Sunday 23 May 2021

आयुर्वेद, ऍलोपॅथी आणि कॉमन मॅन

 मी एक कॉमन मॅन आहे. माझी तब्येत चांगली रहावी यासाठी मी प्रयत्नशील असतो. त्यासाठी उपलब्ध आणि विश्वासार्ह अशा कोणत्याही पॅथी चा मी वापर करतो. आयुर्वेद आणि ऍलोपॅथी यापैकी काहीही मला त्याज्य नाही आहे. 

माझ्या दोन अँजिओप्लास्टी झाल्या आहेत. दुसरी झाल्यावर मी आयुर्वेद आधारित हार्ट केअर सेंटर मध्ये पाच दिवस राहून आलो आहे. तिथं सुद्धा मी स्ट्रेस टेस्ट केली आहे. 

अगदी अशात माझं पोट प्रचंड दुखत होतं. ऍलोपॅथी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली. एक अँटी बायोटिक ने काम केलं. पण ते बंद केलं की परत काही दिवसांनी पोट दुखायचं. सोनोग्राफी आणि सी टी पण केलं. शेवटी डॉ क्षितिजा जुजम यांनी आयुर्वेदिक औषधे दिली आणि त्याने परिस्थिती नियंत्रणात आली असं वाटतं. आताही करोना काळात मी आयुर्वेदिक औषधे प्रिव्हेन्शन म्हणून घेतो आहे. 

एक कॉमन मॅन म्हणून मला एव्हाना कळून चुकलं आहे की आयुर्वेद हे पण एक औषध शास्त्र आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात त्याचा खूप चांगला उपयोग होतो. मात्र शरीराचा ब्रेकडाऊन मेंटेनन्स झाला तर ऍलोपॅथी ला पर्याय नाही. कॉमन मॅन म्हणून हे ही मला जाणवतं की ऍलोपॅथी कडे सर्व प्रश्नावर उत्तरं आहेत, खर्चिक असतील, पण आहेत. 

हे असं आहे यावर माझं एक निरीक्षण आहे. कोणताही ऍलोपॅथी च्या डॉक्टर्सना मी आयुर्वेदा विरुद्ध बोलताना पाहिलं नाही आहे. त्यांच्या काही कॉन्फरन्स अटेंड करण्याची मला संधी मिळाली. ते केस स्टडीज घेतात आणि त्यावर चर्चा करतात. बाकी कुठल्याही पॅथी चा तिथं थोडाही उल्लेख होत नाही. 

याउलट आयुर्वेदिक डॉक्टर्स आयुर्वेदाची  महती सांगताना ऍलोपॅथी ला हमखास शिव्या घालतात. यात काही सन्माननीय अपवाद असतीलही, पण अगदी स्वतःला आयुर्वेदाचे शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्या डॉक्टरांचं भाषण ऐकताना ऍलोपॅथी वरील टीकेचं गुऱ्हाळ ऐकताना डोकं पकलं होतं. त्या.।।. आयुर्वेद आधारित प्रसिद्ध हार्ट केअर सेंटर मध्ये संध्याकाळी एक मिटिंग व्हायची. त्याची सुरुवात अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी कसं बकवास आहे याने सुरू व्हायची. अगदी माझ्या मित्राने करोना वर एक औषध काढलं असं यु ट्यूब वर आलं. त्यातही त्याने ऍलोपॅथिक औषधाने बरं न झालेल्या रुग्णांना मी बरं केलं असं नमूद केलं होतं. आपला मोठेपणा सांगण्यासाठी समोरचा लहान आहे हे सांगणं हास्यास्पद असतं हे सांगण्याची कुणा तत्वज्ञाची गरज नाही आहे. 

योग आणि आहारशास्त्र हे अजून दोन वेगळे विषय आहेत. योगाचा भारतात उदय झाला आहे असं आपण मानतो. आयुर्वेद शास्त्राला ते जितकं पूरक आहे तितकं ते ऍलोपॅथी ला पण पूरक आहे. अनेक ऍलोपॅथिक डॉक्टर्स हे योग आणि आहार शस्त्राचा अंगीकार करताना दिसतात. रिव्हरसिंग हार्ट डिसीज या जग प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक डीन ओर्निश हा ऍलोपॅथी डॉक्टर होता पण त्याने हृदयविकारावर जे उपाय सांगितले ते योग आणि आहार शास्त्र आधारित आहेत. पुण्यात प्रसिद्ध हृदरोग डॉक्टर हेच उपाय सांगतात. डॉक्टर संचेती सारखे निष्णात डॉक्टर योग चं महत्व खुलेआम भाषणात सांगतात. डॉ अभय बंग यांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकात जी जीवन शैली सांगितली आहे ती आहार आणि योग संबंधित आहे.

