Monday 18 December 2023

 ३ नोव्हेंबर ला जिम मध्ये छातीत दुखल्यासारखं झालं. त्याकडे दुर्लक्ष करत मी काम केलं. ४ नोव्हेंबर ला निगडीत ग दि मा सभागृहात गाडी पार्क केल्यावर रॅम्प वर चालत आलो. नाट्यगृहात ए सी असला तरी मला घाम आल्यासारखं झालं. तिथून मी गाडी चालवत पुण्यात आलो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि जेवण करून मी कंपनीत आलो तेव्हा मला अनइझी वाटत होतं. मी निर्णय घेतला स्ट्रेस टेस्ट करून घेऊ. नेमके माझे स्वतःचे डॉक्टर दिवाळीचा आधीचा आठवडा म्हणून लवकर घरी गेले होते. मी दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊन स्ट्रेस टेस्ट केली जी नेमकी पॉझिटिव्ह आली. 

पण एक गोष्ट त्यात चांगली झाली की डॉक्टर ने सांगितलं की स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह ही शेवटच्या एक मिनिटात आली त्यामुळे ती कदाचित डिसेप्टिव्ह आहे. आधी दोन प्लास्टी झाल्यामुळे डॉक्टर म्हणाले की सी टी अँजिओग्राफी करून घ्या. सोमवारी ६ नोव्हेंबर ला सी टी अँजिओग्राफी झाली आणि सुदैवाने त्यात लक्षात आलं की हृदय एकदम टकाटक आहे. दोन दिवसात माझ्या नेहमीच्या डॉक्टर ला रिपोर्ट दाखवले आणि त्यांनी पण सांगितलं की माझे चेस्ट पेन हे कार्डिअक नाही आहेत. 

गंमत अशी झाली की इतकं सगळं सांगून सुद्धा माझे चेस्ट पेन काही थांबत नव्हते. आणि ते दुखणं हे मी शब्दात सांगू नाही शकत. पण डोकं दुखायला लागल्यावर डोक्यात जशा कळा येतात तसे ते पेन्स होते. त्यावर विचार करत असताना मला एक साक्षात्कार झाला की हा स्ट्रेस प्रॉब्लेम तर नाही आहे? 

मी माझी मानसोपचार तज्ञ बहीण मानसी देशमुख हिची मदत घ्यायचं ठरवलं. तिच्या सेशन मध्ये तिने मला १७५ प्रश्न असलेले प्रश्नावली दिली आणि मला विचारलं की गरज पडली तर मनोविकार तज्ञांकडे जाऊन औषधे घ्यायची तयारी आहे का? मी हो म्हणालो. 

मानसीने माझं डायग्नोसिस केलं आणि तिने सांगितलं की मला अँगझायटी डिसऑर्डर झाली आहे आणि ती वाढण्याअगोदर वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे. तिनेच मला एका सायकियाट्रिस्ट चा रेफरन्स दिला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि मला सांगितलं की कौन्सिलिंग थेरपी चालू करण्याआधी तुमची मानसिकता जागेवर येण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी एकच गोळी दिली. 

त्या रात्री मी ती गोळी घेतली आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः जादू झाल्यासारखे माझे चेस्ट पेन थांबले. 

औषधे चालू आहेत. जानेवारी महिन्यात कौन्सिलिंग सेशन चालू होतील. 

बराच विचार केला की इतकी पर्सनल गोष्ट सोशल मीडियावर सांगावी की नाही. पण शेवटी सांगावी वाटली. कारण मानसिक आजार हा कुणालाही होऊ शकतो आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. 

Wednesday 13 December 2023

 दिवसाचे चोवीस तास आणि वर्षात ३६५ दिवस हे वैश्विक सत्य आहे. पण त्याच आणि तितक्याच काळाचा वापर करून प्रत्येक जण आयुष्य मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जगतो. त्यामध्ये काही लोक आकाशाची उंची गाठतात तर काही जण मात्र भरीव असं काही फारसं करू शकत नाहीत. किंबहुना तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांचा पण विचार केला तर अनेक जण अर्ह समस्ती आयुष्य जगतात. अर्ह समस्ती म्हणजे worthy of existence. काय मानसिकता असावी अशा लोकांची हा प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो. मी जेव्हा या लोकांचा अभ्यास करतो, एकूण जीवनशैलीबद्दल विचार करतो तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. 

त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य जगण्याचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याबद्दल या लोकांच्या डोक्यात खूपच स्पष्टता असते. कुठलंही काम करताना ही लौकिकार्थाने समाजात विशिष्ट योगदान देणारी मंडळी, त्या कामाला सिद्धांताच्या आणि उद्देशाच्या कसोटीवर अगदी तावून सुलाखून बघतात. त्या सिद्धांताला आणि उद्देशाला जागणारं ते काम असेल तर त्यात अक्षरश: झोकून देतात आणि त्यासाठी १००% प्रयत्न पणाला लावतात. पण जर काही कारणाने त्यांच्या मूळ सिद्धांताला धक्का बसणार असेल आणि मूळ उद्देश जर सफल होत नसेल तर बहुतेकदा हे लोक त्या कामाच्या वाटेला पण ही लोकं जात नाहीत. या वैचारिक स्पष्टतेमुळे कुठलं काम हातात घ्यायचं आणि कुठलं नाही याची निवड करताना त्यांचा वेळ फारसा जात नाही आणि मग जे काम हातात घेतलं ते तडीस नेताना ते तन-मन-धन झोकून काम करतात. 

सिद्धांत आणि उद्देश यापैकी एक वेळ जगण्याचे सिद्धांत शोधणं हे सोपं असेलही कदाचित, पण उद्देश शोधणं हे मात्र फार जिकिरीचं काम असतं. स्वतःच्या "असण्याबद्दल" खूप खोलवर विचार करणं हे गरजेचं असतं. वयाच्या कुठल्या पायरीवर याची उपरती होते हा एक मोठा प्रश्नच आहे. काही जण वयाच्या विशीत हे शोधू शकतात तर काही जण तीस, चाळीस किंवा पन्नाशीत याचा धांडोळा घेतात. काहींना मात्र आयुष्य संपतं तरी त्याचा शोध घेता येत नाही आणि अनेक जणांना तर तो शोध घ्यावा याची इच्छा पण होत नाही. फक्त एक मात्र आहे की ज्याक्षणी या सिद्धांताचा आणि उद्देशाचा साक्षात्कार होतो तो युरेका क्षण असतो. आपल्याला लक्षात येतं की आपण ही राजहंस आहोत आणि त्यानंतरच्या आयुष्याला एक वेगळे आयाम प्राप्त होतात. त्या युरेका क्षणाच्या आधीचं आणि नंतरचं जगणं यात प्रकर्षाने जाणवणारा फरक दिसून येतो. 

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हा मूळ उद्देश हा भौतिक गोष्टींशी सांगड घालणारा नसतो. तर तो अभौतिक आणि अमूर्त गोष्टींभोवती रुंजी घालत असतो. एकदा आपलं :असणं" हे भौतिकतेशी निगडित नाही आहे हे लक्षात आलं की त्या उद्देशाला परिपूर्ण करण्यातला प्रवास हा कमालीचा आनंददायी असतो. त्यातून मिळणारं समाधान हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. इंग्रजीत एक शब्द आहे "पॅशन". सामान्यतः त्या शब्दाचा वापर सहजगत्या केला जातो. पॅशन ला मराठीत समानार्थी शब्द दिसत नाही. तरी आपण तिला उत्कट किंवा तीव्र भावना म्हणू शकतो. एखादं काम स्वतःवर ओढून घेताना कुठल्याही भौतिक परताव्याची अपेक्षा न ठेवता काम करणं म्हणजे पॅशन. त्यातील गंमत अशी आहे की जेव्हा या भावनेने काम केलं जातं तेव्हा त्या कामातील गुणवत्ता आणि त्यातून मिळणारे रिझल्ट्स हे उच्च दर्जाचे असतात. त्यामुळेच निःस्वार्थी भावनेने समाजपयोगी काम करणाऱ्या अनेक जणांकडून आपण स्तिमित व्हावं असे अचाट काम झालेलं आपण पाहतो. या  उत्कट भावनेला निखार येण्यासाठी मात्र मनातील उद्देश हा एकतर उदात्त हवा किंवा एव्हरेस्ट इतका भव्य हवा. उदात्त उद्देश आणि त्याची पूर्तता करणारी उत्कट भावना याचा एकत्रित अविष्कार हा दिव्यत्वाची प्रचिती देणारा असतो हे आपण आजूबाजूच्या अनेक उदाहरणावरून बघतो. 

बऱ्याचदा असं म्हंटलं जातं की ही जगणं गाणं करण्याची भावना किंवा तिला सूर देणारा उद्देश हे अंगभूत असावं लागतं किंवा ते जन्मतः च येतं. मला नाही वाटत तसं. बहुतांशी लोक जन्माला येताना एकाच प्रकारची शारीरिक आणि मानसिक क्षमता घेत जन्माला येतात. (काही अपवाद असतात). ते लक्षात न घेता बहुतेकदा असामान्य लोकांना आपण देवत्व देऊन मखरात बसवून टाकतो आणि आपणही काही भरीव करू शकतो या भावनेला तिलांजली देतो. जन्मा नंतरची जडणघडण, त्यातही मानसिक, ही कौटुंबिक आणि  सामाजिक इको सिस्टम वर अवलंबून असते. किंबहुना असं म्हंटलं जातं की वयाच्या सातव्या वर्षापर्यंत माणसाचा मेंदू आपल्याला हवा त्या पद्धतीने विकसित करता येतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यानंतर त्या विचारात बदल घडवून आणता येत नाही. तो बदल घडवता येतो. 

फक्त त्यासाठी लर्निंग. . . . . . . . . . . . अनलर्निंग. . . .. . . . . . . रिलर्निंग ही  पद्धती समजून घ्यावी लागते. थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत जे काही जीवन कौशल्ये आपण शिकलो ती एकतर कुणाला तरी हस्तांतरित करण्यात शहाणपण असतं. हे झालं अनलर्निंग. एकदा ते केलं की आपण नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होतो. या नवीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागतात. त्यासाठी कदाचित वेगळी कौशल्ये नव्याने शिकावी लागतात. ही झाली रिलर्निंग ची पद्धत. यामुळे जगण्यात एक नावीन्यता येते. कुठलंही काम करताना "हे बोअर झालं आहे आहे" ही भावना मनाला शिवत नाही. नवनवीन आव्हानं वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्वीकारण्यासाठी मन घाबरत नाही. 

