Tuesday 31 March 2015

Superpower

वर्ल्ड कप च्या निमित्ताने परत एक प्रश्न माझ्या एका मित्राने उपस्थित केला, तो म्हणजे कंपन्यांचं अर्थकारण वर्ल्ड कप चा रिजल्ट बदलू शकतो का? भारताचा सेमी मध्येच पराभव झाला, त्यामुळे आपसूक च या निकषाला पूर्णविराम मिळाला. पण जर भारत जिंकला असता तर हा मुद्दा फारच चवीने चघळला गेला असता हे नक्की.

मला स्वत:ला हि थिअरि अजिबात झेपत नाही. मागे सुद्धा या विषयावर लिहिलं होतं. डिफेन्स, फार्मा आणि agri ह्या तीन इंडस्ट्री सोडल्या तर बाकी कुठल्याही उत्पादनाच्या बाबतीत आपण जगाच्या खिजगणतीत हि नाही आहोत. हा मुद्दा चर्चेत पहिल्यांदा आला होता तो ऐश्वर्या अन सुश्मिता पाठोपाठ ४ एक वर्षात युक्ता अन डायना मिस वर्ल्ड अन मिस युनिवर्स जिंकल्या होत्या तेव्हा. खूप लोकांनी तारे तोडले होते. पण मग गेले १७ वर्ष हे अवार्ड भारताच्या वाटेला आलं नाही आहे. मग काय म्हणायचं यावर. आपला मार्केट saturate झालं?एवढया अगडबंब देशाचं ब्युटी product चं मार्केट मला नाही वाटत ४ ते ५ हजार कोटी पेक्षा जास्त असेल. युरोप चे दोन तीन देश एकत्र आले तरी याच्यापेक्षा जास्त खप असेल.

मुळात आपल्याला आपली लोकसंख्या जास्त आहे, याची खरं तर लाज वाटायला हवी, याचा वृथा अभिमान वाटतो. अहो पण नुसती लोकसंख्या जास्त असून फायदा नाही आहे, तर त्या लोकांकडे पैसे हवेत ना खर्च करायला. आणि ते पैसे हवेत का, खर्च केलेच पाहिजे का हे भांडवलवाद, समाजवाद, मार्क्सवाद यातील वादाचे मुद्दे आहेत. पण मग आपण स्वत:ला भ्रमित ठेवणारे मुद्दे हिरीरीने का मांडतो.?

३४० बिलियन डॉलर्स आमची परकीय गंगाजळी झाली. हं मग. अरे ती apple कंपनी. तिचा तीन महिन्याचा टर्न ओव्हर ७५ बिलियन डॉलर झाला. म्हणजे वर्षाचा किती तर ३०० बिलियन डॉलर्स. आणि आपण आपली पाठ थोपटतो. Forex at all time high. म्हणून. गंमत म्हणून सर्च मारला कॉर्पोरेट reserve चा. तर हे वाक्य पहा. As Moody details, the combined cash of Apple, Microsoft, Google, Verizon Communications and Pfizer climbed to $404 billion. 

मी हे नाही म्हणत कि हे achieve करा. मी हे म्हणतो कि आपला  ढोल  वाजवू नका. ढोल तर लांबचा, टिमकी पण नका वाजवू. नको तो नंबर गेम. खूप काम करावं लागणार आहे. सामाजिकदृष्ट्या सक्षम बनायचं आहे. असं केलं तर २०२५ ला पाठ थोपटण्याची शक्यता आहे, नाहीतर तेव्हाही हेच……… India has potential to become superpower.






Saturday 28 March 2015

निश्चिंत

१ सप्टेंबर १९९४. हॉटेल हर्ष. शिवाजीनगर बंगलोर. SKF ची सुखाची नोकरी सोडून बंगलोर ला जॉईन व्हायला आलो होतो. स्टार्ट अप कंपनी. भविष्याची चिंता. कुंद संध्याकाळ. मी विचार केला, जरा चालत फिरावं. म्हणून निघालो. विचारांच्या गर्तेत  चिन्नास्वामी स्टेडीयम च्या बाजूने चालत होतो. संध्याकाळचे ७-७:१५ झाले असतील. रस्त्यावर अत्यंत तुरळक गर्दी.

अचानक आकाशात ढग भरून आले. आणि क्षणार्धात राप राप असा पाऊस चालू झाला. मला त्या पावसापासून लपायला कुठे आसरा दिसत नव्हता. डावीकडे बघतो तो मिलिटरी बराक. धावत धावत एका बराकी त जाऊन उभा राहिलो. पावसानं एव्हाना चांगलाच वेग पकडला होता.

मिलिटरी चे जवान माझ्याकडे पाहत होते. मी आपलं त्यांच्या कडे पाहत कसं नुसं हसत होतो. एक दोघं बोललेही "अंदर आईये" मी म्हणालो "यही ठीक हू"

पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. मी थांबून एव्हाना तास सव्वातास झाला होता. एक जवान आला आणि म्हणाला "आता मोठया साहेबांचा राउंड असेल. तू आत येउन बस. त्यांनी एकदा उभं राहायची परवानगी नाकारली तर आम्ही कुणी काही बोलू शकणार नाही." मी मुकाटपणे आत गेलो. एका जवानाने टॉवेल दिला, म्हणाला "डोकं पुसून घे."

एकेक जवान माझ्याशी येउन गप्पा मारू लागला. हि पलटण उत्तर प्रदेश ची होती बहुधा. सगळे हिंदी भाषिक. चेन्नई बाजूला पोस्टिंग होतं त्याचं. वेगवेगळ्या ठिकाणी. काही IPKF ला जाऊन आली होती. बर्याच दिवसांनी एकत्र आले होते हिंदीभाषिक. खुश होते. एक दोघांनी माझ्या कुटुंबाविषयी विचारलं. आपुलकीने चौकशी चालू केली. कुठे उतरला आहेस वैगेरे. मी सगळं सांगितलं. 

पाऊस काही थांबत नव्हता.

त्यांची जेवणाची वेळ झाली. मला म्हणाले "दोस्त, अभी यही खाना खाकर जाना." मी नाही म्हणालो. तर म्हणाले "स्टार हॉटेलमे  रह्नेवाला तू. ये खाना अच्छा नही लगेगा" माझा नाईलाज झाला. मन नाही मोडू शकलो.

त्यांनी त्यांचे ओल्ड monk चे टमलर काढले. मला पण एकाने ग्लासात भरून दिली, Old Monk. माझा एक दोन ग्लास संपेपर्यंत त्यांनी किती घेतले मला माहित नाही. पण एक दोघं खूप भावूक झाले. कुणी मला त्यांचा छोटा भाऊ म्हणू लागले. तर कुणाला माझ्याकडे बघून गावाकडच्या मित्राची आठवण येऊ लागली. एका जवानाने मला बायकोचा फोटो खिशात ठेवतो का म्हणून विचारले. खरं तर त्याला त्याच्या बायकोचा अन लहान पोरीचा फोटो मला दाखवायचा होता. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात मला त्याच्या बायको पोरीचं प्रतिबिंब दिसलं. बहुधा ते सगळेच जवान बरेच दिवसात फ्यामिली ला भेटले नसावेत.

एव्हाना जेवण आलं. कुणी कुणाला न सांगता माझ्यासाठी एक जवान ताट घेऊन आला होता. चपाती, भात अन मटन. मटणाची चव भन्नाट लागली. माझ्याशी बोलून भावूक झालेले गप गुमान डोकं खाली घालून जेवू लागले.

आता पाऊस ही थांबला होता. मी म्हणालो "निघतो आता" तर व्हरांड्यात एक जण सायकल घेऊन आला आणि म्हणाला "अभी इतनी रात चलते कहा जाते हो. ये सायकल लेकर जाईये. कल लौटा देना" मी म्हणालो "अरे नको, मी जाईल चालत" हो नाही करता करता, ते मला निरोप देता झाले. पाच सहा जणांनी मला मिठी मारली. चार तासाच्या वास्तव्यात असा माहोल झाला कि मी कातर कातर झालो. बहुधा ते पण झाले असावेत. इतक्या कमी वेळात अशी मैत्री आधी कधी झाली नाही आणि नंतर तर नाहीच नाही.

रात्री एकटा चालत परत हॉटेल वर आलो.

आकाशातील मळभ एव्हाना दूर झाले होते. तारे लुकलुकत होते.

मी आता भविष्याबद्दल निश्चिंत झालो होतो.

Thursday 26 March 2015

दर्शन

मी अधूनमधून मॉर्नींग वॉकतो. मोठी चक्कर पडते. ६-७ किमीची. घर-साळुंखेविहार-रामटेकडी-एसआरपीएफ-घर. मधे SRPF च्या आवारात एक मंदिर लागतं. मी मॉर्नींग वॉकला पारोसे जात असल्यामुळे मंदिरात जात नाही. त्यामुळे आत कोणता देव राहतो माहित नाही. मंदिराच्या बाहेर शिवार आहे. तिथे बाकडी ठेवली आहेत. सिमेंटची. मी त्यावर बसतो. गर्दभावलोकन करतो.

