Friday 28 October 2022

डॉ शंतनू अभ्यंकर

डॉ शंतनू अभ्यंकर आणि माझी तशी जुजबी ओळख. म्हणजे मी त्याला ओळखतो पण तो मला ओळखत नसावा. किंवा ओळखत असला तरी वैभवीचा नवरा म्हणून. मला मात्र या ना त्या कारणाने शंतनू बद्दल माहिती आहे. त्याचा मोठा भाऊ शशांक माझ्या चांगला ओळखीचा. रादर माझं पहिलं व्हिजिटिंग कार्ड शशांकने छापलं आहे १९९४ साली. शंतनू चे सासरे बजाज औरंगाबाद चे उच्चपदस्थ. त्यांच्याही घरी माझं जाणं झालेलं. त्याने होमिओपॅथी करून मग बीजेला ऍडमिशन घेतली ते ही लक्षात आहे. असो, मी शंतनूला ओळखतो हे सांगण्यासाठी ही पोस्ट नाही आहे. तर पोस्ट आहे त्याच्या लेखाबद्दल. 

शंतनूला नुकताच भेटलो होतो डॉ कल्पना सांगळेच्या पुस्तक प्रकाशनाला. आपल्या खुसखुशीत शब्दात त्याने त्या दिवशी भाषण पण केलं. आणि त्यानंतर दीड दोन महिन्यात त्याच्या आजाराचं निदान झालं. लंग्ज कँसर. मी आणि वैभवी पण ऐकून अवाक झालो. काल त्याचा त्या संदर्भांतील लेख वाचला.

ज्यांना कुणाला कँसरबद्दल, किंबहुना कुठल्याही आजाराबद्दल भीती असेल त्याने हा लेख वाचावा. लोक अध्यात्मिक, तात्विक बऱ्याच गोष्टीवर बोलतात. मला वाटतं शंतनू ते जगतोय. ते तो जगतोय हे सांगण्यासाठी त्याला शब्दजंजाळ भाषा वापरावी लागत नाही. त्याने स्वतःचे अनुभव, त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकुणात आयुष्याकडे किती निरपेक्ष भावनेनें बघायला हवं हे त्या लेखातून प्रत्येक वाक्यातून उद्धृत केलं आहे. त्यात फार अलंकारिक भाषा नाही आहे, काहीही अनाकलनीय नाही आहे. इन फॅक्ट एखादा मित्र आपल्या खांदयावर हात ठेवून स्वतःच्याच आजाराबद्दल आपलंच सांत्वन करतोय, त्यातले बारकावे आपल्याला समजावून सांगतोय आणि एकुणात ते सगळं करताना जगण्याकडे किती तटस्थ भूमिकेने बघायला हवं आहे हे सांगतोय. बरं  हे सगळं करताना कुठलाही अभिनिवेश नाही आहे, कुठलीही निराशा नाही आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांवर कायम विरोधात आहे असा एक समज आपल्याकडे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत शंतनू जे आयुष्य जगतो आहे ते अध्यात्मापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. तो लेख वाचताना शंतनू बद्दल कणव निर्माण होत नाही, त्याच्याबद्दल रागही येत नाही तर आपण स्तिमित होत तो लेख वाचत संपवतो. 

योगी लोक काय सांगतील ते तुमच्या माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या, कुठलाही फॅन्सी ड्रेस न घालणाऱ्या, हातात कमंडलू वगैरे न घेता या संवेदनशील डॉक्टर ने अगदी सहजगत्या सांगितलं आहे. बोरकरांनी म्हंटल्याप्रमाणे "जीवन यांना कळले हो" ही कविता शंतनूला परफेक्ट लागू होते. 

एक किस्सा ऐकला होता. मंदाताई आमटेंनी, विश्वास मंडलिकांना विचारलं होतं म्हणे की "आमचे हे योग वगैरे काही करत नाही, तर तुम्ही समजावून सांगा त्यांना." तेव्हा मंडलिक मंदा ताईंना म्हणाले की "हा माणूसच योग जगतोय, त्यांना वेगळ्या योगाभ्यासाची गरज नाही आहे." शंतनूला ही तुलना कदाचित आवडणार नाही, पण त्याने ज्या पद्धतीने लिहिलं आहे त्यावरून लक्षात येतं की त्याने आपली जीवनप्रणालीच योगशी जुळणारी ठेवली आहे.

