Tuesday 27 April 2021

देवत्व

२००९ ची गोष्ट आहे. माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं. मुलगा लंडन चा होता, त्यामुळे पाहुणे तिकडून मुंबईला आले होते. मला मित्राने त्या पाहुण्यातील काही लोकांची काळजी घ्यायला सांगितली होती. त्यात काही लोक ऐंशी च्या वयाचे होते. सकाळच्या चहापासून ते त्यांना कारमध्ये बसवायचं, सामान लोड करायचं, कार्यालयात त्यांना काय हवं नको ते पाहायचं हे सगळं मी फार आवडीने केलं. हे करत असताना मी काही फार वेगळं करतोय असं ही मला वाटत नव्हतं.  

लग्नाचा सोहळा संपला. निरोपाची वेळ आली. आणि न भूतो न भविष्यती असा प्रसंग घडला. त्या लंडन मधील पाहुण्यातील बाबुभाई मकवाना म्हणून मुलाचे काका आणि त्यांचं कुटुंबीय हे माझ्या आई बाबांच्या समोर अक्षरश: हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. ऐंशी वर्षाच्या बाबूभाईंनी माझ्या बाबांची गळाभेट घेतली आणि म्हणाले "तुमच्या पोटी देव जन्माला आला आहे." तो प्रसंगच इतका हृदय होता की मला सुद्धा गदगदून आलं. 

परवा एका मित्रवर्याने फार छान आणि सौम्य शब्दात सांगितलं की देवत्व तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. त्यावर विचार करत असताना मला हा प्रसंग आठवला. प्रत्यक्ष जीवनात असे अनेक प्रसंग आले जिथे लार्जर दॅन लाईफ अशा प्रतिमेत अडकायची भीती होती. मला वैयक्तिक असं वाटतं की त्यापासून मी सुदैवाने लांब आहे. त्या भावनेला माझ्या कक्षेच्या बाहेर ठेवलं आहे. आणि जर प्रत्यक्ष आयुष्यात ही परिस्थिती आहे तर या आभासी जगात तिथं अडकण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. 

असं सांगावं लागतं हे खरंतर विचित्र आहे. कारण या आधी पण मी एकदा नमूद केलं होतं की इथल्या लाईक्स अन कॉमेंट्स काही क्षण आनंद देत असतीलही. पण खरा आनंद मला माझ्या बिझिनेस मध्ये काही जबराट घडलं तर होतो. एखाद्या कस्टमर ने ऍप्रिसिएशन लेटर पाठवलं तर मी दिवसभर हवेत असतो. कंपनीतल्या पोरांनी जर काही कारणामुळे कुठल्या निर्णयाची स्तुती केली तर मी सातवे आसमान वर पोहोचतो.  खूप कमी वेळा होतं  ते, पण जेव्हा होतं  तेव्हा मोगॅम्बो खुश होतो. 

मुळात मी स्वतः देवत्वाच्या गाभाऱ्यात फार कमी जणांना बसवतो. या पृथ्वीवर आणलं म्हणून आई वडिलांना देव मानतो. त्याव्यतिरिक्त फार कमी व्यक्ती आहेत ज्यांना मी देव मानतो. आणि जे आहेत ते आज जगणारे जिते जागते माणसं आहेत. त्यात काही समाजासाठी काम करणारे आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही मेंटॉर्स आहेत. त्यांचं कवित्व पण फार लिमिटेड गातो. त्यांना गाभाऱ्यात ठेवत नाही किंवा त्यांची आरती पण गात नाही.  इतिहासातल्या लोकांबद्दल आदर आहे, त्यांनी केलेल्या कामातून काही शिकतो सुद्धा. पण त्या शिकवणीचा उपयोग पायरी म्हणून करतो आणि त्यावर उभं राहून भविष्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्यातील कुणालाही देवत्व देण्यास मन धजावत नाही. 

थोडक्यात सांगायचं म्हणजे देवत्वाच्या कसोटीवर मी स्वतः लोकांना फार तावून सुलाखून घेतो. आणि या फेसबुकवरची कसोटी फारच तकलादू आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. इथं जर कुणी ते तथाकथित देवत्व द्यायचा प्रयत्न केला तर त्याला तिथंच झटकून द्यायची मानसिकता अगदी पुरेपूर बाळगून आहे, याची खात्री बाळगावी. 

इथं खऱ्याखुऱ्या मानव्याचा अंगीकार करायला आयुष्य कमी पडतंय. ती देवत्वाची खोटी झूल हवी कशाला? 

सकारात्मकता

माणसाने या काळात सकारात्मक राहावे काय? असा प्रश्न प्रसाद ने विचारला. सरळ उत्तर द्यायचं असेल तर, हो. किंवा थोडा प्रश्नाच्या रूपात उत्तर द्यायचं असेल, तर दुसरा चॉईस काय आहे?

एका गोष्टीपासून दूर राहायचं असेल ती म्हणजे टॉक्सिक सकारात्मकता. करोना चालू झाला होता तेव्हा ते एक डॉक्टर म्हणत होते, कुठला करोना, काय आहे ते वगैरे वगैरे. (ते डॉक्टर पण करोना ने गेले असं ऐकलं मी). ही झाली विषारी सकारात्मकता. किंवा आजच्या तारखेला याच फाजील आत्मविश्वासापायी अखिल भारतातील नेत्यांचं वर्तन. किंवा ते हरिद्वार..... जाऊ दे नकोच तो विषय. ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी बऱ्याचदा सौम्य निगेटिव्हिटी पेक्षा घातक असते. 

