Sunday 27 February 2022

सकाळ लेख क्र ९

 व्यवस्थापन करत असताना, एका महत्वाचं कौशल्य शिकून घ्यावं लागतं  आणि ते म्हणजे SWOT विश्लेषण. SWOT म्हणजे Strength (सामर्थ्य), Weakness (दुर्बलता), Opportunities (संधी), Threat (धोका). म्हणायला गेलं तर हे एक ताकदीचं टूल आहे, व्यवस्थापनासाठी. पण यातील मेख अशी आहे की याचा परिणामकारक वापर करून घेण्यासाठी त्यामागचा विचार समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. 

बाकीच्या व्यवस्थापकीय कौशल्यासारखं SWOT सुद्धा हॉवर्ड विद्यापीठात शोधलं गेलं असं म्हंटलं जातं. आपला व्यवसाय हा चार कसोटीवर कसा उतरतो आहे याचं विचारपूर्वक विश्लेषण केला तर त्यावर नियंत्रण आणणं सोपं जाईल असा या मागचा विचार आहे. 

यातील अनुभव असा आहे की SWOT विश्लेषण करताना ते फार संदिग्ध स्वरूपात केलं जातं आणि त्यामागे स्पष्टता नसते. या कारणामुळे अनेक व्यवसाय त्याचा म्हणावा तसा परिणामकारक वापर करून घेत नाही. त्यामुळे तो शब्द फक्त एक व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील एक परिभाषा म्हणून प्रचलित आहे. पण त्यावर फारसं काम केलं जात नाही असा माझा अनुभव आहे. 

SWOT विश्लेषण करताना काही गोष्टी अत्यंत व्यापक स्वरूपात लिहिल्या जातात आणि त्यामुळे त्यावरून कृती काय ठरवायची हे शोधता येत नाही. ज्या विश्लेषणातून कृती तयार होत नाही तो प्रयोग करणे हा वेळेचा अपव्यय असतो. मला असं म्हणायचं आहे की SWOT विश्लेषण करताना वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट लिहून काढले तर त्या प्रत्येक विश्लेषणातून एक कृतिशील आराखडा बनण्याची शक्यता तयार होते. 

थोडं उदाहरणातून समजावून सांगायचा प्रयत्न करतो. स्ट्रेंथ लिहिताना बऱ्याचदा व्यापक पद्धतीने लिहितो "आमचे तांत्रिक ज्ञान चांगले आहे." या वाक्यरचनेतून विषयाचा आवाका कळला पण त्याची वस्तुनिष्ठता, सांख्यिकी पायावर आपल्याला काय म्हणायचं आहे हे लक्षात येत नाही. हीच स्ट्रेंथ आपण जर प्रमाणबद्ध पद्धतीने लिहिली तर तिचा परिणाम वेगळा होऊ शकतो. उदाहरणार्थ: आम्ही आमच्या तांत्रिक ज्ञानाद्वारे पंधरा प्रकारचे उत्पादन करतो आणि येत्या तीन वर्षांमध्ये आम्हाला ती संख्या तीस पर्यंत न्यायची आहे. थोडक्यात आज बनवले जाणारे पंधरा प्रॉडक्टस हे आमचे सामर्थ्य आहे पण आमची मार्केट मधील पोझिशन अजून बळकट करण्यासाठी आम्हाला तीस वेगवेगळी उत्पादने आणणे ही काळाची गरज आहे. एकदा हे लिहून काढलं की पंधरा पासून तीस वर जाण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, या वेगवेगळ्या कृती लिहून काढता येतात. एकदा त्या लिहिल्या की मग त्याला टारगेट टाइम लाईन ठरवता येते आणि ते करण्यासाठी कोण जबाबदार आहे ते ठरवता येतं. हा कृतिशील आराखडा तयार झाला की पुनरावलोकन करण्याचा आराखडा तयार करता येतो. आपण ठरवलेल्या गोष्टी या वेळेत होत आहेत का, होत नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल यावर अभ्यास करता येतो. 

याच धर्तीवर मग आपण आपल्याला व्यवसायाचे दुर्बल घटक, मार्केट मध्ये असणाऱ्या संधी आणि व्यवसायाला उभे राहणारे धोके याचं विश्लेषण करू शकतो. स्ट्रेंथ आणि विकनेस यावर आपण काम करून नियंत्रण आणू शकतो. बहुतेकदा संधी आणि धोके यावर आपले नियंत्रण नसते.  याचा वापर जर व्यवस्थित केला तर व्यवसायाला अनिश्चततेपासून जे प्रश्न उद्भवतात त्याचे उत्तर शोधू शकतो. 

सकाळ लेख क्र ९ 

Tuesday 22 February 2022

चित्रा रामकृष्णा

इथं आपले राजकारणी एकमेकांना शिव्या देण्यात मश्गुल असताना त्या चित्रा रामकृष्णा कडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय. कसली खंग्री स्टोरी आहे. एखादा हॉलिवूड पिक्चर निघू शकेल. बॉलिवूड वाल्यांचा घासच नाही, असला खतरनाक मालमसाला आहे. 

