Monday 12 June 2017

रायगड

"तुला रायगडावर काय आवडलं" रविवारी तिथे जाऊन आल्यावर नील ला विचारलं. तो म्हणाला "मला ट्रेक आवडला"

"आणि तुम्हाला" नील ने विचारलं

मी म्हणालो "ते गाईडने सांगितलं ते"

"गड बांधून झाल्यावर महाराज गडाच्या आर्किटेक्टला, हिरोजी इंदुलकर, यांना विचारतात, काय बक्षिसी देऊ. तर हिरोजी म्हणतात "महाराज, दररोज तुम्हाला माझी आठवण यावी अशी काही तरी बक्षिसी द्या". महाराज विचारात पडतात. आणि हिरोजींना म्हणतात "तुम्हीच सांगा" तर हिरोजी उद्गारतात "ज्या पायरीवर पाय ठेवून तुम्ही जगदीश्वराचे दर्शन घ्यायला जाता, त्या पायरीवर लिहा

"सेवेसी ठायी तत्पर
हिरोजी इंदुलकर"

काय तो राजा अन काय त्यांचे सहकारी. भाग्य लागतं अन करिश्मा पण लागतो. 

हं म्हणत नील विचारतो

"पण तो गाईड शिवाजी महाराजांबद्दल सांगत होता तेव्हा तुम्ही रडत होता असं दादू म्हणाला. का?"

मी सांगितलं "अरे काय एक एक प्रसंग. महाराज मृत्यूशय्येवर आहेत अन हिरोजी फर्जंद त्यांना म्हणतात "महाराज, आग्र्याला तुमच्या जागेवर झोपलो. आज सुद्धा मी तुमच्या जागेवर झोपतो. यम मला घेऊन जाईल अन तुम्ही या दरवाजातून निघून जा. बाजीप्रभू म्हणतात, "राजे, तुम्ही जावा. आमच्यासारखे लाख मेले तरी चालेल, पण त्यांचा पोशिंदा जगलाच पाहिजे" तानाजी म्हणतात "आधी लगीन कोंढाण्याचे, अन मग रायबाचे". उण्या पुऱ्या पन्नास एक वर्षाचं आयुष्य. त्यात असे जीव देणारे सहकारी भेटणं हे पाहून गदगदून येतं रे. त्याचं महत्व हे जर तू कधी आयुष्यात लीडर झालास तर लक्षात येईल तुझ्या.

काय अफाट आयुष्य जगले महाराज. ते कवी भूषणचं काव्य. त्यांच्या कर्तृत्वावर प्रेम दाटून येतं अन मग आपसूक डोळ्यातून पाणी वाहू लागतं"

"अच्छा, तुम्हाला जर इतकं त्यांच्या बद्दल प्रेम वाटतं तर तुम्ही ते बाकीच्या लोकांसारखं जय भवानी, जय शिवाजी वगैरे ओरडत नव्हता. किंवा भगवा झेंडा घेऊन तुम्ही पुतळ्याशेजारी उभं राहून फोटो का नाही काढला?" नीलने विचारलं.

काय सांगावं आता या पोराला. त्याला कितपत कळलं ते माहीत नाही, पण सांगितलं त्याला की "हे असलं दिखाऊ प्रेम काही कामाचं नाही. महाराज मनात पाहिजेत. त्यांचा जगण्याचा उद्देशच किती उदात्त अन उन्नत होता. असा आकाशाला गवसणी घालणारा उद्देश असला की मग भव्य दिव्य हातून घडतं की चार शतकांनंतर ही त्यांची कहाणी ऐकली की उर अभिमानाने भरून येतो"

अर्थात महाराजांच्या मानव्याला देवत्वाच्या चौकटीत जखडणार्या या जगात नीलच्या मनात ते किती काळ राहील हा एक प्रश्नच आहे.

Saturday 10 June 2017

नेटसम्राट

To be or not to be, that is the question.