जेवण करत असताना दाताखाली खडा आला तर आपण तो तसाच चावत पुढे जात नाही. आणि चिडून खाणं पण सोडत नाही. जसा तो खडा आपण फेकून देतो आणि पुन्हा जेवायला चालू करतो त्याच पद्धतीने एखाद्या घटनेमुळे नकारत्मकता वाटली तर तिचा त्याग करणं आणि पुन्हा आपलं काम जोमाने चालू करणं आणि  काही गोष्टी आपण बदलू शकणं हे केवळ दुरापास्त आहे,  त्या कोणत्या आहेत हे ओळखून त्याच्यापासून दूर राहणं यात शहाणपण आहे, असं मला वाटतं. 

काही लोकांची  सकारात्मकता फसवी पण असते. तोंडदेखले ही लोक खूप उत्साही आणि चैतन्याने सळसळली आहेत असं वाटतं. ही मंडळी खूप भ्रामक जगात वावरत असतात. म्हणजे अगदी गणपत वाणी बिडी पिताना, चावायाचा नुसतीच काडी, म्हणावयाचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, या कवितेप्रमाणे ही लोक कल्पनेचे फक्त इमले चढवत असतात आणि या काल्पनिक जगात खुश राहतात. प्रत्यक्षात मात्र कशात काय अन फाटक्यात पाय अशी परिस्थिती असते. (राजकारणी लोकांच्या मागे धावणारे कार्यकर्ते याचं परफेक्ट उदाहरण आहे) 

नकारात्मकता बऱ्याचदा झेलता येते. फक्त ती आपली थोडी एनर्जी खाते. पण आपल्या कृतिशील निर्णयामुळे तिला झाकोळता येते. प्रॉब्लेम येतो तो निराशावादी लोकांना हाताळताना. शक्यतो निराशावादी लोक हे सायलेंट किलर असतात. ते एकूणच वातावरण गढूळ करून टाकतात. ही लोक घाबरट असतात. सौम्य निराशावाद वाढला की त्याचं रूपांतर डिप्रेशन नावाच्या रोगात होतं. आणि त्याचे एक्स्ट्रीम परिणाम आपण सगळे जाणतो. 

असो. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या प्रश्नाला हाताळताना कृतिशील निर्णय ज्यामुळे घेता येतात ती सकारात्मकता. आणि तिचा अंगीकार मी, तुम्ही आणि सर्व भवतालाने घ्यायला हवं असं मला वाटतं. 

Sunday 18 April 2021

मत्सर

ज्या लोकांचं पगार पाणी घरी राहून काम करत चालू आहे, ती मंडळी सोडली तर प्रत्येकाला लॉक डाऊन नको आहे. असं नाही की त्यांना या व्हायरस चा धोका माहिती नाही. त्यांना अगदी याची परिणीती मृत्यू होऊ शकते , ही पण जाणीव आहे. पण तरीही हा धोका पत्करायला ते तयार आहेत. (उत्पादन क्षेत्र हे याचं जिवंत उदाहरण आहे. जमेल तितकी काळजी घेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज चालू ठेवल्या आहेत). 

आदर्शवत जगात घरी राहणं किंवा बाहेर जाऊन रोजीरोटी कमावणे यातला पाहिजे तो चॉईस करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला हवं. 

सध्या हा चॉईस फक्त राजकारण्यांना आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बिनधास्त बाहेर जातात. नुसते बाहेर जात नाहीत तर लाखो जनतेला रॅलीज आणि सभांच्या नावाखाली एकत्र पण आणतात. सत्तेची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 

वर्षभर अभ्यास करणाऱ्या पोरांच्या परीक्षा हे लोक रद्द करू शकतात पण एकाही राजकारण्याने एखादी निवडणूक रद्द करा किंवा पुढं ढकला अशी मागणी केल्याचं ऐकवात नाही. म्हणजे अगदी २८८ विधानसभेच्या जागा असलेल्या राज्यातील एक पोटनिवडणूक देखील नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की तिथले दिवंगत आमदार हे पोस्ट कोविड आजारामुळे निधन पावले. 

आणि हो, सर्व धार्मिक मेळे हा राजकारणाचा भाग आहे. इथं कुणीही अपवाद नाही. तो सगळाच प्रकार इतका थर्ड रेट आहे की त्यावर काही लिहावंसं पण वाटत नाही. निरिच्छ भावना आहे त्याबद्दल. हे सगळं घडवून आणणाऱ्या राजकारणी लोकांच्या पोलादी पंजात आपल्या सारख्या सामान्य जनतेचा जीव अडकला आहे, ऑक्सिजन आणि रेमेडिसीविर पेक्षा पण ही पकड दुर्दैवी आहे. मला आता राजकारणी लोकांचा राग येत नाही, तर त्यांना बाहेर जाऊन  जो काही उच्छाद मांडायचा आहे त्याबद्दल त्यांचा मत्सर वाटतोय. 

