Saturday, 5 September 2026

बाबू

बाकी उत्पादन क्षेत्रातील लघु उद्योग व्यवसायापेक्षा प्रमाण कमी असलं तरी आमच्याकडे लोक सोडून जातात. त्यातले काही लोक जाताना काहीतरी विचित्र भावना असते. विचित्र म्हणजे काय तर त्यांचा जेव्हा निरोप समारंभ असतो तेव्हा तिथं जावंसं पण वाटत नाही आणि गेलोच तर फारसं बोलावंसं पण वाटत नाही. काहींना तर जबरदस्तीचा राम राम करावा लागतो. पण काही लोक असतात जे कंपनी मध्ये भले काहीच वर्षे काम करतात पण ते करताना त्यांनी १००% रिटर्न्स कामाला दिले असतात. म्हणजे त्यांनी स्वतःचा एक स्लॉट कंपनीत तयार केला असतो. ते जेव्हा सुट्टी घेतात तेव्हा उगाच चुकल्यासारखं वाटतं आणि सोडून जातात तेव्हा त्यांनी जो कंपनीत काळ व्यतीत केला त्याबद्दल एक सुखावह भावना मनात रुंजी घालत असते. 

असाच आमचा एक एम्प्लॉयी, त्याचं नाव बाबू. खरं नाव परशुराम राऊत. १७ वर्षे कंपनीत काम केल्यावर त्याने ती सोडण्याचा निर्णय घेतला. तो कंपनीत हेल्पर म्हणून जॉईन झाला आणि हेल्पर म्हणूनच कंपनी सोडली. पण ज्या कामाचा आपल्या इको सिस्टम मध्ये मोबदला सगळ्यात कमी मिळतो, त्या कामात बाबूने मनापासून काम केलं. आमची कंपनी जॉईन करण्याअगोदर अक्षरश: पोती वाहणाऱ्या बाबूने, आमच्या इथे कॉम्पोनंट क्लीन करणे, पॅकिंग करणे, झाडलोट करणे, पाणी भरणे, गाड्या धुणे अशी सर्व कामं केली. मध्ये करोना काळात कँटीन चे इश्यू होते तेव्हा सेकंड शिफ्ट मध्ये पोरांना डबे दिले. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर पोस्ट लिहिली तेव्हा कुणीतरी असं लिहिलं होतं की असा खराच माणूस आहे का, की माझ्या आदर्शवादाच्या सोसातून तो काल्पनिक तयार केला आहे. 

गेली काही वर्षे त्याला कमी अंगमेहनतीचं म्हणजे ऑफिस मधील पॅन्ट्री सांभाळण्याचं काम दिलं होतं. त्यामुळे माझ्या कडे कुणी पाहुणे आले तर त्यांचं सरबराई करायचं काम बांबूचं. माझी केबिन मध्ये जर काही एक्स्ट्रा कागदपत्रे दिसली की माझ्या मागे लागून तो गरज नसलेल्या गोष्टी फेकायला लावायचा. जी कामं करण्याची एस ओ पी वगैरे लिहून लोकांना त्याची सवय लावायला लागते ती एस ओ पी बाबूच्या रक्तात भिनलेली होती. कॉमन सेन्स वापरून तो सांगितलेल्या कामात व्हॅल्यू ऍडिशन करून +१ काम करायचा. बाकी त्याची अजून काही वैशिष्ट्य आधीच्या पोस्ट मध्ये सांगितली होती, त्याची लिंक खाली देत आहे. 

आता तब्येत फारशी साथ देत नाही आणि त्याही पेक्षा महत्वाचं त्याला झोपूयो मध्ये फ्लॅट घर मिळाल्यामुळे त्याने हडपसर बाजूला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तिकडून कंपनीत ये जा करणं हे अवघडच होतं. 