ही वरची शृंखला लक्षात आली की त्याला पूरक गुण असतो तो म्हणजे योजनाबद्ध नियोजन. नियोजनाशिवाय जर काही काम हातात घेतलं तर अपयशी इतिश्री होण्याची मुहूर्तमेढ आपण रोवत असतो. नियोजन या प्रकारावर थोडा जास्त वेळ काम केलं तर ते काम नंतरच्या काळात पूर्णत्वाला जाण्याची शक्यता जास्त असते.  

एकदा का नियोजन झालं की पुढची महत्वाची पायरी आहे ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. बऱ्याचदा आपण योग्य निर्णय कसे घेता येतील याची वाट बघतो. इथं गंमत अशी आहे की जे लोक लौकिकार्थाने सातत्याने योग्य निर्णय घेत असतात त्यांनी आयुष्यात कधीकाळी खूप चुकीचे निर्णय घेतेलेले असतात. त्यातून जे अनुभव पदरात पडतात त्यातून मग योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. Experience is what you get when you don't get what you wanted असं एक इंग्रजी वाक्य आहे. त्या वेगवेगळ्या अनुभवातून निर्णय क्षमता विकसित करावी लागते. 

निर्णयक्षमता अंगात बाणली गेली की त्याला जोड लागते ते कृतिशीलतेची. कृतीविना निर्णय हे फक्त स्वप्नच  राहतं. कामात चालढकल करणं हे खरंतर कृती टाळणे असंच असतं. त्यामुळे एखादं काम हातात घेतलं तर ते लवकरात लवकर तडीला नेण्यात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च करण्याची तयारी हवी. हातात घेतलेल्या कामाला तडफेच्या कृतीची जोड देत ते जर पूर्णत्वाला नेलं तर त्यातून मिळणारा आनंद हा स्वर्गातीत असतोच शिवाय आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आपसूक येतो. 

या तीन गुणांबरोबर गरज असते ती चिकाटीची, पाठपुराव्याची. मॅकडोनाल्ड चा संस्थापक रे क्रॉक याच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट आहे "फाउंडर". त्यात क्रॉक च्या तोंडी सुंदर वाक्य "Perseverance beats genius"  एखाद्याच्या अंगात भले हुशारी कमी असेल पण त्याची पाठपुरावा करण्याची क्षमता असेल तर तो आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मला असे अनेक यशस्वी लोक माहिती आहेत कि ज्यांनी आपली काही स्वप्ने वर्षनुवर्षे मनाशी जपून ठेवली आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेत, कृतिशीलतेची जोड देत आणि त्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा करत आश्चर्यकारक प्रगती केली आहे. 

तर आहे हे असं आहे. जे लोक आयुष्य अर्ह समस्ती पद्धतीने जगतात आणि जे लोक फारसं काही दखलयोग्य जगू शकत नाही त्यांच्या विचारधारेत हा पंचसूत्राचा  मूलभूत फरक आहे असं माझं मत आहे. लेखाच्या सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला दिवसाचे २४ तास मिळाले आहेत. त्या वेळेचा वापर आपण किती इफेक्टिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह करतो हे आपल्या हातात आहे. येणाऱ्या नवीन वर्षात तो तसा करता यावा यासाठी हार्दिक शुभेच्छा. 



Thursday 30 November 2023

 संजय आणि संदीप एकत्रच इंजिनियरिंग पास आउट झाले. संजय आपला गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील तर संदीपचं घर तालेवार. दोघे जानी मित्र. दोघेही जबरदस्त हुशार. पण स्वभाव पूर्ण वेगळे. संजयची मानसिकता काटकसरी आणि नम्रतेची तर संदीप मोठया गप्पा मारणाऱ्या आणि थोडा आढ्यताखोर. दोघांनाही नोकरी लागली. वेगवेगळ्या कंपनीत. संजय मान खाली घालून इमानेइतबारे जॉब करत राहिला. तर संदीपने पाच  एक वर्षे काम करत व्यवसायात उडी मारली. 

सात वर्षे नोकरी करून संजयने सुद्धा छोटं वर्कशॉप चालू केलं.

संजयची स्टेडी ग्रोथ चालू होती. संदीपचं पण वरवर पाहता दणकेबाज व्यवसाय वाटत होता. संदीप संजयला म्हणायचा सुद्धा "अरे, काय एक दोन रन काढतोस. माझ्यासारखा चौके छक्के मारायला शिक". संजय कसंनुसं फक्त हसायचा. 

संदीपने एकदम फॅन्सी ऑफिस बनवलं आणि मोठी फॅक्टरी टाकली. ऑफिसवर एखाद दोन कोटी रुपये खर्च केले असावे. आलिशान केबिन होती संदीपची. उदघाटन समारंभाला संजय काही बोलला नाही, पण नंतर त्याने एकदा संदीप ला विचारलं "तुला काही सॉलिड ऑर्डर वगैरे मिळाली का, की इतकी मोठी फॅक्टरी आणि फाईव्ह स्टार ऑफिस बनवलं तू?" संदीप त्याला बेदरकार पणे म्हणाला "तुला नाही कळणार हा माईंडसेट. तू आपला दहा बारा हजार स्क्वे फूट मध्ये गोट्या खेळत बस." इतकं बोलून सुद्धा संजय ने मोठ्या मनाने त्याला शुभेच्छा दिल्या. 

दोघे आपापल्या व्यवसायात रमले. 

संजयच्या कानावर संदीप बद्दल काही बाही ऐकायला येऊ लागलं. लोकांचे पैसे बुडवणे, बँकेकडून लोन घेतलं त्याचे हप्ते चुकवणे. एखाद दोन वर्षात संदीपची पार वाताहत झाली. लोकांनी कोर्ट केस केल्या. 

संजय स्वतःहून संदीपला एक दिवशी भेटला. काय झालं ते समजून घेतलं. संजयचा संदीपच्या हुशारी वर विश्वास होता. तो संदीप ला म्हणाला "तुझा खड्डा बुजवण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत, पण तुझ्यासाठी मी नवीन बिझिनेस काढतो, तू सांभाळायचा. पैसे कमावून देणेकर्यांचे पैसे चुकवू." आम्ही सगळ्यांनी संजयला खूप धोका पत्करतो म्हणून सांगितलं. पण संजय म्हणाला "दोस्ती आहे, तिला जागावं तर लागणार.". 

व्यवसाय चालू झाला. एकेदिवशी संदीपचे देणेकरी पोलिसांना घेऊन त्याला पकडायला आले. संजय मध्ये उभा राहिला. म्हणाला "एक वर्ष द्या. प्रत्येकाचे पैसे चुकवणार. मी खात्री देतो." संजयचं रेप्युटेशन चांगलं होतंच. देणेकरी परत गेले. 

काल संजयचा मला फोन आला. ज्या सात देणेकर्यांनी संदीप वर पोलीस केस केल्या होत्या, त्यातील शेवटच्या व्हेंडर चे पेमेंट संदीप ने केले. सर्वांनी पोलीस केस मागे घेतल्या. मी अवाक होत, संजयचं अभिनंदन केलं. तर तो म्हणाला "अजून काम संपलं नाही आहे. या वर्षी ज्यांनी केस नाही केल्या पण त्यांचे पैसे देणे आहे, त्यांचे पैसे देणार."

पूर्ण फिल्मी वाटणाऱ्या स्टोरीचा मी साक्षीदार आहे. संजयला मी त्याच्या धैर्याबद्दल, मित्राला मदत करण्याच्या त्याच्या पॅशन बद्दल मनोमन सॅल्युट केला. शेवटी अख्खं कुटुंब त्याने उध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. 

Saturday 25 November 2023

 डीएसके असं म्हंटलं की पुणेकरांना धसका बसतो. पण मी ज्या डीएसके यांची ओळख करून देणार आहे ते आहेत साताऱ्याचे दीपक सुधाकर कुलकर्णी. सॉफ्ट स्किल ट्रेनर ही पहिली ओळख आणि त्यातून झालेली मैत्री. मला आठवतं आहे, माझ्या कंपनीत ट्रेनिंग साठी आले आणि नंतर थोड्या वेळासाठी मला भेटायला आले आणि गप्पा दोन एक तास रंगल्या. नंतरच्या काळात मैत्री वृद्धिंगत होत गेली. त्यांनी शासकीय तंत्र विद्यालयात नोकरी पण केली. दोन एक वर्षांपूर्वी  निवृत्त झाले. आम्ही काही प्रोजेक्ट एकत्र करावा असाही प्लॅन झालेला. पण काही कारणामुळे तो नाही झाला. 

२०१९ च्या सुमारास सातारा आकाशवाणीवर सॉफ्ट स्किल या विषयाला धरून त्यांनी लिहिलेले काही भाग प्रसारित झाले. डीएसके ते मला  भाग नियमित पाठवत आणि घरून कंपनीत जाताना मी ही ते ऐकत असे. ते ऐकताना कधी हलके हसू यायचं तर कधी अंतर्मुख व्हायचो. त्याच प्रसारित झालेल्या भागांचं डीएसके यांनी नुकतेच पुस्तक प्रकाशित केलं "हटके सोचो". 

जी भाषा आकाशवाणीवर प्रसारणसाठी वापरली त्याच भाषेत पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्यामुळे ते फार शब्दजंजाळ न होता सोप्या भाषेत उतरलं आहे. पुस्तकाचा खरा वाचकवर्ग हा मराठी तरुण आहे. शेतीचा कौटुंबिक व्यवसाय सोडून मुलं शहरात नोकरीची कास धरायला येतात आणि इथल्या वातावरणाने बुजून जातात. या नवीन वातावरणात जुळवून घेण्यासाठी काय करायला हवं हे डीएसके यांनी सहजपणे सांगितलं आहे. एक गाव...एक गणपती सारखी स्फोटक वाक्य आहेत पण त्याचा फार वाद होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पुस्तकात पेरली आहेत. सॉफ्ट स्किल्स हा पुस्तकाचा गाभा असला तरी ते नागरिकशास्त्राचं पुस्तक झालं आहे आणि त्याची एकुणात आपल्या सगळ्यांना किती गरज आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. 

"हटके सोचो" या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच श्री अच्युत गोडबोले आणि श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पार पडलं.