योग शास्त्रावर प्रभुत्व असणाऱ्या रामदेव बाबाचं "ऍलोपॅथी हा मूर्खपणा आहे" हे म्हणणं हाच एक मोठा मूर्खपणा आहे.  ज्या पद्धतीने बीजेपीने सरदार पटेलांना आपला नेता म्हणून हायजॅक केलं आहे. तसंच योगप्रवीण रामदेव बाबाने आयुर्वेदाला हायजॅक केलं आहे. आयुर्वेदवर आधारित त्याने बिझिनेस उभा केला, पैसे छापले हे त्यांना लखलाभ. पण ज्या ऍलोपॅथी ने मागील काही दशकात अभूतपूर्व संशोधन करत प्रगती केली, त्याला प्रति संशोधनाने विरोध न करता, "उचलली जीभ लावली टाळ्याला" या प्रकारच्या  विधिनिषेध शून्य विधानाचा निषेध करावा तितका कमी आहे. तो निषेध समाजातील कॉमन माणसाने तर करावाच पण आयुर्वेदिक डॉक्टर्सची जर काही असोसिएशन असेल तर तिनेही करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. कोणत्या पॅथी मध्ये संशोधन आणि प्रगती झाली आहे यावर त्यांनी सांगोपांग विचार करता चित्र समोर आहे. 

तळटीप: माझे सासू सासरे हे योगप्रविण आहेत आणि निगडी प्राधिकरण मध्ये योग शिकवतात, मेव्हणी डॉ क्षितिजा जुजम ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि योग विशारद आहे. तिचं क्षितिज योग सेंटर हे आमच्या भागातील एक प्रसिद्ध योग प्रशिक्षण केंद्र आहे. माझी बायको ही एम डी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि ती गेले पंचवीस वर्षे स्वतःची लॅब चालवते. मी स्वतः क्षितिजा कडून आणि काही आयुर्वेदिक डॉक्टर मित्रांकडून योग्य ती आयुर्वेदिक औषधे घेतो तसेच योग शिकलो आहे. प्राणायाम, वाफ घेणे, जलनेती हे ही मला चांगलं जमतं. वैभवीचे मित्र आणि मैत्रिणी हे त्यांच्या क्षेत्रातील माहीर ऍलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. माझी स्वतःच्या दोन अँजिओप्लास्टी, वडिलांचे कँसर प्रकरण, आणि हे चालू करोना प्रकरण याचा मी कुठल्या पॅथी ने काय फायदा होतो याचे ठोकताळे बांधले आहेत. ते ठोकताळेच आहेत, दावे नाही आहेत. कारण मी इंजिनियर आहे, मेडिकल प्रोफेशनल नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कुणी या दोन पॅथीवरून माझी शाळा घेण्याची शक्यता आहे म्हणून आधीच सांगून टाकलं.

Saturday 15 May 2021

कृतज्ञ

आठ एप्रिलला कंपनीत सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यात काही लक्षण नसणाऱ्या पण पॉझिटिव्ह केसेस आल्या. आणि त्यानंतर लाईनच लागली. पुढच्या केसेस मात्र लक्षण दाखवणाऱ्या. 

ही कंपनीतील तऱ्हा तर बाहेर अनेक जवळचे परिचित पॉझिटिव्ह. त्यात मित्र आले, नातेवाईक आले, मित्रांचे नातेवाईक, कंपनीतल्या एम्प्लॉईज चे नातेवाईक आले. दररोज कुणाचा तरी फोन. कुणी होम आयसोलेशन मध्ये तर कुणी हॉस्पिटल मध्ये दाखल. कुणाचं टेम्परेचर कमी होत नाही तर कुणाचा ऑक्सिजन कमी होतोय. 

आणि यामध्ये तीन दुर्दैवी मृत्यू. माझी मावशी कुसुम आंबेकर, आमच्या इंजिनियर चे वडील, आणि पुण्याबाहेरील मित्र. 

