Sunday 28 December 2014

तुम मुझे भूल

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्या नायिकेबद्दल आदर दाटून येतो. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्या हिरोबद्दल वाटतं, च्यायला येडं आहे बेणं. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्याच्या सादगीने, त्याच्या अनवट सुरावटीने तुमचे डोळे पाणावले. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की गीतकाराच्या दिव्य प्रतिभाशक्तीने तुम्ही स्तिमीत झाला. माझं आज झालं बुवा.

सिंहगड पायथ्याला जाताना आज सकाळी सुधा मल्होत्रा आणि मुकेश यांनी गायलेलं खालील गाणं ऐकलं. विविधभारतीवर. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो येडा होतो. पण आज माहोलच वेगळा होता. सकाळची वेळ. गाडीत एकटाच. विचारांच्या गर्दीत हरवलेला. अन हे गाणं. साहिर, काय लिहीणार या माणसाबद्दल. कभी कभी चा शेवट करताना जोडलेल्या पहिल्या ओळी. पगलावतो लेकाचा. अन या गाण्यासमोर तर लोटांगण. प्रभा जोशींनी सांगितलं एन दत्ता आजारी होते म्हणून गाणं बांधलं सुधा मल्होत्रांनीच. त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.

विविधभारती. I am love'in it.

तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

मेरे दिल की मेरे जज़बात की कीमत क्या है
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है
मैंने क्यों प्यार किया तुमने ना क्यों प्यार किया
इन परेशान सवालात की कीमत क्या है
तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

जिन्दगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है
जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत ही नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुयी इस दुनियाँ में 
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आँख चुराओ तो ये हक़ है तुमको 
मैंने तुम से ही नहीं सब से मोहब्बत की है

तुमको दुनिया के ग़म-ओ-दर्द से फुरसत ना सही 
सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही 
मैं तुम्हारी हूँ यही मेरे लिये क्या कम है
तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत ना सही 
और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 

Thursday 25 December 2014

अजून एकदा सिंहगड डायरी

काय होतं, मनात काही नसतं हो. पण बोलतात लोकं अन मग मन फसतं हो. आता हेच बघा ना. काल उतरत होतो सिंहगडावरून. समोरून मुलींचा घोळका आला. ४-५ जणी होत्या. साधारण पंचविशीच्या. समोर तीन जणी आणि मागे दोघी जण. त्या दोघी मैत्रिणी आणि एकीने दुसरीला ग्रुपमध्ये आणलं असावं. त्यांचं नाव समजा अ आणि ब. (खूप नावं लिहिली पण सध्या फ्रेंड लिस्ट मोठी झाल्यामुळे वेगवेगळी नावे आहेत. फेसबुकचे वातावरण जरा मचुळले आहे सध्या. त्यामुळे अ आणि ब यावर समाधान माना) तर तिघींमध्ये एक भैरवी होती. भैरवी अ आणि ब कडे बघून म्हणाली "ए, तुम्ही दोघी किती सेम टू  सेम दिसता" तर अ म्हणाली "हो मग, आम्ही शेजारीच राहत एकमेकांच्या."

एकटाच होतो. मनातल्या मनात हसत निघालो.

*******************************************************************************

BSNL म्हणजे भगवान से भी नही लगता……. म्हणे

*******************************************************************************

पूर्ण उतरलो. नेहमीच्या शेतात गाडी पार्क केली होती. मी पोहोचलो तेव्हा सीन असा होता, कि एक साधारण तिशीची  स्त्री, अर्थातच सुंदर. लग्न झाल्यापासून सुंदर स्त्रियांशीच माझी का गाठभेट होते हे एक न सुटलेलं कोडं आहे. हा, तर त्या बाईंनी माझ्या कारचा ड्रेसिंग टेबल केला होता. बॉनेट वर पर्स अन त्यातून मेक अप चं सगळं सामान. त्या कारच्या खिडकीत बघून केश संभार सावरत होत्या. त्यावेळेस दुसरी एक कन्यका साईड मिरर मध्ये पापण्यांना ब्रश ने काही तरी छळत होती. कारच्या एका बाजूला ह्या दोन तर पलीकडे अजून दोन कन्यका लिपस्टिक चा मुक्त वापर करत होत्या. बॉनेट पूर्ण भरलेलं.

मी थक्क होऊन बघत बसलो. म्हणजे ड्रेसिंग टेबल कडे. कन्यका आणि त्या सिनियर मग्न होत्या. मी मागे येउन उभा राहिलो, घसा खाकरला. पण कुणी बघायला तयार नाही. मी काही बोलणार तेवढयात त्या सिमरन चं, आलियास सिनियर, माझ्याकडे लक्ष गेलं. अन फणकार्याने म्हणाली "काय बघताय काका" त्या रागाचा अंदाज घेत तो काका हा शब्द शिसासारखा कानात गेला. मी बोललो "अहो माझी कार" तर ती म्हणाली "ओह सॉरी हं, लक्षात च नाही आलं." वर मंजुळ आवाज करत म्हणाली "रागावलात का". हे ती असं ती हसत म्हणाली अन मी फसत गेलो. काही न बोलता कार चालू करून स्पीड पकडणार तेव्हढ्यात मागे डिकीवर हात आपटून कार थांबवा असा इशारा केला. आता ती मला काय करणार अशी कल्पना करत थांबलो तर समोर बॉनेट आणि वायपर च्या मधे तिने भली मोठी हेयरपिन अडकवली होती. ती ओढून घेतली.