मागे रॅनबॅक्सी विकल्यावर दोघा भावांनी कसे दहा हजार कोटी रुपये एका बाबाच्या नादी लागून उडवले होते त्यापेक्षाही रंगीत स्टोरी आहे चित्रा रामकृष्णाची. कोण तो आनंद सुब्रमणियन, त्याची बायको सुनिथा आनंद, कोण तो हिमालयन योगी. बीसी, जगातल्या सगळ्यात पॉवरफुल स्टॉक एक्स्चेंज ला स्वतःची जहागीर बनवून टाकली होती. काय म्हणे तो हिमालयन योगी, त्याला प्रत्यक्ष दर्शन द्यायची गरज नाही म्हणे. आणि तो बाईला वर हे ही सांगतोय "तू केशरचना आज अशी कर, ज्यामुळे तू अजून आकर्षक दिसशील." सेशेल्स ला न्यायचं काय निमंत्रण देतो, तिथं समुद्रात एकत्र पोहू या काय म्हणतो आणि ती बाई पण काय त्याला परमहंस म्हणते, योगी, सिद्धपुरुष म्हणते. इ मेल आय डी पण कसला कडक बनवला आहे rigyajursama@outlook.com, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद चं कॉम्बिनेशन म्हणे. खलास. भाषा बघितली का इ मेल ची. स्वामी नित्यानंद पण फिका पडेल. 

कुठली ती को लोकेशन ची थेअरी. त्या मायक्रो मिलिसेकंद च्या ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन वरून कमावलेले करोडो रुपये, त्याची चौकशी करताना सापडलेले योगीला पाठवलेले इ मेल्स आणि कुणालाही न कळू देता झालेली आनंद सुब्रमणियन ची चीफ ऍडव्हायजर म्हणून अपॉइंटमेंट. कसली सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. 

अन त्याहून कहर म्हणजे, बाईच्या आजूबाजूला बागडणारे तथाकथित फायनान्स विझकिड्स ना त्याची भनक पण लागू नये? अख्ख्या देशाच्या जीडीपी साईझ पेक्षा जास्त व्यवहार होणाऱ्या संस्थेची ही स्त्री एमडी आहे आणि खुशाल तिथल्या अंतर्गत बाबी दुसऱ्या कुणा तिऱ्हाइताला इ मेल वरून शेअर करते. आणि हे कुणाच्या लक्षात येत नाही? जोक करून टाकला आहे सगळ्या सिस्टमचा. 

मार्केट वर गेल्यावर इथं लोकांना फायनान्स चा ऑर्गझम होतो, अन खाली गेल्यावर लोक आत्महत्या करतात, इतक्या सेन्सिटिव्ह असणाऱ्या संस्थेचा खेळ मांडून टाकला या लोकांनी. असा डोकं घुसळवून टाकणारा गुन्हा केल्यावर यांना शिक्षा काय, तर म्हणे रु ३ कोटी. बाईंचा निव्वळ पगार चार वर्षाचा ३० कोटी झाला आणि त्या आनंद सुब्रमणियन चा वीस एक कोटी. फुकटात बाहेर पडतात की अल्मोस्ट. 

वाईट ही वाटतं, राग पण येतो. इतकी शिक्षित बाई. एनएसइ चालू झाल्यापासून त्या इन्व्हॉल्व्ह होत्या. स्ट्रॉंग बिझिनेस वूमन म्हणून नावाजली गेलेली. पण इतकं मिस्टेरीयस वागणं. आम्हाला पंधरा रु जीएसटी कमी भरला म्हणून नोटीस येते आणि इथं सगळ्या सिस्टम ला वेठीला धरलं जातं आणि सगळं हश हश अफ़ेअर. 

काय काय घडतं या जगात, त्या रामकृष्णाला माहिती!

Saturday 19 February 2022

सकाळ लेख क्र ८

मागील लेखात लिहिल्याप्रमाणे एकदा व्यवसायाचे मूळ सिद्धांत आणि उद्देश शोधला की मग पुढची पायरी येते ती व्यवसायाचा थोडा दूरवर विचार करण्याची. साधारण हा काळ तीन ते पाच वर्षाचा असावा. त्या काळामध्ये व्यवसायाचं रूप काय असणार आहे, आपल्याला काही नवनवीन गोष्टी करायच्या आहेत का आणि असेल तर त्या कुठल्या याबद्दल विचारमंथन व्हायला हवं. व्यवस्थापनेच्या भाषेत याला "बिझिनेस प्लॅन" म्हणतात. उद्याचा विचार करण्याची मानसिकता ही सिनियर लीडरशिप कडे असणं अपेक्षित असतं. त्याचं प्रतिबिंब हे या व्यवसायाच्या योजनेवर पडावं ज्यायोगे येणाऱ्या वर्षांमध्ये व्यवसायाची वाटचाल कोणत्या मार्गावर होणार हे अधोरेखित करता येतं. 

या श्वेतपत्रिकेत व्यवसायाचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याशिवाय कंपनीचं मिशन स्टेटमेंट काय आहे आणि ते कुणासाठी, कोणत्या पद्धतीने पूर्ण करायचं आहे हे उल्लेखलं गेलं पाहिजे. हे मिशन स्टेटमेंट बनवण्यासाठी जर तुम्हाला फारसे कष्ट पडत नसतील तर तुम्ही व्यवसाय योग्य पद्धतीने करत आहात असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. थोडक्यात व्यवसायाचा आराखडा हा तुमच्या डोक्यात तयार आहे, तो फक्त व्यवस्थितपणे कागदावर उतरवायचा आहे. एकदा ते झालं की लिहिलेल्या गोष्टींवर वैचारिक मंथन करता येतं आणि व्यवसायच्या भावी काळातील योजना या स्पष्टपणे समोर येतात. 

