Thursday 30 January 2014

JV

१४ जुन २०१२ या दिवशी माझ्या कंपनीचं jv agreement झालं. अमेरिकन "सेटको" नावाच्या कंपनीबरोबर. आता JV हा शब्द माझ्या समाधानासाठी. खरं तर सेटको ने माझ्या कंपनीचा majority stake घेतला म्हणजे त्यांनी रीतसर माझी कंपनी विकत घेतली. मी director चा managing director झालो पण त्याचबरोबर मालकाचा परत employee पण झालो. आता बाकीच्या प्रतिक्रिया:

- गोर्यांनी गुंडाळलं
- brut money power
- विनाशकाले विपरीत बुद्धी
- काही दिवस ठेवतील, मग हाकलून देतील. त्यांचा brand establish झाला की राजेशची काय गरज त्यांना!
- pressurize केलं असेल, बाकी काय!
- येडा आहे राजेश, freedom हरवुन बसेल, मग कळेलंच
- झालं, आता सगळा profit अमेरिकेत, यांच्या हाती काय, टरफलं

अजून काही सुचत आहेत.?

अजूनतरी असं काहीच झालं नाही आणि होईल असं दूरदूरपर्यंत वाटत नाही.

JV ला दुसरे काही positive angle असतात, याबद्दल विश्वास असू द्या.


Saturday 18 January 2014

लाखमोलाचा माणूस

(मित्रांनो, मला माहित आहे टयाग करणे चुकीचे आहे. तुम्हाला आवडत नाही, आणि मलाही tag करायलाही आवडत नाही. (कुणी मला केलेलेही आवडत नाही) पण हि खालील पोस्ट आहे ती मला तुमच्या wall ला tag करू द्या. कारण माझी मित्रसंख्या २५० असावी पण मला आपलं घर लांबलांब वर पोहोचवायचे आहे. त्यामुळे तुमच्या wall चा सहारा घेणे गरजेचे आहे. याउपरही कुणाला हा माझा आगाऊ पणा नाही आवडला तर आधीच क्षमा मागतो.)


काही लोकांना भेटलं ना कि आपल्याला आपलेच खुजेपण लक्षात येतं. असाच मी मागील रविवारी एका भन्नाट व्यक्तीला भेटलो. म्हणजे थोडा मेलवर, कधी फोनवर तर कधी फेसबुकवर संपर्क होता. एकदा प्रत्यक्ष भेटलोही होतो पण अगदीच मोघम. यावेळी मात्र पूर्ण एक तास फळणीकर सर बोलत होते आणि मी अक्षरश: चिंब होऊन ऐकत होतो. कधी डोळ्यातून तर कधी मनातून. ओळखता तुम्ही त्यांना, श्री विजय फळणीकर, आपलं घर चे चालक आणि पालक. (यमक जुळवण्याच्या मोहापायी मालक लिहिणार होतो पण तो सरांचा आणि त्यांच्या कार्याचा अपमान झाला असता).

मूळ गाव नागपूर. घरी अठरा विश्व दारिद्र्य. सरांच्या आई धुणी भांडी करायच्या आणि ज्या वयात खेळ खेळायचे, बागडायचं त्या वयात विजय सर त्यांच्या आईला कामामध्ये मदत करायचे. पण वैतागला हो छोटा जीव त्या गरिबीला आणि आपण जे चित्रपटात बघतो किंवा पुस्तकात वाचतो, त्याप्रमाणे छोटा विजय पळून गेला घरातून आणि आला मुंबईच्या वळचणीला. मुंबई, अगणित लोकांचे पोट भरणारी मायानगरी. पण अशा छोट्या जीवाचे जे हाल होतात तेच त्यांचेही झाले आणि विजयला मुंबादेवीला कुणाला तरी मागून पोटाची खळगी भरायला लागली. (हो, त्याला सर्वसामान्य भाषेत भीक म्हणतात आणि विजय सर सांगताना त्याचा उल्लेख तसाच करतात. पण सरांचे आताचे कार्य बघितले तर तसं  लिहायलासुद्धा माझे हात कचरतात.)तिथून संध्याकाळी निघायचे आणि गिरगाव किंवा चौपाटीला यायचे आणि लोकं टाकायचीच द्रोणामध्ये भेळ. (पुढचे तुमचे तुम्ही समजून घ्या, माझ्यात लिहिण्याची ताकद नाही)