देवी माझ्यावर प्रसन्न् आहे मित्रांनो. नाहीतर विचार करा, मी घरी पोहोचलो आहे. सोसायटीच्या गेटवर वैभवी उभी आहे. तिचे लक्ष कुठेही न जाता हेयरपिन कडे जातं....................Rest in pieces च्या मायला.

********************************************************************************

कोपर्या कोपर्यावर मोबाईल मधून फोटो उडवणारी जनता बघून वाटते, कि गेल्या शतकात लोकांनी जितके फोटो उडवले असतील तितके या दशकात याबाबत मला शंका नाही.
********************************************************************************
सिंहगड वरून परत येताना डावीकडे पाटी दिसते " Advocate अमृता मालुसरे". मला बर्याचदा वाटतं, एक दिवशी कार थांबवावी, घरात जावं आणि विचारावं "ताई, तुम्ही त्या वीर तानाजी मालुसरे यांचे वंशज का" त्यांनी हो म्हणावं आणि मग मला त्या काळातील त्यांच्याकडे असलेली पत्रे किंवा काही वस्तू दाखवाव्यात. मी त्या वस्तूवर हात फिरवत इतिहासात हरवून जावं आणि आपसूक माझ्याकडून ललकारी पडावी "क्षत्रिय कुलवंतस राजाधिराज गोब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत शिवाजी महाराज की जय"

*******************************************************************************

अजून एकदा सिंहगड डायरी

Monday 22 December 2014

बाकी निवांत

दहावी करून डिप्लोमा ला गेलो तेव्हा आपल्याच मस्तीत मश्गुल होतो. Mechanical ला असून दोन मुली होत्या वर्गात, हे म्हणजे alien असल्यासारखं होतं त्या काळात. पण आम्ही हॉस्टेल ची पोरं कुठल्या धुंदीत होतो आठवत नाही, पण कधी त्या दोघींशी बोललेलो आठवत नाही. पौगंडात असा गंडलो.

मग भारती विद्यापीठात. डोळे माझे परजून तयार झाले होते एव्हाना. पण तिथल्या फटाकड्या भोवती इतकी पोरं असायची, म्हणजे मराठी पोरी असल्या तरी पोरं मात्र नॉर्थ इंडियन, कि २० मीटर त्रिज्येच्या आत कधी असल्याचं आठवत नाही.

पुढचा टप्पा SKF. hardcore mechanical कंपनी. स्त्री पार्टी होती. पण आमच्यापासून कोसो दूर. आम्ही पोरं त्यांच्या बद्दलच्या दंत कथा ऐकायचो. कोण कुणाबरोबर फिरतं वैगेरे. पण ते फक्त गॉसिप. मुंडकं खाली घालून bearings चं production किती झालं यातंच आम्ही मश्गुल.

एव्हाना लग्नही झालं.

मग रोलॉन चा जॉब. ऑफिस बंगलोर ला. मला जावं लागायचं, चार महिन्यातून एकदा. तिथे होत्या मुली. म्हणजे कशी एकदम ideal कंडीशन. मी बंगलोर मध्ये, तरुण. ऑफिस च्या पोरी त्याही तरुण. संध्याकाळ नंतर वेळच वेळ. हो, म्हणजे तेव्हा हे फेसबुक प्रकरण पण नव्हतं. पण इथे पण नियती निष्ठुर. MD संजीव शहा बहुधा ad मध्ये लिहित असावा "कृपया सुंदर दिसणाऱ्या मुलींनी अर्ज करू नये." त्यामुळे आम्ही संटे च पार्ट्या करायचो. त्यातही मेरी नावाच्या एका accounts ऑफिसर चं कृष्णा नावाच्या ऑफिस बॉय शी जुळलं. प्रेम हे आंधळं असतं हे त्यावेळी कळलं. (तसं वैभवी चं अन माझं लग्न झाल्यावर सासरच्या लोकांमध्ये "जाऊ दया, जे झालं ते झालं, प्रेम आंधळं असतं, काय करणार" अशी कुजबुज झाल्याची ऐकवात आहे).

मग मीच धंदयाला बसलो. (अर्थ कसे विचित्र प्रचलित होतात नाही).  मी धंदयाला लागल्यावर बाकीचे धंदे करायला वेळ च नाही मिळाला.

तसंही म्हणा माझ्या माय बापाचे संस्कार, बायका पोरांचे प्रेम, अरे चुकलं, बायको पोरांचे प्रेम या पेक्षा "तसलं" काही करायला opportunity मिळाली नाही म्हणून मी सोवळा राहिलो हेच वखवखतं वास्तव आहे. आणि त्याही पेक्षा "तसलं" काही प्रकरण पुढे गेलं तर ते आवरण्याची क्षमता या पामरात नाही हे प्रखर आणि धगधगतं सत्य आहे.

(तुम्हाला म्हणून आतली गोष्ट सांगतो chat बॉक्स मध्ये माझं आणि माधुरी नेने चं बोलणं झालं आणि केवळ त्या ओढीपायी ती डेनवर सोडून नवरा आणि पोरा सकट मुंबई ला आली. chat बॉक्स ची ही ताकद आहे. "श्रीराम नेने, माफ करा.")

Friends, let us use social media to spread love and respect, not hate and anger.

बाकी निवांत

Thursday 18 December 2014

शेती

हर्षल बोलला म्हणून यथाशक्ती यथाबुद्धी लिहायचा प्रयत्न करतोय.