डोक्याचं पार भजं झालेलं. गेल्या पाच सहा दिवसांपासून परिस्थिती बरी आहे. या पूर्ण सव्वा महिन्यात काही लोकांची प्रचंड मदत झाली. ही पोस्ट खास त्यांच्यासाठी. 

सगळ्यात आधी डॉ विनोद भारती. रायझिंग मेडिकेअर नावाचं हॉस्पिटल आहे त्यांचं खराडी मध्ये. लहान भावाच्या टेलिफोनिक ट्रीटमेंट पासून त्यांच्याशी मी बोलत होतो. सेटको च्या सर्व केसेस ची सरांनी टेलिफोन वर ट्रीटमेंट सांगितली. सगळ्यांना त्यांचा नंबर देण्याऐवजी मीच मधला मेडिएटर बनलो. भारती सरांनी माझ्या फोनला उत्तर दिलं नाही असं क्वचितच घडलं. 

या व्यतिरिक्त दोन डॉक्टरांचा उल्लेख करायचा आणि तो म्हणजे डॉ प्रकाश कोयडे आणि डॉ शीतल श्रीगिरी. कोयडे डॉक्टर स्वतः पॉझिटिव्ह झालेले आणि हॉस्पिटल मधून नुकतेच घरी आलेले. जिथं म्हणून मला वाटायचं की अजून कुणाला तरी ओपिनियन विचारायला हवं, मी सरळ कोयडे डॉक्टरांना फोन करायचो आणि माझ्या शंका विचारायचो. त्यांनी कधीही निराश केलं नाही. डॉक्टर शीतलशी मी ऑक्सिजन प्लांट बद्दल फोन करायचो. त्यात मी तिला सांगितलं की मित्राच्या भावाचं टेम्परेचर खाली येत नव्हतं. शीतल डॉक्टरने त्यावर हॉस्पिटल मध्ये इलाज केला आणि पेशंट बरा झाला. 

मित्रवर्य जयंत विद्वंस याने राव हॉस्पिटल मध्ये एचआरसीटी ची सर्व्हिस झटपट दिली, तर घरच्या पॅथॉलॉजिस्ट डॉ वैभवी आणि  तिची मैत्रीण व्ही केअर पॅथ लॅब ची डॉ शिल्पा यांनी  टेस्ट करून दिल्या. 

डोकं विचार करून जास्त जड झालं, तर फळणीकर सर होतेच. "कधीही सांगा हो, मी आहे तुमच्या मदतीला" हे ते सात शब्द मला बळ देऊन जायचे. आणि अधून मधून सकारत्मकतेचं इंजेक्शन द्यायला हक्काचे एम जी सर होतेच. यु ट्यूब चॅनेल वर कुठलं तरी लेक्चर काढायचं आणि ऐकत बसायचं.  

एकूण परिस्थिती निवळली आहे. कंपनीतील अलमोस्ट सर्वजण बरे झाले आहेत. 

काही कटू आठवणी आहेत. त्या लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. 

वरील उल्लेखलेल्या सगळ्यांप्रति मी कृतज्ञ आणि आयुष्यभरासाठी ऋणी आहे.  

Friday 14 May 2021

इंदू जैन

मृत्यू या विषयी इतके स्पष्ट आणि मोहक विचार फार कमी वेळा वाचनात आले. इंदू जैन यांचा  मूळ इंग्रजी लेख फारच सुंदर आहे. त्यात अभिप्रेत असलेला अर्थ पोहचवू शकलो नाही याबद्दल शंका आहे. पण तरीही अनुवाद करण्याचं धारिष्ट्य केलं आहे. चूभूदेघे. मूळ इंग्रजी लेख १४/०५/२०२१ टाइम्स ऑफ इंडिया च्या मुख पृष्ठावर आहे  


मृत्यू हा जगण्याच्या कलेचा एक भाग आहे. माझं सारं आयुष्य आरामात गेलं, पण खरी गंमत चार भिंतीबाहेरचं जे जग आहे त्यात मी अनुभवली.  आयुष्यातील प्रत्येक क्षण मी भरभरून जगले आहे आणि त्यायोगे अनुभवल्या जाणाऱ्या शांततेने माझं आयुष्य परिपूर्ण झाले आहे. 

