Monday, 10 November 2025

विवादास्पद

या सगळ्या पोस्टच्या धबडग्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते आहे. 

देशाची आर्थिक उन्नती होत असताना बऱ्याच मित्रांचा असा आग्रह असतो की आपलं सोशल फॅब्रिक पण अजिबात उसवलेलं नाही आहे असं मानावं. 

याउलट काहींना वाटतं की आपली सामाजिक वीण उसवलेली आहे तर मग या आर्थिक बाबी सुधारत आहेत तर त्याचं काय कौतुक?

मग परिस्थिती काय आहे? अर्थात हे माझं मत आहे. पण लिहायचा प्रयत्न करतो. 

मी परवाच्या पोस्टवर एक वाक्य लिहिलं की "विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही", त्यात विवादास्पद या शब्दावर एका जवळच्या मित्राने आक्षेप घेतला. त्यावर मी काही मत व्यक्त करतो. 

पहिल्यांदा पॉझिटिव्ह गोष्टी बघू यात. तर आजच्या घडीला भारत हे लोकशाही असलेलं जगातील सगळ्यात मोठं राष्ट्र आहे. तब्बल ९० कोटी मतदार मतदान करत असतात. १९५१ पासून देशात रक्तविहीन निवडणुका पार पडत असतात. सर्व जातीचे, धर्माचे, भाषिक लोक मतदान करत असतात. 

पण एक म्हणावं वाटतं की प्रगल्भ लोकशाही म्हणजे फक्त दर पाच वर्षांनी काहीही हल्लागुल्ला न होता निवडणुका होणे इथपर्यंत मर्यादित नाही आहे तर त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट सिस्टम मधली पारदर्शकता, कामाप्रती असलेलं उत्तरदायित्व, काही महत्वाच्या संस्थांना असणारी स्वायत्तता या निकषावर आपल्या इथे, त्यातही महाराष्ट्रात आनंदी आनंद आहे. मतदारांना गृहीत धरून आपले विरोधी पक्ष फोडणे, त्यातील न्यायिक प्रक्रियेबद्दल वेळकाढू धोरण ठेवून संस्थापकांकडून नाव, निवडणूक चिन्ह ओरबाडून घेणे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एकेकाळी घणाघाती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकार स्थापन करणे, केवळ पक्षबदल केला म्हणून इ डी च्या चौकशा बंद करणे, रस्ता, वीज, पाणी हे महत्वाचे प्रश्न लोकांनी विचारूच नये म्हणून समाजाला धार्मिक आणि जातीय लढतीत झुंजवत ठेवणे, आर्थिक प्रगती ज्या इंडस्ट्री मुळे होते असे प्रकल्प आपल्या नाकाखालून दुसरे राज्य घेऊन जातात त्याकडे कानाडोळा करणे, शिवराळ भाषेत मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांना घालून पडून बोलणे म्हणजे खूप मोठा पुरुषार्थ ही लोकशाही ची लक्षणं म्हणत असतील तर मग बोलणंच खुंटलं. 

अनेक राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते हे की पोझिशन्स ला आल्यावर करोडो रुपयाच्या संपत्तीचे मालक होतात, ते कसे होतात असा कुठला उद्योग असतो की त्यांच्या इतक्या जमिनी, बंगले, गाड्या होतात याबद्दल ना कुणी प्रश्न विचारायचे नाही आणि विचारले तर त्याला असं कचाट्यात पकडायचं की त्याने परत आवाजच केला नाही पाहिजे. 

मीडियावर पूर्ण कब्जा करून टाकायचा. असे नॅरेटिव्ह पसरवायचे की सरकारच्या धोरणांची फक्त स्तुती आणि स्तुतीच झाली पाहिजे. 

ज्यांनी म्हणून विरोध केला त्यांना वेगवगेळी प्रलोभनं दाखवून सरकारच्या जागांवर बसवून देऊन त्यांचे आवाज बंद करणे हे तर अगदी सर्रास घडतं आहे. 

ही सगळी विवादास्पद लक्षणं नव्हेत काय?

भारतातील लोकशाही रुजलेली आहे पण ती प्रगल्भ झालेली नाही आहे. ती केऑटिक आहे आणि मॅच्युरिटी पासून तर खूप लांब आहे. हे खरं आहे की जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे कारण एक सशक्त संविधान आपल्या हातात आहे. पण तरीही समानता, निवडणूक आयोग/इ डी/सी आय डी सारख्या अनेक संस्थांची स्वायत्तता, आणि नागरी संस्कृती ही अजून शंकास्पद परिस्थितीत आहे हे ही तितकंच खरं आहे. लॉ आणि ऑर्डर चा बोजवारा उडालेला आपल्याला ठायी ठायी दिसतो. अगदी ट्राफिक मॅनेजमेंट पासून ते अगदी घृणास्पद गुन्हे करणारे इकडे तिकडे मोकाट फिरताना दिसतात. 

