Monday 30 November 2020

शुभंकर क्षण

दिवस १: 

सुरेखा नर्सच्या इंटरव्ह्यू साठी आली. कामात परफेक्ट वाटत होती. इंटरव्ह्यू मध्ये तिने सांगितलं की तिचा घटस्फोट झाला आहे. दोन लहान मुली आणि ती असे सगळे सुरेखाच्या आईवडिलांकडे राहतात. 


दिवस २: 

संगीता हॉस्पिटल मध्ये मावशीचं काम मागायला आली होती. लग्न झालं होतं. पण नवरा दुसऱ्या कुणा बाईचा हात पकडून चार वर्षांपूर्वी पळून गेला होता अन गेल्या चार वर्षात त्याने ने बायकोचं तोंड पाहिलं अन दोन लहान पोरीचं. अशिक्षित असल्यामुळे घटस्फोट वगैरे माहितीच नाही. आणि ही सगळी माहिती अगदी स्थितप्रज्ञपणे. कुठं आक्रस्ताळेपणा नाही, चिडचिड नाही.

आम्ही संगीताला विचारलं की पुण्यात राहते कुठे, तर ती म्हणाली सुरेखा कडे. आम्ही विचारलं, मग इथं आली कशी? तर म्हणे काका घेऊन आले, म्हणजे सुरेखाचे वडील. 

दिवस २, पुढचा सीन. 

तांबे साहेब, सुरेखाचे वडील केबिन मध्ये आले. वय ६०-६२ च्या आसपास. एका पायाला पोलिओ. 

सुरेखा आणि तिच्या दोन मुली तर सांभाळतात कारण सुरेखा तर त्यांची सख्खी मुलगी. 

संगीता त्यांच्या दुकानात कधी काळी हेल्पर म्हणून कामाला होती. अनेक वर्षे काम केलं. लग्न करून नवऱ्याबरोबर गेली, पण नवऱ्याने टाकली म्हणून मग तांबे साहेबानी तिला घरीच आसरा दिला. 

आम्ही विचारलं "सुरेखा, तिच्या दोन मुली. संगीता अन तिच्या दोन मुली. आणि तुम्ही श्री व सौ तांबे. आठ जण घरात. खर्च कसा भागवता?"

तर स्टोरी अशी की, श्री व सौ तांबेंचा दिवस पहाटे साडेतीन ला सुरु होतो. दररोजचं शंभर लिटर दूध विकतात. साडेसहा-सात पर्यंत काम संपतं. आणि मग नऊ वाजता दुकान. ते रात्री आठ वाजेपर्यंत. दररोज १७-१८ तास काम, साठीतले नवरा बायको करतात. 

हे सगळं सांगताना कुठला अभिनिवेश नाही, नशिबाला दूषणं नाही, विधात्याबद्दल तक्रार नाही. 

माझ्यासारखे लोक काही भौतिकते मध्ये आनंद शोधतात आणि देवाला धन्यवाद देतात. तांबे काका सारखे लोक हे मुळात जीवनाप्रति कृतज्ञ असतात आणि अभौतिक आनंदाचे निधान असतात. 

फाळणीकरांनी सुरेखा ला नर्स चं आणि संगीताला मावशीचं काम हॉस्पिटल मध्ये काम दिलं. आणि त्यांच्या चारही मुलींना आपलं घर मध्ये सामावून घेतलं. 

फाळणीकरांनी हा निर्णय मला सांगितला तो एक शुभंकर क्षण होता. 




 

Sunday 25 October 2020

सुनील कानवडे

काही लोकांच्या शब्दकोशात "नाही" हा शब्दच नसतो. त्यांच्यासमोर आव्हान उभं करायचं, मग त्यासाठी नियतीची मदत घ्या की मानवनिर्मित असू द्या, त्याच्याशी दोन हात करायला माणूस सदैव तत्पर. अहमदनगरचे उद्योजक श्री सुनील कानवडे हे याच प्रकारात मोडणारे. 

बँक ऑफ बडोदा मध्ये सुनील चे वडील कर्मचारी आणि त्यांची पत्नी गृहिणी, अशा मध्यमवर्गीय कुटुंबात सुनीलचा जन्म झाला. दहावी पर्यंतचे शिक्षण त्याचं अहमदनगर ला झालं. आणि त्यानंतर १९८३ साली तो शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथे यांत्रिकी पदविका पूर्ण करण्यासाठी रुजू झाला. याच कॉलेज मध्ये मीही त्याचा सहाध्यायी होतो. पहिल्या वर्षापासूनच सुनीलने अभ्यासात सुनीलने आपली छाप पाडली. अर्थात तो अभ्यासही तुफान करायचा. १९८६ ला जेव्हा आम्ही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा शेवटच्या वर्षी सुनील आमच्या वर्गात पहिला आला. का कुणास ठाऊक पण आम्हा औरंगाबादच्या मुलांना पश्चिम महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक मधील मुलांपेक्षा त्या काळात गुण कमी पडायचे. त्यामुळे प्रथम क्रमांक येऊनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्या काळात सुनीलला प्रवेश नाही मिळाला. आणि नुकत्याच चालू झालेल्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची सुनीलची इच्छा नव्हती. त्यामुळे सुनीलने सरळ बजाज ऑटो मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. १९८३ च्या सुमारास चालू झालेल्या बजाज ऑटो औरंगाबाद मध्ये अभियंत्याची गरज होती आणि आमच्या औरंगाबादच्या कॉलेज ची मोठी बॅच तिथे ट्रेनी इंजिनियर म्हणून काम करू लागली. 

सुनीलच्या अंगभूत हुशारीला आता मेहनतीची जोड मिळाली आणि अगदी थोड्या काळात तो बजाज ऑटो मध्ये एक हुशार आणि डायनॅमिक मेंटेनन्स इंजिनियर म्हणून ओळखला जाऊ लागला. डिप्लोमा नंतर त्याला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला नव्हता हे सुनीलच्या मनात ठसठसत होतं. प्रचंड शारीरिक श्रम करणाऱ्या सुनीलने अजून कमर कसली आणि मग केवळ तीन वर्षात म्हणजे १९८९ साली त्याने एएमआयई ची अवघड परीक्षा उत्तीर्ण केली. कदाचित त्याच सुमारास त्याच्या मनात आपला उद्योग असावा असे विचार फेर घालू लागले होते. उद्योजक बनायचं असेल तर कॉमर्स चं ज्ञान हवं म्हणून मग एएमआयई बरोबर तो बीकॉम च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. बजाज ऑटो मध्ये सुनीलचा पोर्टफोलिओ हा मेन्टनन्स चा होता. मग त्यात अजून प्राविण्य मिळावं म्हणून म्हणून मग १९९२ साली त्याने मेंटेनन्स ची अभियांत्रिकी पदविका मिळवली. आणि १९९४ साली त्याने आपल्या शैक्षणिक पदव्या मध्ये एक मानाचा तुरा रोवला. त्यावर्षी त्याने डिझाईन हा अवघड विषय घेऊन एम टेक पूर्ण केलं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं करत असताना त्याची बजाज ऑटो मधील कारकीर्द ही पूर्ण भरात होती. तिथे काम करताना त्याचं शिक्षण कधी आड येत नव्हतं. परीक्षा सोडल्या तर सुनील ने सुट्ट्या कधी घेतल्या नाहीत. 

बजाज ऑटो मध्ये काम करत असतानाच सुनील मधील उद्योजक हा सतत डोकं बाहेर काढत होता. १९९६ साली सुनील ने नोकरीचा राजीनामा दिला आणि श्रीराम उद्योगाची स्थापना केली. दहा वर्षे त्याने मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये जीवतोड मेहनत केली होती अन त्याचाच धागा पकडून सुनील मशीन शिफ्टिंग च्या व्यवसायाने आपल्या उद्योगविश्वाची मुहूर्तमेढ रोवली. हे काम तसं अवघड. वेगवेगळे रिसोर्सेस लागतात. शिवाय प्रचंड मेहनत. पण सुनील ने या क्षेत्रात एक विश्वासार्ह कंपनी म्हणून नाव कमावलं. पुढे हेच काम करताना त्याची एक्सईड बॅटरी त ओळख झाली आणि त्यांचे "लेड" मटेरियल मधून पार्टस बनवण्याची संधी सुनीलला मिळाली. 

आज जवळपास अडीच दशकांच्या अथक मेहनतीतून, आपल्या हुशारीच्या जोरावर श्रीराम उद्योगाचं रोपट्याने चांगलंच मूळ धरलं आहे. पुढे सुनीलने सिद्धी स्टॅम्पिंग, अस्पायर मोल्डिंग, सिद्धी इंडस्ट्रीज अशा उद्योगांची स्थापना केली आणि आज हे सर्व उद्योग यशस्वी रित्या घोडदौड करत आहेत. सिद्धी स्टॅम्पिंग मध्ये लार्सन अँड टुब्रो या प्रसिद्ध कंपनीच्या एका स्टार्टर चं कॉन्ट्रॅक्ट उत्पादन होतं. म्हणजे या कंपनीतच लार्सन अँड टुब्रो चा शिक्का बसून पॅकिंग होतं आणि ग्राहकाला सप्लाय केलं जातं. अस्पायर मध्ये स्पेशल टुलिंगची निर्मिती केली जाते. नुकताच सुनील ने प्रेशर कुकर बनवण्याचा एक प्रोजेक्ट जन्माला घातला आहे आणि ते प्रॉडक्ट लवकरच बाहेर पडेल. 

