Monday 25 May 2015

पंचम

काल झी क्लासिकवर पंचम नाईट बघत होतो. गायक गायिका घोचू होते. पण ऑर्केस्ट्रेशन येड लगाव होते. सगळे वादक अप्रतिम. तीन साथीदार आले होते रे पंचमचे. सत्तरीचे असतील. कॉंची रे कॉंची वर तिघांनी वाजवलं. 600 च्या पॉलीश पेपर वर संगीत यार. अन सलामी दिली "ये दोस्ती हम नही छोडेंगे" ट्रंपेटवाल्याने असे सूर छेडले की शेवटी माझा घसा दुखायला लागला. 

आर डी चं नाव काढलं की मला एक गाणं हटकून आठवतं अन ते म्हणजे एक चतुर नार. संगीतप्रतिभेचा तो एक उत्तुंग अविष्कार आहे असं मला नेहमीच वाटत आलं आहे. विनोदाच्या अंगाने जाणारं हे गाणं ऐकणार्याच्या डोळ्यात पाणी कधी आणतं हे कळत ही नाही. विविध वाद्यांचा इतका सुरेल वापर फार कमी गाण्यांमधे दिसतो. आणि साथीला किशोरदा अन मन्ना डे. फाटलेला सुर सुद्धा सुरात म्हतुम्हाला सांगतो आर डी ने हे एकच गाणं जरी आयुष्यात बनवलं असतं तरी आपण आजच्या इतकंच प्रेम त्यांच्यावर केलं असतं. 


पंचमवर मी एक प्रोग्राम बघत होतो. विधू विनोद चोप्रा बोलत होते. 
"पंचमदाचे लागोपाठ २८ पिक्चर फ्लॉप गेले होते. पण मला १९४२ साठी मला पंचमच हवे होते. मी ऐकून होतो, पंचमदाकडे काम नाही आहे. मी गेलो दादाकडे अन गीत दिलं. सांगितलं, संगीत लावा, मी येतो आठवड्याभरात. एक लडकी को देखा तो गाणं. मी पोहोचलो पंचमदाकडे. विचारलं, झालं. दादाने गाणं ऐकवलं. चाल त्याकाळात जशा चाली होत्या म्हणजे ढाकचिक ढाकचिक. (विधू विनोद इथे पीस ऐकवतात अन आपले कान का नाही फाटले असं वाटतं) मी पंचमदाना बोललो " हे काय आहे दादा. मला हे नकोय. मला ओरिजनल पंचमदा पाहिजे. मी उद्या परत येतो" मी परत गेलो दुसर्यादिवशी. 
तो संगीताच्या दुनियेचा बेताज बादशहा, ज्याच्या नावावर ३५० पेक्षा जास्त चित्रपटाचं संगीत होतं, ज्याने वेगवेगळ्या वादनांचा अद्भुत अविष्कार दाखवला तो स्वरांचा जादुगार माझ्यासारख्या काल आलेल्या नवख्या चित्रपट प्रोड्युसरला विचारत होता "Vidhu, am I still doing this film" 
आणि मी पंचमदाचे दोन्ही हात हातात घेत बोललो "Of course दादा, हे काय विचारणं झालं" 
अन मग पंचमदाची बोटं हार्मोनियमवर फिरू लागली आणि एक लडकी को देखा ची अप्रतिम सुरावट जन्माला आली" 
तुम्हाला सांगतो जिथे फुलं वेचली तिथे गोवर्या वेचायची वेळ आली म्हणजे काय याची तंतोतंत अनुभूती विधू चोप्रांची मुलाखत ऐकताना आली. घसा दुखू लागला, डोळे पाणावले. पुढं १९४२ चं जादूई संगीत सुपर हीट झालं पण तो गौरव पहायला आर डी या दुनियेत नव्हता. 
उफ्फ! लिहीतानाही थरथरतो आहे .

Friday 22 May 2015

Fun day विमानप्रवासाचे

विमानप्रवास तुझ्या नशीबात आहे असं जर कुणी मला नव्वदीच्या सुमारास कुणी सांगितलं असतं तर विनोद म्हणून सोडून दिलं असतं. पण त्यानंतर दहाच वर्षानी कँप्टन गोपीनाथ नावाच्या सुहृदाने एयर डेक्कन नावाची सामान्यांना परवडणारी विमानसेवा चालू केली अन मग माझ्यासारखे अनेक विमानाला फक्त आकाशाकडे बघून आनंद मानणारे प्रवास वेळेच्या बचतीचा आनंद घेऊ लागले. पुढं मग आत्ता नंबर वन ला असलेली, गो इंडिगो आली, वादग्रस्त वाडियांची गो एयर, तामिळनाडूच्या अर्थकारणात धूमाकूळ घालणार्या मारन कुटुंबाची मालकी असलेली अन नुकतीच मुळ मालकाला परत गेल्याने उर्जित झालेली स्पाईस जेट अशा कंपन्यांची सद्दी चालू झाली अन विमानतळं ओसंडून वाहायला लागली. ज्या गोपीनाथांनी नो फ्रील लाईन एयरलाइन ही कल्पना वास्तवात आणली त्यांना मात्र किंगफिशरच्या राक्षसी महत्वकांक्षेने संपवले आणि स्वत: किंगफिशरही गळपाटली. 

असो. तर सांगायचा मुद्दा हा की माझ्यासारख्या सर्वसामान्यांना परवडेल असे विमानदर तर झाले, पण आम्ही विमानतळावर किंवा विमानात वागायचं कसं हे कुठं कुणी सांगितलं. इतर अनेक गोष्टीप्रमाणे अनुभव आले की शिकतील या मानसिकतेतून काही सांगितलंच नाही. अन मग विमान कर्मचारी अन प्रवासी आणि सहप्रवासी यातील वाद चालू झाले. विमानसेवक किंवा सेविका, ग्राउंड स्टाफ़ पहिल्यांदा प्रवास करणार्यांना फटकून बोलू लागल्या. नेहमी प्रवास करणारे पहिल्यांदा प्रवास करणार्यांकडे काही चूक झाली की हिणकस नजरेने बघू लागले. "Shit, this airport has turned out to be bus stand" किंवा "is this aero plane or second class का रेल्वे का डिब्बा" असले कुजकट डायलॉग पडू लागले. यामागे चूक अर्थात विमानकंपन्यांची. तुमच्या विमानातले टॉयलेटस, केबिन लगेज कसं ठेवायचं, फ्लाईटमधे कसं वागायचं याच्या सूचना प्रवाशापर्यंत पोहोचाव्यात म्हणून काय प्रयत्न करता हो तुम्ही. 

