Tuesday, 26 May 2026

काही वर्षांपूर्वीपर्यंत यशस्वी असण्याची व्याख्या फार सोपी होती. चांगलं शिक्षण घ्यायचं, डिग्री कमवायची, बरा पगार देणारी नोकरी शोधायची आणि आदर्शवादाची कास पकडून आयुष्य जगायचं. पण आता मात्र यशस्वी असण्याच्या शेकडो व्याख्या तयार झाल्या आहेत. 

काही मित्र मॅरेथॉन पाळतात, तर कुणी आयर्न मॅन बनतं, एखादा कुणी हिमालयन ट्रेक चा फोटो टाकतं (एव्हरेस्ट बेस कॅम्प), तर कुणी स्काय डायव्हिंग करतं. एखादा चुलत भाऊ खिद्रेश्वर, हम्पी पासून ते अंगकोर पर्यंत सगळी देवळं पालथी घालतो, तर एखादी बहीण तोफे सारखा कॅमेरा घेऊन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनते. एखादी मैत्रीण वयाच्या पन्नाशीला गिटार शिकते, तर मित्र अचानक बालीच्या समुद्र किनाऱ्यावर योग करताना दिसतो. ओह! गिव मी या ब्रेक. 

सोशल मीडिया उघडावं आणि वाटतं की सगळे कसलं भारी आयुष्य जगत आहेत. मी तर बघूनच डिप्रेस होऊन जातो. 

आणि कळत न कळत मनात विचार येतो, माझं काही चुकत तर नाही ना? मग वाटतं

अगदीच काही नाहीतर गेला बाजार भूतान ट्रिप तरी करू या का?  हिमालय नाही तर के टू एस तरी जमवू का? मॅरेथॉन नाही तर रेसकोर्स ला पाच चक्कर पळू का? लहानपणी तबल्याच्या क्लास लावला होता, तो छंद परत करून बघू का? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड खूप छान आहे असं ऐकलं आहे. प्लॅन करू का? जग ज्याची दखल घेईल अशी कोणती तरी गोष्ट आपल्या हातून घडेल का? 

यादी वाढत जाते. अन मनात प्रश्न येतो, कुठून घुसलं हे मनात की असं काही केलं तरच भारी आयुष्य जगल्याची भावना तयार होईल?

कधी एखादा मित्र म्हणतो "कुणी सांगितलं सकाळी चार वाजता उठून वाघ बघत फिरायचं?" तर दुसऱ्या मित्राला वाटतं की ताडोबा किंवा रणथंबोर माझं आयुष्य आहे. दोघेही बरोबरच आहेत. 

कदाचित एक शाश्वत सत्य आपण विसरत चाललो आहोत. मानव प्रजात ही एकाच गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी जन्माला आली नाही आहे. कुणाला काही अचाट करण्याची इच्छा असते, तर कुणाला ध्यानधारणा, कुणाला डोंगरात साद घालत फिरण्याची मनीषा असते तर कुणाला समुद्राची गाज ऐकत शांतते शी हितगुज करायला आवडतं, काहींना परदेश भावतो तर काहींना गावाकडे जाऊन विहिरीत पोहायला.आणि काहींची आनंदाची परमावधी घरात कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यात असते. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतपणे आनंदानुभव घेणं हा त्याचं प्रदर्शन मांडण्यापेक्षा जास्त किमती असू शकतो हेच आपण विसरून गेलो आहे. 

मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे ज्यांच्या बालपणी आनंदाच्या व्याख्या फार साध्या सरळ सोप्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फॉरेन किंवा काश्मीर ट्रिप नसायची तर कुठल्या तरी काका किंवा मामाकडे मुक्काम असायचा, टीव्ही किंवा थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघणे म्हणजे आनंदाची परमावधी, बाहेर जाऊन आईस्क्रीम खाणे म्हणजे एक सोहळा असायचा. अशा छोट्या गोष्टींमध्ये उत्सुकता असायची, अप्रूप असायचं कारण त्या दुर्मिळ होत्या. 

आता या गोष्टी होलसेल मध्ये उपलब्ध आहेत. 

कुठेही आणि कधीही फिरायला जाण्यासाठी अगणित पर्याय, अगणित करमणूक, अगणित माहितीचे स्रोत, अगणित अनुभव. 

इथे खरी मेख आहे. कोणत्याही गोष्टीचे अगणित पर्याय हा मानसिक थकवा आणतो. पर्यायांचा भडिमार म्हणजे असंख्य शक्यता. आणि या सगळ्या प्रकारात समाधानाऐवजी उरते ती चिंता, काळजी. 