अशा धडपड्या सुनीलच्या उद्योजकतेचा कळसाध्याय मात्र या करोना काळात गाठला गेला. करोनाची साथ सुरु झाली आणि मार्च च्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधानांनी आवाहन केलं की मास्क जरूर वापरा आणि काही कारणाने तो उपलब्ध नसेल तर कमीत कमी "गमचा" (मोठा रुमाल) तरी वापरा. या आवाहनामागे असलेली कळकळ आणि संधी सुनील ने ताडली आणि त्याने मास्क बनवण्याची मशिनरी बसवून मास्क चं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. काम जोखमीचं होतं कारण करोना मुळे जगभर व्यवहार ठप्प होते आणि मशीन तर आयात करायची होती. आर्थिक गुंतवणूक होती. पण सुनील आपली सारी व्यावसायिक कौशल्ये वापरून त्या अवघड काळात वेगाने पहिली पूर्ण स्वयंचलित मास्क बनवण्याची लाईन विक्रमी वेळात टाकली आणि उच्च गुणवत्तेच्या मास्कची निर्मिती अहमदनगर मध्ये चालू झाली. इतकी वर्षे व्यवसायात असल्यामुळे सुनीलचे जगभरात ग्राहक आणि सप्लायर्स आहेत. त्याच नेटवर्किंग मधून त्याला मास्क निर्यात करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या. आणि जेव्हा हे मास्क देशात आणि परदेशात अत्यंत वाजवी दरात पुरवू शकतो हे लक्षात आल्यावर सुनीलने लगेच उत्पादन वाढवण्याचा धाडसी निर्णय घेतला. एका स्वयंचलित उत्पादन लाईनच्या पहिल्यांदा पाच आणि त्या पुढच्या दोन महिन्यात अजून पाच अशा एकूण अकरा मास्क उत्पादनाच्या स्वयंचलित लाईन्स चालू केल्या. आज अहमदनगर मध्ये सुनील कानवडे यांच्या फॅक्टरीत दिवसाला दहा लाख मास्क बनतात आणि त्या देशातल्या जनतेला करोनापासून दूर राहण्यासाठी मदत करतात. हे करत असतानाच निर्यातीमुळे परकीय चलन हे देशात येतं. 

आज सुनील कानवडे सारखे उद्योजक हे देशाच्या उत्पादन क्षेत्राचा महत्वाचा कणा आहे. सगळ्यात जास्त प्रगतीशील आणि रोजगार निर्माण तयार करणाऱ्या एसएमई क्षेत्राचा सुनील प्रतिनिधी आहे. अत्यंत कमी वेळात, ज्या प्रॉडक्ट बद्दल आधी काहीही माहिती नाही, त्याच्या उपयुक्ततेचा अभ्यास करून, मार्केट शोधून त्याच्या उत्पदनाचं तांत्रिकी ज्ञान मिळवून लोकोपयोगी असं मास्क सारखं प्रॉडक्ट बनवण्याच्या सुनील कानवडे च्या कल्पक उद्योजकतेला सलाम. 

 

 


Wednesday 23 September 2020

भांडवल आणि नफ्याची सायकल

 या सर्व काळात एक मुद्दा फार चवीने चर्चिला जातो आणि तो म्हणजे इतके दिवस नफा कमावला तर आता कामगारांची काळजी घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?

इथे तुम्हाला मी भांडवल आणि नफ्याची सायकल सांगतो. 

व्यवसाय करत असताना नफा साधारण एका टक्केवारीत होतो. हा नफा म्हणजे सगळे खर्च झाल्यानंतर उरलेले पैसे. यात बिझिनेस ओनरचा पगार पण आला. हो, व्यवसायात असताना सुद्धा बिझिनेस ओनरने पगार घेणंच अपेक्षित असतं. 

आता हा जो नफा उरतो तो गुणोत्तर प्रमाणात खूप जास्त असेल तर बिझिनेस ओनर नफ्यातील काही भाग  डिव्हीडंड म्हणून पगाराव्यतिरिक्त घेऊ शकतो. उरलेला भाग हा बिझिनेस मध्येच रोल केला जातो, जो शक्यतो व्यवसाय वृद्धीसाठी वापरला जातो. 

आता छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांना हा डिव्हीडंड प्रकार व्यवसाय चालू केल्यावर अनेक वर्षे घेता येत नाही. कारण व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना पैसे व्यवसायातच ठेवावे लागतात. त्यामुळे व्यावसायिकांकडे आडमाप एक्सेस पैसे असतात ही अंधश्रद्धा आहे. 

दुसरा महत्वाचा कळीचा मुद्दा इथे येतो आणि तो म्हणजे कॅश ची उपलब्धता. छोटे व्यावसायिक हे मोठ्या उद्योगांना माल सप्लाय करत असतात. त्याचे पैसे वेळेत देणे म्हणजे पाप आहे असा एक समज आपल्या व्यवसाय जगतात आहे. त्यामुळे व्यवसाय नफा जरी दाखवत असतील, की जो नोशनल असतो, त्यांच्याकडे कॅश ची वानवा असते. 

या सगळ्या वरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की धंदा पूर्ण बंद असताना एखाद दोन महिन्यापलीकडे व्यावसायिक फिक्स्ड एक्स्पेन्सेस सहन करू शकत नाही. 

मी स्वतःवरून दोन गोष्टी सांगतो. 

मी गेले अठरा वर्षे व्यवसायात आहे, पण एकही वर्ष डिव्हीडंड घेतला नाही आहे. आणि दुसरं म्हणजे, जर आमच्या भारतभरातील ग्राहकांनी आमची सर्व देणी परत दिली तर शून्य बिझिनेस झाला तरी मी सर्व लोकांना किमान एक वर्ष पगार देऊ शकतो. 

टीप: 

१. मी हे जे लिहिलं आहे ते ग्रोथ माइंडसेट ठेवणाऱ्या आणि लेजिटिमेट पद्धतीने बिझिनेस करणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय मनात ठेवून लिहिलं आहे. उत्पादन क्षेत्रातील छोटे व्यावसायिक जे गडगंज दिसतात ते एकतर सॉलिड प्रॉफिट मेकिंग असतात किंवा त्यांच्याकडे पैसे कमावण्याचे दुसरे मार्ग असतात. 

२. आता आलेली परिस्थिती भविष्यात आली तर तिला तोंड देण्यासाठी, सोसायटीला जसा सिंकिंग फंड असतो तसा फंड कंपन्यांनी तयार करणं गरजेचं आहे. 

३. असंच असेल तर मग नोकरी करणं काय वाईट आहे असं वाटू शकतं. पण आहे हे असं आहे. एथिकल आणि लेजिटिमेट पद्धतीने व्यवसाय करणे हे एक तप आहे. पैसेच कमवायचे असतील तर नोकरी करण्यासारखा चांगला मार्ग नाही. व्यवसाय करायचा असेल तर पैसे कमावण्यापलीकडे जाऊन खूप विचार करावा लागतो. 

Monday 31 August 2020

कार्मिकतेची गरज

 ज्या देशातील बहुसंख्य कर्मचारीवर्ग दोन महिने तंगड्या वर करून घरात बसले असताना परत धार्मिकतेचा पगडा असणाऱ्या सणवारांसाठी सुट्ट्या घेतो, ज्या देशातील बहुसंख्य उद्योजक आणि टॉप मॅनेजमेंट ला आपला उद्योग परत जागेवर कसा यावा यासाठी विचार करण्याची तसदी पण घ्यावी वाटत नाही, ज्या देशातील राजकीय मंडळी सामान्य जनतेचे जीवनमान सुधरवणऱ्या उद्योगांबरोबर चर्चा न करता मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करतात, ज्या देशातील राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी देवाकडे चमत्काराचा धावा करतात, ज्या देशाचे अर्थमंत्री आपल्या नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या परिस्थितीला ऍक्ट ऑफ गॉड म्हणून बोळवण करतात, ज्या देशातील जनता अर्थव्यवस्थेची काळजी न करता राममंदिर झालं म्हणून उन्माद करते आणि आपला बहुसंख्य वेळ हा कुठल्या सेलेब्रिटीच्या आत्महत्या का आणि कशी झाली याची वांझोटी चर्चा करत वाया घालवते,  धार्मिकतेचा पाश जगातील ज्या दोन देशाभोवती आवळला जात आहे त्यापैकी एक आपला देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था डबघाईला जाणार हे सांगण्यासाठी कुठल्या विद्वानांची गरज नाही, 

या देशातील जनतेला समजलं पाहिजे की आपण जो मार्ग निवडला आहे त्याला धार्मिक नव्हे तर कार्मिकतेची गरज आहे. उत्पादकतेचा एल्गार करा नाहीतर फक्त अर्थव्यवस्था कशी डबघाईला गेली आहे याचे मेसेजेस फॉरवर्ड करण्याशिवाय तुमच्या हातात काही उरणार नाही. 


Friday 31 July 2020

Success/Failure

Its a crime if you dont know reasons of failure. 

It is also crime if you dont know reasons of your success. 

आयुष्यात चुकीचं घडलं की त्याचं पोस्टमार्टेम करायला आपण सदैव तत्पर असतो. कारणं शोधतो आणि एक काउंटर ऍक्शन प्लॅन काढतो. आणि मग त्या प्लॅन वर काम केलं तर काही काळानंतर अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडायची शक्यता असते. आता काही लोक असे असतात की ते हे पोस्टमार्टेम करायच्या मनस्थितीत नसतात. ही लोक त्या भोवऱ्यात गंटांगळ्या खात राहतात. काही लोक असेही असतात की ते अपयशाची कारणं आपण शोधली आहेत असं दाखवतात, प्रत्यक्षात त्यांना स्वतःच्या मूलभूत वृत्तीला बदलायचं नसतं. ही लोक तूच चूक पुनः पुनः करतात आणि शेवटी नशिबाला कोसत राहतात. शेवटची कॅटेगरी म्हणजे ही लोक करणे शोधतात, पण त्या वरील काउंटर प्लॅन ला अंमलात आणत नाही. त्यांचेही वांदे होतात. 

