Sunday 28 December 2014

तुम मुझे भूल

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्या नायिकेबद्दल आदर दाटून येतो. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्या हिरोबद्दल वाटतं, च्यायला येडं आहे बेणं. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्याच्या सादगीने, त्याच्या अनवट सुरावटीने तुमचे डोळे पाणावले. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की गीतकाराच्या दिव्य प्रतिभाशक्तीने तुम्ही स्तिमीत झाला. माझं आज झालं बुवा.

सिंहगड पायथ्याला जाताना आज सकाळी सुधा मल्होत्रा आणि मुकेश यांनी गायलेलं खालील गाणं ऐकलं. विविधभारतीवर. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो येडा होतो. पण आज माहोलच वेगळा होता. सकाळची वेळ. गाडीत एकटाच. विचारांच्या गर्दीत हरवलेला. अन हे गाणं. साहिर, काय लिहीणार या माणसाबद्दल. कभी कभी चा शेवट करताना जोडलेल्या पहिल्या ओळी. पगलावतो लेकाचा. अन या गाण्यासमोर तर लोटांगण. प्रभा जोशींनी सांगितलं एन दत्ता आजारी होते म्हणून गाणं बांधलं सुधा मल्होत्रांनीच. त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.

विविधभारती. I am love'in it.

तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

मेरे दिल की मेरे जज़बात की कीमत क्या है
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है
मैंने क्यों प्यार किया तुमने ना क्यों प्यार किया
इन परेशान सवालात की कीमत क्या है
तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

जिन्दगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है
जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत ही नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुयी इस दुनियाँ में 
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आँख चुराओ तो ये हक़ है तुमको 
मैंने तुम से ही नहीं सब से मोहब्बत की है

तुमको दुनिया के ग़म-ओ-दर्द से फुरसत ना सही 
सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही 
मैं तुम्हारी हूँ यही मेरे लिये क्या कम है
तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत ना सही 
और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 

Thursday 25 December 2014

अजून एकदा सिंहगड डायरी

काय होतं, मनात काही नसतं हो. पण बोलतात लोकं अन मग मन फसतं हो. आता हेच बघा ना. काल उतरत होतो सिंहगडावरून. समोरून मुलींचा घोळका आला. ४-५ जणी होत्या. साधारण पंचविशीच्या. समोर तीन जणी आणि मागे दोघी जण. त्या दोघी मैत्रिणी आणि एकीने दुसरीला ग्रुपमध्ये आणलं असावं. त्यांचं नाव समजा अ आणि ब. (खूप नावं लिहिली पण सध्या फ्रेंड लिस्ट मोठी झाल्यामुळे वेगवेगळी नावे आहेत. फेसबुकचे वातावरण जरा मचुळले आहे सध्या. त्यामुळे अ आणि ब यावर समाधान माना) तर तिघींमध्ये एक भैरवी होती. भैरवी अ आणि ब कडे बघून म्हणाली "ए, तुम्ही दोघी किती सेम टू  सेम दिसता" तर अ म्हणाली "हो मग, आम्ही शेजारीच राहत एकमेकांच्या."

एकटाच होतो. मनातल्या मनात हसत निघालो.

*******************************************************************************

BSNL म्हणजे भगवान से भी नही लगता……. म्हणे

*******************************************************************************

पूर्ण उतरलो. नेहमीच्या शेतात गाडी पार्क केली होती. मी पोहोचलो तेव्हा सीन असा होता, कि एक साधारण तिशीची  स्त्री, अर्थातच सुंदर. लग्न झाल्यापासून सुंदर स्त्रियांशीच माझी का गाठभेट होते हे एक न सुटलेलं कोडं आहे. हा, तर त्या बाईंनी माझ्या कारचा ड्रेसिंग टेबल केला होता. बॉनेट वर पर्स अन त्यातून मेक अप चं सगळं सामान. त्या कारच्या खिडकीत बघून केश संभार सावरत होत्या. त्यावेळेस दुसरी एक कन्यका साईड मिरर मध्ये पापण्यांना ब्रश ने काही तरी छळत होती. कारच्या एका बाजूला ह्या दोन तर पलीकडे अजून दोन कन्यका लिपस्टिक चा मुक्त वापर करत होत्या. बॉनेट पूर्ण भरलेलं.

मी थक्क होऊन बघत बसलो. म्हणजे ड्रेसिंग टेबल कडे. कन्यका आणि त्या सिनियर मग्न होत्या. मी मागे येउन उभा राहिलो, घसा खाकरला. पण कुणी बघायला तयार नाही. मी काही बोलणार तेवढयात त्या सिमरन चं, आलियास सिनियर, माझ्याकडे लक्ष गेलं. अन फणकार्याने म्हणाली "काय बघताय काका" त्या रागाचा अंदाज घेत तो काका हा शब्द शिसासारखा कानात गेला. मी बोललो "अहो माझी कार" तर ती म्हणाली "ओह सॉरी हं, लक्षात च नाही आलं." वर मंजुळ आवाज करत म्हणाली "रागावलात का". हे ती असं ती हसत म्हणाली अन मी फसत गेलो. काही न बोलता कार चालू करून स्पीड पकडणार तेव्हढ्यात मागे डिकीवर हात आपटून कार थांबवा असा इशारा केला. आता ती मला काय करणार अशी कल्पना करत थांबलो तर समोर बॉनेट आणि वायपर च्या मधे तिने भली मोठी हेयरपिन अडकवली होती. ती ओढून घेतली.

देवी माझ्यावर प्रसन्न् आहे मित्रांनो. नाहीतर विचार करा, मी घरी पोहोचलो आहे. सोसायटीच्या गेटवर वैभवी उभी आहे. तिचे लक्ष कुठेही न जाता हेयरपिन कडे जातं....................Rest in pieces च्या मायला.

********************************************************************************

कोपर्या कोपर्यावर मोबाईल मधून फोटो उडवणारी जनता बघून वाटते, कि गेल्या शतकात लोकांनी जितके फोटो उडवले असतील तितके या दशकात याबाबत मला शंका नाही.
********************************************************************************
सिंहगड वरून परत येताना डावीकडे पाटी दिसते " Advocate अमृता मालुसरे". मला बर्याचदा वाटतं, एक दिवशी कार थांबवावी, घरात जावं आणि विचारावं "ताई, तुम्ही त्या वीर तानाजी मालुसरे यांचे वंशज का" त्यांनी हो म्हणावं आणि मग मला त्या काळातील त्यांच्याकडे असलेली पत्रे किंवा काही वस्तू दाखवाव्यात. मी त्या वस्तूवर हात फिरवत इतिहासात हरवून जावं आणि आपसूक माझ्याकडून ललकारी पडावी "क्षत्रिय कुलवंतस राजाधिराज गोब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत शिवाजी महाराज की जय"

*******************************************************************************

अजून एकदा सिंहगड डायरी

Monday 22 December 2014

बाकी निवांत

दहावी करून डिप्लोमा ला गेलो तेव्हा आपल्याच मस्तीत मश्गुल होतो. Mechanical ला असून दोन मुली होत्या वर्गात, हे म्हणजे alien असल्यासारखं होतं त्या काळात. पण आम्ही हॉस्टेल ची पोरं कुठल्या धुंदीत होतो आठवत नाही, पण कधी त्या दोघींशी बोललेलो आठवत नाही. पौगंडात असा गंडलो.

मग भारती विद्यापीठात. डोळे माझे परजून तयार झाले होते एव्हाना. पण तिथल्या फटाकड्या भोवती इतकी पोरं असायची, म्हणजे मराठी पोरी असल्या तरी पोरं मात्र नॉर्थ इंडियन, कि २० मीटर त्रिज्येच्या आत कधी असल्याचं आठवत नाही.

पुढचा टप्पा SKF. hardcore mechanical कंपनी. स्त्री पार्टी होती. पण आमच्यापासून कोसो दूर. आम्ही पोरं त्यांच्या बद्दलच्या दंत कथा ऐकायचो. कोण कुणाबरोबर फिरतं वैगेरे. पण ते फक्त गॉसिप. मुंडकं खाली घालून bearings चं production किती झालं यातंच आम्ही मश्गुल.

एव्हाना लग्नही झालं.

मग रोलॉन चा जॉब. ऑफिस बंगलोर ला. मला जावं लागायचं, चार महिन्यातून एकदा. तिथे होत्या मुली. म्हणजे कशी एकदम ideal कंडीशन. मी बंगलोर मध्ये, तरुण. ऑफिस च्या पोरी त्याही तरुण. संध्याकाळ नंतर वेळच वेळ. हो, म्हणजे तेव्हा हे फेसबुक प्रकरण पण नव्हतं. पण इथे पण नियती निष्ठुर. MD संजीव शहा बहुधा ad मध्ये लिहित असावा "कृपया सुंदर दिसणाऱ्या मुलींनी अर्ज करू नये." त्यामुळे आम्ही संटे च पार्ट्या करायचो. त्यातही मेरी नावाच्या एका accounts ऑफिसर चं कृष्णा नावाच्या ऑफिस बॉय शी जुळलं. प्रेम हे आंधळं असतं हे त्यावेळी कळलं. (तसं वैभवी चं अन माझं लग्न झाल्यावर सासरच्या लोकांमध्ये "जाऊ दया, जे झालं ते झालं, प्रेम आंधळं असतं, काय करणार" अशी कुजबुज झाल्याची ऐकवात आहे).

मग मीच धंदयाला बसलो. (अर्थ कसे विचित्र प्रचलित होतात नाही).  मी धंदयाला लागल्यावर बाकीचे धंदे करायला वेळ च नाही मिळाला.

तसंही म्हणा माझ्या माय बापाचे संस्कार, बायका पोरांचे प्रेम, अरे चुकलं, बायको पोरांचे प्रेम या पेक्षा "तसलं" काही करायला opportunity मिळाली नाही म्हणून मी सोवळा राहिलो हेच वखवखतं वास्तव आहे. आणि त्याही पेक्षा "तसलं" काही प्रकरण पुढे गेलं तर ते आवरण्याची क्षमता या पामरात नाही हे प्रखर आणि धगधगतं सत्य आहे.

(तुम्हाला म्हणून आतली गोष्ट सांगतो chat बॉक्स मध्ये माझं आणि माधुरी नेने चं बोलणं झालं आणि केवळ त्या ओढीपायी ती डेनवर सोडून नवरा आणि पोरा सकट मुंबई ला आली. chat बॉक्स ची ही ताकद आहे. "श्रीराम नेने, माफ करा.")

Friends, let us use social media to spread love and respect, not hate and anger.

बाकी निवांत

Thursday 18 December 2014

शेती

हर्षल बोलला म्हणून यथाशक्ती यथाबुद्धी लिहायचा प्रयत्न करतोय.

तर शेती उद्योगाला प्रचलित उद्योगासारखा बघावं का?

सगळ्यात प्रथम आपण मार्केटचा विचार करू. तर भारतासारख्या देशात शेतीच्या उत्पादनाला मरण नाही. खाणारी तोंडे इतकी आहेत कि जे उगवेल ते खपेल. ही luxury इतर उद्योगाला नाही आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट, ग्राहक, याची चिंता करायची गरज नाही आहे. मग एखाद्या उद्योगाला लागणारे घटक शेतीत कसे काम करतात, ते बघू.

१. शिक्षण: कुठलाही उद्योग चालू करताना त्याचं शास्त्रीय शिक्षण गरजेचं असावं. आता लागलीच कुणी तरी म्हणेल कि बिल गेटस कुठे शिकला होता. तर अपवाद हे नियम नाही होऊ शकत. मला असं वाटतं कि शेतीचा शास्त्रीय अभ्यास देणाऱ्या संस्थांनी जास्त meticulously काम करायला हवे. शेतीच करायची तर काय करायचं शिकून, हा attitude सोडून द्यावा. शेती करण्याच्या शास्त्रीय पद्धतीशिवाय vocational ट्रेनिंग द्यायलाच हवे. अभियांत्रिकी उद्योजक आणि शेतकरी यात मला हा पहिला फरक जाणवतो. (आता कुणी आजकालचा शेतकरी शिकला नाही असं कुणी सांगितलं, असा वाद घालू नये. जे दिसतं ते लिहितो)

२. उत्पादन: कुठलेही उत्पादन करायचे तर ढोबळ मानाने एखाद्या मटेरियल चे स्वरूप बदलतो. मग तो लोखंडी बार असो कि सोने असो. आता हे बेसिक raw material मिळण्यात धोके असतात. पण विचार करा, शेतीचे raw material काय, तर शेत जमीन, बी बियाणं, खत आणि मुख्य म्हणजे पाणी. आता ह्या पाण्याची उपलब्धता करून देणे कुणाच्या हातात आहे. निसर्गाच्या. निसर्ग पाणी देतो असं एक वेळ गृहीत धरू. पण शेतकऱ्याला ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात मिळते का हि कुणाची जबाबदारी आहे. त्या उपरही म्हणू कि शेतकर्याने पाणी वाचवले पाहिजे. पण बदलत्या परिस्थितीत हे ज्ञान त्याला कुणी दिले आहे का? थोडक्यात प्रचलित उद्योगाला raw material चे धोके कमी तर शेतीला सगळीच अस्थिरता.

३. वातावरण: गारपीट, बेधुंद पाऊस, वादळ ह्याला शेती जितकी vulnerable असते तितका दुसरा कुठला उदयोग असतो? तर उत्तर आहे कुठलाच नाही. आणि नुकसान तरी कसं तर हाताला आलेलं पीक भुईसपाट. म्हणजे आमच्या इंडस्ट्री मध्ये माल बनवला, ट्रक ने पाठवताना, ट्रक नदीत पडला आणि संपलं. हि अशी टांगती तलवार सतत डोक्यावर.

४. प्रोसेसिंग: धान्य, फळं, भाज्या बनवल्या, उत्पादित केल्या. पण पुढं काय. शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन हे ग्राहकाला पोहोचवायची व्यवस्था कुठे आहे. म्हणजे जास्त उत्पादन केलं तर प्रोसेसिंग करता येत नाही म्हणून फेकून द्यायचं अन कमी उत्पादन झालं तर उत्पन्न कमी. किंवा मधले दलाल लाटणार.

५. अर्थशास्त्र: बाकी मग बँकेचे लोन, त्याचा इंटरेस्ट, त्याचा उत्पन्नाशी ताळमेळ याचं काही धोरण शेतकऱ्याकडे असतं का आणि जर असेल तर त्यावर त्याचा कंट्रोल असतो का? त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे का? ते ज्ञान गरजेचे नाही का? आहेच तर मग कोण देतं त्यांना हे ज्ञान? असे असंख्य प्रश्न उभे राहतात. आणि देत असून जर इतक्या घाऊक भावात आत्महत्या होत असतील तर शिकवणार्यांच काही तरी चुकतंय. शेतीचं यांत्रिकीकरण केव्हा करायचं, किती जमीन असली म्हणजे break even point त्या उत्पन्नाला येतो. आपण बर्याचदा ह्या ज्ञानाची खिल्ली उडवतो, पण याचा उपयोग धंद्यात होतो हे नक्की.

असो. पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे "भारत हा शेतीप्रधान देश आहे" यापलीकडे काहीच माहित नाही, आमच्या उदयोगात आम्ही काही ठोकताळे बांधतो, त्यातूनही प्रॉब्लेम येतात पण त्याची तीव्रता कमी. जे गोत्यात येतात ते स्वत:च्या कर्माने येतात. मला असं वाटतं शेतीचं तसं नाही. शेतीमध्ये शेतकऱ्याच्या कंट्रोल च्या बाहेरच्या खूप गोष्टी आहेत. आणि त्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर SWOT analysis केलं तर strength खूपच कमी आहेत शेती उदयोगात तर weakness खूप जास्त. opportunity ला मरण नाही पण threats चा भडीमार आहे. मुख्य म्हणजे आमच्या उदयोगात threats या hypothetical असतात तर शेतीत ते वास्तव आहे.

त्यामुळे कुबेर म्हणतात त्याप्रमाणे शेतीला बाकी उद्योगासारखे ट्रीट करता येणार नाही. वरील मुद्द्यांवर शासनाने काम केलं तर १०-१५ वर्षानंतर त्या दृष्टीने विचार करता येईल. पण जर शेतीला आणि पर्यायाने शेतकऱ्याला सक्षम केलं नाही तर आत्महत्येचं पाप आपल्याच अंगावर आहे हे ध्यानात असू द्यावे.

(सदर लेखक हे लोकांचे भले करण्याच्या नावाखाली वाटेल ती पापं करणाऱ्या भांडवलशाहीचे मायक्रो लेवल चे का असेना पुरस्कर्ते आहेत. चूभू देणे घेणे)

Wednesday 17 December 2014

अज्ञानी

आता याला confession म्हणा की अजून काही. पण हे खरं आहे. सांगायला लाज वाटते पण शेती आणि शेतकरी या विषयी फारंच कमी माहिती आहे मला. दररोज होणार्या आत्महत्या या बातम्या वाचून जीव जळतो, पण क्षणभरच. नंतर परत ये रे माझ्या मागल्या. कदाचित सारं आयुष्य शहरात गेलं माझं, त्यामुळे कनेक्ट होत नसेल.

शेती, तिचे पावसावर अवलंबून असणे, बि बियाणांचे भाव, खतं- कीटकनाशकांचा वापर, बँकांचे interest rates याची एकमेकांशी विचित्र सांगड होऊन शेतकरी पार आत्महत्या करायला प्रवृत्त होतो यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. त्याचं अर्थकारण किती complex असेल की अगदी होलसेल मधे लोकं जीव देत आहेत. शेतीचं यांत्रिकीकरण करणं योग्य की अयोग्य, त्याने ट्रँक्टर कधी घ्यावा, अंहं एकदम ढ.

खरंतर शेतकरी, अन्नदाता आपला. त्यांची अशी ससेहोलपट बघताना मन द्रवते, पण त्यावर उपाय काय यावर मत प्रकट करण्याइतकीही अक्कल आपल्याला असू नये याचं वाईट वाटतं.

असो. काही गोष्टींचा अभ्यास पुर्णपणे अभ्यास न करता अक्कल पाजळवायला अन जाहीरपणे लिहायला आपण पेपरचे संपादक थोडी आहोत.

आपल्याला शेतीमधलं कळत नाही हे लिहीताना वाटलं, बरं आहे, आपण निर्लज्ज  नाही आहे ते.

****************************************************************************

फेसबुकवर बर्याचदा जातीवरून चर्चा होते. शेतीसारखंच या क्षेत्रातलं माझं ज्ञान तोडकं आहे. आणि का अज्ञानी असू नये. लहानाचा मोठा झालो, पण जातीबद्दल ना कधी घरी विषय ना शाळेत. दहावीनंतर डिप्लोमा ला गेलो. तिथं रमेश नारखेडे नावाचा जीवलग मित्र झाला. तो काही लोकांना जयभीम म्हणायचा. मी एके दिवशी विचारलं, तु नमस्कार च्या ऐवजी जयभीम का म्हणतोस. पहिल्यांदा राग आला त्याला, पण मला खरंच काही माहित नसल्यामुळे शांत झाला.  मग तो मला कॉलेजच्या शेजारी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर घेऊन गेला. आणि सांगितलं भीमराव आंबेडकर आणि त्यांचं महत्व. दोस्ती दृढच राहिली.