तर शेती उद्योगाला प्रचलित उद्योगासारखा बघावं का?

सगळ्यात प्रथम आपण मार्केटचा विचार करू. तर भारतासारख्या देशात शेतीच्या उत्पादनाला मरण नाही. खाणारी तोंडे इतकी आहेत कि जे उगवेल ते खपेल. ही luxury इतर उद्योगाला नाही आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट, ग्राहक, याची चिंता करायची गरज नाही आहे. मग एखाद्या उद्योगाला लागणारे घटक शेतीत कसे काम करतात, ते बघू.

१. शिक्षण: कुठलाही उद्योग चालू करताना त्याचं शास्त्रीय शिक्षण गरजेचं असावं. आता लागलीच कुणी तरी म्हणेल कि बिल गेटस कुठे शिकला होता. तर अपवाद हे नियम नाही होऊ शकत. मला असं वाटतं कि शेतीचा शास्त्रीय अभ्यास देणाऱ्या संस्थांनी जास्त meticulously काम करायला हवे. शेतीच करायची तर काय करायचं शिकून, हा attitude सोडून द्यावा. शेती करण्याच्या शास्त्रीय पद्धतीशिवाय vocational ट्रेनिंग द्यायलाच हवे. अभियांत्रिकी उद्योजक आणि शेतकरी यात मला हा पहिला फरक जाणवतो. (आता कुणी आजकालचा शेतकरी शिकला नाही असं कुणी सांगितलं, असा वाद घालू नये. जे दिसतं ते लिहितो)

२. उत्पादन: कुठलेही उत्पादन करायचे तर ढोबळ मानाने एखाद्या मटेरियल चे स्वरूप बदलतो. मग तो लोखंडी बार असो कि सोने असो. आता हे बेसिक raw material मिळण्यात धोके असतात. पण विचार करा, शेतीचे raw material काय, तर शेत जमीन, बी बियाणं, खत आणि मुख्य म्हणजे पाणी. आता ह्या पाण्याची उपलब्धता करून देणे कुणाच्या हातात आहे. निसर्गाच्या. निसर्ग पाणी देतो असं एक वेळ गृहीत धरू. पण शेतकऱ्याला ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात मिळते का हि कुणाची जबाबदारी आहे. त्या उपरही म्हणू कि शेतकर्याने पाणी वाचवले पाहिजे. पण बदलत्या परिस्थितीत हे ज्ञान त्याला कुणी दिले आहे का? थोडक्यात प्रचलित उद्योगाला raw material चे धोके कमी तर शेतीला सगळीच अस्थिरता.

३. वातावरण: गारपीट, बेधुंद पाऊस, वादळ ह्याला शेती जितकी vulnerable असते तितका दुसरा कुठला उदयोग असतो? तर उत्तर आहे कुठलाच नाही. आणि नुकसान तरी कसं तर हाताला आलेलं पीक भुईसपाट. म्हणजे आमच्या इंडस्ट्री मध्ये माल बनवला, ट्रक ने पाठवताना, ट्रक नदीत पडला आणि संपलं. हि अशी टांगती तलवार सतत डोक्यावर.

४. प्रोसेसिंग: धान्य, फळं, भाज्या बनवल्या, उत्पादित केल्या. पण पुढं काय. शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन हे ग्राहकाला पोहोचवायची व्यवस्था कुठे आहे. म्हणजे जास्त उत्पादन केलं तर प्रोसेसिंग करता येत नाही म्हणून फेकून द्यायचं अन कमी उत्पादन झालं तर उत्पन्न कमी. किंवा मधले दलाल लाटणार.

५. अर्थशास्त्र: बाकी मग बँकेचे लोन, त्याचा इंटरेस्ट, त्याचा उत्पन्नाशी ताळमेळ याचं काही धोरण शेतकऱ्याकडे असतं का आणि जर असेल तर त्यावर त्याचा कंट्रोल असतो का? त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे का? ते ज्ञान गरजेचे नाही का? आहेच तर मग कोण देतं त्यांना हे ज्ञान? असे असंख्य प्रश्न उभे राहतात. आणि देत असून जर इतक्या घाऊक भावात आत्महत्या होत असतील तर शिकवणार्यांच काही तरी चुकतंय. शेतीचं यांत्रिकीकरण केव्हा करायचं, किती जमीन असली म्हणजे break even point त्या उत्पन्नाला येतो. आपण बर्याचदा ह्या ज्ञानाची खिल्ली उडवतो, पण याचा उपयोग धंद्यात होतो हे नक्की.

असो. पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे "भारत हा शेतीप्रधान देश आहे" यापलीकडे काहीच माहित नाही, आमच्या उदयोगात आम्ही काही ठोकताळे बांधतो, त्यातूनही प्रॉब्लेम येतात पण त्याची तीव्रता कमी. जे गोत्यात येतात ते स्वत:च्या कर्माने येतात. मला असं वाटतं शेतीचं तसं नाही. शेतीमध्ये शेतकऱ्याच्या कंट्रोल च्या बाहेरच्या खूप गोष्टी आहेत. आणि त्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर SWOT analysis केलं तर strength खूपच कमी आहेत शेती उदयोगात तर weakness खूप जास्त. opportunity ला मरण नाही पण threats चा भडीमार आहे. मुख्य म्हणजे आमच्या उदयोगात threats या hypothetical असतात तर शेतीत ते वास्तव आहे.