यशस्वी का झालो याचीही कारणं आपण शोधली पाहिजेत. मूळ कारणं. त्याचे दोन फायदे आहेत. आपण तीच थॉट प्रोसेस प्रत्येक प्रश्नाला लावू शकतो. त्यात कदाचित प्रश्नाचा आवाका वेगळा आणि मोठा असेल पण त्याला उत्तर शोधण्याची तार्किक प्रोसेस सेम असू शकते. अशा यशस्वी लोकांनी ही आपली थिंकिंग प्रोसेस शेअर करण्याची मानसिकता जोपासली पाहिजे. किंबहुना ते स्वतःच उत्तरदायित्व समजायला हवं. असं जर झालं तर आमच्या सारखे, जे सुयोग्य मार्गाचं दर्शन घडावं म्हणून धडपडत आहेत, त्यांना काहीतरी दिशा मिळेल. बऱ्याचदा या यशस्वीतेची मूळ कारणं लोकांना सापडत नाही. यश मिळतं पण त्याची थिंकिंग प्रोसेस पाहिजे तशी उतरत नाही. 

Wednesday 15 July 2020

लाफिंग स्मायली

२०१२ साली जेव्हा सेटको बरोबर आमचं जॉईंट व्हेंचर झालं. करारावर सह्या झाल्यावर आर्ट मिलर, जे त्यावेळेस आमच्या बोर्ड चे चेअरमन होते, त्यांनी मला विचारलं "या जॉईंट व्हेंचर मधून तुला काय मिळवायचं आहे?"

मी म्हणालो "प्रोफेशनल फ्रंट ला काय मिळायचं ते मिळेल, पण पर्सनल फ्रंट ला मला माझ्या आयुष्यातून हरवलेला सेन्स ऑफ ह्युमर परत मिळवायचा आहे." माझं उत्तर अनपेक्षित होतं. त्यांनी मला अर्थ विचारला. त्याला उत्तर म्हणून मी जे सांगितलं ते मला वाटतं की बऱ्याच व्यासायिकांची व्यथा आहे. मी म्हणालो "एक वेळ होती की माझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता, पण या बिझिनेस च्या प्रेशर मुळे तो हद्दपार झाला आहे. बिझिनेस चा फॉरमॅट या जेव्ही द्वारे असा करून द्या, की थोडी लाईट मानसिकता होईल."

असो. हसण्याचं थोडं वावडं आहेच. टीव्हीवर हंगामा किंवा गोलमाल चालू असेल तर नील आणि वैभवी हसून लोटपोट होताना मी मख्खसारखा बसून असतो. एखाद्या ग्रुप मध्ये हसी मजाक चालू असेल तर मला तितकं हसू येत नाही.

इथे फेसबुकवर मला अनेक मित्रांनी दाखवून दिलं की मी बऱ्याचदा पोस्टवर हसरी स्मायली देत नाही. मी हे मुद्दामून करत नाही किंवा पोस्टमधील विनोद दर्जेदार नाही असेही मला वाटत नाही. पण कदाचित ती मानसिकता झाली असेल. पोस्ट वाचत असलो तरी मनात दुसरं काही चालू असेल त्यामुळे यांत्रिक पणे लाईक देत असेल.

अर्थात हसऱ्या स्मायलीचा पूर्ण दुष्काळ असतो असं ही नाही. थोडं राशनिंग होतं हे खरं.

सांगायचा मुद्दा हा की स्मायली न देण्यात माज नाही. कदाचित माझीच आकलनशक्ती कमी पडत असेल. सुधारेल ती ही हळूहळू. पण तो पर्यंत तुम्ही हसत आणि हसवत रहा.




Monday 22 June 2020

मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र

काम देण्यायोग्य इंजिनीअर्स उपलब्ध नाहीत ही व्यवसायिकांची व्यथा आणि चांगले पगाराचे जॉब्ज उपलब्ध नाहीत ही युवक/युवतींची व्यथा. आणि हे असं घडण्यामागे समाजाचे सर्व कोन कारणीभूत.

ज्या क्षेत्रात तार्किकतेने काम करण्याची अपेक्षा असते अन ते करण्यात कुठल्याही शाखेचा इंजिनीअर चालतो हे लक्षात आल्यावर भोवऱ्यासारखे तमाम स्ट्रीमच्या इंजिनीअर्स ला आपल्याकडे ओढून घेतलेल्या पण त्याबरोबरच कमी वयात आर्थिक स्थैर्य देणारी आय टी इंडस्ट्री, अचानक इंजिनीअर्सची गरज तयार झाल्यावर शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षींनी जन्माला घातलेले इंजिनियरिंग कॉलेजेस, पण त्या कॉलेजेस मध्ये शिक्षणाची क्वालिटी चांगली आहे की नाही याची माहिती न घेता केवळ "पॅकेज" या आकर्षणापोटी घाऊक भावात ऍडमिशन घेणारा आपला समाज, आणि कॉलेजेस वर चांगल्या क्वालिटी एज्युकेशन देण्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी आणि अनास्था असणारं शासन या सगळ्या गोष्टीमुळे नोकरीक्षम इंजिनियर्स ची वानवा या देशात तयार झाली त्यात नवल ते काय? आणि या जोडीला मूल्यांचं अधिष्ठान आपल्या जगण्याला असायला हवं या भावनेचा अभाव याने एकूणात रसातळाला गेलेल्या इकोसिस्टमचा गळा अजून घोटला.

हे वाचताना एक लक्षात असू द्या की  मी व्यथा मांडतो आहे एसएसएमई  च्या अनुषंगाने जिथे आमच्या वाटेला फक्त तिसऱ्या किंवा चौथ्या श्रेणीच्या कॉलेजेस ची मुलं येतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणाईशी संवाद साधणे आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची चळवळ सुरू होणं गरजेचं आहे. असा एक छोटा प्रयत्न औरंगाबादचे अभ्यासू पत्रकार श्री दत्ता जोशी करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नात त्यांनी मला सहभागी करून घेतलं. या संदर्भातील मतं त्यांच्या समवेत मांडली. या पोस्टद्वारे मी आवाहन करतो की मी तर एक छोटा उद्योजक आहे पण जोशींनी अनेक दिग्गज उद्योगपतींना या विषयावर बोलण्यास उद्युक्त केलं आहे. त्यांच्या यू ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि उद्योग जगताच्या एक एम्प्लॉयेबल युथ म्हणून काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्या.

फक्त आणि फक्त मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र घडवू शकतो. 

Wednesday 17 June 2020

भास्कर मंडलिक

भास्कर अनंतराव मंडलिक, ऑगस्ट १९४१-१८ जून २००९.

बऱ्याचदा माझे नातेवाईक असं म्हणतात, इतक्या जणांवर लिहितोस पण स्वतःच्या वडिलांबद्दल लिहिलं नाहीस कधी ते! आज अकरा वर्षे झालीत त्यांना जाऊन. इतके फादर्स डे झाले. पण धीर नाही झाला.

जे मला माहिती आहे त्यांच्या बद्दल He was man of people. एमएसईबी मध्ये मंडलिक साहेबांना ओळखत नाही असा माणूस विरळा.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये बालपण गेलेलं. कधी बोलायचे नाही ते त्याबद्दल. पाचव्या वर्षी मातृछत्र हरवलेलं. सावत्र आई आणि तिने दिलेला प्रचंड त्रास. फार वर्षांपूर्वी बोलले होते. काटा आला होता अंगावर ऐकताना. ६३-६४ च्या सुमारास लागले एमएसईबी मध्ये. बी एस्सी की  बी ए होते ते. तिसरं वर्ष पण पूर्ण नव्हतं झालं बहुधा. पण दुनियादारीच्या विद्यापीठात विशेष प्राविण्यासह पास  होते ते. त्यामुळे त्यांचं शिक्षण काय हे विचारायची गरज ही पडली नाही.

"नाही" शब्द नव्हता त्यांच्या शब्दकोशात. परभणी, बीड, यवतमाळ, औरंगाबाद, नासिक, पुणे, मुंबई आणि पुणे अशी भ्रमंती झाली. बाकी महाराष्ट्रातल्या तमाम गावांना त्यांनी भेट दिलेली. प्रवासाची आवड मला त्यांच्याकडून मिळाली यात शंका नाही. प्रचंड कामसू. मंडलिक साहेबांना काम दिलं आणि ते झालं नाही अशी तक्रार नाही कधी, वरिष्ठ आणि कनिष्ठ, दोघांकडून.

घरात कायम लोकांचा राबता. ऐंशीच्या दशकात, मराठवाड्यासाठी पुणे म्हणजे परदेश. भास्करचं घर आहे, या इतक्या माहितीवर परभणी आणि इतर गावातून लोक धडकायची आणि काम करून परत जायची.

बिझिनेस या प्रकारावर फार त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्याला कधीही त्यांनी प्रोत्साहन नाही दिलं. किंबहुना विरोधच केला. एसकेएफ ला जॉबला लागताना त्यांनी अगदी आवर्जून प्रयत्न केले. पण व्यवसायाने बाळसं धरेपर्यंत ते कायम साशंक राहिले. व्यवसायाला चार पाच वर्षे झाल्यावर मात्र थोडा विश्वास वाटू लागला त्यांना. मग ते त्यांच्या मित्रांना कौतुकाने कंपनी दाखवायला आणत असत.

या ना त्या कारणाने त्यांची आठवण निघत असतेच. पण अ....अभियंत्याचा च्या प्रकाशन सोहळ्यात आणि आता नवीन कंपनीच्या पूजेच्या दिवशी मात्र त्यांची आठवण प्रकर्षाने झाली. अर्थात पुस्तक प्रकाशन सोहळा त्यांच्या मित्रांच्या डोळ्यातून पाहिला असेलच. कंपनीचं आजचं रूप पाहून मात्र ते हरखून गेले असते हे नक्की.

एम एस ई बी त आयुष्य व्यतीत केल्यावर आम्हा सर्वांचं व्यवसायिक आयुष्य पाहून त्यांना खूप बहुदा टेन्शन यायचं. अर्थात त्या पिढीतल्या लोकांप्रमाणे कधी बोलले नाही. त्यात सुवर्ण सहकारी बँक प्रॉब्लेम मध्ये आली जिथे त्यांनी काही पैसे गुंतवले होते. या सगळ्यांची परिणीती कँसर मध्ये झाली. १८ जून २००९ ला त्यांना देवाज्ञा झाली.

