Monday 18 December 2023

 ३ नोव्हेंबर ला जिम मध्ये छातीत दुखल्यासारखं झालं. त्याकडे दुर्लक्ष करत मी काम केलं. ४ नोव्हेंबर ला निगडीत ग दि मा सभागृहात गाडी पार्क केल्यावर रॅम्प वर चालत आलो. नाट्यगृहात ए सी असला तरी मला घाम आल्यासारखं झालं. तिथून मी गाडी चालवत पुण्यात आलो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि जेवण करून मी कंपनीत आलो तेव्हा मला अनइझी वाटत होतं. मी निर्णय घेतला स्ट्रेस टेस्ट करून घेऊ. नेमके माझे स्वतःचे डॉक्टर दिवाळीचा आधीचा आठवडा म्हणून लवकर घरी गेले होते. मी दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊन स्ट्रेस टेस्ट केली जी नेमकी पॉझिटिव्ह आली. 

पण एक गोष्ट त्यात चांगली झाली की डॉक्टर ने सांगितलं की स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह ही शेवटच्या एक मिनिटात आली त्यामुळे ती कदाचित डिसेप्टिव्ह आहे. आधी दोन प्लास्टी झाल्यामुळे डॉक्टर म्हणाले की सी टी अँजिओग्राफी करून घ्या. सोमवारी ६ नोव्हेंबर ला सी टी अँजिओग्राफी झाली आणि सुदैवाने त्यात लक्षात आलं की हृदय एकदम टकाटक आहे. दोन दिवसात माझ्या नेहमीच्या डॉक्टर ला रिपोर्ट दाखवले आणि त्यांनी पण सांगितलं की माझे चेस्ट पेन हे कार्डिअक नाही आहेत. 

गंमत अशी झाली की इतकं सगळं सांगून सुद्धा माझे चेस्ट पेन काही थांबत नव्हते. आणि ते दुखणं हे मी शब्दात सांगू नाही शकत. पण डोकं दुखायला लागल्यावर डोक्यात जशा कळा येतात तसे ते पेन्स होते. त्यावर विचार करत असताना मला एक साक्षात्कार झाला की हा स्ट्रेस प्रॉब्लेम तर नाही आहे? 

मी माझी मानसोपचार तज्ञ बहीण मानसी देशमुख हिची मदत घ्यायचं ठरवलं. तिच्या सेशन मध्ये तिने मला १७५ प्रश्न असलेले प्रश्नावली दिली आणि मला विचारलं की गरज पडली तर मनोविकार तज्ञांकडे जाऊन औषधे घ्यायची तयारी आहे का? मी हो म्हणालो. 

मानसीने माझं डायग्नोसिस केलं आणि तिने सांगितलं की मला अँगझायटी डिसऑर्डर झाली आहे आणि ती वाढण्याअगोदर वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे. तिनेच मला एका सायकियाट्रिस्ट चा रेफरन्स दिला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि मला सांगितलं की कौन्सिलिंग थेरपी चालू करण्याआधी तुमची मानसिकता जागेवर येण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी एकच गोळी दिली. 

त्या रात्री मी ती गोळी घेतली आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः जादू झाल्यासारखे माझे चेस्ट पेन थांबले. 

औषधे चालू आहेत. जानेवारी महिन्यात कौन्सिलिंग सेशन चालू होतील. 

बराच विचार केला की इतकी पर्सनल गोष्ट सोशल मीडियावर सांगावी की नाही. पण शेवटी सांगावी वाटली. कारण मानसिक आजार हा कुणालाही होऊ शकतो आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. 

Wednesday 13 December 2023

 दिवसाचे चोवीस तास आणि वर्षात ३६५ दिवस हे वैश्विक सत्य आहे. पण त्याच आणि तितक्याच काळाचा वापर करून प्रत्येक जण आयुष्य मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जगतो. त्यामध्ये काही लोक आकाशाची उंची गाठतात तर काही जण मात्र भरीव असं काही फारसं करू शकत नाहीत. किंबहुना तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांचा पण विचार केला तर अनेक जण अर्ह समस्ती आयुष्य जगतात. अर्ह समस्ती म्हणजे worthy of existence. काय मानसिकता असावी अशा लोकांची हा प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो. मी जेव्हा या लोकांचा अभ्यास करतो, एकूण जीवनशैलीबद्दल विचार करतो तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. 