असो. आणि सोशल मीडियावर ही परिस्थिती आहे. विरोध दर्शवणारा "विवादास्पद" हा इतका माईल्ड शब्दही लोकांना सहन होत नाही, आणि मी जो राजकीय विषय लिहायचं टाळतो त्याला मत देण्याविषयी उद्युक्त करायचं आणि मग बडवत बसायचं हा पण एक नवीन ट्रेंड दिसतो आहे. 

थांबतो. 

Saturday, 8 November 2025

काही वर्षांपूर्वी मीच एक पोस्ट टाकली होती की चीन उत्पादनावर बहिष्कार टाकून काहीच साध्य होणार नाही आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर कंबर कसून कामाला लागण्यात शहाणपण आहे. त्याला अजून एक पार्श्वभूमी अशी होती की भारतातील दोन मोबाईल फोन उत्पादक, कार्बन आणि मायक्रोमॅक्स, हे सपशेल अपयशी ठरले होते. 

त्यांनतर अनेक घडामोडी घडल्या. कोविड आलं. कोविड मुळे चीनने जगाचा उत्पादक ही आपली विश्वासार्हता पूर्ण गमावली. त्यात भरीस भर म्हणून की काय पण अमेरिका आणि चीन मध्ये आता पराकोटीला पोहोचलेलं ट्रेड वॉर तेव्हा सुरू झालं. सेमी कंडक्टर ची सप्लाय चेन रोखून चीनमुळे अभूतपूर्व गोंधळ झाला. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकाच नव्हे तर जगातल्या ज्या देशांनी चीनमध्ये प्लांट उभे केले होते, त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. दक्षिण पूर्व आशियात असलेल्या कमी लेबर कॉस्ट मुळे तिथलेच देश उत्पादक शोधू लागले. 

या सर्व देशांमध्ये सशक्त पर्याय उभा राहिला तो म्हणजे भारत. होलसेल मध्ये उपलब्ध असणारं तरुण टॅलेंट पूल, इंग्रजी भाषेशी जवळीक, सॉफ्टवेअर इंडस्ट्री मुळे तयार झालेला ब्रिज, कितीही विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही यामुळे जगभरातील उत्पादक भारताचे दरवाजे ठोठावु लागले. . आपण सुद्धा प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह देत या हे दरवाजे उघडले. सर्वच क्षेत्रात गुंतवणूक आल्या पण या इंसेंटिव्ह चा सगळ्यात मोठा दावेदार ठरला तो मोबाईल उत्पादक. 

मोबाईल उत्पादनाने भारतातील केलेली नेत्रदीपक प्रगती अचंबित करणारी आहे. दक्षिण भारतातील चेन्नई, होसुर आणि बंगलोर हा पट्टा तर उत्तर भारतात नोएडा मध्ये आज जवळपास ३०० कंपन्या मोबाईल उत्पादन करत आहेत. याचा परिणाम असा झाला की आठ एक वर्षांपूर्वी प्रत्येक मोबाईल फोन आयात करणारा भारतीय ग्राहक आजच्या घडीला प्रत्येक मोबाईल फोन आपल्याच इथे उत्पादित केलेला वापरतो. 

यातील पुढची आकडेवारी तर डोळे दिपावणारी आहे. मोबाईल उत्पादनाची निर्यात गेल्या दहा वर्षात शंभर पट वाढली आहे. आजच्या मितीला भारत रु १.२ लाख करोड किमतीचे मोबाईल निर्यात करतो. अमेरिकेत आयात केले जाणारे स्मार्ट फोन भारतात सगळ्यात जास्त बनतात. इथे आपण चीनला मागे टाकलं आहे. आजवर या क्षेत्राने जवळपास १५ लाख डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट रोजगार निर्मिती केली आहे. 

आता कुणी म्हणेल की या सगळ्या उत्पादक कंपन्या बाहेरच्या देशातील आहेत. हे मान्य केलं तरी हे लक्षात ठेवायला हवं की एकदा तुम्ही इथल्या जमिनीवर उत्पादन चालू केलं की त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो तो त्या देशाच्या अर्थ व्यवस्थेला आणि इथल्या लोकांना. १९८३ मध्ये वसलेल्या मारुती सुझुकी चा सगळ्यात मोठा उत्पादक भारत आहे आणि त्यांचं वाहन क्षेत्रातील काँट्रिब्युशन हे वादातीत आहे.

मोबाईल पाठोपाठ आता सेमी कंडक्टर इंडस्ट्री गुंतवणूक घेऊन उभी आहे. मोबाईल इंडस्ट्री स्थिरस्थावर होईपर्यंत सेमी कंडक्टर इंडस्ट्री भरतीय उत्पादन क्षेत्रात हलचल निर्माण करणार आहे. 