यथावकाश लग्न झालं. आंतरजातीय. विरोध झाला, नाही नाही जातीवरून नाही, अस्मादिक डॉक्टर नव्हते म्हणून. ज्या घरात मला दिलं आहे ते तर राष्ट्रीय संमेलन. माझं आंतरजातीय, वैभवीची बहिण क्षितीजा चं arranged आंतरजातीय, भाऊ अमोल त्याचंही स्वजातीत नाही. चुलत भाऊ शंतनु ची बायको ब्राम्हण, बहिण राधिका चं पंजाब्याशी लग्न. दुसरा चुलत भाऊ संजयची बायको ख्रिश्चन तर चुलत बहिणीचा नवरा ब्राम्हण. मामे बहिण चारू चा नवरा तमिलियन तर मावस बहिण शिल्पाचा नवरा काश्मिरी. प्रसादचं arranged आंतरजातीय. इतकंच काय वैभवीच्या आजोबांनी ब्राह्मण बायको शी लग्न केलं होतं. जमलो कधी अन जातीवरून भांडायचं म्हंटलं तर कुणी कुणाशी भांडायचं.

मी कधी कुणाची जात नाही काढली न माझी कुणी. (एकच आहे पण तो च्युत्या आहे हे जगाला माहित आहे).

मधे मला एका मोठ्या कंपनीतून फोन आला "तुमच्या employees ची जात लिहून पाहिजे" मी विचारलं "का" तर म्हणाला आमच्या कंपनीचा नियम आहे. मी बोललो "employee ला घेताना जात विचारायची नाही हा माझा नियम आहे" तर म्हणाला "सांगावीच लागेल" मी म्हणालो "फोन ठेवतो, परत फोन करू नका" तर साहेबाला घेऊन आला. सगळं कळल्यावर मला म्हणाले "government ला डाटा द्यायचा आहे, प्रायव्हेट सेक्टर मधे मागासवर्गीयांचं स्थान काय?" बोललो "हे आधी सांगायचं ना मग, नियम आहे म्हणून काय सांगता" पोरांना बोलावलं "या कारणासाठी जात विचारतोय" डाटा अमनने गोळा केला अन कंपनीला दिला. (नंतर मग बर्याच कंपन्यांनी मागितला)

जात अजूनही आपल्या समाजात इतकी खोलवर रूजली आहे हे मला फेसबुकवरच कळतं, अन मनस्वी दु:खही होतं. लोकं कधी समोर वार करतात तर कधी आड़ून.

जातव्यवस्था फ़ारशी माहित नसलेला मी एक अज्ञानी माणूस आहे. 

Saturday 13 December 2014

जोशी

मी मंडलिक, साधारण पणे मला मांडलिक या नावाने बोलावले जाते. जी लोकं फारच घाईत असतात, म्हणजे इंग्रजी स्पेलिंग पूर्ण वाचायचा हि त्यांना वेळ नसतो ते मला महाडिक असे बोलावतात. ज्यांना ऐकायचा वेळ नसतो ते मला पुंडलिक नावानेही बोलावतात. काल तर गम्मत झाली. तो कुरियर वाला मला कुंडलिक म्हणून बोलवत होता. असो आडनावामुळे गमती होत असतात. त्यावरून आठवलेलं.

कॉलेज मध्ये आमचे  दोन मित्र. मिलिंद जगन्नाथ जोशी आणि मिलिंद रामचंद्र जोशी. आता बोलवावं तर लागायचंच. "ए, अरे मिल्या जोश्याला बोलाव रे." आता या प्रश्नांवर कोणता मिल्या जोशी  हा प्रतिप्रश्न यायचाच. बरं या दोघांची अंगकाठी अन रंग पण सारखाच. दोघानाही डोक्यावर केस. म्हणजे कॉलेज मधल्या प्रचलित हाका "जाड्या किंवा बारक्या" "लंब्या किंवा बुटक्या" "काळ्या किंवा गोऱ्या" "टकल्या आणि केसवाल्या" हि अशी वर्गवारी पण करता येणं अवघड.

मग यावर मार्ग काय? तर एक दिवशी कुणी तरी म्हणालं "मिल्या जोशी ला बोलाव ना राव" तर कुणीतरी विचारलं "अरे जगन्नाथाचा कि रामचंद्राचा". झालं, ती प्रथाच चालू झाली. मिल्या जोशीला ला बोलाव म्हंटल कि पुढचा प्रश्न "जगन्नाथाचा कि रामचंद्राचा".

कॉलेज मध्ये कॉरिडोर मध्ये जात असताना एके दिवशी लेक्चर ला जात असताना साधारण ४०-४५ च्या गृहस्थाने मला अडवले. आणि कुठली ब्रांच वैगेरे विचारलं आणि पुढे म्हणाले "मिलिंद जोशीला ओळखतोस का?" मी विचारलं "कोण, जगन्नाथाचा कि रामचंद्राचा?" तर ते चपापले असावेत, अन लागलीच सावरून म्हणाले "जगन्नाथाचा". मी पण क्लासला जायच्या तिरमिरीत, बाजूने जाणार्या प्रदीप ला सांगितलं "ए जरा, जगन्नाथाच्या मिल्या जोशीला बोलाव रे" आणि त्या गृहस्थाला विचारले "कोण आलं म्हणून सांगू?"

तर देवदास मध्ये "डोला रे" गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या बघताना जसे माझे बुब्बुळे फिरतात अगदी तसेच  माझ्याकडे अन माझ्यापेक्षा सावळ्या असलेल्या प्रदीप कडे बघत ते गृहस्थ कडाडले "मी जगन्नाथ जोशी"

फूटलोच आम्ही.

Wednesday 10 December 2014

कभी ख़ुशी कभी ग़म

मिलिंदने उरलेलं शेवटी खाणार्या माणसाचा उल्लेख केला आणि माझं मन अगदी ३०-३२ वर्षं मागे गेलं. आम्ही चार, बाबा-आई-मी-उन्मेष आणि काकांची फ्यामिली काका-काकू-जयेश-स्वाती. आम्ही एकत्र दोन अविस्मरणीय ट्रीप केल्या. एक गोवा आणि दुसरी उत्तर भारत. दोन्ही वेळेसच्या आठवणीनी  ह्या मनाचा एक कोपरा व्यापून राहिला आहे. आणि माझाच का आमच्या सगळ्यांचाच.

आम्ही चौघं, मी, उन्मेष, जयेश, स्वाती साधारण एकाच वयोगटाचे. सातवी आठवीतले १३-१४ वर्ष वय. त्यात स्वाती सगळ्यात लहान. आधीच शेंडेफळ अन त्यात तीन भावात एकंच बहीण, त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी.  त्यावेळेस ट्रीपला हॉटेल मध्ये जेवण करताना मोठे चार एका टेबल वर आणि आम्ही बारके एका टेबल वर अशी विभागणी व्हायची. आमचे शरद काका, म्हणजे एकदम राजा माणूस. खूप मजा करायचे. ते पैज लावायचे, ज्यांनी ताटात लं सगळं संपवलं त्यांना बक्षीस. कधी चोकलेट, कधी रुपया तर कधी काही. आमच्या भावंडापैकी माझं संपायचं आणि थोडं फार जयेशचं संपायचं पण स्वाती आणि उन्मेषच कधीच नाही. मग ते माझ्याकडे बघायचे आणि मी त्यांच्या उरलेल्या अन्नाकडे. मनातून खुश व्हायचो. आणि सगळी ताट बिलकुल साफ करायचो. हा सिलसिला कित्येक वर्षं चालला.

मोठेपणी हा किस्सा सांगताना माझं नाव "मी खाईल" मिखाईल असं सांगताना सगळेच खदखदून हसायचे. पण आजही माझं आणि जयेश चं ताट चाटून पुसून साफ असतं. स्वाती तसंही कमीच खाते. उन्मेषच्या ताटात मात्र अजूनही residual असतात.

वर्षं सरली. स्वाती कॅनडा त असते. जयेश ठाण्यात असतो. उन्मेष पुण्यात असतो पण भेट दोन आठवडयात. सगळे आपापल्या रगाड्यात आहेत. माझ्या खाण्यावर हि बंधन आली आहेत. त्यामुळे सध्या माझंच ताट चाटून पुसून स्वछ करून टाकतो. आणि काय करणार दुसर्या टेबलवर बसणाऱ्या  चार जणांपैकी शरद काका, आशा काकू आणि माझे बाबा हे अनंताच्या प्रवासाच्या गेले आहेत. त्यामुळे सध्या ताट नाहीतर त्या तीन रिकाम्या जागांकडे आशाळभूतासारखा बघतो आहे.

******************************************************************************
दुसरे पंडितजी. त्यांनी सांगितले कि त्यांचे मित्र त्यांचे किती कौतुक करतात ते. या उलट माझं. माझा एक मित्र आहे. औरंगाबादला बरोबर होतो. हुशार आहे. पण स्वत:ला अति शहाणा समजतो. म्हणजे माझ्या साध्या हलक्या शब्दातल्या पोस्ट ला पार हलक्या दर्जाची आहे हे दाखवण्याचं कसब त्याच्या अंगात आहे. बरं याला मी इतक्यांदा तोंडावर पाडलं आहे. कारण आपण एकदा काय बोलतो आणि नंतर काय याचा अर्थ अर्थी काही संबंध नसतो. पण तोंडावर आपटून याचं नाक वरंच असतं. किमान पंचवीस वेळा तरी या मित्राने विनोदी पोस्टमधून काहीतरी गंभीर, सामाजिक पोस्टमधून अध्यात्मिक, आत्मनिंदा केली असेल तर पुढे जाऊन न मागता सल्ला देणे अशा मुळ पोस्टच्या आसपासही न फिरकणार्या पासिंग कॉमेंटस नी पार डोकं पकवून टाकलं आहे. आपला जुना मित्र आहे ८३ पासून, म्हणून इतके दिवस गपगुमान ऐकून घेतलं. आता मात्र मित्रा, तुझी हुशारी तुलाच लखलाभ. कधी भेटलोच तर चहा पिऊ, बियरही पिऊ पण बंगलोरची हवा कशी अन पुण्याला महागाई किती इतकं बोलू, बास!

Saturday 6 December 2014

Attitude

"Have not you ever pissed off, Rajesh" लहानपणापासूनचा मित्र. हॉटेल ambassador मध्ये. अर्थात २ पेग रिचवल्यावर. मधल्या काळात काय घडलं त्याला माहितच नाही. त्याचाही बिझिनेस आहे मोठ्ठा. बर्याच वर्षांनी. लिहीलेलं वाचलं होतं त्याने.  "नाही म्हणजे नेहमीच कसं गोड गोड. तुला कधीच त्रास होत नाही का लोकांचा?"

आता काय सांगू या भावड्याला. अरे मित्रा, हा पाच फुट साडेनऊ इंचाचा, अन ८० किलोचा देह आहे ना, तो लोकांनी, अन लोकांनी का मित्रांनीच, केलेल्या अपमानाने झिजून झिजून एवढा झाला आहे रे. टाचण्या टोचायच्या आतून. पुना हॉस्पिटल चे वाटवे डॉक्टर, हो हो तेच psychiatrist, व्यथा मांडली त्यांच्यासमोर. त्यानंतर कथा सादर झाली.

कुठल्या देवाचं मंदिर आहे माहिती नसायचं. जायचं फक्त, डोकं टेकवायचं आणि परत. कुठला देव अन कसलं काय.

सपोर्ट मागायचो तेव्हा लोकांना वाटायचं financial सपोर्ट पाहिजे. बोंबला, मोरल सपोर्ट नावाचा एक प्रकार असतो हे कळायचं नाही लोकांना.

रेसकोर्स वर मणभराचं ओझं मनावर घेऊन जात असताना पुर्या ताकदीनिशी त्याला गवतावर फेकून ढसाढसा रडत हलका झालो, तेव्हा कुठे आता बघतो आहेस मला.

जवळच्याने दाखवलेल्या अविश्वासाने त्याचा फोन आला कि थरथर कापायचो, नाही नाही भीतीने नाही, आता हा नालायक परत आपल्यावर अविश्वास दाखवतो का म्हणून!

पासिंग comments नि उन्मळून जायचो. साले, हि बांडगुळं, शहाणपणा चोदवायची. एकेका गोष्टीसाठी रक्त आटायच. वैतागून सिगारेट प्यायचो ना, तेव्हा शिलगावताना हात थरथरायचे माझे. एकेक कश मारताना एक पाकीट ओढल्या इतकी रक्त वाहिनी आकुंचन पावायची. हृदय पिळवटत गेलो, इतकं कि त्याला रक्तप्रवाह कमी पडायला लागला. नळीचं भोक मोठं केलं तेव्हा कुठे पुरवठा पाहिजे तेव्हढा झाला.

गोर्यांशी हात मिळवले तेव्हा एकाने विचारलं "what are your objectives of this jv" त्याला बोललो "ते प्रोफेशनल objectives तर meet होतील. माझं एक पर्सनल ओब्जेक्टीव आहे. या ताणताणावा मुळे मी आयुष्यातला विनोद हरवून बसलो आहे. तो मला परत आणायचा आहे. I would like to get back my lost sense of humor" त्या गोर्याला माहिती नव्हतं, हातरूमाल असतो माझ्याकडे. येडा टिश्यू पेपर देत होता डोळे पुसायला.

मित्रा, अन साधारण एक वर्षापूर्वी लिहायला लागलो. अन त्याचबरोबर दान पण बरोबर पडत गेलं अन भाऊ हा काय positive का काय म्हणतात ना, तो attitudeहि  आला. पण फार मिन्नतवारीने आला आहे रे तो. आणि आताच त्याला सोड म्हणतोस. आता नाही सोडणार त्याला.

जे आहे ते आहे. त्याला आत्मस्तुति म्हण की स्वत:भवती स्वत:च उदबत्ती ओवाळतो म्हण. Choice is yours. मनात येईलही तुझ्या, इथं भेटलास वर नको भेटू म्हणून. कशी होईल भेट, तु स्वर्गात अन मी नरकात. काळजी नसावी.

आणि हो, दारू मलाही चढते बरं का!

बाकी निवांत. Happy new year. 

Wednesday 3 December 2014

संभ्रमित

स्वच्छ भारत, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, हाय स्पीड ट्रेन्स, (आणि हो, हाय स्पीड च बरं, ते बुलेट ट्रेन विसरा),  कालव्यांचं सोलारीकरण, स्मार्ट सिटीज, जनधन, मिशन हाउसिंग, मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया आणि minimum govt, max governance साधारण या एकादश योजनांवर भाजप सरकारची दौड़ चालू आहे. लोकांचं भले करण्याच्या नावाखाली पापं करण्याचा मक्ता असणार्या भांडवलशाहीचा मी अगदी मायक्रो लेवलचा का असेना पण प्रतिनिधि आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांबद्दल उत्सुकता आहे आणि हे तडीला जायला हवं असंही मनोमन वाटतं. राहता राहिला अदानी आणि अंबानींचा सतत होणारा उल्लेख. खरं तर अनुल्लेख म्हणू.  पण राजकीय पुढार्यांना हाताला धरून स्वत:च्या धंद्याची भरभराट करण्याची (सत किंवा कु, व्यक्तीसापेक्ष आहे) प्रवृत्ती  जगात सगळीकडेच आढळते. आपण कसे अपवाद असणार. आणि रिलायन्सचं म्हणाल तर ३ लाख कोटी पर्यंत उलाढाल ही त्यांनी कॉंग्रेसच्या राजवटीतच achieve केली होती. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या उन्नतीवरून पोटशूळ उठण्याचं काही कारण नाही. अहो इतकंच काय, पण ज्या महात्मा गांधींचा उल्लेख आपण साधी रहाणी यावरून करतो त्यांनीही घनश्यामदास बिर्ला अन जमनालाल बजाज या भांडवलदारांना मदत केली असा आरोप चर्चिला जातोच की! मला तर वाटतं की भांडवलदारांना जर स्वत:पासून चार हात कुणी दुर ठेवलं असेल तर भारतातील सध्याच्या प्रचलित भांडवलशाहीचे पुरस्कर्ते, उद्गाते मनमोहनसिंग यांनीच. आता या अकरा योजनांतूनच रू २५ लाख कोटींची उलाढाल होणे अपेक्षित आहे. समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आतापेक्षा वरच्या स्तराला नेले जाणार आहे हे न समजण्याइतकं आम्ही दुधखुळे तर नक्कीच नाही आहोत. उदाहरणच द्यायचं झालं तर निव्वळ टॉयलेट बांधायला सँनीटरीवेअर बनवणार्या सर्व कंपन्या पुढील ४ते ५ वर्षासाठी बुक असणार आहेत.

त्यामुळे प्रश्न तो नाहीच. प्रश्न आहे तो हे सगळं साध्य करताना अमूर्त अशा सामाजिक जाणीवांचं मूल्यवृद्धी करतोय की अवमूल्यन करतोय. नवीन सरकार आल्याबरोबर शंकराचार्यांनी साईबाबाचे फोटो काढून टाकण्याचा आदेश, किंवा दलितांना मंदिर प्रवेश नाकारावा असा फ़तवा, साध्वीने रामजादे अन हरामज़ादे असं लोकांचं केलेलं वर्गीकरण, साधूने विरोधकांना पाकिस्तानात जाण्याचे केलेले आवाहान, IIT मधे मांसाहारी आणि शाकाहारी कँटीन वेगळे पाहिजे अशा ज्या पत्राला कचर्याचा डब्बा दाखवायला पाहिजे त्याची शासकीय लेवलवर चर्चा होणे, बत्रा का कोण ते त्यांनी धादांत खोटी माहिती शाळांतून पसरवणे, रामधारी लोकांचा धुमाकूळ, देशाच्या प्रमुखाने गणपतीला प्लास्टिक सर्जरी संबोधणे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या समाजाला काही दशके मागे घेऊन जात आहेत. बरं या गोष्टी बोलल्या जातात त्याबद्दलही काही हरकत नाही. लोकांचं तोंडं तर पकडू नाही शकत, पण शासकांकडून त्यावर  विरोध तर दूर पण मौन बाळगलं जात आहे. अन काही ठिकाणी तर शासकांच्या मदतीनेच हे सगळं घडवून आणलं जातं आहे हे फार धक्कादायक आहे.

राष्ट्रीय स्तरावर हा प्रकार तर महाराष्ट्रातही लागोलाग या गोष्टी चालू झाल्या आहेत. नाणीजच्या नरेंद्र महाराजांचं मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला व्यासपीठावर असणं हा दुर्दैवी योगायोग नाहीतर केंद्राचीच या बाबतीत री ओढण्याचा प्रकार आहे.  वारीबद्दल मला तसंही फारसं ममत्व नाहीच. आणि त्यांनीच एलिझाबेथ एकादशीवर बंदी घाला ह्याच्याइतकी हास्यास्पद मागणी दुसरी नसावी.  आज ऐकलं कि बैलगाडीच्या शर्यती वरची बंदी उचलली. का तर परंपरा जपली पाहिजे वैगेरे. (आपला घोडयांच्या रेसलाही दणकून विरोध आहे). ते राज्याचे दोन तुकडे करा हो, पण त्याचं समर्थन किंवा विरोध करताना भाषिक अस्मिता, मराठी मनाचे दोन तुकडे असं करण्याऐवजी विकासाची कूर्मगती किंवा ease in administrative governance अशा मुद्द्यावर सत्तेतील दोन्ही भागीदार्यांनी बोलावं आणि निर्णय घ्यावा. उगाच आपलं लोकांची मनं भडकावून अजून एक बेळगाव तयार नका करून ठेवू.