डॉ भूषण शुक्ला यांच्या पोस्टचा स्वैरानुवाद

Friday 9 April 2021

करोना डायरी भाग ४

ज्या घोषणेची आम्ही वाट पाहत होतो ती झाली आणि ती म्हणजे ३ मे ला कंपनी चालू करायची. पुणे/पिंपरी चिंचवड शहर सोडलं तर ग्रामपंचायतीत असणारे बिझिनेस चालू करा असं पेपर मध्ये छापून आलं. तसंही माझ्याकडे फार्मा कंपनीच्या लेटर मुळे कंपनी चालू करता येईल असं पत्र होतं. आणि नांदेड गाव ग्रामपंचायतीत येत असल्यामुळे  मी कंपनी नक्की चालू करू शकत होतो आणि तशी आम्ही केलीही. पण दुपारी चार वाजता पोलीस आले आणि सांगितलं की कंपनी चालू करता येणार नाही. मी परवानगी दाखवली, मिन्नतवारी केली. पण पाळणाऱ्यांसाठी नियम म्हणजे नियम. औट घटकेची खुशी एक दिवस घेतली आणि पुन्हा शटर बंद केलं. 

शेवटी गंगेत घोडं न्हालं आणि १३ मे ला कंपनी चालू करायची परवानगी मिळाली. नियमावलीत असंख्य गोंधळ होते, त्याला सामोरे जात कंपनी चालू केली. सगळ्यात मोठा प्रश्न होता मॅनपॉवर चा. बरेच लोक घरी जाऊन बसले होते. त्यांना परत पुण्यात आणायचं होतं. अनेक फोन आणि झूम कॉल्स च्या मदतीने त्यांना परत यायचं आवाहन केलं. हो ना करता करता, साधारणपणे १० जून पर्यंत ९०% जनता कंपनीत आली होती. 

सगळ्यात पहिले आर्थिक ताळेबंद आणि मग ऑर्डर फ्लो चा आढावा घेतला. सर्व टीम बरोबर मिटिंग केली. काम कसं करायचं त्याचा आराखडा आखला. आणि मग पुढील नऊ महिन्यात तिन्ही प्लांट चे सेल्स आणि ऑपरेशन चे लोक यांनी अभूतपूर्व काम केलं. 

आमचा बिझिनेस सेगमेंट तसा छोटा. स्पिंडल रिपेयर किंवा उत्पादन हा काही खूप मोठा सेगमेंट नाही आहे. मार्केट साईझ लहान. पण त्या मध्ये सुद्धा कल्पकतेने आणि कष्टाने सेल्स डिपार्टमेंट ने ऑर्डर्स आणल्या आणि ऑपरेशन डिपार्टमेंट ने त्याला तितकीच तोलामोलाची साथ देत कंपनीचा बिझिनेस जागेवर आणला. 

पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होतं. आणि ऑर्डर्स मिळवायला कस्टमर ला भेटणं तर गरजेचं होतं. माझी एर्तीगा आणि आमच्या प्लांट हेड ची स्विफ्ट आणि सोबतीला एक ड्रायव्हर. सेल्स च्या पोरांनी कस्टमर व्हिजिट चा धडाका लावला. गुजरातेत राजकोट पर्यंत, हैद्राबाद, बेळगाव, नागपूर इथपर्यंत पोरं कार ने जायचे. नाशिक, औरंगाबाद,कोल्हापूर आणि मुंबई तर अक्षरशः "जरा शिवाजीनगर ला जाऊन येतो" इतक्या सहजतेने टूर मारायचे. 

कंपनीतल्या सर्व ऑपरेशन डिपार्टमेंट ने सुद्धा तुफान काम केलं. प्रोडक्शन, असेंम्बली, टेस्टिंग, व्हेंडर डेव्हलपमेंट या सगळ्यांनी चौफेर काम करत सेल्स ऑर्डर ला यथायोग्य न्याय दिला. 

कुठलीही आर्थिक चणचण जाणवली की पलीकडचे लोक ज्या भूभागाकडे मृत गुंतवणूक म्हणून बोट दाखवायचे, त्याचे पैसे कंपनीत टाकून ते तोंड बंद करायचं असं मी आणि वाघेला ने ठरवलं. पण पैसे होते कुठे आमच्याकडे? शेवटी वाघेला ने मॅनेज केले आणि माझ्या बाबतीत चमत्कार झाला की ज्यायोगे मी पण पैसे उभे करू शकलो. परत एकदा आम्ही पलीकडच्या लोकांना पुरून उरलो. 

या सगळ्याचा परिणाम काय झाला आणि रिझल्ट कसे आले, ते पुढच्या भागात. 


करोना डायरी भाग ४ 



Wednesday 7 April 2021

महापाप

मागच्या वर्षी तीन महिने करोनाने इतकी ठासून मारली आणि कामधंदे बंद ठेवले तरी लोकांच्या अकला जागेवर आल्या नाही आहेत बहुधा. सरकार सांगतं आहे कीं उत्पादन क्षेत्र चालू राहील तरी मानभावीपणे लोक विचारतात "मग आता फॅक्टरी बंद ठेवायची का?". धंदे बंद करायची घाई मला असं वाटतं सरकारपेक्षा या फॅक्टरी मालकांनाच असावी. यामागची मनोभूमिका कळण्यापलीकडे आहे. म्हणजे काय यांच्या अकौंट पैसे पडून आहेत की यांचे कामगार यांना पगार मागत नाहीत. मला तर काही यांची पत्रास लागत नाही. 

