Wednesday, 24 June 2026
कोरियन मुलगी
Thursday, 4 June 2026
परवाच्या इ व्ही च्या पोस्ट मध्ये अनेक जणांनी मीरा कारचा आणि पर्यायाने पंडितराव कुलकर्णी यांचा उल्लेख केला. अर्थात नेट वर मीरा कार ही शंकर राव कुलकर्णी यांनी बनवली आहे असा उल्लेख आहे. पण मीरा चं चित्र आणि उल्लेख हे आजही फाय च्या वेब साईट वर आहे. म्हणजे पंडितराव आणि शंकरराव कुलकर्णी हे अतिशय जवळचे नातेवाईक असणार आहेत. तर मी आज लिहिणार आहे ते फाय बद्दल. फ्युएल इंस्ट्रुमेंट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (फाय) बद्दल. अतिशय प्रोग्रेसिव्ह ग्रुप असला तरी दुर्दैवाने आमचे फार काही बिझिनेस रिलेशन्स फाय ग्रुप बरोबर एस्टॅब्लिश झाले नाही. त्यामुळे मला फक्त दोन-तीन वेळाच त्यांच्याकडे जाता आलं. त्यामुळे मी जे लिहिणार आहे ते मी जे अनुभवलं आणि थोड्या फार ऐकीव माहितीवर.
फाय ग्रुप जरी १९५३ मध्ये स्थापित झाला तरी तो नावारूपाला आला तो पंडितराव कुलकर्णी यांच्या लीडरशिपखाली. एकुणातच हे कुलकर्णी कुटुंबीय उद्योजकतेचा मापदंड ठरलं आहे. मी जेव्हा फाय ग्रुप मध्ये गेलो तेव्हा पंडितराव हे व्यवसायात जास्त ऍक्टिव्ह नव्हते. पण ज्यांना मी भेटलो होतो ते पंडितरावांबद्दल बोलताना थकत नव्हते. त्यांचं उच्च दर्जाचं तांत्रिक ज्ञान, इचलकरंजी सारख्या छोट्या गावात त्यांनी वसवलेला अत्यंत प्रागितिक औद्योगिक समूह, त्या एका ग्रुप मधून बाहेर पडून तयार झालेले असंख्य उद्योजक, त्यांनी समाजासाठी केलेले अनेक प्रकल्प, फाय फाउंडेशन अवॉर्ड्स अशा एक ना अनेक चित्तरकथा मी ऐकल्या आणि स्तिमित झालो होतो.
अत्यंत साध्या वेशात राहणाऱ्या पंडितरावांकडे अनेक परेदशी डेलिगेट्स वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स वर उत्तर शोधण्यासाठी इचलकरंजी त यायचे. तुम्ही समजू शकता की इचलकरंजी फार व्यवस्थित जगाशी कनेक्ट नव्हतं, पण त्या काळात सुद्धा जगभरातून लोक फाय ग्रुप ला व्हिजिट करायचे.
फाय ग्रुप बद्दल आदर आमच्या मनात अजून एका कारणासाठी आहे. आम्ही ज्या असोसिएशनचे सभासद आहोत ती आय एम टी एम ए, इमटेक्स म्हणून एक औद्योगिक प्रदर्शन भरवते. त्या एक्झिबिशन मध्ये फाय ग्रुप टेक्निकली उत्कृष्ट डिझाईन केलेल्या मशीन ला अवॉर्ड देते. फाय फाउंडेशन चं अवॉर्ड इमटेक्स मध्ये मिळणं हे त्या डिझाईनला मिळालेली सर्वात भारी पोचपावती समजली जाते. भारतीय मशीन टूल बिल्डर्स बद्दल फाय फाउंडेशन चं असणारं ममत्व हे अजून एका वेगळ्या कारणासाठी आहे. इंडियन मशीन टूल बिल्डर्सचे अर्ध्वयू समजले जाणारे साठे साहेबांचे पंडितराव कुलकर्णी यांच्याबरोबर अत्यंत सौहार्दाचे संबन्ध होते. इन फॅक्ट अशी वंदता आहे की साठे साहेबांच्या प्रगती ऑटोमेशन सुरु आणि एस्टॅब्लिश होण्यामागे पंडितरावांचा सक्रिय सहभाग होता. प्रगती ऑटोमेशन ने जगभरात आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या प्रॉडक्टस चा झेंडा रोवला ती कथा भारतीय औद्योगिक क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहे.