रूढी, परंपरा, प्रथा, गर्व, अस्मिता याचं जोखड महत्प्रयासाने आम्ही फेकून दिलं आहे. ते परत हळूहळू लादू नका हीच विनंती.

कसं आहे बघा, गुळगुळीत रस्ते आणि फ्लाय ओव्हर्स, स्वच्छता, चकाचकपणा, इंधनाच्या कमी किंमती, कमी भ्रष्टाचार ही परिमाणं राष्ट्र म्हणून तर सौदी अरेबियालाही लागू होतात.

तेव्हा विकासाच्या नावाखाली आपण समाजाच्या अवमुल्यनाकडे डोळेझाक करायची आणि दुसर्या बाजूला केवळ विरोधाला विरोध म्हणून समाजाचा आर्थिक स्तर उंचावणार्या योजनांची उगाच खिल्ली उडवायची या दोन्ही गोष्टी आपल्याला तर काही जमणार नाही बुवा!

म्या पामर  संभ्रमित आहे हे खरं. बाकी निवांत……  

टीप

वेटर्स लोकांना टीप का द्यावी?

२०१० साली अमेरिकेत मी पहिल्यांदा गेलो होतो. डेट्रोइट च्या हॉटेलमधे जेवलो. पैसे दिल्यावर २ डॉलरच्या आतच परत मिळणे expected होतं. टीपची पद्धत आणि ती by default द्यावीच लागते हे माहित होतं. मी waitress ला बिल मागितलं, तर तिला वाटलं मी उरलेली चेंज मागितली. अक्षरश: डाफरली ती माझ्यावर. अविश्वासाने म्हणाली, तुला ते उरलेले पैसे पाहिजेत. जेव्हा लक्षात आलं की बिल मागतोय, तेव्हा बया शांत झाली आणि हसली. ती हसली अन मग माझाही राग पळून गेला. And they parted happily ever after.

टीप ची प्रथा कुठून चालू झाली असावी. जी ऐकीव माहिती आहे ती अशी कि हि अमेरिकेतच चालू झाली आहे. कारण हॉटेल चे वेटर हे organised सेक्टर मध्ये नव्हते. त्यामुळे त्यांना provident fund, health insurance या स्कीम लागू नव्हत्या. आणि मग या गोष्टींना alternative पद्धत म्हणून टीप देण्याची प्रथा चालू झाली असेल.

पण मग आता भारतात काय परिस्थिती आहे. तर एका विशिष्ट category च्या पुढच्या हॉटेल मध्ये नक्कीच PF आणि ESI चे रुल्स लागू झाले असावेत. पूर्वी पुण्याच्या हॉटेल मध्ये पाटी असायची "इथे नोकरांना पगार दिला जातो." तसं जर हॉटेल मालकांनी लिहावं "इथे PF/ESI लागू आहे." नक्कीच टीप देण्याची आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. मला असं आठवतं कि बायपासच्या सयाजी हॉटेल मध्ये पाटी आहे कि इथे टीप देऊ नये म्हणून.

पूर्वी क्रेडीट कार्ड वर टीप लिहिल्यानंतर परत ती रक्कम नंतर चार्ज व्हायची. आता ती हि पद्धत बंद झाली आहे. म्हणजे क्रेडीट कार्ड इश्यू करणारे पण टीप पद्धत बंद झाली आहे असं समजत असावेत.

थोडक्यात unorganized सेक्टर मधील हॉटेलच्या वेटरांना नक्कीच टीप द्यावी, पण एकतरांकित ते पंचतारांकित हॉटेल्स मधे टीप देण्याची गरज नाही कारण तिथले लोकं socially secured असतात, असं मला वाटतं.

मला प्रश्न हा आहे की सोशल सिक्युरिटी देण्यात भारतातले हॉटेल मालक हे अमेरिकेतल्या हॉटेल मालकांपेक्षा पुढे आहेत का?




Saturday 29 November 2014

रविवारचे रिकामे उदयोग

च्या मारी, शप्पथ सांगतो, या इंग्रजीने घात केला. नाही तर फेसबुकवर जेव्हढे तारे तोडतो, तेवढे Linked In वर तोडले असते ना, बिझिनेस डबल तरी केला असता एव्हाना. (झुक्याला सांगू नका रे कोणी. नाहीतर linked in चं मार्केटिंग केलं म्हणून माझं अकौंट च ब्लॉक करायचा).

आता हेच बघा ना, गेले काही दिवसांपासून फेसबुक अगदी स्पिंडल मय झालं आहे. Multifaceted शिवा ने माझ्या विनंतीला मान देऊन माझं स्केच काढलं अन त्यात गळ्यात स्पिंडल अडकवला. मेडलच जणू. नर्मविनोदी यशवंत पाटील यांनी तिथेच मला Amazing Spindleman हि पदवी दिली. ती वाचल्या वाचल्या मी भिंतीवर चढून बसलो. ह्या पदवीदानाची तुलना मी फक्त लोकमान्यांनी नारायण रावांना (हे राजहंस, राणे नव्हे) बालगंधर्व म्हंटले या घटनेशी करू शकतो. भरीस भर म्हणून कि काय पण आमचे परम मैतर अनिकेत बोंद्रे मुरुमकर यांनी मी राजेश स्पिंडलिक असे नामकरण करावे हे हि सुचवले. सध्या हे औरंगाबाद च्या दौऱ्यावर आहेत. माझ्या प्रदेशाचे पाणी पिल्यामुळे आमची मैत्री अजून दृढ होईल यात शंका नाही. मला आठवतंय पत्नीमित्र (इथे हा अर्थ अनेकांच्या पत्नीचे मित्र असा बहुवचनी नसून, माझ्या एकमेव पत्नीचे मित्र इतका एकवचनी घ्यावा) हृषीकेश कुलकर्णी एकदा म्हणाले "राजेश चं नाव घेतलं कि मला तो वैभवीचा नवरा आहे हे दिसत नाही, तो इंजिनियर आहे ते कळत नाही, तर फक्त स्पिंडल दिसतो." परवा (खरंतर दोन महिन्यापूर्वी, पण एका वर्षापूर्वीच्या सगळ्या घटनांना आमच्या मराठ्वाड्यात "परवा" असंच म्हणतात) जर्मनीत त्याला  स्पिंडल या विषयावरून इतकं पकवलं कि आता परत तो स्पिंडल च नाव म्हणून काढणार नाही. पराशर अग्रो टुरिझम चे सर्वेसर्वा मनोज याने सुद्धा मला "ये इलू इलू क्या है" च्या धरतीवर विचारले "ये स्पिंडल स्पिंडल क्या है". आता हाच प्रश्न मला मनीषा कोयराला सारख्या कुणी सुंदरीने विचारला असता तर त्या विवेक मुश्रन सारखा लाजलो हि असतो. (विवेक मुश्रन चं नाव आठवलं राव, मानता कि नाही आपल्या मेमरीला). नाही म्हणायला राजेंद्र गानू सर ही मला इतके मस्त प्रश्न विचारत आहेत कि मला खात्री आहे, एक दोन महिन्यात ते मला सांगणार "अरे, जरा XXXXX कंपनीत visit करून ये, तिथे ५० एक मशिन्स आहेत. तुझा चांगला बिझिनेस वाढेल." (XXXXX याचा अर्थ या लेखापुरता सभ्य घ्यावा.). मध्ये दिवाळीला आपल्या सगळ्यांचा आवडता गणेश ने स्पिंडल ला जणू नववधू समजून असे बहारदार फोटो काढले कि काय सांगू. फेस बुकर प्राईज विजेत्या प्रिया प्रभुदेसाई या सुद्धा स्पिंडल बिझिनेस वर प्रोत्साहनपर कोटस टाकत असतात. (प्रिया ताई, तुम्हाला अरुंधती रॉय बद्दल फारसं ममत्व नसावं. पण हे फेसबुकर प्राईज आहे याची नोंद घ्यावी)

इतका सगळा गदारोळ झाल्यावर मी माझे नाव "राजेश स्पिंडलवाला" वाला का करू नये, या माझा मित्र सुबोध याच्या सुचनेवर मी गंभीर विचार करत आहे. (ज्याच्या बाईक मुळे या पामराचं प्रोफाईल पिक्चर मोनालिसा सारखं जगप्रसिद्ध झालं त्या बाईकचा मालक सुबोध आहे.) तसंही ५०% पेक्षा जास्त बोहरी शेजार असलेल्या आमच्या सोसायटीत हे नाव चपखल बसेल.

आता हे सर्व लिहिल्यावर "लवकरच येत आहे: स्पिंडल म्हणजे काय" अशी, बर्याच जणांना आवडणारे आणि बर्याच जणांना न आवडणारे माझे मित्र डॉ अभिराम दीक्षित यांच्या स्टायल ची पोस्ट नक्कीच पडेल.

खरं तर या लेखातल्या सगळ्यांना tag करणार होतो. पण विजयकुमार देशपांडे सरांच्या उघडtag  विरोधी पोस्ट मुळे आणि मीराताई यांनी काढलेल्या चिमट्या मुळे माझं मानसिक सक्षमीकरण झालं आहे. त्यामुळे ते महापाप माझ्याकडून कदापि होणार नाही. (तसं ते छोटंच पाप आहे, पण आजकाल या भूमीवर प्रत्येक गोष्टीमागे "महा" लिहिण्याची fashion आहे) काय आहे, फेसबुकवर नवीन आलो होतो, तेव्हा आपलं घर च्या विजय फळणीकर यांच्यावर लेख लिहिला होता. तो सर्वदूर पोहोचावा म्हणून tag चा सहारा लेखात सांगून घेतला होता. पण तरीही एक मित्रवर नाराज झाले होते. मग मीही त्यांच्यावर शरसंधान केले. बरं तेही मला ब्लॉक करत नाही अन मी हि त्यांना. हे म्हणजे एका वर्गात बाकावर बसून न बोलण्यासारखं आहे. (तुमच्या पेज ला लाईक करण्याची तुमची आज्ञा ही मान्य केली हो. आता तरी सोडा नाराजी).

(लेखात नेहमी प्रमाणे कंस जास्त झाल्यामुळे "फेसबुकवर चा कंस" या निलेश बंडाळे यांनी मला दिलेल्या उपाधीला जागलो आहे हे नम्रपणे नमूद करतो.) खरं तर कंसाबाहेरचे वाक्य कंसात टाकून आणि कंसात लिहायचे वाक्य कंसाबाहेर लिहून मी निलेशच्या आरोपाचा योग्य परामर्श घेतला आहे हे गर्वाने नमूद करतो आणि थांबतो.

रविवारचे रिकामे उदयोग

Wednesday 26 November 2014

Amchi Kampani

काल फारच डोकं भनकल होतं. हा म्हणजे गोष्टच तशी घडली. नाही म्हणजे असेल तुमची मल्टी national वैगेरे. आहात तुम्ही माझे नेहमीचे कस्टमर. हे जे आले होते ते वेगळं department, नेहमी ओर्डर येते ती वेगळी लोकं. मला म्हणाले "आम्ही हे काम नेहमी करतो आणि मास्टर आहोत. आमच्या पद्धतीने तुम्ही काम करायचं. तेव्हा आमची दोन लोकं काम पूर्ण होईपर्यंत तुमच्या माणसाबरोबर काम करतील. त्याला सांगतील काम कसं करायचं ते " शक्यतो आम्ही कुणाला असेम्ब्ली कशी करतो ते दाखवत नाही. पण कंपनी मोठी, दुसर्या डिविजन मधून येणारा बिझिनेस चांगला. म्हंटल ठीक आहे. पाठवा तुम्ही लोकं. शिकायला तर मिळेल.

आली दोघे जण. कदम आणि शेख नावं ठेवू. आणि काम चालू झालं. लेकाच्यांना काही म्हणता काही माहित नव्हतं.आमचा technician इरफान, पाहिजे ती मदत करत होता. मोठी होती हो स्पिंडल असेम्ब्ली. ती पूर्ण झाल्यावर म्हणाले "नाही हे बहुतेक चेक करायचं राहिलं आहे. असेम्ब्ली परत उघडा." गम्मत नाही हो ती असेम्ब्ली उघडायची. इरफान ने गपगुमान उघडली. जे चेक करायचं ते केलं. इरफान ने काम एक नंबर केलं होतं. बिनकामाची हमाली झाली होती. परत झालं सगळं काम.

आता टेस्टिंग. त्याच वेळेस मी तिथून जात होतो. मला बोलले "इथे आम्हाला हा एक parameter असा पाहिजे." आता ते टेक्निकल आहे म्हणून लिहित नाही, पण थोडक्यात "या भिंतीला luster पेंट लावून पाहिजे, पण मध्ये जर धब्बा दिसला पाहिजे किंवा फोफडे उडले पाहिजे" असं काही तरी. मी म्हणालो अहो हे नाही जमणार. उदया तुम्ही poultry मध्ये जाऊन म्हणाल "मला जरा नासकी अंडी पाहिजेत हो." तर म्हणाले "नाही आम्हाला तसंच पाहिजे." तर इरफान म्हणाला "अहो तसं करायचं असेल तर करून देतो पण लॉक नट लूज ठेवून स्पिंडल चालवावा लागेल." तर कदम भडकला ना "इरफान, तुला कळतं का काय बोलतो ते. नॉन टेक्निकल बोलतोस. असं कधी असतं का"

मग मात्र इतका वेळ शांत बसलेलो मी, सटकलो. त्याला बोललो "ए भाऊ, तू त्याची अक्कल काढतोस. तुझी जागेवर आहे का. तुम्ही जे मागताय ते तरी कधी असतं का? सकाळपासून माझा माणूस तुम्ही सांगाल ते काम करतोय. तुम्हाला जास्त नॉलेज म्हणून तुम्ही येणार होते. तुम्हाला माहित तर काहीच नाही वर आमच्या माणसाला शहाणपणा शिकवताय. हा जॉब उचला आणि जावा घेऊन" कदम सटपटलाच, तरी म्हणाला "कुणाला बोलताय कळतंय का. बिझिनेस जाईल तुमचा इतका मोठा."

मी बोललो "ओ कदम, तुमच्या या बिझिनेस पेक्षा मला माझ्या पोराचा, इरफानचा सेल्फ एस्टीम जास्त महत्वाचा आहे. तुमची भंकस ऐकून घ्यायला तो काही बांधील नाही आहे. आमच्या कंपनीत येउन आमच्याच माणसाची अक्कल काढताय, त्याची काही चुकी नसताना. नको मला तुमचा बिझिनेस."

"बघतोच तुम्हाला" वैगेरे म्हणत गेला. मी दट्ट आहे माझ्या भूमिकेवर. इरफानची चूक नसताना त्याच्यावर चिखलफेक करणाऱ्या कंपनीचा बिझिनेस नकोच मला, कितीही मोठी असू दे न ती.  

सल्ला

बर्याचदा वाचायला मिळतं, फेसबुकवर कमी यायला पाहिजे. व्यसन आहे. इथे बऱ्याचदा डोक्याला ताप होतो. आठवडयातून एकदाच यावे. कंपल्सरी पोस्ट टाकायच्या नाहीत. comment टाकायच्या नाहीत. फक्त लाईक द्यायचं. गेल्या दोन एक महिन्यात असे काही मेसेज आले कि मलाही वाटलं कि आपण पण इथला वावर जरा कमी करावा. नाही म्हणजे, आपली प्रकृती अशी कि कुणी "हाड" म्हणल्याशिवाय आपण काही जागचं हलत नाही. पण आता मेसेज खाली दिले आहेत.

********************************************************************************
मी लहानसा व्यावसायिक आहे. गेल्या दहा वर्षात प्रचंड चढ उतार अनुभवलेत . 8करोड वार्षिक उलाढाल पर्यंत पोहचून परत प्रचंड अपयश हि पाहतोय. अनेक professional motivation आणि managment सेमीनार्स ,पुस्तके , चिंतन ,psychiatrist  सगळे झाले. पण तुमच्या साध्या सरळ अनुभव सिध्द लिखाणाने जितक बळ  मिळाल तितक कशानेच नाही मिळाल ! धन्यवाद ! नाही तर शेतकरया सारखी उद्योकाकाची आत्महत्या का असू नये ..असे विचार भुंगा करीत डोके कुरतडत असतात. अर्थातच मी इतका दुर्बल नाहीच !पण थकतो हे मात्र खर ! कुठल्याही व्यावसायिक ,अथवा आर्थिक लालसे शिवाय एकदा तुम्हाला भेटुन , बोलून स्वतः ला अधिक channelized करता येईल असे वाटतंय. कारण आज सर्वाधिक गरज आहे ती एका friend, philosopher आणि guide ची . आपण थोडा वेळ दिलात तर आनंद होईल. धन्यवाद !!

*********************************************************************************

Rajesh, kindly give your Pune address where I can meet you next time when I come to Pune..I read your observations on automobile industry and without hesitating requesting your half an hour time to seek your guidance specifically on "Challenges in passenger car segment and future trends" I will inform you two days in advance before planning. I am based at Hyderabad. I hope you will love to help and will share your knowledge and experience. Thanks in advance 

*********************************************************************************

आता आली का पंचाईत. नाही म्हणजे लिहिताना तारे तोडणे वेगळं. आणि याची देही याची डोळा (अ) ज्ञान पाजळणं वेगळं. इथे म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. बरं हे मला मार्गदर्शन मागत आहेत. मला, मी कोण, तर ज्याला स्वत:च्या च मार्गाचं दर्शन झालं नाही त्याला. नाही म्हणजे, या तुम्ही. आपण चहा पिऊ, हवं तर जेवण करू एकत्र. पण हे guidance वैगेरे. टेन्शन येतं हो. काही बोलताना चुकलं, किंवा नाहीच बोलता आलं तर तुम्ही म्हणणार "लिहितो बरा चुरूचुरू. बाकी बोंबाबोंब आहे. नाव मोठं, लक्षण खोटं. बडा घर पोकळ वासा" न जाणो अजून काही. 

As a friend कधीही, कुठेही एका पायावर भेटायला तयार आहे आपण. पण त्याच्या पुढची भूमिका हि मोठया जोखमीची. responsibility आहे मोठी, नाही का? काही चुकीचा सल्ला जाईल, याची तुमच्यापेक्षा मलाच भीती जास्त आहे हो. बाकी काही नाही. 

