंदे मॅडम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या स्टुडंट असोसिएशन ने हा कार्यक्रम इतक्या नेटक्या पद्धतीने मॅनेज केला  त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. 

Tuesday, 14 October 2025

कॉलेज ब्रँडिंग

व्यवसाय सुरू करून दहा बारा वर्षे झाली होती. सेटको बरोबर सामंजस्य करार पण झाला होता. त्या काळात कुठल्याही बिझिनेस ओनर्स च्या मिटिंग ला गेलो की आमचं एक आवडतं डिस्कशन असायचं आणि ते म्हणजे माणसं मिळत नाहीत. शिक्षणाचा घसरलेला दर्जा, इंजिनियर्स लोकांना काहीच कसं येत नाही, आय टी इंडस्ट्री ने कसं आपले लोक पळवले वगैरे. तास दीड तास या विषयावर कीस पाडला की आमच्या जीवाला बरं वाटायचं. 

काही काळाने मला त्या चर्चेचा वीट आला आणि मी या प्रश्नाला काही वेगळं उत्तर आहे का यावर विचार करू लागलो. त्याच सुमारास आर सी पी आय टी शिरपूर चे प्राचार्य जयंतराव पाटील यांनी मला त्यांच्या कॉलेज मध्ये भाषणासाठी निमंत्रित केलं. ते आणि पुढची अजून एक दोन भाषणं झाल्यावर मला हे जाणवलं की एकुणात मेकॅनिकल इंडस्ट्री बद्दल मुलामुलींच्या मनात अनेक गैरसमज होते. तिथे करिअर ग्रोथ च्या संधी आहेत की नाही याबद्दल शंका होत्या. त्यातही एम एस एम इ च्या बद्दल अढी च होती म्हणा ना. याला कारण इंडस्ट्री ची संकुचित ध्येय धोरणे पण होती. 

मी माझ्या कंपनी पुरता हा प्रश्न सोडवायचा ठरवलं. कुठल्याही कॉलेज मधून बोलण्यासाठी निमंत्रण आलं तर ते नाकारायचं नाही. त्यामध्ये दोन उद्देश होते. एक सेटको च नाव इंजिनियर्स लोकांना त्यांच्या कॉलेज च्या दिवसापासून माहीत व्हावं आणि दुसरं म्हणजे या फिल्ड मध्ये काय संधी आहेत आणि कसं कोअर ला चिकटून राहिलं तर लॉंग टर्म करिअर ग्रोथ प्लॅन करता येईल. 

२०२० मध्ये कोविड आला. त्यानंतर मात्र हे कॉलेज मध्ये जाऊन बोलण्याचा धडाका लावला. उत्पादन क्षेत्र वेगाने वाढणार याचे संकेत होते. आमचा नवीन एच आर हेड मयूर जॉईन झाला. त्याला मी एकच सांगितलं "I want to change problem of scarcity of manpower to problem of abundance". 

डिजिटल मार्केटिंग, लिंक्ड इन ऍड, मॅन पॉवर एजन्सी, आणि कॉलेजेस मधून केलेलं ब्रँडिंग या सगळ्या फ्रंट वर काम केल्यावर आता परिस्थिती अशी आहे की बिझिनेस मिटिंग मध्ये माणसं मिळत नाही हा मुद्दा चर्चेला आला की मी गप्प होतो. आणि एके काळी अप्रसिद्ध असणाऱ्या कॉलेज मधून लोक घेऊन समाधान मानणाऱ्या सेटको मध्ये आज चांगल्या कॉलेजेस मधली मुलं मुली इंटर्नशिप करतात, जॉब साठी अप्लाय करतात. 

