Friday, 31 July 2026

आमच्या मातोश्री पैसे खर्च करण्याबाबतीत तशा सढळ हाताच्या. नातू, आम्ही मुलं, सुना वगैरेंना वाढदिवशी किंवा नातवांना  परीक्षेत चांगले मार्क पडले, कुठल्या वास्तुशांती वेळी सटासट पाकीट वाटते. जवळच्या नातेवाईकांना कधी गरज पडली की पैसे काढून देते. 

पण असं असलं तरी एका बाबतीत तिला पैसे खर्च झालेले अजिबात आवडत नाही. ते म्हणजे सिटी मध्ये कुठे जायचं असेल तर तिला रिक्षा किंवा कॅब वर पैसे खर्च करणं अजिबात आवडत नाही. ते वाचवण्यासाठी ती कुठलाही आटापिटा करू शकते. म्हणजे आमच्या घरापासून (फातिमानगर) तिला रावेत ला जायचं असेल तर ती मला म्हणते की ड्रायव्हर आधी तुला सोडेल सिंहगड रोड ला आणि मग मला रावेत ला सोडून येईल. मी तिला सांगतो की माझ्या बरोबर कंपनीत येई पर्यंत तू घरून रावेतला पोहोचशील. मी तुला कॅब करून देतो. (त्याचे पैसे पण मीच भरणार असतो खरंतर). पण तिचा तोच हट्ट असतो. कॅब नको, तुला सोडल्यावर ड्रायव्हर मला सोडून येईल. मी तिला हे पण सांगतो की कंपनीतून रावेतला सोडून यायला कारचं जितक्या रुपयाचं पेट्रोल लागतं, तितकेच पैसे कॅब साठी आपल्या घरापासून रावेत साठी लागतात. पण तिला हे गणित काही केल्या कळत नाही. समहाऊ तिच्या डोक्यात ते सिटीबस चे दहा आणि पंधरा रुपयांचे तिकीट फिक्स आहेत. त्यावर ती सिटी अंतर्गत पैसे खर्च करायला नाहीच म्हणते. मी पण आता या विषयावर डोकेफोड करणं बंद केलं आहे. 

इतके दिवस मला वाटत होतं की हा प्रकार फक्त सिटी अंतर्गत प्रवासासाठी आहे. पण नुकताच मला अजून एका गोष्टीवर पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येतं हे जाणवलं. ते म्हणजे औषधं. सुदैवाने माझ्या आईची तब्येत ठणठणीत असते. फक्त आता वयोपरत्वे छोटी मोठी आजारपणं उद्भवतात. सगळ्यात आधी तर तिला डॉक्टरकडे यायचंच नसतं. "मला म्हातारीला काय धाड भरली आहे?" हे पालुपद सारखं चालू असतं. आता काही कारणासाठी तिला अक्षरश: भांडण करून डॉक्टर कडे नेलं आणि त्याने ज्या काही भरमसाठ टेस्ट सांगितल्या, त्या प्रत्येक टेस्ट करताना "या डॉक्टर ला काही कळतच नाही. इतक्या कुठं टेस्ट असतात का साध्या आजारासाठी?" हे वाक्य प्रत्येक अर्ध्या तासाने ती म्हणत होती. तब्येतीला काही झालं याच्या कम्प्लिट डिनायल मोड मध्ये. सर्व टेस्ट आणि तपासण्या झाल्यावर आणि त्यातही त्याचे चार्जेस कळल्यावर, जे मी सांगणं टाळत होतो, तिने मला ठणकावून सांगितलं. "यापुढे काहीही झालं तरी  ते आपल्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन जायचं." परवा त्या स्पेशालिस्ट डॉक्टर कडे फॉलो अप साठी गेलो होतो आणि त्याने दोन महिन्याने परत बोलावलं तर त्यालाच ऐकवलं "टेस्ट सांगणार नसाल तर येते" नशीब त्या स्पेशालिस्ट डॉक्टर च्या औषधांनी तिला थोडा आराम पडला नाहीतर माझं तिने परत कधीच ऐकलं नसतं. त्याबद्दल डॉक्टर चे आभारच मानायला हवेत. 