विमानाचे भाडे कमी झाल्यामुळे तो प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे, त्याचा आनंदच आहे. पण ज्या देशामधे जहॉ सोच वही शौचालय सारखी जाहिरात करावी लागते तिथे हे विमानातले अत्याधुनिक टॉयलेटस आणि बाकीही कसं वापरायचं हे सांगायला नको. ते एयरलाईन वाले ज्या सुचना देतात त्यातली बेल्ट कशी लावायची ही एकमेव सुचना कामाची असते. बाकी सेफ्टी इंन्स्ट्रक्शन चा, खरोखर अपघात झाला तर त्याचा  उपयोग नसतो. पण मग विमानात कसं वागल्याने प्रवास आनंदी होईल हे सांगायचं एयरलाईन्सचं काम नाही. वेबसाईटवर लिहा, पत्रक वाटा, टीव्ही वर अँड दया. पण जर तुम्ही सांगितलंच नाही तर आम्ही पहिल्यांदा प्रवास करणारे काय अंतर्ज्ञानी आहोत काय?

दुसरं एक जाणवतं ते प्रवाशांची बिनडोकगिरी. आणि हे प्रवासी म्हणजे विमानाने नेहमी प्रवास करणारे अतिशहाणे. एयरलाईन वाले सांगतात ना ७ किलोच्या वर हँड बँगेज नको म्हणून. तुम्ही च्यायला ट्रंकाच्या ट्रंका केबिनमधे आणता. अरे तो काय घरचा पोटमाळा आहे का? कसं चालेल. त्या जागेत बँग बसवताना तर तुमची फाटतेच, बाकीच्यांनाही inconvenience होतो. अन यांचा मोह काय तर लगेज बेल्टवर थांबायला नको. नवीन प्रवासी आला, जो बिचारा इमानऐतबारे छोटी बँग घेऊन येतो, की भरलेल्या केबिन्स बघून गांगरून जातो अन मग चुका होतात. 

विमान हॉल्टला पोहोचायच्या आधी लँपटॉपधारक पहिले उभे. काय मुलखाची घाई असते, भगवान जाणे. काय ऑफीसमधे जाऊन दिवे लावतात माहित आहे. नवीन प्रवाशाला वाटतं, आपल्याला सोडून हे विमान उडेल म्हणून मग तोही धावपळ करतो. धक्काबुक्की मग. हेच लॅपटॉपधारक वेटिंग हॉलमधे बसायला दिलेल्या खुर्चीवर बॅग ठेवून विमानाची वेळ होईपर्यंत ढाराढूर झोपले असतात. म्हातारे कोतारे, बायका उभ्या असताना ह्या नवश्रीमंतांना त्याची जाणीव ही नसते. 


आज सकाळी चेन्नैहून बंगलेरला आलो. इनमिन ४० मिनीटाची फ्लाईट. म्हणजे होस्टेसची इतकी घाई असते की हॉट बेव्हर्जेस ते सर्व्ह करत नाहीत. त्या ४० मिनीटात चार अण्णा मुतायला उभे. बरं विमानतळावर आधी तासभर आले असतात. तिथे भरमसाट टॉयलेटस आहेत. उतरल्यावर असतात. पण नाही आम्हाला त्या ४० मिनीटातच धार मारायची असते. पण हे असं नाही, हे कुणी सांगितलं आहे का? नाही. मग नाके मुरडायची, विचित्र नजरेने बघायचं, मनस्ताप करून घ्यायचा अन द्यायचा. 

परवा एयर इंडियाच्या पोस्टवर कॉमेंटी पडल्या त्या एयरइंडियाच्या होस्टेस काकू असतात म्हणून. ही मानसिकता कधी आणि का तयार झाली हा एक प्रश्नच आहे. फायनली ती एयर होस्टेस आहे, तुमची तास, दोन तास किंवा प्रवासाच्या वेळेइतकी यजमानीण. तिने सुंदर अन तरूण असावं ही अपेक्षा का ठेवावी? तिने चटपटीत असावं, पटापट पाहिजे ते आणून द्यावं आणि थोडं पोलाईट असावं याच्यापलीकडे तिने अजून काही असावं हे चुकीचं वाटतं. शेवटी ती होस्टेस आहे, मॉडेल नाही.


विमानतळावर सिक्युरिटी असते. सकाळची सहाची फ्लाईट. म्हणजे आपण पाचला एयरपोर्ट ला आलो असतो. सकाळी पाच वाजता सिक्युरिटीचेकच्या लाईनीत एक महाशय अपुर्या इन्फ़्रास्ट्रक्चर च्या नावाने सीआइएसएफ़ वर डाफरत असतात. आता तो सीआइएसएफ़ चा जवान. तो आपला दिलेल्या आज्ञा पाळतो. त्याला काय कळतं बँग चेकिंगच्या 
कन्व्हेयरची लांबची किती असावी ते. तो बिचारा त्याचं काम करत असतो. तुम्ही मात्र सकाळी तुमचा आणि बाकींच्यांचा 
मुड़ ख़राब करून टाकता. 

विमानात तर सीट ची अदलाबदली नकोच. अहो श्रीनगरहून कन्याकुमारी चा विमानप्रवास ३ तासाचा असेल. अशा काय गप्पा मारायच्या असतात. आणि एवढीच हौस असेल तर रु १०० मोजून सीट बुक करा.

विमानात चढण्या अगोदर ठरवा कोण कसे बसणार ते. तुमच्यातच जर सीट बदली करायची असेल तर विमान उडल्यानंतर काही वेळाने 
करा. otherwise तुमच्यामुळे पूर्ण line खोळंबली असते. 

- जेव्हा अशी घोषणा होते कि "सीट १६ ते सीट ३० यांनी प्रवेश घ्यावा" तेव्हा तुमचा सीट नंबर त्यात नसेल तर उगाच घुसाघूस करून हसे करून नका घेऊ. 

जेव्हा विमानात असे सांगतात कि mobile आणि इतर electronic गोष्टी बंद करा तेव्हा त्या बंद करा. हे तुमच्या safety साठी आहे. "त्याने काय होते" असा  विचार करण्याआधी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का याचा विचार करा. 

प्रवास असा करा कि तुम्ही पण एन्जॉय करा आणि दुसऱ्यांचा प्रवास पण सुखकर करा.


असो. खूप तारे तोडले. नागरिकशास्त्रं वाचावं बदलत्या काळाचं. बाकी काय! 

Thursday 21 May 2015

मराठवाडी

आमच्या मराठवाड्यात कुणीही ओळखीचं भेटलं की पहिले नातं शोधण्याची खुप घाई करतो. माझे बाबा भास्करराव मंडलिक तर याबाबत फार ख्यात होते. कुणी भेटलं की "अरे म्हणजे माझे मामा ना राजाभाऊ, त्यांची पुतणी मंगल हं तिच्या मुलाचं अँडमिशनचं करायचं आहे." तो समोरचा गांगरूनच जायचा. तो गुण माझ्यातही उतरला आहे. कुणाचाही संदर्भ निघाला आणि थोड्या माहितीतला असेल तर "अरे, नात्यात आहे आपल्या" झालं मान न मान तु मेरा मेहमान. एक मात्र आहे, कितीही लांबचा नातेवाईक असू द्या, मनात एक विश्वासाची भावना तयार होते. अर्थात आजकाल मदत करणे अन मदत घेणे दोन्ही कालबाह्य होत चाललं आहे. त्या न्यायाने वयोपरत्वे ही सवय कमी होत गेली आणि मागच्या आठवड्यात मलाच झटका बसला.

