Tuesday, 26 May 2026

काही वर्षांपूर्वीपर्यंत यशस्वी असण्याची व्याख्या फार सोपी होती. चांगलं शिक्षण घ्यायचं, डिग्री कमवायची, बरा पगार देणारी नोकरी शोधायची आणि आदर्शवादाची कास पकडून आयुष्य जगायचं. पण आता मात्र यशस्वी असण्याच्या शेकडो व्याख्या तयार झाल्या आहेत. 

काही मित्र मॅरेथॉन पाळतात, तर कुणी आयर्न मॅन बनतं, एखादा कुणी हिमालयन ट्रेक चा फोटो टाकतं (एव्हरेस्ट बेस कॅम्प), तर कुणी स्काय डायव्हिंग करतं. एखादा चुलत भाऊ खिद्रेश्वर, हम्पी पासून ते अंगकोर पर्यंत सगळी देवळं पालथी घालतो, तर एखादी बहीण तोफे सारखा कॅमेरा घेऊन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनते. एखादी मैत्रीण वयाच्या पन्नाशीला गिटार शिकते, तर मित्र अचानक बालीच्या समुद्र किनाऱ्यावर योग करताना दिसतो. ओह! गिव मी या ब्रेक. 

सोशल मीडिया उघडावं आणि वाटतं की सगळे कसलं भारी आयुष्य जगत आहेत. मी तर बघूनच डिप्रेस होऊन जातो. 

आणि कळत न कळत मनात विचार येतो, माझं काही चुकत तर नाही ना? मग वाटतं

अगदीच काही नाहीतर गेला बाजार भूतान ट्रिप तरी करू या का?  हिमालय नाही तर के टू एस तरी जमवू का? मॅरेथॉन नाही तर रेसकोर्स ला पाच चक्कर पळू का? लहानपणी तबल्याच्या क्लास लावला होता, तो छंद परत करून बघू का? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड खूप छान आहे असं ऐकलं आहे. प्लॅन करू का? जग ज्याची दखल घेईल अशी कोणती तरी गोष्ट आपल्या हातून घडेल का? 

यादी वाढत जाते. अन मनात प्रश्न येतो, कुठून घुसलं हे मनात की असं काही केलं तरच भारी आयुष्य जगल्याची भावना तयार होईल?

कधी एखादा मित्र म्हणतो "कुणी सांगितलं सकाळी चार वाजता उठून वाघ बघत फिरायचं?" तर दुसऱ्या मित्राला वाटतं की ताडोबा किंवा रणथंबोर माझं आयुष्य आहे. दोघेही बरोबरच आहेत. 

कदाचित एक शाश्वत सत्य आपण विसरत चाललो आहोत. मानव प्रजात ही एकाच गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी जन्माला आली नाही आहे. कुणाला काही अचाट करण्याची इच्छा असते, तर कुणाला ध्यानधारणा, कुणाला डोंगरात साद घालत फिरण्याची मनीषा असते तर कुणाला समुद्राची गाज ऐकत शांतते शी हितगुज करायला आवडतं, काहींना परदेश भावतो तर काहींना गावाकडे जाऊन विहिरीत पोहायला.आणि काहींची आनंदाची परमावधी घरात कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यात असते. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतपणे आनंदानुभव घेणं हा त्याचं प्रदर्शन मांडण्यापेक्षा जास्त किमती असू शकतो हेच आपण विसरून गेलो आहे. 

मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे ज्यांच्या बालपणी आनंदाच्या व्याख्या फार साध्या सरळ सोप्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फॉरेन किंवा काश्मीर ट्रिप नसायची तर कुठल्या तरी काका किंवा मामाकडे मुक्काम असायचा, टीव्ही किंवा थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघणे म्हणजे आनंदाची परमावधी, बाहेर जाऊन आईस्क्रीम खाणे म्हणजे एक सोहळा असायचा. अशा छोट्या गोष्टींमध्ये उत्सुकता असायची, अप्रूप असायचं कारण त्या दुर्मिळ होत्या. 

आता या गोष्टी होलसेल मध्ये उपलब्ध आहेत. 

कुठेही आणि कधीही फिरायला जाण्यासाठी अगणित पर्याय, अगणित करमणूक, अगणित माहितीचे स्रोत, अगणित अनुभव. 

