Sunday 30 March 2014

वारे

आज सिंहगडावर जरा लौकरंच गेलो, साडेपाच वाजता सकाळी. सात वाजता खाली उतरताना अचानक समोरून एक परिचित चेहरा आला. नीट बघितल्यावर लक्षात आले अरे हे तर आपले BJP चे उमेदवार श्री अनिल शिरोळे. घामेघूम झाले  होते बिचारे. बरोबरचे एक जण म्हणाले "शिरोळे साहेब खास आपल्याला भेटण्यासाठी सिंहगडावर आले आहेत." नमस्कार झाला, मग मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. ते म्हणाले तुमचं तर मत हवंच पण मित्रांनाही सांगा. मला त्याक्षणी निर्भय, शरद, अविनाश आणि आनंद नरारे यांची फार आठवण आली. मनात म्हणालो तुमचं माहीत नाही पण तुमच्या नेतृत्वाचं कर्तृत्व मला भावत नाही (कसला सभ्य आहे ना मी). पण तोंडदेखलं हसलो आणि मार्गस्थ झालो.

फेसबुकवर वाचल्यामुळे का काय माहित आजकाल माझ्या राजकीय भावना फारच उचंबळून येतात. आणि मग मी उतरताना या उमेदवारांचा विचार करू लागलो. नैसर्गिकरीत्या पहिला विचार आला युवा तडफदार नेते राजकारणातील डेविड बेकहम, विश्वजित कदम यांचा. परत ते काँग्रेस चे, म्हणजे आपली एकदम आवडती पार्टी. अस्मादिक GPA मधून DME झाल्यावर (कसलं हार्वर्ड मधून MBA झाल्यासारखं टेचात लिहिलं आहे ना!) पिताश्रींना त्यांच्या चिरंजीवा बद्दल फारच विश्वास वाटू लागला आणि मग आम्हाला graduate engineer करण्याच्या मोहिमेवर ते लागले. COEP ला admission मिळणे हे दुरापास्त होतं. MIT कॉलेज मध्ये ₹ १५००० भरण्याची तयारी नसल्याने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर मी आणि बाबा, सांगली चे SE श्री गायकवाड साहेब यांच्याबरोबर भारती विद्यापीठ येथे धडकलो. हो नाही करता, काही डोनेशन न भरता तिथे admission मिळाली. तेव्हा पंजावर शिक्का मारून या ऋणातून उतराई व्हावं कि काय या विचारात मी गड उतरू लागलो. पण एकंदरच वातावरण बघता हे काही योग्य वाटेना. मनमोहन सिंह यांचे आपण fan आहोत. पण त्यांची पण सद्दी संपली आहे सध्या.

अशा विचारातच मी भूतकाळात गेलो. दिनेश च्या दुकानात सोमवार पेठेत.  त्या STD बूथ मधून माझे देशभरचे फोन व्हायचे. दिनेशची आई म्हणजे माउली च. माझ्यावर फार जीव. तिथे बसलो असताना दाढीधारी युवक आला. मावशींच्या पाया पडला आणि स्टूल वर बसला. मावशीनी ओळख करून दिली "ए दीपक, हे मंडलिक, engineer आहेत. लैच काम करत असतात." थोडाफार बोललो. आणि तो युवक गेला. मावशीनी विचारलं "ओळखलं का" मी नकारार्थी मान हलवल्यावर म्हणाल्या "ते दीपक पायगुडे, नगरसेवक आहेत. झळकणार बघ राजकारणात" मग त्यांनी दीपक कसा दिलदार आहे वैगेरे सांगितलं. मला फारच भारी वाटत होतं तेव्हा. शिवसेनेतून ते आता म न से त आले. पण काय करणार राज साहेबांचे विचार काही आपल्याला झेपत नाही.

अशा विचारातच घरी पोहोचलो. सिंहगड साथीदार वैभव जो घरातली कामंही करतो तो चहा पिउन खोली झाडू लागला. मी वैभव ला म्हणालो " तू आतली खोली झाड आणि मला दुसरा झाडू दे कारण आता मी सुद्धा झाडू हातात घ्यायची वेळ आली आहे" अशा रीतीने हातात घट्ट झाडू धरून मी घर साफ करू लागलो. मनात मात्र राजकारणाचे "वारे" खेळत होते.



Saturday 29 March 2014

आकडा

दोन दिवसामागे एक पोस्ट लिहिली आणि त्यात १३ नंबर चा उलॆख झाला. आणि मग त्या नंबर शी निगडीत वेगवेगळ्या गोष्टी आणि इतर देशातील काही नंबरची अंधश्रद्धा हे पण कळले. त्यावरून आठवलं कि माझं आणि आकड्याचं बरंच सख्य आहे. लहानपणापासून मला फिगर चा फारच नाद आहे. (please विनोद नको). एक वेगळाच छंद होता मला, गाड्यांच्या नंबर प्लेट वर २ सारखे नंबर असतील तर त्यांची बेरीज करायची आणि मग add करत जायचं. त्याने माझी बेरीज करण्याची practice फारच जोरात होती. (डॉक्टरांची practice जोरात असते, वकिलीची practice जोरात असते. माझी काय तर बेरीज करण्याची. बोंब च आहे) वाहनांचे नंबर तर अगदी पाठ असायचे. नितीन ची ७४४५ कब, राजेशची ७१७८ ची सुपर, निघोटची ३१७९ सुझुकी, प्रताप ची ९९ सुझुकी हे गाड्यांचे नंबर आजही २५ वर्षानंतर मुखोद्गत आहेत. फोन नंबर ला मी डिरेक्टरी कधी वापरलीच नाही. सगळे डोक्यात. २**५६२१० गोडबोल्यांचा, २**१११७१ कुलकर्ण्यांचा हे आज मला २० वर्षानंतर हि पक्के लक्षात आहे. असाच आमचा पहिला फोन BSNL नि ३६२४३६ नंबरचा दिला होता. तो मिळाल्यावर घरातील लोकं फारच गोरेमोरे झाले होते आणि मग तो चेंज करून ३५८४३६ असा करून घेतला. असो.