आज एक बिझिनेस ओनर आला, "शनिवारी बंद ठेवायची का कंपनी?" का रे बाबा? अरे, शासनाला तुमच्यामुळे जीएसटी मिळतो ना, मग ते कशाला बंद ठेवायला सांगतील? त्यांच्या तिजोरीत पैसे नको का यायला? मग ते येणार कुठून? तुम्ही आम्ही काम केलं तर येणार ना? मग लागलीच व्यवसाय बंद ठेवण्याची भाषा तुम्ही स्वतःहून का करता? 

इथं बिचारे हॉटेल व्यावसायिक धंदा चालू रहावा म्हणून आर्जव करताहेत. डोळ्यात पाणी आणून विनवण्या करत आहेत. अन तुम्हाला परवानगी मिळत आहे तर काहीतरी कारण काढून तुम्ही बंद करायच्या गोष्टी करता? 

वेगवेगळे उपाय करा कि! कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर करा. लोकांचं लसीकरण लवकर करता येईल का याची चाचपणी करा. एकत्र या, एखादी कॉमन प्लेस ठरवून वैद्यकीय तपासणी करा. सगळं करा आणि व्यवसाय चालू ठेवा. कर्मचाऱ्यांना आश्वस्त करा, त्यांच्या मनातील करोनाची भीती काढा. मास्क द्या, सॅनिटायझर द्या, कुणाला बरं वाटत नसेल तर सुट्टी द्या. कस्टमर बरोबर संवाद साधा. व्यवसाय चालू ठेवण्याच्या दृष्टीने काय करता येईल ते सगळं करा.  

मान्य आहे, सुलतानी संकट आहे. प्रॉब्लेम गहिरा आहे. त्याला लढायची ताकद आपण काम करून आणायची आहे. लॉक डाऊन हा प्रकार नियम न पाळणाऱ्यांसाठी आहे. जे इमानेइतबारे नियम पाळतात, मास्क लावतात, स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेतात त्यांनी इकॉनॉमी रोलिंग ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करायला पाहिजे. आणि उत्पादनक्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की उत्पादन थांबलं नाही पाहिजे. ऑल रेडी दोन वर्षे आपली लागली आहे, पहिलं वर्ष मंदीमुळे आणि दुसरं वर्ष करोनामुळे. आता बाहेर आलो आहे तर परत गर्तेत जायची का मानसिकता ठेवता? आता आपलं विचार आणि आचार असे गुंफले पाहिजे की समाजाचं आर्थिक चक्र हे फिरतं राहिलं पाहिजे. ते थांबलं तर तुम्ही आम्ही तर तरून जाऊही, पण समाजातील एक मोठा प्रवर्ग प्रॉब्लेम च्या खाईत लोटण्याचं महापाप आपल्या डोक्यावर येईल इतकं ध्यानात ठेवा. 


Sunday 4 April 2021

करोना डायरी भाग ३

भाग २ संपला होता "त्यांची कटकट थांबल्यावर एक त्यांना मेल लिहिली, त्याचा मराठी अनुवाद पुढच्या पोस्टमध्ये. " या वाक्याने. तर जे लिहिलं त्याचा स्वैर अनुवाद थोडी काटछाट करून दिला आहे.

"नमस्कार. 

गेले काही दिवस आपल्यात घमासान चर्चा चालू आहे आणि चर्चेचा रोख हा आहे की हे वर्ष कसं खराब जाणार आहे, आणि त्या अनुषंगाने आपण आपला वित्त पुरवठा आणि नफा तोटा पत्रक व्यवस्थित कसा राहील या दृष्टीने काही निर्णय घेतले. हे सगळं करताना मानसिकदृष्ट्या मी थकलो होतो कारण आजवर, व्यवसायाची उतरंड होईल या दृष्टीने मी कधीही निर्णय प्रक्रियेवर काम केलंच नव्हतं. आपण मात्र चर्चेचा रोख असा ठेवला की आपण आपल्याच निर्णयक्षमतेवर शंका घेतल्या. 

आता पर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यात दोन तीन वर्षे अशी गेली जेव्हा वृद्धी करण्यात अडथळे आले. त्या काळातही मी हा तात्पुरता काळ आहे असं समजून नियोजन हे वृद्धिधिष्ठित ठेवलं. पण अर्थात हे वर्ष अजब आहे. इतकी खराब परिस्थिती कधीच नव्हती. असं असलं तरीही आपण जरा काही काळ नकारात्मकता बाजूला ठेवू शकतो का? आणि काही अशा गोष्टी शोधू शकतो का ज्यायोगे आपण या परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकू.? आपली वृद्धिधिष्ठित मानसिकता बरकरार ठेवू शकतो का? 

अन्यथा आपण या निराशावादी विचारात डुंबत राहिलो तर परिस्थितीने तयार केलेल्या भोवऱ्यात आपण गरागरा फिरू ज्यायोगे आपण आपली धूळदाण उडवायला कारणीभूत राहू. 

