Friday 18 February 2022

रिलायन्स

या आधीच्या बजाज सरांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पॉझिटिव्ह वाईब्ज चा उल्लेख केला होता. तेव्हा कॉमेंट मध्ये असं लिहिलं होतं की "रिलायन्स मध्ये कोणते वाईब्ज जाणवतील?" कॉमेंटचा टोन थोडा उपहासाचा होता, असं आपलं मला वाटलं.  

शक्यतो माझे अनुभव इथं लिहितो. ऐकीव माहितीवर शक्यतो लिहीत नाही. रिलायन्स बद्दल बरेच वाद प्रवाद आहेत. रिलायन्सचा अन माझा कुठल्याही मार्गाने व्यावसायिक संबंध आला नाही. त्यामुळे मी कधी त्यांच्यावर लिहिलं नाही. आज लिहितो. ही पूर्णपणे माझी मतं आहेत. ती पटावी असा आग्रह नाहीच, नेहमीप्रमाणे. हे जे काही लिहिलं आहे ते माझं भारतीय व्यवसायाबद्दल जे काही तोकडं नॉलेज आहे त्यावर आधारित आहे.  

रिलायन्स चा अन माझा संबंध आला असेल तर तो अप्रत्यक्ष पणे. मी हायड्रॉलिक सील विकत असताना सुरत जवळ हाझीरा नामक गावी जायचो. एस्सार आणि एल अँड टी मध्ये मला जावं लागायचं. रस्त्यात रिलायन्स ची अजस्र रिफायनरी दिसायची. ती बघून मी नेहमीच अचंबित व्हायचो. 

अजून मी आमच्या घराजवळ असणाऱ्या रिलायन्स मार्ट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजिटल या दुकानात एक ग्राहक म्हणून जायचो. तिथला अनुभव असा फार काही एक्स्ट्रा ऑर्डीनरी वगैरे नव्हता. मध्ये मी जिओ चं कार्ड घेतलं, एक एक्स्ट्रा कार्ड असावं म्हणून. त्यांचाही काही असा उल्लेखनीय अनुभव नाही आहे. नाही म्हणायला माझ्याकडे रिलायन्स चे शेअर आहेत. सामान्य माणसाला रिलायन्सने शेअर मार्केट ची गोडी लावली असं म्हणतात. मला काही त्या शेअरने खूप जास्त परतावा दिला वगैरे अशातला काही भाग नाही. इन फॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी एल अँड टी, किंवा टाटा च्या काही कंपन्यात कमावले. रिलायन्सने नुकसान पण केलं नाही. 

थोडक्यात सांगायचं तर रिलायन्स बद्दल मला फार काही ममत्व वगैरे नाही आहे. 

पण तरीही रिलायन्स मला एक भारी कंपनी वाटते. मुळात उत्पादन क्षेत्रातील कुठल्याही अवाढव्य कंपनीबद्दल मला आदर वाटतो. कारण त्यांनी असंख्य एम्प्लॉयमेंट जनरेट केली असते. आज रिलायन्स मध्ये साधारण अडीच लाखापर्यंत लोक काम करतात. ही झाली डायरेक्ट एम्प्लॉयमेंट. त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या व्हेंडर कडे काम करणाऱ्या लोकांची बेरीज केली तर साधारण ही संख्या पंधरा लाखापर्यंत जाईल. जास्तच असणार आहे ही संख्या. त्यांचा ग्रुप टर्नओव्हर साधारण पणे ५ लाख कोटी रुपयाच्या जवळपास आहे. म्हणजे आपल्या जीडीपीच्या ०.२%. रिलायन्स चा ऍसेट बेस खतरनाक आहे. मुळात धीरूभाईंनी एकाच आयुष्यात शून्यातून ६०००० कोटीपर्यंत टर्न ओव्हर नेला. आणि पुढे मुकेशभाईंनी तो पाच लाख कोटीपर्यंत. ही खायची गोष्ट नाही आहे मित्रानो. माझा स्वतःचा एका गोष्टीवर विश्वास आहे की ही अचिव्हमेंट लांड्यालबाड्या करून जमत नाही. त्यांच्या मूळ सिद्धांतात एक कुठलीतरी गोष्ट ताकदीची असणार आहे जि त्यांच्या सगळ्या तथाकथित अवगुणांना ओव्हपॉवर करते.  परत आपण हे ही लक्षात घ्यायला पाहिजे की हे सगळं घडतं आहे भारतासारख्या देशात. जिथं कॅपिटॅलिस्ट लोकांना आजही गुन्हेगार म्हणूनच बघितलं जातं. आजही इझ ऑफ डुईंग बिझिनेस च्या स्केल वर आपण कुठंतरी तळाला आहोत. भारतातल्या ब्युरोक्रसीला, कस्टम डिपार्टमेंट ला तोंड देत असा भव्य दिव्य बिझिनेस उभं करणं ही माझ्या मते क्रेडीटेबल गोष्ट आहे.  

राहता राहिला त्यांची टाटा च्या एथिकल बिझिनेस प्रॅक्टिसशी केली जाणारी तुलना. ती अनाठायी आहे असे मी म्हणणार नाही. पण शेवटी प्रत्येकाच्या व्यवसायाचं एक स्ट्रक्चर असतं, उद्देश असतो.  टाटा असो वा एल अँड टी असो, यांचे ओनर कुठलीही फॅमिली नाही आहे. प्रोफेशनल्स ने चालवणाऱ्या या दोन्ही कंपन्या आहेत. रिलायन्स चे मूळ सिद्धांत पटणार पण नाहीत आपल्याला पण भारतीय उद्योगक्षेत्रातील काँट्रीब्युशन आपण नाकारू शकत नाही, हे ही तितकंच खरं. 

आज अनेक सर्व्हिस सेक्टर मधील कंपन्यांचं गुणगान होतं. व्हावं, त्यात वावगं नाही आहे. त्यांनी सुद्धा समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आर्थिक स्थैर्य दिलंच आहे. पण उत्पादन क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत एक जागतिक दर्जाची कंपनी उभी करणाऱ्या धिरुभाई आणि मुकेश अंबानी यांना सर्व्हिस इंडस्ट्रीच्या लीडर्सपेक्षा मी वरचं स्थान देईल. 

असो. राजकीय विचारधारा बाजूला ठेवून जर प्रतिक्रिया लिहिल्या तर संयुक्तिक राहील. अर्थात हे अपील आहे, आग्रह नाहीच.... नेहमीप्रमाणे 


No comments:

Post a Comment