मी आणि नील कारने कुठेतरी चाललो होतो. आकाशवाणी वर शाम ए गजल असा काहीसा कार्यक्रम चालू होता. सॉलीड तयारीच्या आवाजात एक बाई साज छेडत होत्या. गजल आणि माझं काही फार सख्य नाही. अगदी अलीकडे अण्णा, नंदू आणि गजलरंगसारख्या कार्यक्रमाने गोडी वाढवली. नाहीतर मी आणि गजल म्हणजे जरा सांभाळूनच. नाही म्हणायला जगजीतसिंग, किंवा झालच तर मेहंदी हसन साहेबांची रंजीश ए सही, किंवा फरीदा खन्नुमची "आज जाने की जिद ना करो" वैगेरेची ओळख आहे, पण ती चार लोकात सामान्य ज्ञान आहे हे दाखवण्याइतकंच. दर्दी वैगेरे नाही. हा, तर सांगत होतो की आवाज सॉलीड तापला होता बाईंचा. आणि शायरी पण नजाकतदार होती. मी आपलं सहजच बोलून गेलो " अरे नील, मला वाटतं या बेगम अख्तर असाव्यात" नील आपला हं म्हणत रूबिक क्युब सोडवत बसला. गजल संपल्यावर सादरकर्ता म्हणाला "नीदा फाजली के इस कलाम को पेश किया था बेगम अख्तरने" नीलने चमकून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अपार कौतुक दाटून आलं होतं, बापाबद्दल. आयला, बापाला बेगम अख्तर माहिती आहे, म्हणजे फारच झालं. मी पण त्या कौतुकाच्या वर्षावात न्हात कार चालवू लागलो. मिनीटभरच झाला असेल. रूबिक क्युब खेळतच नील म्हणाला "पप्पा, या बेगम अख्तर म्हणजे फरहान अख्तरची आई का हो"

धडपडलोच मी. पण लॉजीक बरोबर होतं.

मी सांगितलं मग त्याला बाईंबद्दल. त्याला काय कळलं हे देवच जाणे.

तसा भास्कर मंडलिकांचा अन नीलचा सहवास ५ वर्षाचा, २००४ ते २००९. पण दोघांचं सॉलीड सूत होतं. सूत कशाला दोरखंडच. जाताना बाबा बहुतेक नीलच्या डोक्यावर हात ठेवून गेले असावेत. जे काही गुण उतरलेत त्यापैकी एक तर कळला. बाकीचे गुण आता काळ सांगेल.

आम्ही अस्सल मराठवाडी.

Tuesday 19 May 2015

असं होऊ शकेल का?

मागच्या आठवड्यात स्मॉल स्केल इंडस्ट्रीची स्किल सेट गरज काय आहे यावर सर्वे घेण्यासाठी शासनपुरस्कृत लोकं आली होती. मी त्यांना आय टी आय ही मूलभूत तंत्रशिक्षण देणारी संस्था भारताच्या स्किल डेव्हलपमेंट मधे महत्वाचा रोल अदा करू शकते हे सांगितलं. तीन वर्षापूर्वी पुणे आणि परिसरातल्या आय टी आय ला मी भेटू देऊन असेंब्ली अन ग्राईंडींग विभागात अँप्रेंटिस घेऊन ट्रेनिंग देऊ शकतो हे सांगितलं होतं. पण आयटीआय च्या प्राचार्यांचा प्रतिसाद अगदीच थंड होता. खरंतर आयटीआय ही अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त संकल्पना आहे, पण बदलत्या काळाप्रमाणे तिने स्वत:ला बदललं नाही ही मोठी शोकांतिका आहे. अर्थात हे बर्याच शासनकृत उपक्रमाबद्दल घडतं हे ही तितकंच खरं. असो.

हा असा सर्वे शासनाने चिकाटीने केला आणि तो स्किल डेव्हलपमेंट खाली केला गेला ही अत्यंत समाधानाची बाब आहे. खरंतर शासनाच्या स्वच्छ भारत, स्किल इंडिया, मेक इन इंडिया, जीएसटी या विकासापोषक योजना आहेत. केवळ विरोधापोटी आपण जर या योजनांची खिल्ली उडवत असू तर आपण नक्कीच स्वत:ला फसवत आहोत. या योजनांचे उद्गाते कोण आहेत हा प्रश्न गौण आहे, त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा सद्य सरकारने केली हे सत्य आहे. अन त्या जर यशस्वी झाल्या तर त्याचं श्रेय सरकारला देण्यात कमीपणा वाटू नये.

सध्या मोदींचे परदेश दौरे आणि बाहेरच्या देशांना केली जाणारी मदत यावर पण गंमतशीर वाचायला मिळतं. मला स्वत:ला त्यात काही वावगं वाटत नाही. मुळात ह्या भेटी कशा ठरत असतील बुवा? म्हणजे असं होत असेल का की सकाळी नाश्त्याच्या टेबलवर मोदी ट्रँव्हेल एजंट ला सांगतील "अरे भाऊ, जरा माझं चीन अन मंगोलियाचं तिकीट काढ बरं. जाऊन येतो जरा" किंवा भारत देशाच्या बँकेचं पासबुक जिलेबी अन फाफडा खाताना पाहत अन ठरवत असतील "चला जरा मंगोलियाला ५००० कोटी देऊन टाकू किंवा नेपाळला १५०० कोटी देऊन टाकू" मला नाही वाटत इतकं सहज असावं. कार्यरत असणारे सचिव मंडळी, इतर मंत्रीगण हे काहीतर विचार करत असतील ना! ह्या देशांशी संबंध ठेवावेत न ठेवावे हे रिपोर्टस तर तयार असावेत. परराष्ट्र खाते अन संरक्षण खाते यांच्या फायली तयार असतील या विषयावर. त्यावर आधीच्या सरकारने विचार केला नाही अन मोदींनी
अंमलबजावणी केली हाच काय तो फरक. फक्त ती करताना त्या खात्याच्या मंत्र्याला का डावललं जातं हा मात्र कळीचा प्रश्न आहे.

अगदी खरं सांगायचं तर तर्कशास्त्र आणि संख्याशास्त्र यांच्याशी ओळख झाल्यानंतरही आणि उर्वरित जगाशी ओळख झाल्यावरही प्लानिंग अन फोरकास्टिंग या विभागात भारताची गेल्या १५ वर्षात झालेली अधोगति अभूतपूर्व आहे. या पार्श्वभूमीवर जर सरकारने पिण्याचं पाणी, पॉवर, दळणवळण, ह्युमन
रिसोर्सेस ह्या मुलभूत बाबींवर काम करताना धर्माधिष्ठीत राजकारणाऐवजी विकासाधिष्ठीत समाजकारण केले तर बहुमताबद्दलचा आदर या देशात वाढेल याबाबत शंका नाही.

