Thursday 12 April 2018

रोजगार लायकी

परवा आयटीआय ला टेक्निशियन मुलं घ्यायला गेलो होतो. पंचवीस कंपन्या हजर होत्या. अन मुलं आली होती दहा. तिथले ऑफिसर सांगत होते, टाटा ग्रुप ला २५० मुलं पाहिजेत, पण मिळत नाही आहेत.

आयआयटी च्या मुलांचं पण लागलीच प्लेसमेंट होत असावं.

म्हणजे थोडक्यात आयटीआय ते आयआयटी चेन मध्ये वांदे झालेत ते डिप्लोमा आणि बीई मुलांचे.

याला काही कारणं आहेत. 

एकतर इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक उदंड झाले आहेत. आणि त्यातून तयार होणाऱ्या लोकांची क्वालिटी संशयतीत आहे. डिप्लोमा मुलं तर अक्षरशः कुठलाही जॉब करायला तयार असतात. काम कुठलंही चांगलं, पण घेतलेल्या शिक्षणाला न्याय देणारं तर असावं. जी कामं आय टी आय टेक्निशियन करू शकतो तीच कामं डिप्लोमा वा ग्रॅज्युएट इंजिनियर ने करण्यात काय मतलब आहे. हेल्परचं काम मागायला येतात हो. वाईट वाटतं. 

त्यात सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्री वाल्या मंडळींनी ही मुलं पळवायला चालू केली. कोअर ब्रँच करायची आणि की बोर्ड बडवत बसायचा, याला काय अर्थ आहे. फक्त मॅथ्स शिकल्यामुळे लॉजिक चांगलं या एका क्वालिफिकेशन वर प्रोग्रामर बनत गेले आणि कोअर विसरत गेले. पोरांची भौतिक स्थिती सुधारली पण शैक्षणिक विषमता तयार झाली. 

आम्ही इंडस्ट्रीवाल्यानी सुद्धा यावर तात्पुरते उपाय योजले. जे मिळतात ते घ्या. आणि अजून कमी पगार देऊन घ्या. आणि मग त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी लेव्हलचं काम द्या. 

पोरं पोरी सुद्धा सुखनैव जीवनाला चटावले. त्यांनीही धोंडा पाडून घेतला पायावर. आता तिथे अनिश्चितता तयार झाल्यावर साळसूदपणे म्हणतात "I want to make career in core". 

एकंदरीत एकेकाळी ज्या इंजिनियरिंग साखळी चा बोलबाला होता, त्याचं आज हसं झालंय. त्या चेन मधील डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट ह्या सगळ्यात कमजोर कडी आहेत. आणि या अधोगतीला समाजातील प्रत्येक घटक, अगदी तुम्ही, मी, शिक्षणसम्राट, इंडस्ट्रीवाले, हे सगळे जण कारणीभूत आहेत. 

आपल्याकडे बेरोजगारी या प्रश्नापेक्षा रोजगारासाठी लायक युवक उपलब्ध आहेत का, हा मोठा प्रश्न आहे.