मागील अडीच दशकं सर्व्हिस इंडस्ट्री ने गाजवल्यावर किमान पुढचे दशक उत्पादन क्षेत्र, त्यातही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गाजवणार अशी चिन्ह तरी सध्या दिसत आहेत. 

फरक

तीन अनुभव शेअर करतो. 
दोन महिन्यांपूर्वी वीस तास प्रवास करून त्या हॉटेल मध्ये गेलो. चेक इन करून रूम मध्ये गेलो तर रूम मध्ये पाणीच नव्हतं प्यायला. रिसेप्शन ला फोन करून सांगितलं तर हाऊस किपिंग ची मुलगी आली, जिला इंग्लिश कळत नव्हतं. शेवटी खाणाखुणा करून तिला सांगितलं की प्यायला पाणी नाही आहे. तिने दोन बॉटल आणून दिल्या. 

केस अशी होती की त्या गावातच प्लास्टिक बॅन होतं. म्हणून रूम मध्ये बॉटल न ठेवता त्यांनी एक काचेचा जग ठेवला होता. प्रत्येक फ्लोअर वर वॉटर डिस्पेन्सर होता. प्रत्येकाने जग मध्ये पाणी भरून आणायचा असा नियम होता. हे सगळं मला संध्याकाळी रिसेप्शन एका व्यवस्थित बाईने समजावून सांगितलं, जी बहुधा तिथली मॅनेजर असावी. मी तिला सांगितलं की एखादा प्रवासी वीस बावीस तास प्रवास करून रूम मध्ये पोहोचतो आणि त्याला प्यायला पाणी नसेल तर वाईट दिसतं. आणि तुमची ही सगळी प्रोसेस तुम्ही चेक इन वेळेस समजावून सांगू शकता, जी मला नव्हती सांगितली. तिने एका कागदावर लिहून घेतलं. 

दोन महिन्यांनी मी परत आता तिथे चेक इन केलं. ते करताना मी जो फीडबॅक दिला होता, त्याच पद्धतीने सांगितलं. 

ग्राहकाभिमुख म्हणजे काय आहे ते पहिल्यांदा अनुभवलं. कामाप्रति आस्था असेल की हे सगळे बदल जाणवतात. 

आता दुसरा अनुभव

मुंबई एअरपोर्ट वर फास्ट इमिग्रेशन ची सोय झाली आहे. त्याचं रजिस्ट्रेशन एका वेब साईट वर होतं. पण पहिल्यांदा बायोमेट्रिक्स करावं लागतं, मग तुम्ही ते वापरू शकता. मी वेब साईट चा सोपस्कार पूर्ण केला आणि मुंबई एअरपोर्ट वर बायोमेट्रिक्स करायला गेलो. तिथं टेबल वर कुणीच नव्हतं. इकडे तिकडे बघितल्यावर एका बिव्हीजी च्या बाईला विचारलं तर तिने दहा मीटर वर एक मोबाईल खेळत असलेल्या माणसाकडे बोट दाखवत सांगितलं की तो आहे. मी त्याच्या कडे गेलो तर "काय कटकट आहे" असा भाव चेहऱ्यावर भाव आणत तो माणूस म्हणाला "नही है क्या कोई, चलो देखते है" ते दहा मीटर तो माणूस अक्षरशः पाय खुरडत चालला.  इकडे तिकडे बघत म्हणाला "हा, बोलो क्या है?" 

म्हणजे तोच खुर्चीतला माणूस होता. त्याने फक्त ऍक्ट केला की कुणा दुसऱ्याचं काम आहे ते. चेहऱ्यावर हास्य नाही, पूर्ण अनास्था. इतकी की समोरच्याने म्हणावं "आज मूड नही है क्या साब, मै फिर कभी आता हूं"

एका प्रसिद्ध मोठ्या खाजगी बँकेतील बाई इन्व्हेस्टमेंट साठी मागे लागली. मी जेव्हा नकारात्मक प्रतिसाद देत होतो तेव्हा म्हणाली "सर, प्लिज घ्या ना स्कीम. नाहीतर माझा के आर ए खराब होईल" त्याच बँकेतील एक रिलेशनशिप मॅनेजर सर्व्हिस देत नव्हता म्हणून मी त्याला बदला म्हणून मी मेल पाठवली तर मॅनेजर चा पळत फोन आला "सर, असं नका करू. माझं प्रमोशन ड्यु आहे. तुमचा एक रिमार्क माझं प्रमोशन पुढं ढकलेल. 

अरे, म्हणजे तुम्ही क्लायंट साठी काम करता की तुमचा के आर ए मीट करण्यासाठी. जेव्हा ग्राहकाप्रति अनास्था दाखवता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रमोशन ची काळजी नसते.