इथे खुर्चीत बसल्या बसल्या हात वर केला आणि छातीत थोडी कळ आली की घाबरणाऱ्या माझ्यासारख्याची आई तब्येतीच्या बाबतीत इतकी डेअर डेव्हील कशी काय हे एक मला कोडंच पडलं आहे.

Saturday, 25 July 2026

१९९७-९८ ची गोष्ट आहे. मी पवई साकी नाका रोड वर एक कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. ज्यांना भेटायचं ते मीटिंग मध्ये होते म्हणून रिसेप्शन ला बसलो होतो. तितक्यात तिथली एक मुलगी, बहुधा रिसेप्शनिस्ट, तणतणत ऑफिस मधून बाहेर आली.  समोरून एक दुसरी मुलगी आली आणि तिने रिसेप्शनिस्ट ला नजरेनेच विचारलं की काय झालं. तर रिसेप्शनिस्ट ने मधलं बोट दाखवून सांगितलं की वाट लागली. तर समोरून आलेली मुलगी म्हणाली "आता परत काही काम सांगितलं ना त्या भाड्याने तर बांबू सर त्याच्यात". 

पहिल्यांदा ऐकायला विचित्र वाटलं तरी मला बॉस ने काय काम सांगितलं, त्याचा स्वभाव कसा आहे हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे जजमेंटल न होता मी आपलं मासिक वाचत बसलो. अर्थात मी पण तेव्हा तिशीत होतो आणि त्या मुलीही समवयीन होत्या. त्यानंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा हे ही लक्षात आलं की तरुणाईची जडणघडण तुमच्या भावतालावर अवलंबून असते. एक काळ होता, पॉलिटेक्निक पासून ते अगदी एस के एफ सोडेपर्यंत वाक्य सुरुवात करताना किंवा संपवताना शिवी यायचीच. आजूबाजूचा माहोलच तसा होता की आपण काही वावगं बोलतो आहे असं वाटायचं नाही. मग हळूहळू भवताल बदलत गेला, घरात मूल जन्माला आलं आणि भाषा बदलत गेली. आता शिवी द्यायची म्हंटलं तरी तोंडातून शब्द फुटत नाही. 

हे आठवण्याचं कारण म्हणजे आताच्या आंदोलनातील जेन झी ची भाषा.लोक असं बोलत होते जणू ही तरुणाई कुठल्यातरी दुसऱ्या ग्रहावरून आली होती. अरे, ही आपलीच पोरं होती. ते ज्या भवतालात मोठी झाली तो एक समाज म्हणून आपणच बनवला आहे. तुम्हीच त्यांना घडवलं आहे. ही तीच तरुणाई आहे ज्यांचा जन्म इंटरनेट च्या काळात झाला आहे. सोशल मीडियावर बोलली जाणारी भाषा, ओ टी टी वर सरसकट ऐकल्या जाणाऱ्या शिव्या हे स्वीकारलं गेलं आहे. आताच ज्या पिक्चरची भरमसाठ स्तुती झाली त्या धुरंधर चे डायलॉग्ज सहकुटुंब सहपरिवार आपण ऐकले आणि त्यावर टाळ्या पण पिटल्या. माझ्या पिढीने जे सामाजिक वातावरण तयार केलं तिथेच आजच्या तरुणाईची भाषा पण रुजली, इतर वेळेस आपण स्वीकारली. जेव्हा आता ज्या सरकारची भलामण करतो त्याच्या विरुद्ध वापरली गेली तेव्हा मात्र आपल्याला टोचली.  

हे झालं भाषेचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या तरुणाईचा जन्म झाला आणि गेल्या बारा वर्षातील निवडणुकीत ते फर्स्ट टाइम व्होटर झाले होते. बी जे पी ला भरभरून मतं दिली होती. तेव्हा त्यांचं वागणं गोड वाटलं होतं. २०१४ च्या विजयानंतर अनेक आघाडीवर भ्रम निरस झाला तेव्हा प्रतिवाद होता की साठ वर्षाची घाण आहे, थोडा वेळ तर लागणारच. असं म्हणता म्हणता बारा वर्षे झाली. एका तपा नंतर सुद्धा जेव्हा लक्षात आलं की समाजाचं क्वालिटी ऑफ लाईफ हे सुधारणे तर दूरच पण खालावत चाललं आहे, लॉ अँड ऑर्डर चा बट्ट्याबोळ झालेला दिसतोय, रस्ते/पाणी/स्वच्छता/वीज/शिक्षण यात सुधारणा करण्याऐवजी इतकी ब्रूट मेजोरीटी असूनही अजूनही सरकार चालवणारा पक्ष धार्मिक ध्रुवीकरण आणि मंदिर यातच मश्गुल आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यात सुधारणा होण्याचे दूरवर चिन्ह दिसत नाही आहे. ज्या भ्रष्टचाराचा मुद्दा घेऊन सत्ता कमावली तो तर तसाच आहे, बारा वर्षांपूर्वी सोन्याची चेन घालून नेत्यांचे पोस्टर दिसायचे ते तर आजही दिसत आहेत, गावातल्या ट्राफिक ची कंडिशन अजून भीषण झाली आहे. 

