Monday 10 November 2014

पराशर-एक अनुभव

काल गेलो होतो मनोज हाडवळे यांच्या पराशर रिसोर्ट ला. कंपनीची ट्रीप घेऊन. २१ जण होतो. गेल्या गेल्या स्वागत झालं पार गंध आणि फुलांचे हार वैगेरे घालून. फ्रेश होऊन गोंधळाचा घाट घातला होता. भगवान काटे म्हणून कलाकार होते. असली संबळ घुमवली त्यांनी कि आमचे पोट्टे सगळे नाचायलाच लागले. लोक कला काय झिंग आणू शकते याचा जिवंत अनुभव घेतला. खूप आरडाओरडा हि केला. मनोज, त्याचे सहकारी  आणि आजूबाजूची झाडी यांनी आम्हाला सहन केलं. रसरशीत रात्रीचं मासवाडीचा जेवण  केलं. जेवणाचा दर्जा "अत्युत्कृष्ट" या सदरात मोडणारा.  रात्री कॅम्प फायर आणि त्याभोवती आमची सगळी पोरं कोंडाळ करून बसली. एकेकाला कंठ फुटायला लागला. नागेश, इरफान, मिलिंद, अनिल, गणेश आणि मी सुद्धा, आम्ही खूप गाणी म्हंटली.

सकाळी उठून टेकडीवर चढायला गेलो. बरोबर विकास होता रिसोर्ट चा. त्याने लिंबू सरबत घेतलं होतं कॅन भरून. वरती महादेवाचं मंदिर होतं. दर्शन घेतलं. समोर दर्गा होता. तिथे कपाळावर गंध लावलेला माणूस, अगदी बजरंग दलाचा सदस्य वाटत होता, दुकान लावून बसला होता. आम्हाला म्हणाला "दर्ग्याच दर्शन घ्या." आम्ही गेलो. स्वच्छ होता. एक बाई डोक्यावरती ओढणी घेऊन प्रार्थना करत होती. कपाळावर टिकली होती. तिचा नवरा दर्ग्यातल्या बाबाशी स्वच्छ मराठीत बोलत होता. मी पण दर्ग्याला नमस्कार केला. परत आलो. परत येताना आमच्या कार सिंगल रस्त्यावरून येत होत्या. एक सायकलवाला आणि नंतर मोटर सायकलवाला समोरून आले. दोघंही बाजूला उभे राहिले. आमच्या ५ कार जाईपर्यंत.

मिसळीचा नाश्ता झाला. मग टीम बिल्डींग च्या activities. आम्ही ट्रेनर नेला होता. मनोज चा हि माणूस होता. एकमेकांची चेष्टा करत, गप्पा मारत तीन तास कसे गेले कळलेच नाही. मी पोरांना अन मुलं मला मित्रच समजायला लागले होते.  परत भूक लागली. कदाचित खूप oxygen शरीरात गेल्यावर भूक लागत असावी. मी निष्कर्ष काढला.

आणि मग पुन्हा एकदा झकास जेवण जेवलो. दुपारी सव्वा ते दोन मनोजशी अन त्याची बायको नम्रता यांच्याशी गप्पा मारल्या. कृषी पर्यटन, अखिल भारतात असलेली ४५०० पेक्षा जास्त कृषी सेंटर आणि त्याचा पर्यटनासाठी वापर, शेती कडे इंडस्ट्री म्हणून बघण्याची गरज, शेतकर्याच्या मुलाला दुसरा शेतकरीच मुलगी देत नाही, ते बदलण्याची सामाजिक गरज अशा विविध विषयावर मनोज कुठलाही अभिनिवेश न बाळगता बोलत होता. मागेच त्याचं पुस्तकाचं rack बघितलं. व्यवस्थित मांडली नव्हती, पण बर्याच विषयांवरची बरीच पुस्तकं होती. त्याने मलाही पुस्तक भेट देण्याच्या लायक समजलं.

परत आमच्या काही activitiesझाल्या. साडेतीन वाजता  निघायची वेळ झाली. खूपच साधं ठिकाण, अत्यंत साधी लोकं.मनोज, त्याची बायको नम्रता आणि त्यांचे सहकारी. कुठेही  भपका नाही. मनोजला मी मिठी मारून त्याचा निरोप घेतला. तेव्हा मला एका अकृत्रिम स्नेह जाणवला, इतका कि लेख चालू करताना अहो जाहो करणारा मी आता अरे तुरे पर्यंत आलो.

निघालो पण का कुणास ठाऊक, मला विचित्र वाटत होतं. काहीतरी या रिसोर्ट मध्ये कमी आहे. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.

वाटेत चहाला थांबलो.कार चालू केली  कारच्या सायलेन्सर ला नाक लावलं. कार्बन डाय oxideछातीत भरून घेतला. तिथून निघालो. कासारवाडीला गळ्यात सोन्याचा गोफ घातलेला, पांढरा शर्ट वाला गॉगल धारी, माझ्या कारसमोर आडवा आला. त्याने माझ्या आईबापाचा उद्धार केला. मी पण त्याच्या अन माझ्या देहयष्टीचा अंदाज घेऊन यथाशक्ती शिव्या घातल्या. दापोडीच्या पुढे एक मुस्लिम तरुण सिग्नलला माझ्याकडे द्वेषाने बघतो आहे असं मला त्याच्याकडे द्वेषाने बघताना जाणवलं. आम्ही कारमधील तिघं जण बालगंधर्व समोरच्या शेट्टी च्या हॉटेल मध्ये रात्रीचं जेवण केलं. भात खात होतो तेव्हापासून हॉटेलच्या manager ने पुढचं गिऱ्हाईक आमच्या डोक्यावर आणून ठेवले. ते आम्ही जेवण कधी संपवतो हे आशाळभूतपणे पाहत राहिले. जेवण झाल्यावर तेलयुक्त पंजाबी जेवणाचा ढेकर दिला.  आज सकाळी कंपनीत आलो. कस्टमर ला खोटी आश्वासनं दिली. कंपनीतल्या पोरांवर डाफरलो. फेसबुकवर शहाणपणा करत एक पोस्ट टाकली. दोन चार दीड शहाणपणाच्या comments टाकल्या. आपल्याच प्रतिमेला घट्ट चिकटून बसणारा शहरी माणूस झालो. आताकुठे मला जे काल विचित्र वाटत होतं, ते कमी झालं.

पण मला  अजूनही मनोज आणि नम्रताच्या पराशर रिसोर्ट मध्ये काय कमी आहे हे कळलेलं नाही आहे.

बघा, तुम्हीच एकदा तिथे भेट द्या आणि शोधा याचं उत्तर. आणि सापडलंच तर मलाही सांगा.

पराशर-एक अनुभव


No comments:

Post a Comment