आपल्याला आता दोन मार्ग आहेत. एकतर मेंदूवर नैराश्याची पुडं चढवायची आणि असे निर्णय घ्यायचे की ज्याने परिस्थिती अजून चिघळेल. (जसं लोकांना काढणं) अन्यथा दुसरा मार्ग हा आहे की या नैसर्गिक आपत्तीला स्वीकारायचं आणि त्यावर मात करण्यासाठी काही उपाय शोधायचे की ज्यायोगे आपण हे वाईट दिवस सरल्यावर येणाऱ्या संधीचं आपण सोनं करू शकू! मी दुसऱ्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे आणि मी सर्वाना आवाहन करतो आपण सर्वानी मला यामध्ये साथ द्यावी." 

हे असं काही तरी पलीकडच्या लोकांना कळवलं. त्यातली पोटतिडिक बहुधा जाणवली असावी. आणि माझ्या मागचा लोक कमी करण्याचा ससेमिरा पूर्णच बंद झाला. आणि व्यावसायिक उद्दिष्ट पूर्णतः सामोरे आले. याच पद्धतीच्या अनेक मेल्स मला माझ्या अन्य सहकार्यांना पाठवाव्या लागल्या. वस्तुस्थितीची जाणीव देत, भविष्य आशादायी असेल यावर माझा सगळा संवाद बेतला होता. यामध्ये घशात माझे शब्द अडकले आणि ते म्हणजे एप्रिल आणि मे च्या पगारात २५% कपात होईल हे सांगताना. अर्थात डिसेंबर नंतर आम्ही हे परत देणार होतो पण तरीही हे सांगताना मन फार जड झालं खरं. आमची गॅंग पण इतकी भारी त्यांनी एका शब्दाने नाराजी व्यक्त केली नाही पण जे काही आम्ही सांगितलं, त्याचा खुल्या मनाने स्वीकार केला. 

अजून एका गोष्टीवरून माझं डोकं पकलं होतं. सामंजस्य करार होताना कंपनीच्या पदरात एक आमचा प्लॉट आला होता. पण या पाश्चात्य मंडळींना व्यवसाय करायचा तो फक्त भाड्याच्या जागेत. कुठलंही विस्तारीकरण करायचं आणि त्यासाठी पैशाची चणचण जाणवली की ही मंडळी त्या भूभागाकडे बोट दाखवायची. म्हणायची ही मृत गुंतवणूक आहे. याला विका. पण ते जरा तिरपांगडं प्रकरण असल्यामुळे विकलं जात नव्हतं. 

एप्रिलचा शेवटचा आठवडा उजाडला. व्यवसाय परत कधी चालू याची काही कल्पना येत नव्हती. एव्हाना आमच्या ऑनलाईन सेमिनारने पूर्ण देशात धूम मचवली होती. चेन्नई पासून ते परवाणु पर्यंत आणि इकडे पुण्यापासून ते जमशेदपूर पर्यंत आम्ही कस्टमर कनेक्ट चा धडाका लावला. आणि याबरोबर कंपनीतल्या सर्वांशी झूमद्वारे कनेक्ट होतोच. शारीरिक आणि श्वसनाचे व्यायाम, जलनेती, व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्या, वाफ घेणे याबाबतच्या सूचना किंवा काही ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्ही सतत एकमेकांशी बोलत राहिलो. 

ते भूभाग प्रकरण आणि या सगळ्या निराशेच्या गर्तेत असताना एकदा कंपनी सुरु झाल्यावर आमचा व्यवसाय कसा जागेवर आला, या संदर्भांतील गोष्ट पुढच्या भागात. याच काळात मी माझं "लीडरशिप" बद्दलची मतं आमच्या लोकांसमवेत शेअर केली. जमली तर त्या मेलचा अनुवाद पण देतो. 





सुरेश-

"झाले बहू, होतील बहू, या सम हाच" ही उक्ती सार्थ करणारा माझा भाऊ, सुरेश पाठक, २८ मार्च ला आम्हाला सगळ्यांना दुःखसागरात लोटून निघून गेला. खूप आठवणी आहेत त्याच्या. त्याच्या मनाचा मोठेपणा हा की आयुष्यभर सर्वांचे फक्त सद्गुण पाहणारा तो. कोणाविषयी काही वावगं बोललं तरी लागलीच म्हणणार "जाऊ दे गं, आपण आपलं कर्तव्य करावं आणि बाकी सोडून द्यायचं." निरागस हसणारा आणि दुसर्यांना हसवणारा. त्याच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर फेर धरून नाचत आहेत. 