परवा रविवारी एक गोष्ट घडली.  सकाळचे ६:३० झाले होते. मी मंदिराच्या आंगणात पोहोचलो. बाहेर बाकडंयावर बसलो. ५ मिनीटे. गर्दभाला अवलोकन करायला ५ मिनीटे पुरतात. मी उठलो अन निघालो.

तेव्हढ्यात मंदिरातून एक साधारण सत्तरीचा माणूस दुडूदुडू चालत आला. पांढरा शर्ट, पांढरं धोतर आणि डोक्यावर पांढरीच टोपी. सव्वापाच फूट उंची. कपाळावर गंध. चेहर्यावर प्रसन्न हास्य. आधी कधी पाहिलं नव्हतं त्यांना. का कुणास ठाव, माझ्यातल्या मीपणाची पुटं गळून पडली. तसंही सकाळी ६:३० वाजता अहंकाराचा ज्वर चढ़त नाही.

मला काय झालं माहित नाही, पण मी त्या माणसाच्या समोर गेलो. त्याचं प्रसन्न हास्य तसंच होतं. तुळशी वृंदावनाच्या शेजारी उभे आम्ही. मी झटकन त्याच्या पाया पडलो. मागे लिहीलं तसं "आपसूक घडतो तो नमस्कार, नाहीतर पाठीला व्यायाम"

तर ते सत्तरीचे गृहस्थही माझ्या पटकन पाया पडले.

मी चरकलो. इतका वयाने मोठा माणूस, पाया का पडला. तरी शब्द नाही फुटला, तोंडातून. पण त्या माणसाच्या डोळ्यात प्रेमभाव झळकत होता. तो दिसला.

मी आणि तो माणूस कमानीपर्यंत चालत होतो. तिथून त्याला डावीकडे जायचं होतं, मला उजवीकडे. आम्ही निघालो.

चार पावलं चालल्यावर मी थांबलो. वळलो. तर तो माणूस तो माणूस ही काही अंतरावर थांबला होता. अन आता माझ्याकडे बघत होता. जणू काही त्याला माहित होतं, मी वळून बघणार म्हणून.

सेकंदात आम्ही परत निघालो, आपापल्या रस्त्याने.

तेव्हापासून विचार करतोय, वळून बघितलं तेव्हा तो माणूस दोन्ही हात कमरेवर ठेवून का उभा होता?




Tuesday 24 March 2015

सलाम

एखाद्यानं सांगावं आणि मी डोकं झुकवावं अशा काही मोजक्या व्यक्ती आहेत. न्हावी हा त्यापैकी एक. तो, पहिला रविवार कारंजा नासिकचा. दुसरा औरंगाबादचा असावा. पण त्या काळात माझं स्वत:कडे इतकं कमी लक्ष होतं की तो मला आठवत नाही. तिसरा अशोकनगरचा शामभाऊ आणि आताचे रिझवानभाई. लहानपणी नशिकला रविवार कारंज्यावर कोपर्यावर न्हाव्याचं दुकान होतं. बाबा तिथे आम्हाला सोडायचे. एकच सांगून जायचे "बारीक करा". हे बारीक करा सांगणं डोक्यात इतकं फिट बसलं आहे की आजही मी तीच विनंती करतो. हो, मग वस्तरा, कात्री वैगेरे भीषण हत्यारं हातात असणार्याला आपण फक्त विनंती करू शकतो, आज्ञा नाही. पण एक आहे, हत्यारांचा धाक असला तरी इतक्या प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवण्याचे मोहक काम अजून कुणी दुसर्या पुरूषानं केल्याचं मला तरी आठवत नाही. (पुरूष महत्वाचा शब्द आहे). शक्यतो, आपल्या नकळत, चुकून अंगावर पाणी पडलं तर आपण दचकतो. पण न्हावी पाण्याचा फवारा उडवणार हे माहित असतं, तरीही मी दरवेळेस दचकतो, invariably. कटिंग झाल्यावर तो न्हावी डोक्याच्या मागचा कट व्यवस्थित झाला हे दाखवण्यासाठी आरसा धरतो. त्या आरशात बघून मी आजतागायत काही सुधारणा सुचवली असेल असं मला तरी आठवत नाही.

सांप्रतकाळात दुनियेचा विसर पाडायला लावणारे, रिझवानभाई. छोटंसंच दुकान आहे घराजवळ. वय असेल ६५ च्या आसपास. थरथरत्या हाताने डोक्यावरून कंगवा आणि कात्री फिरवतात, ते बहारदार असतंच. पण कटिंग झाल्यावर ते नवरतन टाकून डोकं बडवतात ना, तेव्हा साली मेंदूवर चढलेली निराशेची पुटं पटापटा झडत जातात. रिझवानभाईंनी जो माझा मिलीटरी कट निवडला आहे त्याला तर तोड नाही. त्यामुळे खुप फ़ायदे होतात. ट्राफीक हवालदार, आर्मीचा माणूस म्हणून सोडून देतो, रेल्वेत एखादी सुंदरी, डिफेन्सच्या माणूस म्हणून आदराने बोलते. मुळात बथ्थड असलेल्या चेहर्याला जरा राकट रूप येतं. एकदा सदर्न कमांडच्या इथे चालत असताना तर एका मिलीटरीच्या जवानाने मला कडक salute मारला. मी पण निर्लज्जासरखा reciprocate केलं. च्यायला मी खरं कोण कळलं असतं तर पोकळ बांबूचे फटके टाकले असते. असो. पण डिप्लोमानंतर मला फार इच्छा होती, आर्मीत जावं म्हणून. SSB भोपाळला जाणार पण होतो. पण परीक्षेची गडबड झाली अन मी मग असा डमी आर्मीमन होण्यात आनंद मानत राहिलो.

नंतरची चकाचक दाढी. माझ्यासाठी त्यांनी जरा स्पेशल ब्लेड आणून ठेवलं आहे. आणि मग ते ओल्ड स्पाईस टाकत जेव्हा गालावर हात ठेवतात. अहाहा. सुख हो, निव्वळ सुख. आणि मग तो स्क्रब लावून केलेला फेसमसाज. साला, रंग गेला तर पैसे परत असा आमचा चेहरा. पण त्यालाही तरतरी आणण्याचं काम रिझवानभाई न कंटाळता गेले दशकभर करत आहेत.

मधे एकदा मी खुर्चीवर बसलो असतानाच दरदरून घाम फुटला. रिझवानभाई दुकानाबाहेर घेउन जात असतानाच धडपडलो. दुसर्या दिवशी अमेरिकेला जाणार होतो. कसंबसं सावरलं स्वत:ला. डॉक्टरने परवानगी दिली. रिझवानभाईंनी त्या आठवड्यात चार वेळा विचारलं "साब ठीक है क्या?". पण त्या घटनेपासून रिझवानभाईंचा हात माझ्या डोक्यावर पडताना आधीपेक्षा जास्त थरथरतो हे जाणवतं मला.

नीलच्या जावळापासून ते बाबा कँसर ने आजारी असताना घरी येऊन दाढ़ी करताना त्यांच्याशी गोड बोलत त्यांना फ़्रेश ठेवणारे रिझवानभाई. केसाने गळा कापणार्या लोकांच्या मांदियाळीत केस कापताना प्रेमाची पखरण करणारे रिझवानभाई.  एकदा डोकं त्यांच्या हातात गेल्यावर दीड दोन तास आयुष्यातल्या तमाम प्रश्नांना विसरायला लावणारे रिझवानभाई.

सलाम! रिझवानभाई समोर मी नतमस्तक होतो अन त्यांना वाटतं, मी म्हणतोय "चला, कटिंग चालू करा" ते बिचारे कात्रीचा कट कट आवाज चालू करतात.




Thursday 19 March 2015

हे ही

बोनी एकदा बंगलोर हून मुंबई ला आला. आम्ही दादरला पूनम ला राहायचो. यावेळेस मात्र सकाळीच उठून नागपूरला जायचे होते. मग विचार केला तिथेच राहू एयरपोर्ट जवळ एखादया हॉटेल मध्ये. सन न शील नावाची हॉटेल ची पाटी घेऊन एक माणूस उभा होता. बस हि होती. तिथेच JB नगर ला हॉटेल होतं. चेक इन केलं. रात्रीचं जेवायला हॉटेल च्या restaurant मध्ये गेलो. तर डान्स बार तिथे. टाय घातलेले लोकं दारू पिउन उताणे पडलेले. समोर पोरी नाचताहेत. कुणाचं त्यांच्याकडे लक्ष होतं, काहींची शुद्ध हरपली होती, काही इशारे करत होते. गुमान रूम मध्ये आलो आणि तिथेच जेवण मागवलं. पहिल्यांदा प्रकार पहिला पण अनुभवायची डेरिंग नाही झाली.