पण म्हणतात ना सरांच्या हातातून काहीतरी अफाट घडायचे होते आणि ते नजरेस पडले श्री यशवंत रामचंद्र काळे यांच्या. त्यांचे नाव घेताना सरांनी कानाच्या पाळीला हात लावला आणि म्हणाले "ते माझे गुरु, आज जो काही विजय फळणीकर आहे तो फक्त त्यांच्यामुळे." आणि मग चेंबूर चं चिल्ड्रेन एड होम मध्ये रवानगी, तिथे शिक्षण, त्याच्यानंतर परत नागपूर, तिथे पुढील शिक्षण. पण ते सुद्धा मी लिहितो तसं आरामात नाही बरं का. कष्ट, कष्ट आणि फक्त कष्ट. म्हणजे दिवसभर काम करायचे, पैसे कमवायचे आणि रात्री कॉलेज करायचं. सकाळी सहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत दिवस. पूर्णपणे कार्यरत. असं करत शिक्षण पूर्ण केलं. (सरांनी एक डिप्लोमा कोर्स चं नाव सांगितलं, ते विसरलो).

आणि मग पुण्यात दूरदर्शन मध्ये asst floor officer ची नोकरी. आणि एक सर्वसामान्य माणसाचे जीवन जसे असते, तशी आयुष्याची गाडी सुरळीत चालू झाली. मग संसार थाटला. फुल उमलले. वैभव त्याचे नाव. नोकरी मध्ये पण कामाच्या गुणवत्तेवर पुढे जात जात senior producer पर्यंत धडक मारली. घर झाले. थोडक्यात एका त्रिकोणी कुटुंबाला सुखवस्तू म्हणता येईल अशा स्थितीला येउन पोहोचले. आता झालं, नाही का. म्हणजे कष्ट केले आणि त्याचे फळ मिळाले.

पण नाही मित्रांनो. एखादे आयुष्य भट्टीत तावून सुलाखून निघतं म्हणजे काय, हे विजय सरांकडे पाहून कळतं. २००१ साली १६ वर्षाच्या वैभव ला, सरांच्या एकुलत्या एक मुलाला, लुकेमिया चं निदान झालं आणि अवघ्या १५ दिवसात खेळ खलास झाला. कोलमडून जावं एखाद्यानी. आणि फळणीकर कुटुंब सुद्धा उध्वस्त झाले. आत्महत्येचाही प्रयत्न झाला. (थरकलात ना, मी पण असाच हललो होतो ऐकताना.) आता काय? आणि फळणीकर दाम्पत्यांनी ठरवलं कि बास, आता वाहून घ्यायचं selfless कामात.

वैभवच्या विम्याचे पैसे आले आणि त्यातून ambulance घेतली. (कल्पनेचा उगम काय तर वैभवला शेवटच्या प्रवासाला न्यायला अर्धा एक असा करत तब्बल साडेतीन तास उशीर झाला होता. त्याचे consequences काय झाले हे फक्त सरंच सांगू जाणे). त्या काळात वारजे गावात ambulance चा त्रास असायचा. मिळायचीच नाही. अल्प दरात ही सेवा चालू केली. रु २५० फक्त. आणि गम्मत म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत डीझेल चे भाव अडीचपट झाले तरी अजूनही हि सेवा तेव्हढ्याच रेट मध्ये मिळते.

Adaption Center च्या किचकट पद्धती बघून, मुल adapt करायची कल्पना बारगळली. आणि मग ठरवले कि आता अनाथ मुलामुलींचेच आई बाप व्हायचे. ज्याच्यासाठी करायचे तोच आयुष्यातून गेला म्हंटल्यावर स्थावर मालमत्ता विकून टाकली आणि वारजेला आणि डोणजे ला जागा घेतली. २००५ साली अत्यंत सुस्थितीतल्या नोकरीवर स्वाहा केले. आणि साकार झाले "आपलं घर".

आज वारजे आणि डोणजे येथील आपलं घर मध्ये पूर्णपणे अनाथ अशा जवळपास ४० मुला मुलींची  अप्रतिम काळजी घेतली जाते आहे. मोठे होत काही जण कॉलेज चं शिक्षण घेत आहेत. डोणजे येथील संस्थेच्या जागेत अनाथ मुलामुलींबरोबर १० आजी आजोबांना हि सांभाळले जाते. डोणजे इथे एक अतिशय सुबक असे सर्व सुविधा असलेले एक हॉस्पिटल आहे जिथे सर्वाना मोफत ट्रीटमेंट दिली जाते. एक फिरता दवाखाना विजय सरांनी दाखवला. अतिशय सुंदर. म्हणजे मी नुसतं लिहून होणार नाही तुम्हाला ती गाडी बघायलाच हवी. आजूबाजूच्या १०-१२ गावांमध्ये जाऊन हा फिरता दवाखाना सगळ्या गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा देतो. (गम्मत आहे ना, पुण्यासारख्या शहराच्या अवघ्या ३० किमी वर असलेल्या गांवा मध्ये वैद्यकीय सेवांचा दुष्काळ आहे. सालं कुठल्या भयाण स्वप्नांच्या नंदनवनात राहतो आपण) बाजूलाच अपंग मुलांसाठी vocational ट्रेनिंग सेंटर.