यात गंमत अशी आहे की एकदा आपण हे सगळं करू शकतं अशी मनात भावना तयार झाली की या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला जबाबदार ठरवू लागतो. पण कुठलाही माणूस सगळ्याच गोष्टी करू शकत नाही. 

कुणी जगातले सर्व देश बघू शकत नाही. 
कुणी सर्व कला शिकू शकत नाही. 
कुणी सर्व खेळ शिकू शकत नाही.
कुणी सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकत नाही. 
कुणी जगातील सर्व आश्चर्य बघू शकत नाही. 
कुणी आयुष्य परिपूर्ण जगू शकत नाही. 

म्हणून मी बकेट लिस्ट या कल्पनेच्या विरोधात आहे. अँटी बकेट लिस्ट. 

आणि अँटी बकेट लिस्ट म्हणजे निराशावादी नव्हे, आळशीपणा पण नव्हे आणि कमी महत्वाकांक्षी असंही नव्हे. तर ती मुक्ततेची भावना आहे. अँटी बकेट लिस्ट म्हणजे सजगपणे हे ठरवणं आहे की मला समाधानी वाटण्यासाठी काय नाही केलं तर चालेल. 

मला त्या अनुभवांच्या पाठीमागे नाही धावायचं आहे. मला त्या अपेक्षाच ठेवायच्या नाही आहेत. माझं आयुष्य तुलना करण्यापासून मुक्त असणार आहे. 

कदाचित माझी अँटी बकेट लिस्ट मध्ये असेल 

- मला मॅरेथॉन धावणं गरजेचं नाही आहे 
- पन्नास देशांना भेट देणं हे माझ्यासाठी गरजेचं नाही आहे 
- सर्वच छंद मला यायला हवे हा अट्टाहास नाही माझा 
- मी छान जगतो हे मला जगाला ओरडून सांगायचं नाही आहे 
- मला येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं रूपांतर हे कन्टेन्ट मध्ये नाही करायचं आहे. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण "मला याची गरज नाही आहे" ही भावना "हे मला केलंच पाहिजे" पेक्षा खूप समाधान देणारी आहे. 

या तथाकथित प्रगत आयुष्याची एक शोकांतिका आहे. 

लोक एखाद्या सुंदर ठिकाणी फोटो काढण्यात इतकं मश्गुल होतात की तो अनुभव जगणं विसरून जातात. कुठलं तरी सुंदर निसर्गचित्र आपण मोबाईलच्या स्क्रीनद्वारे बघतो, सूर्यास्त आपला कंटेंट बनतो, कुठे आपण प्रवासाला निघालो तर त्याचा पुरावा होतो, सुट्टीचा आनंद लुटण्याऐवजी आपण त्याचं डॉक्युमेंट बनवतो. आणि या गर्तेत तो खराखुरा अनुभव हरवून जातो. 

कुणास ठाऊक पण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण  हे कधीही कुठेही अपलोड केले जात नाही, त्याचं प्रदर्शन मांडावं वाटत नाही आणि त्याचं दुसर्याकडून प्रशस्तीपत्र पण लागत नाही. तेक्षण  फक्त जगले जातात, अनुभवले जातात आणि आठवले जातात. 

अँटी बकेट लिस्टचा उद्देश खूप साधा आहे. त्याने आपल्याला आयुष्य आकसून घ्यायचं नाही आहे, पण स्वरचित दबावाला झिडकारून द्यायचं आहे, मिनिंगफ़ुल आयुष्यासाठी जागा करायची आहे, जे म्हणून शक्य आहे ते कारण्याऐवजी जे माझं आहे तेच आयुष्य जगण्याचा चॉईस आहे. 

कारण शेवटी समाधान कदाचित चेक बॉक्स टिक करण्यातून मिळत नसेल पण काही चेक बॉक्स पूर्णपणे दुर्लक्षित करण्यातून मिळेल. 

डॉ प्रसाद राजहंस   


Thursday, 21 May 2026

मागील आठवड्यात गोव्यात आमच्या इंडस्त्रीची कॉन्फरन्स अटेंड केली. काही डेटा पॉईंट्स सांगतो. 