तर सांगायचं हे आहे की कॉलेज मध्ये जाऊन भाषण देणे हे माझं व्यावसायिक धोरण आहे. त्यांनी बोलावणं आणि मला ऐकणं ही त्यांची गरज नाही आहे तर मी तिथं जाणं आणि माझे विचार त्यांना ऐकवणे ही माझी, व्यवसायाची गरज आहे. ज्या असोशीने मी कस्टमर कडे ऑर्डर मागायला जातो त्याच भावनेने मी कॉलेजेस मध्ये पण जातो. त्यातून काल कॉमेंट मध्ये काही मित्रांनी लिहिलं की मी पुढची घडवतो आहे. खरंतर असं जर काही होत असेल तर तो माझ्यासाठी हा स्वार्थ साधून परमार्थ आहे. 

माझ्याकडे दोन चॉइसेस होते. एक, प्रचलित पद्धतीप्रमाणे माणसं मिळत नाही या प्रश्नाबद्दल चर्चेचं दळण दळायचं किंवा काहीतरी वेगळा मार्ग निवडून यावर उपाय शोधायचा. 

मी दुसरा चॉईस निवडला. आहे हे सगळं असं आहे. 

Monday, 6 October 2025

सातत्य

जे एन इ सी मध्ये एका मुलाने प्रश्न विचारला "डिप्लोमा करून इंजिनियरिंग करतो आहे. पण जे विचारांमध्ये सातत्य नाही आहे. काय करू?" प्रश्न साधाच होता पण महत्वाचा होता. 

मला असं वाटतं मुलामुलींपेक्षा, बदललेली परिस्थिती असं होण्याला जास्त कारणीभूत आहे. म्हणजे मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा डोक्यात एकच गोष्ट फिट होती ती म्हणजे कुठल्या तरी इंजिनियरिंग क्षेत्रातील कंपनीत जॉब ला लागणे. या बेसिक गोलपासून दूर करण्यासाठी कुठलेही एलिमेंट्स कार्यरत नव्हते. ना मोबाईल नव्हते, ना मॉल होते, ना ओटीटी प्लॅटफॉर्म होते, ना टीव्ही होते, ना सोशल मीडिया होता. यु ट्यूब नव्हतं, पॉडकास्ट नव्हतं. हे हात जॉब करण्यासाठी नव्हे तर जॉब देण्यासाठी जन्माला आलेले आहेत अशी आवेशपूर्ण भाषणं देणारी विवेक बिंद्रा सारखे लोक नव्हते. इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून वडापाव ची गाडी टाकणारे लोक नव्हते किंवा एमबीए चहावाला नव्हता. 

याउपर क्षेत्र पण फिक्स. मेकॅनिकल इंजिनियर झाला की ऑटो किंवा त्याचे पार्टस बनवणारी कंपनी, मेकॅनिकल पार्टस किंवा प्रोजेक्ट्स करणारी कंपनी आणि तत्सम. बाकी ब्रांचेस पण हीच तऱ्हा. 

मग दिवस बदलत गेले. सगळ्या इंजिनियर्स ला सामावून घेणारे आय टी क्षेत्र आलं, माहितीचा प्रचंड फ्लो चालू झाला. इन्फोडेमिक आलं. अनेक सुविचार, कोट्स यांचा भडिमार युवा तरुणांवर व्हायला लागला. सरधोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळं करायचं अशा संधी आल्या खऱ्या पण त्या युवकाने विचारलं तसं कन्फ्युजन पण वाढलं. 

यावर उपाय काय? आहे सोपा पण इम्प्लिमेंट करायला तितकाच अवघड. 