सल्ला

Monday 24 November 2014

अ………………अभियंत्याचा भाग ४

अ………………अभियंत्याचा भाग ४

अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल (२००२-२०१९ ते २०२३)

आता खऱ्या अर्थाने मी कंपनी चालवायला लागलो होतो. कंपनी ४ जणांची, त्यातले २ डायरेक्टर. पण चालू झालं काम. तसं दोन वर्षात नाही म्हणायला कंपनीचं थोडं का होईना बस्तान बसलं होतं. २००४ च्या सुरुवातीला  PCB industry साठी लागणारा air bearing spindle घेऊन एक जण आले होते. मी बोललो "ह्यातील आम्हाला काही नॉलेज नाही आहे. नाही होणार हा रिपेयर." आमचा छोटेखानी सेट अप बघून ते बोलले "प्रयत्न तर करा" मी विचार केला प्रयत्न करायला काय हरकत आहे. झाला सुद्धा तो रिपेयर, पण एक parameter काही सेट करू नाही शकलो. high rpm spindle चं एक वैशिष्ट्य आहे. तो पहिले दहा मिनिट फिरला कि झालं. फेल झाला तर त्या काळात होणार.

व्यवस्थित रिपेयर नाही झाला पण एक वेगळंच segment कळलं PCB इंडस्ट्री. तिथे वापरले जाणारे high rpm स्पिंडल्स. आणि त्याचा manufacturer वेस्टविंड. साहेबाच्या देशातील. मग त्यांच्या authorisation च्या मागे लागलो. वर्षभर मागे लागल्यावर शेवटी ती कंपनी पटली आणि आम्ही authorised spindle service provider झालो. (च्यायला, इतका वेळ मला वैभवीला पटवायला हि नाही लागला). आज नऊ वर्ष झाली आहेत. मस्त चाललंय. (लग्नाला २३. तिथंही मस्त चालू आहे). पण इथे एक गम्मत झाली. वेस्ट विंड चे टेस्ट रिग घेण्यासाठी २० लाख रुपयाची investment होती. आम्ही चार जणांचं बोर्ड. लैच खल व्हायचा. potential आहे का, भारतात किती स्पिंडल आहेत, कस्टमर कुठे आहे वैगेरे. २ दिवस चर्चेचं गुर्हाळ चाललं होतं. सगळी माहिती दिल्यावर ३ पैकी २ डायरेक्टर डोकं पकवत होते. मी बोललो "मला माहिती आहे हा बिझिनेस यशस्वी होणार आहे. याची सगळी जबाबदारी माझी." कुणाला काही बोलायला जागाच राहिली नाही.

आमचा रिपेयर चा बिझिनेस. एखादा पार्ट खराब झाला तर सप्लायर चे उंबरठे झिझवावे लागायचे. आणि डोक्याला ताप व्हायचा. सातारा रोड वर आमचा एक वेंडर होता. इतकी शायनिंग करायचा. मी विचार केला च्यायला याचे पाय किती काळ धुणार आपण. २००५ ला वेस्ट विंड साठी १७ लाखाचं  लोन घेतल्यावर एका वर्षातच मी पुढचं लोन घ्यायच्या तयारीला लागलो. इथं बोंबलायला collateral security नव्हती. पण SV ग्रुप ने corporate guarantee दिली आणि आमचा मार्ग सुकर झाला. परत अजून पाहिलं लोन घेऊन एक वर्षही नाही झालं तर पुढचं लोन वैगेरे ऐकावं लागलं. पण मी रेटलं. आणि २००६ ला छोटं मशीन शॉप चालू केलं.

एकेरी, दुहेरी करत डाव रंगात आला. चाराचे आठ लोक झाले, आठाचे बारा.

साधारण २००५ च्या सुमारास लक्षात आलं कि आमची specialty ज्या grinding  स्पिंडल मध्ये होती त्याचं मार्केट झपाटयाने कमी होत होतं. त्या ऐवजी मशिनिंग सेंटर्स वेगाने इंडस्ट्री मध्ये वापरू लागले होते. त्याचा स्पिंडल हि मोठा असतो. काम पण वेगळं आहे. काही अतिरिक्त नॉलेज ची गरज होती जे आमच्यापाशी कणभर हि नव्हतं. त्यातलं एक काम हे त्या प्रकारच्या स्पिंडल refurbishment मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, ते by default करावं लागतं याचा आम्हाला पत्ता हि नव्हता. पण आम्ही मग त्याच्या मागेच लागलो. मिळेल तिथून त्याचं नॉलेज गोळा करत गेलो. equipments जमा केले. प्रोसेस शिकलो. हे नवीन प्रकारचे स्पिंडल रिपेयर करायला शिकणे हा एक आनंददायी काळ होता. आणि त्याच्या बरोबर आम्ही एकेरी दुहेरी ऐवजी चौकार तर कधी छक्के हि मारायला लागलो.

आज सांगायला मस्त वाटते कि मशिनिंग सेंटर च्या स्पिंडल रिपेयरने  आमच्या गाडीची ड्रायविंग सीट घेतली आहे.इतकेच नाही तर २०१२ मध्ये जेव्हा अमेरिकन कंपनी सेटको ने आमच्याशी JV केले त्यामध्ये मशिनिंग सेंटर चे स्पिंडल रिपेयर करण्याच्या proficiency चा सिंहाचा वाटा होता, नव्हे त्यामुळेच झालं ते.

 मग २०१० मध्ये तिसरी शेड आणि २०१२ मध्ये अजून ३ शेड (अर्थात सगळं भाडयाच्या) असं करत गाडी १४० sqft पासून ५५०० sqft इथपर्यंत येउन पोहोचली आहे. कंपनीत २६ स्किल्ड लोकं काम करतात.

 आज आमची कंपनी महिन्याला ९०-१०० स्पिंडल रिपेयर करते. त्यामध्ये मशिनिंग सेन्टर स्पिंडल, grinding स्पिंडल, PCB स्पिंडल, वूड वर्किंग स्पिंडल यांचा मुख्यत्वाने समावेश होतो. आणि या क्षेत्रातल्या भारतातल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये आमचा समावेश होतो. कदाचित आत्मप्रौढी वाटेल पण, अगदी नंबर १ ला आहे असं म्हंटल तरी अतिशयोक्ती होणार नाही.

क्रमश: (पाचवा भाग शेवटचा, हे सगळं  का लिहिलं त्याबद्दल)

Saturday 22 November 2014

भास्कर भट

भास्कर भट, टायटन चा मी शेयर होल्डर असल्यामुळे त्यांच्या Balance Sheet मध्ये वाचलेलं नाव. टायटन चे Managing Director. अतिशय निगर्वी, पण तितकेच witty. अनुभवी आणि हजरजबाबी. Razor Edge Marketing and branding हा विषय दिलेला. म्हणाले "चुकून मला वाटलं कि Gillette ची मेल चुकून मला आली कि काय"

टायटन ची पूर्ण स्टोरी च उलगडली त्यांनी. टायटन म्हंटल कि आपल्याला घडयाळ आणि तनिष्क आठवतं. पण टायटन चे खालील बिझिनेस आहेत:

- टायटन Watches.
- तनिष्क jewelry
- Fast track youth accessories
- टायटन आय + (Eye ware)
- PED Precision Engineering Division (यांचे आम्ही सप्लायर आहोत)
- आणि आता Perfumes (स्कीन नावाचं product आहे म्हणे. मला तर माहित नाही)

तुम्ही नजर टाकली तर सगळे products भारी. सर्व क्षेत्रात टायटन नंबर १ ला आहे. त्यांनी मग त्यांचे वेगवेगळे brands सांगितले. त्यांना कसं develop केलं ते हि सांगितलं. आज टायटन ११००० कोटींची कंपनी आहे. ४५० कोटीचं त्यांचं advertising budget आहे. Fast Track च्या ads कशा provocative आहेत ते हि कबूल केलं,  म्हणाले "पण काय करणार, ads चा एक निकष आहे. ज्या ads मला आवडत नाहीत. suggestive आहेत असं मी म्हणतो, that promptly goes on air. The marketing dept feedback is that the ad which I do not like are hit and go viral among teenagers"

तुम्ही product line बघितली. सर्व क्षेत्रात organised सेक्टर मधील कुणीच नाही आहे. HMT संपल्यावर तर wrist watches मध्ये टायटन undisputed लीडर आहे. अर्थात HMT होती तेव्हा काही वेगळी परिस्थिती नव्हती.  ज्वेलरी बिझिनेस मध्ये पण transparency कुणी आणली असेल तर ती तनिष्क नेच. तसंच eye ware चं. PED सुद्धा फक्त aerospace च्या संदर्भात. म्हणजे सर्व बाबतीत टायटन अगदी ट्रेंड सेटर आहे. कॅश चा बिझिनेस. उगाच नाही १०० रुपयाचा शेयर १५००० हजार पर्यंत पोहोचला.  

Helios नावाची चेन येत आहे त्यांची. त्यात जगातल्या सर्वोत्तम घड्याळांची विक्री होणार आहे. हा पण एक नवीन ट्रेंड च नाही का?

अगदी hardcore टाटा माणूस आहे पण. भाषण झाल्यावर त्यांना moment o म्हणून गिफ्ट दिलं. तर म्हणाले "As per Tata Code of Ethics, we are not supposed to accept any gift. Not accepting gift would offend you. And if we do, it is put for auction on the gate and the proceeds goes to charity. So do not feel bad if you find this gift again in some shop." 

शप्पथ सांगतो, भास्कर भट यांच्यासारखे अधिकारी ही टाटांची खरी ताकद आहे.

प्रश्नोत्तराच्या वेळात माझ्या मनात एक प्रश्न आला. पण घाबरट किंवा भिडस्त स्वभावामुळे मी नाही विचारला. एकाने तसाच, पण तो नाही, प्रश्न विचारला. मला विचारायचं होतं कि "will wrist watch extinct, because of the electronic gadget showing time?" पण जगातल्या काही उत्तम product च्या manufacturing कंपनी च्या MD ला विचारायचं काही मला धैर्य मला नाही झालं. दुसर्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी काही उत्तर दिलं. पण मला नाही पटलं. कदाचित स्वत:च्या प्रोडक्ट च्या प्रेमात असावेत असं वाटलं. Wrist Watch हे extinct होऊ नये हि त्यांची विश लिस्ट वाटली. तुम्हाला काय वाटतं "येणाऱ्या काही वर्षात मनगटी घडयाळ इतिहासजमा होईल?"

हो किंवा नाही या उत्तराला काही सपोर्टिंग कारण दिलं तर मजा येईल.  

Thursday 20 November 2014

जागतिक पुरुष दिन

काही वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. नील बहुधा सिनीयर केजी किंवा पहिलीत असेल. म्हणजे ५ एक वर्षापूर्वी. नीलच्या टीचरने त्याच्या लिहिण्यावरून काहीतरी फालतू रिमार्क टाकले होते. आता ते ५ वर्षाचं पोर. काय त्याच्या handwriting चं नाटक. माझं सटकलं. मी वैभवी ला बोललो "मी येणार तुझ्याबरोबर शाळेत. आणि बघतोच कोण ती टीचर आहे." झालं, अस्मादिक गरम डोक्याने गेले शाळेत. बरोबर वैभवी. आणि गेलो टीचर समोर. शप्पथ, खल्लास झालो. ज्याला एकदम म्हणजे सुबक अशी ती आणि एकदम मधाळ आवाजात म्हणाली "yeeees Sir" वैभवी माझ्याकडे बघत म्हणाली "अरे बोल कि आता" का दातखीळ बसली तुझी हे मनात. मी "you know, you should not. I mean its ok" वैगेरे काही तरी शब्द जुळवत होतो. घरात सिंहगर्जना करणारा मी इथे अगदी म्याऊ झालो होतो. वैभावीने ओळखलं कि सौंदर्य पाहून घायाळ झालेल्या सिंहाची आयाळ काही फडफडणार नाही. म्हणाली "चल निघू आता"

नंतर मग मित्र मंडळीत माझी नक्कल करून सॉलिड हंशा व टाळ्या मिळवायची. आता शाळेच्या गेट वर watchman ने सलाम मारला नाही एवढ्या क्षुल्लक कारणाने म्हणून शाळेत जाणार नाही सांगणारा मी, वैभवीला बोललो "परत आता मला शाळेत जायला सांगू नको"

काल पाच वर्षांनी नील म्हणाला "रिझल्ट घ्यायला तुम्ही चला माझ्याबरोबर." मी बोललो येतो. गेलो आम्ही शाळेत. वैभवीने सांगितलं होतं "दुसरी आहे टीचर आता. पण जा बोर नाही होणार तुला." रांगेत बसलो होतो. तिसरा एक नंबर होता. इतक्यात नील म्हणाला

"माझी मिस चांगली आहे, म्हणून गप्पा मारत बसू नका." तो निरागस पणे म्हणाला (खरं काय माहित), पण माझ्या चोराच्या मनात चांदणं. मी विचारलं "चांगली म्हणजे" तर माझं पोरगं  बोललं "अहो स्वभावाने, तुम्हाला काय वाटलं?" आता मात्र मी चपापलो. आयला, पोरगं पण फिरकी घ्यायला लागलं कि काय माझी. पण मीच मनाला समजावलं आणि तो पण इतर मित्र दाखवू लागला.

टीचर समोर बसलो. ती म्हणाली "I was expecting Neil in rank, but he missed. I always feel that he studies well and  a clever boy. He pretends that he knows everything and he is studious boy, but actually he is not." मला नेहमीच वाटत आलं आहे कि दोन्ही मुलं माझ्यावर गेली आहेत. पण लेकांनी माझे अवगुण इतके शत प्रतिशत उचलावेत, याचं फार वाईट वाटलं. पुढे म्हणाली "actually you should speak in English with him. So that he understands subjects well" मराठी शाळेत घालू का मग, हा प्रश्न तोंडावर आला होता. पण गप्प बसलो.

प्रगती पुस्तक घेतलं, oh sorry, report card आणि चालू लागलो. नील ला म्हणालो "Neil, I am going to talk with you in English from today. Have you heard what your teacher said?" डोळे विस्फारत नील म्हणाला "पप्पा, प्लीज, तुम्ही आपलं मराठीच बोला. फिनिक्स आठवतं ना?" मागच्या आठवडयात नगर रोड वर Phoenix Mall वरून जाताना मी (चुकून) फोनिक्स बघ असं म्हणालो तर नील यश कडे बघत खदखदला आणि म्हणाला "फिनिक्स!" ह्या ह्या ह्या.

चालता चालता नील ला विचारणार होतो "तुझ्या त्या मिस चं नाव काय?" म्हणून. पण गप्प बसलो. हे बेणं म्हणायचं "अहो तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय?" नकोच ती भानगड.

जागतिक पुरुष दिनाची सुरुवात ही अशी झाली. 

Saturday 15 November 2014

रवि वेंकटेसन

रवी वेंकटेसन, साधारण माझ्या वयाच्या (४६) ऑटोमोबाईल आणि सॉफ़्टवेयर शी संबंधित प्रत्येकालाच माहित असलेले नाव. कमिन्स ची झळाळती कारकीर्द अन मायक्रोसाॅफ्ट इंडिया चालू करण्यापासून तिला भारतात establish करणारे. बिल गेटस, स्टीव बामर यांच्याशी खांदा लढवलेले. त्यांच्या कमिन्स Dream run चे क़िस्से आजही चर्चिले जातात. गेले दोन दिवस एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्यांच्या आजूबाजूला फिरतो आहे. माणूस इतका humble की काल ब्रेकफ़ास्टला मलाच म्हणाले hey rajesh, good morning. प्रश्न सुप्रभात म्हणाला तो नाही, गंमत आहे त्यांनी नावाने हाक मारली त्यात. आता परत, मग त्यात काय मोठं? तर माझी अन त्यांची ओळख आदल्या रात्री डिनरच्या वेळेस जेफने करून दिली. "Meet Rajesh, man who takes care of Setco India" आणि नंतर ते बकबकत राहिले, बिझीनेस बद्दल. 70 लोकांमधे त्याच्या stature च्या माणसाने एखाद्याचं (म्हणजे माझ्यासारख्या लिंबूटिंबूचं) दोन सेकंदाच्या संभाषणानंतर नाव लक्षात ठेवणं हे माझ्यासाठी अप्रूप होतं. (आता काही लोकांना अजूनही वाटेल, त्यात काय एवढं? तर ठीक आहे).

Humbleness इतका की, त्यांनी सांगितलं की वयाच्या ३१ व्या वर्षी tata cummins ची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आणि त्यावर त्यांची मार्मिक टिपण्णी "the reason I was chosen for the job was that there was no one interested to turn around failing venture of Tata and Cummins" आणि मग पुढं इतिहास झाला. लोणंदचा प्लांट हे त्याचंच फलित आहे.

त्यांनी सकाळी एक दीडतासाचं जोरकस भाषण केलं. अंहं, भाषण नव्हतं, तो होता संवाद. चालतं बोलतं management book. तुम्हाला काही मुद्दे सांगतो, आवडतील तुम्हाला.

- India is the toughest country to do business. We stand 142th in world ranking behind Pakistan and Yemen.

- Though, India is the most important country in world arena.

- India is not as corrupt as you think.

- Win in India, win everywhere in the world.

- China is harassing western businesses and not interested in creating level playing field. And world business leaders are fade up with this. (China reported 25 billion of machine tool production. As per Gartner, leading report publication, it is valued at 9 billion. Look at the difference)

- long term commitment/right resources, young talent/hunger to perform/listening ability/ tenacity are the keys to success.

- Ambition, willingness to risk, ability to de risk, never give up.

- Important message "Person's nationality, religion do not matter. Ability matters" for the company.

- if the plan does not work, change the plan. But never the goal.

- Chase your vision, not matter how many years. You will succeed. Bill Gates vision at 17, "I want to see computer on the table of every home..........of the world"

- but remembar, having vision with no action plan, remains a dream.

त्यांचं पुस्तक आहे भारतावर Conquering Chaos म्हणून. मला मिळालं. वाचलं की सांगेन. पण माणूस भारी आहे. अभिप्रायाची वाट न बघता, पुस्तक घेऊ शकता.

मुरली शंकर नावाच्या Sundaram Group च्या senior stalwart चं भाषण झालं. Automobile आणि auto component manufacturers बद्दलचा आदर द्विगुणीत झाला. जुना लेख आहे. उद्या टाकतो.

नेहमीच ऊर्जा देणारे पराक्रमी जडेजा भेटले आणि शैलेश सेठ यांचंही मार्गदर्शन मिळालं. (वर काही quotes सेठ साहेबांचे आहेत). जडेजांचा क़िस्सा सांगतो अन संपवतो. पुढच्या सहा वर्षात आमच्या इंडस्ट्रीला 11 times grow होण्याची टारगेट आहे. (Potential आहे). होईल की नाही, मग टारगेट थोडं सैल करायचं का वैगेरे. जडेजा उठले अन म्हणाले "my company turnover was 7 cr in 2004, and today it is 760 cr with one acquisition of French company. If I can grow 100 times in 10 years, you all can do it. No need to change our goal." टाळ्यांचा कडकडाटात संगळ्यांनी अनुमोदन दिलं.