पुस्तक सगळ्यांनी वाचावं असंच झालं आहे पण छोट्या गावातून शहरात येऊन करिअर चालू करणाऱ्या युवा वर्गाने आवर्जून वाचावं. ते वाचल्यावर ते लेखकाबद्दल "डीएसके, मनातलं दडपण नाहीसं करणारा माणूस" असं म्हणतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

काल उल्लेख केलेलं कांचन दीक्षित यांचं "टाईम अँड सेल्फ मॅनेजमेंट" आणि कुलकर्णी यांचं "हटके सोचो" या दोन्ही पुस्तकांचे विषय आवडते. त्या दोन्ही प्रकाशनवेळी लेखक द्वयींनी आणि प्रकाशकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आनंद वाटतो. 

Wednesday 25 October 2023

मध्ये माझ्या कंपनीत एक गेस्ट आले होते. कंपनीत राउंड घेताना मी त्यांना म्हणालो "माझ्या समोर आमच्या क्षेत्रातील कितीही लोक असू द्या, त्यांच्या प्रत्येक स्पिंडल रिपेयर या विषयातील प्रत्येक टेक्निकल क्वेरीचं माझ्याकडे उत्तर आहे." त्यांनी फार कौतुकाने माझ्यावर लिंक्ड इन वर पोस्ट लिहिली. ती वाचल्यावर माझा एक मित्र म्हणाला "तुझा हा तुला फाजील आत्मविश्वास वाटत नाही आहे का?". 

प्रथमदर्शी तसं वाटतं खरं, पण माझ्या त्या स्टेटमेंट मागे दोन दशकांची पार्श्वभूमी आहे. अन त्या वीस वर्षातील अनेक अपयशाच्या कहाण्या आहेत. झालं असं की ज्या व्यवसायात आम्ही आहोत त्याचं बाळकडू आम्हाला नोकरीच्या ठिकाणी मिळालं तरी ते नॉलेज वापरून मी आणि माझ्या पार्टनर ते बाकी स्पिंडल प्रकारात अप्लाय केलं. ते करताना आम्हाला कुणी गाईड नव्हता ना कुणी ट्रेनर. ज्या मध्ये आमची कंपनी सध्या लीडर म्हणून गणली जाते त्या स्पिंडल बद्दल आम्हाला काडीची माहिती नव्हती. (एसकेएफ मधील स्पिंडल अगदीच वेगळे होते). त्यातील प्रत्येक एलिमेंट आम्ही समजून घेतला. खूप जास्त तांत्रिक होईल म्हणून डिटेल मध्ये लिहीत नाही, पण स्पिंडल दुरुस्ती करताना मूलभूत दुरूस्तीशिवाय काही बाय डिफ़ॉल्ट पूरक गोष्टी कराव्याच लागतात हेच आमच्या गावी नव्हतं. कधी ते आम्ही स्वतः अभ्यास करून तर काही वेळा कस्टमरच्या स्पिंडल वर प्रयोग करत शिकलो. जेव्हा कस्टमरच्या स्पिंडल वर प्रयोग केले, तेव्हा चुका झाल्या आणि बेफाम झाल्या. त्याबद्दल कस्टमरच्या मजबूत शिव्या पण खाल्ल्या. काही चुकांमुळे रात्री जागवल्या. झोपच यायची नाही. 

एका कस्टमर ने मला स्पिंडल दुरुस्ती साठी बोलावलं. ज्या प्रकारचा स्पिंडल होता तो त्याआधी मी आयुष्यात बघितला नव्हता. मी हुशाऱ्या मारत कस्टमर ला म्हणालो "अहो, असं कधी होत नाही स्पिंडल मध्ये. काही तरी मोठी गडबड केली तुम्ही काम करताना." त्या मेन्टनन्स मॅनेजर ने मला सांगितलं "बाळा, घरी जा आणि थोडा अभ्यास कर. मग कॉल ला ये." मी परत आलो. त्या स्पिंडल चा प्रकार इंटरनेट वर अभ्यासला. तो रिपेअर कसा करायचा याची प्रोसेस तयार केली. आज त्या प्रकारचे स्पिंडल भारतात आम्ही सगळ्यात जास्त रिपेअर करतो. 

२०१७ साली आम्ही स्पिंडल उत्पादन क्षेत्रात शिरलो. उत्पादन आणि दुरुस्ती या प्रोसेस मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या विभागात सुद्धा कुणी आम्हाला गोष्टी रेडी प्लेट मध्ये दिल्या नाही. खूप प्रॉब्लेम्स आले, किंबहुना अजूनही येत आहेत. पण शिकत जातोय. दोन चार वर्षानंतर मला खात्री आहे, आता काही फसलेल्या प्रयोगातून आम्ही तावून सुलाखून बाहेर पडलो असेल आणि सिकंदर बनलो असू. 

आणि हे बिझिनेस प्रोसेस बद्दल सुद्धा तितकंच खरं आहे. गेले दोन दशकं टक्के टोणपे खात, कुणाकडून फसवले जात, कुणाकडून शिव्या खात इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. 

तेव्हा मित्रा, माझा शर्ट जरी बाहेरून परीटघडीचा दिसत असला तरी त्याच्या आतल्या बाजूला खूप काटे आहेत आणि माझं शरीर त्यामुळे रक्ताळलेलं आहे.  अनुभव असे आहेत की ते गोठलं आहे म्हणून ते रक्त तुला दिसत नाही आहे....इतकंच 

Monday 21 August 2023

 एकत्रितपणे ते देशाच्या सामाजिक-आर्थिक पायाभूत सुविधांना आधार देणारे मचाण आहेत. ही सहाय्यक, विकासात्मक परिसंस्था बिगर-नफा संस्था (एनपीओ) द्वारे तयार केली गेली आहे, (ज्याला भारतात स्वयंसेवी संस्था - स्वयंसेवी संस्था म्हणून देखील ओळखले जाते) ज्याचा प्राथमिक हेतू नफा कमावण्याऐवजी एखाद्या कारणासाठी काम करून समुदायांची सेवा करणे आहे.

एनपीओ हेतू-चालित, ध्येय-उन्मुख असतात आणि ते बदल घडवून आणतात, समुदायांचे उत्थान करतात, व्यक्ती आणि गटांना सक्षम करतात, धोरणांवर प्रभाव टाकतात आणि जीवनाची एकंदर गुणवत्ता वाढवतात. त्यांना 'तिसरे क्षेत्र' म्हटले जाते, कारण ते इतर दोन क्षेत्रांच्या धोरणांना आणि उपक्रमांना समर्थन देतात - सरकार आणि नफा, खाजगी क्षेत्र.

आज एनपीओ क्षेत्राला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे, दरवर्षी अब्जावधी डॉलर्स ची गुंतवणूक केली जाते, लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श होतो. इंडियाज मिलियन मिशन्स : नेशन बिल्डिंगच्या दिशेने 75 वर्षांची सेवा - जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या भारताच्या नॉन-प्रॉफिट सेक्टर रिपोर्टनुसार एनपीओ भारताच्या जीडीपीमध्ये 2% इतके योगदान देतात. अहवालात म्हटले आहे की, "विकासाचे हे इंजिन 2.7 दशलक्ष रोजगार आणि 3.4 दशलक्ष पूर्णवेळ स्वयंसेवकांना योगदान देते, ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा रोजगाराची आकडेवारी जास्त आहे". त्याची प्रचंड व्याप्ती आणि त्याचा परिणाम होणार् या जीवांची संख्या लक्षात घेता, एनपीओ क्षेत्र समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

ऐतिहासिकदृष्ट्या, समाजाने नेहमीच समाजातील दुर्बल सदस्यांप्रती सामूहिक जबाबदारी दर्शविली आहे, उपेक्षित व्यक्ती आणि गटांना विविध मार्गांनी पाठिंबा देऊन सामाजिक असमतोल सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी जर ग्रामीण समाजाने ही जबाबदारी उचलली तर जसजसे समाज वाढत गेले आणि विस्तारत गेले, तसतसे धर्मादाय ट्रस्ट आणि सोसायट्या, कॉर्पोरेट ट्रस्ट आणि स्वयंसेवी संस्था शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा, सांस्कृतिक संवर्धन आणि आर्थिक सक्षमीकरणाचे सूत्रधार बनल्या. श्रीमंत व्यक्तीही परोपकारी कार्यात गुंतल्या, कृतज्ञता म्हणून किंवा ज्यांना आधाराची गरज होती त्यांच्या उन्नतीच्या हेतूने समाजाला पुढे सरसावले.

त्यानंतर एप्रिल २०१४ मध्ये भारताने 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) कायदेशीररित्या बंधनकारक केली. (विशेष म्हणजे 'सीएसआर' हा शब्द अमेरिकन अर्थतज्ज्ञ हॉवर्ड बोवेन यांनी १९५३ मध्ये त्यांच्या 'सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द बिझनेसमन' या पुस्तकात वापरला होता). आता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३५(५) नुसार ठराविक उलाढाल आणि नफा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या मागील तीन वर्षांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या २ टक्के रक्कम सीएसआरवर खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इतके काही धोक्यात असताना, एनपीओसाठी उत्तरदायित्व आणि पारदर्शकता अत्यंत महत्वाची ठरली, ज्यामुळे संचालक मंडळाची भूमिका लक्षात आली, ज्याच्या मूलभूत जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:


प्रशासन: एनपीओ त्याच्या ध्येय आणि धोरणानुसार कार्य करीत आहे याची खात्री करण्यासाठी धोरणे आणि कार्यपद्धती स्थापित करणे.

स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग : एनपीओचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकंदर दिशा देणे आणि धोरणात्मक योजना विकसित करणे.

निधी गोळा करणे: संभाव्य देणगीदारओळखणे आणि एनपीओला त्याचे मिशन पार पाडण्यासाठी संसाधने गोळा करण्यासाठी देणग्या मागणे.

आर्थिक देखरेख: एनपीओच्या आर्थिक स्त्रोतांचे प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने व्यवस्थापन केले जाते याची खात्री करणे.

कायदेशीर आणि नैतिक अनुपालन: एनपीओ कायदेशीर आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कार्य करते याची खात्री करणे आणि ते सर्व लागू कायदे आणि नियमांचे पालन करते.