परवा त्याचा निरोप समारंभ झाला. लोक अगदी उत्स्फूर्त पणे त्याच्या बद्दल बोलले. मी पण बोललो, अर्थातच. त्यात कुठलाही कृत्रिम पणा नव्हता, निगेटिव्ह भावनेची थोडीपण भनक नव्हती. व्यावहारिक पातळीवर त्याने कंपनीला शंभर+ टक्के दिलं. पण त्याही पेक्षा त्याचा कंपनीतील वावर हा कंपनीतील सकारात्मकता वाढवणारा होता. आमच्या इथे आल्यावर या पॉझिटिव्ह वाईब्ज चा अनेक जण उल्लेख करतात. बाबू सारखे जे अनेक लोक आमच्या कडे कार्यरत आहेत त्याने ते शक्य होतं. बाबूवर लिंक्ड इन वर पोस्ट टाकली त्यानंतर त्या पोस्टवरच्या कमीच कॉमेंट्स आहेत पण वाचण्यासारख्या आहेत. आणि तीन जणांनी मला फोन करून बाबूचं कौतुक केलं आणि तो सोडून गेला याबद्दल हळहळ व्यक्त केली. यातच त्याच्या कामाबद्दल कल्पना येते. 

बाबूचं पुढील आयुष्य हे आरोग्यदायी रहावं याबद्दल हार्दिक शुभेच्छा.  

 

Wednesday, 2 September 2026

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमचा टर्न ओव्हर फार काही जास्त नव्हता. लोक पण फार नव्हते. सेल्स मध्ये तर माझ्या बरोबर फक्त दोन जण होते. त्यातल्या एकाने एका कस्टमर कडून खूप मोठी ऑर्डर आणली. म्हणजे आमच्या वार्षिक उलढालीच्या २०% ऑर्डर व्हॅल्यू होती. आम्ही कस्टमर कडून ५०% ऍडव्हान्स रक्कम, ४०% ऑर्डर सप्लाय अगोदर, उरलेले १०% कमिशन झाल्यावर अशी पेमेंट ची डिमांड केली. निगोशिएट करताना त्याने १०% ऍडव्हान्स, ८०% डिलिव्हरी झाल्यावर लगेच आणि १०% कमिशन झाल्यावर अशी पेमेंट टर्म दिली. मी नाही म्हणत होतो, पण आमच्या सेल्स इंजिनीअर ने मला आश्वस्त केलं की फॉलो अप करून पेमेंट आणेल. मी ही मोठ्या ऑर्डर व्हॅल्यू च्या मोहात पडून ती टर्म स्वीकारली. आणि मग व्हायचं तेच झालं, आम्ही स्पिंडल सप्लाय केले आणि ८०% पेमेंट द्यायचं काही कस्टमर नाव घेईना. मी हवालदिल झालो, कारण खूप मोठं वर्किंग कॅपिटल अडकलं होतं आणि आमच्या सारख्या छोट्या व्यवसायाला ते झेपणारं नव्हतं. ज्याने ऑर्डर घेतली त्या सेल्स इंजिनियरला सुद्धा खूप गिल्टी वाटत होतं. एके दिवशी तो म्हणाला की मी जातो कास्टमरकडे आणि जरा कडक भाषेत पेमेंट मागतो. 

मी त्याला म्हणालो "जा तू, पण जास्त वाद घालू नको. आपला मोठा कस्टमर आहे. त्याला दुखवायला नको. भविष्यात तो ऑर्डर देणार नाही. आणि मुख्य म्हणजे आपण सुसंस्कृत लोक आहोत. तेव्हा वादात न पडता आपण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू यात"

हे सगळं ऐकल्यावर माझा बिझिनेस पार्टनर जो इतके दिवस आमचं नाटक बघत होता आणि सप्लायर चे पेमेंट काढायची जबाबदारी त्याच्यावर होती तो उसळून मला म्हणाला "अरे, हे पेमेंट आपल्याला एका आठवड्यात मिळालं नाही तर व्यवसायाला खूप मोठा प्रॉब्लेम तयार होईल. त्या त्या सेल्स इंजिनियर ला कुठं वादात न पडायला सांगतोस. पेमेंट दिलं नाही तर सप्लायर चा पेमेंट साठी आपल्यामागे इतका तगादा लागेल की ते ऐकून कान बहिरे होतील. ऍग्री केल्याप्रमाणे कस्टमर पेमेंट देत नाही आहे, तू काय आपल्या सुसंस्कृत पणाचे गोडवे गातो आहेस."