मायको बॉश मध्ये काम करणाऱ्या माझ्या एका जवळच्या मित्राने पंडितरावांचा किस्सा सांगितला होता. डिझेल पंप मध्ये लागणारा एक क्रिटिकल कॉम्पोनंट होता ज्याचं मशिनिंग करायला २७ सेकंद लागत होते. लाखांमध्ये लागणाऱ्या या प्रॉडक्ट ची प्रॉडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी इंजिनियर जंग जंग पछाडत होते. फाय ग्रुप त्यांच्याबरोबर कनेक्ट होताच. पंडितरावांकडे तो प्रॉब्लेम घेऊन गेले. काही महिन्यात २७ सेकंद लागणारा कॉम्पोनंट ७ सेकंदात बाहेर पडू लागला. फाय ग्रुप बॉशचा एक महत्वाचा सप्लायर बनला हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पंडितरावांचं हे जे वरच्या लेव्हलचं तांत्रिक ज्ञान होतं ते इतकं प्रसिद्ध झालं की क्वालिटी बद्दल पराकोटीचं आग्रही असणाऱ्या जापनीज लोकांमध्ये पण त्यांचं नाव झालं. कि हिन नावाच्या प्रसिद्ध कार्ब्युरेटर उत्पादकाने फाय ग्रुप बरोबर सामंजस्य करार करून चाकण इथे प्लांट टाकला.
आमच्या इमटेक्स च्या शिवाय फाय फाउंडेशन वेगवेगळे अवॉर्ड्स देतं. त्या पुरस्कर्थ्यांची नावं जर बघितली तर त्याचं महत्व आपल्या लक्षात येईल. त्यांच्याबद्दल वाचताना मला हे पण कळलं की ते भारतातील पहिले (आणि कदाचित एकमेव) लोकनियुक्त नगराध्यक्ष होते.
अर्थात उद्योजकांच्या प्रति जी अनास्था आपण सिद्धांतावर चालणाऱ्या अनेकांबद्दल आपण बघतो ती माझ्या मते पंडितराव कुलकर्णी यांच्या वाटेला पण आली. इचलकरंजी आणि फारतर महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे पण त्या पलीकडे ते जावं असं काही आपण फारसं काही केलं नाही. नेट वर पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
कै पंडितराव कुलकर्णी आणि फाय ग्रुप यांना दिल से सॅल्यूट!
Tuesday, 2 June 2026
तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडे एक भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक कार होती. आणि मी ते पुष्पक विमानसारखं कुठली तरी पुराणातील गोष्ट सांगत नाही आहे तर ही गोष्ट आहे २००० च्या आसपासची. सिटी आहे बंगलोर आणि कंपनीचं नाव आहे मैनी. त्यांच्या इलेक्ट्रिक कारचं नाव होतं रेवा. चेतन मैनी नावाच्या तरुण इंजिनियर ने १९९४ च्या आसपास रिसर्च करून ही कार बनवली होती. रेवा बंगलोर च्या रस्त्यावर तर दिसायचीच पण रिपोर्ट सांगतं की जगभरात २६ देशांमध्ये ती निर्यात पण झाली होती.