आणि परवा विनय म्हणाले तसं एक गडकरी सोडले तर भ्रष्टाचार या बाबत कुणावर बोट दाखवता येत नाही हे सत्य डावलता कसे येईल.

बाकी राहुल गांधींनी मोदींना शेतकर्यांकडे दुर्लक्ष करतात म्हणून कानपिचक्या देणं याच्याइतका विनोद नाही.

समाजात जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय असं जर दिसलं तर काही चान्स आहे पुढे, विरोध करण्याचा.  पण त्या घाणेरड्या राजकारणाला जर भाजपाने तिलांजली दिली तर विकासित भारत दिसेल अशी
आशा आहे.

हे आहे माझ्यासारख्या फ्लोटिंग कॉमन मँनचे मनोगत. आम्ही असा विचार करत असताना पंतप्रधान सारख्या जबाबदार व्यक्तिला "भारतीय असल्याची लाज वाटायची" असं बोलायला सुचतं कसं? नकवी साहेब गोमांस खाणार्याला पाकिस्तानचा रस्ता का दाखवतात.? सार्वभौम देशाच्या तुलनेत टीचभर असलेली कंपनी मुस्लिमाला जॉब कसा नाकारू शकते? धूमधडाक्यात चालू केलेल्या योजनांची अंमलबजावणी धड का होत नाही?

की बहुमताचा अनादर करण्याचा फाजील आत्मविश्वास आहे हा? 

विमानप्रवास

परवा एयर इंडियाच्या पोस्टवर कॉमेंटी पडल्या त्या एयरइंडियाच्या होस्टेस काकू असतात म्हणून. ही मानसिकता कधी आणि का तयार झाली हा एक प्रश्नच आहे. फायनली ती एयर होस्टेस आहे, तुमची तास, दोन तास किंवा प्रवासाच्या वेळेइतकी यजमानीण. तिने सुंदर अन तरूण असावं ही अपेक्षा का ठेवावी? तिने चटपटीत असावं, पटापट पाहिजे ते आणून द्यावं आणि थोडं पोलाईट असावं याच्यापलीकडे तिने अजून काही असावं हे चुकीचं वाटतं. शेवटी ती होस्टेस आहे, मॉडेल नाही.

दुसरं एक जाणवतं ते प्रवाशांची बिनडोकगिरी. एयरलाईन वाले सांगतात ना ७ किलोच्या वर हँड बँगेज नको म्हणून. तुम्ही च्यायला ट्रंकाच्या ट्रंका केबिनमधे आणता. कसं चालेल. त्या जागेत बँग बसवताना तर तुमची फाटतेच, बाकीच्यांनाही inconvenience होतो.

आज सकाळी चेन्नैहून बंगलेरला आलो. इनमिन ४० मिनीटाची फ्लाईट. म्हणजे होस्टेसची इतकी घाई असते की हॉट बेव्हर्जेस ते सर्व्ह करत नाहीत. त्या ४० मिनीटात चार अण्णा मुतायला उभे. बरं विमानतळावर आधी तासभर आले असतात. तिथे भरमसाट टॉयलेटस आहेत. उतरल्यावर असतात. पण नाही आम्हाला त्या ४० मिनीटातच धार मारायची असते.

विमानाचे भाडे कमी झाल्यामुळे तो प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे, त्याचा आनंदच आहे. पण ज्या देशामधे जहॉ सोच वही शौचालय सारखी जाहिरात करावी लागते तिथे हे विमानातले अत्याधुनिक टॉयलेटस आणि बाकीही कसं वापरायचं हे सांगायला नको. ते एयरलाईन वाले ज्या सुचना देतात त्यातली बेल्ट कशी लावायची ही एकमेव सुचना कामाची असते. बाकी सेफ्टी इंन्स्ट्रक्शन चा खरोखर अपघात झाला तर त्याचा झाट उपयोग नसतो. पण मग विमानात कसं वागल्याने प्रवास आनंदी होईल हे सांगायचं एयरलाईन्स काम नाही. वेबसाईटवर लिहा, पत्रक वाटा, टीव्ही वर अँड दया. पण जर तुम्ही सांगितलंच नाही तर आम्ही पहिल्यांदा प्रवास करणारे काय अंतर्ज्ञानी आहोत काय?

काही नाही हो, प्रवासात हे सगळं बघताना पाहतो अन प्रवाशांना अन कर्मचार्यांना जो मनस्ताप होतो तो बघून वाटतं की सांगावं. आता बोंबलायला तिथं कुणाला सांगणार, म्हणून इथं.

नागरिकशास्त्राचा अभ्यास परत करावा लागणार आहे.