गोल, फोकस, सिद्धांत, पर्पज हे एकेकाळी फक्त मॅनेजमेंट जार्गन्स होते. कधी नव्हे ते वैयक्तिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं झालं आहे. "मेडिटेशन वगैरे आपल्यासारख्या नॉर्मल लोकांसाठी नाही रे. मोठ्या लोकांचे चोचले आहेत" ही विचारधारा  सोडून द्यायला हवी. व्यायामाचा उद्देश हा  स्वतःला फिजिकली फिट ठेवणे तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त मेंटली फिट हा आहे हे लक्षात ठेवण्याची निकड निर्माण झाली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे २००० च्या आधी रस्ता एकच असायचा. आता अनेक आहेत. कुठला घ्यायचा यावर साधकबाधक विचार करून निर्णय घेणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी आपलं स्वतःबद्दल चं अंडरस्टँडिंग वाढवणं महत्वाचं झालं आहे. तुम्ही कसे आहात आणि काय करायला पाहिजे हे सांगणारे बाहेर अनेक आवाज तुमच्या कानावर आदळत राहतील. कधी नव्हे ते मनाच्या आवाजाला प्रथम प्रायोरिटी देण्याची गरज निर्माण  झाली आहे. उपलब्ध असलेल्या साऱ्या संधींना नॅरो डाऊन करत दोन तीन मार्ग शोधणे, त्या मार्गावर चालण्यासाठी काय स्किल सेट्स लागणार त्याची माहिती घेऊन ते अक्वायर करणे आणि मुख्य म्हणजे आजूबाजूला काय चालू आहे ते बघून विचलित न होता, जे ठरवलं त्याकडे शांतपणे मार्गक्रमण करणे यात शहाणपण आहे, असं माझं मत आहे. जुन्या काळातील छान इंग्लिश वाक्य आहे "A bird in hand is better then two in bush" हे फॉलो करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

म्हणून म्हंटलं सुरुवातीला की प्रश्न साधा आहे पण महत्वाचा आहे. आजूबाजूला कोलाहल खूप आहे. त्यामध्ये राहून स्वतःच अस्तित्व हरवू न देण्याचं अवघड काम तरुणाईच्या खांदयावर आलं आहे. 

त्या युवकाला थोडक्यात उत्तर दिलं होतं, त्याचा विस्तार झाला तो असा. 

दसरा मेळाव्याची थोडी भाषणं ऐकली. डोक्याची मंडई झाली. कारण त्याच दिवशी आपलं घरच्या गाड्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पोहोचल्या होत्या. आणि तिथली विदारक परिस्थितीची जाणीव फोटो आणि व्हिडीओ बघून होत होती. मनात विचार आला आमच्यासारख्या साध्या लोकांना अशा बिकट प्रसंगी काय करायचं ते सुचतं, मित्रपरिवार आवाहन केल्या केल्या भरभरून मदत करत होता, स्वयंसेवक, डॉक्टर्स, परिचारक आणि परिचारिका दसऱ्याच्या दिवशी घर सोडून पूरग्रस्त विभागात जायला तयार झाले होते. आणि राज्याचे शासक अन त्यांचे विरोधक  मात्र मेळावे करण्यात आणि त्याहून वाईट म्हणजे एकमेकांना शिव्या देण्यात मश्गुल होते. 

परवा छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला येत होतो. तेव्हा लक्षात आलं की नेवासा ते अहिल्यानगर एंट्री या ७५ किमी अंतरात रस्ताच उरला नाही आहे. या खड्डेयुक्त रस्त्यावरून गाडी चालवत असताना मनात आलं की तीन महत्वाची औद्योगिक शहरं जोडणारा हा रस्ता. आपण काय इफिशियंसी किंवा प्रॉडक्टिव्हिटी बद्दल बोलणार? संभाजीनगर ते पुणे या २३० किमी च्या प्रवासाला साडे सहा तास लागले. कारचा सरासरी स्पीड झाला ३५ किमी प्रति तास. म्हणजे मालवाहतूक करणारे ट्रक्स तर प्रवास करतील २० किमी प्रति तास. त्याशिवाय ट्रक्सच्या ऍक्सल चा, शॉक ऍब्स चा बल्ल्या वाजणार तो वेगळाच. (कारला थोडी तरी जागा होती, डिव्हायडर ला चिटकून कार चालवली तर ५० किमी बरी चालली. अर्थात २५ किमी ५ किमी प्रति तास अशी चालवल्यावर बाकी पार्ट्सला धोका कमी). 