कालांतराने सार्वजनिक-खाजगी उपक्रमांचा समाजावर अधिक ाधिक प्रभाव पडू लागल्याने परोपकार अधिक संस्थात्मक झाला आहे. एकीकडे एनपीओची तळमळ आणि जीवन बदलण्याची त्यांची एकमेव इच्छा होती, तर दुसरीकडे कॉर्पोरेट संस्थांकडून निधी म्हणून मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागला.

गेल्या काही दशकांत एनपीओ क्षेत्र खूप वेगळे झाले आहे आणि एनपीओचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते, मुख्यतः अ) चॅरिटेबल ट्रस्ट ब) सोसायटी क) कलम 8 कंपनी (भारतीय कायदेशीर व्यवस्थेत अस्तित्वात आहे) ड) नॉन प्रॉफिट कॉर्पोरेशन ई) फाऊंडेशन एफ) धार्मिक संघटना.

सर्वसामान्यांच्या भल्यासाठी, आजच्या ईएसजीमध्ये पर्यावरणीय, सामाजिक आणि मानवी विकासाची उद्दिष्टे त्यांच्या नियोजन ात आणि कामकाजात समाविष्ट करण्याचा कंपन्यांसाठी हा एक उत्कृष्ट मार्ग होता! बेन अँड कंपनीच्या इंडिया परोपकार अहवाल 2023 नुसार, जीडीपीच्या टक्केवारीनुसार भारताचा सामाजिक क्षेत्रातील खर्च आर्थिक वर्ष 2021 मधील 8.6% वरून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9.6% पर्यंत वाढला आहे.

त्यांचे वेगवेगळे अवतार असूनही, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी त्यांचे समान ध्येय आहे - जीवनाची उन्नती करणे, समुदायांची उन्नती करणे आणि मोठ्या भल्यासाठी कार्य करणे.


Friday 28 July 2023

इव्हॉल्व्ह

 दोन एक महिन्यापूर्वी मी राजकोटला होतो. माझा फोन खराब झाला होता म्हणून आमचा सेल्स मॅनेजर प्रणव आणि गुजरात प्रतिनिधी आशिष मी आय फोन घ्यावा यासाठी एका दुकानात घेऊन गेले. आय फोन चा पाहिजे तो कलर तिथं नव्हता म्हणून आम्ही ठरवलं की पुण्यात जाऊन घेऊ. पुण्यात आल्यावर प्रणवने माझ्या मागे आय फोन घ्या भुंगा लावायच्या आत मी माझ्या बजेट मध्ये बसणारा सॅमसंग फोन ऑर्डर करून टाकला. प्रणव मला म्हणाला सुद्धा "तुम्हाला जमत असूनसुद्धा तुम्ही का घेत नाही आय फोन?" मी उत्तरादाखल काही बोललो नाही. 

१९९५-९६ ची गोष्ट असावी. बाबांना निवृत्त होण्यास तीन चार वर्षे उरली होती. निवृत्त झाल्यावर राहण्यास घर असावे म्हणून औंध मध्ये एका सोसायटीत आम्ही घर बघितलं. आजूबाजूचे १ बीएचके दोन फ्लॅट घ्यावे असा प्लॅन होता. किंमत निगोशिएट करण्यासाठी आम्ही, मी बाबा आणि उन्मेष, बिल्डरच्या ऑफिस मध्ये गेलो. पूर्ण सोसायटी तयार झाल्यावर फ्लॅट विकायचे असा त्या बिल्डर चा लौकिक. बाबा एमएसईबी मध्ये. बिल्डर ही मराठवाड्यातील. बाबांना वाटलं की या दोन क्वालिफिकेशन मुळे बिल्डर व्यवस्थित बोलेल आणि  सहज किंमत कमी करून देईल. पहिल्यांदा बाबांचा टोन मित्रत्वाचा होता. पण बिल्डर काही टस की मस हलायला तयार नव्हता. सुरुवातीला नीट बोलणारा बिल्डरचा टोन थोडा अरोगन्सी कडे झुकू लागला. फ्लॅट्स तर आम्हाला आवडले होते. त्यावेळेसची आमची आर्थिक परिस्थिती कशी होती हे मला माहिती नाही, पण किंमत कमी करून बजेट मध्ये बसावं म्हणून बाबांचा स्वर नंतर अगतिक होऊ लागला. बाबा जितके हतबल होत गेले तितका बिल्डर वरचढ होत गेला. आणि आमच्या शेवटच्या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून बिल्डर दरवाजाजवळ गेला आणि तो दरवाजा उघडून उभा राहिलं. थोडक्यात त्यांनी आम्हाला त्याच्या ऑफिसमधून निघून जायला सांगितलं. 

एखाद्याचा स्वभाव असा इव्हॉल्व्ह होत जातो. आजही मला ती घटना आठवली की बाबांची हतबलता जाणवते. त्यातून माझा स्वभाव असा घडला की मी अशाच गोष्टी विकत घेतल्या की ज्या घेताना मला १% सुद्धा पैशाबद्दल अगतिक वाटणार नाही. पुढं फ्लॅट घेतले, गाड्या घेतल्या, त्या चालवताना "टॅंक फुल कर" याशिवाय फ्युएल भरलं नाही, परदेशात खर्च करताना टेचात क्रेडिट कार्ड पुढं केले. पण ते सर्व अशाच पद्धतीने की माझ्या सेल्फ एस्टीम ला कुठेही धक्का पोहोचणार नाही. माझ्या अनेक मित्रांचे आलिशान मॅन्शन आहेत, त्यांच्याकडे लक्झरियस कार्स आहेत, भारी फोन्स आहेत. मला त्यांच्याबद्दल कायम आनंद वाटत आला पण त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत याबद्दल कधीही असूया वाटली नाही.  

बकेट लिस्ट मध्ये काही गोष्टी आहेत. त्या पूर्ण करणार ते स्वतःच्या औकातीत राहून. काही कारणाने त्या नाही घडल्या तर त्याचा गिला-शिकवा नसणार हे नक्की.  


Friday 14 July 2023

मानसिकतेवर

 Well, I have experienced this quite a few times and learnt it hard way. If for some reasons, you are not going well in relationships, just move on. It helps both the involved. And more importantly, positive way. I am talking this in relation with business relationship, friendly relationship and even family relationship.


I have seen many business partnership which broke on bitter terms but I think what was more important was breaking off. Once it was broken, both the partners have followed their own path and did well. Or even if any of them did not do well, it was because of their own actions.

In fact, the wonderful fact of such moving on is that mostly you cross path again in future on happy note. Time kills the bitterness.

Any relationship which is impeding your development, it is better to sacrifice that relationship, however valuable it is. In terms of business, this can be applicable to working partners, employer-employee, customer-supplier or otherwise. We usually try to pull on such strained relations only to land in unhealthy situation, more so for your personal well being.

Remember, no one is indispensable in this world.

काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मी चुकवली आहे. त्यातली एक गोष्ट आहे, ते म्हणजे काही नाती मला झेपत नसताना निभावण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षे गेली हे समजण्यासाठी की कुठलंही नातं हे स्ट्रेच करण्याची काहीच गरज नसते. तुटण्याआधी त्या नात्यातून बाहेर पडलं तर दोघांसाठी खरंतर तो फायद्याचा सौदा ठरतो. आणि हे कुठल्याही नात्यासाठी खरं आहे. मग ते व्यावसायिक संबंध असो, मैत्रीचं नातं असो किंवा अगदी कौटुंबिक नातं असो. थोडं वाचताना विचित्र किंवा अविश्वसनीय वाटेल पण हे माझं लर्निंग आहे. 

मी अनेक व्यावसायिक पार्टनरशिप या तुटताना बघितल्या आहेत. आणि अगदी वाईट पद्धतीने तुटताना पाहिल्या आहेत. पण आज मी ते आठवतो, तेव्हा हे जाणवतं की यातला सगळ्यात महत्वाचा आणि चांगला किंवा महत्वाचा भाग कुठला असेल तर ती पार्टनरशिप तुटणे. एकदा की हे नातं संपलं की बहुतेकदा दोन्ही पार्टनर्स ने आपले मार्ग वेगवगेळे केले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचं भलं झालं. आणि अगदीच कुणाचं भलं नाही झालं तर त्याचं उत्तरदायित्व हे दुसऱ्या कुणावर नसून स्वतःवर असतं, हा साक्षात्कार फार भारी असतो. 

गंमत म्हणजे, बऱ्याच केसेस मध्ये हे दोन पार्टनर्स नंतरच्या काळात एकमेकांच्या समोर आले आणि अगदी निवांतपणे एकमेकांना सामोरे गेले. दोघामधील कटुता ही काळ या औषधाने संपवली असते. 

जे नातं तुमच्या मानसिकतेवर आघात करतं, त्या नात्याचा त्याग करावा. तो लवकरात लवकर करावा या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. कौटुंबिक नात्याबाबतीत हे अवघड असेल कदाचित पण लोक व्यावसायिक नातं सुद्धा ताणून धरतात. खरंतर व्यवसायामध्ये वर्किंग पार्टनर्स, कंपनी आणि त्याचे कर्मचारी, ग्राहक आणि सप्लायर या कुठल्याही नात्यामध्ये कटुता येते आहे असं जाणवलं तर ते नातं विसर्जित करावं. ते केलं नाही आणि मनाच्या विरुद्ध त्या नात्याला निभावत राहिलात, तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो. 

कुठल्याही नात्याला पर्याय नसतो हा एक मोठा गैरसमज बाळगून असतो आणि त्याची मोठी किंमत चुकवतो. जितक्या लवकर हे कळेल तितकं तब्येतीला बरं. 

Thursday 6 July 2023

देशाप्रती प्रेम

बऱ्याचदा इथल्या प्रचलित ट्रेंड च्या विरुद्ध कुणी काही लिहिलं तर बऱ्याच कॉमेंट कर्त्यांचा आव असा असतो असे लिहिणारे कुणी विदेशी लोक आहेत. माझ्यावरती पण ही बला येते.  पण एखाद्या पक्षाच्या धोरणाबद्दल, अजेंडा बद्दल जरा काही विरोध दर्शवला की फार मोठी चूक विरोधकाने केली आहे असा जो आव आणला जातो तो हास्यास्पद ठरतो. इन फॅक्ट मला हे आवर्जून सांगावं वाटतं की कामानिमित्त मला आणि माझ्यासारख्या करोडो लोकांना अनेक परदेशी लोकांशी बोलावं लागतं, परदेशात दौरे करावे लागतात. तिथं हे सारे लोक देशाचे अघोषित ब्रँड अँबेसेडर म्हणून वावरत असतात. देशापायी प्रेम हे त्यांच्या वागण्यातून, कृतीतून झळकत राहतं. 