Tuesday 11 November 2014

कर्दे 2

यावेळेस दिवाळी कर्दे इथे केली. सकाळी सहा वाजता किनार्यावर फिरायला गेलो होतो. हा morning walk घेताना सहसा माझ्या तोंडावर साधारण ४-५ विकेटस गेल्यावर राहुल द्रविड च्या चेहऱ्यावर जसे भाव असायचे तसे भाव असतात. हो, म्हणजे "चिंता करितो विश्वाची" असे. किनाऱ्यावर जमलेले पक्षी बघितले. एक माणूस, बहुधा पुण्या मुंबईचा असावा. मुंबईचाच म्हणू, सारखं पुणेकराची का चेष्टा. तर तो  ध्यान लाऊन बसला होता. तो प्राणायाम करताना कपालभाती करण्याचा काहीतरी चमत्कारिक प्रयत्न करत होता. ते बघूनही माझ्या चेहऱ्यावर काही हसू उमटले नाही.

साधारण एखादा किमी जाऊन मी परत फिरलो. म्हणजे घाम यायला सुरुवात झाली कि परत. व्यायाम पण अगदी तब्येतीला सांभाळून.

एव्हाना माझा धाकटा मुलगा नील आणि बायको वैभवी समुद्रावर आले. ते दोघं समुद्रात धमाल करू लागले. माझ्याजवळ i pad होता. हि सगळी गंमत चालू असताना माझ्यातला

- वेस्ट जर्मनी आणि इस्ट जर्मनी यांचं विलीनीकरण कसं झालं याचा विचार करणारा इतिहासतज्ञ (हो आपल्या लेखी जे मेंदूला जुनं आठवतं तोच इतिहास. त्याच्या पलीकडे पुस्तकं वाचायची. ते कुणी सांगितलं)
- साउथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांचं विलीनीकरण होईल का याचा विचार करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडी तज्ञ
- हिंदुस्तान आणि वायव्य हिंदुस्तान हे एकत्र येउन अखंड हिंदुस्तान होईल का हा विचार करणारा हिंदुत्ववादी
- भारत आणि पाकिस्तान एकमेकांना कसे पूरक ठरू शकतील हे विचार करणारा पुरोगामी (खोटं कशाला सांगू पण बिलावल भुत्तो पाकिस्तान आणि आग्नेय पाकिस्तान म्हणत असेल का असाही मुलायमसिंगी विचार मनात चमकून गेला)

अशी वेगवेगळी व्यक्तिमत्वे तात्विक विचार करू लागली. खोटं कशाला सांगू, पण बर्लिन wall जर लोकं पाडू शकतात तर चायना wall पाडून त्या दोन प्रदेशातील लोकांना एकत्र आणण्याचा विचारही मनाला चाटून गेला.

अशा गहन विचारात असताना वैभवी ओरडली "अरे नुसता उभा काय आहेस ………सारखा. माझे नाहीतर नील चे फोटो तरी काढ" आता हे टिंब म्हणजे काय? तर मनमुराद च्या पोस्ट वर आजच खूप नावं आली आहेत. जे आवडेल ते टाका.

मी फोटो काढायला सुरुवात केली. हा दुसराच फोटो. नील ने अश्या काही आवेशात सूर मारला कि फ्रेंच खाडी पोहून जाणारा मिहीरसेन पण  चकित झाला असता. अन मग माझ्यातला "वादी" संपला अन बाप जागा झाला. ते फोटो, त्या फेसबुकच्या पोस्टी सगळं विसरून मी सुद्धा निलबरोबर उड्या मारल्या, लाटेबरोबर पळत किनाऱ्यावर आलो, लाट परत जाताना पायाला होणाऱ्या गुदगुद्या जाणवल्या. मी आणि वैभवी दमलो नील बरोबर खेळून. नील मात्र साडेसात वाजले तरी सहा वाजताच्या उत्साहाने बेफाम खेळत होता. मी त्याचं खेळणं अनिमिष नजरेनं साठवून घेत होतो.

(पहिला फोटो लावला असता. त्यात वैभवी पण आहे. कुणी उगाच "देवमासा पण होता का समुद्रात?" अशी comment टाकली तर तिला वाईट वाटायला नको म्हणून नाही टाकला.………. तू मला सुंभ म्हणलीस त्याचा बदला म्हणून मी तुला देवमासा म्हणालो, हा माझा युक्तिवाद तयार आहे. काळजी नसावी. काय करणार सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही.………खोटं कशाला सांगू)


Monday 10 November 2014

पराशर-एक अनुभव

काल गेलो होतो मनोज हाडवळे यांच्या पराशर रिसोर्ट ला. कंपनीची ट्रीप घेऊन. २१ जण होतो. गेल्या गेल्या स्वागत झालं पार गंध आणि फुलांचे हार वैगेरे घालून. फ्रेश होऊन गोंधळाचा घाट घातला होता. भगवान काटे म्हणून कलाकार होते. असली संबळ घुमवली त्यांनी कि आमचे पोट्टे सगळे नाचायलाच लागले. लोक कला काय झिंग आणू शकते याचा जिवंत अनुभव घेतला. खूप आरडाओरडा हि केला. मनोज, त्याचे सहकारी  आणि आजूबाजूची झाडी यांनी आम्हाला सहन केलं. रसरशीत रात्रीचं मासवाडीचा जेवण  केलं. जेवणाचा दर्जा "अत्युत्कृष्ट" या सदरात मोडणारा.  रात्री कॅम्प फायर आणि त्याभोवती आमची सगळी पोरं कोंडाळ करून बसली. एकेकाला कंठ फुटायला लागला. नागेश, इरफान, मिलिंद, अनिल, गणेश आणि मी सुद्धा, आम्ही खूप गाणी म्हंटली.

सकाळी उठून टेकडीवर चढायला गेलो. बरोबर विकास होता रिसोर्ट चा. त्याने लिंबू सरबत घेतलं होतं कॅन भरून. वरती महादेवाचं मंदिर होतं. दर्शन घेतलं. समोर दर्गा होता. तिथे कपाळावर गंध लावलेला माणूस, अगदी बजरंग दलाचा सदस्य वाटत होता, दुकान लावून बसला होता. आम्हाला म्हणाला "दर्ग्याच दर्शन घ्या." आम्ही गेलो. स्वच्छ होता. एक बाई डोक्यावरती ओढणी घेऊन प्रार्थना करत होती. कपाळावर टिकली होती. तिचा नवरा दर्ग्यातल्या बाबाशी स्वच्छ मराठीत बोलत होता. मी पण दर्ग्याला नमस्कार केला. परत आलो. परत येताना आमच्या कार सिंगल रस्त्यावरून येत होत्या. एक सायकलवाला आणि नंतर मोटर सायकलवाला समोरून आले. दोघंही बाजूला उभे राहिले. आमच्या ५ कार जाईपर्यंत.

मिसळीचा नाश्ता झाला. मग टीम बिल्डींग च्या activities. आम्ही ट्रेनर नेला होता. मनोज चा हि माणूस होता. एकमेकांची चेष्टा करत, गप्पा मारत तीन तास कसे गेले कळलेच नाही. मी पोरांना अन मुलं मला मित्रच समजायला लागले होते.  परत भूक लागली. कदाचित खूप oxygen शरीरात गेल्यावर भूक लागत असावी. मी निष्कर्ष काढला.

आणि मग पुन्हा एकदा झकास जेवण जेवलो. दुपारी सव्वा ते दोन मनोजशी अन त्याची बायको नम्रता यांच्याशी गप्पा मारल्या. कृषी पर्यटन, अखिल भारतात असलेली ४५०० पेक्षा जास्त कृषी सेंटर आणि त्याचा पर्यटनासाठी वापर, शेती कडे इंडस्ट्री म्हणून बघण्याची गरज, शेतकर्याच्या मुलाला दुसरा शेतकरीच मुलगी देत नाही, ते बदलण्याची सामाजिक गरज अशा विविध विषयावर मनोज कुठलाही अभिनिवेश न बाळगता बोलत होता. मागेच त्याचं पुस्तकाचं rack बघितलं. व्यवस्थित मांडली नव्हती, पण बर्याच विषयांवरची बरीच पुस्तकं होती. त्याने मलाही पुस्तक भेट देण्याच्या लायक समजलं.

परत आमच्या काही activitiesझाल्या. साडेतीन वाजता  निघायची वेळ झाली. खूपच साधं ठिकाण, अत्यंत साधी लोकं.मनोज, त्याची बायको नम्रता आणि त्यांचे सहकारी. कुठेही  भपका नाही. मनोजला मी मिठी मारून त्याचा निरोप घेतला. तेव्हा मला एका अकृत्रिम स्नेह जाणवला, इतका कि लेख चालू करताना अहो जाहो करणारा मी आता अरे तुरे पर्यंत आलो.

निघालो पण का कुणास ठाऊक, मला विचित्र वाटत होतं. काहीतरी या रिसोर्ट मध्ये कमी आहे. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.

वाटेत चहाला थांबलो.कार चालू केली  कारच्या सायलेन्सर ला नाक लावलं. कार्बन डाय oxideछातीत भरून घेतला. तिथून निघालो. कासारवाडीला गळ्यात सोन्याचा गोफ घातलेला, पांढरा शर्ट वाला गॉगल धारी, माझ्या कारसमोर आडवा आला. त्याने माझ्या आईबापाचा उद्धार केला. मी पण त्याच्या अन माझ्या देहयष्टीचा अंदाज घेऊन यथाशक्ती शिव्या घातल्या. दापोडीच्या पुढे एक मुस्लिम तरुण सिग्नलला माझ्याकडे द्वेषाने बघतो आहे असं मला त्याच्याकडे द्वेषाने बघताना जाणवलं. आम्ही कारमधील तिघं जण बालगंधर्व समोरच्या शेट्टी च्या हॉटेल मध्ये रात्रीचं जेवण केलं. भात खात होतो तेव्हापासून हॉटेलच्या manager ने पुढचं गिऱ्हाईक आमच्या डोक्यावर आणून ठेवले. ते आम्ही जेवण कधी संपवतो हे आशाळभूतपणे पाहत राहिले. जेवण झाल्यावर तेलयुक्त पंजाबी जेवणाचा ढेकर दिला.  आज सकाळी कंपनीत आलो. कस्टमर ला खोटी आश्वासनं दिली. कंपनीतल्या पोरांवर डाफरलो. फेसबुकवर शहाणपणा करत एक पोस्ट टाकली. दोन चार दीड शहाणपणाच्या comments टाकल्या. आपल्याच प्रतिमेला घट्ट चिकटून बसणारा शहरी माणूस झालो. आताकुठे मला जे काल विचित्र वाटत होतं, ते कमी झालं.

पण मला  अजूनही मनोज आणि नम्रताच्या पराशर रिसोर्ट मध्ये काय कमी आहे हे कळलेलं नाही आहे.

बघा, तुम्हीच एकदा तिथे भेट द्या आणि शोधा याचं उत्तर. आणि सापडलंच तर मलाही सांगा.

पराशर-एक अनुभव


Saturday 1 November 2014

अ……………अभियंत्याचा भाग ३

 अ……………अभियंत्याचा भाग ३

अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल्स: २००२-२०१९ ते २०२३

अल्ट्रा  ची सुरुवात १९९२ सालीच झाली होती. पहिला स्पिंडल माझ्या बेडरूम मधेच रिपेयर केला होता. ९१ साली माझं लग्न झालं होतं अन आठ महिन्यात मी ५०० sqft च्या राजमहालातील १५० sqft च्या अलिशान माझ्या शयनगृहात मी kerosene ने स्पिंडल चे पार्ट साफ करत होतो. बायको समजूतदार होती म्हणून वाचलो नाही तर वांदे झाले असते. ९३ च्या शेवटी किंवा जानेवारी ९४ ला स्वत:ची जागा घेतली. कशी, तर खाली ५० sqft चं ऑफिस अन वर mezzanine ९० sqft. म्हणजे टोटल जागा तब्बल १४० sqft. दिवसभर rollon चं काम करायचं आणि मग संध्याकाळी ६ ते रात्री ९ स्पिंडल रिपेयर करायचे. सब कुछ आम्ही दोघं, मी आणि वाघेला. हेल्पर, technician, मार्केटिंग, purchase सगळं आम्हीच.

संजय  SKF मध्ये माझा बॉस कम मित्र होता (बॉस कमी मित्र जास्त). मला म्हणायचा "अरे असं किती दिवस दुसर्यांची धुणी धुणार. स्वत: बिझिनेस कर" माझं कचखाऊ घोडं खिंकाळलं 'पैसे कुठे, जागा छोटी वैगेरे" काहीतरी calculations केले अन सांगितलं "हि तुझ्या कंपनीची value, हे माझे पैसे, इतके माझे अन इतके सतीशचे  शेयर, हि ६०० sqft जागा, जागेचं हे भाडं, बाकी काही मदत लागली तर सांग. उदयापासून ह्या जागेत धंदा चालू कर." काही कळायच्या आत राजेश मंडलिक, Manager Technical Service हा Ultra Precision Spindles Pvt Ltd  चा डायरेक्टर झाला.

झालं, माझ्या धंद्याबरोबर च मी दुसऱ्या अजून एका बिझिनेस चं application engg/sales बघावं असंही ठरलं. आणि मग चालू झाली घड्याळा बरोबरची शर्यत. सकाळी ९ ते रात्री ९. शेवटची ८ वर्ष ऑफ the शेल्फ आयटम विकत होतो आणि आता स्पिंडल रिपेयर अन मोठे प्रोजेक्ट, त्याचं application engg, quotes धमाल नुसती. जो additional बिझिनेस मी बघत होतो तिथे मार्केटिंग ची टीम बनवली. आधी तिथे वीस वीस लाखाची quotations एका पानात जायची. मी त्याला यथाबुद्धी बरं रूप दिलं. असंख्य प्रोजेक्ट्स केले. इंदोर च्या टाटा वेंचरच्या एका कंपनीचा प्रोजेक्ट. सहा महिने कचकावून काम केलं. ४. ५४ करोड चा प्रोजेक्ट होता. खूप कष्ट घेतले आणि आॅर्डर लूज़ केली. पण त्या application Engg ने टाटा ग्रूप मधे नाव झालं. टाटा मोटर्सच्या तर orders ची लाईन लागली. काही orders final करायला टाटा सन्स मुंबईला गेलो. मोठ्या prestigious orders मिळवल्या. आणि इतरही अनेक assembly lines, material handling equipments यांच्या आॅर्डर्स मिळवल्या. एकंदरीतच टेक्निकल आणि कमर्शियल गोष्टींमध्ये enrich होण्याचा तो काळ होता. इंडस्ट्रीचा अनुभव घटाघटा पीत होतो......तहानल्यासारखा.

पण सव्वा दीड वर्षात प्रोफेशनल फ्रंट वर अशा काही गोष्टी घडायला लागल्या कि मी मानसिक दृष्टया पूर्ण खचलो. आता मी कुणाचं नाव नाही घेत, पण मी त्याच्यामुळे अक्षरश: नैराश्याचा शिकार झालो. छातीत pricking pains व्हायचे. घरात झोपून रहावसं वाटायचं. जून २००४ ला दुसरा मुलगा झाला मला. नवीन घर हि घेतलं. चांगल्या गोष्टी घडत होत्या, पण त्याचा आनंद लुटू शकत नव्हतो.

एक झालं मात्र, कि माझं आणि वाघेलाच ब्रेन चाइल्ड Ultra Precision Spindles ह्याला काही झळ पोहोचली नव्हती. पण म्हणावं तसं तो बिझिनेस वाढत हि नव्हता हे हि तितकंच खरं.

पहिल्यांदा छातीतलं दुखणं म्हणजे हार्ट चं काहीतरी आहे असं वाटून ट्रीटमेंट चालू केली ती पुढे मानसोपचार तज्ञाकडून घ्यावी लागली. 

एक दिवस अशी काही घटना घडली कि मी सांगून टाकलं मी त्या अतिरिक्त बिझिनेस चं काही बघणार नाही फक्त माझ्या पोराची काळजी घेईल (स्पिंडल बिझिनेस). कदाचित मला नवीन जागाही शोधावी लागली असती. दोन वर्ष आयुष्य rewind करावं लागलं असतं. मी काही फार स्वाभिमानी वैगेरे नाही पण इथे माझं मी पणच पणाला लागलं होतं. दोन घोड्यांवर दशकभर मांड ठोकून शारीरिक दृष्ट्या फाटलो होतोच पण इथे मन ही  उसवलं होतं.

असो खूप रडगाणं झालं. वैभवी आणि आई त्या काळात खंबीर होत्या. त्या काळात काही जवळचे लोकं कसे वागले हे आठवलं तरी मनस्वी आश्चर्य वाटतं.

परत एकदा इकडे तिकडे सांडलेल्या गोष्टींना एकत्र केलं आणि डिसेंबर २००४ पासून जिथे होतो त्या जागेतच एका जोमाने सुरुवात केली अन आयुष्य नव्याने लिहायला लागलो. उंच खोल लाटांवर दोलायमान असणारा मी शिडं लावून मार्गक्रमण करू लागलो.

परत एकदा सकाळी मुसमुसलेल्या उत्साहानी ऑफिस मध्ये जाऊ लागलो.



Friday 31 October 2014

का?

ऐकीव माहिती आहे, म्हणे अॅमस्टरडॅम मधे सायकलचं खुप वेड. पण मग सायकलीच्या चोर्या होऊ लागल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढं सायकलची किंमत ती काय. पण पोलिस तक्रारी वाढल्या. भांडणं वाढली. शासनानं गंमत केली. मुख्य चौंकात ४-५ हजार सायकली ठेवून दिल्या. लोकांना सांगितलं, काय वापरायच्या ते वापरा. आणून परत ठेवून द्या. सायकल चोरीचं प्रमाण कमी झालं.

आमच्या SKF मधे तीन ची Allen key कमी. छोटी असल्यामुळे हरवायची. मग लोकं एकमेकांची ढापायचे. ज्याच्याकडं नसायची त्याचं काम delay व्हायचं. आम्ही एक काम केलं ३ च्या १०० Allen keys आणून ठेवल्या open box मधे. लोकांना सांगितलं, वापरा पण परत आणून ठेवा. १०-१५ गेल्या, पण परत ३ च्या Allen key साठी काम अडलं नाही.

आपल्याला कमी वाढतो की काय, किंवा परत वाढायला येईल की नाही, या भितीपोटी लोकं जास्त वाढून घेत असावेत. अन्न वाया जाऊ लागलं. त्यातूनच buffet जेवणाची पद्धत आली असावी. तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. अन्न कमी वाया जाऊ लागलं असेल.

अमेरिकेत बर्याच ठिकाणी कोक किंवा coffee चं refill फुकट मिळतं. मग असं होतं का हो, फुकट मिळतं तर लाईन लागली आहे.

काय असेल बरं मानसिकता. कुठं थांबायचं हे काही बाबतीत कळतं, पण काही बाबतीत नाही.

म्हणजे एका जन्मात पुरेल इतके पैसे कमावल्यावरही, माणसाला पैसे कमावण्यासाठी का काम करावं वाटतं? का पुढच्या पिढीच्या भविष्याची तरतूद करून ठेवावी वाटते? त्याचा त्याच्या मुलामुलींच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो का?

किंवा दारू फुकट मिळाली तर पार उलट्या होईपर्यंत, फालतूची बडबड करेपर्यंत माणूस का पितो? त्याला असं वाटतं का की परत ही वेळ आपल्या आयुष्यात येणार नाही म्हणून.

त्या ५-६ वर्षाच्या मुलींवर अत्याचार करताना कुठे या लोकांची बुद्धी शेण खायला जाते?