हे मान्य आहे की या सरकारच्या ध्येय धोरणांमुळे आणि बदलत्या भू राजकीय परिस्थितीमुळे अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत पण त्या संधीचं सोनं करण्यासाठीची मानसिकता, इको सिस्टम, सोशल फॅब्रिक नसेल तर जितक्या वेगाने या संधी आल्या त्याच्या दुप्पट वेगाने त्या नाहीशा होण्याची शक्यता आहे. 

नशीब हे की तरुणाई आज निर्नायकी होती, असंघटित होती. स्ट्रक्चर्ड अप्रोच असला असता तर काय झालं असता याचा विचार करावा. 

Sunday, 19 July 2026

मागच्याच महिन्यात अमेरिकेत स्पेस एक्स चा आय पी ओ आला आणि एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत तर होताच पण त्याबरोबर तो पहिला ट्रिलियनेअर झाला. त्याच वेळेस भारतात अगदी त्या तोडीची नाही पण तितक्याच महत्वाची एक गोष्ट घडत होती. 

आय आय टी खरगपूर आणि आय आय टी मद्रास मधून ड्युअल डिग्री घेऊन बाहेर पडलेले आणि नंतर इस्रो मध्ये आपली उमेदीची सहा एक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या पवनकुमार चंदना आणि नागभारत डोका यांनी स्कायरूट एरोस्पेस या अभिनव उद्योगाची हैद्राबाद मध्ये २०१८ साली स्थापना केली. अवकाश ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी न राहता आम जनतेला त्यातून मिळणारे फायदे मिळावेत या उद्देशाने या दोन अत्यंत ध्येयवेड्या अभियंत्यांनी काम चालू केलं. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे दोन अर्ध्वयु विक्रम साराभाई आणि ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारख्या दिग्गजांची लिगसी ला पुढे नेत त्यांनी धाडसी स्पेस प्रॉडक्ट्स आपल्या अभिनव कल्पनेतून त्यांनी साकार केले. 

१८ जुलै २०२६ ला त्यांनी "मिशन आगमन" या प्रोजेक्टद्वारे विक्रम १ नावाचं रॉकेट श्रीहरिकोटा या स्पेस सेंटर वरून अवकाशात झेपावलं. स्पेस कार्यक्रम हे अनेक देशांमध्ये आजही सरकारी माध्यमातून राबवले जातात. त्यात असणारे अवाढव्य खर्च आणि गोपनीयता यामुळे ते साहजिकच आहे. पण सरकारी संस्था बरोबर खाजगिकरणातून असे प्रोजेक्ट यशस्वी करता येतात हे अमेरिका आणि चीन पाठोपाठ भारताने दाखवून दिले आहे. 

स्कायरुट ही एक अजब सक्सेस स्टोरी आहे. १००० लोक काम करणाऱ्या या कंपनीत सरासरी वय फक्त २८ आहे. या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत आणि अवघड प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवले यात चंदना आणि डोका यांची नेतृत्व गुणांची प्रचिती येते. आधीच्या अनेक चांद्रयान आणि मंगल यान प्रोजेक्ट प्रमाणे इथेही कमी प्रोजेक्ट कॉस्ट आणि विक्रमी वेळेत हा प्रकल्प स्कायरुटने पूर्ण केला. रु १००० कोटी फंडिंग मिळवणाऱ्या स्कायरुट चं व्हॅल्यूएशन रु दहा हजार कोटीपर्यंत पोहचले आहे. हे दोन संस्थापक आणि स्कायरुट सर्व तरुण एम्प्लॉईज हे अभिनंदनास पात्र आहेत. 