त्यामुळे कुबेर म्हणतात त्याप्रमाणे शेतीला बाकी उद्योगासारखे ट्रीट करता येणार नाही. वरील मुद्द्यांवर शासनाने काम केलं तर १०-१५ वर्षानंतर त्या दृष्टीने विचार करता येईल. पण जर शेतीला आणि पर्यायाने शेतकऱ्याला सक्षम केलं नाही तर आत्महत्येचं पाप आपल्याच अंगावर आहे हे ध्यानात असू द्यावे.

(सदर लेखक हे लोकांचे भले करण्याच्या नावाखाली वाटेल ती पापं करणाऱ्या भांडवलशाहीचे मायक्रो लेवल चे का असेना पुरस्कर्ते आहेत. चूभू देणे घेणे)

Wednesday 17 December 2014

अज्ञानी

आता याला confession म्हणा की अजून काही. पण हे खरं आहे. सांगायला लाज वाटते पण शेती आणि शेतकरी या विषयी फारंच कमी माहिती आहे मला. दररोज होणार्या आत्महत्या या बातम्या वाचून जीव जळतो, पण क्षणभरच. नंतर परत ये रे माझ्या मागल्या. कदाचित सारं आयुष्य शहरात गेलं माझं, त्यामुळे कनेक्ट होत नसेल.

शेती, तिचे पावसावर अवलंबून असणे, बि बियाणांचे भाव, खतं- कीटकनाशकांचा वापर, बँकांचे interest rates याची एकमेकांशी विचित्र सांगड होऊन शेतकरी पार आत्महत्या करायला प्रवृत्त होतो यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. त्याचं अर्थकारण किती complex असेल की अगदी होलसेल मधे लोकं जीव देत आहेत. शेतीचं यांत्रिकीकरण करणं योग्य की अयोग्य, त्याने ट्रँक्टर कधी घ्यावा, अंहं एकदम ढ.

खरंतर शेतकरी, अन्नदाता आपला. त्यांची अशी ससेहोलपट बघताना मन द्रवते, पण त्यावर उपाय काय यावर मत प्रकट करण्याइतकीही अक्कल आपल्याला असू नये याचं वाईट वाटतं.

असो. काही गोष्टींचा अभ्यास पुर्णपणे अभ्यास न करता अक्कल पाजळवायला अन जाहीरपणे लिहायला आपण पेपरचे संपादक थोडी आहोत.

आपल्याला शेतीमधलं कळत नाही हे लिहीताना वाटलं, बरं आहे, आपण निर्लज्ज  नाही आहे ते.

****************************************************************************

फेसबुकवर बर्याचदा जातीवरून चर्चा होते. शेतीसारखंच या क्षेत्रातलं माझं ज्ञान तोडकं आहे. आणि का अज्ञानी असू नये. लहानाचा मोठा झालो, पण जातीबद्दल ना कधी घरी विषय ना शाळेत. दहावीनंतर डिप्लोमा ला गेलो. तिथं रमेश नारखेडे नावाचा जीवलग मित्र झाला. तो काही लोकांना जयभीम म्हणायचा. मी एके दिवशी विचारलं, तु नमस्कार च्या ऐवजी जयभीम का म्हणतोस. पहिल्यांदा राग आला त्याला, पण मला खरंच काही माहित नसल्यामुळे शांत झाला.  मग तो मला कॉलेजच्या शेजारी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर घेऊन गेला. आणि सांगितलं भीमराव आंबेडकर आणि त्यांचं महत्व. दोस्ती दृढच राहिली.

यथावकाश लग्न झालं. आंतरजातीय. विरोध झाला, नाही नाही जातीवरून नाही, अस्मादिक डॉक्टर नव्हते म्हणून. ज्या घरात मला दिलं आहे ते तर राष्ट्रीय संमेलन. माझं आंतरजातीय, वैभवीची बहिण क्षितीजा चं arranged आंतरजातीय, भाऊ अमोल त्याचंही स्वजातीत नाही. चुलत भाऊ शंतनु ची बायको ब्राम्हण, बहिण राधिका चं पंजाब्याशी लग्न. दुसरा चुलत भाऊ संजयची बायको ख्रिश्चन तर चुलत बहिणीचा नवरा ब्राम्हण. मामे बहिण चारू चा नवरा तमिलियन तर मावस बहिण शिल्पाचा नवरा काश्मिरी. प्रसादचं arranged आंतरजातीय. इतकंच काय वैभवीच्या आजोबांनी ब्राह्मण बायको शी लग्न केलं होतं. जमलो कधी अन जातीवरून भांडायचं म्हंटलं तर कुणी कुणाशी भांडायचं.

मी कधी कुणाची जात नाही काढली न माझी कुणी. (एकच आहे पण तो च्युत्या आहे हे जगाला माहित आहे).

मधे मला एका मोठ्या कंपनीतून फोन आला "तुमच्या employees ची जात लिहून पाहिजे" मी विचारलं "का" तर म्हणाला आमच्या कंपनीचा नियम आहे. मी बोललो "employee ला घेताना जात विचारायची नाही हा माझा नियम आहे" तर म्हणाला "सांगावीच लागेल" मी म्हणालो "फोन ठेवतो, परत फोन करू नका" तर साहेबाला घेऊन आला. सगळं कळल्यावर मला म्हणाले "government ला डाटा द्यायचा आहे, प्रायव्हेट सेक्टर मधे मागासवर्गीयांचं स्थान काय?" बोललो "हे आधी सांगायचं ना मग, नियम आहे म्हणून काय सांगता" पोरांना बोलावलं "या कारणासाठी जात विचारतोय" डाटा अमनने गोळा केला अन कंपनीला दिला. (नंतर मग बर्याच कंपन्यांनी मागितला)

जात अजूनही आपल्या समाजात इतकी खोलवर रूजली आहे हे मला फेसबुकवरच कळतं, अन मनस्वी दु:खही होतं. लोकं कधी समोर वार करतात तर कधी आड़ून.