कंपनीचे मूळ सिद्धांत, मूळ उद्देश, मिशन स्टेटमेंट आणि हे मिशन कोणासाठी, काय पद्धतीने, किती काळात पूर्ण करतोय हे ज्याठिकाणी लिहिलं जातं त्याला व्यवसायाचा "दूरदृष्टी फलक" (व्हिजन बोर्ड) म्हंटलं जातं. हा एकदा तयार झाला की व्यवस्थापकीय कौशल्याचा पुढील भागाकडे आपल्याला जाता  येतं. 

तो भाग म्हणजे वार्षिक ध्येय ठरवणे. हे वार्षिक ध्येय बनवताना मी हॉवर्ड बिझिनेस रिव्ह्यू च्या एका पेपरचा संदर्भ देतो. ते असं म्हणतात की आपले वार्षिक ध्येय जर सांख्यिकी पायांवर लिहून काढायचे असतील तर त्यांना चार भागात विभागावं. या पद्धतीला त्यांनी "बॅलन्स स्कोअर कार्ड" असं नाव दिलं आहे. हे चार भाग आहेत, फिनान्शियल गोल (आर्थिक ध्येय), कस्टमर ओरिएन्टेशन (ग्राहकांप्रती सजगता), इंटर्नल प्रोसेस अँड सिस्टम्स (अंतर्गत पद्धती), लर्निंग अँड ग्रोथ (नाविन्यता आणि वृद्धी). थोडक्यात हा संदर्भ असं सांगतो की आपल्या व्यवसायात आपण जी काही ध्येये ठरवतो आणि ती पूर्ण करण्यासाठी ज्या काही कृती ठरवतो, त्या सर्व कृतींना आता उल्लेखलेल्या चार क्षेत्रात विभागता येतं आणि ते कौशल्य एकदा अंगीकारलं तर व्यवसायाचं व्यवस्थापन करणं हे सोपं जातं आणि त्यामागे पद्धतशीर निर्णयाचा आणि त्यायोगे कृतींचा आराखडा बनवता येतो. सगळ्यात मुख्य म्हणजे आपण जे ठरवलं ते त्याबरहुकूम घडतं आहे का हे मॉनिटर करता येतं. 

हे सगळं वाचताना कदाचित असं वाटू शकेल की हे सगळं छोट्या व्यवसायाने करायची गरज आहे का? तर माझं उत्तर हो, असं आहे. आता इथे वाचताना ते अवघडही वाटू शकेल, पण एकदा तुम्ही व्यवसायाचा अभ्यास करत हे कौशल्य शिकलात तर तुमचा व्यवसाय हा शाश्वत पद्धतीने आणि त्याचबरोबर तो तुमच्या नियंत्रणात आहे असं लक्षात येईल. तस झालं तर मग करोना सारख्या आपत्तीने अस्थिर झालेल्या जगात तुमच्या व्यवसायाला स्थैर्य आणण्यात हातभार लागेल असं मला वाटतं. 

सकाळ लेख क्र ८, 


Friday 18 February 2022

रिलायन्स

या आधीच्या बजाज सरांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पॉझिटिव्ह वाईब्ज चा उल्लेख केला होता. तेव्हा कॉमेंट मध्ये असं लिहिलं होतं की "रिलायन्स मध्ये कोणते वाईब्ज जाणवतील?" कॉमेंटचा टोन थोडा उपहासाचा होता, असं आपलं मला वाटलं.  

शक्यतो माझे अनुभव इथं लिहितो. ऐकीव माहितीवर शक्यतो लिहीत नाही. रिलायन्स बद्दल बरेच वाद प्रवाद आहेत. रिलायन्सचा अन माझा कुठल्याही मार्गाने व्यावसायिक संबंध आला नाही. त्यामुळे मी कधी त्यांच्यावर लिहिलं नाही. आज लिहितो. ही पूर्णपणे माझी मतं आहेत. ती पटावी असा आग्रह नाहीच, नेहमीप्रमाणे. हे जे काही लिहिलं आहे ते माझं भारतीय व्यवसायाबद्दल जे काही तोकडं नॉलेज आहे त्यावर आधारित आहे.  

रिलायन्स चा अन माझा संबंध आला असेल तर तो अप्रत्यक्ष पणे. मी हायड्रॉलिक सील विकत असताना सुरत जवळ हाझीरा नामक गावी जायचो. एस्सार आणि एल अँड टी मध्ये मला जावं लागायचं. रस्त्यात रिलायन्स ची अजस्र रिफायनरी दिसायची. ती बघून मी नेहमीच अचंबित व्हायचो. 