आजही जुन्या नातेवाईकांना आणि परिचिताना भेटल्यावर भास्कर मंडलिक यांच्या आठवणी आवर्जून काढल्या जातात, यावरून ते किती समृद्ध आयुष्य जगले याची जाणीव होते.


Tuesday 16 June 2020

चीन आणि आपण

सध्या चीन विरुद्धच्या पोस्टची सोशल मीडियावर धूम आहे. भरीस भर म्हणून ते वांगचुक त्यांची पण समिधा टाकत आहेत. ते टिकटॉक जर आपण डाउनलोड केलं नाही तर राष्ट्रद्रोही अशी भावना तयार झाली आहे. आणि मी जे लिहिणार आहे, त्यात हे प्रकार फालतू आहेत असं अजिबात नाही आहे. मी हे पण लिहिणार नाही की जगभरातल्या युनिव्हर्सिटी मध्ये चायनीज विद्यार्थी सध्या टॉप करत आहेत अगदी आपल्या भारतीय मुलामुलींना मागे टाकून. 

या लेखात मी हे ही लिहिणार नाही की जेव्हा युरोप मध्ये चार दिवसाचा आठवडा ही मागणी जोर धरत असताना चायनीज लोक दिवसरात्र काम करून देशाला पुढे नेत आहेत. चायनीज जिथे आहेत तिथे असण्याची त्यांची लायकी नाही आहे, असं मला ही वाटतं. शेवटी त्यांनी प्रॉडक्ट डिझाइन कॉपी केले आहेत,मग तीन दशकात ८० कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर खेचलं असेल तर ठीक आहे. 

हा लेख आहे भारताने एका क्षेत्रात चीनला कसं नमतं घ्यायला लावलं, त्याविषयी. आणि हा सरकारचा किंवा लष्कराचा विजय नाही. तर भारतातल्या काही कंपन्यांनी चायनीज कंपन्याना केवळ भारतात नव्हे तर जगात कसं झोपवलं, त्याबद्दल हा लेख आहे. 

२००० साली मी बजाज ऑटो चा एच आर हेड झालो. मला १०० डिझाइन इंजिनीअर्स घ्यायचे होते, जगातील सर्वोत्तम मोटासायकल्स बनवण्यासाठी. व्हीजेटीआय आणि आर ई सी कॉलेजेस मध्ये इंटरव्ह्यू घेतल्यावर मला दहा इंजिनियर्स निवडता आले. प्रत्येक वेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सांगायचा की मुलांना टेक्नॉलॉजी कंपनीत जायचं असतं. मी विचारायचो, का, इंजिन डिझाइन करणे हे टेक्नॉलॉजी काम नाही आहे का? बहुतेक बँकेसाठी कोबोल कोड लिहिणे हेच त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी काम होतं, इंजिन डिझाइन करणे हे उत्पादन क्षेत्र म्हणत असावे. 

त्याच्या पुढच्या वर्षी मी कॉलेजेस ला पत्र पाठवलं "तथाकथित टेक्नॉलॉजी कंपनीपक्षा तिप्पट पगार देईल. मला सर्वोत्तम असे १०० इंजिनियर्स हवेत.". बॉडी शॉपिंग करणाऱ्या कंपन्यांना २००० बॉडीज लागायच्या. त्यांना मी ऑफर केलेली सॅलरी देणं शक्य नव्हतं. 

आणि मग बजाज ऑटो चं आर अँड डी डिपार्टमेंट आम्ही उभं केलं. प्रत्येक बॅच मध्ये सोन्याच्या लगडी घेत. सेक्सी मोटारसायकल चं डिझाइन आणि उत्पादन करण्यासाठी आम्ही किंमत मोजली. आमचा निवडीचा रेशो १:१५ होता. इंटरव्ह्यू ला येणारे, अगदी टॉपर्स सुद्धा, निव्वळ दगड होते. पण त्याच दगडाच्या खाणीत आम्ही रत्ने शोधली. त्यांचं इंग्रजी कदाचित कच्चं होतं पण इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल चा जोश होता. 

हाच मार्ग दक्षिण भारतात एका कंपनीने वापरला, टिव्हीएस ग्रुप. त्यांनी सुद्धा खणखणीत आर अँड डी डिपार्टमेंट उभं केलं त्यांच्या मोटारसायकल बनवण्यासाठी. 

२००५ साली ३०% टक्के कमी किंमतीत, चायनीज मोटारसायकल भारतात उपलब्ध झाल्या. डिलर्स चढाओढीने त्या गाड्या विकू लागले. प्रेसने भारतीय मोटारसायकल कंपन्यांचा शेवट असं भाकीत केलं. पण जास्त नाही, फक्त सहा महिन्यात चायनीज मोटारसायकल कंपन्यांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला, ते परत भारतात न येण्यासाठी. 

पुढं मग बजाजने आफ्रिका मार्केटला लक्ष्य केलं. मोटरसायकल ही टॅक्सी म्हणून वापरणाऱ्या आफ्रिकेसमोर दोन पर्याय होते, एक किमती जापनीज बाईक्स किंवा क्वालिटीत रद्दड पण स्वस्त चायनीज बाईक्स चा. चीनच्या किमतीपेक्षा महाग पण उत्तम क्वालिटी च्या बजाज मोटरसायकलने आफ्रिकेत आपलं बस्तान बसवलं. उत्तम वितरण व्यवस्था, सेवा केंद्रे याद्वारे ग्राहकाभिमुख राहत बजाज आफ्रिकेत अव्वल नंबरला आलं आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय टिव्हीएस. चायनीज मोटारसायकल तिथून हद्दपार झाल्या आहेत. 

जे या क्षेत्रात झालं ते, टीव्ही, मोबाईल फोन्स, कंप्युटर्स किंवा फार्मा क्षेत्रात का नाही होऊ शकत? तोच देश, तेच लेबर लॉ, तेच इन्फ्रास्ट्रक्चर पण फरक उद्योजकतेच्या मानसिकतेत असावा. सरकार ची धोरणे हा एक प्रश्न आहेच पण भारतीय उद्यजोकांची झापडबंद मानसिकता हे ही एक कारण आहे. 

भारतीय बाजारपेठेवर चायनीज वरचष्मा असायला सरकार, जनता आणि व्यावसायिक हे तिघेही कारणीभूत आहेत. आणि हा वरचष्मा का नसावा? 

आपल्या आयटीआय झालेल्या मुलाला शॉप फ्लोअर वर काम करायचं नाही आहे, स्टॉक ब्रोकर ला इंजिनीअर पेक्षा जास्त पगार मिळतोय, उत्पादन क्षेत्रातील कंपनीला टेक कंपनी म्हणून मान्यता मिळत नाही आहे, सरकार अजूनही पुरातन लेबर आणि जमीन कायदे बदलायला तयार नाही आहे, आणि उद्योजक गो ग्लोबल च्या गप्पा व्हिस्की चे घोट घेत मारतो आणि कृती शून्य राहतो आणि सरते शेवटी तुम्ही वाचक, हो तुम्हीच, तुमच्या मुलामुलींना शॉप फ्लोअर वर काम करायला प्रेरित करत नाही आहात. हा आपला तसं तर नैतिक भ्रष्टचार आहे आणि त्यामुळेच हे चायनीज आपल्या डोक्यावर बसले आहेत. आपल्याच कचखाऊ वागण्यामुळे आपल्याच घरात येऊन हे चायनीज लोक आपला खिसा रिकामा करत आहेत. 

श्री श्रीनिवास कांथेली यांच्या इंग्रजी लेखाचा स्वैर अनुवाद

Saturday 13 June 2020

"आपलं घर"

"आपलं घर" ही श्री विजय फाळणीकर संस्थापित आणि समाज पुरस्कृत संस्था, ज्यांचे आई वडील नाही आहेत अशा मुलांची आणि मुलांनी जबाबदारी न घेतल्यामुळे परागंदा झालेल्या आई वडिलांची, काळजी घेणारी म्हणून प्रसिद्ध आहे. पण "आपलं घर" ची आरोग्य सेवा ही येणाऱ्या काळात तिची ओळख होणार आहे हे निश्चित.

आपलं घरच्या डोणजे स्थित आश्रमाशेजारी एक छोटेखानी पण सर्व सोयींनी सुसज्ज असं हॉस्पिटल सध्या कार्यरत आहे. तिथे ओपीडी पेशंट तर तपासले जातातच पण डोळ्यांचे आणि दातांचे सर्व ऑपरेशन हे विनामूल्य केले जातात. याशिवाय पॅथॉलॉजी लॅब आहे आणि नुकतं अल्ट्रा सोनोग्राफी ची सेवा सुद्धा तिथे सुरु झाली आहे.

पुण्यात जरी सर्व मेडिकल सेवा उपलब्ध असल्या तरी इथून तीस किमी लांब गेल्यावर अगदी बेसिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशा गावात डॉक्टर आणि दवाखाना आपलं घरच्या मोबाईल मेडिकल व्हॅन द्वारे पोहोचतात आणि तिथल्या वस्तीच्या गरीब लोकांच्या आजाराची काळजी घेतात.

नुकतंच आपलं घर ने वैद्यकीय सेवा देण्याबाबतीत जी गोष्ट साध्य केली त्याने आपलं घरचे देणगीदार आणि इतर संबंधित लोकांना नक्कीच अभिमान वाटेल.