लॉग इन असावं की डी ऍक्टिव्हेट व्हावं हा एकच सवाल आहे

या सोशल मीडियाच्या कचराकुंडीत
एका पोस्टचा थ्रेड पकडून
नाचावं उसन्या आनंदाने
की खोटं रडावं, चिडावं
अन मग फेकून द्याव्यात त्या भावना
कुठल्या तरी सर्व्हर मध्ये सडत राहण्यासाठी.
आणि मग करावा लॉग आउट
एकाच क्लिकने
व्हाट्स अप, इन्स्टाग्राम अन फेसबुकचा सुद्धा

इथल्या जात्यंधतेच्या नागाने
असा डंख मारावा
की भिनत जावं ते विष
हळूहळू
अन त्यातून कधी बाहेर पडू
लागलो तर

इथेच तर मेख आहे
खऱ्या आयुष्यातल्या आव्हानांशी
दोन हात करण्याची ताकद नसते
म्हणून आम्ही खेळत असतो
लुटुपटू खुश होणं अन चिडणं
कधी सहन करतो, कधी वार करतो
खोटेपणाचा मुखवटा चढवून

आणि अखेर असाह्यतेचं बोट वापरून
क्लिक करतो लॉग इन होण्यासाठी
आमच्याच मारेकऱ्याच्या साईटवर

हे मार्कंडेया, तू इतका चालू कसा निपजलास?
एका बाजूचे मित्र आम्हाला "बॉर्डर वर जा" म्हणून हिणवतात
तर दुसऱ्या बाजूचे मित्र "एसीत बसू नका" म्हणून ओरडतात
मग आभासी जगाला चटावलेलं हे मन घेऊन
हे झुकेरबर्गा
आम्ही डबल ढोलकीवाल्यानी
कोणा साईटच्या लॉगइन मध्ये बोट खुपसायचं
कोणत्या-लॉग इनमध्ये- कोणत्या




साईड बर्थ

रेल्वे मला खूप आवडते. गेले काही वर्षे मी सेकंड एसी ने प्रवास करतो. त्यातून प्रवास करताना सहसा मला साईड बर्थ मिळतो, बहुतेकदा लोअर साईड बर्थ. या साईड बर्थची गंमत आहे. सेकंड एसी मध्ये असला तरी त्या जागेची काही दुःख आहेत. मेन कुपेमधील लोकं साधारणपणे या बर्थच्या लोकांकडे दुर्लक्ष करतात. का कुणास ठाऊक पण रेल कोच अटेंडन्ट सुद्धा साईड बर्थवाल्यांशी जरा हाडतुड करत बोलतो, असं मला वाटतं. बऱ्याचदा मला ब्लॅंकेट किंवा नॅपकिन दिलं नाही असा अनुभव येतो तो या जागेवर बसलं की.

सेकंड एसी मधून कधी प्लॅटफॉर्म वर उतरलं की मी छाती ताणून चालतो. पण साईड बर्थची दुःख काय आहेत ते मला चांगलं माहीत आहे. एक तर दोन्ही बाजूने तो बर्थ अर्धा पडत असल्यामुळे मध्ये एक गॅप पडते. झोपल्यावर ती फार तापदायक असते. मुळात साईड बर्थ ची लांबीमध्ये मी मावत नाही. त्यात त्याची रुंदी पण कमी असते.

या साईड बर्थ वर मांडी घालून बसलं की पायाला सॉलिड कळ लागते. तिथे जेवताना ताट ठेवायला नीट जागा नसते. नेहमी काहीतरी सांडउबड होते. इतकंच काय पण तिथे पाण्याची बॉटल ठेवायला जागा नसते. आणि सगळ्यात मोठं दुःख म्हणजे तिथे मोबाईल चार्जिंगचा पॉईंट पण नसतो. आपल्या काही गोष्टी ठेवण्याचा कप्पा हा पाठीशी असतो त्यामुळे तिथे नीट बसता पण येत नाही.

त्या साईड बर्थ वर झोपलो की मधल्या गल्लीतून फिरणाऱ्या लोकांचा हात लागतो, कधी बॅग चं हँडल लागतं. मेन कुपेतील लाईट बंद जरी होत असतील तरी गल्लीतील लाईट मात्र चालू असतात. या गोष्टींमुळे झोपमोड होते.

साईड बर्थ वर मला बरेचदा आर ए सी मिळते. म्हणजे एकाच सीटवर दोघांनी मिळून प्रवास करायचा. अशी सीट मिळताना मला नेहमीच पुरुष जोडीदार मिळाला आहे. एकदा वैभवीला आणि मला आर ए सी त एकंच साईड बर्थ मिळाला होता. मी गुलुगुलु विचार करत पोहोचलो तोवर टी सी ने मला चार कुपे सोडून दुसरा बर्थ ऍलोट केला होता, अर्थात साईड अप्पर.