इथे खरी मेख आहे. कोणत्याही गोष्टीचे अगणित पर्याय हा मानसिक थकवा आणतो. पर्यायांचा भडिमार म्हणजे असंख्य शक्यता. आणि या सगळ्या प्रकारात समाधानाऐवजी उरते ती चिंता, काळजी. 

यात गंमत अशी आहे की एकदा आपण हे सगळं करू शकतं अशी मनात भावना तयार झाली की या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला जबाबदार ठरवू लागतो. पण कुठलाही माणूस सगळ्याच गोष्टी करू शकत नाही. 

कुणी जगातले सर्व देश बघू शकत नाही. 
कुणी सर्व कला शिकू शकत नाही. 
कुणी सर्व खेळ शिकू शकत नाही.
कुणी सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकत नाही. 
कुणी जगातील सर्व आश्चर्य बघू शकत नाही. 
कुणी आयुष्य परिपूर्ण जगू शकत नाही. 

म्हणून मी बकेट लिस्ट या कल्पनेच्या विरोधात आहे. अँटी बकेट लिस्ट. 

आणि अँटी बकेट लिस्ट म्हणजे निराशावादी नव्हे, आळशीपणा पण नव्हे आणि कमी महत्वाकांक्षी असंही नव्हे. तर ती मुक्ततेची भावना आहे. अँटी बकेट लिस्ट म्हणजे सजगपणे हे ठरवणं आहे की मला समाधानी वाटण्यासाठी काय नाही केलं तर चालेल. 

मला त्या अनुभवांच्या पाठीमागे नाही धावायचं आहे. मला त्या अपेक्षाच ठेवायच्या नाही आहेत. माझं आयुष्य तुलना करण्यापासून मुक्त असणार आहे. 

कदाचित माझी अँटी बकेट लिस्ट मध्ये असेल 

- मला मॅरेथॉन धावणं गरजेचं नाही आहे 
- पन्नास देशांना भेट देणं हे माझ्यासाठी गरजेचं नाही आहे 
- सर्वच छंद मला यायला हवे हा अट्टाहास नाही माझा 
- मी छान जगतो हे मला जगाला ओरडून सांगायचं नाही आहे 
- मला येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं रूपांतर हे कन्टेन्ट मध्ये नाही करायचं आहे. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण "मला याची गरज नाही आहे" ही भावना "हे मला केलंच पाहिजे" पेक्षा खूप समाधान देणारी आहे. 

या तथाकथित प्रगत आयुष्याची एक शोकांतिका आहे. 

लोक एखाद्या सुंदर ठिकाणी फोटो काढण्यात इतकं मश्गुल होतात की तो अनुभव जगणं विसरून जातात. कुठलं तरी सुंदर निसर्गचित्र आपण मोबाईलच्या स्क्रीनद्वारे बघतो, सूर्यास्त आपला कंटेंट बनतो, कुठे आपण प्रवासाला निघालो तर त्याचा पुरावा होतो, सुट्टीचा आनंद लुटण्याऐवजी आपण त्याचं डॉक्युमेंट बनवतो. आणि या गर्तेत तो खराखुरा अनुभव हरवून जातो. 

कुणास ठाऊक पण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण  हे कधीही कुठेही अपलोड केले जात नाही, त्याचं प्रदर्शन मांडावं वाटत नाही आणि त्याचं दुसर्याकडून प्रशस्तीपत्र पण लागत नाही. तेक्षण  फक्त जगले जातात, अनुभवले जातात आणि आठवले जातात. 

अँटी बकेट लिस्टचा उद्देश खूप साधा आहे. त्याने आपल्याला आयुष्य आकसून घ्यायचं नाही आहे, पण स्वरचित दबावाला झिडकारून द्यायचं आहे, मिनिंगफ़ुल आयुष्यासाठी जागा करायची आहे, जे म्हणून शक्य आहे ते कारण्याऐवजी जे माझं आहे तेच आयुष्य जगण्याचा चॉईस आहे. 

कारण शेवटी समाधान कदाचित चेक बॉक्स टिक करण्यातून मिळत नसेल पण काही चेक बॉक्स पूर्णपणे दुर्लक्षित करण्यातून मिळेल. 

डॉ प्रसाद राजहंस   


Thursday, 21 May 2026

मागील आठवड्यात गोव्यात आमच्या इंडस्त्रीची कॉन्फरन्स अटेंड केली. काही डेटा पॉईंट्स सांगतो. 