याबद्दल वाचताना इन्स्पेस या भारतीय शासन प्रणित स्वायत्त संस्थेबाबत पण कळलं. भारतीय खाजगी उद्योगांना एरोस्पेस क्षेत्राची दरवाजे उघडे करून देण्यासाठी या नोडल एजन्सीची स्थापना झाली. हे ही वाचून आनंद झाला की त्याचे अध्यक्ष मा पवनकुमार गोएंका आहेत. भारताची वाहन क्षेत्रातील अग्रणी कंपनी महिंद्रा चा कायापालट करण्यात गोएंका साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेस संस्था नवनवीन आयाम प्रस्थापित करेल यात शंका नाही.

भारतात अनेक सन राईज उद्योग उदयाला येत आहेत. एरोस्पेस हे येणाऱ्या काळात अग्रणी असणार आहे, हे आता सिद्ध झाले आहे. 

(संदर्भ: न्यूजपेपर्स, स्कायरुट यांची वेबसाईट, फाउंडर्स चे लिंक्ड इन प्रोफाईल्स) 


Friday, 26 June 2026

मंडलिक आडनाव सर्वच जातीत असल्यामुळे दोन चार गंमती झाल्या आहेत. त्यातलीच एक. 

काही वर्षांपूर्वी मला एक जण अप्रोच झाले की उद्योजकतेवर ऑन लाईन बोलायचं होतं. त्यांचा फेसबुकवर ग्रुप होता, असेलही अजून. आणि तो जातीवरून ग्रुप बनवला होता. उद्योजकतेवर बोलायचं होतं, त्यामुळे मी नकार द्यायचा काही प्रश्नच नव्हता. तर आयोजकांनी मला सांगितलं की मला त्या ग्रुपचा मेंबर बनावं लागेल. मी त्यांना म्हणालो की मी कुठल्याच ग्रुप चा मेंबर नाही आहे. ते म्हणाले, मेंबर तर व्हावं लागेल. मी त्यांना खरं कारण सांगितलं की तुमचा ग्रुप एका विशिष्ट जातीच्या लोकांसाठी बनला आहे आणि माझी जात ती नाही आहे. तर ग्रुप चा मेंबर झालेलं चालेल का तुम्हाला? तर फोन वर एकदम शांतता पसरली. मग ते म्हणाले की ऑनलाइन सेशन होईपर्यंत मेंबर रहा आणि नंतर ग्रुप सोडला तरी चालेल. मी अजून एक प्रश्न विचारला की मी तुमच्या जातीचा नाही आहे, तर तुमच्या ऑडियन्स ला चालेल ना मी बोललेलं. त्यांनी होकार दिल्यावर मग मी ग्रुप चा मेंबर झालो आणि ऑनलाइन सेशन पार पडलं. 

सेशन झाल्यावर मी काही दिवस ग्रुप चा मेंबर होतो. तिथल्या अनेक पोस्ट पाहिल्या. जात निर्मूलन व्हायला पाहिजे अशा इथे डिंग्या मारणारे अनेक जण तिथं मेंबर होते. ज्या पोस्ट्स वरून इतर जातींची ते टिंगल उडवतात त्या धर्तीच्या अनेक पोस्ट मी त्या ग्रुप वर पाहिल्या. त्याला समर्थन देणारी लोक बघून आश्चर्य पण वाटलं. काही दिवसांनी मनोरंजन बोअर झाल्यावर मी तो ग्रुप सोडला. 

माझे एक आडनाव बंधू खास कंपनीत भेटायला आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. या ना त्या मार्गाने ते शोधत होते की माझी आणि त्यांची जात सेम आहे का ते. शेवटी रिव्हील झालं की ती वेगळी आहे. ते निराश होऊन निरोप घेऊन गेले. नंतर त्यांनी मला फ्रेंड लिस्ट मधून पण उडवलं. 