त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य जगण्याचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याबद्दल या लोकांच्या डोक्यात खूपच स्पष्टता असते. कुठलंही काम करताना ही लौकिकार्थाने समाजात विशिष्ट योगदान देणारी मंडळी, त्या कामाला सिद्धांताच्या आणि उद्देशाच्या कसोटीवर अगदी तावून सुलाखून बघतात. त्या सिद्धांताला आणि उद्देशाला जागणारं ते काम असेल तर त्यात अक्षरश: झोकून देतात आणि त्यासाठी १००% प्रयत्न पणाला लावतात. पण जर काही कारणाने त्यांच्या मूळ सिद्धांताला धक्का बसणार असेल आणि मूळ उद्देश जर सफल होत नसेल तर बहुतेकदा हे लोक त्या कामाच्या वाटेला पण ही लोकं जात नाहीत. या वैचारिक स्पष्टतेमुळे कुठलं काम हातात घ्यायचं आणि कुठलं नाही याची निवड करताना त्यांचा वेळ फारसा जात नाही आणि मग जे काम हातात घेतलं ते तडीस नेताना ते तन-मन-धन झोकून काम करतात. 

सिद्धांत आणि उद्देश यापैकी एक वेळ जगण्याचे सिद्धांत शोधणं हे सोपं असेलही कदाचित, पण उद्देश शोधणं हे मात्र फार जिकिरीचं काम असतं. स्वतःच्या "असण्याबद्दल" खूप खोलवर विचार करणं हे गरजेचं असतं. वयाच्या कुठल्या पायरीवर याची उपरती होते हा एक मोठा प्रश्नच आहे. काही जण वयाच्या विशीत हे शोधू शकतात तर काही जण तीस, चाळीस किंवा पन्नाशीत याचा धांडोळा घेतात. काहींना मात्र आयुष्य संपतं तरी त्याचा शोध घेता येत नाही आणि अनेक जणांना तर तो शोध घ्यावा याची इच्छा पण होत नाही. फक्त एक मात्र आहे की ज्याक्षणी या सिद्धांताचा आणि उद्देशाचा साक्षात्कार होतो तो युरेका क्षण असतो. आपल्याला लक्षात येतं की आपण ही राजहंस आहोत आणि त्यानंतरच्या आयुष्याला एक वेगळे आयाम प्राप्त होतात. त्या युरेका क्षणाच्या आधीचं आणि नंतरचं जगणं यात प्रकर्षाने जाणवणारा फरक दिसून येतो. 

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हा मूळ उद्देश हा भौतिक गोष्टींशी सांगड घालणारा नसतो. तर तो अभौतिक आणि अमूर्त गोष्टींभोवती रुंजी घालत असतो. एकदा आपलं :असणं" हे भौतिकतेशी निगडित नाही आहे हे लक्षात आलं की त्या उद्देशाला परिपूर्ण करण्यातला प्रवास हा कमालीचा आनंददायी असतो. त्यातून मिळणारं समाधान हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. इंग्रजीत एक शब्द आहे "पॅशन". सामान्यतः त्या शब्दाचा वापर सहजगत्या केला जातो. पॅशन ला मराठीत समानार्थी शब्द दिसत नाही. तरी आपण तिला उत्कट किंवा तीव्र भावना म्हणू शकतो. एखादं काम स्वतःवर ओढून घेताना कुठल्याही भौतिक परताव्याची अपेक्षा न ठेवता काम करणं म्हणजे पॅशन. त्यातील गंमत अशी आहे की जेव्हा या भावनेने काम केलं जातं तेव्हा त्या कामातील गुणवत्ता आणि त्यातून मिळणारे रिझल्ट्स हे उच्च दर्जाचे असतात. त्यामुळेच निःस्वार्थी भावनेने समाजपयोगी काम करणाऱ्या अनेक जणांकडून आपण स्तिमित व्हावं असे अचाट काम झालेलं आपण पाहतो. या  उत्कट भावनेला निखार येण्यासाठी मात्र मनातील उद्देश हा एकतर उदात्त हवा किंवा एव्हरेस्ट इतका भव्य हवा. उदात्त उद्देश आणि त्याची पूर्तता करणारी उत्कट भावना याचा एकत्रित अविष्कार हा दिव्यत्वाची प्रचिती देणारा असतो हे आपण आजूबाजूच्या अनेक उदाहरणावरून बघतो. 

बऱ्याचदा असं म्हंटलं जातं की ही जगणं गाणं करण्याची भावना किंवा तिला सूर देणारा उद्देश हे अंगभूत असावं लागतं किंवा ते जन्मतः च येतं. मला नाही वाटत तसं. बहुतांशी लोक जन्माला येताना एकाच प्रकारची शारीरिक आणि मानसिक क्षमता घेत जन्माला येतात. (काही अपवाद असतात). ते लक्षात न घेता बहुतेकदा असामान्य लोकांना आपण देवत्व देऊन मखरात बसवून टाकतो आणि आपणही काही भरीव करू शकतो या भावनेला तिलांजली देतो. जन्मा नंतरची जडणघडण, त्यातही मानसिक, ही कौटुंबिक आणि  सामाजिक इको सिस्टम वर अवलंबून असते. किंबहुना असं म्हंटलं जातं की वयाच्या सातव्या वर्षापर्यंत माणसाचा मेंदू आपल्याला हवा त्या पद्धतीने विकसित करता येतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यानंतर त्या विचारात बदल घडवून आणता येत नाही. तो बदल घडवता येतो. 