उत्पादन क्षेत्राचं जी डी पी काँट्रिब्युशन हे गेली काही वर्षे १५-१७% टक्क्यांवर अडकलं आहे. मॅनेजमेंट मध्ये ग्लास सिलिंग इफेक्ट असतो. तसं उत्पादन क्षेत्र हे ग्लास सिलिंग ला जाऊन धडकलं आहे. भारताला तो सहभाग २५% पर्यंत न्यायचा आहे. पण काही बेसिक गोष्टी करण्यात अजूनही आपण चाचपडत असल्यामुळे ते १७% चं सिलिंग आपण तोडू शकत नाही आहे. ते तोडण्यासाठी त्रिमितीय जबरदस्त थ्रस्ट ची गरज आहे. 

जागतिक पातळीवर भारताकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक क्षेत्रातील बाजारपेठ म्हणून आणि जागतिक उत्पादन केंद्र म्हणून जगातले सगळे व्यावसायिक भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. आमच्याच क्षेत्राचा विचार केला तर जगातील सर्व देशात मशीन टूल या मदर इंडस्ट्री मध्ये घसरण चालू आहे. अपवाद फक्त भारताचा. जगात वर्षागणिक -३% अशी घसरण होत असताना भारतात मात्र पुढील दशकभर १०-११% ची वृद्धी अपेक्षित आहे. उत्पादन क्षेत्राची अनेक वर्षे वाहन उद्योगांच्या खांद्यावर होती. पण त्याबरोबरच आता एरोस्पेस, डिफेन्स, रेल्वेज, वूड इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग अशी अनेक क्षेत्रे उत्पादन क्षेत्र विकसित होण्यात हातभार लावणार आहे. 

या कॉन्फरन्स चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचा लक्षणीय सहभाग. ३००+ सहभागी झालेल्या व्यवसायिकांपैकी ४० एक जण हे २५ ते ३५ वयोगटातील होते. त्यापैकी बरेच जण हे परदेशात शिक्षण घेऊन भारतात व्यवसाय करण्यासाठी परतले होते. (बघता बघता मी ५८ वर्षांचा झालो आणि आतापर्यंत लोक "यंग इन्त्राप्रेन्युअर" उल्लेख करायचे त्या मलाच जाणवतं की आपली सद्दी संपली आहे 😊). फक्त एकच खुपलं की यात मराठी तरुण फार कमी होते. 

मला मराठी तरुणांना हे सांगायचं आहे की सामाजिक संवेदना आणि राजकीय विचारधारा जागृत असणं गरजेचेच आहे, पण त्याबरोबर तुमच्या करिअरला पण तितकंच महत्व द्या. भारतात पुढचं किमान एक दशक हे उत्पादन क्षेत्रात अनेक नवनवीन संधी आणणारं आहे, त्याचा फायदा घ्या. तुम्ही नोकरी करा वा व्यवसाय, उद्योजकीय मानसिकता अंगात बाणवून घ्या. आपल्या भवतालचं सोशल फॅब्रिक उसवण्याचं काम अनेक राजकीय एलिमेंट्स करत राहतील, त्यावर मात करत फक्त आपली भौतिक परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष द्या. राजकीय पक्ष तुमच्याकडे रेवड्या आणि चिंचोके टाकतील पण त्याचा उपयोग फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतील. आपली पत ही त्यापेक्षा जास्त मिळण्याची आहे हे ध्यानात असू द्या. त्यांनी फेकलेल्या ट्रॅप मध्ये न अडकता "कठोर परिश्रमाला पर्याय नाही" या पूर्वसूरींच्या उक्तीचं स्मरण करा. जगाला वेठीला धरणारे राजकीय नेते अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यांनी तयार केली भू राजकीय परिस्थिती आणि ते हे दोघेही बदलेल. पण त्याच बरोबर आता मिळालेल्या या संधीचा फायदा करून घेतला नाही तर ती पण हुकेल. लक्षात घ्या, अशीच संधी १९९५-९६ च्या सुमारास सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये आली आणि भारतातील मोठा प्रवर्ग भौतिकतेबाबत सुदैवी ठरला. पण त्या संधीत आणि उत्पादन क्षेत्राच्या संधीत एक मोठा फरक आहे. उत्पादन क्षेत्रातील संपूर्ण इको सिस्टम ची वाढ ही आपल्याच भूमीवर होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या व्हॅल्यू ऍडिशन चा फायदा हा फक्त आणि फक्त भारतातल्या लोकांना होणार आहे. 

लोहा गरम है, हथौड़ा मार दो!

