Wednesday 12 June 2019

अझीम प्रेमजी

नुकतंच अझीम प्रेमजी विप्रो चेअरमन म्हणून निवृत्त होणार अशी बातमी वाचली. काही लोकांनी भारतीय उद्योगजगतावर आपली अमीट छाप सोडली आहे आणि त्यात अझीम प्रेमजी यांचं स्थान अगदी वरचं आहे हे निर्विवाद.

एकुणात विप्रोची कहाणी ही उद्योगजगतातील अजूबा आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. विप्रो चं मुख्य कार्यालय जरी कर्नाटकातील बंगलोर मध्ये असलं तरी विप्रोचा आणि महाराष्ट्राचा एक जवळचा संबंध आहे. विप्रो म्हणजे खरंतर वेस्टर्न इंडिया  व्हेजिटेबल प्रोडक्टस (Western  Indian vegetable Products) किंवा काही ठिकाणी त्याचा संदर्भ वेस्टर्न इंडिया पाम रिफाईंड ऑइल असा ही येतो. आणि सदर कंपनी चालू झाली होती ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या गावी. ही कंपनी चालू केली होती अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी म्हणजे मोहम्मद प्रेमजी यांनी १९४५ साली. सनफ्लॉवर ब्रँड खाली तेल बनवण्याची ही कंपनी होती. पुढे इथं मग तेलापासून बनवणारे साबणासारखे बाय प्रॉडक्टस बनू लागले. अगदी २०१२ पर्यंत सनफ्लॉवर ब्रँड हा विप्रो कडे होता. त्यामुळे कंपनीचा लोगो हा सूर्यफूल असाच होता. पण मग तो कारगिल नावाच्या एका अमेरिकन कंपनीला विकला. आज अमळनेर च्या फॅक्टरीत संतूर आणि शिकेकाई या साबणाचं उत्पादन होतं. अमळनेर गावामध्ये विप्रोचे शेअर्स घेऊन करोडपती झालेल्या अनेक कहाण्या आहेत.

अझीम प्रेमजी हे साठच्या दशकातील अमेरिकेतील स्टँनफोर्ड विद्यापीठाचे स्नातक. आज परदेशात जाऊन शिक्षण घेणं हे सोपं झालं असलं तरी त्या काळात हे दिव्य होतं. १९६६ साली जेव्हा त्यांचे वडील आजारी पडले तेव्हा मानसिक द्वंद्व झालं होतं. अमेरिकेचं सुखी आयुष्य जगायचं की भारतात परत यायचं. त्यावेळी २१ वर्षे वय असलेल्या अझीम प्रेमजी यांनी भारतात परत यायचा निर्णय घेतला. लौकिकार्थाने छोटा उद्योग चालवणं हे आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सुद्धा अवघड आहे. १९६६ साली लायसन्स राजच्या काळात तर ते दुरापास्त. पण अझीम प्रेमजी यांनी ते आव्हान स्वीकारलं. आणि नुसतं स्वीकारलं नाही तर आपल्या कल्पकतेच्या जोरावर जगातल्या नावाजलेल्या कंपनीमध्ये स्थान मिळवलं.

पुढील दहा वर्षांमध्ये मग विप्रोने अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली विविध उद्योगात पाय रोवले. विप्रो लायटिंग, विप्रो कन्झ्युमर प्रॉडक्टस, विप्रो हायड्रॉलिक्स. व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी शोधत असताना विप्रोला संधी मिळाली ती आयटी क्षेत्रात काम करण्याची. १९७५ ते १९८० च्या काळात संगणक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आयबीएम ला राजनैतिक निर्णयामुळे भारतातून गाशा गुंडाळावा लागला आणि अझीम प्रेमजी यांनी तयार झालेल्या पोकळीमध्ये विप्रोला बसवलं. १९८० ते १९९० मध्ये हा उद्योग बस्तान बसवत असतानाच, १९९१ मध्ये त्यावेळेसचे अर्थमंत्री श्री मनमोहनसिंग यांनी जागतिकीकरणाचे दरवाजे खुले केले आणि त्यानंतर मग विप्रोने मागे वळून पाहिलं नाही. तेव्हपासून ते आजपर्यंत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बिझिनेस च्या लाटेवर आरूढ होताना भारतातल्या पहिल्या तीन कंपनीमध्ये विप्रोचा समावेश होतो.