हे मी का लिहितोय? शंतनूच्या लेखाची समीक्षा म्हणून, तर नाही. मी मलाच समजावून सांगतोय. माझ्या आणि माझ्या जवळच्यांच्या आजाराच्या बाबतीत मी एक नंबरचा भित्रा. माझे सारेच जण जणू काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आले आहेत अशा समजुतीत मी असायचो. वयोपरत्वे ती भावना हळूहळू कमी होत चालली आहे. शंतनूच्या लेखाने ती भावना अगदी नाहीशी नाही पण तिचा परिणाम स्वतःवर कमी होण्याची शक्यता तयार झाली आहे.

एकदा मी कार मधून येताना किशोरी ताईचं "आज सजन संग मिलन बनिलवा" ही बंदिश ऐकत होतो. ती पूर्ण झाल्यावर मी आपसूक दीर्घ श्वास घेत नमस्कार केला. माझ्या ड्रायव्हर ने विचारलं "काय हे भजन होतं का?" मी काहीच बोललो नाही. तसाच शांत बसून राहिलो. कारण मला ती बंदिश काय आहे हे आजही माहित नाही, पण जे ऐकलं ते कमाल होतं. शंतनूचा लेख वाचल्यावर मी असाच नतमस्तक झालो. तो लेख मेडिकल जर्नल चा लेख आहे, स्वानुभव आहे, तात्विक आहे किंवा अजून काय आहे ते माहित नाही पण जे आहे ते मेस्मराइज करणारं आहे हे नक्की. 

डॉ शंतनू, तुला हार्दिक शुभेच्छा. बी व्हिक्टोरियस.

राजेश मंडलिक

Thursday 6 October 2022

कोविड नंतर भारतीय इकॉनॉमी

खरंतर या विषयावर मी आधी लिहिलं होतं, पण पब्लिक मेमरी शॉर्ट असते आणि त्यातही फेसबुकवर लिहिलेलं कुणी सिरियसली घेत नाही. त्यामुळे मध्ये एका पोस्टवर जेव्हा मी भारत आर्थिक बाबींवर सुस्थितीत आहे असं लिहिलं होतं तेव्हा कुणाला तो विनोद वाटला होता किंवा काहींचा त्यावर विश्वास बसला नव्हता. 

जे काही मी लिहिणार आहे ते स्टॅटेस्टिक्स हे वेगवेगळ्या कॉन्फरन्स मधून मांडलं गेलेलं आहे. व्यवसायाच्या निमित्ताने मला तिथे हजर राहायला मिळतं आणि तिथून हा डेटा मिळतो. त्याची सत्यासत्यता प्रूव्ह करण्याची जबाबदारी मी टाळणार नाही, पण मी काही बिझिनेस ऍनालिस्ट वगैरे नाही आहे. जे काही मोठी लोक सांगतात ते टिपून ठेवतो. 

- भारतासारखे विकसनशील देश हे जागतिक इकॉनॉमी च्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स देत आहेत. यात भारतासकट साऊथ ईस्ट एशियातील काही देशांचा समावेश होतो. 

- भारताचा इन्फ्लेशन रेट हा प्री कोविड वर्षात ३.५% ते ५% दरम्यान होता. पोस्ट कोविड काळात तो ७% पर्यंत पोहोचला आहे. पुढच्या वर्षी तो परत प्रि कोविड लेव्हल ला येण्याची शक्यता आहे म्हणजे ४% च्या आसपास. प्रगत देशांचा इन्फ्लेशन रेट हा प्रि कोविड काळात साधारण पणे  १.५% ते २% या दरम्यान होता. पोस्ट कोविड आणि त्यात परत रशिया युक्रेन युद्धामुळे तो १०% पर्यंत पोहोचला आहे. तो सध्या ८.५% ते ९% दरम्यान स्थिरावला आहे. पण तो परत मूळ पदावर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे असे तज्ञ लोक सांगतात. 

- रशिया बरोबरचे राजनैतिक संबंध हा भारताच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. भारत आणि रशिया यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अनेक वेळा झाले आहे. त्यात लष्करी सामुग्री शिवाय क्रायोजेनिक इंजिन सारख्या हाय एन्ड टेक्नॉलॉजी चा समावेश होतो. या मैत्रीपूर्ण संबंधामुळे रशिया युक्रेन युद्धात आपण रशियाला विरोध केला नाही आणि त्यामुळे भारताला फ्युएल प्राईस इन्फ्लेशन वर बाकी जगाच्या मानाने चांगलं यश मिळालं. भारतातही इंधनाचे दर वाढले पण रेट ऑफ चेंज हा अनेक प्रगत देशापेक्षा कमी होता. 

- भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा येणाऱ्या काही वर्षात ७% च्या वर असणार आहे हे माझं नाही तर अनेक फायनान्शियल संस्थांचा कयास आहे. जगात इतका ग्रोथ रेट हा फार कमी देशांचा असणार आहे. 