चार वाजता संभाजीनगर हून निघाल्यावर साडेसात ला अहिल्यानगर आणि नंतर रात्री साडे दहाला घरी पोहोचलो.  झोपताना मी हाच विचार करत होतो, की का इतकी वर्षे झाली पण रस्ता या महत्वाच्या विषयावर आपण सगळे इतके निरिच्छ का झालो आहोत? का छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकांनी आंदोलनं करून रस्ते सुधरवले तसे इतर ठिकाणी होत नाही? 

डोक्यात विषयाची गर्दी झाली होती. एक दिवस आधीची राजकारणी लोकांची भाषा आणि दुसऱ्याच दिवशी अनुभवलेली पुणे-छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याची झालेली वाईट हालत. 

तितक्यात आठवलं की छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन गावांच्या मध्ये एक इमामपूर म्हणून खेडं लागलं होतं. विचार केला हा रस्ता व्हायचा तेव्हा होईल. उत्पादकता आणि इफिशियंसी या विषयावर बाकी देशातील लोक माझ्या देशातील लोकांना खिजवतात ते सहनही करू. पण हे इमामपूर गावाचं नाव बदलायला हवं. रस्ता चांगला होण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. आणि अतिशय महत्वाचा विषय माझ्या डोक्यात आला याबद्दल मी मलाच शाबासकी दिली. डोक्यातले विचार शांत झाले. मी निवांत झोपी गेलो. 

Saturday, 4 October 2025

गुणवत्ता

मध्ये मी टाटांच्या कार वर निगेटिव्ह कॉमेंट केली म्हणून मला मेसेज आला की "इतर वेळेस टाटा ग्रुपचं गुणगान गाता, मग कार बद्दल हे मत का?" त्यांना काय उत्तर दिलं ते जाऊ द्या पण एखाद्या प्रॉडक्टची स्वीकारार्हते साठी त्याची गुणवत्ता हा पहिल्या क्रमांकाचा गुण लागतो हे मी अनुभवावरून सांगतो. आणि दुसरा गुण लागतो, उच्च दर्जाची सेल्स आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस.

एक गोष्ट सांगतो. आमच्या फिल्ड मध्ये एक सी एम एम नावाचं हाय एन्ड मेट्रोलॉजी इक्विपमेंट लागतं. कार्ल झाईस किंवा हेक्झॉगोन नावाच्या बाहेरच्या प्रॉडक्ट ने मार्केट कवेत घेतलं आहे. त्यामुळे माझे अमेरिकन पार्टनर्स च नव्हे तर माझा क्वालिटी मॅनेजर सुद्धा इंपोर्टेड मशीन विकत घ्यावी या मताचा होता. पण मी मात्र पुणे स्थित ऍक्युरेट गेजिंग म्हणून विक्रम साळुंखे यांची कंपनी आहे, तिच्या पारड्यात वजन टाकलं. कारण मला खात्री होती की ती मशीन आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची आहे. आज ऍक्युरेट ची मशीन गेली दोन वर्षे उत्कृष्ट काम करत आहे.  मेक इन इंडिया विथ ग्लोबल क्वालिटी. 

टाटा ग्रुप च्या टीसीएस ने आमच्या सारख्या छोट्या कंपनीसाठी इऑन नावाची इ आर पी सिस्टम काढली. आम्ही ती वापरली. चांगली क्वालिटी आणि तितक्याच तोडीची सर्व्हिस. आम्ही काही तिकीट रेझ केलं की पटापट सूत्र हलायची आणि प्रश्न सोडवला जायचा. (काही वेगळ्या कारणांमुळे आम्ही दोन वर्षांपूर्वी इऑन वरून दुसऱ्या इ आर पी वर शिफ्ट झालो आहोत)



तर मत असं आहे की मेक इन इंडिया हा ड्राइव्ह छान आहेच. पण ते प्रॉडक्ट विकण्यासाठी, लोकप्रिय होण्यासाठी फक्त तोच निकष नसून गुणवत्ता आणि विक्रीपश्चात उत्तम सेवा हे दोन महत्वाचे निकष आहेत.