एकदा गोदरेज मधून बाहेर पडलो. Cab ड्रायव्हर ला बोललो, भूक लागली आहे, कुठल्यातरी हॉटेल मध्ये घेऊन चल. तो निघाला, तर काही मिनिटातच एशियाड नावाचं हॉटेल दिसलं, घाटकोपर जवळ. बोनी म्हणाला, चल जाऊ यात. कॅब ड्रायव्हरने चमकून बघितलं आमच्याकडे. मी म्हणालो, उतरतो आम्ही.  आत गेलो तर अंधारच अंधार. काहीतरी वेगळं वाटत होतं खरं. टेबल वर जाऊन बसलो. अंधाराला डोळे सरावल्यावर बघितलं तर बधीरच झालो. सगळ्या पोरी, सर्व्ह करण्यासाठी. थोडक्यात लेडीज बार होता तो. एक जण आली "क्या लोगे साब" तर मी म्हणालो "आम्हाला फक्त जेवायचं आहे" तर म्हणाली "क्यू साब, बियर तो लिजिये. वो देखो वैसा पिलाउंगी" माझ्या तर घशाला कोरड पडली होती. माझ्या तोंडून शब्द पडले "जरा मेल वेटर रहेगा तो भेजो ना" तर आजूबाजूला उभ्या असलेल्या दोघींकडे उभ्या असलेल्या दोघींकडे बघून म्हणाली "ए, देख साब को आदमी चाहिये, सर्विस देने के लिये" तिघीजण खदखदल्या. माझ्याबरोबर बोनी होता, त्याला येडयाला काही कळत नव्हतं. मल्लू तो. मी बोललो "हे बघ निघतो आम्ही." तर खांद्यावर हात ठेवत म्हणाली "साब, तुम्हारे तरफ देख के लगता है, तुम कभी लेडीज बार  में गया नही दिखता. चलो ठीक है, ऑर्डर दो"

निघताना पैसे दिल्यावर म्हणाली "साब, इतना भी जंटलमनगिरी मत दिखाव. तकलीफ होगी लाईफ मे" माझं लेडिज बार बद्दलचं अज्ञान हा तिच्या लेखी दिखावाच होता.

एकदा आम्ही, म्हणजे संजय सर, बोनी आणि मी, ठाण्याला शुभम नावाच्या हॉटेल मध्ये पार्टी करत बसलो होतो. बरोबर  बोनी पण होता. बोलताना बोनी सहज म्हणाला "what is dance bar? I had never been there". मी संजय सरांना बोललो "सर, मी पण कधीच नाही पहिला डान्स बार. पुढच्या ट्रीप मध्ये घेऊन जाऊ याला डान्स बारला" ते म्हणाले "ओके". अकरा ला पार्टी संपली. ते म्हणाले "चेक नाक्याला सोडतो" फियाट होती त्यांची. निघालो अन चेक नाका गेला तरी गाडी काही थांबायला तयार नाही. मी म्हणालो "अहो सर, थांबा कि" तर म्हणाले "गधड्या, तू कधी या बोन्याला घेऊन येशील. आजच जाऊ यात" कार डायरेक्ट हुमा palace ला. मी तिथे सगळं पाहिलं, ते पैसे उडवणं, पुरुषांच्या बुभुक्षित नजरा, पोरींचे आव्हानात्मक हावभाव. मध्ये असाच बाहेर आलो, तर डान्स साठी वाट बघणाऱ्या पोरीही बघितल्या. निवांत गप्पा मारत होत्या एकमेकींशी. त्या मादक नजरांची जागा काही डोळ्यात करुणेने  घेतलेली दिसली. आत हॉल मध्ये असलेल्या वखवखलेल्या नजरेपासून लपणार्या या बारबालांची मला कीवच आली.

एकंदरीत तो प्रकार काही आवडला नाही. मी आयुष्यात पहिल्यांदाच डान्स बार ला गेलो अन तीच शेवटची वेळ होती.

आज परत गदारोळ चालू झाला. त्यावरून आठवलं, इतकंच.

आणि हो, मत द्यायचं तर नकोच तो प्रकार. 

Wednesday 18 March 2015

संजय काटकर

"हं, काय आहे रे" संजय  सर आत येताना म्हणाले. संजय  काटकर ,  हायड्रो फोर्स इंजिनियरिंग या ठाण्यातल्या कंपनीचे डायरेक्टर. मी कोवळा २७ वर्षाचा. बुसाक+शामबान नावाचे हायड्रॉलिक सील विकायचो मी तेव्हा. मी सांगायला गेलो प्रॉडक्ट वैगेरे, तर म्हणाले "अरे, माहित आहे तुझी कंपनी. डिलीव्हरीचा पत्ता नाही, किंमती मनाला वाटेल लावता तुम्ही येडझव्यासारख्या" कॉलेजपर्यंत माझ्याही तोंडून कानाला गुदगुल्या करणारे शब्द नेहमीच पडायचे. एस के एफ मधे पण काही कमी नव्हती. पण नंतर दोन वर्ष हे मंत्रोच्चार कमीच होत होते. बर्याच दिसांनी हा शब्द ऐकल्यावर पहिले मेंदूला झिणझिण्या आल्या अन मनात या संजय काटकर या  गृहस्थाबद्दल ममत्व तयार झालं. मी म्हणालो "हे १०० चं सील तुम्हाला आत्ता हवं आहे. किंमत ५८२ रू. उद्या हे सील नाही मिळालं तर कंपनीत परत पाय ठेवणार नाही, अन मिळालं तर हायड्रो फोर्स च्या सिलेंडर मधे बुसाक+शामबान, standardize करायचे. बोला आहे कबूल" तर म्हणाले "डन"

संजय  सरांची अन माझी ही पहिली ओळख. सील आलं दुसर्यादिवशी अन कस्टमर-सप्लायर पेक्षा एका वेगळ्याच मित्रत्वाच्या नात्याची नांदी झाली. दोन उच्चशिक्षीत भावांपाठचा हा कमी शिकलेला भाऊ. पण मनाने एकदम दिलदार. मला ते शक्यतो "रामभाऊ" म्हणून हाक मारायचे. त्यांना ड्रिंक्सचं व्यसन होतं. मला ते इतक्यांदा जेवायला घेऊन गेले की त्याची काही गणतीच नाही. अन गंमत म्हणजे ते माझे कस्टमर असून ही, मला एकदाही, and I mean it, बिल देऊ दिलं नाही. मला जेवायला घेऊन गेले की invariably त्यांच्या घरी फोन करायचे "मी राजेशबरोबर आहे" अन ठेवल्याबरोबर मला म्हणायचे "बायकोला सांगितलं ना की मी राजेशबरोबर आहे, की तिला टेन्शन नसतं रे. तिला माहित होतं की मी सज्जन माणसाबरोबर आहे" बरं मिसेस काटकर यांना मी कधीच भेटलो नाही खरंतर.

एकदा मी दादरला एका मोठ्या कंपनीत टेक्निकल डिस्कशन्स साठी गेलो होतो. तिथे माझ्या लक्षात आलं की त्यांचे पॉवर पँक अन सिलींडरचे सप्लायर्स फ़ुल येडं बनवायचे. मी तिथल्या साहेबांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. मला म्हणाले "सिलींग सिस्टम तुच ठरव अन सप्लायर्सही तुच सांग, सिलींडर अन पॉवर पँकचे" मी त्यांना तीन सप्लायर्स दिले. त्या पैकी हायड्रो फोर्स  अन पुण्यातल्या कंपनीने विचारले "तुझं काही कमिशन ठेवायचं का?" मी बोललो "ह्या कस्टमर्स चे जितके प्रोजेक्टस येतील त्यात आमच्या कंपनीचे सील वापरायचे. तेच माझं कमिशन" पहिलीच दणदणीत ऑर्डर मिळाल्यावर योगायोगाने आम्ही कोकणात किहीम बीचजवळ संजय सरांच्या घरी त्यांच्या आईच्या हातचं माशांचं कालवण जेवत होतो. संजय  साहेब म्हणाले "बघ ५% ठेवणं काही अवघड नाही, विचार कर" मी म्हणालो "तुमच्या आईच्या हातचं जेवण माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, कमिशनपेक्षा" "रामभाऊ, जिंकलंस लेका" असं म्हणत जोरात पाठीत धपाटा घातला. (पुढं दहा वर्षात तीन कंपन्यांनी दादरच्या कंपनी बरोबर ५० कोटीचा बिझीनेस केला. मी कंपनी सोडल्यावरही बुसाक चे सील च वापरत राहिले, अजूनपर्यंत. अन पुण्यातल्या कंपनीच्या मालकाने मी बिझिनेस चालू केला तेव्हा खूप मदत केली)

आम्ही खूप फिरलो. एसार स्टील हझीरा, विंडसर छत्राल आणि अशा बर्याच ठिकाणी मी triangular working करायचो. म्हणजे माझेच कस्टमर मी तिकडे त्यांचे सप्लायर म्हणून recommend करायचो. त्याचा खूप फायदा झाला. माझे कस्टमर म्हणून तर ते घट्ट झालेच पण त्यापेक्षा ते माझे सॉलिड जवळचे मित्र झाले. खरं तर मी hydraulics चं स्पेलिंग हि विसरलो आहे. तरीही मी अजून  अशा बर्याच कस्टमर च्या संपर्कात आहे.  