Monday 18 May 2015

चिंतन

बर्याचदा मी रामटेकडी ला सकाळी फिरायला जातो. म्हणजे बर्याचदा जातही नाही. तिथे चालताना महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा नेहमीप्रमाणे अर्धवट अभ्यास करावा काय याच्यावर आज काल चिंतन करतो. जिथे गाडी पार्क करतो त्याच्या समोरच्या बाजूला एक चहाची टपरी आहे. म्हणजे स्थावर नाही तर एका टेम्पो ची टपरी बनवतो. एक तर महापालिकेच्या हद्दीत आहे, पण लांब. अधिकृत परवाना असण्याचं काही कारण नाही. तशी फार गर्दीही नसते त्याच्याकडे. अर्थात मी सकाळी ६ ला जात असल्यामुळेही असेल कदाचित, पण तुरळक गिऱ्हाईक. आम्ही सगळे चालायला येणारे गाड्या रामटेकडीला टेकून, म्हणजे चहाच्या टपरीच्या विरुद्ध बाजूला गाडी लावतो. 
परवा (आम्ही मराठवाड्यातले लोकं खर्या परवापासून ते साधारण एक वर्ष या काळाला परवा असे संबोधतो.) मी चालून परत आलो तेव्हा साधारण सीन असा होता. एका तिशीतल्या तरुणीने तिची भलीमोठी कार टपरीच्या बाजूला लावली होती. तरुणी आपण for a  change भलीमोठी होती असं समजू यात. ती बहुधा पहिल्यांदा च आली होती. बहुधा नाही,नक्कीच. कारण चालताना मी खाली बघण्याचा अभिनय करत असलो तरी माझं लक्ष असतं चालणाऱ्या लोकांकडे. त्या तरुणीला माहितच नव्हतं की तिथे चहाची टपरी असते म्हणून. पण तिथे नो पार्किंगचा बोर्ड ही नव्हता. त्यामुळे गाडी लावण्यात काही चूक नव्हती. 
पण त्या अनधिकृत चहाच्या टपरी मालकाला त्याचा खूप राग आला. साहजिकच आहे म्हणा. पुण्याची प्रथाच नाही का ती. लक्ष्मी रोड ला लोखंडी पाट्या टाकतात च की दुकानासमोरची जागा अडवायला. तिथे पण स्कूटर लावलेली चालत नाही दुकान मालकाला. इथे तर अख्खी कार च लावली होती.  त्याचा चहाचा टेम्पो त्याच्या जागेवर जाण्या इतकी जागा कन्यकेने ठेवली होती. आता त्याने तो टपरीवजा टेम्पो अशा पद्धतीने लावला होता की ड्रायव्हर साईड चा दरवाजा उघडायला तसूभर ही जागा नव्हती. मी पोहोचलो तेव्हा ती पोरगी त्या टपरीधिपती ला काकुळतीने सांगत होती की "मला माहित नव्हतं, इथे तुमचा टेम्पो लागतो म्हणून. मी चुकून गाडी लावली. पण माझ्या पाठीत खूप दुखतं, त्यामुळे मी बाजूच्या सीट वरून कसरत करत ड्रायव्हर सीट पर्यंत नाही जाऊ शकत. तर तुम्ही प्लीज दोन मिनिटासाठी टेम्पो काढा, मी कार काढते. तुम्ही परत टेम्पो तुमच्या जागेवर लावा." लॉजिकल नाही का! बरं हे ती अजीजीने सांगत होती. 
तर तो टपरीचा बादशहा तिला सांगत होता "तुम्हाला काय करायचं ते करा, टेम्पो काय इथून हलणार नाही." आणि आवाजाचा तोच बाज, ज्याची आता आपल्याला सवय झाली आहे. ती तरुणी पार रडकुंडीला आली होती. 
अशा ठिकाणी भोचक पणा करायची सवय आहेच. मी विचारल्यावर परत त्या विशिष्ट टोन मध्ये बाईचं कसं चुकलं ते सांगण्यात आलं. मी त्या तरुणीला विचारलं "तुम्हाला खरंच ही गाडी दुसऱ्या बाजूने जावून काढता नाही येणार का?"ती नाही म्हणाल्यावर मी बोललो किल्ली द्या कारची"तर ती म्हणाली अहो, पण काका त्यांना टेम्पो काढायला काय प्रॉब्लेम आहे? काका म्हणून सुद्धा मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवत तिला बोललो "तुम्हाला घरी लवकर जायचं असेल तर किल्ली दया" तिने अविश्वासाने बघत किल्ली दिली तेव्हा मी तिला सांगितलं "टेन्शन नका घेऊ. समोर माझी कार उभी आहे. अन ही त्याची किल्ली" तर ओशाळत नको म्हणाली. (etios च्या बदल्यात Camray काही वाईट सौदा नव्हता खरं तर). कार काढून दिली. आभार प्रदर्शनाचा सोपस्कार पार पडला. आणि आम्ही आपापल्या वाटेने निघून गेलो. 
आता मला पडलेले प्रश्न:
- टपरीच्या राजाचं बरोबर की चूक? असा आडमुठे पणा काय कामाचा? बरं असं पण नव्हतं की चार गिऱ्हाईक थांबलेत त्याचा चहा पिण्यासाठी, काका हलवाई ला लोका लाईनीत थांबतात तसे. (आता किती वर्षं चितळेचं उदाहरण देणार). म्हणजे ती कार निघेपर्यंत, तो टेम्पो लावायला थांबू शकत होता. 
- याच ठिकाणी तरुणीच्या जागी एखादा गडी असला असता अन त्याचं अन टपरीधिपतीचं भांडण झालं असतं तर मी कुणाची बाजू घेतली असती? कारण कायद्याने ती टपरी अनधिकृत आहे, तिथे नो पार्किंग चा बोर्ड नाही आहे. म्हणजे गाडी लावणं चूक नाही आहे. 
- मी अशी मदत करणे बरोबर आहे का? इथे प्रश्नाचं मूळ उत्तर न शोधता सोपं उत्तर देऊन बोळवण केली नाही का?
बाकी तरुणी होती म्हणूनच तू मदत केली वैगेरे अशा दुय्यम वादात आपण पडायला नको. 
महाराष्ट्राच्या इतिहासशास्त्रावर अर्धवट अभ्यास करण्याऐवजी वर्तमान काळातील नागरिकशास्त्रावर चिंतन, चालताना करायचे ठरवले आहे.   

Thursday 14 May 2015

मंथन.

मी राजेश मंडलिक, वय ४६, व्यवसायाने इंजिनियर.

व्यवसायात येणाऱ्या ताण तणावापासून दूर पाळण्यासाठी पहिल्यांदा ब्लॉग चा अन नंतर फेसबुकचा सहारा घेतला. माझं लिहिणं ही माझी गरज आहे. लोकांना ते आवडलं तर ह्याचा अर्थ ते कुठं तरी मनाला भावत असेल. पण म्हणून मी लोकांसाठी लिहितो असं जर कुणाला वाटत असेल तर हे धादांत खोटं आहे. माझ्या मनातल्या भावभावनांचा निचरा व्हावा म्हणून लिहितो.

कुणी मला लेखक वैगेरे म्हंटल की माझ्यातल्या इंजिनियरला धक्का पोहोचतो. कारण अभियंता ही प्रतिमा मला जास्त जवळची आहे. हे ब्लॉग लिहिणं, आय पॅड वर फेसबुकवर कॉमेंट टाकणं, स्मार्ट फोन चं इंटरनेट चं बिल भरणं, झालंच तर घरचा किराणा, कपडे लत्ते, गाडीचं डिझेल हे सगळं मला मी अभियंता असल्यामुळे शक्य होतं. लेखक मंडळी हे सगळं करू नाही शकत असं मी म्हणत नाही. त्यांच्या लेखनातून हे सगळं जमवत ही असतील ते. पण म्हणून त्यांनाच  लेखक म्हणणं जास्त योग्य ठरतं.  मला नाही. मी अ….भि…यं……ता.

एखादया लेखकाला कपडे शिवायची आवड असेल अन कादंबरी लिहिताना त्याने दोन चार टाके मारले तर त्याला तुम्ही शिंपी म्हणाल का?

आज ही माझं मन कंपनीतल्याच घटनांनी उचंबळतं किंवा खट्टू होतं. एखादी चांगली ऑर्डर मिळाली की नाच, कुठे फेल्युअर झालं की बस चिडचिड करत. 