जेव्हा जग म्हणत होतं की इलेक्ट्रिक कार हे दिवास्वप्न आहे तेव्हा रेवा शांतपणे आपला मार्गक्रमण करत होती. २००४ च्या आसपास सुरु झालेल्या टेस्ला मुळे अचानक इलेक्ट्रिक कारची जगभरात हवा चालू झाली. इनफॅक्ट रेवा ची दोन वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे अर्थात ती इलेक्ट्रिक होती आणि दुसरं म्हणजे २००९ साली लॉन्च झालेल्या पण नंतर एक अपयशी ठरलेल्या नॅनो इतकीच तिची साईझ होती.
आज इ व्ही स्टार्ट अप चा बोलबाला चालू आहे. पण नव्वदीत चालू झालेल्या मैनी च्या रेवा ला महिंद्रा ने २०१० साली अंगीकृत केलं आणि तीच कार इ २ ओ म्हणून ती कार नव्याने लॉन्च केली. आज महिंद्रा इलेक्ट्रिक कार मध्ये धूम करत आहे, पण त्याची सुरुवात इ २ ओ ने झाली आहे असं म्हणायला स्कोप आहे.
ज्या टेस्ला आणि पर्यायाने इलॉन मस्क चं आज जग गुणगान गात आहे पण त्याने टेस्ला मध्ये शिरकाव करण्याच्या आधी भारतात त्या टेक्नॉलॉजीवर आधारित एक पूर्ण कार भारतीय रस्त्यावर पळत होती. पण आपलं दुर्दैव असं की त्या काळाच्या पुढे असलेल्या टॉक्नॉलॉजीवर ना शासनाने विश्वास ठेवला ना भारतीय समाजाने. आणि कुणास ठाऊक, खुद्द प्रमोटर सुद्धा त्याच्या संशोधनात मागे पडले, कारण पुढे महिंद्रा ने सुद्धा ते ई २ ओ मॉडेल बंद केलं.
असे प्रॉडक्ट यशस्वी करण्यासाठी जी सर्वांगीण उद्योजकीय वातावरण लागतं तिची आपल्याकडे वानवा आहे. अमेरिका जर आज अत्यंत प्रगत देश झाला आहे त्यामध्ये या उद्योजकीय मानसिकतेचा मोठा सहभाग आहे.
Tuesday, 26 May 2026
Thursday, 21 May 2026
Tuesday, 19 May 2026
Friday, 13 March 2026
काही वर्षांपूर्वी मी एक व्हिडीओ बघितला होता. ख्रिश्चन लग्नामध्ये मुलीचे वडील, फादर समोर मुलगा-मुलगी एकमेकांना स्वीकारण्याआधी, एक छोटं भाषण देतात. मला त्या वडिलांची कमाल वाटली. कारण त्या भाषणात विनोद होता, भावना होत्या, अभिमान होता, प्रेम होतं. आणि हे सगळं म्हणताना वडील एकदम कुल होते. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला ते ब्रिट वाटले. त्यांचं भाषण मराठीत लिहिण्याचा मोह आवरत नाही आहे.
वडील म्हणतात
"फिलिप, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने चालू होतात तशी ही पण चालू होते."
"काही वर्षांपूर्वी एक माणूस असतो जो चांगला बाप ही असतो आणि एव्हाना तुला हे कळलंच असेल की तो बाप म्हणजे मीच आहे. तर त्याला एक मस्त मुलगा असतो आणि कुटुंब एकंदरीत आनंदात असतं. एकेदिवशी मला कळतं की माझी बायको पुन्हा एकदा प्रेग्नन्ट झाली आहे आणि लवकरच एक बाळ आमच्या घरात येणार आहे. मग मी देवाकडे प्रार्थना केली. त्याला म्हणालो "देवा, खरंतर सगळं तुझ्यामुळे घडतं. पण येणारं बाळ जर मुलगी असेल तर माझ्यावर कृपा होईल." देवाने माझी प्रार्थना ऐकली. त्या छोट्या परीला मीच माझ्या कुशीत घेतल्यावर मला अपार आनंद झाला."