जातव्यवस्था फ़ारशी माहित नसलेला मी एक अज्ञानी माणूस आहे. 

Saturday 13 December 2014

जोशी

मी मंडलिक, साधारण पणे मला मांडलिक या नावाने बोलावले जाते. जी लोकं फारच घाईत असतात, म्हणजे इंग्रजी स्पेलिंग पूर्ण वाचायचा हि त्यांना वेळ नसतो ते मला महाडिक असे बोलावतात. ज्यांना ऐकायचा वेळ नसतो ते मला पुंडलिक नावानेही बोलावतात. काल तर गम्मत झाली. तो कुरियर वाला मला कुंडलिक म्हणून बोलवत होता. असो आडनावामुळे गमती होत असतात. त्यावरून आठवलेलं.

कॉलेज मध्ये आमचे  दोन मित्र. मिलिंद जगन्नाथ जोशी आणि मिलिंद रामचंद्र जोशी. आता बोलवावं तर लागायचंच. "ए, अरे मिल्या जोश्याला बोलाव रे." आता या प्रश्नांवर कोणता मिल्या जोशी  हा प्रतिप्रश्न यायचाच. बरं या दोघांची अंगकाठी अन रंग पण सारखाच. दोघानाही डोक्यावर केस. म्हणजे कॉलेज मधल्या प्रचलित हाका "जाड्या किंवा बारक्या" "लंब्या किंवा बुटक्या" "काळ्या किंवा गोऱ्या" "टकल्या आणि केसवाल्या" हि अशी वर्गवारी पण करता येणं अवघड.

मग यावर मार्ग काय? तर एक दिवशी कुणी तरी म्हणालं "मिल्या जोशी ला बोलाव ना राव" तर कुणीतरी विचारलं "अरे जगन्नाथाचा कि रामचंद्राचा". झालं, ती प्रथाच चालू झाली. मिल्या जोशीला ला बोलाव म्हंटल कि पुढचा प्रश्न "जगन्नाथाचा कि रामचंद्राचा".

कॉलेज मध्ये कॉरिडोर मध्ये जात असताना एके दिवशी लेक्चर ला जात असताना साधारण ४०-४५ च्या गृहस्थाने मला अडवले. आणि कुठली ब्रांच वैगेरे विचारलं आणि पुढे म्हणाले "मिलिंद जोशीला ओळखतोस का?" मी विचारलं "कोण, जगन्नाथाचा कि रामचंद्राचा?" तर ते चपापले असावेत, अन लागलीच सावरून म्हणाले "जगन्नाथाचा". मी पण क्लासला जायच्या तिरमिरीत, बाजूने जाणार्या प्रदीप ला सांगितलं "ए जरा, जगन्नाथाच्या मिल्या जोशीला बोलाव रे" आणि त्या गृहस्थाला विचारले "कोण आलं म्हणून सांगू?"

तर देवदास मध्ये "डोला रे" गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या बघताना जसे माझे बुब्बुळे फिरतात अगदी तसेच  माझ्याकडे अन माझ्यापेक्षा सावळ्या असलेल्या प्रदीप कडे बघत ते गृहस्थ कडाडले "मी जगन्नाथ जोशी"

फूटलोच आम्ही.

Wednesday 10 December 2014

कभी ख़ुशी कभी ग़म

मिलिंदने उरलेलं शेवटी खाणार्या माणसाचा उल्लेख केला आणि माझं मन अगदी ३०-३२ वर्षं मागे गेलं. आम्ही चार, बाबा-आई-मी-उन्मेष आणि काकांची फ्यामिली काका-काकू-जयेश-स्वाती. आम्ही एकत्र दोन अविस्मरणीय ट्रीप केल्या. एक गोवा आणि दुसरी उत्तर भारत. दोन्ही वेळेसच्या आठवणीनी  ह्या मनाचा एक कोपरा व्यापून राहिला आहे. आणि माझाच का आमच्या सगळ्यांचाच.

आम्ही चौघं, मी, उन्मेष, जयेश, स्वाती साधारण एकाच वयोगटाचे. सातवी आठवीतले १३-१४ वर्ष वय. त्यात स्वाती सगळ्यात लहान. आधीच शेंडेफळ अन त्यात तीन भावात एकंच बहीण, त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी.  त्यावेळेस ट्रीपला हॉटेल मध्ये जेवण करताना मोठे चार एका टेबल वर आणि आम्ही बारके एका टेबल वर अशी विभागणी व्हायची. आमचे शरद काका, म्हणजे एकदम राजा माणूस. खूप मजा करायचे. ते पैज लावायचे, ज्यांनी ताटात लं सगळं संपवलं त्यांना बक्षीस. कधी चोकलेट, कधी रुपया तर कधी काही. आमच्या भावंडापैकी माझं संपायचं आणि थोडं फार जयेशचं संपायचं पण स्वाती आणि उन्मेषच कधीच नाही. मग ते माझ्याकडे बघायचे आणि मी त्यांच्या उरलेल्या अन्नाकडे. मनातून खुश व्हायचो. आणि सगळी ताट बिलकुल साफ करायचो. हा सिलसिला कित्येक वर्षं चालला.