फक्त त्यासाठी लर्निंग. . . . . . . . . . . . अनलर्निंग. . . .. . . . . . . रिलर्निंग ही  पद्धती समजून घ्यावी लागते. थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत जे काही जीवन कौशल्ये आपण शिकलो ती एकतर कुणाला तरी हस्तांतरित करण्यात शहाणपण असतं. हे झालं अनलर्निंग. एकदा ते केलं की आपण नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होतो. या नवीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागतात. त्यासाठी कदाचित वेगळी कौशल्ये नव्याने शिकावी लागतात. ही झाली रिलर्निंग ची पद्धत. यामुळे जगण्यात एक नावीन्यता येते. कुठलंही काम करताना "हे बोअर झालं आहे आहे" ही भावना मनाला शिवत नाही. नवनवीन आव्हानं वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्वीकारण्यासाठी मन घाबरत नाही. 

ही वरची शृंखला लक्षात आली की त्याला पूरक गुण असतो तो म्हणजे योजनाबद्ध नियोजन. नियोजनाशिवाय जर काही काम हातात घेतलं तर अपयशी इतिश्री होण्याची मुहूर्तमेढ आपण रोवत असतो. नियोजन या प्रकारावर थोडा जास्त वेळ काम केलं तर ते काम नंतरच्या काळात पूर्णत्वाला जाण्याची शक्यता जास्त असते.  

एकदा का नियोजन झालं की पुढची महत्वाची पायरी आहे ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. बऱ्याचदा आपण योग्य निर्णय कसे घेता येतील याची वाट बघतो. इथं गंमत अशी आहे की जे लोक लौकिकार्थाने सातत्याने योग्य निर्णय घेत असतात त्यांनी आयुष्यात कधीकाळी खूप चुकीचे निर्णय घेतेलेले असतात. त्यातून जे अनुभव पदरात पडतात त्यातून मग योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. Experience is what you get when you don't get what you wanted असं एक इंग्रजी वाक्य आहे. त्या वेगवेगळ्या अनुभवातून निर्णय क्षमता विकसित करावी लागते. 

निर्णयक्षमता अंगात बाणली गेली की त्याला जोड लागते ते कृतिशीलतेची. कृतीविना निर्णय हे फक्त स्वप्नच  राहतं. कामात चालढकल करणं हे खरंतर कृती टाळणे असंच असतं. त्यामुळे एखादं काम हातात घेतलं तर ते लवकरात लवकर तडीला नेण्यात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च करण्याची तयारी हवी. हातात घेतलेल्या कामाला तडफेच्या कृतीची जोड देत ते जर पूर्णत्वाला नेलं तर त्यातून मिळणारा आनंद हा स्वर्गातीत असतोच शिवाय आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आपसूक येतो. 

या तीन गुणांबरोबर गरज असते ती चिकाटीची, पाठपुराव्याची. मॅकडोनाल्ड चा संस्थापक रे क्रॉक याच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट आहे "फाउंडर". त्यात क्रॉक च्या तोंडी सुंदर वाक्य "Perseverance beats genius"  एखाद्याच्या अंगात भले हुशारी कमी असेल पण त्याची पाठपुरावा करण्याची क्षमता असेल तर तो आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मला असे अनेक यशस्वी लोक माहिती आहेत कि ज्यांनी आपली काही स्वप्ने वर्षनुवर्षे मनाशी जपून ठेवली आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेत, कृतिशीलतेची जोड देत आणि त्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा करत आश्चर्यकारक प्रगती केली आहे. 

तर आहे हे असं आहे. जे लोक आयुष्य अर्ह समस्ती पद्धतीने जगतात आणि जे लोक फारसं काही दखलयोग्य जगू शकत नाही त्यांच्या विचारधारेत हा पंचसूत्राचा  मूलभूत फरक आहे असं माझं मत आहे. लेखाच्या सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला दिवसाचे २४ तास मिळाले आहेत. त्या वेळेचा वापर आपण किती इफेक्टिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह करतो हे आपल्या हातात आहे. येणाऱ्या नवीन वर्षात तो तसा करता यावा यासाठी हार्दिक शुभेच्छा.