उत्पादन क्षेत्राचं जी डी पी काँट्रिब्युशन हे गेली काही वर्षे १५-१७% टक्क्यांवर अडकलं आहे. मॅनेजमेंट मध्ये ग्लास सिलिंग इफेक्ट असतो. तसं उत्पादन क्षेत्र हे ग्लास सिलिंग ला जाऊन धडकलं आहे. भारताला तो सहभाग २५% पर्यंत न्यायचा आहे. पण काही बेसिक गोष्टी करण्यात अजूनही आपण चाचपडत असल्यामुळे ते १७% चं सिलिंग आपण तोडू शकत नाही आहे. ते तोडण्यासाठी त्रिमितीय जबरदस्त थ्रस्ट ची गरज आहे. 

जागतिक पातळीवर भारताकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक क्षेत्रातील बाजारपेठ म्हणून आणि जागतिक उत्पादन केंद्र म्हणून जगातले सगळे व्यावसायिक भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. आमच्याच क्षेत्राचा विचार केला तर जगातील सर्व देशात मशीन टूल या मदर इंडस्ट्री मध्ये घसरण चालू आहे. अपवाद फक्त भारताचा. जगात वर्षागणिक -३% अशी घसरण होत असताना भारतात मात्र पुढील दशकभर १०-११% ची वृद्धी अपेक्षित आहे. उत्पादन क्षेत्राची अनेक वर्षे वाहन उद्योगांच्या खांद्यावर होती. पण त्याबरोबरच आता एरोस्पेस, डिफेन्स, रेल्वेज, वूड इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग अशी अनेक क्षेत्रे उत्पादन क्षेत्र विकसित होण्यात हातभार लावणार आहे. 

या कॉन्फरन्स चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचा लक्षणीय सहभाग. ३००+ सहभागी झालेल्या व्यवसायिकांपैकी ४० एक जण हे २५ ते ३५ वयोगटातील होते. त्यापैकी बरेच जण हे परदेशात शिक्षण घेऊन भारतात व्यवसाय करण्यासाठी परतले होते. (बघता बघता मी ५८ वर्षांचा झालो आणि आतापर्यंत लोक "यंग इन्त्राप्रेन्युअर" उल्लेख करायचे त्या मलाच जाणवतं की आपली सद्दी संपली आहे 😊). फक्त एकच खुपलं की यात मराठी तरुण फार कमी होते. 

मला मराठी तरुणांना हे सांगायचं आहे की सामाजिक संवेदना आणि राजकीय विचारधारा जागृत असणं गरजेचेच आहे, पण त्याबरोबर तुमच्या करिअरला पण तितकंच महत्व द्या. भारतात पुढचं किमान एक दशक हे उत्पादन क्षेत्रात अनेक नवनवीन संधी आणणारं आहे, त्याचा फायदा घ्या. तुम्ही नोकरी करा वा व्यवसाय, उद्योजकीय मानसिकता अंगात बाणवून घ्या. आपल्या भवतालचं सोशल फॅब्रिक उसवण्याचं काम अनेक राजकीय एलिमेंट्स करत राहतील, त्यावर मात करत फक्त आपली भौतिक परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष द्या. राजकीय पक्ष तुमच्याकडे रेवड्या आणि चिंचोके टाकतील पण त्याचा उपयोग फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतील. आपली पत ही त्यापेक्षा जास्त मिळण्याची आहे हे ध्यानात असू द्या. त्यांनी फेकलेल्या ट्रॅप मध्ये न अडकता "कठोर परिश्रमाला पर्याय नाही" या पूर्वसूरींच्या उक्तीचं स्मरण करा. जगाला वेठीला धरणारे राजकीय नेते अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यांनी तयार केली भू राजकीय परिस्थिती आणि ते हे दोघेही बदलेल. पण त्याच बरोबर आता मिळालेल्या या संधीचा फायदा करून घेतला नाही तर ती पण हुकेल. लक्षात घ्या, अशीच संधी १९९५-९६ च्या सुमारास सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये आली आणि भारतातील मोठा प्रवर्ग भौतिकतेबाबत सुदैवी ठरला. पण त्या संधीत आणि उत्पादन क्षेत्राच्या संधीत एक मोठा फरक आहे. उत्पादन क्षेत्रातील संपूर्ण इको सिस्टम ची वाढ ही आपल्याच भूमीवर होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या व्हॅल्यू ऍडिशन चा फायदा हा फक्त आणि फक्त भारतातल्या लोकांना होणार आहे. 

लोहा गरम है, हथौड़ा मार दो!