माझ्या काकांना चार मुलं आणि आत्यालाही चार मुलंच. आजी माझ्या वडिलांना म्हणायची "इथं हैद्राबाद मध्ये आठ मुलंच आहेत. तुझ्या चार मुलींपैकी एक इकडे पाठवून दे." त्या आजीच्या आग्रहामुळे माझी रवानगी परभणीहून हैद्राबाद ला झाली, माझ्या काकांकडे, म्हणजे सुरेशच्या वडिलांकडे. तेव्हा मी दुसरीत होते. हैद्राबाद मोठे शहर. काका आणि आत्या, दोघांचे घर सुलतान बाजारात होते. घराजवळ डावरे स्कुल होती. त्या शाळेत सुरेश, अत्याचा मुलगा शरद आणि मी असे सारे जायचो. हैद्राबाद मोठं शहर, त्यामुळे मी थोडी घाबरायची. पण सुरेश माझ्या पाठीशी असायचा. मला मार्क चांगले मिळायचे. तो वैतागायचा. म्हणायचा "तुला जास्त मार्क मिळतात म्हणून मला मी अभ्यास कमी करतो म्हणून सगळे बोलतात.तू जरा अभ्यास कमी करत जा." शाळेतून घरी येताच आम्ही लगेच खेळायला बाहेर पळायचो. सर्व भावात मी एकटी बहीण. पण विटीदांडू, लगोरी, पतंग उडवणे या सगळ्या खेळात मला सहभागी करून घ्यायचे. गच्चीवर तो पतंग उडवायचा आणि मी त्याच्या मागे चक्री घेऊन फिरायची. या सगळ्यामुळे मी खेळात अगदी प्रवीण झाले आणि शाळेत टीमची कर्णधार झाले. 

पुढे मग भाषावार प्रांतरचनेत हैद्राबाद आंध्र प्रदेश मध्ये गेलं आणि मराठवाडा महाराष्ट्रात आलं. त्यावेळेस माझे काका, सुरेशचे वडील सीतारामपंत पाठक, हे मुंबईला कोर्टात रजिस्ट्रार म्हणून गेले आणि मी परभणीत परत आले. कारण मुंबईत जायची माझी डेअरिंग नव्हती. अर्थात सुरेश पुन्हा आयटीआय करण्यासाठी आमच्या घरी परभणीला आला. त्यामुळे आमची जुगलबंदी चालूच असायची. पुढं माझं लग्न झालं आणि मी मंडलिक झाले आणि सुरेश चं लग्न वाशिमच्या माळोदे घरातील सुनीताशी झालं. सुनीता वहिनी पण सुगृहिणी. सुरेशने आई वडिलांची प्रचंड सेवा केली आणि वहिनींनी त्याला तितकीच साथ दिली. घरात कायम पाहुण्यांची वर्दळ असायची. वहिनी आणि सुरेश खूप आदरातिथ्य करायचे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. मला दोन मुले. अनेक दिवाळी आणि राखीपौर्णिमा ला आम्ही भेटत राहिलो. बहीण भावाचं नातं अजून घट्ट होत गेलं. आम्ही पुण्यात आलो, अन सुरेश आमच्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमाला हजर व्हायचा. सकाळी यायचा, दहा ते दुपारी चार आम्ही हास्य जत्रेत मश्गुल असायचो. रात्री तो परत ठाण्याला जायचा. 

मध्ये दुर्दैवाने त्याच्या मुलाचे, सचिनचे, निधन झाले. पण त्याची वाच्यताही तो कुठे करत नसे. ते दुःख तो कधीच कुरवाळत बसला नाही. त्याला त्याच्या सर्वच भाच्यांचं विशेष कौतुक. माझ्या मुलांचा पण त्याला खूप अभिमान. त्यांचं शिक्षण, व्यवसाय याचा त्याला विलक्षण अभिमान होता. राजेशने कुठं कविता म्हंटली, किंवा त्याचं कॉलेज मध्ये भाषण वगैरे झाले की सुरेश मला आवर्जून फोन करायचा आणि राजेशची भरभरून स्तुती करायचा. उन्मेषच्या बांधकामाच्या व्यवसायाचं त्याला कौतुक होतं. त्यानेच बांधलेली राजेश ची फॅक्टरी बघायची त्याची इच्छा अपुरी राहिली. 

त्याची मुलगी सुचेता ही खऱ्या अर्थाने कन्यारत्न आहे. जावई तुषार आणि नातू अथर्व यांचा त्याला सार्थ अभिमान. अथर्व आणि त्याचं नातू-आजोबाचं नातं मोठं मोहक होतं. सुचेताच्या सासूबाईंची पण तो नेहमी तारीफ करायचा. हे कौटुंबिक सुख मात्र त्याला भरभरून मिळाले, याचं मला समाधान वाटतं. 

त्याचा जवळपास मला दररोज फोन असायचा, सकाळी आठच्या सुमारास. दररोज फोन आला तरी आम्हाला गप्पाना कधीच तोटा नव्हता. अथर्वची अमेरिकेतली खबरबात, परभणीतील मुक्ताजीनचे सोनेरी दिवस, हैद्राबादच्या आठवणी, इतर नातेवाईकांची चौकशी असे अनेक विषय असायचे. आयुष्य हसून खेळून जगायचं हे मी त्याच्याकडे बघून शिकले. त्याच्यापेक्षा मोठ्यांशी आणि वयाने लहान असणाऱ्यांशी तो एकाच सहजतेने बोलायचा. कुठल्याही दुःखाला न गोंजारता, दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानणारा असा माझा भाऊ!

लहानपणी मला एकटीला सोडून तू  पळत निघायचा आणि मग काका किंवा आत्या तुला बोलायचे की बेबीला एकटं सोडून का पुढे पळतोस. आताही परत मला एकटीला सोडून पुढे निघून गेलास. स्वर्गात असणारे काका आणि आत्याचे बोल खाशील तिथे पण, की इथेही बेबीला एकटं सोडून निघून आलास. लहानपणी परत यायचास, आता मात्र तू परत येणार नाहीस आणि मी तुझ्या आठवणी काढत रडत बसणार! त्याशिवाय काय उरलं आहे माझ्या हातात?