- भारताने आपली बँकिंग प्रणाली ही फार सेफ बनवली आहे. आणि हे आज नव्हे तर अगदी २००३ पासून. आणि त्यामुळेच दोन मोठे धक्के जागतिक अर्थव्यवस्थेला बसले पण भारतीय आर्थिक स्थिती डळमळीत झाली नाही. पहिला धक्का लेहमन ब्रदर्स चा २००९ साली आणि नंतर २०२० चा कोविड. त्या दोन्हीला भारतीय अर्थव्यवस्थेने समर्थ पणे तोंड दिलं आहे. 

- आजच्या घडीला कॅपिटल गुड मार्केट साईझ (म्हणजे यात ऑटोमोबाईल, हेवी मशिनरी वगैरे सारखे प्रोजेक्ट येतात) हे साधारण पाने $ ४३.२ बिलियन चं आहे ते २०२६ साली $ १०० बिलियन पर्यन्त जाण्याचं प्रोजेक्शन आहे. मेक इन इंडिया या ड्राइव्ह चा सगळ्यात जास्त फायदा या सेक्टर ला होताना दिसतोय. रेल्वे, डिफेन्स, एरोस्पेस या क्षेत्रात प्रचंड काम भारतीय कंपन्यांना मिळालं आहे. पी एल आय, गतिशक्ती या योजनेमुळे याला सकारत्मक इंधन मिळालं आहे. 

- सगळ्यात मुख्य म्हणजे जागतिक मार्केट मध्ये चीन ने आपली विश्वासार्हता गमावली आहे. यात कोविड एक भाग झाला. याव्यतिरिक्त गेल्या दोन एक वर्षातील घडामोडी पाहिल्या तर चीन-तैवान संबंध, सेमी कंडक्टर सप्लाय मध्ये आलेलं अभूतपूर्व शॉर्टेज, श्रीलंका इश्यू, भारताशी घेतलेला राजनैतिक पंगा, त्यांच्या पोलादी पडद्याआड घडणाऱ्या अनेक घटना यामुळे त्यांनी आपली इमेज खराब करून टाकली आहे. याचा अर्थ असा नाही की चीन फार प्रॉब्लेम मध्ये वगैरे आहे कारण त्यांचं अंतर्गत कंझम्पशन खूप जास्त आहे. त्यामुळे "चीन साठी चीन, आणि बाकी जगासाठी भारत" अशी एक प्रतिमा उत्पादन क्षेत्रात तयार झाली आहे. भारताबरोबरच व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया या दक्षिण पूर्व देशांना फायदा होणार आहे. 

संधी दाराशी आली आहे. तिचं सोनं करण्यासाठी "उत्पादकता" हा कळीचा मुद्दा आहे. आजच्या घडीला भारताची उत्पादकता ही जगात खूप कमी आहे. यावर जास्त बोलत नाही कारण गाडी मग वेगळ्याच ट्रॅक वर जाईल. फक्त एक माझं मत सांगतो. या संधीचा फायदा उठवण्यासाठी प्रचंड सामाजिक स्थित्यंतर तर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. तसं जर झालं र पुढील ७-८ वर्षे प्रचंड घडामोडीची असणार आहेत. 

आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिकल सिस्टम घडामोडी मध्ये आपली पावले बरोबर पडली तर भविष्यात येणाऱ्या  अनेक दीपावली समृद्धी घेऊन येणार आहेत, असा अनेकांचा अंदाज आहे. मीही त्याबद्दल आशावादी आहे

Monday 3 October 2022

ब्रेन ड्रेन

 आजकाल बऱ्याच वेळा हे दिसून येतं आहे की अनेक घरातून मुलं मुली हे परदेशात शिकायला जातात आणि तिकडेच नोकरी पकडून सेटल होतात. बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे "आजची तरुणाई पैशाच्या मागे लागली आहे" किंवा "चंगळवाद फोफावला आहे" इतकं बोलून त्या वस्तुस्थितीची बोळवण करून टाकतो.  ही तिकडे गेलेली मुलं मुली भारतात असणाऱ्या लोकांचा चेष्टेचा विषय बनतो. 