मग त्या सेल्स इंजिनियर कडे वळत पार्टनर म्हणाला "तू जा रे कस्टमर कडे. आणि चांगली कडक भाषा वापर. त्याने दाद दिली नाही ना तर ऐकव त्याला की आठवड्यात पेमेंट नाही दिलं तर केस ठोकीन म्हणा. त्याने तुला उलटं बोललं तर मग मी बघतो काय करायचं ते. लेजिटीमेट पैशांची डिमांड करतोय, काही भीक नाही मागत आहे."

पार्टनर चं काय डोकं फिरलं माहीत नाही, तोच गेला सेल्स इंजिनियर बरोबर त्या कस्टमर कडे आणि तिथं दंगा करून पेमेंट घेऊनच आला. 

त्या दिवशी मला कळलं की नाही त्या ठिकाणी गुळमुळीत पणा काही उपयोगाचा नाही आणि मुख्य म्हणजे जे योग्य आहे तिथं आपल्या सहकार्याच्या मागे उभं राहून त्याला पूर्ण पाठिंबा देणं हे लीडर चं काम असतं. नंतरच्या आयुष्यात मला याचा फार फायदा झाला. 

Monday, 17 August 2026

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कस्टमरचा फोन आला होता. तो फोन झाल्यावर अनाहूत पणे माझ्या तोंडून शब्द पडले "कसला बिनडोक माणूस आहे" आणि पुढं दोन चार शिव्या. माझ्या बाजूला पार्टनर बसला होता. त्याने मला, काय झालं असं विचारलं. तर स्टोरी अशी होती. 

एका सुपर इंजि नावाच्या कस्टमरला आम्ही एक स्पिंडल विकला होता. ज्या मशीन वर तो स्पिंडल लावला होता तो एका सुरत च्या कस्टमर कडे चालू होता. त्याच्या ऑपरेशन मध्ये काही तरी इश्यू होता. त्याबद्दल त्याने मला एक दोन वेळा फोन ही केला होता. पण प्रॉब्लेम काय आहे हे तो व्यवस्थित सांगू शकत नव्हता. त्या दिवशी फोन आला होता तेव्हाही प्रॉब्लेम काय आहे हे तो सांगू शकला नाही. फक्त स्पिंडल बरोबर चालू नाही हीच कॅसेट लावली होती. 

हे सांगून मी पार्टनर ला म्हणालो की "स्पिंडल मध्ये प्रॉब्लेम काय आहे हे तो व्यवस्थित सांगू शकत नाही. टेक्निकली ढ गोळ्या आहे तो कस्टमर. कसा काय लोक धंदा करतात काय माहित?" माझ्या टोन मध्ये त्या कस्टमर प्रति तुच्छतेचा भाव होता. 

पार्टनर सुद्धा माझ्या म्हणण्याला दुजोरा देईल या आशेने मी त्याच्याकडे पाहिलं. तर त्याने मला विचारलं की कस्टमर ने कुठं वापरला आहे स्पिंडल. मी सांगितलं की त्याने एक व्ही एम सी बनवली आहे. पार्टनर ने अंदाजे त्या मशीन ची किंमत विचारली. मी सांगितलं, तीस एक लाख रुपये असेल. 