खरं तर शाळेत असताना जीवशास्त्र (जीव घ्यायचा हा विषय), रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि नंतर आयुष्यात नागरिकशास्त्र शिकता शिकता अर्धमेला झालेलो मी, आधुनिक अशा संख्या शास्त्रावर (numerology you know) अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. (वास्तू शास्त्र हा एक मला अगम्य विषय आहे. आग्नेय ला किचन आणि काय काय, डोक्यावरून जातं माझ्या). पण एकदा मी ट्रेन नि कानपूर ला चाललो होतो. डब्यात एक जळगाव ला माणूस चढला. अमन त्याचं नाव. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला म्हणाला "तुमच्या आयुष्यात २ आणि ४ या फिगर ला फार महत्व आहे." आता त्याला काय सांगावं कि मला कुठली फिगर……. (पुन्हा, please विनोद नको).

मग मी विचार केला

२४: माझा वाढदिवस (महिना लिहित नाही, नाहीतर तुम्ही सगळे गिफ्ट घेऊन हजर व्हाल.)
२: लग्नाची तारीख (**************ditto************************)
२ : मोठया मुलाचा वाढदिवस  (समजून घ्या. आता परत नाही ते वाक्य )
११: १+१=२: छोट्या मुलाचा वाढदिवस
४: बायकोचा वाढदिवस
४: लहान भावाचा वाढदिवस
२४: लहान भावाच्या बायकोचा वाढदिवस
१३: १+३: ४: सख्या चुलत भावाचा वाढदिवस
२४: सख्ख्या चुलत बहिणीचा वाढदिवस
२२: २+२=४: बिझिनेस पार्टनर चा वाढदिवस
२८/०८/२००२=२+८+८+२+२=२२:२+२=४: बिझिनेस ची मुहूर्तमेढ
४ मजला: पहिलं घर
flat no १३: १+३=४ राहतं घर
९८२२४५४२०४=final आकडा ४: माझा मोबाईल नंबर

बास! थांबतो. खूपच बोर झाले असाल. तुम्हाला वाटेल आता काय खानदान काढतो काय हा बाबा. पण कसल्या आणल्यात ना ओढून ताणून २ आणि ४ आयुष्यात. मी त्या ट्रेन मधल्या अमनला मनोमन नमस्कार केला. पण तुम्हाला ह्या २ आणि ४ नंबरचा अजून एक सॉलिड योगायोग सांगतो. मला २ मुलं. बायको १, पण २-४ जणी ना भारी पडेल. आणि सगळ्यात मी स्वत: एकटा पण सभ्य भाषेत, twin personality चा अन खाष्ट भाषेत दुतोंड्या. परत २.

आता एवढा फिगर चा अभ्यास झाल्यानंतर रतन खत्री ची लाईन पकडायचा मला अनावर मोह होतो. आणि मग उदयाला ओपन ला आणि क्लोज ला कुठली फिगर, २ कि ४, लावायची याचा विचार करत झोपी जातो. numerology आणि माझा तेव्हढाच काय तो संबंध.

तरी नशीब हे numerology वाले भानामती वैगेरे करत नाहीत, नाहीतर कुठलीच, २ आणि ४ काय,  शिल्पा शेट्टीची पण फिगर आठवणार नाही अशी करणी केली असती……………

आता २ नंबर शी इतका संबंध आलाच आहे तर दोन नंबर चे धंदे करावेत का?  

Saturday 22 March 2014

आवाहान केजरीवालांच्या अरविंदांना

माझे बाबा (लता बाईंचा लेख चालू झाला असं वाटतंय ना!) MSEB मधे होते. त्यांचे एक चीफ़ इंजीनियर साहेब होते, देशपांडे. अतिशय कर्तव्यदक्ष. सचोटी ची तर मिसाल होती. घरच्या कामासाठी कार वापरली तर treasury मधे पैसे जमा करत असं सांगायचे बाबा. खरं खोटं देव जाणे बुवा!

तर एकदा रास्ता पेठला संप झाला होता काही मागण्यांवरून. यूनियन चे लोकं भले दंगा घालत होते. कुणी साहेब आला की १/२ किमी आधी त्याला अडवायचे, गाडीतून उतरावयचे, आणि सांगायचं "चालत जा" साहेब लोकं पण मुकाटपणे चालू लागायचे. कुणी सांगितली झंझट.

देशपांडे आले त्यांच्या ambassador मधून. शिरस्त्याप्रमाणे गाडी लोकांनी गाडी अडवली. सांगितलं "साहेब, उतरून पायी जावं लागेल" ते म्हणाले "का"?

लोकं: आदेश आहे
दे: कुणाचा?
लोकं: लीडरचा (भाऊला हात वैगेरे)
दे: लीडर तुमचा, मी का ऐकू? आणि शासनानं मला शासकीय कामासाठी वापरायला दिलेली ही गाडी आहे. त्या योगे मी आॅफीसच्या पोर्च पर्यंत जाणं अपेक्षित आहे, तेव्हा मी उतरेल तर तिथंच. तुम्ही बघा काय करायचं ते!
लोकं: साहेब, बाकीचे लोकं गेलेच की चालत
दे: बाकीच्यांनी शेण खाल्लं, मग...........
लोकं: जावं तर तुम्हाला चालंतंच लागेल
दे: फायनल का तुमचं

जमावाकडून होकार आल्यावर देशपांडे ड्रायव्हर ला म्हणाले "विष्णु, कमीशनर आॅफीसला गाडी घे"

साहेबांनी कमिशनरांना परिस्थिती सांगितली आणि सांगितलं की मी सच्च्या दिलाने काम करणारा माणूस आहे पण या पोस्टच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असं कुणी वागणार असेल तर ते चालणार नाही. कमिशनर देशपांडेंची सचोटीची ख्याती ऐकून होतेच, त्यांना माहिती होतं नाणं खणखणीत आहे. त्यांनी रास्ता पेठेत १४४ क़लम लावला. कुमक पाठवली आणि देशपांडेंना सांगितलं "जा सर तुम्ही, बिनधोक" दोघांनीही एकमेकांना सलाम ठोकला, कडक.