डोणजे येथे आपलं घर ने एक सुबक आणि सर्व उपकरणं युक्त असं "ब्रेस्ट कँसर सर्जरी सेंटर चालू केलं आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे पेशंट साठी अगदी विनामूल्य ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी इथं केली जाते. सेंटर चालू झाल्यापासून आठ दिवसात तीन यशस्वी सर्जरी झाल्या. डॉ. शेखर कुलकर्णी आणि डॉ ओजस देशपांडे वाधवा यांनी श्री फाळणीकर यांच्या कल्पनेला साथ दिली आणि एक दर्जेदार वैद्यकीय सेवा या परिसरात चालू झाली. आपलं घरचं हे पाऊल येणाऱ्या काळात अनेक उत्तमोत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची नांदी आहे असं म्हणणं चूक ठरणार नाही.

श्री नाना पाटेकर आणि श्री दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे लोक, आणि अनेक संस्था आपलं घर बरोबर संलग्न आहेत. या माध्यमातून देश विदेश चे लोक आपलं घर शी आम्ही जोडू शकलो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की आपलं घरला भेट द्या. मला खात्री आहे, तुम्हाला काम नक्की आवडेल आणि फळणीकरांच्या कर्म यज्ञात हातभार लावू शकाल. 

Tuesday 9 June 2020

भानगडी करोनाच्या

शप्पथ सांगतो राव, येड पळलंय. नाय म्हणजे ऐकायचं कुणाचं.

काल पर्यंत सांगत होते की जून मध्ये पिक फिगर पोहोचेल करोनाची आणि मग डाउनवर्ड ट्रेंड चालू होईल. आता सांगत आहेत की जुलै मध्ये पिक फिगर पोहोचेल आणि सप्टेंबर पर्यंत करोना राहील.

कधी सांगतात एअर बॉर्न ट्रान्सफर होणार नाही. वजन जास्त असल्यामुळे खाली फ्लोअर वर पडेल. कुणीतरी मध्येच म्हणतं, नाही एअरबॉर्न ट्रान्सफर होतं, कुठेही सांभाळून रहा.

कुणी म्हणतं मास्क जास्त वापरू नका. ऑक्सिजन इन टेक चा प्रॉब्लेम होईल. कुणी म्हणतं एन ९५ वापरू नका, कॉटन चा मास्क वापरा. कुणी म्हणतं मास्कच्या आऊटर सर्फेस वर व्हायरस असू शकतो. कुणी म्हणतं, आतल्या सरफेस वर राहतो.

कुणी म्हणतं मेटल फेसवर व्हायरस जिवंत राहतो, कुणी म्हणतं फॅब्रिक वर जिवंत राहतो.

कुणी म्हणतं मॉरटॅलिटी  रेट बाकी व्हायरस पेक्षा कमी आहे आणि इथे तर दिवसेंदिवस भयप्रद डेथ स्टोरीज ऐकायला मिळतात.

कुणी म्हणतं एरिया सील आहे, जावं तिथून तर काहीही सापडत नाही आहे.

औषधाच्या बाबतीत कहर झालाय. व्हिटॅमिन सी खा, डी खा. अर्सेनियम खा, कंफ्यूर खा, लिंबू पिळून पाणी प्या, हळद टाकून दूध घ्या, स्टीम घ्या, गरम पाणी घ्या.

थंड असते म्हणून बियर पिऊ नका, व्होडका पिल्याने रशियन लोकांचा डेथ रेट कमी आहे.

एसी असेल तर डक्ट मधून दुसरीकडे व्हायरस जाऊ शकतो, म्हणे.

मध्येच कुणीतरी फ्रान्सचा व्हिडीओ दाखवतं की सगळे हॉटेल्स गर्दीने तुडुंब वाहत आहेत.

कुणी दुसऱ्याच आजारासाठी ऍम्ब्युलन्स बोलावतं आणि दवंडी पिटली जाते पेशंट करोना पॉझिटिव्ह आहे म्हणून.

मायला, एक गाव अन बारा भानगडी झाल्या आहेत या करोनाच्या. 

Tuesday 26 May 2020

टाईमपास.

१९९४ पासून मी सेल्स मध्ये काम करतोय. एक आठवड्यापेक्षा सलग मी पुण्यात राहिलो आहे असं मला आठवत नाही. पण या कोविड ने ते करून दाखवलं. १४ मार्च ला मी दिल्लीहून पुण्यात आलो. कोविड चं सावट एव्हाना गडद व्हायला लागलं होतं. २० मार्च ला मी चेन्नई ला जायचो होतो, पण पोस्टपोन करून १६ एप्रिल तारीख केली. नंतर मात्र प्लॅन कॅन्सल केला.

१५ मे च्या सकाळी मी अमेरिकेला जायचो होतो, सहकुटुंब. आणि आज परत निघणार होतो. पण आपण काही ठरवतो आणि करोनाच्या मनात काही वेगळं होतं.

पुण्यात आलात आणि रहायला काही प्रॉब्लेम झाला तर कंपनीत राहू शकता हे आवाहान मी आमच्या एम्प्लॉईजला पहिल्या दिवसापासून करतोय. काल आमचा अतुल दीक्षित आला आणि त्याचं प्रायव्हेट हॉस्टेल अजून बंद आहे. तो म्हणाला की मी राहू शकतो का कंपनीत? कंपनीने आनंदाने परवानगी दिली. तो एकटाच कुठे राहणार कंपनीत, म्हणून मी त्याला म्हणालो की मी पण येतो तुझ्याबरोबर कंपनीत राहायला.

एका दगडात चार पक्षी मारले.

- तब्बल तीन महिन्याने घर सोडून राहणार.
- माझी ट्रॅव्हेल बॅग, जी पडून होती, तिला हवा लागणार.
- अतुल ला एक साथ म्ह्णून ते एक समाधान. 

ह्या सगळ्या सांगायच्या गोष्टी. पण आज संध्यकाळी, ते स्कॉच ब्राईट नको, ते सिंक नको, तो व्हॅक्युम क्लिनर नको आणि तो मॉप नको.

मै और मेरी तनहाई अक्सर ये बाते.......म्हणत फुल टाईमपास. 

Monday 25 May 2020

५२ वा वाढदिवस

कालच्या बावन्नव्या वाढदिवशी आश्चर्यकारकरित्या मला खूप शुभेच्छा आल्या. इथे फेसबुकवर तर आल्याच आल्या पण कंपनीतल्या मुलांनी माझ्याबद्दल फार छान लिहिलं. इथल्या मैत्रगणांशी माझी दोस्ती तर आहेच पण लॉक डाऊन ४ आणि त्यात रविवार यांनी पण हातभार लावला. अन त्यात कडी म्हणजे माझ्या पुस्तकाची प्रकाशिका सानिका वाडेकर, लोकप्रिय मिलिंद शिंदे, श्रीरंग जाधव आणि जयंत विद्वंस हा मित्रत्रिकोण, आपल्या कल्पक डिजिटल मार्केटिंग स्टाईलने वहाण ब्रँड तयार करणारा भूषण कांबळे, ज्यांच्यामुळे या लॉक डाऊन च्या निराशाजनक काळात खूप वेगळी कामं करायची संधी मिळाली ते आपलं घर चे संस्थापक आणि मित्र विजय फाळणीकर, लिहिण्याची चांगली रेंज असणारे हेरंब जोशी उर्फ बगुनाना यांनी फार दिलसे भावना व्यक्त केल्या. त्यांच्या बरोबरच ऋषिकेश मारणे, महेश चव्हाण, सारंग भालेराव, विनय वझे, जयंत अत्रे, प्रणव कुलकर्णी, सुजाता मुनोत यांच्या लिहिण्याने मी काल हरभऱ्याच्या झाडावर बसलो होतो. संध्यकाळी "बास झालं कौतुक. भांडी घासून घे" हा इशारा ऐकल्यावर आपसूक खाली उतरलो.

असो. अजून एक वर्ष गेलं. पण आव्हानं काही संपली नाही आहेत. गेल्या वर्षी एप्रिल पासून परिस्थिती बिघडली ती अजून काही जागेवर येत नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांची मालिका येत गेली. त्यांना तोंड देताना सेटको चे सहकारी, माझ्या घरची लोक आणि इतर मित्रमंडळीची खूप मदत झाली. त्या सगळ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.

टाईमलाईन, व्हाट्स अप आणि फोनवर शुभेच्छा आल्या त्यांचे पुन्हा आभार. या करोनाच्या संकटातून जग मुक्त होवो, ही प्रार्थना.

लेथ जोशी चित्रपटासाठी श्री वैभव जोशी यांनी फार सुंदर काव्य रचलं आहे. आमच्या कंपनीच्या एका कार्यक्रमात म्हंटली होती ही कविता. मेधा जाधव यांनी त्याचं व्हिडीओ रूपांतरण केलं आहे. तुम्हालाही आवडेल. 

Monday 18 May 2020

सेंड ऑफ

मी जॉब करायचो तेव्हाची गोष्ट आहे. आमच्या कंपनीत एक मॅनेजर जॉईन झाला होता. काही दिवसातच श्रीनिवास कंपनीत पॉप्युलर झाला होता. त्याचं बोलणं, चालणं एकदम मस्त होतं. त्याला एक छोटी टीम दिली होती आणि एक नवा सेगमेंट डेव्हलप करायला दिला होता. ऑइल अँड गॅस सेगमेंट मध्ये प्रॉडक्ट विकायचं.

आमचा एम डी पूर्ण फ्रिडम द्यायचा काम करताना. त्याची फक्त एकच अपेक्षा होती. सेल्स फिगर्स आणि त्याला अचिव्ह करण्याचा काळ तुम्ही सांगायचा. तो त्यात अजिबात लुडबुड नाही करायचा. त्याला त्या वेळेत सेल्स ची फिगर दिसायला हवी. थोडक्यात गोल सेट करणे आणि ते जमवून आणणे याला तो खूप मान द्यायचा. श्री ने दीड वर्षाचा वेळ मागितला आणि सेल्स फिगर्स पण त्याने एम डी  ला सांगितली.

