Sunday 4 April 2021

करोना डायरी भाग ३

भाग २ संपला होता "त्यांची कटकट थांबल्यावर एक त्यांना मेल लिहिली, त्याचा मराठी अनुवाद पुढच्या पोस्टमध्ये. " या वाक्याने. तर जे लिहिलं त्याचा स्वैर अनुवाद थोडी काटछाट करून दिला आहे.

"नमस्कार. 

गेले काही दिवस आपल्यात घमासान चर्चा चालू आहे आणि चर्चेचा रोख हा आहे की हे वर्ष कसं खराब जाणार आहे, आणि त्या अनुषंगाने आपण आपला वित्त पुरवठा आणि नफा तोटा पत्रक व्यवस्थित कसा राहील या दृष्टीने काही निर्णय घेतले. हे सगळं करताना मानसिकदृष्ट्या मी थकलो होतो कारण आजवर, व्यवसायाची उतरंड होईल या दृष्टीने मी कधीही निर्णय प्रक्रियेवर काम केलंच नव्हतं. आपण मात्र चर्चेचा रोख असा ठेवला की आपण आपल्याच निर्णयक्षमतेवर शंका घेतल्या. 

आता पर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यात दोन तीन वर्षे अशी गेली जेव्हा वृद्धी करण्यात अडथळे आले. त्या काळातही मी हा तात्पुरता काळ आहे असं समजून नियोजन हे वृद्धिधिष्ठित ठेवलं. पण अर्थात हे वर्ष अजब आहे. इतकी खराब परिस्थिती कधीच नव्हती. असं असलं तरीही आपण जरा काही काळ नकारात्मकता बाजूला ठेवू शकतो का? आणि काही अशा गोष्टी शोधू शकतो का ज्यायोगे आपण या परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकू.? आपली वृद्धिधिष्ठित मानसिकता बरकरार ठेवू शकतो का? 

अन्यथा आपण या निराशावादी विचारात डुंबत राहिलो तर परिस्थितीने तयार केलेल्या भोवऱ्यात आपण गरागरा फिरू ज्यायोगे आपण आपली धूळदाण उडवायला कारणीभूत राहू. 

आपल्याला आता दोन मार्ग आहेत. एकतर मेंदूवर नैराश्याची पुडं चढवायची आणि असे निर्णय घ्यायचे की ज्याने परिस्थिती अजून चिघळेल. (जसं लोकांना काढणं) अन्यथा दुसरा मार्ग हा आहे की या नैसर्गिक आपत्तीला स्वीकारायचं आणि त्यावर मात करण्यासाठी काही उपाय शोधायचे की ज्यायोगे आपण हे वाईट दिवस सरल्यावर येणाऱ्या संधीचं आपण सोनं करू शकू! मी दुसऱ्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे आणि मी सर्वाना आवाहन करतो आपण सर्वानी मला यामध्ये साथ द्यावी." 

हे असं काही तरी पलीकडच्या लोकांना कळवलं. त्यातली पोटतिडिक बहुधा जाणवली असावी. आणि माझ्या मागचा लोक कमी करण्याचा ससेमिरा पूर्णच बंद झाला. आणि व्यावसायिक उद्दिष्ट पूर्णतः सामोरे आले. याच पद्धतीच्या अनेक मेल्स मला माझ्या अन्य सहकार्यांना पाठवाव्या लागल्या. वस्तुस्थितीची जाणीव देत, भविष्य आशादायी असेल यावर माझा सगळा संवाद बेतला होता. यामध्ये घशात माझे शब्द अडकले आणि ते म्हणजे एप्रिल आणि मे च्या पगारात २५% कपात होईल हे सांगताना. अर्थात डिसेंबर नंतर आम्ही हे परत देणार होतो पण तरीही हे सांगताना मन फार जड झालं खरं. आमची गॅंग पण इतकी भारी त्यांनी एका शब्दाने नाराजी व्यक्त केली नाही पण जे काही आम्ही सांगितलं, त्याचा खुल्या मनाने स्वीकार केला. 

अजून एका गोष्टीवरून माझं डोकं पकलं होतं. सामंजस्य करार होताना कंपनीच्या पदरात एक आमचा प्लॉट आला होता. पण या पाश्चात्य मंडळींना व्यवसाय करायचा तो फक्त भाड्याच्या जागेत. कुठलंही विस्तारीकरण करायचं आणि त्यासाठी पैशाची चणचण जाणवली की ही मंडळी त्या भूभागाकडे बोट दाखवायची. म्हणायची ही मृत गुंतवणूक आहे. याला विका. पण ते जरा तिरपांगडं प्रकरण असल्यामुळे विकलं जात नव्हतं. 

एप्रिलचा शेवटचा आठवडा उजाडला. व्यवसाय परत कधी चालू याची काही कल्पना येत नव्हती. एव्हाना आमच्या ऑनलाईन सेमिनारने पूर्ण देशात धूम मचवली होती. चेन्नई पासून ते परवाणु पर्यंत आणि इकडे पुण्यापासून ते जमशेदपूर पर्यंत आम्ही कस्टमर कनेक्ट चा धडाका लावला. आणि याबरोबर कंपनीतल्या सर्वांशी झूमद्वारे कनेक्ट होतोच. शारीरिक आणि श्वसनाचे व्यायाम, जलनेती, व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्या, वाफ घेणे याबाबतच्या सूचना किंवा काही ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्ही सतत एकमेकांशी बोलत राहिलो. 

ते भूभाग प्रकरण आणि या सगळ्या निराशेच्या गर्तेत असताना एकदा कंपनी सुरु झाल्यावर आमचा व्यवसाय कसा जागेवर आला, या संदर्भांतील गोष्ट पुढच्या भागात. याच काळात मी माझं "लीडरशिप" बद्दलची मतं आमच्या लोकांसमवेत शेअर केली. जमली तर त्या मेलचा अनुवाद पण देतो. 





No comments:

Post a Comment