आणि यात सगळ्याच कौतुकाची गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता. शब्द नाही हो मला वर्णन करण्यासाठी. चकाचक फरशी. सगळे अगदी सुबक आणि आटोपशीर. साधे पण सुंदर. सरांचे अगदी छोट्या गोष्टीवर बारीक लक्ष असते. "बाळा, हा कपडा असा का, खिडकी पुसली नाही ठीक, डब्बे बरोबर बंद नाही केले" चालत असताना अनेक सूचना देत असतात. हॉस्पिटल ला गेलो तर ambulance थोडी तिरपी लागली होती. लागलीच ड्रायवर ला सांगितले "बाळा, जरा सरळ लावून टाक ती". तुमच्या नजरेला दिसणार पण नाही पण सरांना मात्र लागलीच. आणि सगळं सांगताना आवाजात कमालीची मृदुता, सभ्यता.

ऑफिसमध्ये वैभवचा फोटो आहे आणि त्याच्या शेजारीच गजानन महाराजांचा. विजय सर बहुधा गजानन महाराजांना दररोज वंदन करत असावेत, आणि आज मी सद्गदित होऊन मनोमन  विजय सरांना नमन करत होतो.

विजय सरांनी सांगितले त्यांचे आत्मकथन आहे "पराजय नव्हे विजय" (नाव पण किती समर्पक. त्याची गोष्ट पण विजय सर मस्त सांगतात) रसिक साहित्य ला मिळते आणि बुक गंगा च्या वेब वर ऑन लाईन विकत घेता येते. आठवडा भर वेळच नाही मिळाला. आताच ऑर्डर केले. मग, करताय ना तुम्ही पण?

लाखमोलाचा माणूस

१७/१२

 अमेरिकेचे तिघं  जण आले होते, स्कॉट, ब्रायन आणि जिम. पहिले दोघं बुधवारी अमेरिकेला गेले आणि आज मी आणि जिम मुंबईला आलो. गप्पा मारत होतो.  एक्स्प्रेस हाय वे चालू झाल्या एक माणूस धार मारताना दिसला, त्याने त्याचा फोटो काढला. मी म्हणालो, मित्रा जे तु कॅमेरात बंदिस्त करतो आहेस तो खरा भारत नाही आहे रे! तो म्हणाला "कुठे बघायला मिळेल मला तुझा भारत" मी म्हणालो, तुला फोटोच न्यायचे ना तर घेऊन जा अजंता एलोराचे फोटो, ही बघ विजयाची गाथा जिथे लिहीले जात असे ते विजयनगर (हंपी), हे आजूबाजूला दिसणारे सह्याद्रीचे डोंगर सुद्धा जिथे टेकड्या वाटतात तो हिमालय, त्याला खजुराहोचेही फोटो दाखवले. (गूगल इमेजेस कृपा). . तो हरखून गेला. मी म्हणालो " it is unfortunate that western world knows India as corrupt country, country of snakes and elephants, monks. Please come with me and I will show you this beautiful country" त्याला श्रीनगर आणि पहेलगामबद्दल सांगितलं.  जिम म्हणाला " can I see life of rural India" मी त्याला मनोजचं पाराशर अॅग्रोटुरीझम ची website दाखवली. माडाच्या मनात दाखवलं, गणपतीपुळेचं.

देशाबद्दल बोलताना मी बहुधा एक दोनदा भावुकही झालो होतो. (तुम्ही बोलून बघा कधी, फारंच भारी वाटतं) तो मला म्हणाला "I have not seen a person like you who is so passionate of his country" मग मी त्याला शिवाजी महाराज आणि भगतसिंह यांची गोष्ट सांगितली. त्याला म्हणालो "याला म्हणतात passion".

आता ऐकतोच आहे म्हंटल्यावर इंग्रजांनी आमच्या देशाला कसा लुटला त्याचंही रसभरित वर्णन केलं.

त्याला म्हणालो " believe me, this country has immense potential and also bright future"

संध्याकाळी निरोप घेताना जिम म्हणाला "till date I had a different perspective of your country. Today it is completely changed" थोडक्यात साॅलीड पकवला होता त्याला.