देशपांडे साहेब कारनीच आॅफीसच्या दरवाजापर्यंत गेले आणि बॅग घेऊन जिना चढू लागले. पायी आलेले इतर साहेब लोकं त्यांना नमस्कार करू लागले आणि त्यांनी पण प्रतिसाद दिला, जणू काही घडलंच नाही अशा थाटात.
********************************************************************************

स्थळ: श्रुति मंगल कार्यालय. लग्नाचा कार्यक्रम. लग्नाला हज़र होते, शिवसेनेतुन काॅंग्रेसमधे गेलेले माजी मुख्यमंत्री. लग्न सोहळा संपला. मी गॅलरीत उभा. बघितलं तर साहेब ११८ NE तुन गेले, सगळ्यांचा निरोप घेत. आणि त्यांची दोन्ही मुले मर्सिडीज़ मधून निघाले सगळ्यांना टाटा करत, निरागसपणे. (लहान मुलं निरागसच असतात़, मी ती माझ्यासारख्याची किंवा नेत्यांची. गोची वय वाढल्यावर होते)

*********************************************************************************
तेव्हा अरविंद केजरीवाल साहेब,

एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला काही सोयी शासनानी दिल्या होत्या त्या आपला आदर राखायचा म्हणून
नाही तर पदाचा. आपण त्या अव्हेरल्या. पदावरून पायउतार पण झालात. (असेल ही काही तांत्रिक वा तात्विक कारण,
कुणास ठाव) आता लोकसभेला शड्डू ठोकून उभे आहात, तुमच्याकडे आम्ही एक सशक्त पर्याय म्हणून बघत आहोत. कुचकामी शासक आणि छुप्या अजेंड्याचे विरोधक यात आम्ही पिचलो गेलो आहोत. आणि भावलं आम्हाला तुमच्यतलं सच्चेपण,अगदी देशपांडेंसारखंच. पण हे सच्चेपण अधोरेखित करण्यासाठी तुम्हाला ह्या शासकीय सोयी नाकारण्याची काहीच गरज नव्हती. शेवटी राज्याचा शकट हाकणं ही काही तोंडची गोष्ट नाही हे कळतं आम्हाला. आतासुद्धा तुम्ही ही रिक्शानी प्रवास करण्याची, लोकलनी लोंबकळण्याची भंकस नका करू. तीसुद्धा आम्हाला राणे आम्हाला येडे बनवून गेले, तशीच वाटते आम्हा सामान्यांच्या डोळ्यावर केलेली धूळफेक.  (लिहीण्याच्या भरात नाव लिहून गेलो का नेत्याचं, काही हरकत नाही).

आपण IIT यन आहात, सुज्ञ आहात, तेव्हा जास्त सांगणे न लगे. बाकी आमच्याकडे एक वाक्य प्रचलित आहे "क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे". जमतय का बघा तेव्हढं .

तुम्ही आम्हाला वारे दिलेत, ते आमचं मत वार्यावर न जाऊ द्यायचं बघा बुवा!

- राजेश


Thursday 20 March 2014

आबा आणि नातू

माझ्या वडिलांचे निधन २००९ साली झाले. नील चा जन्म २००४ चा. पण ५ वर्षात दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. बाबा गेल्यानंतर पुढच्या ६ महिन्यात नीलचे काही विचार पहा ५-६ वर्षाचाच होता तो. ती निरागसता हलवून टाकते, अगदी आतून. 


बाबा गेल्यानंतर साधारण ३/४ महिन्यांनी आई सोसायटीत खाली गप्पा मारत बसली होती. तिच्याबरोबर कवूर काकू आणि शिंदे काकू बसल्या होत्या. दुर्दैवाने कवूर काका २००४ साली तर शिंदे काका फार पूर्वी expire झाले होते. माझा धाकटा मुलगा नील, त्यावेळेस ५ वर्षाचा होता, खाली त्यांच्याच आजू बाजूला खेळत होता. खेळता खेळता तो अचानक आजी जवळ आला आणि म्हणाला "पण हे असं का होतं, देव सगळ्या आबांनाच देवाघरी का घेऊन जातो"
********************************************************************************
माझे लग्न ९१ साली झाले. त्यावेळेस video cassette असायची. मला अचानक सापडली. मी तिला DVD मध्ये convert करून घेतली. मी, वैभवी, यश आणि नील माझ्या laptop वर तो कार्यक्रम बघत होतो. २०१० साली. आणि बाबा आले स्क्रीन वर. नील अचानक उठला आणि "आजी आजी" करत तिला ओढत घेऊन आला, म्हणाला "बघ, आबा बघ, आता खुश, आता रडू नकोस"
********************************************************************************
एकदा रात्री बेडरूमच्या खिडकीशी उभे राहून नील समोरच्या बिल्डींग कडे बघत होता. मी विचारले "काय रे काय बघतोस" म्हणाला "मी समोरच्या मोबाईल tower वर चढणार" म्हंटलं "का" म्हणाला "तिथून आकाश किती जवळ आहे" "मग?" "मग काय, मला आबांना भेटता येईल ना" मी निशब्द

********************************************************************************
मी चेन्नई ला चाललो होतो. नील नी विचारलं "पप्पा, विमानानी जाणार" मी म्हणालो "हो" नील परत "विमान खूप उंच ढगातून जाते का" मी bag भरत त्याच्याकडे लक्ष न देता "हो" थोडा वेळ गेला. माझं लक्ष गेलं तेव्हा नील शून्यात नजर लाऊन बसला होता. मी विचारले "विचार कसला करतो आहेस" माझ्या जवळ आला आणि म्हणाला "तुम्ही एक काम करा. विमान उंच ढगात गेलं कि खिडकी उघडा, बाहेर जा, आबांना घ्या आणि विमानात बसवा आणि त्यांना घेऊन या."!!!!
********************************************************************************


शरद पाटील च्या पोस्ट नि आठवणी जाग्या झाल्या आणि मनभर पसरून राहिल्या.

Wednesday 19 March 2014

काय बोलणार

आज प्रात:समयी उठणे झाले. मुखासमार्जन करून फेसबुक प्रेरित दुचाकी सवारी साठी बाहेर पडलो. दुचाकी वर मांड ठोकून स्वारी मोठया तडफेने खडकवासला धरणाच्या दिशेने निघाली. का कोण जाणे आज दुचाकी जरा फुदकतच चालली होती, जणू दुडका घोडाच. मजल दरमजल करत मी सिंहगड हमरस्त्यावर आलो. आणि ताशाच्या आणि ढोलच्या मंजुळ आवाजांनी माझ्या कानांच्या पडद्यांना गुदगुल्या होऊ लागल्या. तेवढयात माझ्या नजरेला ते विहंगम दृश्य दिसले. एक low waste jeans, चट्ट्या पट्ट्याचा t शर्ट, पायात पांढऱ्या रंगाचे sports shoes, आणि spikes केलेली केशरचना केलेला मावळा हातात मशाल घेऊन धावत येताना दिसला. नजरेचे पारणे फिटले. भरीस भर म्हणून काय त्याने डोळ्यावर काळा गॉगल घातला होता. अजून खरं तर उजाडायचे होते पण पालित्याचा प्रकाश बहुधा त्याच्या डोळ्यांना त्रासदायक होत असावा.