हा साईड बर्थ मध्यमवर्गीय माणसाला रिप्रेझेन्ट करतो. मेन कुपे मधील लोकं श्रीमंत वर्गातील असल्यासारखी वागतात. प्लॅटफॉर्म वरील सेकंड क्लास च्या माणसासमोर मी शायनिंग टाकत उतरतो. ती माझ्याकडे असूयेने पाहत असावीत असा माझा गैरसमज असतो. माझा शायनिंगचा अविर्भाव असला तरी आत बोगी मध्ये माझी कशी सॉलिड लागलेली असते हे माझं मला माहित असतं. पण हे सांगणार कुणाला? श्रीमंत लोकं माझ्याकडे ढुंकून पण बघत नसतात, अन प्लॅटफॉर्म वरच्या सो कॉल्ड गरीब वर्गाला माझी कैफियत सांगण्यात मला एक तर लाज वाटते किंवा इगो आडवा येतो.

अशी ही साईड बर्थ ची सीट. माझ्यातल्या मध्यमवर्गीय माणसाचं चपखल प्रतिनिधित्व करते. म्हणून मी त्या सीटच्या प्रेमात असतो.

अर्थात त्याशिवाय मला काही चॉईस नसतो.

Saturday 3 June 2017

बेफाम

परवा श्रीने विचारलं "बेफाम जगायचं आहे राव. काय करायला हवं?"

बेफाम जगण्यासाठी एक तर पोटात आग असायला हवी नाहीतर डोक्यात. आणि जेव्हा इथल्या आगी विझल्या असतील तर मग मात्र बुडाखाली आग लावावी लागते. खूप अवघड असतं  ते. स्वतः च स्वतः च्या बुडाला वात पेटवणं.

आणि मग आपण पुस्तकं वाचतो. नारायण मूर्ती, कलाम सर, सुब्रतो बागची, स्टीव्ह जॉब्स, बिल गेटस, कॅप्टन गोपीनाथ यांना  आपण मनोमन मार्गदर्शक मानू लागतो मेंटॉर. कधी आपण जिते जागत्या लोकांमध्ये आपण असे मेंटॉर शोधत असतो. मला असे खूप लोकं भेटले. एस के एफ मध्ये असताना असाध्य आजारावर विजय मिळवून आज अहमदाबाद चा प्लांट हेड असलेल्या अजय नाईक मध्ये, रॊलॉन मध्ये माझा एम डी संजीव शहा आणि मॅनेजर बोनी पॉल मध्ये, कस्टमर म्हणून जायचो पण ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने हरखून जायचो अशा असंख्य लोकांमध्ये.  टॅक्सी ड्रायव्हर मध्ये, बँक मॅनेजर मध्ये, सप्लायर मध्ये अगदी कुणीही हा मेंटॉरचा रोल निभावून जातं. वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या उद्योजकांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी कसे उद्योग उभे केले हे ऐकताना पगलावून जायचो आणि त्यांनी दर्शवलेल्या मार्गावर चालायचा प्रयत्न केला. मार्गदर्शक. मेंटॉर.

बरं ही मार्गदर्शक लोकं स्वतः ला आरामशीर कॅरी करतात. म्हणजे त्यांच्यात तो गुरु बिरू चा आवेश नसतो. ते तुम्हाला फार शिकवतात असाही त्यांचा अविर्भाव नसतो. त्यांच्या बोलण्यातून ठिणग्या उडत असतात. अन एखादी ठिणगी आपल्या मनातील ज्योत पेटवून जाते.

प्रश्न असा आहे की आपल्यातली बारूद जिवंत आहे का? की  सुखासीनतेच्या आवरणाखाली ही बारूद ओली होऊन त्याच्यातली जान थंड झाली आहे.


Friday 2 June 2017

पांढरपेशा मंडळींचे हित

उत्पादन क्षेत्रातील कुठलाही उद्योग मॅनेज करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

१. रॉ मटेरियल: मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रॉ मटेरियल ची उपलब्धता हा कळीचा मुद्दा असतो. ते जर कुणाच्या लहरीवर अवलंबून असेल तर तो उद्योग अनिश्चततेच्या भोवऱ्यात सापडतो. 

२. संकटाना सामोरे जाण्याची ताकद: आमच्या क्षेत्रात जी संकटे येतात ती मानव निर्मित असतात. उदा: क्रूडचे भाव कमी जास्त होणे, निश्चलनीकरण, कुठे युद्ध होणे वगैरे. ती मानवामुळे आहेत त्यामुळे त्याची व्याप्ती ही नियंत्रित असते आणि तिला सामोरे जाण्याची ताकद आम्ही बाळगून असतो. 

