Friday, 31 October 2025
Saturday, 25 October 2025
स्पार्क
काल जे एन इ सी, छत्रपती संभाजीनगर इथे झालेलं भाषण अनेक अर्थाने लक्षात राहील.
ज्या हॉल मध्ये भाषण झालं ते रुक्मिणी सभागृह, माझ्या मते मी आतापर्यंत जिथे भाषणं दिली, त्यापैकी सगळ्यात भव्यदिव्य आणि नेत्रदीपक सभागृह होतं. तिथली लाईट आणि साउंड सिस्टम, सीटिंग अरेंजमेंट, व्यासपीठाची साईझ हे एकूणच अव्वल दर्जाचं.
त्या "स्पार्क" कार्यक्रमाची मॅनेजमेंट सुद्धा वाखाणण्याजोगी. अनेक कॉलेजेस मध्ये अशा कार्यक्रमाला मुलं मुली गोळा करण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ करावी लागते. पण इथं दिसत होतं की कार्यक्रमासाठी आधी रजिस्ट्रेशन प्रोसेस केली होती आणि त्यानुसार मुलं मुली हजर होती. अनेक ठिकाणी कार्यक्रमाला दिलेली वेळ आणि सुरु होण्याची वेळ यात कमालीची तफावत असते. काल मात्र साडेदहा ची दिलेली वेळ बरोबर पाळली गेली. अँकर्स ने पूर्ण तयारी केली होती. त्यांनी बोलायचं कसं, चालायचं कसं यात कमालीची प्रोफिशियंसी दिसत होती. अतिशय थोडक्यात ओळख करून देऊन, इतर नेहमीच्या बोरिंग सोपस्कारांना टाळत मला बसल्यापासून पुढील पाच मिनिटात स्टेज वर बोलावलं सुद्धा. आणि सरते शेवटी कार्यक्रमाची संपण्याची वेळ बारा होती, त्या वेळेला बरोबर कार्यक्रम संपला.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलामुलींनी विचारलेले प्रश्न. अनेक कॉलेजेस मध्ये मुलं मुली प्रश्नच विचारत नाहीत, कारण बहुधा त्यांना जबरदस्तीने तिथे बसवलं असतं. पण इथे मी प्रश्न विचारा असं आवाहन केल्या केल्या दोन हात वर गेले होते. (याची कल्पना मला प्रो पवार यांनी दिली होती). पहिला प्रश्न मला इथे सांगावासा वाटतो
"तुम्ही कॉलेज मध्ये स्टुडंट म्हणून कसे होता?" कदाचित हा प्रश्न मला याआधी कधीही विचारला गेला नव्हता. यावरून तुम्हाला कल्पना येईल की नंतरच्या आठ दहा प्रश्नाची लेव्हल किती चांगली होती ते.
सगळ्यात शेवटी सांगावंसं वाटतं की महात्मा गांधी मिशनने उभे केलेल्या या विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कमालीचं सुबक आणि सर्वांगीण विचार केलेलं जाणवतं. त्या परिसरात वावरताना ज्या पॉझिटिव्ह वाईब्ज चा आपण नेहमी उल्लेख करतो, तिचा ठायी ठायी अनुभव येतो. तिथले विद्यार्थी/विधार्थिनी आणि प्रोफेसर्स हे जेव्हा त्यांच्या डिपार्टमेंट ची माहिती सांगतात, तेव्हा त्यांच्या आवाजातील अभिमान आणि चमक ही जाणवत राहते. इंजिनियरिंग डिपार्टमेंट मध्ये त्यांनी मशिन्स, रोबोट्स, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इ व्ही यांच्या मॉडेल्स वर चांगलीच इन्व्हेस्टमेंट केली आहे. लॅब अद्यावत आहेत. आणि याबरोबरच स्विमिंग पूल, स्टेडियम, काही मोठा कर्यक्रम झाला तर डेलिगेट्स च्या राहण्यासाठी सुविधा यावर विचारपूर्वक डेव्हलपमेंट केली आहे.
ज्या शहरात माझा डिप्लोमा झाला, त्याच शहरात इंजिनियरिंग कॉलेजमधील दुसरं भाषण. पहिलं इन्फॉर्मल पद्धतीने झालं होतं. पण कालच्या जे एन इ सी च्या "स्पार्क" कार्यक्रमामुळे मनात एक वेगळाच वरचा बेंचमार्क तयार केला आहे. यापुढे अशा कारणासाठी जेव्हा कधी बोलावणं येईल तेव्हा त्याची तुलना कालच्या स्पार्क कार्यक्रमाशी केली जाईल हे नक्की.