त्या मावळ्याच्या मागे स्वयंचलित दुचाकी स्वार होते. दुचाकीचे आवाजशमन यंत्र काढून टाकले होते. त्यामुळे एकाच दुचाकीतून शेकडो घोडे फुरफुरल्याचा (खिंकाळण्याचा) स्फूर्तीदायक आवाज येत होता. ते बघून मला फारच चेव चढला आणि मी जोमाने धरणाकडे कूच करता झालो.

मार्गक्रमण करता करता हे दृश्य थोडया फार फरकाने पुन्हा पुन्हा दिसू लागले. मी पण फुरफुरतच होतो. असाच नव्या दमाचा गडी असल्यागत जात असता समोरच्या स्वयंचलित चारचाकीच्या (याला छोटा हत्ती असेही म्हणतात) टपावरील मावळ्याने आवाज टाकला "ओ चड्डीवाले काका, सायकल चालवा, इकडं तिकडं काय बघताय" बाकीचे मावळे फुसफुसले. मी आपलं ऐकून न ऐकल्यासारखं केलं (मी फारच sensitive माणूस आहे हो! पुढं काय होईल हे मी sense करतो) आणि थोडया कमी चेवाने दुचाकीची मांड फिरवत निघालो.

काही अंतर पुढं गेल्यानंतर माझे कान सावध च होते, कानावर आलेले न ऐकण्यासाठी. तरी आलाच आवाज "ए नरसाळ्या, हाण कि जोरात सायकल" परत फुसफुसणे. यावेळेस कान पुन्हा बंद पण नजर गेलीच भावडयावर (भा  व  डया, नीट वाचा. नाहीतर म्हणाल तिथं गप्प बसलो आणि इथे शिवी देऊन शहाणपणा ………………… गाळलेली जागा आपापल्या कुवती प्रमाणे) तर हसायलाच आले. उघडया मैदानावर भावड्या झोपला असता ना तर बरगड्या बघून आकाशातल गिधाड आलं असतं. मनोमन विलक्षण………. छे संतापून काय करता, म्हणून हसतच पुढे गेलो.

पुढचा प्रवास फारच निरस झाला. म्हणजे कंपू येत होते पण दुर्दैवाने कानावर काही पडलं नाही. माझी मग धरणाला वळसा घालून परतीच्या प्रवासाची दौड चालू झाली. (येताना दुचाकी हातात घेऊन पळत निघालो असं काही चित्र डोळ्यासमोर आलं का?).

वेगवेगळे मावळे चित्र विचित्र वेशभूषेचे, अर्वाच्य भाषेचे यांना कानात शिसे ओतत आणि डोळ्यावर पट्टी बांधत मागे टाकत होतो. पण पुढे जाताना छाती गर्वानी २ इंच (दोनच फक्त, तेव्हढीच होते) फुगली होती. गर्व से कहो हम………… अरे बघता काय सामील व्हा आणि मनात दाटून आला अभिमान मराठी असण्याचा.

(एका महापुरुषाची दोनवेळा  जयंती साजरी करण्याची एकमेवद्वि तिय घटना या पृथ्वीतलावर फक्त महाराष्ट्रात होत असेल याचा मला सार्थ अभिमान आहे )









Tuesday 18 March 2014

रस्ते

रस्ते


रस्ते असावेत प्रशस्त, अगदी broad minded म्हणावेत तसे. इतका  प्रशस्त कि वेगवेगळ्या गाड्यांना सामावून घेणारा असावा रस्ता.

रस्ते असावेत सपाट, खड्डे, खाचखळगे यांनी भरलेले नसावेत. पण अगदी गुळगुळीत पण नसावेत. (गाडी लैच सटकते).

आखीव रेखीव असावेत. एकमेकांना धक्का बुक्की न करता, गाड्यांना आपापल्या कुवती प्रमाणे पुढे मागे जाता यावे.

दमछाक करणारी चढण नसावी. म्हणजे मी असं म्हणत नाही कि अजिबात च उतार चढाव नको म्हणून. पण गाड्यांची जीव काढणारी नसावी.

योग्य  त्या ठिकाणी दिव्यांनी प्रकाश द्यावा, रस्त्यावर.

सफर झाल्यावर आंबू नये माणसांनी, थकून भागून. सहर्ष उत्सव व्हावा प्रवासाच्या शेवटी.

कोण म्हणतंय रे

जसे रस्ते……………तसा देश


Saturday 15 March 2014

Branding


साधारण ९४-९५ ची गोष्ट असेल. कंपनीत तेव्हा डॉट matrix प्रिंटर असायचे. कोणत्या document ची कॉपी काढायची असेल तर बाहेर दुकानात जाऊनच आणावी लागायची. बंगलोर ला माझ्या MD च्या केबिन मध्ये मी, MD संजीव आणि अमेरिकन डग ग्रेग. डग मला म्हणाला "get me photocopy of this document" मी पेपर हातात घेऊन त्याच्या तोंडाकडे पहात राहिलो "अं" संजीव च्या लक्षात आलं, म्हणाला "Rajesh, please get Xerox of this" मी सुटकेचा निश्वास टाकला.

*********************************************************************************

हॉटेल कुठलं ते आठवत नाही पण छोटंच गाव असावं. मी वेटरला "जरा मिनरल water देना" वेटर "साब, नाही है" मी म्हणालो "मतलब"
तो "सर जो आप बोला वो नही है, लेकिन बिसलेरी है" आणि आणून दिलं भलतंच बालाजी किंवा तत्सम

*********************************************************************************

मी भारताच्या अग्रगण्य tractor manufacturer मध्ये फोन केला. तेव्हा हे आजच्यासारख रेकॉर्डेड मेसेज नव्हते. मंजुळ आवाजाची स्त्री असायची त्या बाजूला. मी फोन लावल्या लावल्या, ती वदली "tractor" मी विचारले "महिंद्रा tractor" ती म्हणाली "ya! tractor"

असा confidence पाहिजे नाही. साला tractor म्हणजे महिंद्रा.