पार्टनर मला म्हणाला "तू एक लक्षत घे. तुझ्या कस्टमर ने तीस लाख रुपयांची मशीन, की ज्यात साधारण पणे दोन एक हजार पार्टस असतील बनवून त्याच्या कस्टमर ला विकली आहे. बरं मशीन बनवताना इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, न्यूमॅटिक, हायड्रोलिक्स या इंजिनियरिंग च्या सर्व शाखांचं नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे. ते सर्व पार्ट जोडून त्याने मशीन बनवली आणि सप्लाय पण केली आहे. तू सोळा फक्त मेकॅनिकल पार्टस असणारी एक स्पिंडल नावाची साधारण पणे एक लाख रुपये किमतीची सब असेम्बली बनवतोस. आणि ती वेळेत बनवताना तुझ्या xx तुन धूर निघतो. तू काय गप्पा मारतोस, की कस्टमरला टेक्निकली कळत नाही ते". 

पुढं जाऊन तो म्हणाला "बऱ्याचदा आपण आपला जो व्यवहार होतो त्यावरून समोरच्या बद्दल काही मत बनवतो. पण त्या पलीकडे जाऊन त्यांचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतात ज्यामुळे ते खूप मोठं काम करत असतात. हे ध्यानात ठेवून तुझा त्यांच्याशी पूरक व्यवहार ठेवत जा. नाहीतर लोकांना मूर्ख म्हणून हिनवण्याच्या नादात तू कधी मार्केट मधून बाहेर पडशील हे तुला कळणार पण नाही."

पार्टनर चं म्हणणं कायम लक्षात ठेवलं आहे मी. 😊

Saturday, 15 August 2026

आपलं आयुष्य असं निवांत चालू असताना काही लोक आणि त्यांचं काम समोर येतं आणि आपण स्तिमित होऊन जातो. काल छत्रपती संभाजीनगर मध्ये काहीसं असंच घडलं. 

मंजिरी मुळे माझी नितीन घोरपडे यांच्याशी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष ओळख झाली होती. जगभरातील आयर्न मॅन पूर्ण करणाऱ्या या अवलियाचा इतिहास फारच खतरनाक आहे. व्यसनाधीनता ते आयर्न मॅन चे असंख्य 'किताब हा प्रवासच फुल फिल्मी आहे. 

आणि अशात या फिजिकल फिटनेस च्या वेडाला जोड मिळाली ती समाजसेवेची. अल्कोहॉलिक ऍनानिमस च्या कामाला वाहून घेताना आपला व्यवसाय त्यांनी विशीतल्या मुलाच्या खांद्यावर सोपवला आणि स्वतःला समाजसेवेत झोकून दिलं. 

क्रांती चौंकाजवळ कॉर्पोरेशन कडून जागा भाड्याने घेऊन नितीन सर अल्कोहॉलिक ऍनानिमस चं काम करत होते. या सेंटर च्या बाजूलाच एक कॉर्पोरेशनचं सार्वजनिक शौचालय होतं. "अस्वच्छता" या शब्दाला किळस यावी इतकं ते घाणेरड्या अवस्थेत होतं. प्रचंड दुर्गंधी पसरवणाऱ्या तिथे कचऱ्याचा ढीग होता. शुद्धीत असणारी कुठलीही व्यक्ती तिथे जाणं शक्य नसल्यामुळे तिथं सर्व अवैध धंदे चालायचे. 

ती सगळी भीषण परिस्थिती बाजूच्या वास्तूत दररोज येणाऱ्या नितीन सरांच्या नजरेत (खरंतर नाकात) येत होती. एकेदिवशी काय भनक आली पण नितीन सर सरळ कॉर्पोरेशन च्या ऑफिस मध्ये गेले आणि त्यांनी ती पण जागा भाड्याने मागितली. पूर्ण एक वर्ष पाठपुरावा करून शेवटी कॉर्पोरेशन बरोबर भाडेकरार झाला. 