मी नोकरी सोडून बिझिनेस चालू करायचं ठरवल्यावर त्यांनी मला बोलावलं. त्या दिवशी ठाण्यात वागळे मध्ये द्वारका काय ते हॉटेल आहे, तिथे राहिलो. त्यांनी खूप ड्रिंक्स घेतले. मला म्हणाले "साल्या, विसरू नकोस आम्हाला. आणि कधी पैशाची मदत वैगेरे लागली तर सांग." ते आणि मीच होतो. भरपूर गप्पा मारल्या. निघताना प्रेमभराने मिठी मारली.

पण हि दारू फार बेकार चीज आहे. एखाद्याचं लिव्हर खराब करताना, ती दारू, त्याचं हृदय किती मोठं आहे वैगेरे बघत नाही. पोखरतच ते. जे व्हायचं, तेच झालं. २००४ साली, संजय सर हे जग सोडून निघून गेले. मी औरंगाबाद ला होतो. नाही जाऊ शकलो, अंत्यविधीला. 

तीन चार वर्षा खाली एक फोन आला "काय रामभाऊ" आणि पाठोपाठ ते गडगडाटी हास्य, हा हा हा. सटपटलोच मी. "अरे, मी अजय बोलतोय, संजयचा मोठा भाऊ" आणि मग ते बोलत राहिले, ४-५ मिनिटे. काय बोलले, मला काहीच आठवत नाही कारण मी मनाने संजय सरां बरोबर किहीम बीच जवळच्या त्यांच्या गावात त्यांच्याच आईच्या हातचे सुरमई खात होतो.  

Monday 16 March 2015

प्रश्न

खालील पोस्ट मी खाजगीरीत्या ५-६ जणांना पाठवली. पण कार्यबाहुल्यामुळे कुणी त्याला उत्तर नाही दिलं. फक्त एकाशी फोनवर बोललो. हा फोन फेसबुकच्या फोरम वर टाकतो आहे. हो, आणि कृष्णा उमरीकर म्हणतो तसं हे काही मधमाश्याच्या पोळ्यावर दगड मारायचा प्रयत्न नाही आहे. genuine प्रश्न आहे, genuine comment टाकाव्यात हि विनंती. 

बरेच दिवसापासून हे डोक्यात घर करून आहे. 

खरं तर सगळेच स्वातंत्र्य काळातील नेते हे तुमच्या माझ्यासारखे नॉर्मल लोकं होते. त्यांनी केलेल्या काही चुका अगदी अक्षम्य अशा होत्या. पण त्या चुका ज्यासाठी करत होते तो उद्देश, देशाला स्वातंत्र्य देण्याचा, हा इतका महान होता कि त्यासमोर या चुका झाकोळल्या गेल्या. किंबहुना त्यातल्या काही चुकांचं रीतसर ग्लोरिफिकेशन केलं गेलं. गांधी, सावरकर, आंबेडकर यांच्यावरून तर इथे नेहमीच वाद होतात. या तीन नेत्यांवरून, इथे म्हणजे महारष्ट्रात, जितके वाद होतात तितके दुसर्या कुठल्याही नेत्यावरून होत नसावेत. 

हिटलर चा जो Fascism, ज्याला नंतर Fascist असं संबोधलं जातं आणि साधारण हे विशेषण सावरकरवादी मंडळीना लावलं जातं. याच हिटलर चा पाठपुरावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही केला होता. हिटलर बरोबर ते मुसोलिनी सारख्या हुकुमशहा ला भेटले होते. इतकंच नव्हे तर इंग्रजांना पळवून लावण्यासाठी त्यांनी त्या काळी अत्यंत भ्रष्ट आणि स्त्री लंपट असलेल्या जपान्यांची मदत घेतली होती. त्यांचे हे सगळे प्लान सपशेल फसले होते असं दिसून येतं. 

असं असताना, सावरकरांच्या एकंदरीत शैलीबद्दल जितकं वादळ उठतं, तितकं नेताजींच्या शैली बद्दल उठत नाही असं दिसतं. यामागची कारणं काय असावीत. सावरकरांचा गांधी हत्येतील कथित सहभाग, यामुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा डागाळली हे तर नक्कीच. त्यांना न्यायालयाने सोडलं वैगेरे हि गोष्ट वेगळी. पण त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला मोठा  डाग लागला हे त्यांचे समर्थक हि मान्य करतील. या व्यतिरिक्त काय?

दुसरं, महारष्ट्रात सावरकर यांच्यावरून  दोन गट आहेत आणि ते जातनिहाय आहे हे स्पष्ट दिसतं. अशा वेळेस प बंगाल मधेही नेताजींच्या विचार शैलीवरून जात निहाय दोन गट आहेत का? कि सरसकट बंगाल मध्ये नेताजींना मानतात. कि सरसकट विरोध आहे, जी शक्यता कमी आहे. 

असं असण्यामागे काय कारण असावे.? नेताजींनी ज्या चुका केल्या त्याचं glorification केलं गेलं का? नेताजींचा मृत्यू हा गूढ आहेच. कि आजकाल सावरकरवादी त्यांचा मृत्यू हा मानसिक क्लेशातून प्रायोपवेशन ने झाला असं म्हणतात तसाच नेताजींचा मृत्यू सुद्धा glorified आहे का?

आणि एक. नेताजी बद्दल सहानुभूती असण्यासाठी गांधीनी त्यांना दिलेली सापत्न वागणूक कारणीभूत आहे का?

प्रश्न

Sunday 15 March 2015

UOB

आताची तैपै फ्लाईट रात्री १०:५५ ची होती. मी पेंगुळलेल्या डोळ्याने जाऊन बसलो. मिलियन डॉलर आर्म म्हणून भारी पिक्चर आहे. मेरठचे दोघं अमेरिकेच्या बेसबॉल गेमचे चँपियन बनतात, असा काहीतरी विषय. झोप होती तर म्हंटलं बघावा, म्हणून ads ला फ़ास्ट फ़ॉरवर्ड मारला. तरीही, एक गोंडस पोरगा अन साधारण गावातली गल्ली टिपली होती मी. झोपलो मग, पिक्चर अर्धवट. हॉंगकॉंग तैपै मधे आधीच्या सेक्टरचा झोपेचा बँकलॉग पूर्ण केला.

परत येताना पहिल्या सेक्टर मधे तैवान डायरी कीबोर्डवर बडवली. हॉंगकॉंगला बसलो, निवांत होतो. सहा तासाचा प्रवास. ते गोंडस पोरगं आठवलं ad मधलं. पिक्चर लावला, हॉलीडे. आधी ad.

"साधारण चाळीतल्या घराचा दरवाज़ा बंद करून एक बाबा त्याच्या पोराचं बोट धरून बाहेर पडतो. बाहेर निघताना वरांड्यावर माणूस बिड़ी ओढत बसला असतो. मग पूर्ण दर्शन होतं त्या बाप लेकाचं. बाबाचा साधाच पण परीटघडीचा हाफ स्लीव्हज शर्ट, व्यवस्थित खोचलेला त्या खाकी सदृश पँटमधे. कमरेला बेल्ट. भांग व्यवस्थित. ते, पोट्टं, बापाचीच झेरॉक्स. पँटच्या ऐवजी हाफ चड्डी फक्त. गल्लीतून चालत आहेत दोघं. हा मार्ग माझा एकला मधे राजाभाऊ परांजपे आणि सचिनची आठवण येते. खरं सांगू, चाळीस वर्षापूर्वीच्या भास्कर मंडलिक अन राजेश मंडलिकची ही आठवण हळूच मनाला स्पर्शून गेली.

रस्त्यावर बसलेले मासे विकणारे, भांड्याच्या कल्हई करणार्या लोकांवरून कँमेरा झरकन फिरून तो जत्रेत येतो. तोंडातून जाळ काढणार्या माणसाकडे ते पोरगं आश्चर्य मिश्रीत कुतुहलाने बघतं. अन मग समोर दिसतं भलं मोठं मेरी गो राऊंड. बापाला पोराच्या नजरेतच कळतं, त्याला बसायचं आहे. दोघं तिकीट देणार्या दाढीवाल्या म्हातार्याकडे जातात.