अजून मी आमच्या घराजवळ असणाऱ्या रिलायन्स मार्ट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजिटल या दुकानात एक ग्राहक म्हणून जायचो. तिथला अनुभव असा फार काही एक्स्ट्रा ऑर्डीनरी वगैरे नव्हता. मध्ये मी जिओ चं कार्ड घेतलं, एक एक्स्ट्रा कार्ड असावं म्हणून. त्यांचाही काही असा उल्लेखनीय अनुभव नाही आहे. नाही म्हणायला माझ्याकडे रिलायन्स चे शेअर आहेत. सामान्य माणसाला रिलायन्सने शेअर मार्केट ची गोडी लावली असं म्हणतात. मला काही त्या शेअरने खूप जास्त परतावा दिला वगैरे अशातला काही भाग नाही. इन फॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी एल अँड टी, किंवा टाटा च्या काही कंपन्यात कमावले. रिलायन्सने नुकसान पण केलं नाही. 

थोडक्यात सांगायचं तर रिलायन्स बद्दल मला फार काही ममत्व वगैरे नाही आहे. 

पण तरीही रिलायन्स मला एक भारी कंपनी वाटते. मुळात उत्पादन क्षेत्रातील कुठल्याही अवाढव्य कंपनीबद्दल मला आदर वाटतो. कारण त्यांनी असंख्य एम्प्लॉयमेंट जनरेट केली असते. आज रिलायन्स मध्ये साधारण अडीच लाखापर्यंत लोक काम करतात. ही झाली डायरेक्ट एम्प्लॉयमेंट. त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या व्हेंडर कडे काम करणाऱ्या लोकांची बेरीज केली तर साधारण ही संख्या पंधरा लाखापर्यंत जाईल. जास्तच असणार आहे ही संख्या. त्यांचा ग्रुप टर्नओव्हर साधारण पणे ५ लाख कोटी रुपयाच्या जवळपास आहे. म्हणजे आपल्या जीडीपीच्या ०.२%. रिलायन्स चा ऍसेट बेस खतरनाक आहे. मुळात धीरूभाईंनी एकाच आयुष्यात शून्यातून ६०००० कोटीपर्यंत टर्न ओव्हर नेला. आणि पुढे मुकेशभाईंनी तो पाच लाख कोटीपर्यंत. ही खायची गोष्ट नाही आहे मित्रानो. माझा स्वतःचा एका गोष्टीवर विश्वास आहे की ही अचिव्हमेंट लांड्यालबाड्या करून जमत नाही. त्यांच्या मूळ सिद्धांतात एक कुठलीतरी गोष्ट ताकदीची असणार आहे जि त्यांच्या सगळ्या तथाकथित अवगुणांना ओव्हपॉवर करते.  परत आपण हे ही लक्षात घ्यायला पाहिजे की हे सगळं घडतं आहे भारतासारख्या देशात. जिथं कॅपिटॅलिस्ट लोकांना आजही गुन्हेगार म्हणूनच बघितलं जातं. आजही इझ ऑफ डुईंग बिझिनेस च्या स्केल वर आपण कुठंतरी तळाला आहोत. भारतातल्या ब्युरोक्रसीला, कस्टम डिपार्टमेंट ला तोंड देत असा भव्य दिव्य बिझिनेस उभं करणं ही माझ्या मते क्रेडीटेबल गोष्ट आहे.  

राहता राहिला त्यांची टाटा च्या एथिकल बिझिनेस प्रॅक्टिसशी केली जाणारी तुलना. ती अनाठायी आहे असे मी म्हणणार नाही. पण शेवटी प्रत्येकाच्या व्यवसायाचं एक स्ट्रक्चर असतं, उद्देश असतो.  टाटा असो वा एल अँड टी असो, यांचे ओनर कुठलीही फॅमिली नाही आहे. प्रोफेशनल्स ने चालवणाऱ्या या दोन्ही कंपन्या आहेत. रिलायन्स चे मूळ सिद्धांत पटणार पण नाहीत आपल्याला पण भारतीय उद्योगक्षेत्रातील काँट्रीब्युशन आपण नाकारू शकत नाही, हे ही तितकंच खरं. 

आज अनेक सर्व्हिस सेक्टर मधील कंपन्यांचं गुणगान होतं. व्हावं, त्यात वावगं नाही आहे. त्यांनी सुद्धा समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आर्थिक स्थैर्य दिलंच आहे. पण उत्पादन क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत एक जागतिक दर्जाची कंपनी उभी करणाऱ्या धिरुभाई आणि मुकेश अंबानी यांना सर्व्हिस इंडस्ट्रीच्या लीडर्सपेक्षा मी वरचं स्थान देईल. 

असो. राजकीय विचारधारा बाजूला ठेवून जर प्रतिक्रिया लिहिल्या तर संयुक्तिक राहील. अर्थात हे अपील आहे, आग्रह नाहीच.... नेहमीप्रमाणे 


श्री राहुलकुमार बजाज

बजाज ऑटो मध्ये जॉईन होण्याची संधी दोनदा आली होती. एक १९८६  मध्ये आणि नंतर १९८९ मध्ये. १९८६ मध्ये त्यांनी जवळपास आमचा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादचा अख्खा क्लास जॉईन करून घेतला होता. रादर त्या काळात औरंगाबाद मध्ये त्यांना मिळतील तेवढे इंजिनियर्स लागत होते. मला डिग्रीला ऍडमिशन मिळाली आणि बजाजला जॉईन झालो नाही. १९८९ मध्ये डिग्री झाल्यावर परत बजाज ऑटो औरंगाबादमध्ये कॅम्पस मध्ये निवड झाली होती, पण ऐनवेळेला जॉईन होताना मेडिकल मध्ये फेल झालो आणि परत एकदा निराशा पदरी आली. 