Tuesday, 19 May 2026

गानू सर आणि मी एकमेकांच्या मित्र यादीत कधी आणि कसे आलो हे लक्षात नाही. पण त्यांची आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट चांगलीच आठवते. २०१४ साली गानू सर गोव्यावरून त्यांच्या एका पुण्यातल्या मित्राला घेऊन डायरेक्ट सेटको मध्ये आले होते. मी नव्हतो कंपनीत पण सुदैवाने जवळच गेलो होतो. ते परत येतो म्हणून सांगून गेले आणि त्याप्रमाणे आलेही. 

फेसबुकच्या ओळखीतून भेट हा एक त्या काळी  एक औत्सुक्याचा विषय होता. त्यात गानू सरांच्या आणि माझ्या वयात १५ एक वर्षाचा फरक. बरं, दोघांचं फिल्ड वेगळं. ते अकौंटन्सी ची प्रॅक्टिस करणारे तर मी अभियांत्रिकी क्षेत्रातील. पण केवळ फेसबुकवरील पोस्ट वाचून आणि त्यात लिहिलेले व्यावसायिक सिद्धांत आवडले म्हणून कौतुक करण्यासाठी आवर्जून आलेले गानू सर माझ्यासाठी अप्रूप होते. 

त्या भेटीनंतर असंख्य वेळा भेटी झाल्या. पण आभासी जगात झालेली ही मैत्री प्रत्यक्षात फुलण्यात मोठा सहभाग गानू सरांचा. जेव्हा कधी म्हणून ते पुण्यात आले त्यातील बहुतांश वेळा ते तर भेटलेच पण मी गोव्याला गेलो तेव्हा ही वाट वाकडी करून ते खास भेटण्यासाठी आले. माझं जे काही समाजसेवी संस्थांबरोबर काम आहे त्याचं नुसतं कौतुक न करता त्यात ते ऍक्टिव्ह पणे सहभागी झाले. 

वयाच्या तिशी पर्यंत अगदी पक्के मुंबईकर असलेले गानू त्यानंतर हार्ड कोअर गोयंकर झाले. या सगळ्या प्रवासातील किश्यांचा त्यांच्या कडे खजिना आहे. आमचे फळणीकर सर आणि वैराळकर अण्णा यांच्या सारखं अगदी. या तिघांची गप्पांची मैफल जुळवून आणायची आहे. वाचनाची प्रचंड आवड असलेला हा माणूस हजारो पुस्तकं संग्रही बाळगून आहे. त्याबरोबरच जुन्या जाणत्या शास्त्रीय संगीताच्या गायक गायिकांबरोबरच नव्या युगाच्या लोकांचं गाणं आवडलं तर त्यांचं ते मनसोक्त कौतुक करतात. आणि तिसरी आवड ड्रायव्हिंग ची आणि पर्यायाने प्रवासाची.  आता वयोपरत्वे बाहेर गावचं वाहन चालवणं कमी केलं तरी पाच एक वर्षांपूर्वी ते कार ने गोवा ते पुणे मुंबई करणाऱ्या गानू सरांनी जगभर भटकंती केली आहे. 

ते भाजप चे खंदे समर्थक च नव्हे तर आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा. त्यांचा काही मित्रवर्ग कधी विरोधी राजकीय सूर लावतात (यात बऱ्याचदा मी पण असतो)  तेव्हा ते खेद व्यक्त करतात पण राजकीय मतांतरे असली तरी सौम्य विरोधापलीकडे ते फार व्यक्त होत नाहीत. 

या माध्यमातून माझी अनेक जणांशी प्रत्यक्ष अनेक जणांशी चांगली मैत्री झाली त्यापैकी गानू सर एक. मागच्या आठवड्यात एका कॉन्फरन्स च्या निमित्ताने गोव्याला जाणं झालं मग गानू सरांना भेटणं हे स्वाभाविक होतं, त्या प्रमाणे भेटलो सुद्धा. त्यांच्याशी बोलताना ते मुंबई सोडून गोव्याला का आले याबद्दल मला जे समज आहे त्याला पुष्टी देणारं उत्तर यावं म्हणून खोदून विचारलं. पण त्यांनी त्याला शिताफीने टाळलं. पण गोव्यात आज जी बीजेपी ची सत्ता आहे तो येण्यामागे गानू सरांसारख्या पडद्यामागचा कलाकारांचा मोठा हात आहे असं मी मानतो. 

