Thursday 17 June 2021

तिसरा लेख

 "मूल जन्मल्यावर ते सात वर्षे माझ्या हवाली करा. आणि मी तुम्हाला ते काय म्हणून घडवायचं ते घडवू शकतो" असं कुणीतरी फेमस शास्त्रज्ञ म्हणून गेलाय. थोडक्यात काय तर वयाच्या सात वर्षापर्यंत माणसाच्या पुढील आयुष्याचा प्रोग्रॅम लिहून पूर्ण होतो. तो बदलायचा असेल तर मग प्रचंड कष्ट आहेत. याचा संदर्भ पुढच्या पॅरा मध्ये आला आहे.

सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे त्यांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. 

नोकरी सोडून व्यवसायात जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी, मूळ सिद्धांत काय हवेत हे थोडं स्वानुभवावरून सांगतो. माझीच केस स्टडी यासाठी घेतो की मी सुद्धा मूळचा पक्का नोकरदार माणूस. फासे पडत गेले आणि आज लघुउद्योजक म्हणून का होईना पण ओळखला जातो आहे. काही मुद्दे मांडतो, बघा तुम्हाला पटतं का ते!. आणि तुम्हाला काही सांगण्याचा अविर्भाव न ठेवता एक स्वगत म्हणून माझे विचार फक्त मांडतो. 

१. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी फॅन्सी प्रकार आहे असं कधीही ठेवलं नाही. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" किंवा "दुसऱ्यांची ऑर्डर घ्यायची आपल्याला नाही आवडत"  असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू केला नाही. बहुतेक  व्यवसाय हे अक्षरश: नशिबाने चालू झाले आहेत. माझ्याही ध्यानी मनी नसताना व्यवसाय चालू झाला, तो रुजला आणि फुलला. व्यवसाय उभे राहतात ते नाविन्यपूर्ण कल्पनेवर किंवा नावीन्यपूर्ण पद्धतीवर. 

२. व्यवसायात यशस्वी कुठलाही प्रस्थापित फॉर्म्युला नाही आहे. बरं एका यशस्वी बिझिनेसचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची गॅरंटी नाही. पण गाईडलाईन्स नक्की आहेत. त्या जर फॉलो केल्या तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच. The best university to learn business is to do business. 

३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा सुविचार शाळेत वाचल्यावर आपण विसरतो. व्यवसायात आलो आणि हा सुविचार ठळक अक्षरात, दररोज दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवला. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे. "मला सगळं कळतं" किंवा "मी जे करतो तेच बरोबर" या करोनाला ६ फूट दूर ठेवलं. या डोक्यावर कुठलीही हॅट नाही आहे. कुठलीही कल्पना ऐकण्यासाठी, स्वीकारू की नाही हा पुढचा प्रश्न, हा मेंदू रिकामा आहे.

४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं. ते बरोबर की चूक यावर विचार नाही केला. विश्वास ठेवा, बऱ्याचदा चूक निर्णय हे निर्णय न घेण्यापेक्षा फायदेशीर असतात. निर्णय घेणं उद्यावर ढकलले नाही. एकदा तुम्ही वेळेत निर्णय घ्यायला शिकला की मग क्रिझवर मांड ठोकल्यावर प्रत्येक बॉल जसा बॅटच्या मधोमध बसतो तसा दरवेळी निर्णय योग्य घेतला जातो असा माझा अनुभव आहे. 

५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही. "Planning without action is just hallucination." हे कुणीतरी म्हणून गेलं आहे.

६. Perseverance beats genius. एखादं काम हातात घेतलं की त्याचा पूर्ण कार्यक्रम करून टाकायचा. आर या पार. 

७. दिवसा स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवला. आज १९ वर्षे झालीत. आजही स्वप्नं बघणे चालूच आहे. आणि अजून एक जाणवलं इतक्या वर्षात. एक स्वप्न जगात एकाच वेळी दोन माणसं बघत नाहीत. 😊 

वरील सात मुद्द्यात पहिले दोन हे वास्तव आहे आणि नंतर आलेले पाच सूत्र आहेत, व्यवसायात येण्याचे. हे मला जाणवलेले. दुसर्यांचे वेगळे असतील. रिकॅप म्हणून खाली लिहितो

1. Unlearning
2. Decisiveness and no procrastination 
3. Action
4. Perseverance
5. Dream. 

वि स खांडेकरांच्या अमृतवेल मधील भारी वाक्य उद्धृत करतो आणि आवरतो. 

भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही आहे. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं  वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत यावं म्हणून धडपडणं, या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलानं दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या आयुष्याला अर्थ येतो तो यामुळेच.

तिसरा लेख