"मी त्या एंजल कडे बघत अजून एक प्रार्थना केली की "देवा, तिला तिच्या आईसारखं बनव" देवाने माझी ती ही प्रार्थना ऐकली. माझी मुलगी तिच्या आईप्रमाणे अतिशय लाघवी, प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी अशी मोठी होत होती. पण मग माझ्या लक्षात आलं की या मायलेकी माझ्याकडे लक्षच देत नव्हतं. मग मी देवाकडे प्रार्थना केली की "देवा, तिच्यात माझा थोडा तरी अंश उतरू दे." आणि गंमत म्हणजे देवाने माझी ती पण प्रार्थना ऐकली. तुला सांगतो ती ट्रक पण चालवते आणि ट्रॅक्टर सुद्धा. ती गवताचा भारा उचलून ट्रॉली मध्ये सहजपणे लोड करते आणि मनात आलं तर तंबाखू पण चघळू शकते. तुला लक्षात येत आहे की कुठला झंझावात तू गळयात अडकवून घेतो आहेस ते."
"हे सगळं होत असताना तिचं एक स्वतःचं भावनाशील व्यक्तिमत्व घडत होतं, तिची भवतालाबद्दल मतं तयार होत होती, आणि तिची बुद्धी विकसित होत होती. मग देवाकडे पुन्हा प्रार्थना केली "आता पुरे. तू खूप तिच्यावर उपकार केले आहेस. आता अजून एक प्रार्थना. तिला तुझ्यासारखं बनव." आणि काय सांगू तुला, त्याने ते ही ऐकलं. त्याने तिला लोकांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त केलं. ती रुग्णांची सेवा करणारी परिचारिका बनली. ती हे काम अत्यंत प्रेमाने करते. तिने अनेकांना आपल्या सेवाभावी वृत्तीने यमाच्या दारातून अक्षरश: खेचून परत आणलं आहे. आणि अनेकांनी तिचा हात आपल्या हातात धरून शांतपणे या पृथ्वीवरून एक्झिट पण घेतली आहे. तिने या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. ते करण्यासाठी तिने अनेक दिव्य कामं केली आहेत. त्यासाठी जगभर फिरली आहे, डोंगर चढून गेली आहे, रौद्र स्वरूप असलेल्या नदीच्या पात्रात छोट्या बोटीने तिने प्रवास केला आहे आणि युद्धभूमीवर आजूबाजूने बुलेट्स जात असताना जमिनीवर झोपून आपलं रुग्णसेवेचं कर्तव्य बजावलं आहे. तिच्या या वागण्यातून जगात अजून एक सुप्रीम शक्ती आहे याची जाणीव होते."
"हे सगळं छान असलं तरी काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटत आहे. मी देवाकडे पुन्हा, आणि कदाचित शेवटची प्रार्थना केली "माझ्या मुलीवर सुखाचा वर्षाव कर" मग तू तिच्या आयुष्यात आलास. तुला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसतो. त्याबद्दल मी विधात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आज मी माझ्या जवळ असणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुझ्या हातात सोपवत आहे. पण ते करण्याआधी मला तुला सांगायचं आहे की विधाता आणि मी, आम्ही दोघांनी ती आजच्या दिवसासाठी अशी सुंदर बनावी म्हणून अथक प्रयत्न केले आहेत."
"फिलिप, आज माझ्या कन्येचा हात तुझ्या हातात सोपवताना, तुझी हरकत नसेल तर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी आणि विधाता असे दोघेही तिच्या पाठीशी आहोत. तेव्हा तिच्याशी अजिबात पंगा घेऊ नकोस."