आणि मग सुरू झाला एका अत्यंत दरिद्री अवस्थेत असलेल्या जागेचा ट्रान्सफॉर्मेशन प्रवास. खर्च प्रचंड होताच. पण त्यावर डोकं धरून न बसता जितके पैसे होते त्याने काम चालू केलं. तब्बल १२ ट्रक घाण त्या पाच सहाशे स्क्वे फूट जागेतून काढला गेला. (त्या कचऱ्याचं वर्णन नितीन सरांनी केलं ते आठवून आता लिहिताना पण कसं तरीच वाटतंय). 

चांगल्या कामासाठी कुणी तरी धावून येतं या युनिव्हर्सल नियमाला धरून इथं पण एक पुण्यातील बिझिनेसमन ने नितीन सरांचा प्लॅन समजावून घेतला आणि जितकं बजेट होतं त्यापेक्षा थोडे जास्त पैसे पाठवले. 

आठ महिने सतत काम केल्यावर ज्या जागेत जाणं सुद्धा दुरापास्त होतं, जी जागा व्यसनाधीन लोकांचा अड्डा होती तिथं आता मुलींसाठी सुबक, वातानुकूलित अभ्यासिका तयार झाली आहे. वरच्या मजल्यावर मेडिटेशन रूम बनवली गेली आहे आणि टेरेस वर नितीन सरांनी छोटेखानी ऑफिस आणि लायब्ररी बनवली आहे. 

काही महिन्यांपूर्वी अस्वच्छतेचं आगर असलेल्या त्या जागेत आज चाळीस मुली विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, संध्याकाळी मेडिटेशन चा वर्ग भरतो आणि रविवारी सकाळी दहा ते बारा मुलांनी तिथेच बसून पुस्तकं वाचावी अशी व्यवस्था केली गेली आहे. 

मी तासभर तिथं होतं. नितीन सर हा सगळा प्रवास सांगताना माझ्या डोक्यात हे सगळं कसं शक्य आहे हेच चालू होतं आणि मनोमन मी त्यांना सलाम करत होतो. 

Saturday, 1 August 2026

काल राजेशचा माझ्या बद्दलचा, त्यातही माझ्या तब्येतीचा लेख वाचला. त्याच्या लिखाणाबद्दल मला नेहमीच त्याचं कौतुकही वाटतं आणि आनंदही होतो. त्याला अनेकजण आणि मी सुद्धा श्रावणबाळ म्हणतात त्यात काही चूक नाही. तो ज्या पद्धतीने माझी काळजी घेतो त्याबद्दल समाधान आणि अभिमान पण वाटतो. माझी सूनही डॉक्टर असल्यामुळे, मला काही झालं की तत्परतेने तपासण्या करत असते. नातू नील तर आजीच्या सेवेत तत्पर असतो. दुसरा मुलगा उन्मेष आणि सून अर्चना, हे सुद्धा मला काही झालं की आवर्जून फोन करतात, चौकशी करतात आणि गरज पडली तर येऊन काळजी घेतात. घरातल्या अशा वातावरणामुळे माझी तब्येत चांगली राहते. मुलांचे बाबा जाऊन आता सतरा वर्षे झालीत तरी मी आनंदात असते. अर्थात वयोपरत्वे कधी तब्येत खराब झाली तर थोडी चिडचिड होते. 

माझे वय सध्या ८२ चालू आहे. आतापर्यंत कधीही तब्येतीची तक्रार नव्हती. पण हल्ली सर्दी, खोकल्यामुळे बेचैन होते. लवंग, मध, वाफ घेणे या घरगुती उपायांचा काही उपयोग होत नाही. तसं झालं की माझी इच्छा नसताना राजेश मला दवाखान्यात स्पेशालिस्ट डॉक्टर कडे नेतो. तिथे मग सी टी स्कॅन वगैरे मनात धडकी भरवणार्या मशीन मध्ये तपासणी होते. तिथं एक विचित्र मानसिक दडपण असतं ज्यामुळे घाबरायला होतं. मग नको तो दवाखाना अशी भावना मनात बळावते. ज्या आजारांशी मी घरातच सामना केला त्यासाठी ते हॉस्पिटल, ती मशिन्स, इंजेक्शन्स आणि मुख्य म्हणजे त्याला लागणारे भरमसाठ पैसे हे नको वाटतं. 