ज्यांनी मला या कार्यक्रमात आमंत्रित केलं ते जे एन इ सी चे श्री पवार सर, प्रिन्सिपल डॉ मुसंदे मॅडम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या स्टुडंट असोसिएशन ने हा कार्यक्रम इतक्या नेटक्या पद्धतीने मॅनेज केला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
Tuesday, 14 October 2025
कॉलेज ब्रँडिंग
Monday, 6 October 2025
सातत्य
दसरा मेळाव्याची थोडी भाषणं ऐकली. डोक्याची मंडई झाली. कारण त्याच दिवशी आपलं घरच्या गाड्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पोहोचल्या होत्या. आणि तिथली विदारक परिस्थितीची जाणीव फोटो आणि व्हिडीओ बघून होत होती. मनात विचार आला आमच्यासारख्या साध्या लोकांना अशा बिकट प्रसंगी काय करायचं ते सुचतं, मित्रपरिवार आवाहन केल्या केल्या भरभरून मदत करत होता, स्वयंसेवक, डॉक्टर्स, परिचारक आणि परिचारिका दसऱ्याच्या दिवशी घर सोडून पूरग्रस्त विभागात जायला तयार झाले होते. आणि राज्याचे शासक अन त्यांचे विरोधक मात्र मेळावे करण्यात आणि त्याहून वाईट म्हणजे एकमेकांना शिव्या देण्यात मश्गुल होते.
परवा छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला येत होतो. तेव्हा लक्षात आलं की नेवासा ते अहिल्यानगर एंट्री या ७५ किमी अंतरात रस्ताच उरला नाही आहे. या खड्डेयुक्त रस्त्यावरून गाडी चालवत असताना मनात आलं की तीन महत्वाची औद्योगिक शहरं जोडणारा हा रस्ता. आपण काय इफिशियंसी किंवा प्रॉडक्टिव्हिटी बद्दल बोलणार? संभाजीनगर ते पुणे या २३० किमी च्या प्रवासाला साडे सहा तास लागले. कारचा सरासरी स्पीड झाला ३५ किमी प्रति तास. म्हणजे मालवाहतूक करणारे ट्रक्स तर प्रवास करतील २० किमी प्रति तास. त्याशिवाय ट्रक्सच्या ऍक्सल चा, शॉक ऍब्स चा बल्ल्या वाजणार तो वेगळाच. (कारला थोडी तरी जागा होती, डिव्हायडर ला चिटकून कार चालवली तर ५० किमी बरी चालली. अर्थात २५ किमी ५ किमी प्रति तास अशी चालवल्यावर बाकी पार्ट्सला धोका कमी).
चार वाजता संभाजीनगर हून निघाल्यावर साडेसात ला अहिल्यानगर आणि नंतर रात्री साडे दहाला घरी पोहोचलो. झोपताना मी हाच विचार करत होतो, की का इतकी वर्षे झाली पण रस्ता या महत्वाच्या विषयावर आपण सगळे इतके निरिच्छ का झालो आहोत? का छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकांनी आंदोलनं करून रस्ते सुधरवले तसे इतर ठिकाणी होत नाही?
डोक्यात विषयाची गर्दी झाली होती. एक दिवस आधीची राजकारणी लोकांची भाषा आणि दुसऱ्याच दिवशी अनुभवलेली पुणे-छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याची झालेली वाईट हालत.
तितक्यात आठवलं की छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन गावांच्या मध्ये एक इमामपूर म्हणून खेडं लागलं होतं. विचार केला हा रस्ता व्हायचा तेव्हा होईल. उत्पादकता आणि इफिशियंसी या विषयावर बाकी देशातील लोक माझ्या देशातील लोकांना खिजवतात ते सहनही करू. पण हे इमामपूर गावाचं नाव बदलायला हवं. रस्ता चांगला होण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. आणि अतिशय महत्वाचा विषय माझ्या डोक्यात आला याबद्दल मी मलाच शाबासकी दिली. डोक्यातले विचार शांत झाले. मी निवांत झोपी गेलो.