मी कुठल्याही कमाई साठी लिहिलेलं आंतरजालावर टाकत नाही. त्यामुळे ते कुणीही चोरलं तर मला काही फरक पडत नाही. त्यातून त्याला मानधन मिळत असेल तर कदाचित मला थोडा राग येईन. पण मी सुद्धा कमाई साठी लिहिलं अन कुणी ते चोरून जर पैसे कमवायचा प्रयत्न केला तर मात्र मी त्याला योग्य तो न्याय देईन. शाब्दिक, कोर्ट कचेरी…… अगदी काहीही. अन्यथा मी जे लिहितो ते कुणीही, कुठेही टाकू शकतं. स्वत:च्या भिंतीवर (ती पण बोंबलायला खरं तर तुमची नाही), WA वर किंवा कचरा पेटीत.  कुठेही. लिहिल्याचं श्रेय लिहिणाऱ्याला देणं हा सदसदविवेक बुद्धीचा भाग आहे. तो ज्याचा त्याचा प्रश्न. माझी स्वत:ची विवेक बुद्धी जागृत आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. मार्क झुकेरबर्ग ला मार्केंडेय शब्द मीराताई नी वापरला, हे सांगून टाकतो. "लोकांच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतीलही कदाचित, दु:ख मात्र एक समान असतात" हे शरद चं वाक्य हे मी invariably लिहितो. तसंही भासमान जगातल्या दांभिकपणाचं मनावर ओझं असताना उसन्या शब्दांचं अन वाक्याचं ओझं कशाला?

इथल्या लिखाणात अन वाचनात व्यवहार नाही म्हणून गोडी टिकून आहे असं माझं मत आहे.


बरेच जण म्हणतात पुस्तक लिही. माझं मत सांगतो. फेसबुक लिखाण हा एक फॉर्म आहे. त्याला कवितेला असतं तसं एक मीटर आहे. ते जमलं म्हणजे पुस्तक बिस्तक जमेल असं काही नाही. तो वेगळा प्रांत आहे. त्याला समर्पणाची भावना लागते. एकदा deliverables मागे लागले की पळता भुई थोडी होते.      

तसाही माझ्यावर आत्ममग्नतेचा आरोप होतोच. तुम्ही बघितलं असेल तर मी जे लिहितो ते माझ्या भोवती फिरतं. ते खरं तर मी माझ्या ऐवजी मोहन, संजय, प्रदीप असं काही नाव टाकून लिहू शकतो. ते फिक्शन होऊ शकेल. पण ती माझीच फसवणूक असेल. परवा मिथिला सुभाष म्हणाल्या "माणसाने प्रथमपुरुषी एकवचनी लिहिले म्हणजे ती त्याची आत्मकथाच  असते का? फिक्शन असू शकत नाही का?" विचार करावा.

आता माझ्या सत्य अन काल्पनिकता याचं जोड असणार्या लिहिण्याला साहित्यिक मुल्य असते का? मला नाही वाटत.

तुम्ही माझे मित्र आहात, मित्रच रहा. वाचक बनू नका.

असो. काही घटना, काही संवाद, काही वाद, काही प्रतिवाद यावरून झालेलं मंथन.

Wednesday 13 May 2015

attention seeker

चेन्नई हून चार मुलं आली होती ट्रेनिंग साठी, तीन महिन्यासाठी. काल त्यांच्या साठी रात्री पार्टी होती. कंपनीत च रात्री बिर्याणी मागवली होती. जेवण झाल्यावर कुणीतरी गाणी लावली. पोरांचे लागलीच पाय थिरकायला लागले. मी पण दोन वेळा पाय पुढे अन चार वेळा मागे करून हलवले. मला कॉलेज चे दिवस आठवले. स्वत:बद्दल त्यावेळेस बरेच गैरसमज होते. अजूनही आहेत, गैरसमजाचे मुद्दे बदलले आहेत. तर गैरसमज असा होता की, मी खूप चांगला नाचतो. तो समज पुढे एरोबिक्स मध्ये शिस्तशीर नाचताना फोल ठरला. पण गद्धे विशी ती, कोण सांगणार.

ह्या गैरसमजापायी कोणत्याही गणपतीच्या मिरवणुकीत किंवा अजून कुठल्याही नाचणार्यांच्या घोळक्यात मी जरा हटके नाचायचो. म्हणजे लोकांच्या लक्षात यावं म्हणून. त्यावेळेही, लोकं बघून न बघितल्या सारखे करायची, कुणी गालातल्या गालात हसायची. छद्मश्री. हे नवीन नाव कळलं, छद्मी हसणाऱ्यासाठी, मोहन सरांकडून. कुणी दुसर्याच्या कानात काही तरी सांगायचं. त्यातल्या त्यात हे कुणी "सांगणारी किंवा बोलणारी" असेल तर मी अजून चेकाळायचो. साधारणपणे अशा वागण्यार्याला attention seeker म्हणतात.

मग पुढील आयुष्यात कुणाचं लक्ष वेधून घ्यावं असं काही घडलं नाही. नाही म्हणायला, वैभवीच्या आई वडिलांचं लक्ष वेधून घेतलं, कारण इलाजच नव्हता. एकदा महिन्याच्या पगारापेक्षा क्रेडीट कार्ड वर जास्त खर्च केला म्हणून इन्कम tax अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. स्क्रुटिनी झाल्यावर अधिकाऱ्यानेच मला १००० रु वरखर्चासाठी दिले. मागच्या महिन्यात २७ रु कमी सेल्स tax भरला म्हणून ही सेल्स tax अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. यश आणि नील ही 5 स्टार क्याड्बरी वैगेरे आणली तरी ढुंकूनही बघेनासे झाले. त्यांच्या अपेक्षा म्हणे Mac D किंवा KFC सारख्या माझ्या खिशाला न परवडनार्या आहेत म्हणे. 

एकंदरीत फारच गळचेपी होऊ लागली. कुणी बघायला तयार नाही.

शेवटी ती संधी फेसबुकने दिली. मित्रांच्या वाढदिवसाचे नोटिफिकेशन देवून.  लक्षात आलं की सगळे जण वाढदिवसाच्या शुभेच्छा न्यूज फीड मध्ये किंवा टाईम लाईन वर देतात. इथे मी डाव साधला. मी इन बॉक्स मध्ये जाऊन शुभेच्छा टाकतो. अगदीच माहितीतलं असेल अन फोन नंबर पण असेल तर WA वर. अन दुसरं म्हणजे विविध डे च्या शुभेच्छा, सर्वपित्री अमावसे सारख्या सणांच्या शुभेच्छा, नेत्यांच्या शुभेच्छा या आपण दिल्या तर इतक्या पोस्टच्या भाऊ अन बहीण गर्दीत कोण बघणार त्यांच्याकडे , केवळ ह्या कारणासाठी मी तिकडे फिरकत ही नाही.

Hard core attention seeker, you know.

जे आहे ते आहे.


Monday 11 May 2015

हॉर्न

सदर पोस्ट जरा दीड शहाणपणाची. कुणी त्याला स्वत: भोवती उदबत्ती ओवाळणं म्हणतं, अन काल एका मित्राने माझ्या अशा लिहिण्याला तोंडपाटीलकी म्हंटल. तर तीच सही. (बाकी मित्र यादीतील शरद, सौरभ, राकेश, डॉ यशवंत, मिलिंद या अशा अत्यंत सेन्सिबल अन विचाराने प्रगल्भ असलेल्या लोकांच्या आडनावाला वापरून आलेला हा तोंडपाटीलकी शब्द माझ्या डोक्यात गेला आहे. ज्याने कुणी शोधून काढला त्याला बुकलावसं वाटतंय. असो)

सध्या मीरा सिरसमकर अमेरिकेत आहेत. त्यांनी लिहिलं "आठ दिवस झालेत अमेरिकेत. हॉर्न ऐकला नाही."