जन्मोजन्मी हाच भाऊ मिळो!

 कुमुद मंडलिक

Saturday 3 April 2021

करोना डायरी भाग २

लॉक डाऊन चा पिरियड जसा वाढत गेला, आणि कंपनीतले सगळे कर्मचारी एक तर त्यांच्या गावी घरी पोहोचले होते किंवा पुण्यात असतील तर ते घाबरले होते. सगळ्यात पहिलं आव्हान होतं ते त्यांच्या मनात विश्वास जगवायचा की कंपनी त्यांच्या पूर्ण पाठीशी असेल. त्या विश्वासाची त्यांना गरज होती की माहिती नाही, कदाचित मलाच त्याची गरज जास्त होती. जिथं शक्य आहे तिथं प्रत्यक्ष भेटून किंवा झूम द्वारे मी त्यांच्या संपर्कात राहिलो. त्याद्वारे आम्ही काही ट्रेनिंग सेशन्स प्लॅन केले. काही टेक्निकल, सेल्स, सॉफ्ट स्किल्स हे विविध विषय घेऊन आम्ही लोकांशी सतत बोलत राहिलो. 

दुसरं आम्ही ग्राहकांशी संपर्कात राहण्याचा एक अभिनव प्रोग्रॅम आखला. आमच्या बिझिनेस च्या अनुषंगाने आम्ही एक सेमिनार बनवला होता "Why do spindles fail and how to prevent it". हा विषय घेऊन आम्ही मग ऑनलाईन सेमिनार केला. लॉक डाऊन काळ आणि नंतर बिझिनेस जागेवर येईपर्यंत आम्ही ३० पेक्षा जास्त वेळा सेमिनार घेतला आणि तब्बल ३००० पेक्षा जास्त ग्राहकांशी संपर्कात आलो. इतकं काम तर आम्हाला इन पर्सन भेटायचं असलं असतं तर कमीत कमी दीड वर्षे गेली असती

हे सगळं करत असताना एक वेगळा प्रश्न उभा राहिला. आमच्या तिकडच्या सहकार्यांनी मला दबाव आणला की नोकर कपात करा म्हणून. एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यात मला दररोज संध्याकाळी फोन यायचा आणि काही भलतीच आकडेमोड करून मला सांगण्यात आलं की कमीत कमी वीस लोक कमी कर. इथं दोन फॅक्टस होत्या. एकतर मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात, व्यवसाय बरोबर चालत नाही म्हणून कुणाला काढलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय असलेल्या माझ्या कर्मचाऱ्यांना केवळ ही नैसर्गिक आपत्ती आली म्हणून काढून टाकायचं हे मूळ सिद्धांताला धरून नव्हतं. शेवटी याच लोकांच्या जीवावर ही कंपनी भारतात नंबर एक ची आणि जगातल्या पहिल्या पाच मध्ये नावारूपाला आलेली आहे ही वस्तुस्थिती मला माहित होती.

सुरुवातीला मी त्यांना शाब्दिक विरोध केला. मग शासनाने केलेलं आवाहन दाखवलं, तरीही ही मंडळी काही ऐकत नव्हती. शेवटी मला एक परिपत्रक सापडलं ज्यात शासनाने अशा व्यवसायिकांवर कारवाई करू हा नियम त्यांना दाखवला. हे लोक जर घाबरत कशाला असतील तर ते कायद्याला. थोडं त्यांच्या मागणीतला जोर कमी झाला. पण कटकट चालू होती. 

शेवटी मी त्यांना उपाय सांगितला की एप्रिल आणि मे मध्ये आपण पगार कपात करू २५% आणि जेव्हा कार्यक्रम जागेवर येईल तेव्हा परत देऊन टाकू, डिसेंबर २० नंतर. त्यांचा लागलीच पुढचा प्रश्न आला की त्याने वित्त पुरवठा सुधारेल पण तोटा तर कायम राहील. त्यांना काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलं. एक क्षणाचाही विचार न करता मी त्यांना सांगितलं की माझा आणि व्यवसायिक सहाध्यायी यांचा पगार आपण अर्धा करू आणि ती तात्पुरती कपात नसेल तर बुक्स मध्ये अकौंटिंग करायचंच नाही. एप्रिल २०२० पासून ते मार्च २०२१ पर्यंत. 

याद्वारे तुमचा नफा जागेवर राहील. 

पण माणूस एकही काढणार नाही यावर ठाम राहिलो. आणि त्या शब्दाला जागलो सुद्धा! त्यांची कटकट थांबल्यावर एक त्यांना मेल लिहिली, त्याचा मराठी अनुवाद पुढच्या पोस्टमध्ये. 

करोना डायरी भाग २

Thursday 1 April 2021

करोना डायरी भाग १

 २१ मार्च २०२० ला मी कंपनीत घोषणा केली की  आठ दिवस कंपनी बंद राहील. शासनाचा आदेशच होता तो. मार्च मध्ये जे ठरवलं ते झालं नाही पण एप्रिल दणक्यात सेल करू असा विचार करत मी घरी आलो. पण जसा आठवडा जात गेला, हे जाणवलं की  लॉक डाऊन वाढवला जाणार. 