गानू सरांना त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐


Friday, 13 March 2026

 काही वर्षांपूर्वी मी एक व्हिडीओ बघितला होता. ख्रिश्चन लग्नामध्ये मुलीचे वडील, फादर समोर मुलगा-मुलगी एकमेकांना स्वीकारण्याआधी,  एक छोटं भाषण देतात. मला त्या वडिलांची कमाल वाटली. कारण त्या भाषणात विनोद होता, भावना होत्या, अभिमान होता, प्रेम होतं. आणि हे सगळं म्हणताना वडील एकदम कुल होते. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला ते ब्रिट वाटले. त्यांचं भाषण मराठीत लिहिण्याचा मोह आवरत नाही आहे. 

वडील म्हणतात 

"फिलिप, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने चालू होतात तशी ही पण चालू होते."

"काही वर्षांपूर्वी एक माणूस असतो जो चांगला बाप ही असतो आणि एव्हाना तुला हे कळलंच असेल की तो बाप म्हणजे मीच आहे. तर त्याला एक मस्त मुलगा असतो आणि कुटुंब एकंदरीत आनंदात असतं. एकेदिवशी मला कळतं की माझी बायको पुन्हा एकदा प्रेग्नन्ट झाली आहे आणि लवकरच एक बाळ आमच्या घरात येणार आहे. मग मी देवाकडे प्रार्थना केली. त्याला म्हणालो "देवा, खरंतर सगळं तुझ्यामुळे घडतं. पण येणारं बाळ जर मुलगी असेल तर माझ्यावर कृपा होईल." देवाने माझी प्रार्थना ऐकली. त्या छोट्या परीला मीच माझ्या कुशीत घेतल्यावर मला अपार आनंद झाला."

"मी त्या एंजल कडे बघत अजून एक प्रार्थना केली की "देवा, तिला तिच्या आईसारखं बनव" देवाने माझी ती ही प्रार्थना ऐकली. माझी मुलगी तिच्या आईप्रमाणे अतिशय लाघवी, प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी अशी मोठी होत होती. पण मग माझ्या लक्षात आलं की या मायलेकी माझ्याकडे लक्षच देत नव्हतं. मग मी देवाकडे प्रार्थना केली की "देवा, तिच्यात माझा थोडा तरी अंश उतरू दे." आणि गंमत म्हणजे देवाने माझी ती पण प्रार्थना ऐकली. तुला सांगतो ती ट्रक पण चालवते आणि ट्रॅक्टर सुद्धा. ती गवताचा भारा उचलून ट्रॉली मध्ये सहजपणे लोड करते आणि मनात आलं तर तंबाखू पण चघळू शकते. तुला लक्षात येत आहे की कुठला झंझावात तू गळयात अडकवून घेतो आहेस ते." 

"हे सगळं होत असताना तिचं एक स्वतःचं भावनाशील व्यक्तिमत्व घडत होतं, तिची भवतालाबद्दल मतं तयार होत होती, आणि तिची बुद्धी विकसित होत होती. मग देवाकडे पुन्हा प्रार्थना केली "आता पुरे. तू खूप तिच्यावर उपकार केले आहेस. आता अजून एक प्रार्थना. तिला तुझ्यासारखं बनव." आणि काय सांगू तुला,  त्याने ते ही ऐकलं. त्याने तिला लोकांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त केलं. ती रुग्णांची सेवा करणारी परिचारिका बनली. ती हे काम अत्यंत प्रेमाने करते. तिने अनेकांना आपल्या सेवाभावी वृत्तीने यमाच्या दारातून अक्षरश: खेचून परत आणलं आहे. आणि अनेकांनी तिचा हात आपल्या हातात धरून शांतपणे या पृथ्वीवरून एक्झिट पण घेतली आहे. तिने या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. ते करण्यासाठी तिने अनेक दिव्य कामं केली आहेत. त्यासाठी जगभर फिरली आहे, डोंगर चढून गेली आहे, रौद्र स्वरूप असलेल्या नदीच्या पात्रात छोट्या बोटीने तिने प्रवास केला आहे आणि युद्धभूमीवर आजूबाजूने बुलेट्स जात असताना जमिनीवर झोपून आपलं रुग्णसेवेचं कर्तव्य बजावलं आहे. तिच्या या वागण्यातून जगात अजून एक सुप्रीम शक्ती आहे याची जाणीव होते."