तुम्हाला म्हणून सांगतो, मी गेले सतरा वर्षं झालेत कारचा हॉर्न वाजवत नाही. अविश्वसनीय आहे, पण हे सत्य आहे. आणि फक्त पुण्यात नाही तर कोणत्याही शहरात. मुंबई, नासिक, औरंगाबाद, नगर, कोल्हापूर, नागपूर, बंगलोर, चेन्नई ह्या सगळ्या गावात मी कार चालवतो पण हॉर्न वाजवल्याशिवाय.

माझे काका इराणला असायचे. लहान असताना माझ्या काकांनी कार घेतली. ठाण्यात आम्ही खूप फिरायचो. कार चालवताना ते म्हणायचे कि परदेशात कुणीही हॉर्न वाजवत नाही. ही गोष्ट माझ्या डोक्यात इतकी फिट होती कि मी ठरवलं कि आपण कधीही स्कूटर चा हॉर्न वाजवायचा नाही. हो म्हणजे, तेव्हा कार घेऊ हे स्वप्नात ही वाटलं नव्हतं.

पहिली कार फियाट. चालवायला लागलो. हॉर्न न वाजवण्याची गोष्ट डोक्यात होती. हळूहळू सवय लावत गेलो. २००० साली santro घेतली. एव्हाना हॉर्न न वाजवणे ही सवय मला फारच आवडू लागली. तेव्हा मुंबईला सचिन काळे म्हणून माझा कलीग होता. तो जॉईन झाल्यावर hands on ट्रेनिंग साठी त्याच्या बरोबर ४ दिवस मुंबई त फिरलो. कांदिवली, अंधेरी, मरोळ, सिद्धीविनायक, विक्रोळी, भांडूप, ठाणे असा बेफाम कार्यक्रम असायचा. शेवटचा call कळव्याचा सिमेन्स चा होता. गाडी पार्क केल्यावर सचिन ने गाडीचा हॉर्न वाजवून बघितला अन मला म्हणाला "चार दिवसात एकदाही हॉर्न ऐकला नाही. बघावं चालू आहे कि खराब झाला आहे."

हॉर्न न वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर तुम्ही गाडी सेफ चालवता. तुम्हाला माहिती असतं कुणीही कुठून ही घुसू शकतं. स्पीड लिमिट मध्ये राहतो. लोकांशी भांडणं कमी होतात. सिग्नल ला उभे असाल तर हिरवा दिवा लागल्यावर हॉर्न वाजवायची सवय आपोआप जाते. ट्राफिक मुळे रस्त्यावर जो मनस्ताप होतो आणि जे आपण कावून, मूड खराब करून ऑफिस ला किंवा घरी पोहोचतो त्या ऐवजी चांगल्या मूडमध्ये असतो.

आणि हे अवघड नाही आहे. एकच हुकमी एक्का आहे. "ज्या वेळेस तुम्हाला हॉर्न दाबायची इच्छा होते त्यावेळेस ब्रेक दाबा." प्रयत्न करून बघा. जमेल तुम्हाला.

आणि हे मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून, आदरवाईज पुष्कळ लोकं नाही वाजवत हॉर्न. ज्याने मला कार शिकवली तो माझा मित्र प्रताप, अजिबात हॉर्न वाजवत नाही. मी ज्यांना कार शिकवली तो मिलिंद अन चेन्नई चा प्रदीप, अतिशय कमी हॉर्न वाजवतात. एक दोन वर्षात नाही वाजवणार नाहीत ते.

अमेरिकन आर्ट मिलर आला होता. मला म्हणाला "No wonder you honk so much. I have seen almost on every truck written "Horn Please". But I am surprised that you do not follow that instruction."

आपला तर गाडी चालवताना मोटो आहे बुवा "No Horn Please OK"

(चढावर गाडी उलटी येणे किंवा रस्त्यावर खुर्ची टाकून गप्पा टाकण्याऐवजी गाडीवर बसूनच गप्पा मारणे अशा अपवादात्मक वेळी वाजवतो ही हॉर्न. पण अपवाद म्हणूनच)

(वैधानिक इशारा: हॉर्न न वाजवता गाडी चालवणे हे प्रयत्नाने होते. आणि ब्रेक दाबायचं लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही स्पीड कमी करणार नाही आणि हॉर्न वाजवणार नाही. झालं मग माझी वाजवणार. वेगळं Disclaimer लिहित नाही बसत)

Saturday 9 May 2015

हं मग, आपलं असंच आहे.

तसा मी पापभिरू माणूस. त्यातल्या त्यात ट्राफिक मध्ये काही पाप करायचं टाळतो. उगाच डोक्याला ताप. नो एन्ट्री त जात नाही, इथे तिथे गाडी लावत नाही, सिग्नल पाळतोच पाळतो. मुंबई ला पुण्याची कार टिपून पकडतात. फिल्म साठी. मुंबई पासिंग च्या गाड्या त्यांच्या रेब्यान मधून दिसत नाहीत. महिन्यापूर्वी  भर उन्हाळ्यात सो कॉल्ड आर टी ओ approved फिल्म उडवली. परवा बालेवाडीजवळ मर्सिडीज ला पुणे ट्राफिक हवालदार फिल्म वरून उकळत होता. पाहिलं तर मर्क ची पासिंग मुंबई ची. लैच मज्जा आली. बदला घेतल्याचा फील आला.

हे असं सगळं असताना आठवड्यापूर्वी फातिमानगर मध्ये डायमंड बेकरी ला सकाळी राहिलेले पाच रु देण्यासाठी गाडी चालूच बाहेर उभी करून दोन मिनिटासाठी गेलो. सकाळ ७:४५ ची वेळ. बाहेर येउन बघतो तर दोन हवालदार, एक तंबाखू चोळत तर एक काठी फिरवत कार भोवती फिरत होते. मी आपलं त्यांच्याकडे लक्ष न देत दरवाजा उघडला, तर एक जण आला
 "ओ, नो पार्किंग हाये"
मी बोललो "अहो, दोन मिनिटासाठी पैसे दयायला गेलो होतो"
तर तो "बरोबर, पण नो पार्किंग आहे इथे"
मी "अहो, गाडी सुद्धा चालू ठेवली आहे. लागलीच निघणार होतो."
हवालदार "घ्या, दीड शहाणे. म्हणजे नो पार्किंग मध्ये गाडी लावता हा एक गुन्हा. अन परत गाडी चालू ठेवता हा दुसरा गुन्हा"
मी अवाक. गाडी चालू ठेवणं हा गुन्हा? दहा मिनिटाची खोटी करून दादा पुता करत सोडलं पण जाताना "कार फिरवता, थोडे नियम वैगेरे पाळत जा जरा" हे म्हणायला विसरले नाही पोलिस दादा.