३१ जानेवारी २०२०ला आम्ही नवीन प्लांट चं उदघाटन केलं. अख्खा फेब्रुवारी शिफ्टिंग मध्ये गेला. १ मार्चला आम्ही मोठ्या जोमाने नवीन प्लांट मध्ये काम चालू केलं आणि त्याच्या दुसऱ्याच आठवड्यात टाळेबंदीची चर्चा चालू झाली. बोलता बोलता ती लागू झाली पण. 

परिस्थिती अवघड होती. नुकताच बांधलेला आधीपेक्षा तिप्पट मोठा प्लांट. तिथं झालेला खर्च, आणि या मोठ्या प्लांटच्या अनुषंगाने आ वासून उभे राहिलेले नवीन खर्च, सगळे आकडे डोळ्यसमोर नाचू लागले. हेच सगळं टेन्शन घेऊन बसलो असतो तर मानसिक स्थिती फार खराब झाली असती. या विचारात असतानाच आमच्या आपलं घर चे अन्नदानाचे फोटो ग्रुप वर आले. पहिले मी फळणीकर सरांना फोन केला आणि त्यांच्या या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करायची तयारी दाखवली. 

२८ मार्च ते तीन एप्रिल मी आपलं घरच्या ऍम्ब्युलन्स बरोबर रस्त्यावरील निराधार लोकांना अन्नदान करत फिरलो. वेगळाच अनुभव होता तो. भुकेली लोक अक्षरश: गाडीची वाट बघत थांबले असायचे. अन्नदानाचं काम आहे म्हंटल्यावर पोलीस लोक पण पटकन सोडून द्यायचे. 

तीन एप्रिल ला संध्याकाळी मला आमच्या एका फार्मा कस्टमर कडून त्यांच्या स्पिंडल ची मागणी आली. हा स्पिंडल अर्धवट आमच्याकडे झाला होता. पहिले दोन तीन दिवस तर काही सुधरलंच नाही. कस्टमर ने आम्हाला रीतसर पत्र दिलं होतं, की  हा पार्ट इसेन्शियल कमोडिटी खाली येतो तर सेटको ला कंपनी चालवायची परवानगी द्या. पण त्या पत्राचा वापर कसा करायचा हेच माहिती नव्हतं. आणि कंपनीतील मुलं सुद्धा घाबरली होती. काहीजण त्यांच्या गावी जाऊन पोहोचली होती. जी होती त्यांची कंपनीत यायची तयारी नव्हती. 

या सर्व दिवसात काही ना काही कारणाने कंपनीत यायचो. शेवटी काही रिसोर्सेस कडून फार्मा कस्टमरच्या पत्राचा वापर करून कंपनी कशी चालवायची याची माहिती घेतली. तीन दिवस कलेक्टर ऑफिस, डी आय सी ऑफिस आणि मामलेदार कचेरी अशा चकरा मारल्या आणि साधारण ११ एप्रिल रोजी मामलेदार कचेरी खडकमाळ इथं माझं कंपनी चालवायचं लेटर मिळालं. त्या ऑफिस मध्ये एक मेन ऑफिसर मॅडम होत्या. मी तिथं असताना त्यांना कुणा तलाठ्याच्या फोन आला की पीडीएस खाली मिळणारं अन्नधान्य त्यांच्या ऑफिस ला पोहोचलं नाही आहे आणि स्वतःचे पैसे घालून त्यांना नागरिकांना ग्रोसरी द्यावं लागतं. मॅडम मला म्हणाल्या "ओ इंडस्ट्रीवाले, तुम्ही लोकांनी पण थोडी मदत करायला हवी या कामाला. हे आमचे तलाठी किती लोकांना देणार धान्य." 

इथं परत फळणीकर सर मदतीला धावून आले. आपलं घर आणि सेटको च्या मदतीने आम्ही वीस किट्स तयार केले आणि डोणजे गावातील तलाठीकडे सुपूर्त केले. आपलं घरने एव्हाना हे काम तसंही चालू केलं होतं. मी सोशल मीडियावर हे किट्स प्रकरण टाकल्यावर अनेक जणांनी मदत पाठवली. आपलं घरच्या सेवेतून आणि या छोट्या मदतीतून कार्यक्रम संपला तेव्हा ८०० ग्रोसरी किट्स चं वितरण झालं होतं. अर्थात यात मोठा सहभाग आपलं घर चा होता. नकारात्मक वातावरणात काहीतरी आपण भरीव करू शकतो या भावनेला उभारी मिळाली. 

इकडे फार्मा इंडस्ट्रीचा स्पिंडल रीतसर परवानगी घेऊन सप्लाय केला आणि चौदा एप्रिल ला टाळेबंदी अजून वाढवली अशी बातमी आली. त्या दिवसापर्यंत कंपनीचे बहुतेक कर्मचारी आपापल्या गावी पोहोचले होते. करोना ची भीती आता गडद झाली होती. 

संकट गहिरं झालं होतं. त्याला सामोरं कसं जायचं याचे विचार डोक्यात घोंगावू लागले. 


करोना डायरी भाग १