श्रीनिवासने, श्री म्हणू यात त्याला, काम धडाक्यात चालू केलं होतं. तो बोलताना आश्वस्त वाटायचं. एम आर एम मध्ये त्याचं प्रेझेंटेशन वर पब्लिक फिदा असायचं. कारण खूप सकारात्मकता असायची त्याच्या बोलण्यात. ऑइल अँड गॅस सेगमेंट साठी तो जे काही प्रयत्न करतोय त्याची व्यवस्थित माहिती श्री द्यायचा. आमचा बॉस ही त्याला थम्स अप द्यायचा. प्रकाश मशीन टूल सेगमेंट बघायचा.

श्री जॉईन झाल्यापासून चौथ्या महिन्याची एम आर एम चालू होती. आमचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन झाल्यावर श्री चं प्रेझेंटेशन चालू झालं. नेहमीप्रमाणे सकारात्मकता ठासून भरली होती त्याच्या बोलण्यात. पण यावेळेस एम डी च्या डोळ्यात श्री बद्दल दिसणारं कौतुक मला दिसत नव्हतं. आणि मला कारण कळलं. श्री चे प्रयत्न असले तरी सेल्स च्या फिगर मध्ये काही प्रॉमिसिंग दिसत नव्हतं.

एव्हाना माझी आणि श्री ची पण चांगली दोस्ती झाली होती. कारण तो माणूस म्हणून पण चांगलाच होता.

महिने सरले. आणि वार्षिक मिटिंग झाली. श्री बोलला जोरदार पण त्याचे रिझल्ट्स अजिबात प्रॉमिसिंग नव्हते. एम डी च्या चेहऱ्यावर यावेळेस चांगलीच नाराजगी दिसली. श्री ला जाणवली ती.

दीड वर्षांनी सुद्धा परिस्थितीत फारसा काही बदल झाला नव्हता. श्री चे प्रयत्न जारी असले तरी ऑइल अँड गॅस सेगमेंटचा सेल्स चा दुष्काळ काही सरला नाही. पुढे दोन तीन महिन्यात श्री ने खूप प्रयत्न केले पण यश काही लाभलं नाही.

शेवटी श्रीनिवास ने डिसेंबर मध्ये स्वतःहून राजीनामा दिला. मला वाईट वाटलं. मी एमडी कडे श्रीची रदबदली करायला गेलो आणि विनंती केली की श्री ला राजीनामा परत घ्यावा यासाठी एमडी ने शब्द टाकावा. मी एमडी ना म्हणालो "श्री स्वभावाने चांगला आहे, त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे, तो सिन्सिअरली प्रयत्न करत होता सेल्स करण्याचा."

एम डी  ने शांतपणे ऐकून घेतलं आणि मला सांगितलं "श्री सोडून चालला आहे, याचं मलाही वाईट वाटतंय. पण माझ्या मते मी त्याला टीम आणि काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण तरीही तो रिझल्ट्स आणू नाही शकला. Understand that good behavior and being positive can not be alternative to poor results. त्याच्या कामात मला काही प्रॉब्लेम वाटले, तो हुशार आहेच पण तरी त्याचं प्रोजेक्शन चुकलं किंवा त्याने जे प्रयत्न सांगितले ते इफेक्टिव्ह नाही ठरले. त्याच्या पेक्षा कमी हुशार लोकांनी केवळ बिझिनेस चा समजून उमजून पाठपुरावा केला आणि गोल्स अचिव्ह केले. Remember, perseverance always beats genius.  त्यामुळे त्याला मी अडवणार नाही. एक माणूस म्हणून मला ही त्याच्या बद्दल आदर आहेच. कदाचित नवीन ठिकाणी तो यशस्वी होईलही. पण इथे तो अयशस्वी ठरला हे सत्य आहे."

एम डी म्हणणं बिनतोड होतं. श्री ला दुःखी मनाने आम्ही सेंड ऑफ दिला.





Sunday 17 May 2020

भानगडी

सालं या करोनावर लस आलीच नाही तर कसल्या खतरनाक भानगडी होतील, नाही?

हात मिळवायचा नाही. फक्त नमस्ते. उराउरी भेट तर लांबची गोष्ट.

फिरायचं असेल तर स्वतःच्या गाडीतून. पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी होईल. ट्रेन मध्ये सेकंड स्लीपर मध्ये एका कुपेत ६ च प्रवासी असतील.  केवढे अगडबंब रस्ते लागतील. गाड्याच गाडया. अहोरात्र. 

हॉटेलिंग बंद. सॉलिड पैसे वाचतील. आणलं तरी टेक अवे. कारोबार (कार-ओ-बार) करावा लागेल. 

क्रिकेट, फुटबॉल स्टेडियम ओस पडतील. उलटं होईल. स्टेडियम च्या भोवती मोठमोठे स्क्रीन्स असतील. आणि त्यात दिसतील ऑनलाईन प्रेक्षक. खेळाडूंना टीव्हीवर नाही पाहायचं तर खेळाडू प्रेक्षकांना टीव्हीत पाहतील. 

मंदिरं ओस पडतील. ऑनलाईन दर्शन फक्त. पेटीत दक्षिणा ऑनलाईन पेमेंट ने. ते काही आपण लोक सोडणार नाही.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी बंद पडतील. वारी, कुंभमेळे झाले तरी प्रातिनिधिक स्वरूपात होतील.


Saturday 16 May 2020

करोनाशी दोस्ती

बस झालं करोनाला घाबरणं. लस येईपर्यंत हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असणार आहे. आणि अशा बऱ्याच साथी येऊन गेल्या आहेत ज्यावर औषध सापडलं नाही आपण त्याच्या बरोबर जगणं शिकलो आहे. कुणास ठाऊक काही चांगल्या सवयी लागतील अन त्या प्रोसेस मध्ये बाकीचे आजार कमी होतील.

सोशल डिस्टंसिंग आणि जरा बरं वाटत नसेल तर गप घरी पडून राहणे हे कळीचे मुद्दे आहेत. त्याबरोबर पर्सनल हायजिन हे महत्वाचं असणार आहे.  लोकांना जास्त भेटाभेटीची भानगड नाही. घर-कामाची जागा-घर इथं फिजिकल अस्तित्व. बाकी सगळ्या गोष्टीवर तिलांजली. गर्दीच्या ठिकाणी तर नकोच नको. करोनाला थोडी कळतं, तुम्ही मंदिरात दर्शनाच्या लायनीत उभे आहेत की मॉल मध्ये गमजा मारताहेत.

आता शासनाने सुद्धा एक पेशंट सापडला तर तीन किमी चा एरिया सील करणं वगैरे भानगडी थांबवाव्या. त्या माणसाची फक्त चौकशी करून तो ज्यांना भेटला त्यांची टेस्ट करावी अन बाकी सोडून द्यावं. आभाळ फाटलं आहे, कुठं कुठं पळणार, पोलीस अन डॉक्टर लोक.

समाजाच्या लोकांनी सुद्धा जरा सद्सद्विवेक बुद्धी जागृत करावी. बिल्डिंग मध्ये एक करोना पेशंट सापडला सगळं संपलं असा आकांडतांडव करणं थांबवावं. हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर वेळेस गुलाबाचं फुल द्यायचं आणि तोच कर्मचारी जर पॉझिटिव्ह आला तर त्याला बिल्डिंग मध्ये परवानगी नाकारायची हा दुटप्पीपणा थांबवावा.

उगं आपले पेशंटचे मोठमोठे आकडे बघून डोकं खराब करून घेऊ नये. बघायचेच असेल तर त्यातून बरे झालेल्या पेशंटचे आकडे बघा, मरणाऱ्या लोकांपेक्षा खूप जास्त आहेत ते.

आपापल्या घरी परत जाणाऱ्या लोकांची काळजी घेऊ यात. विमानातून पुष्प वृष्टी छानच आहे. पण हेलिकॉप्टर मधून फूड पॅकेट्स या लोकांवर टाकायला पण बहुधा तितकाच खर्च येईल, नाही का? योग्य चॉईस करू यात.

चला, एका नवीन जीवन प्रणालीचा अंगीकार करू यात. कुणास ठाऊक करोनाशीच दोस्ती होईल.

आणि एकमेकांना मर्यादेपलीकडे दुखवायचं नाही हा दोस्तीचा नियम आहे.

Friday 1 May 2020

मुक्ती सोपान

आदरणीय मालती ताईंना सप्रेम नमस्कार

करोनाचे साम्राज्य सर्वत्र पसरले आणि वाटले "मुक्ती सोपान काय म्हणते?", कुंदा, माझी धाकटी बहीण कशी असेल म्हणून फोन केला आणि कळले की ती करंदीकर मॅडम कडे, म्हणजे तुमच्याकडे राहायला गेली आहे. जीव भांड्यात पडला. मी खरं तर तिची मोठी बहीण, पण तिला माझ्यापेक्षा तुमचाच आधार जास्त आहे. वेळोवेळी आपण तिच्यामागे सावली म्हणून उभ्या राहता याचे मनस्वी समाधान वाटते.

आमचे वडील कै श्री केशवराव डंक यांनी अनेक गरीब मुलांना आश्रय देऊन शिक्षण दिले. कित्येक गरिबांचे संसार उभे केले. या पार्श्वभूमीवर कुंदाला वृद्धाश्रमात ठेवताना खूप वाईट वाटत होते. तिला आपण कायम आपल्याबरोबर ठेवू शकत नाही या विचाराने मनाला यातना होत होत्या. पण आज ती आपल्या छत्र छायेखाली तिचं जीवन व्यतीत करते आहे यामागे आपला तर चांगुलपणा आहेच आणि वडिलांची पुण्याई सुद्धा आहे असं वाटते. अर्थात कुंदाने सुद्धा मनापासून तिथे काम करून सर्वांचे मन जिंकून घेतले. आलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या मार्गदर्शनाखाली ती व्यवस्थित राहते याचं समाधान मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.