या सगळ्या मागे अजून एक गोष्ट. राजेश चे वडील एम एस इ बी त होते. तिथे पेन्शन नव्हती. त्यामुळे त्यांच्यानंतर जी शिल्लक आहे त्यावरच माझी सगळी भिस्त आहे. मुलं खर्चाला नाही म्हणत नाहीत, पण मलाच असं वाटत राहतं की आपल्या तब्येतीचा भार त्यांच्यावर पडायला नको. त्याच भावनेतून ते औषधांवर पैसे खर्च करणं जीवावर येतं. 

घरात दोन मुलाकडे मिळून पाच गाड्या आहेत भल्यामोठ्या. राजेश सांगतो तो हिशोब मी ऐकून घेते खरं, पण आयुष्यभर पी एम टी अन रिक्षा च्या मीटर कडे बघत प्रवास केलेल्या मला आयुष्याच्या उत्तरार्धात पोरांच्या गाडीमध्ये राणी सारखं इकडे तिकडे फिरायचं समाधान वेगळंच असतं हे कुणाला काय कळणार? मला नाही वाटत या माझ्या विचारधारेत काही चूक आहे. तुम्हाला वाटतं का माझं काही चुकतंय म्हणून? 

Friday, 31 July 2026

आमच्या मातोश्री पैसे खर्च करण्याबाबतीत तशा सढळ हाताच्या. नातू, आम्ही मुलं, सुना वगैरेंना वाढदिवशी किंवा नातवांना  परीक्षेत चांगले मार्क पडले, कुठल्या वास्तुशांती वेळी सटासट पाकीट वाटते. जवळच्या नातेवाईकांना कधी गरज पडली की पैसे काढून देते. 

पण असं असलं तरी एका बाबतीत तिला पैसे खर्च झालेले अजिबात आवडत नाही. ते म्हणजे सिटी मध्ये कुठे जायचं असेल तर तिला रिक्षा किंवा कॅब वर पैसे खर्च करणं अजिबात आवडत नाही. ते वाचवण्यासाठी ती कुठलाही आटापिटा करू शकते. म्हणजे आमच्या घरापासून (फातिमानगर) तिला रावेत ला जायचं असेल तर ती मला म्हणते की ड्रायव्हर आधी तुला सोडेल सिंहगड रोड ला आणि मग मला रावेत ला सोडून येईल. मी तिला सांगतो की माझ्या बरोबर कंपनीत येई पर्यंत तू घरून रावेतला पोहोचशील. मी तुला कॅब करून देतो. (त्याचे पैसे पण मीच भरणार असतो खरंतर). पण तिचा तोच हट्ट असतो. कॅब नको, तुला सोडल्यावर ड्रायव्हर मला सोडून येईल. मी तिला हे पण सांगतो की कंपनीतून रावेतला सोडून यायला कारचं जितक्या रुपयाचं पेट्रोल लागतं, तितकेच पैसे कॅब साठी आपल्या घरापासून रावेत साठी लागतात. पण तिला हे गणित काही केल्या कळत नाही. समहाऊ तिच्या डोक्यात ते सिटीबस चे दहा आणि पंधरा रुपयांचे तिकीट फिक्स आहेत. त्यावर ती सिटी अंतर्गत पैसे खर्च करायला नाहीच म्हणते. मी पण आता या विषयावर डोकेफोड करणं बंद केलं आहे. 