मोठेपणी हा किस्सा सांगताना माझं नाव "मी खाईल" मिखाईल असं सांगताना सगळेच खदखदून हसायचे. पण आजही माझं आणि जयेश चं ताट चाटून पुसून साफ असतं. स्वाती तसंही कमीच खाते. उन्मेषच्या ताटात मात्र अजूनही residual असतात.

वर्षं सरली. स्वाती कॅनडा त असते. जयेश ठाण्यात असतो. उन्मेष पुण्यात असतो पण भेट दोन आठवडयात. सगळे आपापल्या रगाड्यात आहेत. माझ्या खाण्यावर हि बंधन आली आहेत. त्यामुळे सध्या माझंच ताट चाटून पुसून स्वछ करून टाकतो. आणि काय करणार दुसर्या टेबलवर बसणाऱ्या  चार जणांपैकी शरद काका, आशा काकू आणि माझे बाबा हे अनंताच्या प्रवासाच्या गेले आहेत. त्यामुळे सध्या ताट नाहीतर त्या तीन रिकाम्या जागांकडे आशाळभूतासारखा बघतो आहे.

******************************************************************************
दुसरे पंडितजी. त्यांनी सांगितले कि त्यांचे मित्र त्यांचे किती कौतुक करतात ते. या उलट माझं. माझा एक मित्र आहे. औरंगाबादला बरोबर होतो. हुशार आहे. पण स्वत:ला अति शहाणा समजतो. म्हणजे माझ्या साध्या हलक्या शब्दातल्या पोस्ट ला पार हलक्या दर्जाची आहे हे दाखवण्याचं कसब त्याच्या अंगात आहे. बरं याला मी इतक्यांदा तोंडावर पाडलं आहे. कारण आपण एकदा काय बोलतो आणि नंतर काय याचा अर्थ अर्थी काही संबंध नसतो. पण तोंडावर आपटून याचं नाक वरंच असतं. किमान पंचवीस वेळा तरी या मित्राने विनोदी पोस्टमधून काहीतरी गंभीर, सामाजिक पोस्टमधून अध्यात्मिक, आत्मनिंदा केली असेल तर पुढे जाऊन न मागता सल्ला देणे अशा मुळ पोस्टच्या आसपासही न फिरकणार्या पासिंग कॉमेंटस नी पार डोकं पकवून टाकलं आहे. आपला जुना मित्र आहे ८३ पासून, म्हणून इतके दिवस गपगुमान ऐकून घेतलं. आता मात्र मित्रा, तुझी हुशारी तुलाच लखलाभ. कधी भेटलोच तर चहा पिऊ, बियरही पिऊ पण बंगलोरची हवा कशी अन पुण्याला महागाई किती इतकं बोलू, बास!

Saturday 6 December 2014

Attitude

"Have not you ever pissed off, Rajesh" लहानपणापासूनचा मित्र. हॉटेल ambassador मध्ये. अर्थात २ पेग रिचवल्यावर. मधल्या काळात काय घडलं त्याला माहितच नाही. त्याचाही बिझिनेस आहे मोठ्ठा. बर्याच वर्षांनी. लिहीलेलं वाचलं होतं त्याने.  "नाही म्हणजे नेहमीच कसं गोड गोड. तुला कधीच त्रास होत नाही का लोकांचा?"

आता काय सांगू या भावड्याला. अरे मित्रा, हा पाच फुट साडेनऊ इंचाचा, अन ८० किलोचा देह आहे ना, तो लोकांनी, अन लोकांनी का मित्रांनीच, केलेल्या अपमानाने झिजून झिजून एवढा झाला आहे रे. टाचण्या टोचायच्या आतून. पुना हॉस्पिटल चे वाटवे डॉक्टर, हो हो तेच psychiatrist, व्यथा मांडली त्यांच्यासमोर. त्यानंतर कथा सादर झाली.

कुठल्या देवाचं मंदिर आहे माहिती नसायचं. जायचं फक्त, डोकं टेकवायचं आणि परत. कुठला देव अन कसलं काय.

सपोर्ट मागायचो तेव्हा लोकांना वाटायचं financial सपोर्ट पाहिजे. बोंबला, मोरल सपोर्ट नावाचा एक प्रकार असतो हे कळायचं नाही लोकांना.

रेसकोर्स वर मणभराचं ओझं मनावर घेऊन जात असताना पुर्या ताकदीनिशी त्याला गवतावर फेकून ढसाढसा रडत हलका झालो, तेव्हा कुठे आता बघतो आहेस मला.

जवळच्याने दाखवलेल्या अविश्वासाने त्याचा फोन आला कि थरथर कापायचो, नाही नाही भीतीने नाही, आता हा नालायक परत आपल्यावर अविश्वास दाखवतो का म्हणून!

पासिंग comments नि उन्मळून जायचो. साले, हि बांडगुळं, शहाणपणा चोदवायची. एकेका गोष्टीसाठी रक्त आटायच. वैतागून सिगारेट प्यायचो ना, तेव्हा शिलगावताना हात थरथरायचे माझे. एकेक कश मारताना एक पाकीट ओढल्या इतकी रक्त वाहिनी आकुंचन पावायची. हृदय पिळवटत गेलो, इतकं कि त्याला रक्तप्रवाह कमी पडायला लागला. नळीचं भोक मोठं केलं तेव्हा कुठे पुरवठा पाहिजे तेव्हढा झाला.