"How can I help you Sir"

"How much do you charge for a ride" बाप विचारतो

" A dollar per person. And if a kid is less than 5, then it is free  ride for kid"

बाप: "Here, 2 dollars. Two tickets please"

म्हातारा, पोराकडे बघत. "How old is kid"

बाप "6 years old"

म्हातारा आश्चर्याने "You could have told as 5. What difference does it make? I would  not have known it, anyway."

बाप "Ya! But my son would have known it"

हे बोलताना बापाच्या डोळ्यात वात्सल्य, अन त्या चिमुकल्याच्या डोळ्यात बापाबद्दल ओतप्रत अभिमान.

We live by principles..........असं म्हणत ती बँकेची ad संपते.

मी सावकाश डोळे मिटतो. माझ्या पाणावलेल्या डोळ्यात भास्कर मंडलिकांचा चेहरा तरळत राहतो.

Wednesday 11 March 2015

भक्त आणि भक्ती

मध्ये एका WA ग्रुपवर एक मित्र म्हणाला "तू (कुणाचातरी) भक्त आहेस"

मी बोललो: नाव, राजेश मंडलिक, वय ४६,  रूढार्थाने जग ज्याला मानते तसा दोन पोरांचा बायोलोजीकाल बाप आणि लौकिकार्थाने ३० जणांच्या कुटुंबियांचा भार वाहणारी कंपनी चालवतो म्हणून पूर्ण पुरुष. कुणा माणसावर भक्ती म्हणाल तर माझ्या आई बापावर आणि त्यानंतर…………. स्वत:वर.

बाकी कुणावर भक्ती, माय फूट.

भक्त/भक्ती, फेसबुकीय लिखाणात काही शब्दांचे अर्थ वहावत जातात, भक्ती हा त्याचं उत्तम उदाहरण. खरं तर भक्ती हा अत्यंत पवित्र शब्द. माझ्या मते भक्ती ही आपण अमुर्त अशा गोष्टीवर करतो. कला, खेळ, बुद्धीमत्ता, कर्तृत्व यावर जेव्हा अलौकिकत्व दिसतं तेव्हा आपण स्वत:ला विसरतो आणि अलौकिक रूपावर आपण जे भाळतो ती भक्ती. आणि जी लोकं ह्या अमूर्त गोष्टी आपल्यासमोर घेऊन येतात त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो. परवाच परत एकदा ऐकलेलं "सरणार कधी रण" यामधील संगीत/शब्द/आवाज याने मनात जे तरंग उठतात ती भक्ती, झाकिरभाईंचा हात तबल्यावर कडाडल्यावर जी अनुभूति येते ती भक्ती, तेंडुलकर जेव्हा कड़ाकड स्ट्रेट ड्राईव्ह ओढतो तेव्हा जो शहारा उमटतो ती भक्ती, पुल रावसाहेब सांगताना हसता हसता रडवतात तो अनन्य भाव म्हणजे भक्ती, आज जाने की झिद ना करो मधे फ़रीदा खन्नूम खिळवून ठेवते ते खिळणं म्हणजे भक्ती.

पण या फेसबुकवर भक्त आणि भक्ती या शब्दाची पार बोळवण झाली आहे. खरंतर बहुतांश मानवजातीची जर कुठल्या मूर्त व्यक्तीवर भक्ती असेल तर ती स्वत:वर. "देव आपणात आहे, शीर झुकोवनिया पाहे" हे बाबूजी म्हणून गेले तेच खरं तर सत्य. ही अशी पवित्र भावना कुणाच्या पायावर वाहत असेल ही शक्यता कमीच, अन त्यातल्या त्यात ह्या राजकीय नेत्यांवर हे तर अशक्यच.

त्यातही, आपल्या सोयीनुसार या शब्दाचा वापर करायचा. म्हणजे एका पक्षाच्या समर्थकांना हे भक्त म्हणणार. त्याचवेळेस यांचे नेते भ्रष्टाचाराच्या चिखलात गळ्यापर्यंत रूतले आहेत ते विसरणार. दुसरे यांना भ्रष्टाचारी दिसणार पण स्वत:च्या पक्षात घराणेशाही पायी सुंदोपसुंदी चालू आहे ते विसरणार. या असल्या भंगार लोकांच्या चरणी लीन होण्याइतकी तुमच्यामाझ्या सारख्या साध्या लोकांची, हो साध्या सामान्य नव्हे, भक्ती स्वस्त झाली नाही आहे.

विठ्ठलाचं नाव घेत तल्लीन होणार्या ज्ञानेश्वर तुकोबाच्या अभंगात ती दिसते, पावनखिंडीत बाजीप्रभूच्या त्वेषात ती दिसते, रॉजर फ़ेडरर च्या नजाकतदार फटक्यात दिसते ती आणि हो ४५००० rpm चा स्पिंडल रिपेयर करताना राजेश मंडलिकच्या तन्मयतेत दिसते ती..............भक्ती.

तेव्हा मित्रहो, काळाच्या ओघात कित्येक शब्दाच्या अर्थाचे अनर्थ होतात. भक्त/भक्ती या ओवीच्या शब्दाला शिवी चे रूप येऊ न देणे हे तुमच्या माझ्या हातात आहे.

असो. ह्या शब्दाचा कसा वापर करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी मात्र माझ्यापुरता हा प्रश्न सोडवला आहे. 

Monday 9 March 2015

मी आणि मि

काही महिन्यांपूर्वी  एका मित्राकडून पैसे उधार घेतले होते. त्याला बोललो कि साधारण जानेवारीच्या  च्या दुसर्या आठवडयात पैसे परत देईन म्हणून. काल गेलो होतो त्याच्याकडे पैसे परत करायला. त्याच्यातला अन माझा संवाद.

मी: तुझे पैसे परत देतोय.

मि: अरे धन्यवाद. काय सांगू तुला, मला पैशाची गरज होतीच. योग्य वेळेस पैसे दिलेस.

मी: अरे, इतकं काय त्यात. मैत्रीत इतकं तर चालतं यार.

मि: तू म्हणाला होतास जानेवारीत पैसे देशील म्हणून. फोन करणारच होतो मी तुला, मला एका महत्वाच्या कामासाठी लागत होते.

मी: अरे, काय सांगू तुला धंद्यात इतकी मंदी आहे सध्या. पैसेच मिळत नाहीत रे. परत मागच्या महिन्यात युरोप टूर ला गेलो होतो बायको पोरांना घेऊन.

मि: ओहो, तसंही मला genuinely पैसे लागत होते रे. अगदी गरज असल्याशिवाय फोन करेल का मी तुला.

मी: ठीक आहे रे. दिले ना आता. खुश. लोकं वर्ष भर पैसे देत नाहीत. दोन महिने उशिरा का होईना दिले ना. ऐश कर. चल. निघतो.

मी रुबाबात परत निघालो. मि उपकाराच्या ओझ्याखाली झुकत निरोप देता झाला.

मी, मीत्राचा अन मि म्हणजे मी असं कुणी समजलं असेल तर माझं व्याकरण कच्चं आहे असं समजावं.




Friday 6 March 2015

तैवान डायरी

मुंबईहून तैपै साठी निघालो. अमेरिकन जेफ अन क्रेग ही होते. मी आपलं चेक इन काऊंटरला सांगायचा प्रयत्न केला की आम्ही तिघं बरोबर आहोत. तर हे दोघेही वेगवेगळ्या काऊंटरवर गेलेही चेक ईन ला. ४७, ६१ आणि ६७ रो. माझा होता ६७ नं. बाजूला गुजराती मुलगा. "सर, वो दोस्त है ७० नंबर पे. विंडो सीट है. एक्सचेंज करेंगे" आज सीट स्वँपिंग. तरी मी खिजवलंच जरा "दोस्त, रातको ११ बजे फ्लाईट निकलेगा, सुबहं ७ बजे हॉंगकॉंग. तो रातमे ऐसा क्या करनेवालों हो आप" की लागलीच "क्या सर, ऐसाभी क्या, प्लीज़ सर" मी दिली सीट एक्सचेंज करून, तर इकडे बाजूला............. चला या वेळेस सस्पेन्समधेच ठेवतो.  उगाच एकमेकांच्या मांडीला मांडी न लावणारे अमेरिकन अन बिनकामाचे गळ्यात पडणारे आपण.
*********************************************************************************
चीनची मागील वर्षाची GDP Growth 7.4% झाली. १९९० पासूनचा हा निच्चांक आहे. म्हणजे गेले ३० वर्षे चीन ८% पेक्षा जास्त ग्रोथ अचिव्ह करत होतं. महिन्यापूर्वी एका लेखात मी लिहीलं होतं की हे दोन चार वर्षे दिवे पाजळून काही होणार नाही, तर वर्षानुवर्षे केलं तर दारिद्र्यरेषेच्या वर समाजाचा मोठा भाग येईल. त्याला पुष्टी मिळाली.
********************************************************************************
तैपै १०१ या एकेकाळच्या जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या ८५ व्या मजल्यावर एका अलिशान रेस्टॉरंट मधे पार्टी झाली. चायनीज कस्टमर्सला उंची दारू पाजणे आणि उत्तमोत्तम पदार्थ खाऊ घालणे, असा द्विकलमी कार्यक्रम होता.