पुढे मी एसकेएफला लागलो. तिथले हुशार म्हणून गणले जाणारे इंजिनियर्स यांनी बजाज ऑटो मध्ये काम केलं होतं आणि मग एसकेएफ ला आले होते. इतकंच काय पण माझे क्लासमेट असणाऱ्या साऱ्या जणांच्या वागण्यात एक धार आली होती. टेक्निकल नॉलेज त्यांचं झळाळून निघत होतं. बजाज ऑटोच्या टेक्निकल कामाची कमाल होती. अशी तगडी ऑर्गनायझेशन श्री राहुलकुमार बजाज यांनी बनवली होती. 

पुढे हायड्रॉलिक सील्स विकण्याच्या आणि नंतर माझ्या स्पिंडल दुरुस्ती आणि उत्पादन करायच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला बऱ्याचदा बजाज ऑटो च्या औरंगाबाद आणि आकुर्डी प्लांट मध्ये जावं लागलं. आजही जातो. लौकिकर्थाने मी फारसा काही बिझिनेस केला नाही, पण कधीही बजाज ऑटो मध्ये जायचं म्हंटल्यावर मी हरखून जायचो. एक वेगळीच सकारात्मक भावना बजाज ऑटो च्या मेन गेट पासून सरसरत जायची. कंपनीच्या लीडरची ही कमाल असते. श्री राहुलकुमार बजाज यांच्यामुळे असणारे पॉझिटिव्ह व्हाइब्ज हे कंपनीच्या प्रत्येक आवारात जाणवत राहतात. 

बजाज ऑटो मध्ये दिसणारा नेटनेटकेपणा, कुठलंही काम उत्तम करण्याचा तिथला आग्रह, सातत्याने नवनवीन होणारी डेव्हलपमेंट ही संस्कृती राहुलकुमार बजाज सरांनी रुजवली आणि त्यांची शिकवण पुढच्या पिढीने फुलवली. सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व असावं अशा पद्धतीने डावपेच रचणाऱ्या चायनीज उत्पादनाला मात्र दुचाकी आणि चारचाकी व्यवसायात भारतात जम बसवता आला नाही त्यामागे भारतातील सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांचा सहभाग आहे. बजाज ऑटो चे धोरण या क्षेत्रात पूरक होतं आणि ते बनवण्यात श्री राहुलकुमार बजाज यांचं योगदान असावं असं मानण्यात चांगला वाव आहे. उत्तर भारतातील हिरो ग्रुपने जपानच्या होंडा बरोबर सामंजस्य करार करार करत बजाज ऑटो ला टक्कर दिली आणि भले व्यवसायिक गणितावर ते बजाजच्या पुढे गेले पण मार्केट मध्ये बजाज ऑटो चा दबदबा कायम राहिला. स्कुटर या त्यांच्या एस प्रॉडक्ट ला दुरावा देत, पुढच्या पिढीने आणलेल्या मोटारसायकल ला श्री राहुलकुमार बजाज यांनी पाठिंबा दिला आणि कंपनीची सूत्र राजीव आणि संजीव बजाज यांच्या हातात सोपवताना कुठलंही फ्रिक्शन होणार नाही याची काळजी घेतली. 

भारतीय उत्पादनक्षेत्राला ज्या मोजक्या कंपन्यांमुळे चार चांद लागले त्यात बजाज ऑटो चा नंबर खूप वर आहे आणि पर्यायाने श्री राहुलकुमार बजाज यांचं नाव हे आपल्या औद्योगिक इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा आत्यंतिक आदराने घेतलं जाईल यात शंका नाही. चार पाच वर्षांपूर्वी एका लग्न सोहळ्यात श्री राहुलकुमार बजाज केवळ दहा फुटांवर बसले होते. पण त्यांच्या आजूबाजूला मोठमोठ्या लोकांचा घोळका होता, त्यामुळे इच्छा असूनही मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण दुरूनच नमस्कार केला. सुदैवाने मला पुढचा जन्म जर इंजिनियरचा मिळाला तर काही कंपन्यांमध्ये माझी या जन्मी काम करायची अपूर्ण राहिलेली इच्छा तेव्हा पूर्ण होईल यात एक नाव हे बजाज ऑटो पण आहे. 

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे अर्ध्वयू, बुलंद भारत की बुलंद तस्वीर दिवंगत श्री राहुलकुमार बजाज यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.  

Thursday 17 February 2022

माझे एक ओळखीचे गृहस्थ आहेत. एका बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी मशीन ऑपरेटर म्हणून काम चालू केलं. १९८५ च्या सुमारास. पुण्यात आले तेव्हा खिशात तीस रुपये होते. काम इमानेइतबारे केलं. कष्ट केले. काम करत एक वन बीएचके फ्लॅट घेतला. जिथं घेतला तो त्या काळात पुण्याच्या बाहेर एरिया होता. कालपरत्वे तिथं चांगली डेव्हलपमेंट झाली. 