अर्थात प्रत्येक जण अनुभवतो तसं मला सुद्धा काही मनासारखं नाही घडलं तर असमाधानी वाटतं. पण अशा प्रत्येकवेळी मी स्वतःलाच प्रश्न विचारते "हे घडलं खरं. पण त्यावर नाराज होऊन मला स्वतःला शिक्षा देणं हे खरंच गरजेचं आहे का?" उत्तरादाखल माझ्या मनातील नकारात्मक भाव कुठल्या कुठे पळून जातात. मला त्यामुळे खात्री वाटते की माझं इथलं तात्पुरतं वास्तव्य संपताना मी तर आनंदी असणारच, पण त्याही पेक्षा पुढील प्रवासाची मला प्रचंड उत्कंठा आहे. 

मृत्यू या प्रकाराबद्दल अनेकांना कुतूहल आहे, मला ही आहेच. पैलतीरावर काय आहे हे कुणाला माहिती नाही, पण काहीतरी नाविन्यपूर्ण असणार हे तर नक्की. ते अनुभवण्याची मला आस आहे. मृत्यूला कवटाळण्यास मी पण अधीर आहे. फक्त त्याच्या कानात मला हळूच सांगावंसं वाटतं "थोडं थांब. मी येणार तुझ्याबरोबर. पण त्याआधी मला या शय्येवर व्यवस्थित जुळवून घेऊ दे. उशी नीट करू दे आणि माझ्या रजईमध्ये निवांत होऊ दे." 

माझ्या मित्र मैत्रिणींना या शेवटच्या प्रवासाची पूर्ण कल्पना दिली आहे. जे माझ्या जवळचे आहेत आणि मला पूर्ण ओळखून आहेत त्यांचं सांत्वन करण्याची गरज पडणार नाही. त्यांना माहिती आहे की ज्या असोशीने मी जगण्यावर अतोनात प्रेम केलं, त्याच उत्सवी मन:स्थितीत मी मृत्यूला सुद्धा कवटाळणार आहे. माझ्या जवळच्या लोकांबरोबरच, ज्यांच्यामुळे मी परिपूर्णतेच्या पायऱ्या चढले त्या गुरूंना पण याची कल्पना आहे. ज्यांना माझ्या निर्गमनाचं दुःख होईल त्यांच्या बद्दल मला नम्र सहानुभूती वाटते. त्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही की पैलतीरावर मी किती खुश आणि आंनदी असणार आहे ते!

जर मला कुणी माझी शेवटची इच्छा विचारली तर मी हेच सांगेन की माझ्या निधनाची बातमी कुणाला सांगू नका. "इंदू कुठं आहे?" असं कुणीही विचारू नये. कारण जिथं कुठं आनंद असेल, जिथं कुठं हास्याची लकेर असेल, त्या प्रत्येक लकेरीत माझं अस्तित्व असणार आहे. या वसुधेवर माझा शेवटचा प्रवास हा कसाही होऊ दे, पण पंचमहाभूतांची छेड  काढत मी मृत्यूच्या बाहुपाशात विसावणार आणि या अनंतात विलीन होईल. 


इंदू जैन 

Tuesday 11 May 2021

मेडिकल जुगाड

आमच्या इंजिनियरिंग मध्ये काही प्रोसेस चा आम्हाला अंगीकार करावा लागतो की ज्या प्रासंगिक असतात. ती प्रोसेस वापरून आम्ही तो विशिष्ट प्रश्न सोडवतो सुद्धा. हा प्रश्न आम्हाला पुन्हा पुन्हा जेव्हा दिसतो, तेव्हा त्याचं उत्तर म्हणून  त्याची एस ओ पी (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बनवावी लागते की ज्यामुळे जेव्हा कधी ते प्रॉब्लेम स्टेटमेंट पुढे आलं तेव्हा त्याचं उत्तर म्हणून ती एस ओ पी आम्ही वापरतो. 

जर आम्ही प्रासंगिक सोल्युशन काढलं तर त्याला आपण जुगाड म्हणतो. आणि जर त्याची एस ओ पी बनवली तर ते कायम स्वरूपी उत्तर बनतं. 

आपण असे जुगाड अनेक बघितले आहेत ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. तो कोण पिल्लई होता ज्याने कुठली पानं टाकून पेट्रोल ला रिप्लेसमेंट म्हणून क्लेम केलं होतं. अख्ख्या भारताला येडं केलं होतं. भारतात असे अनेक प्रॉडक्टस बनतात जे स्केलेबल होत नाहीत आणि जुगाड म्हणून राहतात.