*********************************************************************************

एकदा मुंबई हून taxi ने पुण्याला येत होतो. (तेव्हा ते कुल कॅब चं घरच्यांना काय कौतुक. आई अगदी आवर्जून कुणाला तरी निमित्त काढून सांगायचीच "राजेश येतो आहे मुंबई हून कूल कॅब नि). मी समोर बसलो होतो. मागे एशियन पेंट्स चे मार्केटिंग चे उच्च पदस्थ बसले होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. मी मधेच विचारलं "सर, हे तुम्ही पेंट चं नाव tractor का ठेवलं" (आठवलं का एशियन पेंट्स चं tractor नावाचं पेंट). तर तो अधिकारी म्हणाला " त्याचं असं आहे मित्र, आम्हाला भारताचं रुरल मार्केट capture करायचं आहे. आणि ग्रामीण भागात tractor म्हणजे घरात बरकत आहे. आम्हाला ते पकडायचं, म्हणून आमच्या नव्या प्रोडक्ट चं नाव तेच, tractor. " मी अवाक.

*********************************************************************************

टाटा सुमो launch झाली तेव्हा या कानाने ऐकलं "टाटाची JEEP बघ"

*********************************************************************************

जेफ बरोबर discussion करत होतो. event management ची कंपनी शोधत होतो. जेफ सहज पणे म्हणाला "google it"

*********************************************************************************

आता ज्यावरून हे सगळं आठवलं तो ताजा ताजा किस्सा. अगदी सोळा आणे खरा.

काल आमच्या नागेश चा तैवान visa चा online फॉर्म भरत होतो. मेल चा column  आला.

मी: नागेश, मेल वापरतोस.

नागेश: अं, काय म्हणालात सर?

मी: अरे, तुझा e mail आहे का?

नागेश: नाही सर, माझा g mail आहे.

मी एकटाच त्याच्याबरोबर केबिन मध्ये हसू आवरत.

*********************************************************************************

Branding असं असतं राजा!!!!!

Friday 14 March 2014

Datt

चित्रपटाची संहिता/पटकथा चांगली असेल तर पात्र कुणीही रंगवले असेल तर शक्यतो जमून जाते. आता बघा ना जिंदगी ना बनेगी दोबारा मध्ये कतरिना सुद्धा कसली उच्च दर्जाची अभिनेत्री वाटते. एवढंच कशाला त्या फरहानची spanish girl friend हि आपल्या लक्षात राहते. लगान मधील कचरू आणि पार म्हातारे झालेले ए के हंगल हि विसरू म्हणता विसरत नाही आपण. स्वदेस मधील बल्ब पेटल्यावर आनंद झालेली म्हातारी विसरू शकतो का आपण?. ३ idiot मधील प्रत्येक charectar मनात घर करून राह्ते अगदी मिलीमीटर सकट.

हे असं असताना मुन्नाभाई MBBS  किंवा लगे रहो मुन्नाभाई सारख्या तगड्या संहिता असताना विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांनी लीड actor म्हणून संजय दत्त याची का निवड केली असावी बरे! म्हणजे त्याच्या जागी अगदी कोणीही खपून गेला असता. बरं हि दोघंही जर हुशार आणि सेन्सिबल मंडळी वाटतात. म्हणजे यांना कुणी असं सांगत नाही का कि "अरे हा संजय दत्त चालू माणूस आहे. शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या एका मोठया conspiracy चा तो एक भाग आहे. त्याच्या नका तुम्ही नादी लागू" विद्या बालन किंवा ग्रेसी सिंग कशा intelligent बायका वाटतात. त्यांना म्हणावसं नाही वाटत का "हा माणूस असेल तर मी त्याच्या गळ्यात पडणार नाही" मला आठवतंय, लहानपणी मी एका मित्राबरोबर दुकानात गेलो होतो ज्याने काही दिवसांपूर्वी त्याच्याच घरात २-३ रुपयाची चोरी केली होती. मी त्याच्याबरोबर गेलो म्हणून बंबाच्या लाकडाने बदडला होता मला माझ्या आईने. मग हे चोप्रा आणि हिरानी सारखी विचारवंत मंडळीचं  संजय दत्त बाबत विचार करताना यांच्या बुद्धीचं दही होत नाही का? फारच बाळबोध प्रश्न आहेत, पण आज गप्पा मारताना उपस्थित झाले खरे.

Monday 10 March 2014

मुश्ताक भाई

सध्या आमच्या engineering industry मध्ये तथाकथित recession चालू आहे. पण काही कंपन्या अशा असतात ना कि तिथे मंदी, recession वैगेरे शब्द अस्तित्वातच नसतात. अशीच एक कंपनी माझ्या जवळची मुश्ताक भाई यांची महाराष्ट्र इंजिनीअर प्रायवेट लिमिटेड.

नाही, पण असं काय आहे ना कि मी लिहावं मुश्ताक भाई बद्दल. अशा बर्याच कंपन्या असतात कि ज्यांचे मालक हरहुन्नरी असतात, खूप शिकून सवरून आपापल्या परीने व्यवस्थित मार्केटिंग करून कंपनीचा डोलारा सांभाळत असतात. गम्मत खरी इथे आहे. मुश्ताक भाई फक्त चौथी पास आहेत. १९८९ साली फक्त रु ५००० भांडवलावर (ते पण उधारीचे) एक लेथ घेऊन धंदा चालू केला. स्वत: काम आणायचे, स्वत:नीच करायचे आणि स्वत: डीलीवरी देऊन यायची. पण धडाडी, कल्पकता, हुशारी या जोरावर मुश्ताक भाई आज जवळपास १०० लोकांना सांभाळतात. त्यांचं अदयावत (CNC) अशा मशिन्सची भलीमोठी कंपनी आहे. म्हणजे जवळपास ४० VMC/ HMC आणि turning centers, २ भल्यामोठ्या VTL, ३ जिग बोरिंग, २ grinding मशिन्स, १ CMM  असा भला मोठा पसारा आहे. माझ्या Engineers नसलेल्या मित्रांना कदाचित याचा अंदाज येणार नाही, म्हणून मी जरा पैशाच्या हिशोबात सांगतो. त्यांचा साधारण रु १० कोटीचा वर्षाचा लेबर चा टर्न ओवर आहे. म्हणजे with material जर म्हणायचे झाले तर रु २५ कोटी फक्त.

इंग्रजीचा गंध नाही. पण आज देश विदेशात त्यांच्या इथून material supply केले जाते. स्वत: मुश्ताक भाई जर्मनी, फ्रांस, बेल्जिअम, सिंगापूर या देशात जाऊन आले आहेत. काही नाही,एक इंग्लिश येणारा मित्र घ्यायचा आणि जायचे. २-४ कोटीच्या मशिन्स घेऊन यायच्या.