तीन एक वर्षांपूर्वी त्यांनी रिटायरमेंट घेतली. पुण्यापासून साठ किमीवर त्यांचं गाव आहे. तिथं छोटं टुमदार घर बांधलं. घरामागे तीन साडेतीन एकरचं शिवार आहे. तिथं शेती करतात. कंपनीतून रिटायरमेंट घेताना चांगले पैसे मिळाले. ते व्यवस्थित इन्व्हेस्ट केले. त्याचे आता चांगले रिटर्न्स मिळतात. एस डब्ल्यू पी ने जितके हवे तितके पैसे त्यांना दरमहा मिळतात. 

वन बीएचके फ्लॅट च्या बिल्डिंग मध्ये होता ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये गेली. तिथं टू बीएचके फ्लॅट मिळाला. तिथं मुलगा राहतो. मुलीचं लग्न झालं आहे. 

आयुष्यात सुरुवातीला काय वांदे झाले असतील तितकेच. आता कसली ददात नाही आहे. सगळं निवांत आहे. 

म्हंटलं तर अगदी सरधोपट स्टोरी.  

आणि म्हंटलं तर आयुष्याचा बराच काळ आर्थिक स्थैर्य. मला असं नेहमीच वाटत आलं आहे की असे लोक ज्यांनी आपले खर्च आपल्या कमाईला अनुसरून ठेवले त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ हे एखाद्या श्रीमंत माणसापेक्षा कमी नसतं. आर्थिक साक्षरता म्हणतात ती ही. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी खूप पैसेच कमवावे लागतात असं नाही आहे, पण आपले रिसोर्सेस व्यवस्थित प्लॅन करून मंथली आऊटफ्लो ला बीट करणारा इनफ्लो ठेवला की आर्थिक स्थैर्य येतं. नाहीतर खूप पैसे कमावल्यावर सुद्धा आर्थिकदृष्ट्या अस्थिरता असणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतोच की!

Sunday 13 February 2022

सकाळ लेख क्र ७

 आपण मोठ्या आस्थापनेला भेट देतो तेव्हा तिथे एक बोर्ड भिंतीवर टांगलेला दिसतो. जिथे त्या आस्थापनेचे काम करण्याचे मूळ सिद्धांत (कोअर व्हॅल्यूज) आणि मूळ उद्देश (कोअर पर्पज) लिहिलेले असतात. कधी आपण विचार केला आहे का की  ते का लिहिले असतात? आणि मुख्य म्हणजे कधी हा विचार केला आहे का की हा फलक फक्त मोठ्या आस्थापनेत का दिसतो? कुणास ठाऊक काहींना वाटत असेल की हे सिद्धांत आणि उद्देश यावर विचार करायची गरज ही फक्त मोठ्या व्यवसायाला असते. किंवा कुणाला हे ही वाटू शकेल की हे फक्त लोकांना लुभावण्यासाठी केलेलं असतं. त्याने फक्त भिंती सजवल्या जातात प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात त्याचा काहीही उपयोग नसतो. 

माझं याबाबतचं मत थोडं वेगळं आहे. मला सुद्धा व्यवसायाचे मूळ उद्देश आणि सिद्धांत डिझाईन करण्याची प्रेरणा २०१६ ला मिळाली. म्हणजे व्यवसाय चालू केल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी. हे माहिती का करून घ्यायला पाहिजे यावर माझं मत व्यक्त करतो. 

उद्योजक जेव्हा त्याचा व्यवसाय चालू करतो आणि जेव्हा व्यवसाय वयात येतो, म्हणजे त्याचं व्यावसायिक वय ८-१० वर्षे होतं तेव्हा आपण एक निष्कर्ष काढू शकतो की तो व्यवसाय आता तग धरू शकेल. याचा दुसरा अर्थ असा की ग्राहकांनी त्या व्यवसायाला स्वीकारलं आहे. पुढं जाऊन आपण असं म्हणू शकतो की उद्योजकाचे जे व्यवसायाचे सिद्धांत आहेत ते ग्राहकांनी, पुरवठादाराने तसेच त्याच्या एम्प्लॉईजने पण स्वीकारले असतात. आता थोडा असा विचार करा की ज्या सिद्धांतावर उद्योजकाने व्यवसायाचा डोलारा सांभाळला असतो तेच सिद्धांत त्याच्या प्रत्येक सहकाऱ्याने वापरले तर काय होईल?

अगदी बरोबर.....त्या आस्थापनेतल्या कर्मचाऱ्याबरोबर कोणताही व्यवहार करताना असं वाटेल की जणू काही आपण त्या व्यवसायाच्या संस्थापकाशी आपण व्यवहार करतोय. ग्राहकाला वाटेल की ज्या सिद्धांताच्या आधारे व्यवसायाला ऑर्डर दिल्या त्या आपण सातत्याने देऊ शकू कारण जी उत्पादन गुणवत्ता, जी सेवा आपल्या उद्योजकाने दिली तीच गुणवत्ता, तीच तत्पर सेवा त्या कंपनीचा कर्मचारी पण देतोय. साधारण अशाच पद्धतीची भावना पुरवठादार किंवा कामावर काम करणारे सहकारी यांच्या मनात पण असेल. 