पिल्लईच्या विरुद्ध उदाहरण ज्यांनी त्यांचं जुगाड एक सोल्युशन म्हणून सिद्ध केलं आणि ते म्हणजे पॅडमॅन  अरुणाचलम. ज्यांनी सॅनिटरी नॅपकिन या प्रकाराचा पाठपुरावाच केला नाही तर एक उत्पादन म्हणून प्रसिद्ध केलं आणि दक्षिण भारतात स्त्रियांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल केला. 

सध्या करोना काळात असे अनेक मेडिकल जुगाडू प्रसिद्ध होत आहेत. त्यातल्या त्यात अल्कोहोल चे दोन  जुगाड व्हाट्स अप च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याला रीतसर संशोधनाचा कुठलाही पुरावा नाही आहे. पाच पन्नास पेशंटवर प्रयोग करून ते सोल्युशन म्हणून द्यायचा प्रयत्न करतात. हे प्रचंड धोकादायक आहे. 

यामागे एक कारण आहे. करोना ने सर्व प्रचलित मान्यतांना धुडकावून लावलं आहे. एक वर्षापेक्षा जास्त झालं आहे पण करोना भारतात निवांत बागडतो आहे. कुठलाही मेडिकल प्रोटोकॉल हा छातीठोकपणे सांगू शकत नाही की करोना रिपोर्ट पाहून मी गॅरंटी देऊ शकतो की मी याला या प्रोटोकॉल ने बरं करेन. आणि त्यामुळेच या "वन टाइम सोल्युशन" ला काहीकाळ प्रसिद्धी मिळते आणि नंतर ते कुठल्या तरी क्लाउड वर जाऊन स्क्रॅप होतं. 

त्यामुळे असल्या कोणत्याही व्हाट्स अप मेसेज च्या नादी लागून जीव धोक्यात टाकू नका. कारण या उपचारांची सॅम्पल साईझ आणि काळ हा फार छोटा आहे. त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन नाही आहे. आधी पेशंटची परिस्थिती काय होती आणि नंतर काय झाली याची माहिती ही कुठल्या संस्थेत सबमिट झाली नाही आहे. त्या मेसेजवर आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. आमच्या इंजिनियरिंग मध्ये या जुगाड मुळे कुणाच्या जीवाचा खेळ करत नाही. केला तरी अगदीच अपवादात्मक. पण इथे लोकांच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे धोका गंभीर आहे. 

योग्य डॉक्टर्स चा सल्ला घ्या, सोशल मीडिया च्या एखाद्या पोस्टवरून कुठलेही आडाखे बांधू नका आणि त्या वर आंधळा विश्वास ठेवू नका, सांख्यिकी शास्त्रावर विश्वास ठेवा, कोणत्या प्रोटोकॉल ने जास्त लोक बरे होत आहेत त्याची माहिती घ्या आणि लॉजिकल विचार करा. 

तळटीप: माझे सासू सासरे हे योगप्रविण आहेत आणि निगडी प्राधिकरण मध्ये योग शिकवतात, मेव्हणी डॉ क्षितिजा जुजम ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि योग विशारद आहे. तिचं क्षितिज योग सेंटर हे आमच्या भागातील एक प्रसिद्ध योग प्रशिक्षण केंद्र आहे. माझी बायको ही एम डी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि ती गेले पंचवीस वर्षे स्वतःची लॅब चालवते. मी स्वतः क्षितिजा कडून आणि काही आयुर्वेदिक डॉक्टर मित्रांकडून योग्य ती आयुर्वेदिक औषधे घेतो तसेच योग शिकलो आहे. प्राणायाम, वाफ घेणे, जलनेती हे ही मला चांगलं जमतं. वैभवीचे मित्र आणि मैत्रिणी हे त्यांच्या क्षेत्रातील माहीर ऍलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. माझी स्वतःच्या दोन अँजिओप्लास्टी, वडिलांचे कँसर प्रकरण, आणि हे चालू करोना प्रकरण याचा मी कुठल्या पॅथी ने काय फायदा होतो याचे ठोकताळे बांधले आहेत. ते ठोकताळेच आहेत, दावे नाही आहेत. कारण मी इंजिनियर आहे, मेडिकल प्रोफेशनल नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कुणी या दोन पॅथीवरून माझी शाळा घेण्याची शक्यता आहे म्हणून आधीच सांगून टाकलं.