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी मिडल ईस्ट मध्ये एका कस्टमर कडे गेलो होतो. तिथला अधिकारी कुठला जॉर्डन किंवा सीरिया असल्या तत्सम देशातला होता. त्याने माझ्या कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे विचारलं. माझ्या कंपनीत त्यावेळी सर्व मशिन्स या भारतीय बनावटीच्या होत्या. ते सांगितल्यावर तो मला कुत्सितपणे म्हणाला "अच्छा, तुला असं सांगायचं आहे की भारतीय मशिन्स वापरून तू इंटरनॅशनल क्वालिटी आणतोस?". त्याला मी विचारलं की "तू कधी भारतात आला आहेस का? एकदा ये आणि भारतात आणि माझ्या कंपनीत काय चालू आहे ते डोळ्याने बघ. आणि नंतर स्वतःचं मत मांड. तुझ्या या देशात मी देतो ती सर्व्हिस देणारं कुणी नाही म्हणून तू मला इथं बोलावलं आहेस, मी बिझिनेस मागायला तुझ्याकडे आलो नाही आहे." हे बोलताना माझा आवाज पण चांगलाच धारदार झाला होता. त्याचे दोन असिस्टंट भारतीय होते. ते मला डोळ्याने इशारा करत होते की जरा सबुरीने घे म्हणून. मी काही बधलो नाही. 

जर्मनीतल्या एका कंपनीने आपल्या इथल्या चुकीच्या वर्क प्रॅक्टिसेस बद्दल बेकार तोंडसुख घेतलं होतं. त्याला टाटा, इन्फोसिस सारख्या आणि माझ्या माहितीतल्या अनेक बेस्ट ह्युमन ऍसेट मॅनेज करणाऱ्या कंपनीची माहिती दिली. त्याने मग आमची कंपनी पाहिली. त्याचं मत बदललं. बरोबर येऊन भारतात काम करू यात अशी त्याने आम्हाला गळ घातली. काही कारणाने शक्य झालं नाही, पण भारताबद्दलचं त्याचं मत बदललं हे नक्की. 

कुणी विदेशी पाहुणा इथं आला की गरिबीचे फोटो काढतो. मी त्याला ठणकावून सांगतो की हे फोटो काढू नको. काही ऐकतात, काही ऐकत नाहीत. पण हे  सांगताना कचरत नाही. 

अनेक उद्योजक असे आहेत की जे आपल्या कामाच्या स्वरूपातून सामाजिक बांधिलकी जपतात. माझा एक मित्र आहे. एक प्रॉडक्ट ट्रेंड करायचा जपान हुन. चार लोक होते, कमिशन मिळायचं त्याला, सुखात होता. त्याने ते प्रॉडक्ट भारतात बनवायचं ठरवलं. मशिनरी घेतली, सत्तर लोक घेतले, व्हेंडर डेव्हलप केले आणि प्रॉडक्ट डेव्हलप केलं. थोडा प्रॉब्लेम मध्ये असतो, तेव्हा मी विचारलं सुद्धा त्याला " कशाला ही प्रॉडक्शन ची झकमारी करतोस?" तर तो म्हणाला "अरे हे जर केलं नाही तर आपल्या अस्तित्वाचा काय उपयोग? इथं रोजगारनिर्मिती झाली, जागा लागली, कस्टमर ला फायदा झाला प्राईसचा. आपल्या लोकांना जर काही काम मिळत असेल तर थोडा त्रास सहन करायला काय प्रॉब्लेम आहे?". उद्योगाचा मूळ उद्देश हा पैशापलीकडे असला ते माझ्यालेखी वंदनीय आहे. 

तेव्हा मित्रानो, तुमच्या आवडत्या नेत्याच्या किंवा पक्षाच्या विरोधात कधी कुणी चार शब्द बोलत पण असतील तर याचा अर्थ असा नाही की त्याचं देशावर प्रेम नाही आहे. देशावर या भारत भूमीवर त्यांचं पण प्रेम असतंच,  फक्त ते उन्मादी किंवा आक्रस्ताळी पद्धतीने फेसबुकवर प्रतिक्रियांद्वारे किंवा पोस्टद्वारे व्यक्त करण्याची त्यांना गरज भासत नाही तर ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी वेगळं माध्यम वेगळं निवडलं आहे. 

तिरंगा फडकताना किंवा राष्ट्रगीत चालू झालं की अंगावर रोमांच उभे राहत डोळ्याच्या कडा ओल्या होणे हे भारतभूच्या प्रत्येक सजग नागरिकात होतं इतकं समजून घेतलं तरी पुरेसं आहे. 

तुम्हाला हेच म्हणायचं होतं  ना 

माझे व्हाट्सअप

व्हाट्स अप विद्यापीठाबद्दल सध्या बराच बोलबाला आहे. जाहीर आहे की त्याबद्दल चांगलं कुणी बोलत नाही. तरीही व्हाट्स अप ग्रुप मध्ये आलेले मेसेज आपण वाचतो, काही फॉरवर्ड करतो. काही दीड शहाणे लोक तिथं आलेली माहिती संदर्भ म्हणून वापरत, त्यात स्वतःचा मिर्च मसाला जोडत सुरस आणि चमत्कारिक कथा तयार करतात. प्रत्यक्षात वादविवाद घालतात. ते काही व्याख्याते जसं "भगतसिंगाला पकडल्यावर तो इंग्रज जेलर म्हणाला" एकदम आत्मविश्वासाने सांगतात तसं हे व्हाट्सअप युनिव्हर्सिटी चे "पादवी" धारक "बंद दारा आड झालेल्या मिटिंग मध्ये अजित डोवाल यांनी पुतीन ला सांगितलं की भाऊ युद्ध थांबव, नाहीतर महागात पडेल." जणू काही बंद दरवाज्याआड हा होताच तिथं. असो. 

मी सम हाऊ या व्हाट्सअप विद्यापीठापासून मुक्त आहे. आणि ही अवस्था प्रयत्नांती आली आहे. त्यासाठी थोडा वाईटपणा घेतला आहे. पण त्याचा परिणाम असा झाला आहे की, मला कुठल्याही प्रकारचे भंकस मेसेज येत नाही. सकाळी व्हाट्स अप बघितला कि त्यात जेमतेम चार किंवा पाच मेसेजेस येऊन पडलेले असतात. त्यातला एखाद दुसरा महत्वाचा असतो, ज्यावर मला प्रति उत्तर द्यायचं असतं किंवा फ़ॉलो अप करायचा असतो आणि बाकी व्यवसायाच्या माहितीपर असतात. हे कसं जमलं ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून पोस्टप्रपंच. 

पहिलेपासून मला व्हाट्सअप ग्रुप ची ऍलर्जी आहे. तरीही मित्राग्रहास्तव मी सुरुवातीला लिहिणाऱ्या लोकांच्या एक दोन ग्रुपचा मेंबर झालो होतो. पाच सहा महिन्यात पकलो आणि तिथून एक्झिट झालो. तेव्हापासून कानाला खडा लावला आणि आज मी कुठल्याही अवास्तव ग्रुपचा मेम्बर नाही आहे. लिहिणारे नाही, विज्ञान रिलेटेड नाही, मशिनिंग ग्रुप, सीईओ ग्रुप असा कुठलाच ग्रुप नाही. 

आमच्या क्रिसलीस चे तीन एक ग्रुप आणि कोबिझ नावाच्या इंडस्ट्री चे, तसेच आपलं घरचा ट्रस्टीचा क्लोज ग्रुप, आणि एक दोन इंडस्ट्रियल असोसिएशनचे  ग्रुप आहेत जिथे मी मेंबर आहे कारण आम्हाला महिन्या दोन महिन्यातून एकदा भेटायचं असतं आणि त्याचे अपडेट्स ग्रुपवर येत असतात. त्या ग्रुपवर आम्ही आमचे अचिव्हमेंट्स आणि मिटिंग तारखा आणि आमच्या रिक्वायरमेंटस याबद्दल लिहीत असतो. 

याशिवाय माझे शाळा, पॉलीटेक्नीक, इंजियरिंग आणि एक अवास्तव असे वेगवगेळे चार ग्रुप आहेत. आणि फॅमिली म्हणजे फक्त सख्खे भाऊ बहीण असे दोन तीन ग्रुप आहेत. याशिवाय अनेक नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मी नम्र पण ठामपणे नकार दिला आहे. 

माझे व्हाट्सअप चे दोन नंबर आहेत. एक फॉर बिझिनेस आणि एक जनरल. क्रिसलीस, कोबिझ हे जे कामाचे ग्रुप आहेत तिथं माझा बिझिनेस चा नंबर आहे. बाकी जे एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी जे ग्रुप आहेत तिथं पर्सनल नंबर आहे. पर्सनल फोन मी घरीच ठेवतो. जे काही मेसेज असतील ते कामावरून परत आल्यावर बघतो. बहुतांशी पर्सनल ग्रुप्स वर मी काही काम करावं असं नसतंच. 

याशिवाय काही स्वयंशिस्तीचे नियम बनवले आहेत. 

१. मी स्वतः कितीही भारी फॉरवर्ड असेल तरी कुणालाही पाठवत नाही. अपवादात्मक काही असतील पण बोटावर मोजण्याइतके. 

२. कुणाचीही जयंती किंवा श्रद्धांजली याचे मेसेजेस फॉरवर्ड नाही, बनवत नाही आणि कुणी पाठवले तर त्याला रीस्पॉन्ड पण करत नाही. अगदीच कुणी माझ्या माहितीतले असतील तर तिथे व्यक्त होतो. 

३. काही सणांना आणि महत्वाच्या दिवशी मेसेजेस आले तर त्याला उत्तर देतो पण स्वतःहून कुणालाही मेसेज पाठवत नाही. अगदीच वाटलं तर फोन करतो. 

४. कुणाचा वाढदिवस असेल तर व्हाट्स अप वर शुभेच्छा देण्याऐवजी फोन करून किंवा पर्सनल मेसेज करून भावना व्यक्त करतो.  

५. कुणी नातेवाईक मेसेजेस पाठवून खूप बोअर करत असेल तर मी त्यांना सरळ ब्लॉक करतो. 