जाताना म्हणाला " I just have a last question. And you can answer this in my next visit to Pune. Why do so many indian people migrate to USA?"

तो जाऊन २४ तास झाले, मी त्या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे.

आणि एक सल, ह्या देशाचं भविष्य उज्वल आहे हे सांगण्यासाठी मला भूतकाळाचा आधार घ्यावा लागला. वर्तमानाचा नाही आणि हेरंब जोशींना मनोमन नमस्कार केला. चुकलो



Wednesday 15 January 2014

भेट

आज सकाळी Marriott ला गेलो होतो, अमेरिकेहून पाहुणे आले आहेत, त्यांना घेण्यासाठी (guests ला आणण्याशिवाय कशाला जातोय हा दीडशहाणा Marriott मध्ये, असा खडूस विचार तुमच्या मनामध्ये आला असेल, तर तुम्हाला सांगून ठेवतो…………. तुमचा विचार बरोबर आहे). Lounge मध्ये वाट बघत बसलो होतो. बासरीचे सुमधूर सूर कानावर येत होते. सूर कुठुन येत आहेत असं बघत असतानाच मला "तो" दिसला. एका पिलरजवळ कोपर्यात खुर्ची टाकून बसला होता. २५-२६ चा असेल. किरकोळ शरीरयष्टी पण हातात भली मोठी flute. सुरेख वाजवत होता . ती उंच अशी lounge त्याच्या सुरांनी अशी भारून गेली होति. त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. जो तो आपापल्या कामात गर्क होता.  काही सुटा बुटा तील लोकं त्याच्याजवळच उभे राहून गप्पा मारत होते. तो त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.  तो मात्र तन्मयतेने बासरी वाजवत होता.

 मी त्याच्याकडे बघून स्मित केले, त्यानेही प्रतिसाद दिला. मी त्याच्याकडे गेलो.

त्याचे नाव दीपक. मूळ गाव अंबड. १० वर्षापासून पुण्यात बासरी शिकतो आहे, पंडित गिंडे यांच्याकडे. मनात म्हणालो "मित्रा, हि तुझी जागा नाही रे, तुझी जागा तिकडे स्टेज वर, रसिकांसमोर. तु असाच वाजवतोय आणि लोकं ब्रम्हानंदात माना डोलवत आहेत." हात मिळवला आणि म्हणालो "पुढच्या वेळेला भेटू, तेव्हा माझ्या हातात तिकीट असेल तुझ्या कार्यक्रमाचं"

अजून बोलायचं होतं, पण विचार केला, Lounge Manager येईल आणि म्हणेल "चला…. भेटेची वेळ संपली. कैद्याला भेटायला आलेल्या नातेवाईकाला जेलर म्हणतो ना, अगदी तसंच.

त्यानं पण प्रेमाने हात दाबला आणि सस्मित नजरेने निरोप दिला.

दिवसभर त्याचे बासरीचे सुर कानात गुंजत होते

भेट

Saturday 11 January 2014

बी जे मेडिकलचा इंजिनियर

BJ Medical College म्हणजेच बैरामजी जीजीभोय मेडिकल कॉलेज. जगभर विखुरलेल्या डॉक्टरांचे स्वप्न. या कॉलेज मधून पास झालेल्या कुणाच्याही समोर, (त्याला वयाची अट नाही, डॉक्टर कुठल्या पोस्ट वर त्याचेही बंधन नाही) बी जे चे नाव काढले कि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागते. जणू काही आपण त्यांच्या प्रियकराचे किंवा प्रेयसी चे नाव घेतले आहे.

तर अशा या बी जे शी माझी ओळख निव्वळ अपघातानेच झाली. (बी जे आणि ससून ची ओळख अपघाताने होणे हे भितीदायकच नाही का). माझ्या शाळेतील अनुराधा पाटील हि बी जे ला आहे हे कळले. मी आणि प्रताप वयोपरत्वे बी जे च्या लेडीज होस्टेल ला जाऊन थडकलो. आणि मग पुढची ५ वर्षे जातच राहिलो. काही दिवसातच वैभवीची पण भेट झाली. ती पण माझ्याबरोबर नाशिक ला CDO/मेरी हायस्कूल ला होती. आणि मग त्यांनीच मला बी जे मेडिकल कॉलेज मध्ये नेले.