मध्ये मी माझ्या पुतण्याबद्दल एक पोस्ट टाकली होती. पोस्ट कसली, तो लग्नाचा उमेदवार आहे हे जाहीरच केलं होतं. ते वाचून एका मुलीच्या आईचा मेसेज आला की त्यांची मुलगी लग्नाची आहे आणि आडनावावरून आम्ही त्यांच्या जातीचा आहे असं वाटतंय, म्हणून मेसेज केला. मी त्यांना सांगितलं की आम्ही त्या जातीचे नाही आहोत, पण आंतरजातीय लग्नाची तयारी आहे. अच्छा म्हणून त्या गायब झाल्या. 😊 आता चेक केलं तर त्या पण लिस्ट मध्ये नाही आहेत. 

जात केंद्रस्थानी न ठेवता प्रत्यक्ष जीवनात जगणं सहज शक्य आहे. सोशल मीडियावर मात्र थोडं अवघडच जातं. 

Wednesday, 24 June 2026

कोरियन मुलगी

दक्षिण कोरिया मध्ये आलो आहे. एका कंपनीबरोबर व्यावसायिक चर्चा करण्यासाठी. फोटो मध्ये जिच्याबरोबर आहे ती बिझिनेस ओनर ची मुलगी आहे. तिशीच्या आतच आहे. इतक्या तरुण वयाच्या मुलीची व्यवसायाची, जागतिक, सामाजिक, धार्मिक, तात्विक समज मात्र चकित करणारी आहे. मीटिंग मध्ये आपल्या वडिलांचा उल्लेख करताना ती आवर्जून मिस्टर शीम असा करते. पण हे करताना ती लेकीचं नातं पण अगदी प्रेमळ पणाने निभावत असते. बोलताना जाणवतं की ती अत्यंत प्रामाणिक आहे, तिचा सेन्स ऑफ ह्युमर उच्च दर्जाचा आहे. कोरियन आहे पण तरी तिचं इंग्लिश एकदम भारी आहे. प्रचंड कष्टाळू आहे. मला माझ्या ट्रॅव्हेल प्लॅन चं फार कौतुक असतं पण तिचे ट्रॅव्हेल प्लॅन पाहून मी स्तिमित झालो. जगभर ती सेल्स साठी फिरत असते. मी भेटलो, त्याच्या काही दिवस ती टर्की ला ३ आठवडे राहून आली होती. मला भेटल्यावर रात्री साडे दहाच्या ट्रेन ने एकटी बुसान हुन सोल ला जाणार होती आणि रात्री एक ला पोहचणार होती. कारण दुसऱ्या दिवशी साडे नऊ वाजता तिची कस्टमर बरोबर मीटिंग होती. 

तिने आणि तिच्या कुटुंबाने केलेला पाहुणचार एका वेगळ्याच लेव्हलचा होता. ती पुढच्या आठवड्यात पुण्याला येणार आहे. तिने स्टँडर्ड इतकं वरचं ठेवलं आहे की त्याची बरोबरी करताना माझा कस लागणार आहे. 

त्यांच्या कंपनीबरोबर व्यावसायिक रिलेशन्स जर प्रस्थापित झाले तर हीच मुलगी आमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे आणि मला खात्री आहे की जग पाहिलेल्या या मुलीकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. 

Thursday, 4 June 2026

 परवाच्या इ व्ही च्या पोस्ट मध्ये अनेक जणांनी मीरा कारचा आणि पर्यायाने पंडितराव कुलकर्णी यांचा उल्लेख केला. अर्थात नेट वर मीरा कार ही शंकर राव कुलकर्णी यांनी बनवली आहे असा उल्लेख आहे. पण मीरा चं चित्र आणि उल्लेख हे आजही फाय च्या वेब साईट वर आहे. म्हणजे पंडितराव आणि शंकरराव कुलकर्णी हे अतिशय जवळचे नातेवाईक असणार आहेत. तर मी आज लिहिणार आहे ते फाय बद्दल. फ्युएल इंस्ट्रुमेंट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (फाय) बद्दल. अतिशय  प्रोग्रेसिव्ह ग्रुप असला तरी दुर्दैवाने आमचे फार काही बिझिनेस रिलेशन्स फाय ग्रुप बरोबर एस्टॅब्लिश झाले नाही. त्यामुळे मला फक्त दोन-तीन वेळाच त्यांच्याकडे जाता आलं. त्यामुळे मी जे लिहिणार आहे ते मी जे अनुभवलं आणि थोड्या फार ऐकीव माहितीवर. 