आणि माणूस स्वभावाला एकदम दिलदार. पोरांना भारीच सांभाळतात. "माणसं टिकत नाहीत" वैगेरे फालतू complaints त्यांच्याकडे चालतच नाहीत. एकदा माणूस लागला त्यांच्याकडे कि त्यांचाच. आणि का नाही हो. वसंत म्हणून हुशार operator. वयाच्या २२ व्या वर्षी मुश्ताक भाई कडे लागला. आज वसंत जवळपास २० वर्ष आहे त्यांच्याकडे आहे, आता सुपरवायझर झाला आहे. wagon r मधून फिरतो. निलेश आहे, मी १२ वर्षापूर्वी त्याला बघितलं तेव्हा एक सुपर वायझर होता (डिप्लोमा आहे तो). आज अख्खी factory सांभाळतो. मुश्ताक भाई पण त्याला i २० देताना कचरत नाहीत.

मुश्ताक भाई, स्वच्छतेचे एकदम भोक्ते. factory तर एकदम कडक पण बघण्यासारखी त्यांची केबिन. भपका नाही पण सुबक. आतच फ्रीज. भरलेला. स्वत: चहाचे आशिक. पण पाहुण्यांनी शब्द काढावा आणि मुश्ताक भाई दोन मिनिटात हजर करणार. कोल्ड ड्रिंक, ice टी. लेमन टी, कॉफी आणि बरोबर बिस्कीट. crockery पण दर्जेदार. engineering industry चालवतात पण कायम पांढरा शर्ट, तो पण परीटघडी चा. आयुष्यभर हात काळे केलेल्या माणसाचं हे पांढऱ्या रंगाचं प्रेम मला कायम अचंबित करत आलं आहे.

व्यसनं पण केली, अतिरेक हि झाला पण धंद्यावर कधी आच नाही येऊ दिली. ५ वर्षापूर्वी हाजी झाले. सगळी व्यसनं सोडून दिली. आता बाह्य रूप तर स्वछ आहेच पण तब्येत हि बढीया. हात मिळवला कि कळतं, हा कुणावर पडला तर काय हाल होतील ते. सामाजिक कार्यातही पुढे. कायम त्यांच्या कडे मदत मागायला लोकं असतात आणि मी त्याच्यात पडत नाही पण कळतं कि कुणी त्यांच्या केबिन मधून रिकाम्या हातानी जात नसावा.

मला नेहमी म्हणतात "च्यायला, मी तुझ्यासारखा शिकलेला पाहिजे होतो" मी म्हटलं "कशाला, बिझनेस प्लान, sales forecast, cash flow याचा अभ्यास करता करता चाचपडत राहतो मी आणि ३-४ लाखाचं equipment आणेपर्यंत तुम्ही ३०-४० लाखाचं मशीन घेऊनही आले असता". ७-८ वर्षापूर्वी मला म्हणाले "हि वेब साईट काय भानगड आहे रे" मी समजावलं. निलेशला बोलावलं "काही नाही महिन्याभरात आपली वेबसाईट पाहिजे." तीन आठवडयातच मला बोलावलं. दाखवली "कशी आहे www.maharashtraengineers.com" मी चाट. सहा महिने माझी साईट develop करायला घेतलेला मी, तीन आठवड्याची करामत बघून चकित झालो होतो. थोडे काही suggestions दिले आणि म्हणालो "साईट चं नाव फारंच मोठं झालं हो. upload झाली आहे का?" म्हणाले "काय, mepl.com करू" ४ दिवसात www.mepl.com.

आजही  मुश्ताक भाई सकाळी ९ वाजता कंपनीत हजर असतात, रात्री साडेआठ वाजेपर्यंत जी तोड काम करतात. बरोबर दुपारी २ वाजता घरून आणलेला डबा खातात. कधीही त्यांना भेटायला गेलो कि त्यांच्याकडे वेळ नाही असं नाही. ते केबिन मध्ये आपल्याशी बोलत असतात. आणि कुठल्याही कस्टमर चा फोन आला तरी त्यांना कुठल्या मशीन वर जॉब चं काय operation चालू आहे हे मुखोद्गत असतं. मार्केटिंग, production, बिझिनेस development, finance अशी विविध department पुस्तकी पद्धतीने हाताळणारा मी मुश्ताक भाई ना observe करत असतो, एखादा IIM चा विद्यार्थी मुंबई च्या डब्ब्यावाल्याचा अभ्यास करतो तसा.

(लेखातील नावं बदलली आहेत, पण मागे लिहिल्याप्रमाणे कुणाला असेच मुश्ताक भाई भेटले तर तो योगायोग समजू नये. कारण असे मुश्ताक भाई जागोजागी सापडतात आणि माझ्यासारख्या मरगळलेल्या जीवांना उभारी देत असतात) 

Saturday 8 March 2014

अ………ज्ञानी

परवाच मोबाईल फोन घेताना विविध मॉडेल compare करत होतो. आणि लक्षात आले कि कसला  ढ आहे ना मी. technical specification चा काहीच गंध नव्हता. पुढे जाऊन असेही लक्षात आले कि अशी बरीच क्षेत्रं आहेत कि जिथे माझं ज्ञान अगदीच जुजबी आहे. अज्ञांनीच म्हणा ना!

ज्याची लाज वाटायला पाहिजे पण मुर्खासारखा अभिमान वाटतो अशी जागा म्हणजे स्वयंपाक घर. काही म्हणता काहीच जमत नाही. माझा मित्र विनय इतका भारी डॉक्टर पण काय जेवण बनवतो. चवीने आणि आश्चर्याने मी त्याच्या हातचं खाताना बोटं तोंडात घालतो. वैभवीच्या सगळ्या बहिणींचे नवरे हे अतिशय उत्तम  बल्लव आहेत. सागर, शिवकुमार, दिलीपभाई यांच्या या कलेची रसभरीत वर्णनं ऐकली कि तोंडाला तर पाणी सुटतच, पण डोळ्यातूनही. कारण साला मी त्यांच्या आसपासही फिरकू शकत नाही. (कांदा फारच तिखट आहे राव). (नाही म्हणायला मंडलिक परिवारात नाही बरं कुणी माणूस लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणारा. तेवढंच एक समाधान. थोडक्यात या क्षेत्रात आम्ही  खानदानी येडे आहोत)

दुसरं म्हणजे शेती. भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे फक्त पुस्तकातच. मध्ये अनिकेत दा कडे गेलो होतो मुरुमला. त्यांनी फारच प्रेमाने दाखवली त्यांची शेती. आणि हळूच विचारले "काही जमतंय का" बहुधा ताडलंच असावं कि बाबाला काही सुधरत नाही आहे. मी पण खालच्या मानेनं कबुली दिली "नाही बुवा"

दिवसभर जो laptop बडवत असतो, त्याचे specifications. LAN, Server या hardware चे features. अगम्य आहे हो सगळं. आणि त्यात परत software languages चा विषय निघाला कि लोकं मला हिब्रू भाषेबद्दल चर्चा करत आहेत असंच वाटतं. अहो  Microsoft Excel, काय भारी प्रकार आहे. पण CA जेव्हा प्रोजेक्ट report घेऊन येतो तेव्हा आ वासून सगळे formulas बघण्याशिवाय काही पर्याय उरतो का?