Sunday 30 April 2023

दैनंदिन आयुष्यात अनेक गैरसमज घेऊन आपण वावरत असतो. 

- अपघात होऊन रस्त्यावर वाहनाच्या काचा पडल्या असतील आणि त्यावरून जर आपण आपली स्कुटर किंवा कार नेली तर आपल्या गाडीचे चाक पंक्चर होईल. 

किंवा 

- शॉवर ने अंघोळ करताना बादलीने जितकं लागेल त्यापेक्षा जास्त पाणी लागतं. 

किंवा 

- विमान थांबल्या थांबल्या आपण उभे राहिलो तर विमानतळाच्या बाहेर पहिल्यांदा बाहेर पडू. 

हे सगळं ठीक आहे. पण सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे 

- लिफ्ट कॉल  करण्याचं बटन दाबल्यावर ते अजून दोन चार वेळा प्रेस केलं तर लिफ्टचा स्पीड वाढून ती लवकर आपल्या मजल्यावर येईल. 


ना मी ग्लास टेक्नॉलॉजिस्ट आहे ना रबर किंवा टायर टेक्नॉलॉजिस्ट. तरी मी ही पोस्ट लिहिण्याचं डेअरिंग करतोय. 

आज सकाळी मी पोस्ट टाकली ज्यात एक मुद्दा असा होता की अपघातामुळे जर रस्त्यावर वाहनाच्या काचा पडल्या असतात त्यावरून आपलं वाहन गेलं तर आपल्या गाडीचं चाक पंक्चर होत नाही. यावर काही जणांनी शंका उपस्थित केली जी अतिशय रास्त आहे. त्याला उत्तर म्हणून ही पोस्ट जी अगदी सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट या न्यायाने नव्हे तर एक तंत्रज्ञ म्हणून लिहितो आहे. 

पूर्वी जेव्हा कार किंवा ट्रकच्या काचा ज्याला इंग्रजीत शक्यतो विंडशिल्ड म्हणतात त्या साध्य काचांपासून बनवलेल्या असत. त्यामुळे अपघात झाला की त्या काचेचे अणकुचीदार तुकडे होऊन शरीरात शिरून ड्रायव्हर आणि पॅसेंजरचा मृत्यू ओढवायचा. हे आपण अनेक जुन्या चित्रपटात पाहिलं आहे आणि माझ्या वयाच्या लोकांनी लहान असताना अपघाताच्या बातम्यामध्ये वाचलं आहे. 

या फॅक्टर वर रिसर्च होत गेला आणि विंडशिल्डची ग्लास यामध्ये कालानुरूप बदल होत गेला. ती ग्लास टफन्ड बनली म्हणजे त्याची ताकदपण वाढली. त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि त्यातील इन्ग्रेडीअन्त असे आले की अपघात झाल्यावर आता त्या काचेचे तुकडे बनून हवेत उडत नाहीत तर काच तिथे जागेवरच स्क्वीझ होते. हे तुम्ही आता रस्त्यावर अपघात झाला तर बघू शकता. अपघात फारच भयानक असेल तर आणि काचेचे तुकडे झालेच तर ते पेबल्स (म्हणजे खडे) प्रमाणे होतात. म्हणजे त्यात अणकुचीदार पणा येत नाही. आणि ते तुकडे जर रस्त्यावर पडलेच तर ते छोटे छोटे खड्याप्रमाणे होतात. 

ही झाली काचेची बाजू. 

याशिवाय टायर टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा बदल होत गेले. आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये रबर ट्रेडिंग च्या खाली स्टील वायर असतात. त्यामुळे एकुणात टायर पिअर्स होऊन ते पंक्चर होण्याची शक्यता आता रिलेटिव्हली फार काम झाली आहे. 

त्यामुळे रस्त्यात विंडशिल्ड चे म्हणजे वाहनाच्या काचेचे तुकडे रस्त्यावर पडले आहेत तर त्याला चुकवण्यासाठी रस्ता वाकडा करण्याची गरज नाही आहे. इन फॅक्ट तसं केलं तर मागून येणाऱ्या वाहनाची आपल्याला टक्कर देण्याची शक्यता जास्त असते. 

(अर्थात आपल्या नेहमीच्या काचेपासून बनलेल्या गोष्टी, जसं की बियर बॉटल, जर रस्त्यावर फुटून पडल्या असतील आणि त्याचे अणकुचीदार टोक अँगल मध्ये रस्त्यावर पडले असेल तर ते टायर साठी त्रासदायक ठरू शकतं)




Saturday 25 March 2023

शिक्षण

बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की कमी शिक्षण मिळाल्यामुळे न्यूनगंडत्व हा एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव बनवतं. आणि तो न्यूनगंड, त्यांना व्यावसायिक यश मिळाल्यावर कधी अहंकारात परावर्तित होतो हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. मग व्यवसायामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी आलाच तर त्याचा पाणउतारा करण्याची हे लोक एकही संधी सोडत नाहीत. एखादं भरीव काम लौकिकार्थाने कमी शिक्षित लोकांकडून झालंच तर "बघा,  जास्त शिक्षण न घेऊन सुद्धा मी हे काम केलं की नाही?" असा अहंभाव त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. 

याउलट कमी शिक्षणाचा न्यूनगंड न ठेवता, उच्चशिक्षित लोकांशी कुठलाही बाऊ किंवा आव ने ठेवता हे लोक जेव्हा व्यवहार करतात, तेव्हा कमालीचे प्रोजेक्ट साकार झालेले मी पाहिले आहेत. कोल्हापूर मध्ये सरोज कास्टिंग नावाची कंपनी आहे. त्याचे संस्थापक बापू जाधव हे खूप कमी शिकलेले. पण त्याचा न्यूनगंड ना बाळगता त्यांनी जो मर्सिडीझ आणि कमिन्स ला इंजिन कॉम्पोनंट सप्लाय करण्याचा व्यवसाय उभा केला हे उदाहरण अभ्यास करण्यासारखं. माझे  बिझिनेस मेंटर हे तसे फार शिकलेले नाही आहेत, पण त्यांनी आपल्या पॅशन च्या जोरावर वाचन केलं, स्वतःची थॉट प्रोसेस अप्लाय केली आणि एक स्वतःची स्ट्रॉंग थेअरी बनवली की जी आम्हाला बिझिनेस कसा करायचा ते शिकवते.

जास्त शिकलेल्या लोकांमध्ये जर विनयशीलता असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लागतात. मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे की उच्च शिक्षण हे त्या लोकांना लीन बनवते, त्यांच्या मनात दुसऱ्या बद्दल एम्पँथी तयार करते, ह्युमन इक्वालिटी हे जीवनाचं तत्व बनवतात.  ही लोक कमालीची यशस्वी होतात.

शिक्षण कमी असेल तर तुम्ही "नॉलेज सीकर" बनू शकता आणि भवतालात हे नॉलेज देणारे असंख्य लोक आहेत. त्यांची मदत घ्यायला लाज वाटायचं काही कारण नाही. उच्च शिक्षित असाल तर "नॉलेज गिव्हर" बना. तिथं माज असण्याचं काही कारण नाही.  नॉलेज सीकर आणि नॉलेज गिव्हर यांचं यथोचित कोलॅबोरेशन झालं तर एक अत्यंत सशक्त आस्थापना उभी राहू शकते.  

शिक्षणाबद्दल असा भाव हवा असं माझं मत आहे. त्याचं महत्व वादातीत आहे. पण ते जर नसलं तरी आयुष्य बनवता येतं याबद्दल मनात कुठलीही शंका ठेवू नये असं माझं मत आहे. 

Saturday 18 February 2023

सनराईज उद्योग

२०१७ ची गोष्ट आहे. ब्रिटन गॉट टॅलेंट मध्ये एक विनोदवीर आला होता. डॅलिसो चोपंडा नावाचा. भारी कॉमेडियन आहे. तिथे ४-५ मिनिटाच्या स्किटमध्ये त्याने धमाल उडवून दिली होती. त्या स्किट मध्ये ब्रिटन मधील मंदी बद्दल तो विनोदाने म्हणाला होता "इंग्लंड मध्ये रेसेशन आलं आहे असं मी तेव्हा मानेल जेव्हा एखादी भारतीय कंपनी इंग्लंड मध्ये कॉल सेंटर उघडेल." खोटं कशाला सांगू, पण मी सुद्धा त्या विनोदावर हसलो होतो. त्याला कारण होतं. त्याची विनोदाची जातकुळी भन्नाट आहे. डिलिव्हरी क्लास आहे. पण थोडं वाईट वाटलं होतं. ते टाटांनी जे एल आर, टेटली, कोरस स्टील  घेऊन सुद्धा, भारतीय असलेल्या पण इंग्लंडस्थित राहून भारतात पोलाद साम्राज्य उभे करणाऱ्या मित्तलांनी यूरोपातील अर्सेलर घेऊनही असे जोक केले जातात, यासाठी. 

तीन चार दिवसांखाली एअर इंडिया ने बोईंग आणि एअरबस वर ला  ४७० विमानांची ऑर्डर दिली त्याने कदाचित असे जोक करताना कॉमेडियन चार वेळा विचार करतील असं मनाला चाटून गेलं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रांस चे अध्यक्ष मॅक्रो आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्या ऑर्डर बद्दल काय स्टेटमेंट दिलं आहे हे आपण पेपर मध्ये वाचलंच आहे. पण भारताला सुद्धा या ऑर्डरमुळे दूरगामी फायदा होणार आहे असं दिसतं, ज्याबद्दल रिलेटिव्हली कमी बोललं गेलं असं वाटतं. (याआधी अशी मोठी ऑर्डर अमेरिकन एअरलाईन्स ने २०११ साली दिली होती)

भारतात काही सनराईज उद्योग उदयाला येत आहेत आणि एव्हिएशन त्यापैकी एक आहे हे एव्हाना अनेकांना माहिती झालं आहे. असं म्हंटलं जातं की या ऑर्डरपासून प्रेरित होऊन इंडिगो जी, कोविड आधी ३०० विमानांची ऑर्डर देणार होती, ती रिलीज करण्याच्या निर्णयाप्रत आली आहे. आणि कुणास ठाऊक ती कदाचित ५०० ची असेल अशी वदंता आहे. स्वतः टाटांनी आताच्या ऑर्डरची प्राईस हेज करण्यासाठी अजून ३४० विमानांची ऑर्डर देऊन ठेवली आहे असं बोललं जातं. टाटा ग्रुप मधल्या उच्चपदस्थाने ही माहिती शेअर केली होती, जी बहुतेक गोपनीयतेचा भंग झाला म्हणून मागे घेण्यात आली. नुकत्याच चालू झालेल्या अकासा ची सुद्धा ७२ विमानाची डिलिव्हरी पुढील दोन वर्षात अपेक्षित आहे. येणाऱ्या काही वर्षात सगळे मिळून २००० नवीन विमाने भारतात येण्याची शक्यता आहे. 