सांगायचं तर आम्हा सर्व बहिणीत ती सगळ्यात श्रीमंताघरी दिलेली. अत्यंत समृद्ध घर होतं तिचं. पण दुर्दैव तिचं, नशिबाचे वासे फिरले आणि ती अक्षरश: एकटी झाली. तिच्यावर अशी वेळ यावी हा काळाचा महिमा पण आपल्याकडे राहून आयुष्याच्या उत्तरार्धात तिच्या आयुष्याला आकार मिळतोय हे पाहून मन भरून येतंय. आज ती आपल्याबरोबर राहून पुन्हा समृद्ध आयुष्य जगते आहे हे पाहून कृतार्थ वाटते.

बरेच दिवस आपल्याशी संवाद साधायचा होता. इतर काळात जगरहाटीमुळे आणि आपल्या कार्यमग्नतेमुळे ते शक्य झालं नाही. करोना मुळे आजकाल वेळ असतो, तेव्हा मनातले विचार शब्दबद्ध केले.

चि कुंदास अनेक आशीर्वाद. तुझी काळजी आता वाटत नाही कारण तुझ्यामागे समर्थ हात आहेत मालतीताईंचे. त्यांचा आधार हा मोलाचा. तू व्यवस्थित राहतेस, पण वडीलकीच्या नात्याने काळजी घे असं सांगावंसं वाटतं. बाकी ठीक. आमच्या सगळ्यांच्या तब्येती छान आहेत.

पुन्हा एकदा साऱ्यांना नमस्कार

कुमुद मंडलिक 

Thursday 30 April 2020

न्यूमरॉलॉजी

न्यूमरॉलॉजी वर फारसा काही विश्वास नाही पण जेव्हा कधी त्याचा विषय निघतो, मला वाटतं की २ आणि ४ या आकड्यांशी माझं फार सख्य आहे. म्हणजे बघा माझा वाढदिवस २४, बायकोचा आणि भावाचा ४, यश चा २, नील चा ११ म्हणजे १+१=२, चुलत भावाचा १३ म्हणजे ४, चुलत बहिणीचा २४, भावाच्या बायकोचा २४, तर बिझिनेस पार्टनरचा २२. माझं पहिलं घर चौथ्या मजल्यावर तर आताचं राहतं घराचा नंबर १३ म्हणजे ४. माझा मोबाईल नंबर आहे xx२२४x ४२x४.

२०१९ साल आमच्यासाठी डेंजर गेलं. ७ जुलै २०१९ ला आमचे चार साथीदार एका अपघातात आम्हाला सोडून गेले.

२०१९ संपताना आम्ही टीम मेट्स गप्पा मारत होतो. पण परत न्यूमरॉलॉजी चा विषय निघाला. मी त्यांना म्हणालो माझ्या साठी २ आणि चार हे आकडे लकी आहेत. तेव्हा २०२० हे आपल्याला भन्नाट जाणार. सगळ्यांनी एकमेकांना हाय फाय दिला.

वर्षाची सुरुवात ठीकठाक झाली. पण फेब्रुवारी मध्ये आम्ही नवीन जागेत शिफ्ट झालो. आणि मार्च महिन्याच्या मिटिंग मध्ये खूप भारी स्वप्नं रंगवली. आणि मार्च २२ ला लक्षात आलं की कंपनी तात्पुरती बंद करावी लागणार. आणि एप्रिल महिना (४) तर भयानक गेला. लॉक डाऊन एक्सटेन्ड झालं, आणि महिना संपता संपता या दोन लोकांची बातमी, इरफान खान आणि ऋषी कपूर. अजून काय वाढून ठेवलं आहे उरलेल्या वर्षात देव जाणे.

आता परत कधी मी २ आणि ४ हे आकडे माझ्यासाठी लकी आहेत अशी फुशारकी मारणार नाही. 

Tuesday 28 April 2020

डी ऍक्टिव्हेट

चार एक वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा अकौंट डी ऍक्टिव्हेट केलं तेव्हा पार अगदी इमोशनल वगैरे पोस्ट टाकली होती. आज ती पोस्ट वाचली तेव्हा हसू येतं. डी ऍक्टिव्हेट चं टॅब दाबताना पार अगदी शेवटल्या सिगारेटचं थोटूक ज्या भावनेने फेकतो तसं झालं होतं. नंतर मग सवय लागत गेली डी ऍक्टिव्हेट करण्याची आणि परत ऍक्टिव्हेट करण्याची. आणि हा काळ अगदी एक आठवड्यापासून ते दोन-अडीच महिन्यापर्यंत आहे. पूर्वी लोकसुद्धा वेलकम बॅक वगैरे म्हणून स्वागत करायचे. आता कुणी ते पण म्हणत नाही. आली परत कटकट असं कुणी म्हणत असावेत कदाचित. पण आता ती एक एसओपी झाली आहे. ज्या भावनेने पोस्ट करतो त्याच भावनेने डी ऍक्टिव्हेट पण करतो.

अधून मधून डी ऍक्टिव्हेट होण्याची काही कारणे आहेत. एक म्हणजे, हा लॉक डाऊन पिरियड सोडून द्या, पण दिवसात दीड एक तास फेसबुकवर व्यतीत केला जातो. (माझ्या बऱ्याच नातेवाईकांना मी चोवीस तास फेसबुकवर पडीक असतो असं वाटतं). जेव्हा मी पहिल्यांदा डी ऍक्टिव्हेट केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फेसबुक डी ऍक्टिव्हेट केल्यावर सुद्धा कुठल्यातरी दुसऱ्या कामात अडकलेला असतो. आता या लॉक डाऊन मध्ये सुद्धा मी एक आठवडा डी ऍक्टिव्हेट होतो आणि त्या काळात मी अनेक इतर कामं केली. म्हणजे थोडक्यात फेसबुकवर जो वेळ जातो तो दुसऱ्या कशाला कमी प्रायोरिटी दिल्यामुळे काढता येतो. ज्या वेळेस म्हणून असं लक्षात येतं की आता फेसबुकपेक्षा फार महत्वाची कामं नाही आहेत तेव्हा मग मी परत येतो.

दुसरं म्हणजे मी जे लिहितो ते बहुतांशी स्वानुभवावर आधारित असतं. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात जर काही घडलं की ज्यामुळे मी लो फील करत आहे तेव्हा मला फेसबुकवर यायला आवडत नाही. कारण माझ्याकडे शेअर करण्यासाठी मालमसाला नसतो. त्यामुळे मी इथे फेसबुकवर आनंद मिळवायला वगैरे येत नाही तर माझी मन:स्थिती जेव्हा आनंदी असेल तेव्हा येतो. सहसा इथे काहीही फालतू चालू असेल तरी त्याचा स्वतःवर सहसा परिणाम करून घेत नाही, मग ते राजकारण असो, धार्मिक/जातीय वाद असो वा ट्रेंड असो. डी ऍक्टिव्हेट असताना जर काही शेअर करण्याजोगं घडलं तर मी ब्लॉग वर लिहून ठेवतो आणि परत आल्यावर शेअर करतो.

आता शेवटचा प्रश्न उरतो ते अकौंट लॉग आऊट करून ठेवता येत नाही का? इथे मात्र माझी सपशेल हार आहे. म्हणजे ते काही लोकांना नॉन व्हेज बंद करण्यासाठी श्रावण महिना लागतो तसं मला फेसबुकवर न येण्यासाठी डी ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपले उदय जोशी सर किंवा डॉ देशपांडे कसे डी ऍक्टिव्हेट न होऊनही फेसबुकवर येत नाही, ते अजून जमलं नाही.

कुणास ठाऊक काही वर्षाने ते ही जमेल आणि तेव्हा परत ही पोस्ट वाचताना मला हसू येईल. 

कृतीशील निर्णय

तसं पाहिलं तर मी कमालीचा भित्रा माणूस. आणि भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तसं काही विचित्र घडलं की माझी विचारधारा मृत्युपाशी जाऊन थांबते. पण असला भित्रा स्वभाव असला तरी कृती करायची म्हंटली की ही भीती पळून जाते. करोना चं नाटक चालू झालं तेव्हा मी कंपनीत सांगितलं की " हा व्हायरस आला आहे आणि आपल्या हातात फक्त त्यापासून सावधान राहणं आहे आणि आपल्यामुळे तो दुसऱ्याला होणार नाही हे बघणं आहे. त्यामुळे भीती आहे पण घाबरून काम करणं बंद वगैरे असं करू नका तर त्या भीतीवर मात करण्यासाठी काही कृती शोधा आणि कृतिशील रहा." अर्थात बहुतेकांना ते पटलं नाहीच, काहींनी पटल्यासारखं दाखवलं पण कृती शून्य. अर्थात मला कुणाला कमी लेखायचं नाही आहे कारण या आजाराची व्याप्ती मोठी आहे. तेव्हा हा संदर्भ घेऊन मी  लिहिणार त्यावर विचार नक्की व्हावा असं माझं आवाहन आहे.

व्हायरस जेव्हा आला तेव्हा मी काळजी काय घ्यायची हे लोकांना सांगितलं आणि त्यांना हे ही सांगितलं की लागलं तर मी त्यांची कंपनीत राहायची व्यवस्था करेन. सगळ्यांनी मनातून तो उपाय उडवून लावला. गंमत म्हणजे कंपनी चालू करण्यासाठी शासनाने जी नियमावली आणली, जी प्रत्येकाला प्रत्यक्षात आणायला अवघड आहे, त्यात हा एक नियम आहे की कंपनीने शक्य झाल्यास लोकांची कंपनीत राहायची व्यवस्था करावी.

तो व्हायरस, त्याची काम करण्याची पद्धत लक्षात आल्यावर मी मनातून घाबरलो असलो तरी लॉक डाऊन मध्ये जेव्हा कधी म्हणून गरज म्हणून काम करायची वेळ आली तेव्हा सर्व काळजी घेऊन बाहेर पडलो. हे कुणाला आततायीपणाचं वाटेल. पण चार दिवस आपलं घरच्या अन्नदान कार्यक्रमासाठी, त्यांनतर तीन दिवस कंपनी चालू करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी (हा एक पोस्टचा विषय आहे), मग कंपनीतील अर्जंट काम संपवण्यासाठी दहा दिवस अन त्याबरोबर आपलं घर बरोबर ग्रोसरी किट्स वाटण्यासाठी. या दिवसात एक दिवस त्या नॉन करोना पेशंटला लिफ्ट पण दिली.