साधारण सहा महिन्यापूर्वी एका लेखात २००५ साली चायनीज बिझीनेसमन बरोबर शांघायमधे रात्रीची जेवणं केली होती अन मला हे बिझीनेसमन बावळट अन आढ्यतेखोर वाटले असा मी उल्लेख केला होता. दहा वर्षानंतर ही मला जाणवलं की त्यात काहीच फरक पडला नाही आहे. ते तसेच वाटले, मुर्ख.

(फ़ार्मा इंडस्ट्रीच्या संबंधित दोघांना माझं बोलणं आवडलं नव्हतं. आधीच सॉरी)
********************************************************************************
एका डिनरमधे मेन्यु ऑर्डर करताना जेफ तैवानीज होस्टला म्हणाला "Rajesh does not eat beef and pork. Orde........." मी त्याला मधेच थांबवलं. म्हंटलं "भाऊ, तु कर ऑर्डर. आज खाणार. तब्येतीला रेड मीट चांगलं नाही म्हणून जास्त खाणार नाही, पण आज थोडं का होईना खाणार.

महाराष्ट्र सरकारच्या गोहत्याबंदी चा निषेध असा केला.

दोन्ही खाल्लं. बीफ अन पोर्क.

(पण तैवानमधे शेतीला उपयुक्त प्राणी म्हणून आदरापोटी बीफ न खाणारा सेक्ट आहे बरं का!)
*********************************************************************************
Exhibition मधे आमच्या बूथवर दोघी जण होत्या होस्टेस म्हणून. ऑफीसमधेच काम करतात. गुडघ्यावरती दोन इंच स्कर्ट. सजलेल्या नटलेल्या. पण ढुंकून म्हणून बघत नव्हतं त्यांच्याकडे. म्हणजे लोकं बोलायचे, पण कामापुरतं फक्त. लाळघोटेपणा नाही. दोघी हॉटेलवर राहतात. लहान आहेत वयाने. आणि हॉटेलपण ठीक ठाकच असावं. दोघं पोरं पण आहेत. आज जेवलो की त्यांच्याबरोबर. नजरेत वखवख नाही. भंकस नाही.

जेवण करून आलो बाहेर. अन ५-६ सरदारजी अन तैवानीज मुली. आपली मंडळी चाळीशीची अन त्या पोरी विशीतल्या. आपली लोकं म्हणताहेत "please, one photo. And come close. No problem" मग एकाची दुसर्याला टाळी.

शक्यतो परदेशात भारतीय दिसला की मी थोडं का होईना मान वळवून बघतोच. आज मात्र प्रयत्नपूर्वक टाळलं. अन पीटरशी बोलताना मान जरा झुकलेलीच होती माझी.

निर्भयाची डॉक्युमेंटरी, हं............
******************************************************************************
Howard Plaza म्हणून हॉटेल आहे तैपैचं. कमोडचं सीटकव्हर चं टेम्परेचर adjust करता येतं. सकाळी पार्श्वभागाखाला थंड लागू नये म्हणून.

इतकी पण लक्झरी असू नये. अंगावर येते.

असो. उद्याला भेटू परत.

तोपर्यंत निवांत

Wednesday 4 March 2015

निवांत

फेसबुकवर काय लिहायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, कुणाबद्दल लिहायला पाहिजे याबाबतीत बरीच लोकं बरीच मतं व्यक्त करतात. मी काही त्यावर मत व्यक्त करायला पाहिजे असं काही नाही आहे, पण काल एका मित्राने समजावून सांगितलं तेव्हा विचार केला. तसा विचार आधीही केला होता, हात सळसळले ही होते. पण शांतीला धरलं. अगदी नुकतेच आबा पाटील गेले तेव्हा श्रद्धांजली कशी द्यावी यावर उहापोह झाला. अगदी द्यावी की नाही असंही झालं. मग पानसरे गेले. तेव्हाही एका सेन्सिबल मित्रवर्याने "अशा काळात विनोदी पोस्ट टाकणर्यांची लाज वाटते. अनफ्रेंड करून टाकीन वैगेरे" आता अवकाळी पाऊस झाला तेव्हा हे मित्र रिसॉर्ट वर मजा करत आहेत, मग तेव्हा कुणी असं म्हंटलं तर चालेल का "शेतकर्याचं नुकसान झालंय, अन तुम्ही पार्टीचे फोटो लावताय खुशाल" तर नाही म्हणू शकत.

आता कुणी फक्त शुभेच्छा देतं तर कुणी उपहासाचा राग आळवतं. काहीजण फक्त राजकीय पोस्ट. पण ही ज्यांची त्यांची आवड. तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. वाटलंच कॉमेंटमधे प्रतिवाद करा. पण हे "का लिहीतोस" असं नाही म्हणू शकत.

मला म्हणायचं असं की हा प्लँटफॉर्म दिला आहे, चावडी. तिथं होऊन बोंबा मारायच्या, कुजबूज करायची, धुसफुस करायची, रडायचं हे ज्या त्या माणसावर अवलंबून आहे. आता ते तुम्हाला आवडलं, नाही आवडलं त्याला काही घेणं देणं नाही. आभासी जगात मित्र झालो आहोत. काही अपवाद वगळता एक व्यक्ती म्हणून समोरच्याची थोडी माहिती असते, बाकी आनंद असतो. आता तुम्ही नाराज असाल तेव्हा समोरच्याला आनंद नाही झाला पाहिजे हा अट्टाहास काही कामाचा नाही. बरं त्याउपरही तुम्ही अनफ्रेंड करू शकता, अनफॉलोचा ऑप्शन आहे. करा की ते. अन शांतपणे करा. काही जगाला बोंबलून सांगायची गरज नाही. थोडक्यात फेसबुक म्यानर्स किंवा रूल असे काही नाहीत. क्लोज़ ग्रूपला असतील ते असतील. बाकी तुम्ही शिवि देऊ शकता, ओवी म्हणू शकता, गाणं गाऊ शकता, रडगाणं गाऊ शकता. काहीही. लोकांना आवडलं तर त्यांनी ठेवावं, नाहीतर उडवावं. शिव्या घालाव्या. पण "तु हे का लिहीलं" हा विचारायचा अधिकार मला नाही.

यावेळेस मित्राने नाव वैगेरे टाकून लिहीलं. आता माझ्या मित्राने लिहीलं "तु (मी) फक्त स्वत:च्याच पोस्टवर कॉमेंट करतो. आत्ममग्न आहे" तर माझ्या आताच्या धकाधकीच्या लाइफ़स्टाइल मधे मी विचार लिहायचे, ते विचार दळभद्री का असेना, पण त्यावर येतात कॉमेंट. त्यांना उत्तर द्यायचं. कुठे सहमती तर कधी कापाकापी. इतकंच जमतं. एक दिवसाआड पोस्टचा रतीब टाकून, सगळा उद्योग करून परत दुसर्यांच्या पोस्ट वाचायच्या. त्यावर कॉमेंटही करायच्या. अन मग घरी पोटापाण्यासाठी न्यायचे काय, मातीची ढेकळं. मी काय लिहीतो, हा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय लिहीता हा तुमचा. पण मी काय, कसं, कुणाबद्दल लिहीतो हा तुमचा प्रश्न होऊ नाही शकत. आणि तुम्ही काय लिहावं याचं मला काही घेणं देणं असण्याचं काही कारण नाही. बरं त्यात आपण आतल्या गाठीचे, त्यामुळे ज्या विषयाची माहिती नाही त्याच्या वाटेलाही जात नाही मी. शेती, साहित्य समीक्षा, इतिहास, ism यावर फुकाचा आव आणून मिशीवर ताव मारून कॉमेंटा ठोकायची इच्छाही नाही आणि अक्कल ही नाही. आधी च काय कमी मनस्ताप असतात की ओढवून घेऊ.  मी काय लिहीतो, काय शेयर करतो त्याचं उत्तरदायित्व माझं. तिथं काही राडा झाला तर स्वत:ला डिफ़ेंड करण्याची ताकद ठेवतो.

आता कुणी कविता टाकतं, काय बोंबाबोंब होते हो. अहो ठीक आहे, नका वाचू ना!  स्क्रोल करा. Fraction of second लागतो. आज वाचलं "फोटोला कोण हॉट कसं म्हणू शकतं" अहो उडवून टाका ना मग. कुणी म्हणतं, प्रोफ़ाईल फोटोच का सारखा बोलतात कुणी, पदार्थाचे फोटो का टाकतात. का टाकतात म्हणजे? लिहीलं आहे का कुठे नाही टाकायचे म्हणून. ह्या फेसबुकच्या भिंती असतील तर मार्कच्या तातश्रीच्या आहेत बाकी कुणाच्या नाहीत.