धड धाकट अशा तीन तीन लोकांची हत्या करताना यांचे हात थरथरून थांबत का नाहीत?

का?

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

फेसबुकवर चौफेर वाचन करत असल्यामुळे मला राजकारण्याचंही एक गुप्त अंग (शब्द जोडून वाचून नये) आहे असा एक फील येऊ लागला आहे. माझ्या राजकीय विश्लेषणाची (ख्या ख्या, असं कोण हसतय रे) दखल कुणी घ्यावी असंही नाही, पण त्यातून डावी विचारसरणी प्रतिध्वनित होते असं माझं मन सांगत होतं. (माझ्या राजकीय विचारांची माझ्याशिवाय दुसरा कुणी कुत्राही दखल घेणार नाही हे माहित आहे. आता या वाक्यात मी स्वत:ला कुत्रा म्हणवलं असा कुणी जावईशोध लावला तर माझा नाईलाज आहे.) फेसबुकवर येईपर्यंत, माणूस एक तर सरळ किंवा वाकड्या विचारसरणीचा असतो एवढंच माहित होतं. ही डावी अन उजवी विचारसरणी म्हणजे वेगळंच झेंगट. असो.

तर आपणच तयार केलेल्या भाजप विरोधक या प्रतिमेला जागणं तर भाग होतं. ते बजावत मी कालपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या पोस्ट वाचत होतो. पेपर पण अख्खा चाळून काढला. आजचा लोकसत्ता (मला काही कळत नाही, पण काही लोक याला संघसत्ता संबोंधतात. इथं बोंबलायला मला तरूण भारत संघाचं आणि लोकमत/सकाळ काॅंग्रेसचा वाटत नाही तर बाकीच्यांची काय कथा), मग मटा, पुढारी, संध्यानंद सगळे पेपर पिंजून काढले. पेपर मधे तर नाहीच नाही, पण फेसबुकवरच्या पोस्टमधेही कुठे टिंगल टवाळी नाही. पार विश्वंभर चौधरीपासून ते माझा आवडता मित्र निर्भय पर्यंत सगळ्यांनी स्तुतीच केली राव. माझी पंचाईतच झाली. म्हंटलं आपल्याला काही सुचत नाही तर कुणाला तरी अनुमोदन द्यावं. पण नाहीच. नाही म्हणायला काही माझ्या सेन्सिबल मित्रांनी ते ब्राह्मण किंवा संघाचे म्हणून, पेशवाई आली वैगेरे अशी गरळ ओकली, पण आपल्या काय पल्ले नाही पडली. त्यामुळे असल्या फडतूस पोस्टच्या मी वार्यालाही उभा नाही राहिलो.

आता काय विधीमंडळ नेते झालेच आहेत. मुख्यमंत्री होतीलच. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

लेन्स आणून ठेवली आहे. घासून पुसून साफ करून ठेवतो, आणि बघतो कुठं काही चुकतंय का साहेबांचं. आणि मग हाणायचं काहीतरी तिरकं. तेव्हढेच आपली प्रतिमा जपल्याचं समाधान. नाही का?

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा


Tuesday 28 October 2014

Bargaining

दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबादला गेलो होतो. तिथे नवरंगपुरा मार्केटमधे गेलो होतो. म्हंटलं मुलासाठी ड्रेस घ्यावा. त्यावेळी कुठल्याही गावाला गेलो की आई सांगायची, घरातल्या लोकांसाठी आणत जा काहीतरी. त्याआधी दोन वर्षापूर्वी बायकोला बंगलोर हून रु १६०० ची साडी आणली होती. तेव्हापासून या प्रकारातला माझा interest तसा कमीच झाला होता. आता तर कुठं गेलो आणि कुणी गिफ्ट वैगेरे दिलं तर घेऊन येतो. नाहीतर तसाच. (भेटलो तर लक्षात ठेवा)

तर काय सांगत होतो, गेलो दुकानात. आणि बोललो दाखवा ड्रेस. किमती चालू झाल्या २००, २५०, ३००. मला एक ड्रेस फारच आवडला. पण किंमत रु ३५०. दुकानदाराला म्हणालो "थोडा कम करो ना". नंतरचं संभाषण तो गुजरातीत आणि मी हिंदीत (इथे मराठीत) चालू झालं. गुजराती लोकांचं हे एक वैशिष्ट्य, समोरचा तमिळ मध्ये बोलत असला तरी हे गुजरातीत, मग माझ्यासारख्या मराठी बाणाची काय कथा. उगाच नाही वेस्टर्न लाईन चा भैया  पण गुजराती बोलत. 

दु:  तू सांग 
मी: २०० ला दया
दु:  नाही परवडत.
मी: बरं ठीक आहे, २२५ ला दया
दु: नाही जमणार
मी: तू सांग
दु: ३००
मी: थोडे कमी करा कि
दु: नाही जमणार. ३०० च्या खाली एक रुपया नाही.

तो अशा टेचात म्हणाला कि माझाही मराठा बाणा जागा झाला. मी बोललो "राहू दे मग. जातो मी" तो म्हणाला " जेवढयात मिळतं घ्या, नंतर पस्तावाल." मी बोललो "अरे जा, तू काय एकटाच आहे का मार्केट मध्ये. शोधेन मी" आणि तडक निघालो. दीड तास मार्केट पालथं घातलं, पण तसा ड्रेस काय मिळाला नाही. परत गेलो त्या दुकानात आणि म्हणालो "दया तो ड्रेस"

दु: हे घ्या
मी: ३०० ना
दु: नाही आता ३५० लाच.
मी: अहो असं काय, मगाशी ३०० म्हणालात ना
दु: मग तेव्हा का नाही घेतला. आता भाव ३५०.
मी: अहो असं काय करता, दया  ना  हो प्लीज ३०० ला.
एव्हाना त्याचा साथीदार आला.
दु: एकदा बोललो ना आता ३५० म्हणजे ३५०. त्याच्या खाली एक पैसा नाही. पाहिजे असेल तर घ्या नाही तर बघा.
मी: (काकुळतीने) अहो द्या ना ३०० ला, मुलगा खुश होईल, बायको ओवाळेल मला.
दुकानदार साथीदाराकडे बघतो. साथीदार दरवाज्यापाशी जाऊन उभा राहतो, दरवाजा उघडतो, "आता निघा" असं नजरेतूनच बोलतो. माझ्या मनात विचार आला, साला जेवढयाला मिळत होता ड्रेस, घेतला असता तर बरं झालं असतं. उगाचच नाटकं केली. मन कुरतडत बसलो.

उद्धव ठाकरेंच्या मनात काय चालू आहे याची कल्पना आहे मला.

दोन गोष्टी:

- तो ड्रेस शेवटी घेतला कि नाही हे दोन दिवसात सांगतो.
- तुमच्या मनात आलं असेल कि तो दुकानदार पण दाढीवाला अन ५६ इंच छातीवाला आणि साथीदार दाढीवाला अन डोक्यावर टक्कल असलेला होता का? तर उत्तर आहे, नाही.  इतके पण योगायोग नसतात घडत आयुष्यात.

Saturday 25 October 2014

करद्यातली सकाळ

करद्याचा निसर्गरम्य समुद्रकिनारा. सकाळची सहाची रम्य वेळ. त्या किनारी कुणीच नाही. पायाला गुदगुल्या करणार्या वाळूतून एकटाच चालत असणारा मी. लाटा किनार्यावर विसर्जित झाल्यावर परत जाताना झालेली वाळूची मोहक नक्षी. अचानक मला त्या खळाळणार्या समुद्राच्या किनार्यावर दिसलेले असंख्य पक्षी. काही उडणारे, काही नितळ पाण्यात खाद्य शोधणारे, तर काही नुसतेच बसलेले.

मला वाटलं अशा रम्य वेळी मी एकटाच का. मला वाटलं माझ्याबरोबर असायला पाहिजे...................,माझ्याबरोबर असायला पाहिजे.......................गणेश बागल

कसलं कद्रू डोकं दिलं आहे मला. अशावेळी स्वत:च्या बायकोबरोबर चालण्याचा विचार करायचा सोडून, गणेश. छ्या. "आपल्याला हव्या ते वेळी हव्या त्या व्यक्तिची आठवण न येणे म्हणजे नरक." वपु

(खरंतर हे भंगार वाक्य माझंच आहे. याला आपण वपुंचं मरणोत्तर साहित्य म्हणू यात फारतर. सध्या पुलंची प्रार्थना जोरात फिरत आहे. वपुंवर का अन्याय)

कुठल्याही बीच रिसोर्ट ला किंवा कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीबरोबर मी टूर वर गेलो की "स्वत:च्या" हे आवर्जून लिहावं लागतं यावर माझे समस्त पुरूषमित्र सहमत असावेत. बाकी दोन गोष्टी पहायला मला अशा ठिकाणी मला बिलकुल आवडत नाही, एक म्हणजे माझे सुटलेले पोट व एकंदरच अस्ताव्यस्त पसरलेलं शरीर आणि दुसरं म्हणजे स्वत:च्या व्यक्तिमत्वाला न शोभणार्या अन त्याला व्यवस्थित carry न करू शकणार्या ३/४th घातलेल्या बायका. हो म्हणजे, स्वत:च्या सोडून दुसर्या बायकांबरोबर चालण्याच्या विचार करण्याच्या पापापासून मला जर कुणी वाचवत असेल तर हा 3/4th युक्त ड्रेसिंग सेन्स. आणि या एका कारणासाठी कुणाची नज़र लागू नये म्हणून मी माझ्या बायकोला ही ती घालण्यास उद्युक्त करतो. Men will be men. पण ३/४th या पाश्चात्य वेशभूषेबद्दलचा मनातला आकस समस्त पुरूषवर्गाने कमी करायला हवा. त्याचं असं झालं की मी व मंडळी मुरूडगावात देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो, तर तिथे पाटी "प्रवेश हिंदू पद्धतीने पोशाख केलेल्यांना" मला वाटलं मंडळीला बाहेर उभं रहायला सांगतात की काय! तर पुजारीने काही अडवलं नाही बुवा. यावरून मी तीन inferences काढले

- ३/४th हा आता हिंदु पोशाख म्हणून मान्य व्हावा (हे मोहन भागवतांसाठी) बाकी ३/४th च्या 1/4th होतील तेव्हा डोळे उघडतील, असंही  काही लोकं म्हणतील. पण एकच सांगू इच्छितो. जर्मनीला चर्च मधे गेलो होतो. मी अन रियाज. म्हणजे एक हिंदू अन एक मुसलमान, ख्रिश्चन देवालयात. मुख्य म्हणजे चर्च मधे एकही उघड़ी नागडी स्त्री दिसली नाही. मला म्हणायचं हे की कुठे कसे कपडे घालायचं याचा sense असतो बायकांना
- हिंदु पद्धतीने पोशाख, म्हणजे पोशाख असावा आतमधे माणूस पाहिजे. बरीच प्रगती म्हणायची की. (हे शंकराचार्यांसाठी. तुम्ही किती समाजाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो सुधरतोय) काही वर्षात जाईल ती पाटीही.
- पुर्वी एका पेक्षा अधिक बायका असाव्यात म्हणून ओळख करून देताना "या आमच्या मंडळी" असं म्हणत असावेत. मी आपलं सहज मंडळी म्हणून लिहून बघितलं. लिहीतानाच हडबडलो.

खरं म्हणजे पुरावा म्हणून दोन चार फोटो मोबाईलमधून उडवले पण आहेत मी. (या वाक्याचा अर्थ डिलीट केले असा वाटत असेल, पण तो फ्लॅश उडवला म्हणजे फोटो काढला या धर्तीवर घ्यावा. १९६८ ला जन्मलेल्या माणसाने नवीन technology adapt केली तरी त्याची बुद्धी जुनाटच आहे याचं हे एक उत्तम उदाहरण), पण ते इतके गचाळ आहेत की माझी ते पोस्ट करण्याची daring नाही झाली. गणेशचं नाव ज्या फ्रेम मधे आहे तिथे माझं फोटो, ते पण पक्ष्यांचे, लावणं म्हणजे पंडितजींच्या समोर एखाद्या बाथरूम सिंगरने "इंद्रायणी काठी" म्हणण्याचं धाडस करण्यासारखं आहे. (उपमा चुकली का? पंडितजी म्हणजे  जरा जास्तच झालं नाही का. बरं मग आनंद भाटे, नाहीतर जयतीर्थ मेवूंडी, नाहीतर राहूल  देशपांडे, नाहीतर.......... बास पेपर मधे वाचून शास्त्रीय गायकांपैकी ही तीनच नावं आठवत आहेत) 


असो. तर गणेश, या पोस्टमधे मी तुझी खुपंच स्तुति केली आहे. माझा एक दोन दिवसात तुला जर फोन आला तर काही तरी assignment साठी केला असं काही वाटू देउ नको ही लै म्हणजे लैच नम्र विनंती. फोनला उत्तर द्यावे.

Sent from my iPad

Wednesday 22 October 2014

ISRO हवाल आणि हाल

परवा परत आले होते  ISRO चे scientist. मग परत ते मंगलयानाचं टॅक्सी पेक्षा कमी चार्ज वैगेरे झालं. हसलो परत. त्यांनी काही भारी गोष्टी सांगितल्या अजून. एक तर यानाच्या velocity मधे पूर्ण प्रवासात जर कधीही 0.1 m/sec इतका जरी फरक पडला असता तरी यान भलतीकडेच भरकटलं असतं. यानाने पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण कक्षेत ७ फेर्या मारल्या. हेच काहीतरी पुढच्या प्रवासासाठी इंधन होतं. (हे काही कळलं नाही, पण असंच काहीतरी म्हंटले बुवा). पृथ्वीच्या कक्षेतून, मंगळाच्या कक्षेत जाताना अशी वेळ निवडली होती जेव्हा दोन ग्रहात कमीत कमी अंतर होतं. पृथ्वीच्या बाहेर गेल्यावर एक मेसेज जायला एका बाजूने १२ मिनीट लागतो. म्हणजे एखादा fault जर आला तर तो solve झाला की नाही याला २४ मिनीटे लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी plan B तयार होता. पण यानाच्या संपूर्ण प्रवासात कुठलाही plan B वापरावा लागला नाही. ज्या वेळेला पाहिला मेसेज येणं expected होतं, तो येण्यात एक सेकंदाचाही फरक पडला नाही.

आले त्याच दिवशी IRS हा communication satellite पाठवला होता. सिरीजमधला दुसरा. सात पाठवायचे आहेत. ते झालं की अख्खा भारत GPRS साठी कव्हर होईल. अमेरिकेची गरज पडणार नाही.

काही दिवसांपूर्वी कॅनडा, Switzerland, Germany, France या प्रगत चार देशांचे एकूण ५ satellite आपण एकाच launcher ने ठेवून आलो orbit मधे.

३०० बिलीयन डाॅलरची बाजारपेठ ही मंगलयानामुळे नसून क्रायोजेनिक इंजिन बनवण्याच्या सफलतेमुळे आणि वरच्या दोन business avenue मुळे आहे.

Cheers. मजाच आली हे सगळं ऐकताना. तुम्हाला पण ना!

I am proud of ISRO.

********************************************************************************

आता हे पण वाचा.

- या scientist ना (म्हणजे जे माझ्याकडे आले होते) दिवसाला हाॅटेलमधे राहण्याचे रू ५५० मिळतात.

- यांना पूर्ण दिवसाच्या जेवणाखाण्याचे रू १५० मिळतात.

- यांना कामासाठी दिवसभराच्या फिरण्याचे फक्त रू १५० मिळतात.

- माझ्याकडे inspection आले तेव्हा रेल्वे नी आले. त्याचेही tatkal मधे तिकीट काढलं तर त्यांचे पैसे मिळत नाही. आज काल premium train चं तिकीट ४ ते ५ हजार असतं. ते काढलं तरी पैसे regular तिकीटाचे मिळतात.

शप्पथ, या मंडळींना जर private sector सारख्या facilities दिल्या ना, आकाशगंगेतला एकही ग्रह सोडणार नाहीत.

जे झालं ते झालं, नवीन सरकारने या बाबींकडे लक्ष द्यावं ही अंतरिक इच्छा.

(वरची सगळी गप्पा मारण्यातून आलेली माहिती आहे. पुरावा मागू नये. बाकी govt undertaking च्या लोकांच्या हालाचे क़िस्से आहेत, ते नंतर. एक आठवलं, विमानप्रवास फक्त Air India ने म्हणे. आता काय बोलायचं कप्पाळ)

Tuesday 21 October 2014

ते आणि आपण

बऱ्याचदा मी परदेशातले अनुभव लिहितो. तुम्हाला वाटेल हा फारच स्वत:ची लाल करतो, आणि तिकडे काय भारी असतं असं लिहून आम्हाला शहाणपणा शिकवतो. पण जे आहे ते आहे. एका बाबतीत मात्र आपण भारतीय समस्त जगाला मात देऊ शकू आणि ती गोष्ट म्हणजे "दिलदारपणा". आणि त्यातल्या त्यात मी जेव्हा आपल्याला जर्मनी या अत्यंत प्रगत अन गुणवत्तेचा मापदंड असलेल्या देशातील लोकांबरोबर compare करतो, तेव्हा मला आपली लोकं फारच भारी वाटतात.

माझे जर्मनीत ६-७ सप्लायर आहेत. त्यापैकी एक मायकेल फ्रीटाग. महिन्याला मी त्याच्याकडून १००० एक युरोचं मटेरियल घ्यायचो. (साधारण लाखभर रुपये). पैसे आधी रेमिट करायचे. दरवेळेला. मग हा बाबुराव मटेरियल पाठवणार. बँक पैसे रेमिट करायला २५ युरो चार्ज करते, अर्थात माझ्या कंपनीवर. एकदा order दिली होती, ३०० युरोची. बँके नि पैसे रेमिट करताना चुकून २५ युरो त्याला चार्ज केले. थोडक्यात त्याला २७५ युरो मिळाले. तर म्हणाला "आधी २५ युरो पाठव. मग मटेरियल पाठवतो" मी बोललो "बंडू, तुझ्याकडून मी दर महिन्याला माल उचलतो. पुढच्या order मध्ये २५ युरो जास्त टाकतो". तर म्हणाला "नाही, तू नाही दिलेस पैसे तर" आहे कि नाही बिनडोक. शेवटी माझा भाऊ आहे अमोल. तो असतो जर्मनीत.  त्याला सांगितलं, टाक त्या मायकेलच्या बोडक्यावर २५ युरो. तेव्हा कुठं त्यानं मटेरियल पाठवलं. (आता तुम्ही विचार कराल, कि बँकेला का नाही सांगितलं. तर आपली सिस्टम आहे. विनाकारण आपण परदेशात पैसे नाही पाठवू शकत)

आतासुद्धा होतो जर्मनीत ट्रेनिंग ला. त्या  चं authorisation आहे आम्हाला. तरी आम्हाला म्हणे ट्रेनिंग चे दिवसाला १००० युरो पडतील. मी म्हणालो "तात्या, तुझेच स्पिंडल आम्ही रिपेयर करणार. भारतात तुझं सर्विस सेंटर आहे म्हंटल्यावर तुझाच बिझिनेस वाढेल ना. तरीही आम्हालाच बांबू लावणार" तर म्हणाला "माझा एक ट्रेनर ४ दिवस तुमच्यात बिझी राहणार" मी बोललो "अरे, आम्ही दोन माणसं तिथं येणार. दोघांचे १ लाख रु, हॉटेल आणि इतर खर्च ५०००० रु. आम्ही इतक्या ची वाट लावतो, तू थोडा खर्च कर ना" कसाबसा बाबा तयार झाला.

rigid तर इतके आहेत कि ज्याचं नाव ते. यांच्याकडून चूक म्हणजे होतंच नाही कधी अशी शायनिंग. अरे काय आकाशातून पडले का तुम्ही. नाव नाही लिहित, पण क्वालिटी भंगार म्हणून, एजन्सी सोडून दिली त्यांची. आताची गोष्ट. ज्या कंपनीत गेलो होतो त्याने ३ spare part  पाठवले होते. आम्ही सांगत होतो, त्यात प्रोब्लेम आहे म्हणून. तर नाहीच. जर्मनीला गेल्यावर कळलं कि त्यांची चूक होती म्हणून. तर म्हणतो कसा "मला चेक करावं लागेल तू order बरोबर दिलीस का ते" आहे कि नाही अतिशहाणा.