दणदणीत अशी बिल्डींग, प्रशस्त आवार, त्याचे king-size प्रवेशद्वार, भलेमोठे corridor, कॅन्टीन सगळेच कसे अचंबित करणारे. औरंगाबादच्या साध्या वातावरणातून पुण्याच्या भारती विदयापीठ ला येउन मी तसा बुजलोच होतो. म्हणजे ज्याला इंग्रजी बोलता येत नाही तो माठ अशी एक भावना झाली होती. आणि इथे तर एकापेक्षा एक हुशार मंडळी मराठीत बोलत होती. Govt Polytechnic औरंगाबाद येथील DME आणि भारतीचे  Production Engineering इथे स्त्री पार्टी चा दुष्काळच  होता. त्यातही असल्या तर सौंदर्य त्यांच्या आसपास हि फिरत नव्हतं. आणि इथे बी जे मध्ये सौंदर्य आणि बुद्धिमत्ता हातात हात घालून सुखाने नांदत होत्या. आणि अजून एक वैशिष्ट्य "अच्छी सूरत को सवरने कि जरुरत क्या है, सादगी भी तो क़यामत कि अदा होती है" या ओळींना सूट होणारे पोरा पोरींचे रहाणे. कुठंही भपका नाही, shining नाही पण यांच्या देहबोलीत विलक्षण आत्मविश्वास, चेहऱ्यावर तेज. आणि कपडे पण साधे. कुठंही मिरवणे नाही. आणि केवढी ती पुस्तके. माझ्या engineering च्या एकूण पुस्तकाचे वजन यांच्या एका पुस्तका एवढे असावे. मला त्यांच्याबद्दल अप्रूप  वाटायचं पण असूया कधीच वाटली नाही.

मुलामुलींचे एकमेकांशी बोलताना मोकळेपणा हा तर माझ्यासाठी कुतूहलाचा विषय होता. शाळेनंतर मी मुलींशी नीट बोललोच नव्हतो. (किंवा बोलायची अक्कल नव्हती). आणि इथे वैभवी आणि अनुराधा बिनधास्त मुलांशी गप्पा मारत होत्या. बरं त्यात उथळपणा अजिबात नव्हता.

माझी हळूहळू तिथल्या मुलींशी ओळख होऊ लागली. मंजिरी, वैशाली, श्रद्धा, सोनल (म्हणजे आताची फेसबुक सम्राज्ञी अनु सिंग), नाझिमा, गजाला, अनु-मंजू या वैभवीच्या  एकदम फास्ट फ्रेंड. आणि मुलांमध्ये केदार, राजेश, वाळिंबे, हृषीकेश हि मंडळी. अर्थात हे सर्वजण माझ्याशी अंतर ठेवूनच असायचे (मी पण त्याच लायकीचा होतो). हि माझी वैभवीमुळे  झालेली ओळख.

त्याच वेळेला माझे दुसरे ऋणानुबंध बी जे कडे नेऊ लागले ते म्हणजे आमचा अत्यंत जिवलग मित्र जगदीश पाटील. जगदीश माझ्या लहान भावाचा, उन्मेष चा मित्र आणि नंतरचा बिझिनेस पार्टनर. आणि जगदीश चा मोठा भाऊ सुनील पाटील उर्फ बाळा. आता larger than life अशी इमेज झालेल्या डॉक्टर बाळा पाटील याला बी जे तील त्याच्या १० वर्षे आधीचे आणि १० वर्षे नंतरचे मुलं मुली अगदी वैयक्तिक ओळखत असतील. त्याचं व्यक्तिमत्वंच तसं होतं, होतं का, अजूनही आहे.या बंधुद्वायांचे घर अशोकनगर मध्ये आमच्या घराजवळच होते आणि तिथे या बी जे च्या मुलांचा राबता असायचा. या सगळ्या वातावरणामुळे माझी बी जे ची भीड चेपली गेली.

मग काय, सुरुवातीला पंधरवड्यातून एकदा बी जे ला जाण्याची frequency वाढत, practically रोजावर आली. तिथले gatherings, orchestra आम्ही बी जे चे student असल्यासारखे एन्जॉय करायला लागलो. "बिलानशी नागीन निघाली" वर एकदा बेफाम नाचल्यावर तर एका दोघांनी विचारले सुद्धा "कुठल्या year ला आहेस" मी सुद्धा उत्तर ठोकून वेळ निभावून नेली.