इतके दिवस मला वाटत होतं की हा प्रकार फक्त सिटी अंतर्गत प्रवासासाठी आहे. पण नुकताच मला अजून एका गोष्टीवर पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येतं हे जाणवलं. ते म्हणजे औषधं. सुदैवाने माझ्या आईची तब्येत ठणठणीत असते. फक्त आता वयोपरत्वे छोटी मोठी आजारपणं उद्भवतात. सगळ्यात आधी तर तिला डॉक्टरकडे यायचंच नसतं. "मला म्हातारीला काय धाड भरली आहे?" हे पालुपद सारखं चालू असतं. आता काही कारणासाठी तिला अक्षरश: भांडण करून डॉक्टर कडे नेलं आणि त्याने ज्या काही भरमसाठ टेस्ट सांगितल्या, त्या प्रत्येक टेस्ट करताना "या डॉक्टर ला काही कळतच नाही. इतक्या कुठं टेस्ट असतात का साध्या आजारासाठी?" हे वाक्य प्रत्येक अर्ध्या तासाने ती म्हणत होती. तब्येतीला काही झालं याच्या कम्प्लिट डिनायल मोड मध्ये. सर्व टेस्ट आणि तपासण्या झाल्यावर आणि त्यातही त्याचे चार्जेस कळल्यावर, जे मी सांगणं टाळत होतो, तिने मला ठणकावून सांगितलं. "यापुढे काहीही झालं तरी  ते आपल्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन जायचं." परवा त्या स्पेशालिस्ट डॉक्टर कडे फॉलो अप साठी गेलो होतो आणि त्याने दोन महिन्याने परत बोलावलं तर त्यालाच ऐकवलं "टेस्ट सांगणार नसाल तर येते" नशीब त्या स्पेशालिस्ट डॉक्टर च्या औषधांनी तिला थोडा आराम पडला नाहीतर माझं तिने परत कधीच ऐकलं नसतं. त्याबद्दल डॉक्टर चे आभारच मानायला हवेत. 

इथे खुर्चीत बसल्या बसल्या हात वर केला आणि छातीत थोडी कळ आली की घाबरणाऱ्या माझ्यासारख्याची आई तब्येतीच्या बाबतीत इतकी डेअर डेव्हील कशी काय हे एक मला कोडंच पडलं आहे.

Saturday, 25 July 2026

१९९७-९८ ची गोष्ट आहे. मी पवई साकी नाका रोड वर एक कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. ज्यांना भेटायचं ते मीटिंग मध्ये होते म्हणून रिसेप्शन ला बसलो होतो. तितक्यात तिथली एक मुलगी, बहुधा रिसेप्शनिस्ट, तणतणत ऑफिस मधून बाहेर आली.  समोरून एक दुसरी मुलगी आली आणि तिने रिसेप्शनिस्ट ला नजरेनेच विचारलं की काय झालं. तर रिसेप्शनिस्ट ने मधलं बोट दाखवून सांगितलं की वाट लागली. तर समोरून आलेली मुलगी म्हणाली "आता परत काही काम सांगितलं ना त्या भाड्याने तर बांबू सर त्याच्यात". 

पहिल्यांदा ऐकायला विचित्र वाटलं तरी मला बॉस ने काय काम सांगितलं, त्याचा स्वभाव कसा आहे हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे जजमेंटल न होता मी आपलं मासिक वाचत बसलो. अर्थात मी पण तेव्हा तिशीत होतो आणि त्या मुलीही समवयीन होत्या. त्यानंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा हे ही लक्षात आलं की तरुणाईची जडणघडण तुमच्या भावतालावर अवलंबून असते. एक काळ होता, पॉलिटेक्निक पासून ते अगदी एस के एफ सोडेपर्यंत वाक्य सुरुवात करताना किंवा संपवताना शिवी यायचीच. आजूबाजूचा माहोलच तसा होता की आपण काही वावगं बोलतो आहे असं वाटायचं नाही. मग हळूहळू भवताल बदलत गेला, घरात मूल जन्माला आलं आणि भाषा बदलत गेली. आता शिवी द्यायची म्हंटलं तरी तोंडातून शब्द फुटत नाही. 