मानव निर्मित संकटाबरोबर निसर्गनिर्मित संकटे आम्हाला कधी फेस करावी लागत नाहीत. ती जर आलीच तर आम्ही उद्योजक हतबल होऊ. 

३. आम्ही जे बनवतो ते नाशवंत नसते. म्हणून गरज पडलीच तर आमचा भाव येईपर्यंत आम्ही वस्तू स्टोअर करून ठेवू शकतो. 

४. स्किल्डमनुष्यबळ: आमच्या उद्योगात मनुष्यबळ लागते. त्यासाठी आयटीआय ते आयआयटी अशी शिक्षणाची चेन गेल्या साठ वर्षात शासनाने तयार केली आहे. ती जर नसेल तर आमचं येड पळलं असतं. हें असे शिक्षण असल्यामुळे आम्ही वस्तू उत्पादन क्षेत्रातील लोकं सातत्याने सुधारणा करू शकतो. 

५. आर्थिक ज्ञान: मी स्वतः जरी अभियंता असलो तरी व्यवसाय करण्यासाठी लागणारे बेसिक अर्थशास्त्राची माहिती मला आहे, ज्ञान नव्हे. कर्ज कधी घ्यावं, त्यासाठी लागणारे ठोकताळे याची जुजबी का होईना माहिती आहे, ज्ञान नव्हे. अर्थात बेधुंद कर्ज घेणारे आणि नंतर हात पोळून घेणारे अनेक उद्योजक मला माहित आहेत. 

६. बाहेरच्या माणसाचे ज्ञान: आमच्या उद्योगात बऱ्याचदा आम्ही आम्हाला काही कळत नसेल तर बाहेरच्या माणसाला बोलावतो. त्याला बहुतेकवेळा आमच्या बिझिनेसचं  काहीही कळत नसतं, तरीही तो जे सांगेल ते आम्ही निमूटपणे ऐकतो. त्यातलं जे आमच्या उद्योगासाठी महत्वाचं आहे, ते उचलतो. आणि बहुतेकवेळा हा तिसरा माणूस आमच्या बिझिनेस मध्ये सोल्युशन देऊन जातो. 

७. असोसिएशन: उत्पादन क्षेत्रातील बरेच उद्योग, हे कोणत्यातरी असोसिएशनला संलग्न आहेत. तिथे अगदीच धुतल्या तांदळासारखी माणसं नसतात, पण शासनाला योग्य डेटा देऊन त्यांच्याकडून उद्योगाला लागणारे टॅक्स स्ट्रक्चर, सवलत यासाठी पाठपुरावा करतात. याचा थोडा का होईना पण उद्योगाला फायदा होतो. 

८. कुठलाही उद्योग फुलण्यासाठी एक इको सिस्टम लागते. ती तयार करण्याची जबाबदारी सरकारची असते. ती योग्य पद्धतीने वापरायची कुवत समाजामध्ये असावी लागते. सिस्टम नसेल तर हजारो हातांची क्रयशक्ती वाया जाण्याची शक्यता असते. 

९. तसं बघायला गेलं तर आम्ही ज्या उद्योग क्षेत्रात काम करतो तो नसला तरी जग मरणार नाही. आपल्याकडे एक मोठा उद्योग हातात आहे, त्या उद्योगातून तयार होणाऱ्या गोष्टी या माणूसजातीला जगवतात. त्याकडे शासनाचे आणि एकूणच समाजाचे होणारे दुर्लक्ष हे अनाकलनीय आहे. त्या उद्योगाला सावत्र मुलाची ट्रीटमेंट देऊन बाकी निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या उद्योगाला अति प्रोत्साहन देणं हे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखं आहे. डेन्मार्क, न्यूझीलंड ने जसं दूधदुभत्याचे पदार्थ बनवून जगात श्रीमंत देश बनवले तशी संधी आपण राज्यकर्त्यांच्या आणि एकूणच समाजाच्या नतद्रष्टतेपायी आणि दूरदृष्टीच्या अभावापायी गमावली आहे. त्या पलीकडे जाऊन आर्थिक विषमतेची दरी तयार करून तथाकथित मध्यमवर्गीय हे या उद्योगाची टिंगलटवाळी करतात हे दुर्दैवी आहे. 

तेव्हा ब्ल्यू कॉलर आणि व्हाइट कॉलर वाल्या स्त्री पुरुषहो आणि राज्यकर्त्यानो

काळ्या रंगाशी इमान राखणारा या देशाचा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या ताकदवर बनण्यात बाकी पांढरपेशा मंडळींचे हित आहे.