बी जे चा orchestra म्हणजे एक प्रकरण आहे. मी खूपच एन्जॉय केले. ते भव्य  auditorium, house full गर्दी. नुसता कल्ला. ते कागदी बाण. टाळ्या, गोंधळ. त्या सगळ्यात गाणे टिकवून धरायचे म्हणजे दिव्यच होते. पण हि भावी डॉक्टर मंडळी टिकवायचे. वर्षा गायकवाड चे "बिलानशी नागिन निघाली" अर्चना पेद्राम चे "तुम्हे हो न हो" किंवा "हवाहवाई" "जानेमन जानेमन" रवि करमरकर चे "रात कली एक ख्वाब मे आयी" शेखर कुलकर्णी चे "मधुबन मे राधिका नाचे रे" वैभावीचे "हरी ओम हरी" सुप्रिया बिल्दीकर चे "ओ लाल मेरी" हे अजूनही कानात गुंजन करत असतात.

तिथे काही परिसंवाद पण भारी असायचे. एकदा विषय होता "premarital sex is ethical or not" यात झालेली एकेक भाषणे म्हणजे ट्रीट होती. चंद्रशेखर फणसाळकर, आनंद जोशी, पंडित सर यांनी धमाल उडवून दिली होती.

तिथली भित्तीपत्रके हि वाचनीय असत. कविता, लेख यांची रेलचेल असायची. सध्या harmony नावाचा कार्यक्रम करणाऱ्या  शेखर कुलकर्णीचा एक लेख, बहुधा पुण्यावर होता ज्याचा शेवट लेखकू शेखरू असा केलेला, लेख लक्षात नसला तरी शेवट लक्षात आहे.

यात कमी कि काय म्हणून हे सगळे ट्रेक्स पण भरपूर करायचे. ढाकचा भैरी, dukes nose, राजमाची, शिवथर घळ, तुंग तिकोना, लोहगड, हरिश्चंद्रगड हे यांचे favorite ट्रेक्स. मंगेश नारवाडकर माझा परिचयाचा. एकदा त्याने मला बी जे च्या टेरेस वर नेले आणि म्हणाला "इथून rapling करायचे आहे" मी म्हणालो "येड लागलं का तुला" तर म्हणाला "कर, घाबरतो कशाला, आम्ही आहोत ना" खाली जमिनीवर वैभवी आणि बहुधा वैशाली उभ्या होत्या. इज्जातीचाच सवाल होता. घेतलं देवाचं नाव आणि हळूहळू खाली आलो. पहिल्यांदाच rapling करणाऱ्याचे जे होते तेच माझेही झाले. शेवटचा काही भाग उलटापुलटा होतच आलो.

एकदा मला एप्रिल फुल करण्याच्या नादात, वैभवीच्या मैत्रिणींची मी हवा गुल केली होती, आता तुम्हाला होस्टेल वरूनच सस्पेंड करतो म्हणून. सगळा खुलासा झाल्यावर त्या ८-९ सुंदऱ्या आणि मी सुप्रियाला पार्टी करायला गेलो होतो. त्यानंतर कित्येक दिवस मला उगाचच डोक्यावर मोरपीस आणि हातात बासरी असल्यासारखे वाटत होतं.

एव्हाना माझे आणि वैभवी चे सुत जुळले आणि मग तर मी तिच्या मित्र परिवाराचाच भाग झालो. सुरुवातीला जे अंतर वाटायचे ते पण नाहीसे झाले. मी वरवर दाखवत असलो तरी मनातून जरा टरकतच होतो. कारण या पोरापोरींचा IQ आणि sense ऑफ humor फारच वरच्या दर्जाचा होता. तरीही मी त्यांच्यात मिसळायचो. trekking ला जायचो. पार्टीला जायचो. (आणि त्यावेळेस पार्टी म्हणजे काय हो स्टेशन चे माधव, नाहीतर सुप्रिया किंवा चौपाटी) एन्जॉय करायचो. वैभवीमुळे मी त्यांच्यात जायचो आणि ते पण मला मुकाट सहन करायचे.