हे आठवण्याचं कारण म्हणजे आताच्या आंदोलनातील जेन झी ची भाषा.लोक असं बोलत होते जणू ही तरुणाई कुठल्यातरी दुसऱ्या ग्रहावरून आली होती. अरे, ही आपलीच पोरं होती. ते ज्या भवतालात मोठी झाली तो एक समाज म्हणून आपणच बनवला आहे. तुम्हीच त्यांना घडवलं आहे. ही तीच तरुणाई आहे ज्यांचा जन्म इंटरनेट च्या काळात झाला आहे. सोशल मीडियावर बोलली जाणारी भाषा, ओ टी टी वर सरसकट ऐकल्या जाणाऱ्या शिव्या हे स्वीकारलं गेलं आहे. आताच ज्या पिक्चरची भरमसाठ स्तुती झाली त्या धुरंधर चे डायलॉग्ज सहकुटुंब सहपरिवार आपण ऐकले आणि त्यावर टाळ्या पण पिटल्या. माझ्या पिढीने जे सामाजिक वातावरण तयार केलं तिथेच आजच्या तरुणाईची भाषा पण रुजली, इतर वेळेस आपण स्वीकारली. जेव्हा आता ज्या सरकारची भलामण करतो त्याच्या विरुद्ध वापरली गेली तेव्हा मात्र आपल्याला टोचली.  

हे झालं भाषेचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या तरुणाईचा जन्म झाला आणि गेल्या बारा वर्षातील निवडणुकीत ते फर्स्ट टाइम व्होटर झाले होते. बी जे पी ला भरभरून मतं दिली होती. तेव्हा त्यांचं वागणं गोड वाटलं होतं. २०१४ च्या विजयानंतर अनेक आघाडीवर भ्रम निरस झाला तेव्हा प्रतिवाद होता की साठ वर्षाची घाण आहे, थोडा वेळ तर लागणारच. असं म्हणता म्हणता बारा वर्षे झाली. एका तपा नंतर सुद्धा जेव्हा लक्षात आलं की समाजाचं क्वालिटी ऑफ लाईफ हे सुधारणे तर दूरच पण खालावत चाललं आहे, लॉ अँड ऑर्डर चा बट्ट्याबोळ झालेला दिसतोय, रस्ते/पाणी/स्वच्छता/वीज/शिक्षण यात सुधारणा करण्याऐवजी इतकी ब्रूट मेजोरीटी असूनही अजूनही सरकार चालवणारा पक्ष धार्मिक ध्रुवीकरण आणि मंदिर यातच मश्गुल आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यात सुधारणा होण्याचे दूरवर चिन्ह दिसत नाही आहे. ज्या भ्रष्टचाराचा मुद्दा घेऊन सत्ता कमावली तो तर तसाच आहे, बारा वर्षांपूर्वी सोन्याची चेन घालून नेत्यांचे पोस्टर दिसायचे ते तर आजही दिसत आहेत, गावातल्या ट्राफिक ची कंडिशन अजून भीषण झाली आहे. 

हे मान्य आहे की या सरकारच्या ध्येय धोरणांमुळे आणि बदलत्या भू राजकीय परिस्थितीमुळे अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत पण त्या संधीचं सोनं करण्यासाठीची मानसिकता, इको सिस्टम, सोशल फॅब्रिक नसेल तर जितक्या वेगाने या संधी आल्या त्याच्या दुप्पट वेगाने त्या नाहीशा होण्याची शक्यता आहे. 

नशीब हे की तरुणाई आज निर्नायकी होती, असंघटित होती. स्ट्रक्चर्ड अप्रोच असला असता तर काय झालं असता याचा विचार करावा.