"हे सगळं छान असलं तरी काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटत आहे. मी देवाकडे पुन्हा, आणि कदाचित शेवटची प्रार्थना केली "माझ्या मुलीवर सुखाचा वर्षाव कर" मग तू तिच्या आयुष्यात आलास. तुला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसतो. त्याबद्दल मी विधात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आज मी माझ्या जवळ असणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुझ्या हातात सोपवत आहे. पण ते करण्याआधी मला तुला सांगायचं आहे की विधाता आणि मी, आम्ही दोघांनी ती आजच्या दिवसासाठी अशी सुंदर बनावी म्हणून अथक प्रयत्न केले आहेत."

"फिलिप, आज माझ्या कन्येचा हात तुझ्या हातात सोपवताना, तुझी हरकत नसेल तर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.  मी आणि विधाता असे दोघेही तिच्या पाठीशी आहोत.  तेव्हा तिच्याशी अजिबात पंगा घेऊ नकोस."



Monday, 16 February 2026

सिंगापूर-मुंबई विमान उड्डाणासाठी तयार झालं. रन वे कडे निघालं आणि घोषणा झाली "फर्स्ट ऑफिसर महंमद नजीर इज वेलकमिंग यु ऑन एस क्यू ४२२". 

झालं, माझं टाळकं सटकलं. मी ज्या विमानात प्रवास करतो आहे, त्याचा पायलट मुस्लिम? शक्यच नाही मला आता प्रवास करणं. मी बेल दाबून एअर होस्टेस ला बोलावलं आणि तिरमिरीत तिला सांगितलं की "पायलट मुस्लिम असल्यामुळे मी या विमानातून प्रवास नाही करू शकणार. विमान परत घेऊन मला विमानतळावर सोडा." माझी कीव करत एअर होस्टेस म्हणाली "सर, विमान ऑल रेडी रन वे वर खूप पुढे आलं आहे. असं नाही करता येणार." मी म्हणालो "मला काही ऐकायचं नाही आहे, मला आताच्या आता सोडा" हे बोलताना माझा आवाज चढला होता. ते ऐकून आजूबाजूचे लोक कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते. त्यात काही जणांच्या चेहऱ्यावर "कसलं येडा माणूस आहे" असा माझ्याप्रति भाव होता. तर काही जणांच्या चेहऱ्यावर माझ्या बद्दल कौतुक दिसलं. ज्यांच्या चेहऱ्यावर कौतुक दिसलं त्यांना मी म्हणालो की मला तुम्ही सपोर्ट करा. तसं म्हंटल्यावर त्यांनी डोळे मिटून झोपण्याचा अभिनय केला. 

विमान उडालं. सकाळचीच वेळ होती. खिडकीतून बघितलं तर खाली समुद्र दिसत होता. दोन मिनिटं विचार केला की पाणीच आहे खाली, उडी मारण्याचा पण धाडसी विचार माझ्या मनात आला. मग त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर हातावर हात ठेवून बसलो. दोन्ही हात माझेच आहेत त्याची काळजी घेतली. 

शेजारचा पॅसेंजर जो माझ्याकडे अपार कौतुकाने पाहत होता म्हणाला "तुमची स्टाईल आवडली. पण तुम्हाला म्हणून सांगतो. मुस्लिम नको हा प्रकार जिथे शक्य आहे तिथे वापरायचा फक्त. उदाहरणार्थ, उबर किंवा ओला कॅब ड्रायव्हर किंवा एखादं हॉटेल, झालंच तर न्हावी. ज्या वेळेस जिथे चॉईस नाही, तिथं शहाणपणा करायचा नाही." मला हा डाव आवडला. 

मुंबई एअरपोर्टवर माझा ड्रायव्हर रवी आलाच होता. आम्ही पुण्याकडे निघालो. नशीब इतकं बेकार की एक्स्प्रेस हायवे ला तुफान ट्रॅफिक. फुल जॅम. अमृतांजन पॉईंटच्या दोन एक किमी अलीकडे आमची गाडी गचके मारत थांबली. मी रविवर डाफरलो. तो म्हणाला गाडी पूर्ण चेक करून आणली होती. नशीब रस्त्याच्या डाव्या बाजूलाच गाडी होती. तिथल्या बॅरिकेड वर एक मोबाइल नंबर होता. कार रिपेअर म्हणून. रवीला म्हणालो, डायल कर आणि बोलाव त्याला. पाचच मिनिटात समोरच्या बाजूने स्कुटर वर आला. त्याचं नाव विचारलं तर अस्लम. पण विमानातल्या पॅसेंजरचं म्हणणं आठवलं. जिथं चॉईस नाही तिथं शहाणपणा चोदवायचा नाही. दहा मिनिटात त्याला दोनशे रुपये दिले कार दुरुस्तीचे आणि सुखरूप घरी पोहोचलो. 