आता अधूनमधून व्हिक्टोरिया, लिंडा, कँटरीना वैगेरेचे, कुणी पाठ उघड़ी दाखवतं तर कुणी अजून काही उघडं करून दाखवतं अन येतात मेसेज, "hi dear, how are you?" आता दोन मुलांचा बाप मी, मग होते कधी प्रोफ़ाईल बघायची इच्छा. तर mutual friend मधे इथे ह भ प म्हणून वावरणारे, पोरीच्या मित्रयादीत. मग काय करायचं? काही नाही करायचं , गालातल्या गालात हसायचं अन शांत बसायचं.

मधे एक जण म्हणाली "मला इथे survive व्हायचं, मग चांगलं तर लिहावं लागेल" मी म्हणालो "ए ताई, तुझं कर्तृत्व सिद्ध करायची ही काही जागा नाही. हे आपलं कर्तव्य ही नाही अन भूषणही नाही"

हसीमजाक थोडी ठीक आहे, मजेत सांगितलं तर अजून चांगलं आहे. पण जिवाच्या आकांतानं या फेसबुक
अन बाकी सोशल मिडीयात कसे दिवे लावावे हे सांगण्यात काही मतलब नाही देवा!

असो.

बाकी निवांत 

Tuesday 3 March 2015

SFL

मागल्या आठवड्यात चेन्नईला चाललो होतो. हो, तीच पहाटे ५:५० ची फ़्लाइट. बसलो, मी aisle मधे, विंडोला एक जण आणि मधली सीट रिकामी. एक सरदारजी आले. बसतानाच म्हणाले "Good morning friends" खिडकीधारकाकडे त्यांनी बघितलं, तो कसंबसं हसला आणि मोबाईल मधे कुडमुड करू लागला. माझ्याकडे बघितलं, मी तोंडभरून म्हणालो "Good morning Sir" मला म्हणाले "how are you doing this morning young man" आता ४६ वर्षाच्या इसमाला एक साठीचा माणूस young man म्हणतो, मला आनंदाचं भरतं आलं. मी म्हणाला "good and thanks" (बास, आता याचा पुढचा क़िस्सा पुर्ण मराठीत लिहीतो. तरच त्याचं गांभीर्य राहीन. इंग्रजीत जे बोललो ते लिहीलं तर एका गंभीर लेखाचं विनोदी लेखात रूपांतर होईल). तर म्हणाले "गालातल्या गालात का हसतो आहेस" मी म्हणालो "अहो, कितीतरी महिन्यांनी कुणीतरी सहप्रवाशाला इतकं सुंदर ग्रीट केलं आहे. आनंद वाटतोय"

अंगावर कंपनीचा युनिफॉर्मचा शर्ट होताच. "कुठली कंपनी ही सेटको" गुजरातमधे एक सेटको नावाचीच कंपनी आहे, क्लच बनवतात. फ़ेमस आहे. (गुजरात मधे आहे, फ़ेमस तर असणारच). मी म्हणालो "नाही, ती वेगळी. आम्ही मशीन टूल स्पिंडल मधे आहोत" स्पिंडल बोलल्यावर खुललाच गडी. सगळंच माहिती होतं त्यांना. कोणत्या मशीनचे स्पिंडल रिपेअर करता, ग्राईंडींग कसं करता, डिस्क स्प्रिंग कुठुन घेता. मी पण प्रेमाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. मधेच त्यांनी विचारलं "सिंग फोर्जिंगला कधी गेला होतास का?" 

सिंग फोर्जिंग लिमिटेड, ९० च्या दशकात उदयाला आलेली. ७५० कोटी टर्नओव्हर झालेली एक अग्रगण्य कंपनी. जितक्या वेगाने वर गेलेली अन त्याच्या दुप्पट वेगाने लयाला गेलेली सिंग फोर्जिंग लि SFL. खुप कथा ऐकल्या, बँकेला बुडवलं, कँनडाला पळून गेले सिंग साहेब वैगेरे. 

मी म्हणालो "गेलो होतो, पण तेव्हा SFL चा डाऊनटर्न चालू झाला होता. तरी बिझीनेस साठी खुप प्रयत्न केला होता" SFL ने खुप सेकंड हँड मशीन्स आणल्या होत्या. काम खूप होतं त्यांच्याकडे, पण मला काही शेवटपर्यंत काम मिळालं नाही. बरंच झालं म्हणा, कंपनी २-३ वर्षात गुंडाळली गेली. मला म्हणाले "कुणाला भेटायचास तु" मी बोललो "आता लक्षात नाही........." "You must have met Mr Bhargav" मी म्हणालो "Could be. But I made mistake. I should have met one of Mr Singhs" दोन चार भाऊ होते ते. तर सरदारजी म्हणाले "This is destiny. Finally you are meeting Mr Singh in Chennai bound flight" 

मी अवाक. I was meeting one of Singhs. माझा कानावर, डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आणि मग SFL चा उत्कर्ष कसा झाला ते सांगितलं. कसे ते स्वत: ब्रेकफ़ास्ट बजाजच्या चेयरमेन बरोबर तर डिनर महिंद्राच्या MD बरोबर करायचे ते सांगितलं. त्या दिवसांचं वर्णन करताना त्यांच्या चेहर्यावर आनंद नुसता ओसंडून वाहत होतो आणि मी पण त्या चित्तरकथेत गुंगुन गेलो होतो. 

कॉफ़ी घेतली. पहिला सीप मारताना मी म्हणालो "Sir, I have a question for you." बारा गावाचं काय, बारा देशाचं पाणी पिलेला तो stalwart. मला म्हणाला "you want to know, what went wrong with SFL" मी त्यांचा हात हातात घेतला "if it hurts, please do not tell" तर म्हणाले "नाही, मला सांगू दे. त्यानेच माझ्या मनावरचं ओझं उतरेल" आणि मग पुढचे एक तास सिंग साहेब बोलत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. खूप ऑर्डर्स, एक्सपान्शन प्रोग्राम, बँक प्रपोजल्स, Business rivalry, फ़ंडस् disbursement थांबणं, over trading झालेलं, सप्लायर्सचे पैसे थकले, बँक अकाउंट npa, भावांची कचखाऊ वृत्ती, वडिलांनी ऐनवेळी काढलेला पाठिंबा........ आणि मग सगळं ठप्प. कधी भरल्या गळ्याने, कधी पाणावल्या डोळ्याने सिंग साहेब त्यांची कथा, छे व्यथा, सांगत होते अन मी ही त्या हेलकाव्याबरोबर हिंदकळत होतो. नंतर मग मिडल इस्टमधे जॉब, रेड कॉर्नर नोटीस, कफल्लक असताना पैसे दाबून बसले आहेत असे टोमणे, स्वत:चं आडनावही लावत नाहीत ते. उफ़्फ़. चित्रपटच जणू. 

सिंग साहेब म्हणाले "मी आयुष्यात प्रचंड यश पाहिलं अन पराकोटीचं अपयश ही. आता मी लोकांना सांगतो, तुझं कुठे चुकतंय ते. लोकं म्हणतात जे स्वत: अपयशी होतात ते कन्सलटन्सी करतात. असेलही ते खरं. माझ्या मनात मात्र हेच येतं की ज्या चुका मी केल्या त्या इतरांनी करू नये" 

सिंग साहेबांना भेटून दहा दिवस झालेत. दिवसाआड मेलवरती ब्लॉग पाठवतात ते. आजही पाठवला. म्हंटलं तो मराठीत पोस्ट करण्याआधी त्यांची तर ओळख करून द्यावी, म्हणून हा प्रपंच. 

(सिंग साहेबांचं आडनाव बदललं आहे. पण माणूस अस्सल. कंपनीत येणार म्हणून त्यांनी सांगितलं आहे.) 


अबोला

"राजेश दादाला मी फारच घाबरते" इति मामे बहिण स्वप्ना

"काय असेल ते असेल, तुला आम्ही दोघंही भाऊ खुप टरकून असतो" अमोल आणि आशिष माझे मावस भाऊ

"कैसा है ना वो तेरा मंडलिक. बहुत गुस्सेवाला लगता है" ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला, अशी वैभवीची मैत्रिण. अन कॉलेजमधे असताना  तिचं अस्मादिकाबद्दल मत.

"तुला माहित नाही, कंपनीत सगळे तुला टरकून असतात" माझा बिझीनेस पार्टनर

फेसबुकवर मिश्कील, सरळमार्गी माणूस वैगेरे अशी लोकांची माझ्याबद्दल गैर समजूत झाली आहे असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र माझ्याबद्दल अशी मतं आहेत. फेसबुकला मुखवट्यांचं जग म्हणतात, ते बहुधा यासाठीच.

