Saturday 21 August 2021

कैफियत

समीरने आमच्या कंपनीत राजीनामा दिला. एक्झिट इंटरव्ह्यू च्या वेळेस तो माझ्यासमोर बसला. आणि पार डोळ्यात पाणी वगैरे आणून आमच्या कंपनीतले प्रॉब्लेम सांगू लागला. मी त्याला थांबवलं आणि म्हणालो "पहिले ते डोळ्यातून पाणी येणं थांबव. तू चालला आहेस, तर आणि काही प्रॉब्लेम असेल तर राग येऊन सांग. पण कुठल्याही प्रकारचं गिल्ट फिलिंग मला येईल असं बोलू नको. कारण तुझे ग्रीव्हन्सेस असतील किंवा डिसऍग्रिमेंट पण असतील. आमचीही काही चूक झाली असेल ते मान्य आहे. पण तुझ्या डोळ्यातून पाणी यावं इतका काही मी वाईट वागत नाही."

असं बऱ्याचदा होतं, नाही? एखादा/दी, आपणावर विनाकारण इमोशनल अत्याचार करत अशी काही स्टोरी बनवतं की आपण काही फार मोठा गुन्हा केला आहे. आपल्याला काही कारण नसताना दोषी ठरवून पाश्चातापाच्या कटघर्यात उभं राहायला भाग पडतात आणि अत्यंत काहीतरी पुचाट कैफियत हिरीरीने मांडत असतात. 

झालं आहे असं की स्वतःवर काम करता करता स्वतःच्या वागण्याबद्दलची थॉट प्रोसेस इतकी क्लिअर झाली आहे की कुठल्याही संबंधाला, मग ते एम्प्लॉयर-एम्प्लॉयी असो, की कस्टमर-सप्लायर हे प्रोफेशनल रिलेशन्स अथवा मैत्रीचं, नात्यातील (अगदी आई मुलाचं) हे पर्सनल रिलेशन्स , सांभाळताना माझ्याकडून पूर्ण न्याय माझ्या बाजूने दिला जाईल अशी जीवनप्रणाली बनली आहे. 

थोडक्यात सांगायचं आहे की आता पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन्स मेंटेन करत मी सुद्धा ३०/३२ वर्षे व्यतीत केली आहेत. कळत्या वयापासून हटवादीपणा, मानापमान, तिरस्कार,  स्वार्थ या सगळ्यांपासून दूर राहायचा प्रयत्न केला आहे. या तीन दशकात कुणाला पैशाला फसवलं नाही, जाणून बुजून कुणाला थर्ड लावला नाही, एखादं काम अंगावर घेतलं तर त्याच्या रिटर्न्स ची फारशी अपेक्षा न ठेवता ते पूर्ण करायचा मनापासून प्रयत्न केला आहे, कुणाचा ठरवून अपमान केला नाही, स्वतःचा फायदा व्हावा म्हणून फारसं कधी खोटं बोललो नाही. असं असताना काही वर्षांपूर्वी पर्यंत लोकांच्या कैफयतीना मी सिरियसली घ्यायचो आणि बिनकामाच्या गिल्टपायी विनाकारण तळमळत बसायचो. 

आता मात्र गेल्या पाच वर्षात बराच बदललो आहे. फॉर गुड. एव्हाना खात्री आहे की आपली बाजू खणखणीत आहे. हे मानण्यात माज नव्हे तर स्वतःवरचा विश्वास आहे. आतापर्यंत जो जगण्याचा मार्ग निवडला आहे त्याचं ते फलित आहे. या सगळ्यांचा, गर्व नव्हे, पण अभिमान नक्की आहे. 


a1

Tuesday 3 August 2021

भारी रविवार

 लाईफ पण सध्या इतकं धाकड झालं आहे की चांगलं वाटून घ्यायला आजकाल फार लांब जावं लागत नाही. ही मंडळी आजूबाजूला बागडत असतात. 

काल रविवारी, राहुल करूरकरांबरोबर तरुणाईच्या संवादाचं शेवटचं सेशन होतं. कंपनीतूनच ऑनलाईन बोलत होतो. नवीन काम अथवा व्यवसाय चालू करताना इंडस्ट्रीच्या अपेक्षा काय असतात यावर बोलत होतो. पहिलाच मुद्दा होता, घेतलेल्या कामाची १००% जबाबदारी घेणे. त्याचं उदाहरण द्यायला मला फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीतील मनीषा ढमाले एकटी रविवार असून कंपनीत काम करत होती. तिच्याकडे कंपनी एमआयएस अपडेट करायचं काम आहे. ३१ जुलै ला शेवटचा दिवस असल्यामुळे तिला वेळ मिळाला नव्हता. तिला कुणीही न सांगता, ती एकटी फक्त ते काम पूर्ण करायला आली होती. 

"Leave legacy at workplace" हा बोलण्याचा मुद्दा होता. कामाच्या ठिकाणी आपली छाप सोडणे हे फक्त टॉप मॅनेजमेंट च्या लोकांचं काम आहे असा एक सार्वत्रिक समज आहे. आमच्या इथे मॅनेजमेन्ट टीम चांगली तयार होतेच आहे, पण अशी छाप कुणी अगदी हेल्पर पण पाडू शकतो. हे शोधण्यासाठी मला परत फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीत सध्या कुणी अशी छाप पाडत असेल तर तो म्हणजे आमचा हेल्पर बाबू. काल तो ही कंपनीत आला होता आणि त्याची जी कामं नव्हती ती पण कुणीही न सांगता करण्यासाठी तो रविवारी आला होता. त्याचीही ओळख तरुणाईला करून दिली. 

सेमिनार संपवून घरी आलो. तर व्हाट्स अप वर प्रियांका डंक कुलकर्णी ची स्टोरी होती. प्रियांका म्हणजे माझी सख्खी मामेबहिण. तिच्या खडतर प्रवासाचा मी पण साक्षीदार आहे. हा लेख तिच्या इंजिनियरिंग च्या सरांनी लिहिला आहे. त्याआधी मी का नाही लिहिला याचं मला वाईट वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की वाचा. 

लेखाची लिंक 

https://www.ravindrajoshi.com/2021/07/blog-post_31.html?m=1

आणि शेवटचा फोटो आहे, कलाम सरांनी पत्राची पोच दिल्याचा. त्यांची पुण्यतिथी होती त्यादिवशी तो फोटो मेमरीत दिसला. लिंक्ड इन वर टाकला. तिथलं अल्गोरिदम कळत नाही. ३ लाख लोकांनी ते पत्र पाहिलं. हजारो लोकांनी प्रोफाइल व्ह्यू केलं. प्रोफेशनल मीडिया नीट वापरला तर कंपनीचा ब्रँड कसा तयार होतो त्याची झलक. 

(दुसर्याबद्दल लिहिता लिहिता शेवटी मंडलिकांनी स्वतःची लाल केलीच असं जर कुणाला वाटत असेल तर..........ते बरोबर आहे. त्याबाबत आपण हयगय करत नाही)