फाय ग्रुप जरी १९५३ मध्ये स्थापित झाला तरी तो नावारूपाला आला तो पंडितराव कुलकर्णी यांच्या लीडरशिपखाली. एकुणातच हे कुलकर्णी कुटुंबीय उद्योजकतेचा मापदंड ठरलं आहे. मी जेव्हा फाय ग्रुप मध्ये गेलो तेव्हा पंडितराव हे व्यवसायात  जास्त ऍक्टिव्ह नव्हते. पण ज्यांना मी भेटलो होतो ते पंडितरावांबद्दल बोलताना थकत नव्हते. त्यांचं उच्च दर्जाचं तांत्रिक ज्ञान, इचलकरंजी सारख्या छोट्या गावात त्यांनी वसवलेला अत्यंत प्रागितिक औद्योगिक समूह, त्या एका ग्रुप मधून बाहेर पडून तयार झालेले असंख्य उद्योजक, त्यांनी समाजासाठी केलेले अनेक प्रकल्प, फाय फाउंडेशन अवॉर्ड्स अशा एक ना अनेक चित्तरकथा मी ऐकल्या आणि स्तिमित झालो होतो. 

अत्यंत साध्या वेशात राहणाऱ्या पंडितरावांकडे अनेक परेदशी डेलिगेट्स वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स वर उत्तर शोधण्यासाठी इचलकरंजी त यायचे. तुम्ही समजू शकता की इचलकरंजी फार व्यवस्थित जगाशी कनेक्ट नव्हतं, पण त्या काळात सुद्धा जगभरातून लोक फाय ग्रुप ला व्हिजिट करायचे. 

फाय ग्रुप बद्दल आदर आमच्या मनात अजून एका कारणासाठी आहे. आम्ही ज्या असोसिएशनचे सभासद आहोत ती आय एम टी एम ए, इमटेक्स म्हणून एक औद्योगिक प्रदर्शन भरवते. त्या एक्झिबिशन मध्ये फाय ग्रुप टेक्निकली उत्कृष्ट डिझाईन केलेल्या मशीन ला अवॉर्ड देते. फाय फाउंडेशन चं अवॉर्ड इमटेक्स मध्ये मिळणं हे त्या डिझाईनला मिळालेली सर्वात भारी पोचपावती समजली जाते. भारतीय मशीन टूल बिल्डर्स बद्दल फाय फाउंडेशन चं असणारं ममत्व हे अजून एका वेगळ्या कारणासाठी आहे. इंडियन मशीन टूल बिल्डर्सचे अर्ध्वयू समजले जाणारे साठे साहेबांचे पंडितराव कुलकर्णी यांच्याबरोबर अत्यंत सौहार्दाचे संबन्ध होते. इन फॅक्ट अशी वंदता आहे की साठे साहेबांच्या प्रगती ऑटोमेशन सुरु आणि एस्टॅब्लिश होण्यामागे पंडितरावांचा सक्रिय सहभाग होता. प्रगती ऑटोमेशन ने जगभरात आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या प्रॉडक्टस चा झेंडा रोवला ती कथा भारतीय औद्योगिक क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहे. 

मायको बॉश मध्ये काम करणाऱ्या माझ्या एका जवळच्या मित्राने पंडितरावांचा किस्सा सांगितला होता. डिझेल पंप मध्ये लागणारा एक क्रिटिकल कॉम्पोनंट होता ज्याचं मशिनिंग करायला २७ सेकंद लागत होते. लाखांमध्ये लागणाऱ्या या प्रॉडक्ट ची प्रॉडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी इंजिनियर जंग जंग पछाडत होते. फाय ग्रुप त्यांच्याबरोबर कनेक्ट होताच. पंडितरावांकडे तो प्रॉब्लेम घेऊन गेले. काही महिन्यात २७ सेकंद लागणारा कॉम्पोनंट ७ सेकंदात बाहेर पडू लागला. फाय ग्रुप बॉशचा एक महत्वाचा सप्लायर बनला हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पंडितरावांचं हे जे वरच्या लेव्हलचं तांत्रिक ज्ञान होतं ते इतकं प्रसिद्ध झालं की क्वालिटी बद्दल पराकोटीचं आग्रही असणाऱ्या जापनीज लोकांमध्ये पण त्यांचं नाव झालं. कि हिन नावाच्या प्रसिद्ध कार्ब्युरेटर उत्पादकाने फाय ग्रुप बरोबर सामंजस्य करार करून चाकण इथे प्लांट टाकला. 