योग ला मी योगा म्हणत नाही, हे लक्षात आलं का तुमच्या? 

Monday 10 May 2021

कहाण्या

पुण्यातील परिस्थिती जरी स्टेबल होत असली तरी अजूनही खूप पॉझिटिव्ह केसेस येत आहेत. भय इथले संपत नाही या ओळीप्रमाणे लोक अजूनही खूप घाबरत आहेत. कृपया खालील केसेस वाचा ज्या गेल्या पंधरा दिवसात बऱ्या झाल्या आहेत. 

१. वय २८, सी आर पी सुरुवातीला चांगला होता, पण नातेवाईकाच्या मृत्यूचा स्ट्रेस आला आणि तो डायरेक्ट १०० वर पोहोचला. ऑक्सिजन ८८. वेळेत योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि पेशंट घरी आलाय. 

२. वय ३२, सी आर पी ०. ८ आणि एच आर सी टी ९. दुसऱ्या आठवड्यात सी आर पी पोहोचला २५ आणि  एच आर सी टी १३. योग्य ट्रीटमेंट मिळाली पेशंट हॉस्पिटल मधून घरी आलाय. 

३. वय ६०, डी  डायमर १२५००, एच आर सी टी १७. योग्य वेळेत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट. खूप सुधारणा आहे. बहुतेक एका आठवड्यात डिस्चार्ज मिळेल. 

४. वय ८०, इतर व्याधींनी ग्रस्त. केवळ होम आयसोलेशन ने ओके. योग्य ट्रीटमेंट, योग्य वेळात मिळाली. 

५, वय ४५, एच आर सी टी २५/२५. पेशंट ला योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि पेशंट बरा झालाय. 

६. वय ५२, ऑक्सिजन खाली वर होतोय. ट्रीटमेंट मिळाली. आता स्टेबल झाला आहे. 

या मनघडन कहाण्या नाही आहेत तर समोर घडलेल्या केसेस आहेत. सर्व परिचित आहेत. 

हे सर्व पाहत असताना काही गोष्टी कळल्या आहेत, त्या तुमच्याशी शेअर कराव्या असं वाटलं. 

१. भीती पासून दूर रहा. पेशंट ठीक होणार हा विश्वास मनात ठेवा. (पेशंट ने आणि त्याच्या नातेवाईकाने) 

२. वेळेत ट्रीटमेंट घ्या. कुठंही दिरंगाई करू नका. 

३. हॉस्पिटल आणि डॉक्टर्स वर विश्वास ठेवा. तुम्ही मरावं अशी ट्रीटमेंट मुद्दामून कुणी देत नाही. स्वतःहून हॉस्पिटल बदलण्याचा निर्णय घेऊ नका. डॉक्टर ने जर असमर्थता व्यक्त केली तरच हॉस्पिटल बदला. 

४. एक कुणी डॉक्टर फॉलो करा. चार ठिकाणी ओपिनियन विचारू नका. तुमचं कन्फ्युजन वाढेल आणि निर्णय स्लो घेतले जातात. 

५. आधी काही आजारासाठी ट्रीटमेंट घेतली म्हणून करोना ट्रीटमेंट चा प्रोटोकॉल टाळू नका. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर  करोना ची औषधे घ्या. 

६. नातेवाईक पेशंटला ट्रीट करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. 

बाकी एस एम एस ची त्रिसूत्री सतत लक्षात असू द्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे आपल्या हातात आहे. लसीकरण झालं आहे किंवा करोना होऊन गेला म्हणून बेफिकीर राहू नका. रस्त्यावरचे अपघात रोखणे हे हॉस्पिटल चं काम नाही आहे, ते आपल्या वागण्यावर अवलंबून आहे. करोना चं पण तसंच आहे. मास्क आणि फिजिकल डिस्टन्स ठेवणे हे अजूनही चालू ठेवा. शारीरिक आणि श्वसनाचे व्यायाम करा. करोनाचा पराभव करा. 