गोर्यांशी हात मिळवले तेव्हा एकाने विचारलं "what are your objectives of this jv" त्याला बोललो "ते प्रोफेशनल objectives तर meet होतील. माझं एक पर्सनल ओब्जेक्टीव आहे. या ताणताणावा मुळे मी आयुष्यातला विनोद हरवून बसलो आहे. तो मला परत आणायचा आहे. I would like to get back my lost sense of humor" त्या गोर्याला माहिती नव्हतं, हातरूमाल असतो माझ्याकडे. येडा टिश्यू पेपर देत होता डोळे पुसायला.

मित्रा, अन साधारण एक वर्षापूर्वी लिहायला लागलो. अन त्याचबरोबर दान पण बरोबर पडत गेलं अन भाऊ हा काय positive का काय म्हणतात ना, तो attitudeहि  आला. पण फार मिन्नतवारीने आला आहे रे तो. आणि आताच त्याला सोड म्हणतोस. आता नाही सोडणार त्याला.

जे आहे ते आहे. त्याला आत्मस्तुति म्हण की स्वत:भवती स्वत:च उदबत्ती ओवाळतो म्हण. Choice is yours. मनात येईलही तुझ्या, इथं भेटलास वर नको भेटू म्हणून. कशी होईल भेट, तु स्वर्गात अन मी नरकात. काळजी नसावी.

आणि हो, दारू मलाही चढते बरं का!

बाकी निवांत. Happy new year. 

Wednesday 3 December 2014

संभ्रमित

स्वच्छ भारत, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, हाय स्पीड ट्रेन्स, (आणि हो, हाय स्पीड च बरं, ते बुलेट ट्रेन विसरा),  कालव्यांचं सोलारीकरण, स्मार्ट सिटीज, जनधन, मिशन हाउसिंग, मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया आणि minimum govt, max governance साधारण या एकादश योजनांवर भाजप सरकारची दौड़ चालू आहे. लोकांचं भले करण्याच्या नावाखाली पापं करण्याचा मक्ता असणार्या भांडवलशाहीचा मी अगदी मायक्रो लेवलचा का असेना पण प्रतिनिधि आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांबद्दल उत्सुकता आहे आणि हे तडीला जायला हवं असंही मनोमन वाटतं. राहता राहिला अदानी आणि अंबानींचा सतत होणारा उल्लेख. खरं तर अनुल्लेख म्हणू.  पण राजकीय पुढार्यांना हाताला धरून स्वत:च्या धंद्याची भरभराट करण्याची (सत किंवा कु, व्यक्तीसापेक्ष आहे) प्रवृत्ती  जगात सगळीकडेच आढळते. आपण कसे अपवाद असणार. आणि रिलायन्सचं म्हणाल तर ३ लाख कोटी पर्यंत उलाढाल ही त्यांनी कॉंग्रेसच्या राजवटीतच achieve केली होती. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या उन्नतीवरून पोटशूळ उठण्याचं काही कारण नाही. अहो इतकंच काय, पण ज्या महात्मा गांधींचा उल्लेख आपण साधी रहाणी यावरून करतो त्यांनीही घनश्यामदास बिर्ला अन जमनालाल बजाज या भांडवलदारांना मदत केली असा आरोप चर्चिला जातोच की! मला तर वाटतं की भांडवलदारांना जर स्वत:पासून चार हात कुणी दुर ठेवलं असेल तर भारतातील सध्याच्या प्रचलित भांडवलशाहीचे पुरस्कर्ते, उद्गाते मनमोहनसिंग यांनीच. आता या अकरा योजनांतूनच रू २५ लाख कोटींची उलाढाल होणे अपेक्षित आहे. समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आतापेक्षा वरच्या स्तराला नेले जाणार आहे हे न समजण्याइतकं आम्ही दुधखुळे तर नक्कीच नाही आहोत. उदाहरणच द्यायचं झालं तर निव्वळ टॉयलेट बांधायला सँनीटरीवेअर बनवणार्या सर्व कंपन्या पुढील ४ते ५ वर्षासाठी बुक असणार आहेत.

त्यामुळे प्रश्न तो नाहीच. प्रश्न आहे तो हे सगळं साध्य करताना अमूर्त अशा सामाजिक जाणीवांचं मूल्यवृद्धी करतोय की अवमूल्यन करतोय. नवीन सरकार आल्याबरोबर शंकराचार्यांनी साईबाबाचे फोटो काढून टाकण्याचा आदेश, किंवा दलितांना मंदिर प्रवेश नाकारावा असा फ़तवा, साध्वीने रामजादे अन हरामज़ादे असं लोकांचं केलेलं वर्गीकरण, साधूने विरोधकांना पाकिस्तानात जाण्याचे केलेले आवाहान, IIT मधे मांसाहारी आणि शाकाहारी कँटीन वेगळे पाहिजे अशा ज्या पत्राला कचर्याचा डब्बा दाखवायला पाहिजे त्याची शासकीय लेवलवर चर्चा होणे, बत्रा का कोण ते त्यांनी धादांत खोटी माहिती शाळांतून पसरवणे, रामधारी लोकांचा धुमाकूळ, देशाच्या प्रमुखाने गणपतीला प्लास्टिक सर्जरी संबोधणे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या समाजाला काही दशके मागे घेऊन जात आहेत. बरं या गोष्टी बोलल्या जातात त्याबद्दलही काही हरकत नाही. लोकांचं तोंडं तर पकडू नाही शकत, पण शासकांकडून त्यावर  विरोध तर दूर पण मौन बाळगलं जात आहे. अन काही ठिकाणी तर शासकांच्या मदतीनेच हे सगळं घडवून आणलं जातं आहे हे फार धक्कादायक आहे.