ऱ्हाईन नदी अख्ख्या जर्मनी तून १२ महिने दुथडी भरून वाहत असते. अमाप पाणी. तरी हॉटेल मध्ये फुकट पाणी दिलं तर शप्पथ. रूम वर पण ३.३० युरो ला ५०० ml ची बाटली ठेवली असते रुबाबात. (३०० रु). जेवायला गेलो कि विचारणार "what would you like to drink?" पाण्याचा, कोल्ड ड्रिंक चा आणि बियर चा रेट सेम. कशाला बोंबलायला लोकं पाणी पितील.

स्वच्छतेचं लय कौतुक इथल्या लोकांचं.  दांडू दाखवून लोकांना सवयी लावल्यात. Given a chance, आपल्यापेक्षा घाण करतील. ऑक्टोबर फेस्ट ऐकलं असेल ना तुम्ही. अरारा, बियर पिउन काय राडा करतात. उलटया करणे, बाटल्या फोडणे सगळे प्रकार चालतात. एकच नशीब, शहरभर राडा करत नाहीत तर एका मैदानात घालतात गोंधळ. समोरच्या बाकावर पाय ठेवून बसणं अगदी सर्रास चालतं ट्रेन मध्ये.

घर भाडयाने देतात, पण deposit परत देताना पार वाट लावतात.

तेव्हा एकच सांगतो मित्रानो, मोठं मन आपल्या लोकांचं. प्रगती झाली असेल त्यांची, पण कद्रू आहेत  लेकाचे.

आपलं मन आहे तसं ठेवून, काही गोष्टी थोडया सुधरवल्या ना, येड लावू आपण जगाला.

I love my India

ते आणि आपण




Saturday 18 October 2014

आजी अन तिचे नातू

२०११ च्या जुलैला मी केसरीबरोबर अमेरिकेची ट्रीप केली.   My fair lady. सगळ्या बायका, साधारण माझ्याच वयाच्या. काहीतरी ८० च्या पण. पहिल्या दिवशीच आमची घट्ट मैत्री झाली. दुसर्या दिवसापासून गप्पांच्या मैफिली सजू लागल्या. बर्याच जणी नोकरी करणार्या, काही उद्योजिका तर काहींना रीतसर पेंशनर. मला विचारलं "तुम्ही काय करता?" मी तर आयुष्यभर चुल अन मुल केलं. ह्यांची आई ते चार वर्षाचे असताना गेली, घरात बाईमाणूस नाही. मग मीच ओढ़ला गाड़ा. "पण, मग आता काय करता?" "आता, मी नातवांमधे रमते, गेली कित्येक वर्षं." माझ्या तोंडून चटकन निघून गेलं. मग त्यांचं चालू झालं "सरळ पाळणाघरात ठेवायचं वैगेरे, वैगेरे". मला तर ते काही पटलं नाही. पैश्यांचं सोडा हो, पण आजीचे प्रेम, त्यांना आवडेल ते खाऊ घालणे, वेळेवर दुध देणे ही कामं माझ्याव्यतिरिक्त दुसरं कुणी व्यवस्थित करू शकेल यावरच मुळी माझा विश्वास नव्हता.

नातवंडं जेव्हा मांडीवरून रांगायला अन मग हळूहळू पाऊल टाकायला लागतात तेव्हा आजीबाई ला होणारा आनंद शब्दात नाही सांगता येणार. मुले वर्षात कशी मोठी होतात ते कळतच नाही. त्यांचे बोबडे बोलणे, आई बाबा आॅफीसला निघाल्यावर निरागसपणे टाटा करणे (त्या छोट्यांच्या मनात काय घालमेल चालू असेल याचा विचार केला तर आपल्यालाच थोड़े वाईट वाटते).

अरे हो, एक सांगायचंच राहिलं, माझी मोठी सुन, वैभवी, डाॅक्टर, तिची स्वत:ची पॅथ लॅब अन धाकटी अर्चना, इलेक्ट्रानिक इंजिनियर, MSEB त.

तर सांगत होते, की मोठा नातू यश, ३ वर्षाचा झाला, चुरचुर गोड़ बोलू लागला. (आता वय १९. आता जणू त्याचं बोलणंच आटलंय). एकदा त्यांच्या आईला घरी यायला उशीर झाला. तेव्हा म्हणाला, "आजी, आता माझी मम्मी येईपर्यंत तुच माझी मम्मी. आणि मग ती आल्यावर तु परत आजी. चालेल?" तो इतका निरागसपणे म्हणाला की मला अतीव समाधान वाटले. त्या रात्री माझ्या वजनात २ पौंडाची भर पडली. या अशाच सतत भर पडण्यामुळे मी जाड झाली आहे. (कसलं भारी कारण).

दुसरा नातू, अभिषेक, जन्मत:चं एकदम गुटगुटीत. त्याची आई संध्याकाळी साडेसहाला घरी यायची. तोपर्यंत आम्ही तयार होऊन खाली फिरायचो. आजूबाजुच्या बायका म्हणत "आजीला नातू शोभतो" माझे ताबडतोब उत्तर "आजीला दृष्ट नाही लागणार, पण माझ्या गोड़ नातवाला लागेल." त्याच्या काकाने प्रथमच कार घेतली. त्या रंगाची कार दिसली, की "चल त्या कारमधे जाऊ या" म्हणून तिथेच अडायचा. आता दहावीचा आहे तो. अभ्यासात मग्न आहे.

यश ९ वर्षाचा झाल्यावर मला तिसरा नातू झाला. खरंतर मला मुलगी नाही, आणि पहिले दोन नातू. मला वाटलं की आता नात होणार. पण झाला तो नील, अतिशय गोड. हे मुलं खेळतच मोठं झालं. त्याचं अंगाखांद्यावर खेळणं, त्याच्या बरोबर हाॅलमधे खेळणं ही म्हणजे माझ्यासाठी करमणूक. सारखी बडबड, आणि बरीच लाॅजिकलही. आता तो दहा वर्षाचा आहे, पण घरात तो चालतो म्हणजे फ़ुटबॉल बरोबर पळतो.

ह्या तीन नातवंडांच्या सहवासात मला tv चे वेड लागले नाही (मी अजिबात tv बघत नाही). त्यांच्या सहवासात कसा वेळ गेला हे कळलंही नाही अन अजून कळतही नाही. कधीकाळी नोकरी केली नाही याची खंत वाटायची, आता तीही वाटत नाही. आजही राजेश अाणि यशने ठरवलं की दोघांचं दररोजचं ३८ किमी फिरणं कमी होण्यासाठी नांदेड सिटीत छोट्या फ्लॅटमधे रहायचं. पाळणाघरासारखी परत माझ्या मनाने उचल खाल्ली अन मी त्यांच्या दिमतीला येऊन राहते आहे. आणि यात मला एक प्रकारचे आत्मिक समाधान लाभते आहे. (नाही म्हणायला नील पासून लांब राहते त्यांची खंत वाटते, पण ठीक आहे)

या पोरांचे आईबाप, पोरांचं जीवन मार्गी लागावं म्हणून हाय वे बांधताहेत. त्यावरून ही पोरंाच्या पायाला चाकं लागून ती भरधाव जातीलही. कुणाच्या पंखात इतके बळ येईन, की ती हवेतून उडतीलही. उडावंही त्यांनी, माझे आशिर्वाद आहेत त्यांना. पण या मोरपंखी आठवणींची साठवण मात्र माझ्याजवळंच राहीन. ती कुपी या आजीच्या पदरात बंदिस्त असेल.

नातूही खुश अन आजीही.............

"घरात असता हासरे तारे, मी पाहू कशाला नभाकडे"

कुमुद मंडलिक 

Sunday 12 October 2014

अ........अभियंत्याचा २

साधारण ९२-९३ च्या सुमारास माझ्या डोक्यात धंदा करण्याचा किडा वळवळू लागला. (विचार मनात आला अन लौकिकार्थाने बरं घडलं तर किडा डोक्यात वळवळला असं म्हणतात अन कलमडला की तोच किडा..........) घडामोडी अशा घडल्या की ९३ च्या सुमारास hobby business म्हणून spindle repair करण्याचं चालू केलं. फुलटाईम धंदा करण्याची डेअरिंग नव्हती. मी विचार केला की अशी नोकरी शोधावी की वेळेचं बंधन नसावं, पण थोडा पगारपाणी व्यवस्थित असावा. हे म्हणजे बायको म्हणून माधुरी पाहिजे (दिक्षीतांची हो, जास्त लिहीलं का जरा) पण स्वयंपाक निपुण पण असावी. आणि सापडली, माधुरी सापडली, म्हणजे नोकरी.  Resident engineer हा concept नवीन होता. पाच ठिकाणी अर्ज केले. Rollon Hydraulics नावाच्या कंपनीने मला वरलं. MD संजीव शहा म्हणाला "तुझा धंदा वैगेरे आहे ठीक आहे, पण तुझ्या कामासाठी कंपनीचं काम नाही झालं असं ऐकलं तर बाहेर जावं लागेल" मी "कबूल" बोललो. २००० हेडकाउंट आणि ३०० कोटी  turnover असलेल्या multinational SKF मधून एका रात्रीत start up venture आणि ५ लोकं असलेल्या बनियाच्या देशी कंपनीत मी रूजु झालो. १ सप्टेंबर १९९४. शप्पथ सांगतो १ महिना आई वडिल बोलत नव्हते माझ्याशी. जणू काही inter caste marriage केलं आहे मी. (ते खरंतर मी केलं होतं १९९१ ला तेव्हा ठीकठाक होते). पण मी बधलो नाही. वैभवीचा पुर्ण पाठिंबा. (असावा, असं वाटतंय)

कंपनी बंगलोरला, मी पुण्यात. प्रोडक्शन सोडून सेल्स मधे उडी. सगळी उलथापालथ नुसती. 

डायरेक्ट बाॅस बोनी पाॅल, मल्लू. अन अजून चार लोकं. वेंकट, गणेश, विजया आणि मुर्ती. कोणाला हिंदीचा गंध नाही, माझी अगाध इंग्रजी. हळू हळू बस्तान बसवायला चालू केलं. माझा सेल्स एरिया महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश. कंपनी नवीन, प्रोडक्ट नवीन. Busak+Shamban hydraulic seals. भारतातल्या प्रचलित seals पेक्षा चौपट किमती. पण MD संजीवला विश्वास प्रोडक्टवर आणि बोनीवरही. मी पण पुण्यात गरागरा फिरू लागलो. पहिले दोन वर्ष M 80, मग हिरो होंडा अन शेवटची दोन वर्षं सँट्रो. प्रतिदिन दिवसाला ९०-१०० किमी. आणि त्या बरोबर इतर शहरातही. इंडियन रेल्वेजची नाळ जुळली ती इथे. दिवस सरू लागले, कंपनी establish होऊ लागली. पहिल्या दोन तीन वर्षात तास न तास reception मधे बसून ठेवणारे कस्टमर्स आता फोन करून बोलावू लागले. अहमदाबाद, वडोदरा, सुरत, इंदोर, गोवा, बंगलोर, नागपुर, नाशिक अशी तूफ़ानी भ्रमंती होवु लागली. रेल्वे माझं दुसरं घर झालं. एका वेळेस ८-९ तिकीटं काढायचो. रविवार पेठ आरक्षण केंद्राचा बुकींग क्लर्क मित्र झाला होता. अहमदाबादचं हाॅटेल अॅपेक्स, बडोद्याचं अमिटी ही  हाॅटेलं म्हणजे माझे पत्ते झाले. सगळीकडचे माझे टॅक्सीवाले, रिक्षावाले दोस्त बनले. अहमदाबादच्या गोवर्धनकाकांनी तर नंतर आई बाबांना सौराष्ट्र ची ट्रीप त्यांच्या ambassador मधून करवुन आणली. 
Injection moulding machines, hydraulic cylinders, steel mills हे manufacturers करत automobile manufacturing असा कस्टमर बेस वाढत गेला. 

SKF प्रमाणेच इथलेही अनंत क़िस्से आहेत. मी एकटाच पुण्यात असल्यामुळे working colleague नव्हतेच. पण माझे कस्टमर्स माझे मित्र बनत गेले. स्वत: बोनी आणि दिल्लीचा रेसिडेंट इंजिनियर बन्सी हे जीवाभावाचे मित्र झाले. आजही महिन्यातून एकदा तरी आमचा फोन होतोच. न्यू हायड्रो चा मोहन चोळकर, फास्टोचे उदय मराठे, विंडसरचे अनेक इंजिनियर्स यांच्याशी दोस्ती होत गेली. फास्टोचे MD सुमंत सर तर मला लहान भाऊच म्हणायचे. त्यांना ड्रिंक्सचा जबरी शौक होता. मी आलो की, घरी फोन करून सांगायचे राजेश आला आहे अन मला म्हणायचे, तुझं नाव सांगितलं की बायकोला माहित असतं, नवरा चांगल्या संगतीत आहे. कॅटइंजिनियरिंगचे पालेकर. त्यांच्या पत्नि, सविता वहिनी चहा नाश्ता करायच्या.तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं. अहो या सविता (की सरिता) पालेकर म्हणजे सचिन तेंडुलकरच्या सख्ख्या भगिनी. मला हे त्यांच्याशी ओळख झाल्यावर बरेच दिवसांनी कळलं. सुहास पालेकरांचं अन माझं फार काही जमलं नाही. अन्यथा सचिनला एकदा दर्शन दिलंच असतं माझं. एकदा गोवा हायड्राॅलिक्स मधून फोन आला एका application संदर्भात. परिकर म्हणून होते. तेच आजचे गोव्याचे मुख्यमंत्री. एक ना अनेक. मी या कंपनीत पहिला मोबाईल कसा घेतला हा एक क़िस्सा आहे. 

इकडे कंपनीत ही बरंच चाललं म्हणायचं. इंजिनियर म्हणून stepping stone नोकरीला वापर करून २-३ वर्षात बाय करायच्या विचारात असणारा मी ६ वर्ष झाली तरी हलायचं नाव घेत नव्हतो. Sales, Marketing या functions ची चांगलीच ओळख झाली. Foreigners येत जात असल्यामुळे आणि बोनीमुळे इंग्रजी बोलण्याचा सराव झाला. आता मी hydraulic seals चं ट्रेनिंग द्यायला भारतात जाऊ लागलो. संजीव अन बोनीचं इंग्रजी ड्राफ्टींग उच्च दर्जाचं होतं. दररोजच्या official कामात मी involved नसलो तरी त्यांची official letters माझ्यापर्यंत यायची अन मी ती बारकाईनं वाचायचो. ७०० स्क्वेअर फुटच्या डिकन्सन रोडच्या छोट्या आॅफीसपासून सुरू केलेला प्रवास आता ५५०० sqft चं जयनगर चं अलिशान आॅफीस अन २५००० sqft ची बनरगट्टा रोडचं mfg unit पाशी आला होता. आणि त्या सगळ्यांचा मी साक्षीदार होतो. 

१ आॅगस्ट २००२ ला नोकरीचा राजीनामा दिला. संजीव अन बोनीला सांगितलं की आता spindle repair चा छोटासा का होईना, स्वत:चा बिझीनेस pursue करतो.  पण नंतरच्या माझ्या स्वत:च्या बिझिनेसमधे स्थिर स्थावर होण्यात रोलाॅनच्या ८ वर्षाच्या नोकरीचा सिंहाचा वाटा हे निसंशय. ते पण पक्के व्यावसायिक होते. साल्यांनी ८ वर्षात विचारलं नव्हतं, काय म्हणतोय बिझीनेस. २५ सप्टेंबरला बंगलोरला निरोपसमारंभ झाला. संजीव म्हणाला "I was risking by hiring Rajesh as resident engineer which was relatively new concept then. But I am happy that he proved, my decision was not wrong." मला पण बोलायला सांगितलं. 

सालं कुणाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना माझा घसा का दाटून येतो़ हे एक न उलगडलेलं कोडं आहे. बोनीने माझ्या पाटीवर थोपटलं. सगळ्यांशी हस्तांदोलन करून मी निरोप घेतला............मुकपणे

Saturday 11 October 2014

History of Germany

काल जर्मन इतिहासावरचे म्युझियम बघितले. फार जुना नाही, साधारण दुसर्या महायुद्धापासून.

फोटो १: बाँब, अजूनही सापडतात. हा नुसता नमुना. युद्ध बेकार बरं का. परत होऊ नये बुवा.

फोटो २: हिटलर रस्ता हे नाव काढून नवीन नामकरण. हिटलरचं नामोनिशाण नाही आहे म्युझियम मधे.

फोटो ३: युद्धात आईवडिलांपासून हरवलेल्या मुलांच्या मुलाखती. कोण, कुठला. Tracing service. जर्मन भाषा कळत नाही पण तरीही गळा भरून येतो, धूसर दिसतं. १९४५ साली इतकी effective service दिली की ५०००० मुलांपैकी फक्त ४०० मुलं अनाथ राहिली.

फोटो ४: जे म्हणायचं ते फोटोत लिहीलं आहे. युद्ध स्य कथा रम्यं, म्हणजे दुसर्याच्या.

फोटो ५: पश्चिम जर्मनीला मदत म्हणून मार्शल प्लान. अमेरिकन एकदम येडे नाहीत बरं का. इराक़, अफ़ग़ानिस्तान फसलं तरी कुठेतरी बरोबर पडले आहेत त्यांचं दान.

फोटो ६, ७: हा इंस्ट जर्मनीचा स्टालीन प्लान. विचार स्वातंत्र्याची गळचेपी. रणगाडे घातलेत अंगावर. आणि पुढचा फोटो. जर्नलिस्टची कमाल. पुस्तकात कॅमेरा ठेवून फोटो काढलेत अन जगासमोर आणलेत अत्याचार.