माझे वाद होतात का? तर होतात. कंपनीतले सहयोगी, कस्टमर, सप्लायर संगळ्यांशी वाद होतात. अगदी खडाजंगी. पण बहुतेकवेळा वाद झाल्यावर लोकांचं बोलणंच बंद झालं का, तर नाही. सुदैवाने जिथे जिथे माझं कडाक्याचं भांडण झालं तिथेही माझा अबोला वैगेरे कधी झाला नाही. किंबहुना, जिथे म्हणून माझी चुकी वाटली तिथे मी कान धरून उभा राहिलो. लोकांनी पण मला माफ केलं. पण जिथे मी बरोबर आहे, तिथे मी भांडलो, जीव तोडून भांडलो अन सांगितलं की "तु चुकीचं वागत आहेस" त्या प्रोसेस मधे मात्र कटुता नाही आली आणि तुम्हाला म्हणून सांगतो, भांडण झालं म्हणून मी कुणाशी बोलत नाही असं आजतागायत झालं नाही आहे.

कस्टमर धंद्यातला महत्वाचा घटक. माझी सगळ्यात जास्त भांडणं यांच्याशीच झाली आहेत. जे कस्टमर सप्लायरला येडे समजतात त्यांना तर मी धुतला आहे, अर्थात शाब्दिक. खुप क़िस्से आहेत.

हे सगळं आठवलं, मधे एका पोस्टवर कॉमेंटमधे अबोला हा विषय आला. मला खरंच कळत नाही बोललं नाही तर प्रश्न सुटतात का? मला नाही वाटत सुटतात म्हणून. उलट बिघडतात. When you run away from problem, you are actually going away from solution. बरं समजा एखाद्या मुद्द्यांवर पटत नसेल तर तो मुद्दा सोडून सौहार्दाचे संबंध होऊ नाही शकत का? माझ्या आजीवरून एका मामाचे अन आईचे भांडण झाले. आता आमची आजी जाऊन ७-८ वर्षं झाली, तिचा दुसरा जन्मही झाला असेल अन हे दोघं धड बोलत नाहीत. मित्रांमधे होतं असं, भावंडात होतं. पण सगळ्यात मला दु:ख वाटतं ते आई अन मुलात/मुलीत भांडणं लागतात तेव्हा. तुरळक अपवाद वगळता आई वडिलांनी पोरासाठी ख़स्ताच खाल्ल्या असतात. पण जेव्हा ही लोकं दहावा पण जेवायला येत नाही तेव्हा मनस्वी दु:ख होतं अन राग पण येतो.

माझी पण लोकांनी भरपूर ठासली आहे. कुणी पैसे बुडवले आहेत, कुणी करियरमधे काड्या घातल्या आहेत, कुणी च्युत्या बनवलं आहे पण तरीही अहमदाबादला गेलो की त्याला फोन करतो, बंगलोरला गेलो की भेटतो, पुण्यात भेटलं की पार्टी करतो.

बाकी नातेवाईक मंडळी तर वर लिहीलेल्या प्रतिमेमुळे वाट्यालाच जात नाही माझ्या. कुणी गेलंच तर फाट्यावर मारतो पण बोलणं सोडत नाही.

सॉरी, म्हणजे कुणाचे genuine मुद्दे असतीलही, नाही म्हणत नाही मी. पण एकदा विचार करून बघा हे न बोलणं त्या नात्याला न्याय देत आहे का? आणि परत जुळलंच तर बोलवा मला चहाला...............बाकी कुणाला दुसरं काही पाजायचं असेल तर ना नाही माझी. 

Sunday 1 March 2015

चला मग

(सदर लेखात आत्मस्तुतीचा मोठा डोस आहे. रिचवून घ्या)

"काय सांगायचं राव माणसं च टिकत नाही"

"चांगली माणसं मिळतच नाही राव"

साधारणत: माझ्या साईजच्या कंपनीच्या मालकांना भेटलो की  अशी वाक्य हमखास कानावर पडतात. खोटं नाही सांगत, मला हा प्रॉब्लेम कधी जाणवलाच नाही. नाही म्हणजे माणसं सोडूनच जात नाही, असंही नाही. पण दर्जेदार मिळतात ही लागलीच.

मधे गानू सरांनी लिहीलं होतं की कॉंन्ट्रँक्ट लेबर वैगेरे बद्दल लिहा म्हणून. खरं सांगू का मला हंगामी कामगार हा फंडाच झेपत नाही. तुम्ही त्याला हंगामी समजता मग तो तुम्हाला हंगामीच समजतो. काय आहे, आपल्याकडे सुवर्ण मध्य काढण्याची पद्धतच नाही आहे. म्हणजे बघा सुरूवातीला मालक लोकांनी कामगारांवर अत्याचार केले असणार. मग कामगार संघटना आल्या. त्यांनी मग अतिरेक केला. बंद, संप, मनमानी. ती चळवळ दडपताना हे हंगामी कामगारांचं प्रकरण निघालं. आता त्या प्रकाराने खुपच बेकार स्वरूप धारण केलं आहे.

माझ्या कंपनीपुरतं बोलायचं झालं तर माझा याबाबतचा प्रवास लिहीतो. कंपनीत फक्त ३० लोकं आहेत.

- माझ्या कंपनीत एकही कंत्राटी कामगार नाही. सगळे कायमस्वरूपी कामगार.
- साधारणपणे २० हेडकाउंट झाला की PF आणि ESI चं कंपनीवर उत्तरदायित्व येतं. माझ्या कंपनीत आम्ही या सोशल सिक्युरिटी ५ जण असल्यापासून लागू केल्या.
- दर २२ दिवसामागे १ पीएल, ८ CL, ८ SL वर्षाला देतो. PL साठल्या तर leave encashment ची सुविधा आहे.
- गेले ५ वर्षापासून gratuity scheme लागू केली आहे.
- कंपनीत subsidized कँटीन आहे.
- वर्षाला युनिफॉर्मचे दोन जोड देतो आणि एक शूजचा.
- बर्याच कामगारांना कंपनीतर्फे कार ड्रायव्हिंगचा क्लास लावला. कस्टमर कॉल अटेंड करायला कार ने पाठवतो.
- गेली १२ वर्षे इमानऐतबारे लोकांना increment देतो. न चुकता.
- सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांशी बोलताना कामावरून discrimition करत नाही. भेदभाव नाही.

(अजूनही खूप मुद्दे आहेत, पण फारच लाल करतो असं होईल. जेवढी केली तितकी पुरे)

मित्रांनो, मला सांगायचं हे की तुम्ही बिझिनेस करता तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवाव्या असं मला वाटतं. याला फार पैसे पडतात का? तर नाही. परवा पश्चिम महाराष्ट्रातल्या एका कंपनीत गेलो. ऑटो कॉंम्पोनन्ट कंपनी. १०००-१२०० कोटी टर्नओव्हर. पण लोकांना नुसतं राबवायचं. कामाच्या वेळा नाही. कँटीन नाही. काही सुविधा म्हणून नाही. बरं मालकाकडे पैसे नाहीत, असं आहे का, तर नाही. मालकाने कुटुंबात ७-८ मर्क, ३ जग्वार अशी गाड्यांची लूट. पुण्यात एक सातारा रोडला वेंडर आहे. त्याची जागा करोडो रूपयांची आहे. स्वत: गडगंज. पण साधी मुतारी नाही हो धड कामगारांसाठी. एक टॉयलेट बांधायला किती खर्च येतो, ₹ ५००००. तितके पण तुमच्या खिंशातून पडत नाही आणि गाड्या मात्र उडवायच्या. असं कसं चालेल. आपण लोकं असं वागतो मग लोकं भांडवलशाही चूक म्हणून बोंब मारतात. त्यात काही चूक नाही हो. अहो, नफ़ा कमवाच पण आपल्या कर्मचार्यांना त्याचा फायदा पोहोचवा. त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवा. काय सोडेल मग तो कंपनी. Be a capitalist by brain and socialist at heart.

अजून एक मुद्दा सांगतो. कमीत कमी नातेवाईक घ्या. लोकं घेताना रीतसर पेपर मधे ad देऊन लोकं घ्या. एकदा कंपनीचं reputation बनलं की लोकं स्वत:हून चालत येतात. आणि हो, कामगारांने कंपनी सोडली तर त्याचे dues पूर्ण द्या.

कदाचित कुणी असं म्हणेलही, लहान कंपनी चालवतो, म्हणून शहाणपणा शिकवतोय, १०० लोकं झाले की समजेल साल्याला. असेलही असं कदाचित, पण १०० होतील तेव्हा काही दुसर्या आयडियांचा वापर केला असेल लोकं टिकवण्यासाठी. कसं आहे लोकं आहेत तर आपण आहे.

"लोकांचे भले करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्याची पद्धती म्हणजे भांडवलशाही" ही व्याख्या वाचताना मनस्वी दु:ख होतं. तर चला, ही व्याख्याच बदलू यात.