या सगळ्याचा उपयोग कंपनीतील कर्मचाऱ्यांची निवड करताना होतो. त्यातही जेव्हा आपण जेष्ठ पदावरचे लोक निवडत असतो, त्यावेळेला या मूळ सिद्धांत आणि उद्देश याचा संयुक्तिक वापर केला तर तुमचे पर्याय कंपनीत उभे करायला मदत होते आणि त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी वाटून घेता येते. बऱ्याचदा असं होतं की आपण कर्मचाऱ्यांची निवड करताना व्यवसायाशी निगडित तांत्रिक कौशल्यांच्या आधारे निवड करतो पण जर कधी त्यांची कामाची पद्धती आवडली नाही तर ती मूळ सिद्धांताच्या निगडित असते. तेव्हा मुलाखत घेताना जॉब सीकर चे मूळ सिद्धांत हे तुमच्या सिद्धांताशी जुळतात का ते पहा. तांत्रिक कौशल्य हे नंतर ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवू शकतो पण सिद्धांत शिकवणं हे अत्यंत अवघड काम आहे. त्यातही ऑर्गनायझेशन च्या संरचनेत जेव्हा आपण जेष्ठ कर्मचारी निवडतो तेव्हा हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो. 

तेव्हा तुमच्या व्यवसायाला जर सात आठ वर्षे झाली असतील आणि आता त्याबद्दल मनात आत्मविश्वास आला असेल की आपण हा व्यवसाय अनेक वर्षे चालवू शकू,  तर तुमचे व्यवसायाचे मूळ सिद्धांत काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे शोधण्याचा जरूर प्रयत्न करा. थोडी अवघड प्रोसेस आहे पण अत्यंत उत्कंठावर्धक आहे. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर सल्लागार लोकांची मदत घ्या. फक्त इथे एक निर्वाणीचा मुद्दा सांगतो. त्यावर काम करताना त्या प्रोसेसचा तुम्ही भाग व्हा. कारण तुमचे सिद्धांत आणि उद्देश हे तुम्हालाच शोधायचे आहेत. सल्लागाराची मदत फक्त प्रोसेस समजावून घेण्यासाठी घ्या. 

व्यवसायाच्या या महत्वाच्या टप्प्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

सकाळ लेख क्र ७

Wednesday 9 February 2022

आमच्या एका फोरम मध्ये आम्ही काही ग्रुप तयार केले आहेत. जीडीपी ग्रुप म्हणतो आम्ही. ग्रोथ ड्रिव्हन पॅशनेट पीपल. महिन्यातून एक मिटिंग असते. व्यवसायाच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर करतो ज्यायोगे व्यवसाय करण्याच्या पद्धतीत काही बदल आणता येतील. अर्थात चांगल्यासाठी. 

काल मीटिंगमध्ये आमचा एक चर्चेचा मुद्दा होता, जो पुढील आर्थिक वर्षाच्या संदर्भातील होता. प्रत्येकाने काही गोष्टीवर प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं. काही जणांचं झालं होतं. काहींचं नव्हतं झालं. त्या मध्ये मी पण एक होतो. काम पूर्ण न झाल्याचं सांगताना मी पटकन म्हणून गेलो "नाही झालं, कारण मला सुचलं नाही. किंवा कंटाळा आला. मी कबूल करतो कि चूक झाली."

माझं बोलून झाल्यावर ग्रुप मधील एक जण म्हणून गेला "ते ठीक आहे. पण कन्फेशन इज नॉट ओन्ली सोल्युशन". 

थोडं हार्ड हीटिंग स्टेटमेंट होतं माझ्यासाठी. मी विचार केला त्यावर. आणि जाणवलं की त्या स्टेटमेंट मध्ये तथ्य आहे.  

बऱ्याचदा आपण चुकीची कबुली देऊन ते काम न केल्याचं प्रायश्चित्त घेतलं अशी मनाची समजूत घालतो. पण आपल्या वागण्यात एखादी चूक झाली तर ते कबूल करणं ही पहिली स्टेप झाली.  ती झालेली चूक सुधारून बरोबर प्रोसेसच्या दृष्टीने आपण काउंटर कृती करायला हवी ही पुढची पायरी. त्यापुढे जाऊन तशाच टाईपची चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपण आपल्या जीवनपद्धतीत काय बदल घडवतोय यावर सुद्धा कॉन्शसली काम करण्याची तयारी हवी. नुसतीच तयारी नव्हे तर तसं प्रत्यक्ष वागत त्याची एसओपी बदलली की मग ते चूक झाल्याचं अकौंट क्लोज होतं. 

अवघड प्रोसेस आहे, पण स्वतःला व्यावसायिक म्हणून एस्टॅब्लिश करायचं असेल तर हे शिकायला हवं.  

थर्टी इयर्स चा एक्सपिरियन्स झाला आहे, पण हे शिक्षण काही सुटत नाही आहे. 

Tuesday 8 February 2022

माझे एक रिझवान म्हणून मित्र आहेत. त्यांचा सणसणीत मोठं घर आहे. त्या घरामध्ये त्यांनी एक प्रार्थनास्थळ बनवलं आहे.  रिझवान स्वतः पाच वेळा नमाज पढतात. 