या उद्योगाला येणाऱ्या काही वर्षात पायलट्स, केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ, मेंटेनन्स क्रू या क्षेत्रात रोजगार तयार होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर विमानातील वेगवेगळ्या सब असेम्ब्ली चा मेंटेनन्स करणाऱ्या व्यावसायिकांना चांगले दिवस यावेत. गेल्या अनेक वर्षात टाटा, महिंद्रा, क्वेस्ट यांनी उद्योगांनी बंगलोर, हैद्राबाद, नागपूर, वडोदरा इथे एव्हिएशन इंडस्ट्रीच्या निगडित उद्योग थाटले आहेत, जे बोईंग, एअरबस, लॉकहीड मार्टिन सारख्या कंपन्यांना विमानांचे स्पेअर पार्टस पुरवतात. त्या उद्योगांना आणि तसेच त्यांच्या व्हेंडर्स ला व्यवसायपूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. एव्हिएशन इंडस्ट्री मध्ये व्हेंडर म्हणून पात्र होण्यासाठी क्वालिटी चे एंट्री बॅरिअर खूप कडक आहेत. पण त्यांची जर यशस्वीरीत्या पूर्तता केली तर खूप प्रॉस्पेक्ट्स आहेत इतकं नक्की. येणाऱ्या काही वर्षात या सगळ्या व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत हे नक्की. 

बाय द वे, या डीलची घोषणा करताना टाटा ग्रुप चे एन चंद्रा, बोईंग चे डेव्हिड कॅलहून, एअरबस चे जेफ निटेल यांना वर्ल्ड मीडिया ने जास्त कव्हर केलं नाही हे आजच्या प्रथेला धरूनच आहे. 

व्यंकटेश

 काल व्यंकटेशला भेटलो. वेंकी म्हणतात त्याला. वय साधारण पस्तीस चाळीसच्या मध्ये. कंपनी पण तशी लहानच, पिनिया बंगलोर मध्ये. सहा सात हजार स्क्वे फूट मध्ये. वयोपरत्वे आणि व्यवसायाच्या साईझच्या दृष्टीने मी मोठा. म्हणून थोडा ताठ्यात गेलो होतो शॉप मध्ये.

वेंकीची स्टोरी अजब, ते मला तिथं दोन एक तास थांबल्यावर कळलं.
२००१-२ च्या सुमारास वेंकी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. एम एस झालं, वेंकी ला जॉब लागला. जनरल मोटर्स ची एन व्ही एच मध्ये काम करणारी छोटी, पण हाय टेक कंपनीत. त्या कंपनीत वेंकी चमकला. कंपनीने त्याची ग्रीन कार्ड ची प्रोसेस चालू केली. आणि वेंकी ने तिथं जाहीर केलं की ग्रीन कार्ड बनवू नका कारण सहा महिन्यात मी भारतात जाऊन वडिलांच्या व्यवसायात जॉईन होणार आहे. त्याच्या भारतीय आणि अमेरिकन कलीग्ज ने "द ग्रेट अमेरिकन लाईफ स्टाईल" न सोडण्याचा आग्रह केला. पण वेंकीचा निर्णय फायनल होता.
२००५ ला वेंकी भारतात परतला, आणि जॉईन झाला वडिलांच्या प्रस्थापित इंजियरिंग व्यवसायात. पंचवीस वर्षे जुना व्यवसाय, मार्केट लिडर, कंपनीत शंभर पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. वेंकीला सेकंड जनरेशन व्यावसायिक म्हणून यापेक्षा चांगलं पिच काय असणार? त्याने धडाक्यात काम चालू केलं.
कंपनीत काही सिनियर पार्टनर्स होते. त्यांना वेंकीची नवीन मॅनेजमेंट स्टाईल झेपत नव्हती. त्याच्यावर बंधनं यायला लागली. बदलत्या काळानुसार लागणारे निर्णय वेंकी घ्यायचा पण सिनियर पार्टनर्सचं त्याला अनुमोदन नसायचं.
शेवटी वेंकीने निर्णय घेतला. वडील आणि त्यांच्या पार्टनर्स पासून वेगळं होण्याचा. त्याने स्वतःचा व्यवसाय थाटला, जिथं मी उभा होतो. व्यंकटेश ने हाय एन्ड रोबोटिक्स मध्ये बिझिनेस चालू केला. मी पोहोचलो तेव्हा तिथे २० लोक काम करत होते. अल्युमिनियम प्रोफाइल मध्ये छोटं ऑफिस थाटलं होतं. डिझाईनचे दोन वर्क स्टेशन. वडिलांच्या प्रस्थापित बिझिनेस मध्ये राहिला असता तर राजा असला असता, पण प्रोग्रेसिव्ह मानसिकतेला खतपाणी जिथं मिळत नव्हतं त्या इझी लाइफस्टाइल ला वेंकी ने तिलांजली द्यायचं ठरवलं आणि स्वतःचा छोटा का होईना पण बिझिनेस चालू केला. प्रतिकुलता येतेच, पण अनुकूलतेतून अशी प्रतिकुलता येण्याचं उदाहरण मी पहिल्यांदा पाहत होतो. पण वेंकीची क्लिअर थॉट प्रोसेस पाहता तो त्यावर मात करेल यात शंका नाही.

तसं बघायला गेलं तर वेंकी दुसऱ्या पिढीचा व्यावसायिक. पण ज्या पद्धतीने त्याने व्यवसाय थाटला, त्याची तुलना फर्स्ट जनरेशन उद्योजकाशी केली तर वावगं ठरणार नाही.
वेंकीच्या युनिट मध्ये जाताना थोडा अहंकार होता माझ्या मनात. तिथून बाहेर पडताना स्वतःलाच वेंकीपेक्षा मी छोटा वाटू लागलो....... सर्वार्थाने.

Tuesday 14 February 2023

दोन प्रकारचे लीडर्स

मी दोन प्रकारचे व्यावसायिक लीडर्स बघितले आहेत. 

पहिला प्रकार म्हणजे जे लोकांसाठी काम करतात. म्हणजे लोकांची ग्रोथ ही त्यांच्या केंद्रस्थानी असते. ग्रोथ म्हणजे फक्त आर्थिक ग्रोथ नव्हे, तर सर्वांगीण विकास. त्यासाठी हे लीडर्स आपल्या लोकांना एम्पॉवर करण्यात विश्वास ठेवतात. त्यासाठी ते त्यांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करतात.  ते स्वतःची पोझिशन बाजूला ठेवतात आणि फक्त कंपनीचं हित डोळ्यसमोर ठेवतात. 

आमचा रिटायर झालेला प्रेसिडेंट जेफ क्लार्क याबाबत माहीर होता. तो कधीही आपले निर्णय कंपनीवर लादायचा नाही. खरंतर "हे असं करा/करू नका" हे म्हणायची त्याच्याकडे पॉवर होती. पण असे अनेक निर्णय, भले त्याच्या मनाविरुद्ध असतील पण कंपनीच्या हिताचे असतील तर त्याने खुल्या मनाने स्वीकारले. आणि हो, हे करताना अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा केली, समोरच्याला बोलू दिलं, त्याच्या मताचा आदर केला, काउंटर अर्ग्युमेंट करताना व्हेटो कधी वापरला नाही. काही वेळा त्याने त्याच्या निर्णया बद्दल कन्व्हिन्स केलं आम्हाला पण तो लादला नाही. याचा फायदा असा झाला कि प्रत्येकाचा सेल्फ एस्टीम हा जोपासला गेला. शेवटी एकमेकांना आदर देणं म्हणजे हेच नाही का?

जेफ सारखे लोक ही पहिली कॅटेगरी. 

याउलट मी असे काही लोक बघितले आहेत की त्यांचा आपल्या टीमवर अजिबात विश्वास नसतो. (तो जर नसेल तर ही लोक टीम वाढवतात कशाला हा मला नेहमी पडणारा प्रश्न). सतत त्यांना आरोपीच्या कटघर्यात. निर्णय त्यांच्यावर लादायचे आणि ते वर्क आउट नाही झाले तर त्यासाठी टीमला जबाबदार धरायचं. व्यवसायात स्वतः निर्णय घेऊन टाकायचा टीमला विचारायचं नाटक करायचं. म्हणजे सहसा त्यांचा डायलॉग असा असतो "मी अमुक तमुक करायचं ठरवलं आहे. तुम्हाला काय वाटतं?" आता तुम्ही व्यवसायाचे प्रीमियर. तुम्ही ठरवलंच आहे तर आम्ही कशाला विरोध करू? असा लोक विचार करतात. आणि यापुढे जाऊन कुणी काही सुचवलं तर आपल्या पोझिशनचा वापर करून ते म्हणणं हाणून पडायचं. लोक सुद्धा आपल्या कोशात जातात. ते निर्णय घेत नाहीत आणि मग होयबा, किंवा प्राकृत भाषेतील चमचा लोकांची गॅंग आपल्या भोवताली जमा करण्यात तो लीडर धन्यता मानतो. या प्रकारच्या लीडर बरोबर काम करणाऱ्या लोकांची वाढ खुरटते, पर्यायाने व्यवसायाची. 

काळाच्या कसोटीवर सिद्ध होणारं एंटरप्राइज, मग ते कुठल्याही साईझ चं असो, बनवायचं असेल तर पहिल्या प्रकारचे नेतृत्वगुण अंगात बाणवायला हवेत असं माझ्या लक्षात आलं. 

लोकांना भेटलं की हे असं नव्याने काही तरी शिकायला मिळतं. 


व्यवसायाने बाळसं धरल्यावर एका प्रक्रियेत मोठा फरक होतो. फरक बऱ्याच गोष्टीत होतो. पण सगळ्यात मोठा फरक होतो तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत. 

