Saturday 18 January 2014

लाखमोलाचा माणूस

(मित्रांनो, मला माहित आहे टयाग करणे चुकीचे आहे. तुम्हाला आवडत नाही, आणि मलाही tag करायलाही आवडत नाही. (कुणी मला केलेलेही आवडत नाही) पण हि खालील पोस्ट आहे ती मला तुमच्या wall ला tag करू द्या. कारण माझी मित्रसंख्या २५० असावी पण मला आपलं घर लांबलांब वर पोहोचवायचे आहे. त्यामुळे तुमच्या wall चा सहारा घेणे गरजेचे आहे. याउपरही कुणाला हा माझा आगाऊ पणा नाही आवडला तर आधीच क्षमा मागतो.)


काही लोकांना भेटलं ना कि आपल्याला आपलेच खुजेपण लक्षात येतं. असाच मी मागील रविवारी एका भन्नाट व्यक्तीला भेटलो. म्हणजे थोडा मेलवर, कधी फोनवर तर कधी फेसबुकवर संपर्क होता. एकदा प्रत्यक्ष भेटलोही होतो पण अगदीच मोघम. यावेळी मात्र पूर्ण एक तास फळणीकर सर बोलत होते आणि मी अक्षरश: चिंब होऊन ऐकत होतो. कधी डोळ्यातून तर कधी मनातून. ओळखता तुम्ही त्यांना, श्री विजय फळणीकर, आपलं घर चे चालक आणि पालक. (यमक जुळवण्याच्या मोहापायी मालक लिहिणार होतो पण तो सरांचा आणि त्यांच्या कार्याचा अपमान झाला असता).

मूळ गाव नागपूर. घरी अठरा विश्व दारिद्र्य. सरांच्या आई धुणी भांडी करायच्या आणि ज्या वयात खेळ खेळायचे, बागडायचं त्या वयात विजय सर त्यांच्या आईला कामामध्ये मदत करायचे. पण वैतागला हो छोटा जीव त्या गरिबीला आणि आपण जे चित्रपटात बघतो किंवा पुस्तकात वाचतो, त्याप्रमाणे छोटा विजय पळून गेला घरातून आणि आला मुंबईच्या वळचणीला. मुंबई, अगणित लोकांचे पोट भरणारी मायानगरी. पण अशा छोट्या जीवाचे जे हाल होतात तेच त्यांचेही झाले आणि विजयला मुंबादेवीला कुणाला तरी मागून पोटाची खळगी भरायला लागली. (हो, त्याला सर्वसामान्य भाषेत भीक म्हणतात आणि विजय सर सांगताना त्याचा उल्लेख तसाच करतात. पण सरांचे आताचे कार्य बघितले तर तसं  लिहायलासुद्धा माझे हात कचरतात.)तिथून संध्याकाळी निघायचे आणि गिरगाव किंवा चौपाटीला यायचे आणि लोकं टाकायचीच द्रोणामध्ये भेळ. (पुढचे तुमचे तुम्ही समजून घ्या, माझ्यात लिहिण्याची ताकद नाही)

पण म्हणतात ना सरांच्या हातातून काहीतरी अफाट घडायचे होते आणि ते नजरेस पडले श्री यशवंत रामचंद्र काळे यांच्या. त्यांचे नाव घेताना सरांनी कानाच्या पाळीला हात लावला आणि म्हणाले "ते माझे गुरु, आज जो काही विजय फळणीकर आहे तो फक्त त्यांच्यामुळे." आणि मग चेंबूर चं चिल्ड्रेन एड होम मध्ये रवानगी, तिथे शिक्षण, त्याच्यानंतर परत नागपूर, तिथे पुढील शिक्षण. पण ते सुद्धा मी लिहितो तसं आरामात नाही बरं का. कष्ट, कष्ट आणि फक्त कष्ट. म्हणजे दिवसभर काम करायचे, पैसे कमवायचे आणि रात्री कॉलेज करायचं. सकाळी सहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत दिवस. पूर्णपणे कार्यरत. असं करत शिक्षण पूर्ण केलं. (सरांनी एक डिप्लोमा कोर्स चं नाव सांगितलं, ते विसरलो).

आणि मग पुण्यात दूरदर्शन मध्ये asst floor officer ची नोकरी. आणि एक सर्वसामान्य माणसाचे जीवन जसे असते, तशी आयुष्याची गाडी सुरळीत चालू झाली. मग संसार थाटला. फुल उमलले. वैभव त्याचे नाव. नोकरी मध्ये पण कामाच्या गुणवत्तेवर पुढे जात जात senior producer पर्यंत धडक मारली. घर झाले. थोडक्यात एका त्रिकोणी कुटुंबाला सुखवस्तू म्हणता येईल अशा स्थितीला येउन पोहोचले. आता झालं, नाही का. म्हणजे कष्ट केले आणि त्याचे फळ मिळाले.