राष्ट्रीय स्तरावर हा प्रकार तर महाराष्ट्रातही लागोलाग या गोष्टी चालू झाल्या आहेत. नाणीजच्या नरेंद्र महाराजांचं मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला व्यासपीठावर असणं हा दुर्दैवी योगायोग नाहीतर केंद्राचीच या बाबतीत री ओढण्याचा प्रकार आहे.  वारीबद्दल मला तसंही फारसं ममत्व नाहीच. आणि त्यांनीच एलिझाबेथ एकादशीवर बंदी घाला ह्याच्याइतकी हास्यास्पद मागणी दुसरी नसावी.  आज ऐकलं कि बैलगाडीच्या शर्यती वरची बंदी उचलली. का तर परंपरा जपली पाहिजे वैगेरे. (आपला घोडयांच्या रेसलाही दणकून विरोध आहे). ते राज्याचे दोन तुकडे करा हो, पण त्याचं समर्थन किंवा विरोध करताना भाषिक अस्मिता, मराठी मनाचे दोन तुकडे असं करण्याऐवजी विकासाची कूर्मगती किंवा ease in administrative governance अशा मुद्द्यावर सत्तेतील दोन्ही भागीदार्यांनी बोलावं आणि निर्णय घ्यावा. उगाच आपलं लोकांची मनं भडकावून अजून एक बेळगाव तयार नका करून ठेवू.

रूढी, परंपरा, प्रथा, गर्व, अस्मिता याचं जोखड महत्प्रयासाने आम्ही फेकून दिलं आहे. ते परत हळूहळू लादू नका हीच विनंती.

कसं आहे बघा, गुळगुळीत रस्ते आणि फ्लाय ओव्हर्स, स्वच्छता, चकाचकपणा, इंधनाच्या कमी किंमती, कमी भ्रष्टाचार ही परिमाणं राष्ट्र म्हणून तर सौदी अरेबियालाही लागू होतात.

तेव्हा विकासाच्या नावाखाली आपण समाजाच्या अवमुल्यनाकडे डोळेझाक करायची आणि दुसर्या बाजूला केवळ विरोधाला विरोध म्हणून समाजाचा आर्थिक स्तर उंचावणार्या योजनांची उगाच खिल्ली उडवायची या दोन्ही गोष्टी आपल्याला तर काही जमणार नाही बुवा!

म्या पामर  संभ्रमित आहे हे खरं. बाकी निवांत……  

टीप

वेटर्स लोकांना टीप का द्यावी?

२०१० साली अमेरिकेत मी पहिल्यांदा गेलो होतो. डेट्रोइट च्या हॉटेलमधे जेवलो. पैसे दिल्यावर २ डॉलरच्या आतच परत मिळणे expected होतं. टीपची पद्धत आणि ती by default द्यावीच लागते हे माहित होतं. मी waitress ला बिल मागितलं, तर तिला वाटलं मी उरलेली चेंज मागितली. अक्षरश: डाफरली ती माझ्यावर. अविश्वासाने म्हणाली, तुला ते उरलेले पैसे पाहिजेत. जेव्हा लक्षात आलं की बिल मागतोय, तेव्हा बया शांत झाली आणि हसली. ती हसली अन मग माझाही राग पळून गेला. And they parted happily ever after.

टीप ची प्रथा कुठून चालू झाली असावी. जी ऐकीव माहिती आहे ती अशी कि हि अमेरिकेतच चालू झाली आहे. कारण हॉटेल चे वेटर हे organised सेक्टर मध्ये नव्हते. त्यामुळे त्यांना provident fund, health insurance या स्कीम लागू नव्हत्या. आणि मग या गोष्टींना alternative पद्धत म्हणून टीप देण्याची प्रथा चालू झाली असेल.

पण मग आता भारतात काय परिस्थिती आहे. तर एका विशिष्ट category च्या पुढच्या हॉटेल मध्ये नक्कीच PF आणि ESI चे रुल्स लागू झाले असावेत. पूर्वी पुण्याच्या हॉटेल मध्ये पाटी असायची "इथे नोकरांना पगार दिला जातो." तसं जर हॉटेल मालकांनी लिहावं "इथे PF/ESI लागू आहे." नक्कीच टीप देण्याची आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. मला असं आठवतं कि बायपासच्या सयाजी हॉटेल मध्ये पाटी आहे कि इथे टीप देऊ नये म्हणून.

पूर्वी क्रेडीट कार्ड वर टीप लिहिल्यानंतर परत ती रक्कम नंतर चार्ज व्हायची. आता ती हि पद्धत बंद झाली आहे. म्हणजे क्रेडीट कार्ड इश्यू करणारे पण टीप पद्धत बंद झाली आहे असं समजत असावेत.

थोडक्यात unorganized सेक्टर मधील हॉटेलच्या वेटरांना नक्कीच टीप द्यावी, पण एकतरांकित ते पंचतारांकित हॉटेल्स मधे टीप देण्याची गरज नाही कारण तिथले लोकं socially secured असतात, असं मला वाटतं.

मला प्रश्न हा आहे की सोशल सिक्युरिटी देण्यात भारतातले हॉटेल मालक हे अमेरिकेतल्या हॉटेल मालकांपेक्षा पुढे आहेत का?