फोटो ८: १९५४ मधे फ़ुटबॉल वर्ल्ड कप मधे जर्मनीची हंगेरीवर २-० अशा पिछाडीवरून ३-२ अशी मात. युवकांमधे नवचैतन्य. विकसित देश होण्याची सुरूवात. फोटो, त्या वर्ल्ड कप च्या मेडल सेरेमनीचा.

फोटो ९: Economic miracle strengthens the political stability.

फोटो १०: बीटल्स, जगात सगळ्यात जास्त विकली गेलेली कार (असं ते म्हणतात, मला टोयोटाची करोला वाटते) औद्योगिक क्रांतीची सुरूवात

फोटो ११:  election voting turn out : 90% अबबब! वर्ष: १९५७ आँ

फोटो१२: अपोलोने चंद्राहून आणलेला दगड.

फोटो १३: Economic growth and prosperity must not be persued at the cost of environment.

फोटो १४, १५: बर्लिन वाॅल जमीनदोस्त. इंस्ट जर्मनीतून आलेल्या कुटुंबाची ही कार. दोन देशांच्या लोकांचे मीलन. हर्षोल्लास, आनंद, लोकांच्या डोळ्यातून पाणी. आणि डोळे पुसणारा मी.


Friday 10 October 2014

ते आणि आपण

आता हा फोटो पहा. तुम्ही म्हणाल की काय हा येड्यासारखे विचित्र फोटो लावतोय. इतकं फोटोजेनिक आहे जर्मनी. पण मी काय बोलतो याच एकदा. मी इथल्या डोंगराचे, बागांचे, तळ्याचे फोटो लावले तर मजा नाही येणार. तुम्ही स्वत:च अनुभवा, इथल्या वीजेचा कल्पक वापर, स्वच्छता, अत्याधुनिक तरीही निसर्गाच्या बरोबर. युरोप अनुभवावाच. नाही म्हणजे सिंगापूर,चीन, थायलंड, हे पण चकाचक देश पण युरोपची अकृत्रिमता नाही तिथे. एखाद्या घरी पाहुणे यायचे म्हंटले की आवराआवरी होते आणि एखादं घर कधीही जा स्वच्छंच, हाच फरक. रस्त्यावर झाडाचा पालापाचोळा असतो, तो कुणीही साफ नाही करत, पण प्लास्टीकची पिशवी शोधून सापडणार नाही रस्त्यावर. कोकच्या बाॅटल्स, बियर कॅन्स कचरापेटीत, दररोज सकाळी ५ वाजता साफ होणार्या. माझा एक मित्र आहे पुण्यात. कारमधे बसून बियर प्यायची फार हौस. प्या हो, पण कुणी बघत नाही आहे हे बघून बियर कॅन रस्त्यावर कुठेही फेकणार आणि दुसर्या दिवशी शहाणपणा रामटावत  पुणं किती घाण आहे ते बोलणार. (मुख्य म्हणजे हे विस्थापितच आहेत, कुठुन ते सांगितलं तर हसाल तुम्ही) जेव्हा आपल्याला कुणी बघत नाही असं असताना आपण जसे वागतो ते खरं वागणं. मोदींच्या स्वच्छता अभियानाला पुर्ण पाठिंबा. बाकी tv कॅमेरासमोर मानभावीपणे झाड़ू मारणार्या लोकांनी सांगावं की ते बोलले "सखुबाई, आज आराम कर जरा, मी झाड़ू मारतो". असो, बरंच विषयांवर झालं. 

तर हा पहिला फोटो आहे माझ्या रूमसमोर असलेल्या पेट्रोल पंपच्या दरपत्रकाचा. डिझेलचा भाव १.३० युरो. लोकसभा निवडणुकीच्या आधी फेसबुक आणि WhatsApp वर आंतरराष्ट्रीय अर्थकारण यावरचा गाढा अभ्यास असलेली विद्वान मंडळी इतर देशात पेट्रोल अन डिझेल किती स्वस्त आहे याचा मेसेज हिरीरीने एकमेकांना forward करत होती. हा दर डिझेलचा जर्मनीतला, १.३ युरो म्हणजे तब्बल १०९ रू लिटरला. अशीच गत पेट्रोलची पण आहे. आतासुद्धा ७५ पैसे पेट्रोल स्वस्त झाल्यावर सरकारचे गुणगान गाणारी मंडळी डिझेल de control होऊन त्याचा भाव खाली वर होणार  आहे हे लक्षातच घेत नाही. थोडक्यात काय तर इंधनाचा भाव वरखाली होणं याला फक्त सरकार जबाबदार आहे (थोडंसं असेलही पण रूपयात एखादा पैसा) या गैरसमजुतीला फारकत द्यावी असं मला वाटतं. मग ते आधीचं ममो चं सरकार असो की नमोचं. आणि जर कुणी दावा करत असेल की सरकारमुळे भावात चढउतार होतो तर समजा तो फेकतोय. 

हा दुसरा फोटो आहे दिल्ली विमानतळावरचा. नितांत सुंदर विमानतळ. आपलं मुंबईचं विमानतळही झकास झालं बरं का. त्यावरून आठवलं मुंबईच्या जुन्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरच्या देशातून आलो की बेल्टवर लगेज घ्यायला थांबलो की पॅ असा आवाज करून तो बेल्ट बंद पडायचा. अन मग कुठुनतरी आवाज यायचा "welcome to India" नज़र वळवली की हे देशीच बेणं. कुठल्यातरी परदेशी माणसाचं हास्य बघून परत अत्यंत लोचट, बुळबुळीत हास्य तोंडावर आणणार. मीच चुकीचा असेल, पण मला त्यांचा भयंकर राग यायचा. आता तो घाणेरडा प्रकार बंद. असो. तर फोटो आहे चार्जिंग स्टेशनचा. काही पिन्स व्यवस्थित होत्या, पण बहुतांश चार्जिंग स्टेशनवर samsung च्या पिना नव्हत्याच. म्हणजे तोडून नेल्या होत्या. आता विचार करा, या पिना काय तुटायची गोष्ट आहे का? हे कुठल्यातरी बिनडोक माणसाचं काम. असं मुर्खासारखं  वागायचं अन परत आलं की म्हणायचं Welcome to India. 

मित्रांनो, काय आहे ज्या गोष्टी तुमच्या आमच्या नियंत्रणात आहेत त्या आपण ठेवू अन ज्या नाहीत त्याच्यावर कुठं शायनिंग टाकायची. 

Sent from my iPad

Tuesday 7 October 2014

।।ओम हृषाय नम:।।

हा डाॅ. हृषीकेश कुलकर्णी, म्हणजे जगभर त्याला आता या नावाने ओळखत असावेत. पण बी जे त ल्या कुणाला तुम्ही विचारलं, या नावाचं कुणी माहित आहे का, तर मोठं प्रश्नचिन्ह दिसेल. त्यांची बायको प्रज्ञा ही बीजेचीच आहे, पण ती सुद्धा सटपटेल दोन सेकंद.

 तेव्हा हा हृष्या, माझ्या बायकोचा, वैभवीचा जवळचा मित्र. (बीजे मधील सगळेच लोकं एकमेकांचे जवळचे मित्र असतात).

एका कार्यक्रमात मी हृष्याची वाट पाहत होतो, म्हणजे तो त्याच्या मित्राशी (अर्थातच जवळच्या) बोलत होता. मी नेहमीप्रमाणे भोचकपणे त्यांचं बोलणं ऐकत होतो.

हृ: कसा आहेस?
मि: मस्त मजेत.
हृ: कुठं रहायला
मि: अरे, पौड रोड वर ते हाॅस्पिटल आहे ना, त्याच्या बाजूला मंदिर आहे...........
हृ: (मधेेच) अरे, असा मंदिरात का राहतोस, फ्लॅट वैगेरे घ्यायचा ना
मग दोघांच्याही खळखळून हसून एकमेकांना टाळ्या. "तु यार बिलकुल बदलला नाही" वैगेरे (बीजे च्या डाॅक्टर्स चं हे एक वैशिष्ट्य, ते कितीही म्हातारे झाले तरी बदलत नाही)

जर्मनीत जायचं हे ठरल्यापासून वैभवी म्हणत होती, हृष्या कुठे आहे ते बघ. मला वाटत होतं, तो म्युनिकला आहे. तर तो Bad Homburg म्हणजे मी जिथं होतो, तिथून ३० किमी वर. येतो़ म्हणाला भेटायला ४ वाजता. म्हंटलं ये मजा येईल.

४:३० वाजता आला. मग sorry, उशीर झाला वैगेरे. वेळेचं अन माझं फार काही सख्य नसल्यामुळे मला काही फार वाईट नाही वाटलं, किंवा रागही नाही आला. खरंतर मनातून बरंच वाटलं. प्रज्ञा, त्याची बायकोपण आली होती. (ती लग्नाआधी त्याची मैत्रीण होती, अर्थातच जवळची. हे शेवटचं. ती बहुतेक अजूनही त्याची मैत्रीणच आहे, असं वाटलं. ती हृष्या ला अजूनही हृष्याच म्हणते. हृष किंवा नुसतं हृ नाही).

गप्पा चालू झाल्या. पुण्याचे हालहवाल विचारले. (खरंतर हालंच). वैभवी अन पोरांची चौकशी झाली. मग तो म्हणाला "तुझी हरकत नसेल तर जेवायला जाऊ यात जवळंच" आता हे काय विचारणं झालं. आम्ही तिघं रेस्टाॅरंट कडे चालू लागलो.

आणि मग हृष्याने तो प्रश्न विचारला "हे स्पिंडल म्हणजे काय असतं बुवा" यातून एक अर्थ असा निघतो की असा कुठला दिव्य item आहे की धंदा करून तुला फेसबुकवर लिहायला वेळ मिळतो. पण मी वाईट विचार झटकले.असा चान्स कोण सोडणार? ही डाॅक्टर मंडळी अगम्य शब्दात आपल्यासमोर मेडिसीन या विषयाबद्दल बोलत असतात. काहीच कळत नसतं. त्याचा राग मनात होताच. खरंतर एखादा डाॅक्टर यांत्रिकी विषयाबद्दल आत्मीयतेने बोलतो हे मुळात संघातल्या माणसाने गांधीजीबद्दल आदराने बोलण्याइतकं दुर्मिळ आहे. (जर्मनीत बसून लिहीत असल्यामुळे हिटलर-ज्यू, किंवा ओबामा-पुतिन अशा आंतरराष्ट्रीय उपमा सुचत होत्या. पण मेरा भारत महान आणि परत निवडणुका) पण मग spindle बद्दल सांगून त्याला पकवून टाकलं.

बोलता बोलता हाॅटेल आलं. (रेस्टाॅरंट लिहीलं की आधी उडपी लिहीलं आहे असंच वाटत राहतं). साग्रसंगीत जेवण झालं. बिलही आलं (हे कशाला). ते आल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर गुणीले ८४ करून आँकड़ा नाचू लागला. भारतात मी बिल देण्याचा अभिनय तरी करतो. इथं तोही प्रयत्न केला नाही. उगाच हृष्याची परीक्षा कशाला? (खरंतर हे विधान अमेरिकेत गुणीले ६० किंवा तैवान मधे गुणीले ३ असं निर्लज्जासारखं लिहू शकतो).

परत येताना प्रज्ञाने, हृष्या माझ्या लिखाणाचा fan आहे असं सांगितलं होतं. परत हृष्याने पण त्याबद्दल एकदोन स्तुतिपर वाक्य बोलून मला कुरवाळलं होतं. मग दुसर्या दिवशी WhatsApp वर हा फोटो पाठवला. खरंतर हा तो फेसबुकवर टाकू शकत होता. पण माझ्या लक्षात आलं आधी कुरवाळून हा फोटो पाठवणे म्हणजे छू: म्हणण्यासारखं आहे. मी हृष्याला मनोमन दाद देत कुईकुई करत हा लेख पुर्ण केला.

।।ओम हृषाय नम:।।


Saturday 4 October 2014

एक कथन सामान्य अभियंत्याचं

तुम्हाला माहिती आहे, माझ्या कारकिर्दीला ३० sept ला २५ वर्षं पूर्ण झाली. (आम्हाला कसं माहिती असेल भैताडा. तू काय सचिन तेंडूलकर आहेस, पेपर मध्ये बातमी यायला). १ सप्टेंबर १९८९ ला या अभियंत्याने हातात Allen Key, Spanner, Screw Driver अशा आयुध्यांचा सेट घेतला (अगदी bat, racket किंवा ball च्या धर्तीवर). आणि तेव्हापासून आजतागायत त्यांनी साथ सोडलेली नाही. मध्ये मग Laptop, मोबाईल, i पॅड हि शस्त्रात्रही दिमतीला आली. ह्या अडीच दशकांच्या कारकिर्दीचे मुख्यत: तीन टप्पे पडतात. (१०००० आणि ९९९९९ दोन्ही पाच आकडी पगार. तेव्हा फक्त पाच आकडी पगार म्हणायचं. तसंच दशक, शतक हि उगाच अर्थाला वजन प्राप्त करतात.)

१९८९-१९९४: SKF India Ltd.

बजाज औरंगाबाद ने लत्ताप्रहार केल्यावर मी नोकरी शोधत भिरभिर फिरत होतो. बाबांनी शब्द टाकला आणि SKF कडून एक वर्षाची GTE Apprentice पदरात पाडून घेतली. (बाबांनी तसे शब्द कमी टाकले, पण जेव्हा टाकले, आयुष्याला वळण मिळाले इतकं नक्की). आपलं पाहिलं प्रेम (माझं ते हि शेवटचं ठरलं), पहिली नोकरी नेहमीच प्रिय  असते. तशीच माझी SKF ची नोकरी. पहिल्या आठवड्यात प्रोडक्शनच्या मशीन सेटर ने मला सांगितलं "ए, जा, स्टोर मधून O ring घेऊन ये" मी विचारलं "ओरिंग च spelling काय" तर सगळ्या लोकांना बोलावून सांगितलं "बघा आजचे इंजिनियर, येड्यांना O ring म्हणजे काय ते माहित नाही". एका मशीनचं मेंटेनन्स चं काम चालू होतं, मी थोडं डोकं घालून काय चालू आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत होतो, तर एक सिनीयर फिटर "ए, बाजूला हो. च्यायला एक वर्षासाठी येतात, अन डोकं पकवून टाकतात" एकदा मला एका क्वालिटी इन्स्पेक्टर ने सांगितलं " 6219 च्या १०० outer rings, groove dia साठी चेक करून ठेव" दोन एकशे ग्रामची एक रिंग, पंजात घेऊन apparatus वर फिरवायची. २०-२२ रिंगात हात दुखायला लागले. एक भला माणूस म्हणाला "तुझी फिरकी घेत आहेत, बंद कर हे काम आणि जा जेवायला". अशा भल्याबुर्या घटनांनी अडखळत सुरू झालेल्या नोकरीत मी रूळलो. अजय नाईक, मकरंद महाजन, संजीव गोयल हे इंजिनियर मित्र आणि working associates यांच्या मदतीने हा चिखलाचा गोळा चाकावर फिरू लागला. मुर्ती, विकास, सराफ, हेक्टर, सोरघडे अशी सिनीयर सुपरवायजर, पांडू भोसले, शिरसकर, राव, बी आर पाटील या सेटर मंडळींनी या गोळ्याला थापायला सुरूवात केली. मशीनवरून हात फिरायला लागला, तशी ती माझ्याशी बोलू लागली. मला हे झालं, असं कर म्हणजे production व्यवस्थित येईल असं सुचवू लागली. विश्वास बसला, मग आत्मविश्वास आला. काही सिनीयर लोकांना मी त्याचं काय चुकते ते सांगू लागलो. वाद व्हायला लागले. एकदा असाच वाद झाल्यावर एक सेटर बोलला "इथे भेटलात, वर नका भेटू" मी बोललो "कसं भेटणार, तुम्ही स्वर्गात, मी नरकात" त्याला काय बोलावं ते कळलंच नाही.

खरंतर SKF चे अनंत किस्से आहेत. सगळे लिहायचे म्हंटलं तर पाच-सहा पानं होतील. पण एक नक्की, ग्रह, तारे एकदम जोरात होते. नाहीतर जाॅब allocation च्या दिवशी टीआरबी ला जा असं सांगून, परत बोलावून, नाहीतर असं कर डीजीबीबी ला जा हे सांगणं. (TRB ला पोरं तीन महिन्यापेक्षा जास्त टिकत नसत). GTE ना सहसा एक वर्षात बाय बाय ही तिथली प्रथा. पण मी आणि संजीव गोयल GTE चे कंपनी ट्रेनी झालो.  ते होताना सोमण साहेब म्हणाले, मी तुला प्लानींगला घेतो. मी तिथं टेचात बोललो "मला प्रोडक्शन मधेेच काम करायचं आहे" म्हणालो ते ठीक आहे, ते मान्य ही होणं. १८ आॅगस्ट १९९१ ला माझा साखरपुडा झाला, मी कंपनी ट्रेनी, म्हणजे confirmed जाॅब नाही. अशा वेळेस पाटील साहेबांनी बोलावून सांगायचं की "Management has decided to curtail your training period by 13 months" मी आणि तिघं १ आॅगस्ट १९९१ पासून कन्फर्म होणं. (कुणी याला वैभवीचा पायगुण ही म्हणतात). मी TQ नावाच्या लाईनवर काम करत होतो. Advanced मशीन्स, ट्रायल प्रोडक्शन पासून मी involve होतो. एकदा कंपनी हेड ग्रेस्कोव्ह (बहुधा पोलिश असावेत) लाईनवर आले आणि काहीतरी इलेक्ट्रानिक वस्तु तोंडासमोर धरून प्रश्न विचारू लागले. मला वाटलं की चांगलं काम करतोय म्हणून फोटो काढत आहेत. नंतर कळलं, माझी उत्तरं रेकाॅर्ड करून घेत होते. (९२ साली हे जरा अभिनवच). फाटलीच होती. अजय, मक्या आणि गोयलबरोबर सेकंड शिफ्टला येऊन रात्री १ वाजता केलेली  प्राईडची आॅम्लेट अन बियरची (तेव्हढेच परवडलं) बॅचलर पार्टी त्यांच्या लक्षात नसेल, पण माझ्या आहे.

SKF ची गाथा एम जी चव्हाण, ए बी पाटील आणि शिदोरे साहेब यांची नावं न लिहीता पुर्ण होणं निव्वळ अशक्यच. सहा महिन्यापूर्वी MGC कंपनीत आले तेव्हा पोरांना त्यांची ओळख करून देताना मीच गदगद झालो होतो.

निव्वळ स्वप्न वेगळी बघितली म्हणून SKF चा जाॅब ३१ आॅगस्ट १९९४ ला सोडला. बारक्याच होतो, त्यामुळे सेंड आॅफ वैगेरे झाला नसावा, पण शेवटच्या दिवशी एकटाच स्कूटरवर आसवं ढाळत परत घरी आलो होतो.

आजही कुठल्या कंपनीत गेलो की SKF मधे यायचा तसा कुलंटचा वास आला की मी तो केवड्याचा सुवास घ्यावा तसा भरून घेतो आणि त्या पहिल्या नोकरी च्या प्रति कृतज्ञेतीची भावना अंगभर सरसरत जाते.

तळटीप: खूप नावं सुचत आहेत, पण जागे अभावी लिहीता येणं अवघड आहे.