Thursday 6 May 2021

करिअर

 एखादं करिअर दणदणीत घडण्यासाठी अंगभूत हुशारी, प्रचंड कष्ट करायची तयारी आणि तिसरा एक महत्वाचा फॅक्टर असतो आणि तो म्हणजे कौटुंबिक इको सिस्टम जी तुमच्या करिअर ला पूरक असली पाहिजे. आज मला इंडस्ट्री मध्ये जवळपास ३२ वर्षे झालीत आणि मागे वळून बघताना (३२ वर्षे झालीत म्हणजे मी हे लिहू शकतो) असं जाणवतं की आईने दागिने गहाण ठेवून (की विकून) आम्हा दोघा भावांचं शिक्षण केलं हे मोठं योगदान आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आमच्या आई बाबांनी करिअर ला बाधा येईल असं कुठलंही वर्तन ठेवलं नाही. घरात असणाऱ्या लग्न मुंजी, आजारपण, किंवा कुणाच्या निधनसमयी भेटायला जाणे यासाठी त्यांनी मला कधीही फोर्स केलं नाही. इतकंच काय पण बाबांच्या आजारपणात मला आठवतं  तसं ते गेले त्या दिवशी मी फक्त घरी थांबलो होतो. हॉस्पिटल ला ऍडमिट होते तेव्हा मी नक्कीच जायचो, पण दिवसभर काम करून. तो पर्यंत आई, वैभवी, उन्मेष असं आम्ही आलटून पालटून ड्युटी करायचो. पण कामाला  कुणीही सुट्टी घेतली नाही. 

आमच्या आईचं पण अगदी सेम. अगदी अलीकडची गोष्ट सांगायची म्हणजे, करोना लसीकरणासाठी मी सकाळी साडेसहाला जाऊन नंबर लावला. आईला फोन केला. ती माउली सकाळी सात वाजता आली. मी घरी जाऊन आंघोळ, कंपनीचा ड्रेस वगैरे घालून निल ला घेऊन आठला पोहोचलो. मग तिला बसायला सांगितलं. टोकन घेतलं. तिला प्रोसिजर समजावली. आई म्हणाली "तू जा कंपनीत. मी करते सगळं व्यवस्थित." नीलला तिच्याबरोबर थांबवलं होतं. साडेनऊला त्याचा ऑनलाईन क्लास होता. आईने त्याला पण घरी पाठवलं. लस घेतली आणि एकटी घरी आली. मुलगा किंवा नातू सोबतीला थांबला नाही म्हणून तक्रार.... शून्य. 

वैभवीचा पण तसाच सपोर्ट असतो. काही खरेदीचं नाटक नाही, फार छानछोकीचं आयुष्य नाही, कुठं बाहेर फिरायला ते माझ्या सोयीने.  १९९४ ला माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. आणि मी सेल्स जॉब घेतला. १९९४ते २००२ मी महिन्यातील १२ ते २२ दिवस बाहेर असायचो. पण तक्रार नाही.  २००५ ला घर बदललं. तिने जी तारीख ठरवली त्या दिवशी नेमकं एका ब्रिटिश माणसाबरोबर मला बंगलोर ला जावं लागलं. कामवाल्या बाईबरोबर वैभवीने, आठ महिन्याचा निल बखोटीला बांधून घर शिफ्ट केलं. सगळ्यात कहर २०११ ला झाला. त्या दिवशी मला संध्याकाळी सहा वाजता अमेरिकेला जायचं होतं. मी सकाळी कंपनीत गेलो होतो. (हो, मी बऱ्याच फॉरेन ट्रिप ला कंपनीत बॅग घेऊन जातो आणि तिथून मुंबईला). तर सकाळी बारा वाजता यश फुटबॉल खेळताना पडला डोक्यावर आणि बेशुद्ध नोबल हॉस्पिटल ला ऍडमिट. मी धावपळ करत पोहोचलो. तो पर्यंत तो शुद्धीवर आला होता. मी वैभवीकडे फक्त पाहिलं, तिने सांगितलं "तू जा, मी सांभाळते". 

असे अजून किमान पन्नास प्रसंग सांगू शकतो. कुणी या जगण्याला मनस्वी म्हणतं, कुणी जबाबदारीचं. काहीही असलं तरीही फॅमिली सपोर्ट इको सिस्टम सणसणीत आहे म्हणून बाह्य जगात इतक्या उड्या मारू शकतो. 

थोडक्यात सांगायचं काय तर करिअर घडवायचं असेल तर कुटुंबाचा सहभाग लागतोच. फक्त त्याला रिटर्न म्हणून तुम्ही सुद्धा इमानइतबारे काम करून त्याचे पांग फेडायला हवेत असं मला वाटतं.