साधारण १९९४ नंतर वैभवीच ससून सुटलं आणि माझं त्या परिसरात जाणं बंद झालं. पण आयुष्यभराचे संचित मला इथे मिळाले. डॉक्टर सुनील आणि डॉक्टर अनुपमा (alias बाळा आणि बोपी, जास्त संभ्रमात पडू नका) यांच्या लग्नात सहजच revive झालेली विनय आणि वैशालीची ओळख पुढे कित्येक पर्यटनाचा आणि मैफिलीचा साथीदार देऊन गेली. आजही हे मैत्र मैत्रिणी भेटतात आणि भूतकाळात हरवून जातात आणि मी त्यांचे ते हरवून जाणे अनिमिष नजरेने बघत असतो. डॉक्टरांच्या मांदियाळीत गप्पांच्या मैफिलीत माझी ओळख "हा engineer आहे बरं का" अशी करून देताना "हा दहावी पास आहे" अशा टोन मध्ये केल्यासारखी वाटते पण माझी तक्रार नसते कारण नंतरचे २-३ तास हे फक्त हसण्यासाठी मुक्रर केलेले असतात. टोणगावकर, सुशील, केदार यांची विनोदबुद्धी envious आहे. हरीशचा sensitiveness आपल्यालाही आयुष्याचा वेगळ्या तऱ्हेने विचार करायला भाग पाडतो. Reunion ला भेटायचं, तिथे खूप धमाल करायची, त्याची CD करायची आणि तीच CD परत बघताना परत तेवढीच धमाल करायची हे यांनाच जमू जाणे. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ७-८ स्त्री पुरुषांचा जणांचा ग्रुप आहे, ते दिसायला तेजस्वी आहेत, आपल्या वयाची तमा न बाळगता ते जोरजोरात हसत आहेत, टाळ्या घेत आहेत, देत आहेत, एकमेकांची खिल्ली उडवत आहेत तर खुशाल समजावं हे बी जे मधून पास झालेले डॉक्टर्स आहेत.

आयुष्य जर rewind करून परत जगायचे म्हंटले तर बी जे त जायला आवडेल. (आणि तो अभ्यास, नको का हे वाक्य इथे).

असा मी बी जे मेडिकल एन्जोय केलेला engineer, Lets Act च्या कार्यक्रमात बी………… जे, बी………………… जे अशा घोषणा देत आपसूक भूतकाळात जातो.  स्क्रीन वर  बी जे चा फोटो झळकतो, तेव्हा पार्शभूमीवर  "याद ना जाये बिते दिनोकी " चालू असते आणि सभागृहातल्या प्रत्येक डॉक्टरच्या डोळ्यातून धारा वाहत असतात, त्यावेळेस हा अभियंता सुद्धा पाणथळलेल्या डोळ्यांनी तो रोमांच अनुभवत असतो.  







काही गोष्टी:

- यातील उल्लेखलेले सर्वच जण हे आज प्रथितयश डॉक्टर्स आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख कदाचित खटकेल, पण हा प्रेमापोटीच झाला आहे. आणि त्यापायीच त्यांची नावं मी अगदी बेधडक वापरली आहेत, त्यांची परवानगी न घेता. कुणाला आवडले नसल्यास आधीच sorry म्हणतो.

- उल्लेखलेल्या प्रत्येकामागे डॉक्टर लिहिणे अपेक्षित असते. पण तसं लिहिले असते तर लेखभर  "डॉक्टर" असेच दिसले असते

- काही संदर्भ चुकीचे असतील. पण भाव महत्वाचा.

- बाळा पाटील आता फारच मोठे प्रस्थ आहे. कालानुरूप त्याला इथे बाळासाहेब किंवा त्याच्या अमेरिकन connection मुळे सनी वैगेरे म्हणायला हवे. पण तसं लिहायला हात धजवातच नाही.

-

- मला माहिती आहे बी जे मेडिकल पुण्याच्या ऐवजी मुंबई, कराड, सोलापूर, मिरज, औरंगाबाद, नागपूर इथल्या कुठल्याही govt मेडिकल कॉलेज चं नाव लिहून हा लेख परत लिहिला तर काहीच चुकीचे वाटणार नाही.

- आणि हो! लेखापेक्षा तळ टीप जास्त झाल्या, नाही.


Tuesday 7 January 2014

नियम

अशात शाश्वत अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग खुपदा वाचनात आला. गरजा वाढवून ठेवायच्या आणि मग पैशाच्या मागे लागायचं वैगेरे हे कसे चूक. बरोबरच आहे पण म्हणजे काय, यावर थोडा विचार केला. तर काही ठोकताळे बांधले. बघा पटताहेत का ते:

- कुठलेही वाहन घेतल्यानंतर त्या मध्ये इंधन भरताना "tank फुल करो" हे सांगताना टेन्शन नाही आले पाहिजे, म्हणजे थोडक्यात खिशाकडे लक्ष गेले नाही पाहिजे.
- मोबाईल बिल, विजेचे बिल, इंटरनेट चे बिल, सोसायटीचे maintenance बिल, corporation tax भरताना "शेवटच्या दिवशी भरू" हा विचार न येता दुसर्या दिवशी ते भरण्याची ताकद पाहिजे.
- बेडरूम मध्ये AC लावताना आता यामुळे विजेचे बिल किती वाढेल हा विचार जर मनात येत असेल तर AC लावू नये.
- घरासाठी किंवा वाहनासाठी कर्ज घेणे काहीच चुकीचे नाही. पण EMI हा घराच्या income source पेक्षा २५ ते ३०% पेक्षा जास्त नको. मग तो sustainable राहतो, आणि जसेजसे वर्ष जातील, तो डाचत नाही. हे जर गणितात बसत नसेल तर म्हण लक्षात ठेवावी "मुर्खांनी घर बांधावे आणि शहाण्यांनी त्यात भाडेकरू म्हणून राहावे".
- लग्न, वाढदिवस असले कार्यक्रम कर्ज काढून करू नये. स्वत:च्या saving मधून करावे . personal loan चा इंटरेस्ट रेट खूप जास्त असतो. पर्यटनासाठी सुद्धा हेच लागू. कर्ज काढून foreign trip करणे हा मूर्खपणा आहे.
- स्वत:ची ताकद उमजून क्रेडीट कार्ड वापरावे. GF, मित्र, नातेवाईक यांच्यावर shining ठोकण्यासाठी त्याचा वापर करू नये. क्रेडीट कार्ड चे पेमेंट बिल आल्याच्या दुसऱ्या दिवशी झाले पाहिजे. शेवटच्या दिवशी नाही.
- स्वत:च्या धंद्यात सगळी जायदाद collateral ठेवा, राहते घर सोडून.
- balance sheet strong ठेवा. बँक Balance Sheet बघून लोन देते, ना कि तुमच्या दरवाजातील अलिशान गाडी बघून.
- हे जरी खरं असले तरी cashflow ही reality आहे. ना कि profit, जो notional आहे. जो पर्यंत पैसॆ तुमच्या account madhe नाहीत तो पर्यंत तुम्ही त्याचे मालक नाही. त्याप्रमाणे खर्च प्लान करा
- लक्षात ठेवा, बँक त्यांनाच लोन देते जे बँकेला prove करतात कि त्यांना लोनची गरज नाही आहे. Bank always extends umbrella in all seasons other than rainy season.

थोडक्यात काय, तर पैसे कमवा आणि जेवढे कमावता त्यानुसार खर्च करा, ना कि, भरमसाठ EMI करायचा आणि मग त्याची पूर्तता करण्यसाठी खूप काम करायचे.

इकडचे, तिकडचे वाचताना जे जाणवले ते लिहिले आणि या दुसऱ्यांना सूचना नाही आहेत तर मलाच सावध करतो आहे. 
 
 

Attitude

माझी कंपनी तशी लहानंच आहे, २३ जणांची. त्यात कॅंटीन facility आहे. १/३ employee ने द्यायचे, २/३ कंपनीने. जेवणाचे कंत्राट एका मराठमोळ्या माणसाकडे. त्याचे नाव रमेश. रमेशच्या खूपच complaints करायची, आमची पोरं. जेवणात किडे निघाले, स्टेपलर पिन निघाली, जेवण कमी पडलं, भात कच्चा राहिला, एक ना अनेक. रमेशनी कधी तक्रारीं्कडे लक्षंच दिले़ नाही. उलटं सुनवायचा "घरी होत नाही का असं" "हे आहे असं आहे, बघाजमतं का ते" "छोटे मोठे problems होतंच राहणार" ३० डिसेंबर ला म्हणाला "उद्या canteen बंद, मला ३१ ची मोठी order आहे" मी म्हणालो "कंपनीत काय फुकट जेवण देतोस का, दुसरी order मिळाली तर इथे जेवण नाही हा काय प्रकार" रमेश बधलाच नाही.

तक्रारी होत्याच, रमेशचं contract बंद केलं.

नवीन contractor शोधला, शाम त्याचे नाव, गुलबर्ग्याचा. छोटंच हाॅटेल. रमेशचाच रेट, पण एक भाजी, पापड़ आणि कोशिंबीर extra. "३६५ दिवस सर्विस मिळेल, सुट्टी नाही" "काहीही complaint असेल, सांगा काळजी घेईल" मी म्हणालो "चांगली ताटं वाट्यालागतील" तर म्हणाला "आणेल की, शेवटी धंदा वाढवायचा आहे" मी विचारलं " मग उद्यापासून जमेल" तर म्हणाला "करतो की, काळजी नका करू"

Canteen सुरळीत चालू.

पाच वर्षानंतर मला शामसेठ एका भारी हाॅटेल च्या गल्ल्यावर बसून सिंहगड रोडच्या लोकांच्या जिंभेचे चोचले पुरवताना दिसतोय, आणि रमेश मराठी लोकांवर अन्याय झाला म्हणून मनसेच्या मोर्च्यात राज ठाकरे झिंदाबादच्या घोषणा देताना दिसतो आहे.