Monday, 26 January 2026

आरंभ

काही वर्षांपूर्वी मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला होता "हे तू आपलं घर ला सुट्टीच्या दिवशी किंवा कधी रात्री पर्यंत थांबतोस. काय मिळतं तुला यातून?" म्हणजे त्याच्या लेखी या सगळ्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. मी त्याला म्हणालो "तिथे किंवा त्यासारख्या संस्थेत गेलं की आपल्या अनेक भावना टोन डाऊन होतात." म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या व्यावसायिक आयुष्यात एखादा मोठा प्रॉब्लेम आला तर तो सोडवता जाऊ शकतो याबद्दल आश्वस्त वाटतं, स्वतःबद्दल काही भ्रामक कल्पना तयार झाल्या असतील तर त्या दूर होतात, सहवेदनेचा खरा खुरा अर्थ कळतो, माणुसकी वरचा विश्वास दृढ होतो आणि याउपर या लोकांच्या हाताला हात लावून मम म्हणत जी काही कामं होतात त्याद्वारे आपल्या अकौंट मध्ये पण थोडं फार पुण्य जमा होतं हा स्वार्थी विचार पण मनात येतो. 

आज अंबिका टाकळकरच्या आरंभ संस्थेच्या नवीन वास्तूला भेट देताना अगदी हेच घडलं. २०१२ च्या सुमारास काहीतरी माझ्या डोक्यात खूळ आलं आणि पाच सहा समाजसेवी संस्थेसोबत माझा संवाद चालू झाला त्यापैकी आरंभ एक. या सर्वांशी माझी ओळख झाली तेव्हा असं काही अफाट काम समाजात चालू आहे हे पचवून घ्यायला बराच काळ गेला. आरंभ मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो, कदाचित २०१५-१६ मध्ये तेव्हा ऑटिझम च्या मुलामुलींसाठी अंबिका ने उभं केलेलं काम बघून मी स्तिमित झालो होतो. ती वास्तू, मुलंमुली, त्यांना झालेली व्याधी आणि आपल्या अथक प्रयत्नाने ऑटिझम ला पराभूत करू या निर्धाराला वाहून घेतलेली अंबिका आणि तिची टीम हे सगळं पाहून नतमस्तक झालो होतो. 

मग या ना त्या कारणाने अंबिका बरोबर बोलत गेलो. मी पहिल्यांदा जिथे गेलो होतो, तिथून तिने संभाजीनगर च्या पोद्दार शाळेच्या शेजारी संसार हलवला आणि आता तिने वाळुंज पासून पैठण बाजूला ३.५ किमी आत आरंभ साठी जी नवीन संस्था बांधली ती म्हणजे तिने संस्थेसाठी पाहिलेल्या स्वप्नांचा, स्वमग्न आणि गतिमंद मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे म्हणून उत्तम, उदात्त करता येईल त्या प्रयत्नांचा विलोभनीय आविष्कार आहे. 

मी अंबिका ला म्हणालो सुद्धा की रस्त्यावरून मला पहिल्यांदा आरंभ ची बिल्डिंग दूरवरून दिसली, तेव्हा पहिली भावना ही आली की तिने घेतलेल्या झेपेने कमालीचा आश्चर्यचकित झालो. आणि ज्या कल्पकतेने तिने आणि आर्किटेक्ट राजेश चौधरी यांनी ती देखणी वास्तू उभी केली आहे तिला तोड नाही. अर्थात हा प्रवास सोपा नव्हताच. निसर्गनिर्मित, मानवनिर्मित आणि करायचं तर उत्तमच या तिनेच स्वतःला दिलेल्या आव्हानामुळे तयार झालेल्या प्रश्नांना अंबिकाने मोठ्या निर्धाराने उत्तरं शोधली.  उदात्त, उन्नत याच्या बरोबरीने पारदर्शक कामाला कुठून तरी आर्थिक आणि मानसिक पाठबळ मिळतंच याची प्रचिती पुन्हा एकदा अंबिकाची गाथा ऐकल्यावर आली. पुढच्या महिन्यापासून आरंभ चा प्रवास या नवीन वास्तुतून नवीन उमेदीने पुढे चालू राहणार आहे. 

ममता ताई, फळणीकर सर, अशोक, गिरीश कुलकर्णी सर आणि अंबिका सारखे लोक खऱ्या अर्थाने तारे जमीन पर आहेत. ही सगळी लोक आपल्याला ओळखतात, आपुलकीने संवाद साधतात ही खूप सुखावह भावना आहे. 