व्यवसाय लहान असताना सर्व निर्णय तुम्हाला एकट्याने घ्यायचे असतात. त्यातून परिस्थितीला अनुसरून निर्णय घ्यायची सवय लागते खरी, पण त्या प्रोसेस मध्ये अजून एक घडतं. एकधिकारशाहीचा जन्म होतो. एखाद्या सिच्युएशन कडे आपण जसं बघतो तीच पद्धत बरोबर असा एक फाजील आत्मविश्वास अंगात भिनतो. 

कालानुरूप व्यवसाय वाढतो. त्याला संयुक्तिक असं एक बोर्ड कंपनीत तयार होतं, डायरेक्टर बोर्ड. अगदीच फॉर्मल बोर्ड तयार नाही झालं तरी मग सिनियर लोकांची टीम तयार होते. असं अपेक्षित असतं की आता यापुढे घेतले जाणारे निर्णय हे त्या बोर्ड च्या किंवा कोअर टीमच्या संमतीने घेतले जावेत. मग ते कुठलेही असोत.

इथं खरी गंमत चालू होते. इतके दिवस एकट्याने निर्णय घेण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सवय लागलेल्या प्रमुखाला अपल्यावरती आता बोर्ड आहे आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त पॉवर आहे हेच मान्य होत नाही. 

तीच गोष्ट सिनियर लोकांच्या टीमची. या टीमला जर निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही तर कुठलाही निर्णय घेताना एकांगी विचार केला जातो, फक्त प्रमुखाच्या मेंदूने, जो व्यवसायाच्या दृष्टीने हितकारक असेलच असे नाही. रादर दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टीने तो चुकीचा पण असू शकतो.

Saturday 21 January 2023

सोशल मीडिया

 सोशल मीडिया म्हणजे माझ्यापुरतं फेसबुक, लिंक्ड इन, व्हाट्स अप इतक्या पुरतं मर्यादित आहे. या संदर्भांत

मला साधारण तीन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. 

"राजेश काय चोवीस तास फेसबुकवर पडीक असतो" ही बहुतेकदा माझे नातेवाईक आणि काही प्रत्यक्षातल्या मित्रांची प्रतिक्रिया असते. यात वास्तविकतेपेक्षा हेटाई जास्त असते.

"तुम्ही जे काही लिहिता ते आम्हाला आवडतं." हे फेसबुकवरील मित्र मैत्रिणी आणि लिंक्ड इन चे कनेक्शन व्यक्त होतात. यातही काही जेन्यूईन असतात तर काहींना नाईलाज असतो. 

"इतका वेळ कसा काय मिळतो तुला/तुम्हाला?" ही एक बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न. यातही काहींना कुतूहल असतं, काहींना अविश्वास असतो. परवा श्रीपाद घोडके कडे मला तरुणांनी मला हा प्रश्न विचारला. 

सोशल मीडिया मॅनेज कसा करतो, यावर लिहा असं काही जणांनी सांगितलं, त्यावर लिहितो. व्हाट्स अप आणि लिंक्ड इन मॅनेज करायला फार अवघड नाही. 

व्हाट्स अप वर सहसा चॅटिंग करत नाही. बोलायला अगदीच जमत नसेल तर करतो, ते ही अगदी मोजकं. चॅटिंगचा थ्रेड लांबू लागला की फोन करतो. 

वाढदिवस, श्रद्धांजली, सणावाराच्या शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी यावर स्वतःहून कुठल्याही ग्रुप वर कधीही लिहीत नाही. पर्सनल मेसेजद्वारे भावना पोहचवतो. 

कितीही भारी मेसेज असेल तरीही फॉरवर्ड करत नाही. अगदीच वाटलं तर ओरिजिनल सोर्स वर जातो आणि तिथली लिंक शेअर करतो. 

व्यावसायिक असे नऊ ग्रुप आहेत (३ क्रिसलीस, ३ आय एम टी एम ए, १ असोसिएशन, १ ट्रस्टी, १ कंपनी), पर्सनल ६ ग्रुप आहेत. त्यातले तीन फॅमिली चे आहेत ज्याची जास्तीत जास्त मेम्बर संख्या ८ आहे. दोघांचे नंबर वेगळे आहेत. सर्व ग्रुप वर राजकीय, धार्मिक, जातीय धुळवड खेळायला सक्त मनाई आहे. कुठं झालीच तर माझ्या शब्दात सुनावतो आणि ते जर बंद झालं तरच ग्रुपवर थांबतो. नाहीतर ग्रुप सोडतो. 

रिझल्ट: सकाळी मोबाईलवर दोन्ही नंबर मिळून साधारणपणे फक्त दहा ते बारा मेसेज असतात. 

लिंक्ड इन: 

लिंक्ड इन चा वापर फेसबुकपेक्षा रिलेटिव्हली कमी. ते ऑफिसमध्ये बघायची लिबर्टी घेतो. कारण ते बहुधा व्यावसायिक कारणासाठी निगडित असतं. तिथे तसाही फारसा टाईमपास होत नाही. 

आता राहता राहिलं फेसबुक: 

फेसबुकवर फक्त दोनच ऍक्टिव्हिटी इमानेइतबारे करतो. एक वॉल वर लिहिणे. अगदीच संयुक्तिक कॉमेंट असतील तर त्यांना उत्तर देणे. 

फेसबुकच्या दिवसभरातील माझ्या दोन वेळा फिक्स आहेत. एक घरून कंपनीत येईपर्यंत आणि दुसरी कंपनीतून निघाल्यावर घर येईपर्यंत.  साधारण दीड पावणेदोन तास. याशिवाय घरातील ऍडिशनल अर्धा ते पाऊण तास. कंपनीतील सव्वानऊ ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत फेसबुक वापरत नाही. सुट्टीच्या दिवशी घरी फेसबुक जास्त वापरलं जातं. बाकी प्रवासात असेल तर बेधुंद फेसबुक वापरतो. एअरपोर्ट, कार किंवा ट्रेन मध्ये असेल तर कधी पुस्तक तर कधी फेसबुक.  

फेसबुकवर सुद्धा कुठल्याही राजकीय, धार्मिक आणि जातीय धुळवडीत सहभाग नसतो. कुठल्याही ट्रेंड मध्ये सहसा सहभागी नसतो. फेसबुकवर कुणी काय लिहावं, कुठले फोटो लावावे, कोण शहाणपणा करतो, मूर्खपणें वागतं याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. (दोन-तीन पोस्ट पूर्वी लिहिल्या होत्या, त्यानंतर कानाला खडा). 

माझा सोशल मीडिया वापरायचा अजेंडा फिक्स आहे. मी टाईमपास साठी येत नाही. समाज प्रबोधन, दुसर्यांना इन्स्पिरेशन वगैरे तर फार लांबच्या गोष्टी आहेत. तो अजेंडा काय आहे, त्याचा वापर काय आणि कसा करायचा याबाबत माझे आराखडे फिक्स आहेत. माझ्या वेळेची किंमत काय आहे मला चांगलं माहित आहे. त्यामुळे इथं जो वेळ व्यतीत करतो, तो फुकट नाही आहे. सध्या इतकंच सांगतो. 





Wednesday 4 January 2023

माझं मन.

आता तसाही शेवट जवळ आलाच आहे. सगळ्या प्रकरणावर एकदाचा पडदा पडणार असं दिसतं आहे. तेव्हा मित्रा, मला जे सांगायचं आहे ते मी स्पष्टपणे सांगून टाकतोच. आणि हे जे मी सांगणार आहे ते पूर्णपणे सजगतेने सांगणार आहे, ज्याबद्दल माझ्या मनात किंचितही संदेह नाही. 

मी सर्वार्थाने परिपूर्ण असं आयुष्य जगलो आहे. इथवर पोहोचण्यासाठी प्रसंगानुरूप अनेक काटेरी मार्गांचा उपयोग केला. आणि त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा सांगतो, तो म्हणजे जे मी वागलो ते माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून, जे मला पटतं, तसाच वागलो.

पश्चातापाचे क्षण मी पण भोगले. फारसे नाही आणि ज्याचा आवर्जून उल्लेख करावा असे तर फारच  कमी.  त्या प्रसंगी मला कृतिशील राहणं हे अतीव गरजेचं होतं. सुटका नव्हतीच. मी त्यावर विचारपूर्वक निर्णय घेतले. काळजीपूर्वक एकेक गुंता सोडवत गेलो. त्या उपरही सांगतो, हे सगळं करताना मी फक्त माझ्या मनाचं ऐकलं. 

हो, काही प्रसंग आलेही आयुष्यात, आणि मला माहिती आहे की ते तुझ्याही लक्षात असतील. माझ्या क्षमतेपेक्षा मी मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे फटके ही बसले. पण त्याच्या परिणामांना मी सामोरे गेलो आणि काहींना काळाच्या ओघात मी विस्मृतीत ढकललं. पडलो, धडलो पण पुन्हा उभा राहिलो अन नव्याने घडलो. हे सगळं करताना कौल घेतला तो माझ्याच मनाचा. 

मी जगण्यावर असोशीने प्रेम केलं. कधी हसलो तर कधी रडलो. कधी पराभूताची मानसिकता अनुभवली. कोषात गेलो. पण आता जेव्हा अश्रूच गोठले आहेत तेव्हा तो भूतकाळ मला मोठा विस्मयकारी वाटतो आहे. मला त्यावेळेस घेतलेल्या निर्णयाचा गम अजिबात वाटत नाही आहे. कारण मी केलेल्या कृतीची दिशा माझ्याच मनाने तर दाखवली होती. 

शेवटी मनुष्ययोनीत जन्माला आलोच आहे तर त्यातून काहीतरी भरीव निष्पन्न घडायला नको का? जर भरभरून जगलोच नाही तर अस्तित्वहीन असण्याचा काय उपयोग? लाचारीतून जन्माला आलेल्या शब्दांचा मला सहारा नकोच आहे. सत्य आणि सत्यच बोलण्याचं धैर्य माझ्यात हवं. आणि मला माहिती आहे, याचा मला प्रचंड त्रास झाला आहे, होणार आहे. पण शेवटी माझं मन मला जे सांगतं आहे तेच ऐकायला हवं.  

माझं मन.....त्याचंच बोट धरून तर मी अनेक आव्हानांना सामोरे गेलो आहे. 

फ्रॅंक सिनात्रा च्या माय वे या गाण्याचा गद्य भावानुवाद