पण नाही मित्रांनो. एखादे आयुष्य भट्टीत तावून सुलाखून निघतं म्हणजे काय, हे विजय सरांकडे पाहून कळतं. २००१ साली १६ वर्षाच्या वैभव ला, सरांच्या एकुलत्या एक मुलाला, लुकेमिया चं निदान झालं आणि अवघ्या १५ दिवसात खेळ खलास झाला. कोलमडून जावं एखाद्यानी. आणि फळणीकर कुटुंब सुद्धा उध्वस्त झाले. आत्महत्येचाही प्रयत्न झाला. (थरकलात ना, मी पण असाच हललो होतो ऐकताना.) आता काय? आणि फळणीकर दाम्पत्यांनी ठरवलं कि बास, आता वाहून घ्यायचं selfless कामात.

वैभवच्या विम्याचे पैसे आले आणि त्यातून ambulance घेतली. (कल्पनेचा उगम काय तर वैभवला शेवटच्या प्रवासाला न्यायला अर्धा एक असा करत तब्बल साडेतीन तास उशीर झाला होता. त्याचे consequences काय झाले हे फक्त सरंच सांगू जाणे). त्या काळात वारजे गावात ambulance चा त्रास असायचा. मिळायचीच नाही. अल्प दरात ही सेवा चालू केली. रु २५० फक्त. आणि गम्मत म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत डीझेल चे भाव अडीचपट झाले तरी अजूनही हि सेवा तेव्हढ्याच रेट मध्ये मिळते.

Adaption Center च्या किचकट पद्धती बघून, मुल adapt करायची कल्पना बारगळली. आणि मग ठरवले कि आता अनाथ मुलामुलींचेच आई बाप व्हायचे. ज्याच्यासाठी करायचे तोच आयुष्यातून गेला म्हंटल्यावर स्थावर मालमत्ता विकून टाकली आणि वारजेला आणि डोणजे ला जागा घेतली. २००५ साली अत्यंत सुस्थितीतल्या नोकरीवर स्वाहा केले. आणि साकार झाले "आपलं घर".

आज वारजे आणि डोणजे येथील आपलं घर मध्ये पूर्णपणे अनाथ अशा जवळपास ४० मुला मुलींची  अप्रतिम काळजी घेतली जाते आहे. मोठे होत काही जण कॉलेज चं शिक्षण घेत आहेत. डोणजे येथील संस्थेच्या जागेत अनाथ मुलामुलींबरोबर १० आजी आजोबांना हि सांभाळले जाते. डोणजे इथे एक अतिशय सुबक असे सर्व सुविधा असलेले एक हॉस्पिटल आहे जिथे सर्वाना मोफत ट्रीटमेंट दिली जाते. एक फिरता दवाखाना विजय सरांनी दाखवला. अतिशय सुंदर. म्हणजे मी नुसतं लिहून होणार नाही तुम्हाला ती गाडी बघायलाच हवी. आजूबाजूच्या १०-१२ गावांमध्ये जाऊन हा फिरता दवाखाना सगळ्या गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा देतो. (गम्मत आहे ना, पुण्यासारख्या शहराच्या अवघ्या ३० किमी वर असलेल्या गांवा मध्ये वैद्यकीय सेवांचा दुष्काळ आहे. सालं कुठल्या भयाण स्वप्नांच्या नंदनवनात राहतो आपण) बाजूलाच अपंग मुलांसाठी vocational ट्रेनिंग सेंटर.

आणि यात सगळ्याच कौतुकाची गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता. शब्द नाही हो मला वर्णन करण्यासाठी. चकाचक फरशी. सगळे अगदी सुबक आणि आटोपशीर. साधे पण सुंदर. सरांचे अगदी छोट्या गोष्टीवर बारीक लक्ष असते. "बाळा, हा कपडा असा का, खिडकी पुसली नाही ठीक, डब्बे बरोबर बंद नाही केले" चालत असताना अनेक सूचना देत असतात. हॉस्पिटल ला गेलो तर ambulance थोडी तिरपी लागली होती. लागलीच ड्रायवर ला सांगितले "बाळा, जरा सरळ लावून टाक ती". तुमच्या नजरेला दिसणार पण नाही पण सरांना मात्र लागलीच. आणि सगळं सांगताना आवाजात कमालीची मृदुता, सभ्यता.

ऑफिसमध्ये वैभवचा फोटो आहे आणि त्याच्या शेजारीच गजानन महाराजांचा. विजय सर बहुधा गजानन महाराजांना दररोज वंदन करत असावेत, आणि आज मी सद्गदित होऊन मनोमन  विजय सरांना नमन करत होतो.

विजय सरांनी सांगितले त्यांचे आत्मकथन आहे "पराजय नव्हे विजय" (नाव पण किती समर्पक. त्याची गोष्ट पण विजय सर मस्त सांगतात) रसिक साहित्य ला मिळते आणि बुक गंगा च्या वेब वर ऑन लाईन विकत घेता येते. आठवडा भर वेळच नाही मिळाला. आताच ऑर्डर केले. मग, करताय ना तुम्ही पण?

लाखमोलाचा माणूस

No comments:

Post a Comment