एके दिवशी मी रिझवानभाईंना भेटायला गेलो होतो. त्यांची नमाजाची वेळ होती. मी त्यांना विचारलं "मी येऊ का वर मशिदीत?" रिझवान भाई म्हणाले "चला की. पण चालणार आहे का तुम्हाला?" मी म्हणालो "तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मलाही काही प्रॉब्लेम नाही."

मी त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रार्थनास्थळी गेलो. रिझवानभाई आणि त्यांच्या बरोबर दोघे जण नमाज अदा करत होते. मी मागच्या भिंतीला टेकून डोळे मिटून हात जोडत वज्रासनात बसलो होतो.

नमाज पढून झाल्यावर रिझवानभाईंनी मला आवाज दिला "चला मंडलिक साहेब."  मी डोळे उघडले आणि त्यांच्याबरोबर खाली आलो. 

रिझवानभाईंचं कुठलं सोशल मीडियावर अकौंट आहे कि नाही माहित नाही. पण असलं तरी त्यांनी माझ्या नमस्काराच्या पोझ चा फोटो काढून काही द्वेषपूर्ण पोस्ट लिहिली नसती याबद्दल खात्री आहे. 


Sunday 6 February 2022

सकाळ लेख क्र ६

 Planning without action is simply hallucinations. 


हेन्री फोर्ड


कल्पनांना कृतीची जोड नसेल तर या आभासी विश्वात आपण तरंगत राहतो. हे होतं बऱ्याचदा. चर्चा घडते, विश्लेषण होतं आणि जेव्हा म्हणून कृती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण कच खातो. कृतीशीलता हा व्यवस्थापकीय कौशल्याचा एक महत्वाचा गुण आहे. यातील एक गंमत अशी आहे की पैशाच्या अभावी आपण कृतिशील नसणं हे मी समजू शकतो, पण बऱ्याचवेळा कृती न करण्यामागे चालढकल पणा किंवा "करू की, घाई काय आहे" हा स्वभाव नडतो.


एखादा निर्णय घेतल्यावर कृती न करण्यामागे अजून एक कारण असू शकतं आणि ते म्हणजे प्राधान्य न ठरवणे.


कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं हे न ठरवल्यामुळे एक वेळ अशी येते की अनेक कामं आ वासून उभी राहतात आणि मग कुठलंही कामं करण्याचा उत्साह मावळून जातो किंवा मग एखाद्या कमी महत्वाच्या कामामध्ये आपण वेळ घालवतो. कामाचा प्राधान्यक्रम जर ठरवला तर कृती अतिशय परिणामकारक ठरते. एक छोटा प्रयोग सांगतो. सकाळी काम चालू केल्यावर कोणती कामं करायची ती लिहून काढा. त्याला १ ते ५ प्राधान्यक्रम द्या. ही प्राधान्यता सोपं किंवा अवघड या पद्धतीने करू नका तर व्यवसायाची काय गरज आहे यावरून ठरवा. पहिलं काम पूर्ण केल्याशिवाय दुसरं काम हातात घेऊ नका. त्या पाच कामाशिवाय दुसरं कुठलंही काम करू नका. 


यालाच पूरक असं कौशल्य आपल्याला शिकावं लागतं आणि ते म्हणजे चिकाटी, पाठपुरावा. काही अवघड कामं असतात. आपण ती करायची टाळतो. लहानपणी प्रश्नपत्रिका सोडवताना आपण अवघड प्रश्न शेवटी सोडवण्यासाठी राखून ठेवायचो. व्यावसायिक आयुष्यात सुद्धा आपण असे प्रश्न नंतर सोडवायचे म्हणून बाजूला ठेवतो. प्रश्नपत्रिकेत हे प्रश्न सुटले नाहीत तर काही गुण वजा व्हायचे. व्यावसायिक जीवनात सुद्धा हे प्रश्न न सोडवण्याची किंमत असते. तिची पत काय आहे यावरून ते काम करायचं की नाही यावर एकदा होकार आला की मग मात्र ते पूर्णत्वाला न्यायचा ध्यास ठेवणं जमायला हवं. व्यावसायिक गरजेनुसार ते काम संपवायचं कधी यावर काही पुढे मागे होऊ शकतं. 


मॅक्डोनाल्ड ज्याने नावारूपाला आणली त्या रे क्रॉक च्या जीवनावर आधारित एक चित्रपट आहे. त्यात रे क्रॉक च्या तोंडी एक वाक्य आहे. Perseverance beats genius. हे वाक्य खरं करणारी असंख्य उदाहरणे आपल्याला आजूबाजूला घडताना दिसतात. लौकिकार्थाने शैक्षणिक काळात बुद्धिमत्तेच्या फुटपट्टीवर फार काही चमकदार कामगिरी न करणाऱ्या अनेकांनी पुढे व्यवसायिक आयुष्यात मात्र जगाने दखल घ्यावी असं काम केलं. हे करण्यासाठी कृतीशीलता वाढवणे, कामाचं प्राधान्य ठरवणे आणि सरतेशेवटी हातात काम घेतलं की ते पूर्णत्वाकडे नेण्याचा सचोटीने प्रयत्न करणे या तीन अमूर्त व्यवस्थापकीय कौशल्याना समजून घेऊन आत्मसात करणे हे गरजेचं आहे.


सकाळ लेख क्र ६