Tuesday, 19 May 2026

गानू सर आणि मी एकमेकांच्या मित्र यादीत कधी आणि कसे आलो हे लक्षात नाही. पण त्यांची आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट चांगलीच आठवते. २०१४ साली गानू सर गोव्यावरून त्यांच्या एका पुण्यातल्या मित्राला घेऊन डायरेक्ट सेटको मध्ये आले होते. मी नव्हतो कंपनीत पण सुदैवाने जवळच गेलो होतो. ते परत येतो म्हणून सांगून गेले आणि त्याप्रमाणे आलेही. 

फेसबुकच्या ओळखीतून भेट हा एक त्या काळी  एक औत्सुक्याचा विषय होता. त्यात गानू सरांच्या आणि माझ्या वयात १५ एक वर्षाचा फरक. बरं, दोघांचं फिल्ड वेगळं. ते अकौंटन्सी ची प्रॅक्टिस करणारे तर मी अभियांत्रिकी क्षेत्रातील. पण केवळ फेसबुकवरील पोस्ट वाचून आणि त्यात लिहिलेले व्यावसायिक सिद्धांत आवडले म्हणून कौतुक करण्यासाठी आवर्जून आलेले गानू सर माझ्यासाठी अप्रूप होते. 

त्या भेटीनंतर असंख्य वेळा भेटी झाल्या. पण आभासी जगात झालेली ही मैत्री प्रत्यक्षात फुलण्यात मोठा सहभाग गानू सरांचा. जेव्हा कधी म्हणून ते पुण्यात आले त्यातील बहुतांश वेळा ते तर भेटलेच पण मी गोव्याला गेलो तेव्हा ही वाट वाकडी करून ते खास भेटण्यासाठी आले. माझं जे काही समाजसेवी संस्थांबरोबर काम आहे त्याचं नुसतं कौतुक न करता त्यात ते ऍक्टिव्ह पणे सहभागी झाले. 

वयाच्या तिशी पर्यंत अगदी पक्के मुंबईकर असलेले गानू त्यानंतर हार्ड कोअर गोयंकर झाले. या सगळ्या प्रवासातील किश्यांचा त्यांच्या कडे खजिना आहे. आमचे फळणीकर सर आणि वैराळकर अण्णा यांच्या सारखं अगदी. या तिघांची गप्पांची मैफल जुळवून आणायची आहे. वाचनाची प्रचंड आवड असलेला हा माणूस हजारो पुस्तकं संग्रही बाळगून आहे. त्याबरोबरच जुन्या जाणत्या शास्त्रीय संगीताच्या गायक गायिकांबरोबरच नव्या युगाच्या लोकांचं गाणं आवडलं तर त्यांचं ते मनसोक्त कौतुक करतात. आणि तिसरी आवड ड्रायव्हिंग ची आणि पर्यायाने प्रवासाची.  आता वयोपरत्वे बाहेर गावचं वाहन चालवणं कमी केलं तरी पाच एक वर्षांपूर्वी ते कार ने गोवा ते पुणे मुंबई करणाऱ्या गानू सरांनी जगभर भटकंती केली आहे. 

ते भाजप चे खंदे समर्थक च नव्हे तर आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा. त्यांचा काही मित्रवर्ग कधी विरोधी राजकीय सूर लावतात (यात बऱ्याचदा मी पण असतो)  तेव्हा ते खेद व्यक्त करतात पण राजकीय मतांतरे असली तरी सौम्य विरोधापलीकडे ते फार व्यक्त होत नाहीत. 

या माध्यमातून माझी अनेक जणांशी प्रत्यक्ष अनेक जणांशी चांगली मैत्री झाली त्यापैकी गानू सर एक. मागच्या आठवड्यात एका कॉन्फरन्स च्या निमित्ताने गोव्याला जाणं झालं मग गानू सरांना भेटणं हे स्वाभाविक होतं, त्या प्रमाणे भेटलो सुद्धा. त्यांच्याशी बोलताना ते मुंबई सोडून गोव्याला का आले याबद्दल मला जे समज आहे त्याला पुष्टी देणारं उत्तर यावं म्हणून खोदून विचारलं. पण त्यांनी त्याला शिताफीने टाळलं. पण गोव्यात आज जी बीजेपी ची सत्ता आहे तो येण्यामागे गानू सरांसारख्या पडद्यामागचा कलाकारांचा मोठा हात आहे असं मी मानतो. 

गानू सरांना त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