काल पुलगेट च्या चौकात सिग्नल ला डावीकडे वळायचं होतं. मला रेड सिग्नल होता. उजवीकडून ट्राफिक पण चालू होती. मी अर्थात थांबलो होतो, हिरवा दिवा लागेपर्यंत. मागे BMW किंवा तत्सम अशी गाडी होती. त्याने बहुधा हॉर्न वाजवून पोलिसाला विचारलं, जाऊ का?. हवालदाराने खुण केली, जा म्हणून. मी बघून न बघितल्यासारख केलं. त्याने शिट्टी मारून माझं लक्ष वेधत जा म्हणाला. मी ढिम्म. त्यालाच खुण करून सांगितलं "समोर रेड सिग्नल आहे" म्हणून. तर डोक्यावर हात मारत म्हणाला "अहो, जा की" एव्हाना मागचा BMW पिसाटला होता. प्या प्या करत बसला. पोलिस माझ्या कार जवळ आला अन म्हणाला "अहो जा की, का ताप देताय डोक्याला" मी गाडी बाजूला घेतली अन उतरून पोलिसाला विचारलं

मी: काय झालं?
पो: अहो, काय झालं म्हणून काय विचारताय. मी सांगत होतो ना जा म्हणून.
मी: रेड सिग्नल होता ना. मग का म्हणून जायचं मी
पो: मी सांगत होतो ना जा म्हणून.
मी: अहो तुम्ही कोण? तुमचं काय सांगायचं, उद्या तुम्ही या पेट्रोल पंपाच्या मागे लपणार आणि मी रेड सिग्नल असताना लेफ्ट मारला तर पंपाच्या मागून कारच्या पुढे येत म्हणणार, चला गाडी बाजूला घ्या. दोन तीनशे रुपयाची तोडपाणी होणार. तुम्ही एक दिवशी जा म्हणता अन दुसर्या दिवशी त्याच स्पॉट ला आमची वाट लावता. मला दोनशे रु दया मग मी जातो.

आज अवाक व्हायची पाळी पोलिसावर आली होती. विचित्र हातवारे करत तो म्हणाला "काय एक एक वल्ली असतात राव!" अन माझ्याकडे पाहत म्हणाला "इथे भेटलात, वर नका भेटू"

मग मी पण माझा ठेवणीतला डायलॉग टाकला "अहो, वर कसे भेटणार? तिथे तुम्ही स्वर्गात रंभा उर्वशी बरोबर डान्स करत असणार अन मी नरकात उकळत्या तेलात तळला जात असणार. जे काय बोलायचं ते इथंच उरकून घेऊ"

हात जोडत म्हणाला "या आता" मी पण शिट्टी वाजवत दरवाजा उघडला आणि पोलिसाला बाय करत गेलो.

हं मग, आपलं असंच आहे.

Friday 8 May 2015

जात

तुम्हाला म्हणून सांगतो वयाच्या ४५ व्या वर्षी पर्यंत जात हा काय प्रकार होता माहितच नव्हतं. जी काय ओळख झाली ती फेसबुकवर. सुरुवातीला चार पाचशे मित्र होते तेव्हा हे सुसह्य तरी होतं. जास्त मित्र झाल्यावर आता त्याची धग जाणवायला लागली आहे. मी स्वत: आंतरजातीय विवाह केलेला. कंपनी चालवताना सुद्धा जात, धर्म या गोष्टीला अजिबात थारा नाही. पण आज काल इतर वेळेस अत्यंत हृदय स्पर्शी  शब्दात मनोगत व्यक्त करणारे माझे काही मित्र, जेव्हा कुठल्या तरी दुसर्याच मुद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जातीवर गोळ्या झाडतात तेव्हा नवल तर वाटतेच, पण मनस्वी दु:ख होते.

कुठल्याही हि इतिहासातल्या गोष्टीकडे जातीचा चष्मा लावून ती पाहिली जाते तेव्हा त्याचा चुथडा होतो. मी स्वत: खूप मोठा अभ्यासक वैगेरे नाही आहे पण वाचन मात्र केलं आहे. आतापर्यंत माझ्याही मनात शंका उत्पन्न झाल्या आहेत, पण ते कालसुसंगत असेल असं वाटून समाधान करून घेतलं. चिवडत नाही बसलो. मग ते टिळकांचा गणेशोत्सव असो कि गांधींचं न समजणारं राजकारण असो. त्या काळात त्यांचं वागणं सुसंगत असेलही. त्या काळातल्या लोकांना हे सगळं करा, हे सांगण्याचं द्रष्टेपण तर त्यांच्यात होतं. पण मग नंतर आता ह्या सगळ्या प्रकारची गरज नाही हे तर्काधिष्ठित पद्धतीने सांगणारे द्रष्टे नेते आहेत कुठे. जे आहेत ते  कालबाह्य गोष्टींचा उपयोग करून एकमेकांवर कुरघोडी करण्यात रममाण झाले आहेत. आणि आपण त्यांचेच  समर्थक. आयला, जी मंडळी सावरकरांचा माफी वीर म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला अन जयंतीला उद्धार करतात तीच मंडळी गो हत्या बंदी वेळेस मात्र  "सावरकर म्हणाले,गाय उपयुक्त पशु आहे" चे फलक फडकावत होते.  नव्वदीत उभारलेल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्री ला २००० मध्ये Y २K प्रॉब्लेम न कळणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी आपण ७०-१०० वर्षानंतर ती लोकं कशी चुकीची होती यावर खल करत बसतो.

नेते तर सोडाच, तर आपण संताना सोडलं नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्या जाती काढून एकमेकांवर गरळ ओकतो. हे म्हणजे अती झालं. नाठाळ च आपण. पण आपल्या डोक्यात काठी न मारणारे तुकाराम नाही आहेत हे आपलं दुर्दैव. 

मुळात आपली चेतना, मग ती रागाची असो वा अभिमानाची असो, ती चेतवायला जातीचा वापर केला जातो हेच मुळात लांच्छनास्पद आहे. आम्हाला आमच्या गरिबीची लाज वाटत नाही, आमच्या इथे स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे, आपण भ्रष्टाचार हा शिष्टाचार समजतो, स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली तरी उन्हाळा आला कि पिण्याचं पाणी नाही अशी बोंब मारत असतो. ह्या कुठल्याही गोष्टीची ना खेद ना खंत. आपण आपली जात अन धर्म सांभाळण्यात गर्क आहोत. आपण जातीवंत अन धर्मपालक विष्ठावान दुर्गंधी पसरवण्यात धन्यता मानतो.

असो. जुलै २०१३ पासून फेसबुक जोरात फडफडावयला लागलो. तेव्हापासून जात शब्दाचा उल्लेख असलेली एक पोस्ट टाकली अन ही आता दुसरी. आता यापुढे नाही.

जात