विमानं, rocket यांचा तर मी धसकाच घेतला आहे. मुलं पण आपला बाप engineer आहे असं समजून या विषयावर काही प्रश्न विचारतात, तेव्हा मी ऐकून न ऐकल्यासारखा करतो किंवा काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेतो. कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे हे सांगताना मात्र "this is not rocket science" हे मात्र आवर्जून सांगतो.

कॅमेरा, tv, फ्रीज या सगळ्या वस्तू घेताना लोकं किती चिकित्सक असतात. मी मात्र या गोष्टींचं selection छापा कि काटा या style नि च करतो. पण चेहऱ्यावर मात्र ज्ञानी भाव मात्र सोडत नाही हे सगळं करताना. तिथे एकदम जोरात.

राजकारण. काय पब्लिक ला मतं असतात ना. bjp, कॉंग्रेस, आप कसली बेफाम चर्चा चालते फेसबुकवर आणि काही मित्रमंडळी मध्ये. नाही म्हणायला मी पण एक अधून मधून वाक्य टाकतो पण त्यात काही जोर नसतो. (ते काहीही असलं तरी मोदी साहेब काही झेपत नाही बुवा आपल्याला) हे असलंच कंसातील. तेवढीच लायकी आपली.

आपली एक लई भारी थेअरी आहे. जे खूप लोकं घेतात, तेच आपण पण घ्यायला असं काही नाही. हा rule लावून मी २००० साली santro घेतली (तेव्हा santro च्या आकाराची फारच मजाक उडवत होते लोकं), माझ्याकडे tv आहे तो पण RCA चा (Radio Corporation ऑफ America) ऐकलं कधी, कार मध्ये पहिल्यांदा टेप लावला तो पण blaupunkt चा, नाव ऐकूनच लोकांनी नाक मुरडलं होतं. बर्याचदा बसला मटका जागेवर.

लोकांना किती माहित असतं. सुर्याखालील कुठलाही विषय घ्या, बाह्या सरसावून तयारच असतात authoritatively बोलायला. मी तर बाबा अस काही अतर्क्य आलं कि हळूच काढता पाय घेतो. आणि बरीच कारणं असतात नाही का. आजकाल मोबाईल फोन नि फारंच चांगली सोय दिली आहे अशा discussion मधून निघून जायला. (पूर्वी nature's call हे एकंच कारण असायचं) फोन आला म्हणून कानाला लावायचा आणि निघून जायचं. (एकदा मी अशीच acting करत निघालो कानाला फोन लावून बोलत, तेवढयात रिंग च वाजली फोनची)


तर असामी………… नाही नाही आसामी नाही तर चालू माणूस. Jack of all, master of none. (हे jack पेक्षा काही degraded version आहे का? फिट बसलं असतं मला). कुठल्याही क्षेत्रात असामान्य प्राविण्य न मिळवता जीवनाची नैया हाकणारा अ…………ज्ञानी असा सामान्य माणूस.

Tuesday 4 March 2014

It happens only in...........

खरं म्हणजे हा किस्सा मी लिहिणारच नव्हतो. पण डोक्यात फारच वळवळ चालू होती. तर विचार केला लिहूनच टाका.

तर झालं असं कि १५ दिवसांपूर्वी अस्मादिक दिल्ली हून पुण्याला येत होते. (कसलं भारदस्त वाटतय ना "अस्मादिक" आणि काय काय). विमान नागपूर ला थांबले. शेजारची तरुणी (पुढं वाचा, लागलीच "बर्या भेटतात शेजारी" असले विचार मनात आणू नका) आपल्या ४ वर्षाच्या कन्यकेला घेऊन उतरती झाली. माझी aisle ची जागा होती. नवीन प्रवासी येऊ लागले. कुतूहलाने मी माझ्या शेजारी कोण येतंय ते बघू लागलो.

तेवढयात आलीच, ती, डोक्यावरून ओढलेला घुंघट, हातभर बांगडया, आ तळहातकोपर्या पर्यंत पसरलेली मेहंदी (आसेतुहिमाचल या धर्तीवर) (आज काल "तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला" असलं गाणं कालबाह्य झालं आहे), गळ्यात दागिने अशी नवपरिणीत वधू. तिला खिडकीजवळच्या सीट वर जायचे होते. मुखदर्शन अपरिहार्य होते. रुपगर्विता जणू. म्हणजे अगदी ऐश्वर्या किंवा प्रियांका नाही पण परिणीती किंवा विद्या बालन पर्यंत. तिच्या मागेच तिचा नवरा होता. पण तिच्या मानाने काहीतरीच होता तो. म्हणजे अगदी उदय चोप्रा पेक्षाही बंडल. असं माझ्या मनात आलं. (आणि मग माझ्या लग्नाच्या वेळेस मला बघितल्यावर सोनईकरांच्या घरी कशी कुजबुज झाली ते जाणवलं. "डॉक्टर नाही तर, थोडा तरी उजळ बघायचा वैभवीने." काहीतरीच आहे हा आपल्या वैभूच्या मानाने" वैगेरे). आता मला वाटलं कि नवरदेव विराजमान होतील मधल्या सीट वर. पण नाही, मला मागे ढकलून, त्याने  त्याच्या वधूला आत जाऊ दिलं आणि त्या पाठोपाठ एक १४-१५ वर्षाचा बंड्या (बहुधा विद्याचा भाऊ असावा) मधल्या सीट वर विसावला.

मग उदय (हेच नाव ठेऊन देऊ) च्या मागे एक पगडी घातलेले वयस्कर गृहस्थ होते, त्यांना उदयनी aisle सोडून जी दुसरी रांग सुरु होते तिथल्या मधल्या सीट वर बसतं केलं आणि स्वतः त्या रांगेच्या aisle सीट वर बसला.