अंबिका, बाळासाहेबआणि त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यासाठी पियुष मिश्रा चे शब्द उसने घेऊन म्हणतो

"आरंभ है प्रचंड"


Thursday, 1 January 2026

 नवीन वर्षाची सुरुवात करताना परत एका गोष्टीचा पुनरुच्चार करावासा वाटतो की भारतीय उत्पादन क्षेत्र हे अतिशय सकारात्मक संक्रमणातून जात आहे. किंबहुना जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर पहिल्यांदाच जगाच्या पाठीवर वेगवगेळ्या क्षेत्रात अनेक घडामोडी एकाच वेळेस घडताना दिसत आहेत. कोविड १९ झालं, रशिया युक्रेन युद्ध झालं, यूरोप मध्ये सीरिया, जॉर्डन, अफगाणिस्तान, लेबनान सारख्या देशातून असंख्य लोक आश्रित म्हणून आले, चीनची एकूणच शक्ती प्रचंड वाढली, तैवान ला त्याने खुले आव्हान दिले तर युरोप मध्ये अनेक देशात चीनने प्रचंड गुंतवणूक केली, अशी परिस्थिती तयार झाली की जग ग्लोबलायझेशन कडून लोकलायझेशन कडे वळत आहे अशी चिन्ह दिसू लागली, जगात क्रमांक एकवर असलेल्या महासत्ता असलेल्या देशाच्या लीडरशिप ने अनाकलनीय निर्णय घेतले ज्यामुळे जगाची दिशा भरकटल्यासारखी वाटली. भारतात सुद्धा बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, ज्यावर मागे लिहिलं होतं. त्याबद्दल परत लिहीत नाही, कारण मूळ विषय सोडून वेगळ्याच गोष्टींवर चर्चा सुरु होते. 

आज भारताचे उत्पादनक्षेत्र जीडीपी मध्ये १५% सहभाग नोंदवतं. येणाऱ्या दशकामध्ये हे गुणोत्तर प्रमाण २५% नेण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. 

हे जरी खरं असलं तरी जगात तयार झालेल्या अनिश्चिततेमुळे (मॅनेजमेंट जार्गन मध्ये याला VUCA जग असे संबोधतात. Volatile, Uncertain, Complex, Ambiguous), दोन गोष्टींचा व्यावसायिकाने विचार करावा असं वाटतं. एक तर जगात काय घडतं त्यापासून आपण इम्यून आहोत या गैरसमजातून बाहेर पडावं. दोन दशकांपुर्वी हे बऱ्याच अंशी खरं असेल, पण आता नाही. आणि दुसरं म्हणजे जगात हे जे काही चालू आहे त्या बदलांचा स्वीकार करणे आणि मुख्य म्हणजे त्या बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणण्यात चपळता दाखवणे. आपलं भविष्य सुरक्षित करण्याची शक्यता या मुळे तयार होईल. खात्री नाहीच. 

आपल्या उत्पादनाची आणि सेवेची गुणवत्ता यात सातत्याने सुधार आणणे हा आपला मंत्र असायला हवा. भारताची उत्पादकता आणि गुणवत्ता याबद्दल जगात फारसं चांगलं बोललं जात नाही. अर्थात शैक्षणिक, सामाजिक आणि  राजकीय भवताल हा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्पादकता या मानसिकतेला दुर्दैवाने पूरक नाही आहे. पण आजूबाजूच्या इको सिस्टम कडे दुर्लक्ष करत व्यवसायाने अंतर्गत पद्धती या इतक्या सशक्त बनवायला हव्यात की बाह्य मूलभूत अवगुणांचा जगाला विसर पडायला हवा. अवघडच आहे ते, पण घडायला हवं. 

एक प्रश्न व्यावसायिकाने सातत्याने विचारायला हवा तो म्हणजे "जगात सर्वोत्तम असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा माझ्या व्यवसायाचं नाव घेतलं जातं का?" त्याचं उत्तर देताना मुक्त पणे "हो" येत नसेल तर बाह्या सरसावून सर्वोत्तम बनण्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे. 

२०२६ मध्ये पाऊल टाकताना, पुढील दशकात व्यवसायाची भरभराट कशी होईल, याच्या पायाभरणीवर लघु आणि माध्यम उद्योगांनी जोर देण्यात शहाणपण आहे.  

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.