या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षणीय आहे. ती म्हणजे, तंत्रज्ञानाच्या जोरावर विप्रोने सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये मानाचं स्थान मिळवलं तरी प्रेमजी यांनी त्यांच्या पारंपरिक उद्योगाला जिवंत ठेवलं. ते उद्योग बंद वा विकले नाहीत. सनफ्लॉवर हा त्यांनी ब्रँड विकला पण अमळनेर ची फॅक्टरी आजही कार्यरत आहे. तीच कथा हायड्रॉलिक्स वा हेल्थकेअर प्रॉडक्टसची. हायड्रॉलिक्स हा बिझिनेस हा कष्टाचा आणि आयटी सापेक्ष कमी नफ्याचा. पण अझीम प्रेमजी यांनी त्या उद्योगावर आयटी इतकं लक्ष ठेवलं आणि त्यांनाही जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवलं.

आज विप्रो ग्रुपचा वार्षिक टर्नओव्हर हा रु ५०००० कोटीच्या आसपास आहे. स्वतः अझीम प्रेमजी हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत क्रमांक दोन वर आहेत आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीत हे पहिल्या पन्नासात असावेत. पण इतकं असूनही त्यांचा साधेपणा हा स्तिमित करून जातो. जगातली कोणतीही कार पदरी बाळगू शकणाऱ्या अझीम प्रेमजी सरांकडे टोयोटा करोला गाडी आहे. जवळच्या लोकांनी खूप आग्रह केला तेव्हा त्यांनी मर्क घेतली ती पण सेकंड हॅन्ड. गंमत म्हणजे मर्सिडीझ चा प्रथम मालक हा विप्रोमधेच काम करत होता. स्वतःचं विमान घेऊ शकणारा हा उद्योजक इकॉनॉमी मध्ये प्रवास करतो. इतकंच काय पण आजही अझीम सर पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा टॅक्सी ने प्रवास करतात.

आणि मला सगळ्यात जास्त त्यांचं व्यक्तिमत्व भावतं ते त्यांच्या समाजपयोगी कामासाठी पैसा उभा केल्याबद्दल. भारतामधील उद्योजकांमध्ये चॅरिटीसाठी उदासीनता दिसते. त्या पार्श्वभूमीवर अझीम प्रेमजी यांचं विप्रो फाउंडेशन /अझीम प्रेमजी फाऊंडेशन उठून दिसतं. अझीम प्रेमजी सरांनी या फाऊंडेशनला थोडेथोडके नाही, पण तब्बल रु ५०००० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. श्री वॉरन बफे आणि बिल गेट्स यांनी "The Giving Pledge" या राबवलेल्या मोहिमेला पूर्ण पाठिंबा देणारे अझीम प्रेमजी पहिले भारतीय. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात विप्रो फाऊंडेशन येणाऱ्या वर्षात भरीव कामगिरी करेल याबाबत काही शंका नाही. आपल्या संपत्तीचा वापर हा गरीब लोकांचं आयुष्य सुखकर व्हावं, यासाठी ते नेहमी आग्रही असतात.

अशा विविध आयाम असणाऱ्या व्यक्तिमत्वाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०११ साली भारत सरकारने अत्यंत प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं.

तब्बल ५१ वर्षे विप्रो ग्रुपची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या अझीम प्रेमजी यांनी निवृत्त व्हायचं ठरवलं आहे. त्याच्या द्रष्ठेपणाला, उद्योजकतेला आणि कल्पकतेला मानाचा मुजरा आणि यापुढील आयुष्य हे सुखकर असो या शुभेच्छा.