मला काही सुधारलं नाही. आयला हे नुकतंच लग्न झालेलं जोडपं पण असं वेगळं वेगळं का बसतंय. बरं असा विचार केला कि विमान उडल्यावर ताऊ जी झोपल्यावर विमानाचे लाईट बंद झाल्यावर बंड्या व उदय सीट exchange करतील आणि… बास (म्हणजे मी धुमारे उडवणं बंद करा म्हणतोय), तर तशीही काही शक्यता नव्हती. इनमिन १ तासाची फ्लाईट. फक्त उडताना आणि उतरताना लाईट बंद. ३०००० हजार फुटावर पोहोचलं कि विमानाचा ड्रायवर फुल उजेड पाडतो.

मागे एका पोस्ट च्या निमित्ताने विकास गोडगे आणि संतोष शेलार यांनी खूप कानपिचक्या दिल्या होत्या पण भोचक स्वभावाचा मी. एवीतेवी डाराडूर झोपणारा त्यादिवशी जागा राहण्यासाठी कॉफीचे  (रु ६०, तेवढंच daring आपलं) घुटके मारत हळूच उदय कडे बघत होतो. तर तो आपला विद्याकडे बघून स्मित करायचा आणि परत समोर बघायचा. विद्या पण बहुधा लाजून हसत असावी. ताऊ एव्हाना निद्रादेवीच्या आधीन झाले होते. मला राहवलं नाही, मी बंड्याला म्हणालो "तू उदयच्या सीट वर बस आणि त्याला इकडे बसू दे कि" तो म्हणाला "नाही जमणार". त्याचा कोल्ड response पाहून मी बंडयाला म्हणालो "एक काम करू यात, मी ताऊ जिच्या शेजारी बसतो, तू माझ्या जागी बस आणि उदयला ला विद्या शेजारी बसवू. म्हणजे ते काय करतात यावर तुला लक्ष पण ठेवता येईल." हे ऐकल्यावर बंड्याने तोंड वाकडं केलं आणि झोपल्याची pose घेतली.

मी विचार केला कि आता उदय ला च आपण proposal द्यावं. पण तो पठ्ठ्या विदयाकडे बघून मुरकं मुरकं हसण्यात इतका गर्क होता कि माझ्याकडे लक्षच देत नव्हता. एव्हाना ताउजी पण डोळे किलकिले करू लागले. शेवटी ठरवलं कि विदयालाच propose करावं कि…… अरे काही चुकली का वाक्यरचना! ठीक आहे जसा मी विचार सोडून दिला तसंच हे वाक्य पण सोडून देतो.

एव्हाना विमानाच्या ड्रायवर ने, यावेळेला बहुधा cleaner असावा, उद्घोषणा केली कि विमान थोडया वेळातच पुणे विमानतळावर (हवाई अड्डा, कसला भंगार शब्द आहे ना, अड्डा काय!) उतरणार आहे. बंड्याने पण झोपेचं सोंग बंद केलं. मी त्याला विचारलंच "का रे हलला नाहीस लेका" तर म्हणाला "जीजू नही आते थे, ताउजी जो साथ मे है!"

विमानातून खाली उतरलो. अजूनही बंड्या आणि विद्या बरोबरंच चालत होते आणि उदय ताउजीना पुणे विमानतळाची माहिती देताना दिसत होता. (सुखोई squadron बद्दल सांगत असावा)

मी अवाक. शप्पथ, कसले एकएक अनुभव येतात ना. ( माझ्या पोराला तर मी आत्ताच unwanted झालो आहे. ताउजी एवढा झालो  तर बरोबर प्रवास, आणि तेही लग्नानंतर लगेच, तर फार दूरचं, १०० मी च्या त्रिज्येत उभं राहू देणार नाही)


संभ्रम

दोन दिवसांपूर्वी चाकणला चाललो होतो. समोर एक सिक्स सीटर काळा धुर भकभक सोडत चालली होती. शेजारी अमन बसला होता. मी म्हणालो "कसलं विष ओकत आहे ना ही सिक्स सीटर". तर अमन म्हणाला " हमम…पण त्या रिक्शा ड्रायव्हरचं पोट आहे त्याच्यावर. त्याच्यासाठी अमृतंच ते"

खरं आहे "एकासाठी जे विष असतं ते दुसर्यासाठी अमृत असु शकतं"

गाणी बजावणी चालू असलेली वरात. जोरात आवाजाचा ब्रास बॅंड. कानाला प्रचंड त्रास. जे माझ्या कानाला बेसूर वाटतं ते त्या वाजवणार्याच्या घरच्यांना मंजुळ वाटत असेल कदाचित.

(खरं तर मला या प्रकारात त्या घोड्यावर बसलेल्या गाढवाचंच नवल वाटतं. या युगात त्याला आवडतं बरं हे सगळं नाटक करायला)

एक मजेदार किस्सा सांगतो. अमेरिकन जिम एकदा माझ्या घरी आला होता. गणपती होते तेव्हा घरात. दाराशीच बायकोने स्वस्तिक ची रांगोळी काढली होती. एकतर तो बूट घालूनच घरात शिरत होता. त्याला मी सांगितले जर बूट काढावा लागेल. विचित्र नजरेने बघत त्याने काढले बूट. आणि दरवाजातून आत शिरताना त्याला स्वस्तिक दिसले. पायाच्या अंगठ्याने स्वस्तिक ला स्पर्श करत त्याने विचारले "what is this?" जीवाच्या आकांताने मी ओरडलो "don't touch it with your feet" त्याने चमकून विचारले "why" मी म्हणालो "this is our sacred sign" जिम निर्विकार चेहऱ्याने म्हणाला "this looks similar to Hitler's Nazi sign. how is that this is your holy sign?"  माझ्याकडे उत्तर नव्हतं.

मला पवित्र वाटणारं दुसर्या कुणासाठी तिरस्काराचं कारण नक्कीच असु शकतं.

पथारी पसरून फूटपाथवर भाजी विकणारी आजीबाई आणि रेवड्याची हातगाडी ढकलत आणि शेजारीच चालणार्या त्याच्या चिमुकलीशी गप्पा मारताना जाणारा तो विक्रेता जेव्हा ट्राफीक जाम करत असतात़, तेव्हा मी पुर्णपणे संभ्रमात पडलो असतो.

कळतच नाही ना मी संभ्रमात आहे की कुठल्या..................भ्रमात.