Monday, 16 February 2026
Monday, 26 January 2026
आरंभ
Thursday, 1 January 2026
नवीन वर्षाची सुरुवात करताना परत एका गोष्टीचा पुनरुच्चार करावासा वाटतो की भारतीय उत्पादन क्षेत्र हे अतिशय सकारात्मक संक्रमणातून जात आहे. किंबहुना जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर पहिल्यांदाच जगाच्या पाठीवर वेगवगेळ्या क्षेत्रात अनेक घडामोडी एकाच वेळेस घडताना दिसत आहेत. कोविड १९ झालं, रशिया युक्रेन युद्ध झालं, यूरोप मध्ये सीरिया, जॉर्डन, अफगाणिस्तान, लेबनान सारख्या देशातून असंख्य लोक आश्रित म्हणून आले, चीनची एकूणच शक्ती प्रचंड वाढली, तैवान ला त्याने खुले आव्हान दिले तर युरोप मध्ये अनेक देशात चीनने प्रचंड गुंतवणूक केली, अशी परिस्थिती तयार झाली की जग ग्लोबलायझेशन कडून लोकलायझेशन कडे वळत आहे अशी चिन्ह दिसू लागली, जगात क्रमांक एकवर असलेल्या महासत्ता असलेल्या देशाच्या लीडरशिप ने अनाकलनीय निर्णय घेतले ज्यामुळे जगाची दिशा भरकटल्यासारखी वाटली. भारतात सुद्धा बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, ज्यावर मागे लिहिलं होतं. त्याबद्दल परत लिहीत नाही, कारण मूळ विषय सोडून वेगळ्याच गोष्टींवर चर्चा सुरु होते.
आज भारताचे उत्पादनक्षेत्र जीडीपी मध्ये १५% सहभाग नोंदवतं. येणाऱ्या दशकामध्ये हे गुणोत्तर प्रमाण २५% नेण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत.
हे जरी खरं असलं तरी जगात तयार झालेल्या अनिश्चिततेमुळे (मॅनेजमेंट जार्गन मध्ये याला VUCA जग असे संबोधतात. Volatile, Uncertain, Complex, Ambiguous), दोन गोष्टींचा व्यावसायिकाने विचार करावा असं वाटतं. एक तर जगात काय घडतं त्यापासून आपण इम्यून आहोत या गैरसमजातून बाहेर पडावं. दोन दशकांपुर्वी हे बऱ्याच अंशी खरं असेल, पण आता नाही. आणि दुसरं म्हणजे जगात हे जे काही चालू आहे त्या बदलांचा स्वीकार करणे आणि मुख्य म्हणजे त्या बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणण्यात चपळता दाखवणे. आपलं भविष्य सुरक्षित करण्याची शक्यता या मुळे तयार होईल. खात्री नाहीच.
आपल्या उत्पादनाची आणि सेवेची गुणवत्ता यात सातत्याने सुधार आणणे हा आपला मंत्र असायला हवा. भारताची उत्पादकता आणि गुणवत्ता याबद्दल जगात फारसं चांगलं बोललं जात नाही. अर्थात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय भवताल हा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्पादकता या मानसिकतेला दुर्दैवाने पूरक नाही आहे. पण आजूबाजूच्या इको सिस्टम कडे दुर्लक्ष करत व्यवसायाने अंतर्गत पद्धती या इतक्या सशक्त बनवायला हव्यात की बाह्य मूलभूत अवगुणांचा जगाला विसर पडायला हवा. अवघडच आहे ते, पण घडायला हवं.
एक प्रश्न व्यावसायिकाने सातत्याने विचारायला हवा तो म्हणजे "जगात सर्वोत्तम असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा माझ्या व्यवसायाचं नाव घेतलं जातं का?" त्याचं उत्तर देताना मुक्त पणे "हो" येत नसेल तर बाह्या सरसावून सर्वोत्तम बनण्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे.
२०२६ मध्ये पाऊल टाकताना, पुढील दशकात व्यवसायाची भरभराट कशी होईल, याच्या पायाभरणीवर लघु आणि माध्यम उद्योगांनी जोर देण्यात शहाणपण आहे.
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.