माझ्या मते आपण हे सगळ्या गोष्टीकडे फार सुपरफिशियल पद्धतीने बघतो आहोत. म्हणजे अगदी माझीच केस स्टडी घेऊ यात. माझा व्यवसाय हा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. देवकृपेने बऱ्यापैकी नाव वगैरे कमावलं आहे. एका मल्टी नॅशनल कंपनीशी सामंजस्य करार झालेला आहे. बरं सेटको बोर्ड आमच्या मुलांना कंपनीत घ्यायला तयार आहे. तरीही माझा मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनियरिंग करून एम एस करण्यासाठी अमेरिकेत गेला आहे आणि परत येण्याची सुतराम शक्यता नाही आहे. माझ्या पार्टनर ची मुलगी सुद्धा सेटको त काम करून आता अमेरिकेला गेली आहे. आणि तिची पण परतण्याची शक्यता धूसर आहे. यापलीकडे जाऊन माझ्या मोठ्या मुलाने नील ला मेकॅनिकल इंजिनियरिंग न घेता कॉम्पुटर सायन्स घ्यायला लावलं आहे आणि त्यालाही तो तिकडे बोलावतो आहे. 

माझ्या देशप्रेमाच्या मला फार गप्पा मारायला आवडत नाही. पण ज्या पद्धतीने मी कंपनी चालवतो त्यावरून माझ्या कंपनीतल्या लोकांनाच नव्हे तर माझ्या अमेरिकन काउंटर पार्ट ला पण माहिती आहे की माझं भारतावर आणि इथल्या लोकांवर किती प्रेम आहे ते. त्यामुळे ती भावना घरात पण झिरपलेली आहे, असा माझा समज आहे. 

आता प्रश्न हा आहे की इतकं असलं तरी माझी पोरं बाहेर राहण्याचा विचार करत आहेत. मग याचं उत्तरदायित्व आपल्या सोशल इको सिस्टम वर आहे असं माझं हळूहळू मत बनत चाललं आहे. 

आपल्या इथलं असलेलं क्वालिटी ऑफ लाईफ, मग त्यामध्ये रस्त्याची कंडिशन, सार्वजनिक स्वच्छता, आपल्या इथं असणारी जातिव्यवस्था, धार्मिक भावनेचं झालेलं अति उन्मादीकरण या आणि यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात असा माझा दावा नाही तर कयास आहे. घरापासून कॉलेज पर्यंत जाताना फ्लेक्स वर दिसणारे भावी नेते जे गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून असतात, कानावर सातत्याने पडणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या बातम्या, शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात राजकारण्यांचा झालेला शिरकाव या सगळ्यांचा तरुणाईच्या मनावर सबकॉन्शसली फरक पडत नसेल असं जर आपल्याला वाटत असेल तर मोठी गल्लत होत आहे.

वानगीदाखल दोन घटना सांगतो. सहावी सातवीत असताना निलला शाळेतर्फे ट्राफिक कंट्रोल कसा करायचा हे शिकवायला रस्त्यावर नेलं होतं. लाल सिग्नल असल्यामुळे ते बारा वर्षाच्या पोराने एक इनोव्हाला हात दाखवून अडवलं. तर त्या गाडीतल्या पांढरे कपडे आणि सोनसाखळी घातलेल्या सद्गृहस्थाने निलला, बारा वर्षाच्या पोराला "ए ***चोद चल, बाजूला हो" असं सांगून गाडी पुढं दामटली. 

सिंहगडच्या पायथ्याला काही गावकरी आपल्या शेतात कार पार्किंग साठी जागा देतात. यश, नील आणि मी असे तिघेही होतो. सिन असा होता की आमच्या शेजारी एका पोलीस अधिकाऱ्याची एर्तिगा होती. तो अधिकारी आपल्या कुटुंबकबिला घेऊन आला होता. पण बाहेर जाताना त्या गावकऱ्याने त्याला पार्किंग चे ३० रु मागितले तेव्हा "पैसे कसले मागतोस हरामखोर" असं म्हणत निघून ती गाडी निघून गेली. 

अशा घटनांचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत नसेल का? घरातील एक सद्भाव वातावरण आणि घराच्या बाहेर जे १२ एक तास असतात तिथलं विचित्र वातावरण यामुळे ही तरुणाई कन्फ्युज होत नसेल का? 

त्यामुळे हे बिघडलेलं सोशल इंजिनियरिंग जर आपण बदललं नाही तर हे प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत जाणार आहे. आज अनेक शहरात बिल्डिंगमध्ये फक्त म्हातारे लोक राहत आहेत. राष्ट्रप्रथम ही भावना खऱ्या अर्थाने मनात रुजवायची असेल तर शैक्षणिक, मनुष्यबळ विकास, सामाजिक विकास या मूलभूत गोष्टीवर अगदी मुळापासून काम करत प्रगल्भ समाज बनवणं ही काळाची गरज असणार आहे. 


ब्रेन ड्रेन