आमच्या इमटेक्स च्या शिवाय फाय फाउंडेशन वेगवेगळे अवॉर्ड्स देतं. त्या पुरस्कर्थ्यांची नावं जर बघितली तर त्याचं महत्व आपल्या लक्षात येईल. त्यांच्याबद्दल वाचताना मला हे पण कळलं की ते भारतातील पहिले (आणि कदाचित एकमेव) लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. 

अर्थात उद्योजकांच्या प्रति जी अनास्था आपण सिद्धांतावर चालणाऱ्या अनेकांबद्दल आपण बघतो ती माझ्या मते पंडितराव कुलकर्णी यांच्या वाटेला पण आली. इचलकरंजी आणि फारतर महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे पण त्या पलीकडे ते जावं असं काही आपण फारसं काही केलं नाही. नेट वर पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. 

कै पंडितराव कुलकर्णी आणि फाय ग्रुप यांना दिल से सॅल्यूट!


Tuesday, 2 June 2026

तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडे एक भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक कार होती. आणि मी ते पुष्पक विमानसारखं कुठली तरी पुराणातील गोष्ट सांगत नाही आहे तर ही गोष्ट आहे २००० च्या आसपासची. सिटी आहे बंगलोर आणि कंपनीचं नाव आहे मैनी. त्यांच्या इलेक्ट्रिक कारचं नाव होतं रेवा. चेतन मैनी नावाच्या तरुण इंजिनियर ने १९९४ च्या आसपास रिसर्च करून ही कार बनवली होती. रेवा बंगलोर च्या रस्त्यावर तर दिसायचीच पण रिपोर्ट सांगतं की जगभरात २६ देशांमध्ये ती निर्यात पण झाली होती. 

जेव्हा जग म्हणत होतं की इलेक्ट्रिक कार हे दिवास्वप्न आहे तेव्हा रेवा शांतपणे आपला मार्गक्रमण करत होती. २००४ च्या आसपास सुरु झालेल्या टेस्ला मुळे अचानक इलेक्ट्रिक कारची जगभरात हवा चालू झाली. इनफॅक्ट रेवा ची दोन वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे अर्थात ती इलेक्ट्रिक होती आणि दुसरं म्हणजे २००९ साली लॉन्च झालेल्या पण नंतर एक अपयशी ठरलेल्या नॅनो इतकीच तिची साईझ होती. 

आज इ व्ही स्टार्ट अप चा बोलबाला चालू आहे. पण नव्वदीत चालू झालेल्या मैनी च्या रेवा ला महिंद्रा ने २०१० साली अंगीकृत केलं आणि तीच कार इ २ ओ म्हणून ती कार नव्याने लॉन्च केली. आज महिंद्रा इलेक्ट्रिक कार मध्ये धूम करत आहे, पण त्याची सुरुवात इ २ ओ ने झाली आहे असं म्हणायला स्कोप आहे. 

ज्या टेस्ला आणि पर्यायाने इलॉन मस्क चं आज जग गुणगान गात आहे पण त्याने टेस्ला मध्ये शिरकाव करण्याच्या आधी भारतात त्या टेक्नॉलॉजीवर आधारित एक पूर्ण कार भारतीय रस्त्यावर पळत होती. पण आपलं दुर्दैव असं की त्या काळाच्या पुढे असलेल्या टॉक्नॉलॉजीवर ना शासनाने विश्वास ठेवला ना भारतीय समाजाने. आणि कुणास ठाऊक, खुद्द प्रमोटर सुद्धा त्याच्या संशोधनात मागे पडले, कारण पुढे महिंद्रा ने सुद्धा ते ई २ ओ मॉडेल बंद केलं. 

असे प्रॉडक्ट यशस्वी करण्यासाठी जी सर्वांगीण उद्योजकीय वातावरण लागतं तिची आपल्याकडे वानवा आहे. अमेरिका जर आज अत्यंत प्रगत देश झाला आहे त्यामध्ये या उद्योजकीय मानसिकतेचा मोठा सहभाग आहे.