जरी घाबरट असलो तरी मी विचार केला:

- जी काही कामं आली  ती "अबाऊव्ह सेल्फ" अशा प्रकारची होती. कारण या कुठल्याही कामात माझा वैयक्तिक स्वार्थ नव्हता.

- व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून मेडिकल स्टाफ काळजी घेतोय आणि दररोज कामावर जातोय तर आपण योग्य ती काळजी घेऊन काम का नाही करू शकत?

- ज्या लोकांची इम्यून सिस्टम चांगली आहे त्यांना हा व्हायरस त्रास देत नाही आणि इम्यून सिस्टम चांगले असण्याचे निकष गेली अनेक वर्षे पाळतो आहे.

- जरी संसर्ग झाला तरी पेशंटचं बरं होण्याचं प्रमाण हे ८५% आहे. मग आपण त्या ८५% असू अशी आशा बाळगण्यात काय चूक आहे.

या विचारांनी माझ्या भीतीवर मात केली अन काम केलं.

हातातली कामं उरकली म्हणून परत गेले चार दिवस लॉक डाऊन मध्ये आहे. पण महत्वाचं काम आलं तर परत कामाला बाहेर जाईल.

भीती जर आपल्याला निष्क्रिय बनवत असेल तर ती विजयी होईल, पण मनातील भीतीमुळे जर आपण काही कृतीशील निर्णय घेत असू अन तिची अंमलबजावणी करत असू तर भीतीवर आपण विजय मिळवू.

मी दुसरा पर्याय निवडला.

(यांनंतरही जर मला करोनाचा संसर्ग झालाच तर आला मोठा दीडशहाणा अशी भावना जर तुमच्या मनात आली तर माझा नाईलाज आहे.)



Monday 27 April 2020

सरकारी जॉब

डिप्लोमा होताना वडील सारखे म्हणायचे की हे संपलं की  मएसईबी मध्ये जनरेशन ला लावून टाकतो. कसाबसा मला डिप्लोमा ला फर्स्ट क्लास मिळाला आणि आईबाबांच्या मनात मला बीई करण्याचं आलं आणि सांपत्तिक स्थिती फार चांगली नसताना त्याकाळी नवखं असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेज मधून बीई झालो. तेव्हाही बाबांच्या मनात होतं की मी एमएसईबी मध्ये जनरेशन ला जॉईन व्हावं. पण माझ्या डोक्यात "करेन तर प्रायव्हेट नोकरी" हे खूळ कुठून डोक्यात आलं हे मला आजपर्यंत उमगलं नाही आहे. आणि तो पगडा इतका की माझा मित्र मंगेश पाठक केंद्र सरकारच्या सी आय आर टी या डिपार्टमेंट ला लागला तेव्हा मी त्याला ही सरकारी नोकरी सोडून खाजगी नोकरी कर असा न मागता बिनकामाचा सल्ला द्यायचो. 

पुढे ज्या पद्धतीने मंगेशची सी आय आर टी मध्ये कारकीर्द फुलत गेली, त्याने मला त्याचा अभिमान तर वाटतोच पण आज पन्नाशीत जेव्हा मी माझ्या वागणुकीचा विचार करतो तेव्हा मला हसायला येतं. शासकीय नोकरीला कमी लेखण्याची माझी विचारधारा किती तकलादू होती हे आज प्रकर्षाने जाणवतं. 

प्रायव्हेट जॉब आणि सरकारी जॉब याची तुलना करताना काय गमावलं आणि काय कमावलं याची जर गोळाबेरीज केली तर उत्तरात फार तफावत येत नाही. किंबहुना मूर्त आणि अमूर्त गोष्टींचा विचार केला तर चिमूटभर श्रीमंतीच्या बदल्यात मूठभर मेंदूची शांतता आणि दोन हाताच्या कवेत मावतील इतके आयुष्याचे सुनहरे क्षण मी मिस केले असं बऱ्याचदा वाटतं.  प्रायव्हेट जॉब आणि पर्यायाने मी व्यावसायिक झालो पण या प्रवासात मी जे टक्के टोणपे खाल्ले, धोके पत्करले ते सरकारी नोकरीत करावे लागले असतेच असं वाटत नाही. 

याबाबत माझं आणि माझा मित्र संतोष देशपांडे यांची नेहमी चर्चा होते. बी एस एन एल मध्ये चौतीस वर्षे नोकरी करून त्याने नुकतीच व्ही आर एस घेतली. त्याला माझ्या धंद्याबद्दल फार अप्रूप आणि कौतुकही. खुल्या मनाने तो बोलून पण दाखवतो. पण जेव्हा माझे टेन्शन्स आणि आडवेतिडवे ट्रॅव्हल प्लॅन बघून काळजी पण व्यक्त करतो. आणि असंही म्हणतो की आम्ही एकमेकांचे रोल चेंज केले तरी तितक्याच सहजतेने स्वीकारले पण असते. सरते शेवटी आम्ही दोघेही एकच निष्कर्ष काढतो, जे आयुष्य आपण निवडलं आहे त्याचं उत्तरदायित्व आपल्यावर आहे. ते इमानेइतबारे जगावं, एन्जॉय करावं. एकमेकांना चिअर्स करत पेग संपवतो आणि तो त्याच्या मार्गाला जातो अन मी माझ्या. 

Friday 24 April 2020

सापेक्षता

टाटा या ग्रुप बद्दल माझ्या मनात तीव्र आदर आहे. त्यांनी देशात आणलेली औद्योगिक परिवर्तन. टाटा एअरलाईन्स, (जी नंतर एअर इंडिया झाली), टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा केमिकल, टीसीएस, इंडियन हॉटेल्स अशा अनेक कंपन्या त्यांनी चालू केल्या आणि नावारूपाला आणल्या. टी आय एस एस, आय आय एस सी सारख्या संस्था चालू केल्या. टाटा ट्रस्ट तर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली. जे आर डी टाटा यांचा फोटो आमच्या शॉप फ्लोअर ला लावला आहे. जर मी टाटा च्या कुठल्याही कंपनीत लागलो असतो तर एक लॉयल एम्प्लॉयी म्हणून नाव काढलं असतं.

पण असं असलं तरी ते तसे आहेत म्हणून मी त्यांचे प्रॉडक्टस विकत घेईल याची शाश्वती नाही. किंबहुना माझ्याकडे टाटा ची कुठलीही कार नाही आहे आणि ना मी तिचं फारसं कधी कौतुक केलं आहे. टाटा ग्रुप ची कंपनी म्हणून मी फक्त विस्तारा ने प्रवास करेल असा पण सुद्धा कधी केला नाही. अगदीच नाही म्हणायला आम्ही अशात टीसीएस ची इऑन नावाची इआरपी वापरतो, पण ती टाटा ग्रुप ची आहे म्हणून नव्हे तर तिची उपयुक्तता सिद्ध झाली, त्यामुळे वापरतो. टाटा नॅनो न चालण्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तिची क्वालिटी आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस चांगली नसावी असा एक माझा अंदाज आहे. पंचतारांकित हॉटेल्स मध्ये राहायचा योग फार कधी आला नाही, पण जेव्हा आला तेव्हा राहील तर इंडियन हॉटेल्स मध्येच असं कधी ठरवलं नाही. याचं कारण माझ्या सापेक्ष त्यांच्या प्रॉडक्टस किंवा सर्व्हिसेस ची क्वालिटी आणि रेट हे मला इम्प्रेस करू शकले नसावे.

कुणाचं चांगलं वागणं हे हे त्यांनी दिलेल्या प्रॉडक्ट क्वालिटी ला ऑप्शन असू शकत नाही.

आमच्या बिझिनेस मध्ये आम्ही भरपूर गोष्टी कस्टमर बरोबर शेअर करतो. आणि माझे किंवा माझ्या बिझिनेस पार्टनर चे त्यांच्या बरोबर अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तरीही काही मोजके कस्टमर आमच्याकडे आजकाल काम पाठवत नाही. आमचा एक सेमिनार आहे "व्हाय डू स्पिंडल्स फेल अँड हाऊ टू प्रिव्हेंट इट". आमच्या बिझिनेस च्या रिलेटेड आम्ही खूप गोष्टी सांगतो. हेच कस्टमर तिथं कौतुक करतात, टाळ्या वाजवतात पण बिझिनेस देत नाही. कदाचित आमची क्वालिटी, रेट किंवा आफ्टर सेल्स ग्राहकाला पटत नसावी.

इतकं काय पण इथं मी फेसबुकवर वेगवेगळे अनुभव शेअर करतो. माझ्या जवळच्या लोकांना माहित असतात ते. पण मला लोकांनी त्या गोष्टीमुळे स्वीकारावं असं जर मनात ठेवलं तर तसं प्रत्यक्षात होत नाही. त्यांना स्वतःच्या अपेक्षा असतात, त्यांची जर पूर्तता केली नाही तर ते सरळ बाय करतात. लोकांच्या गुड बुक्स मध्ये रहावं या उद्देशाने जर वागणं ठेवलं तर पदरात काही पडत नाही.

त्यामुळे तुमचं चांगलं वागणं, लोकांना मदत करणं हे आपल्या जागी ठीक. ते तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करता हा भाव हवा. जर दुसऱ्यासाठी करतो आणि म्हणून दुसर्यांनी मला स्वीकारलं पाहिजे असा भाव ठेवला तर निराशा वाट्याला येते.

त्यामुळे सापेक्षता हा सिद्धांत भौतिकशास्त्रातच नव्हे तर भौतिक जगण्यात सुद्धा चपखल लागू होतो.
  

Thursday 23 April 2020

चीन

ज्या देशांनी चीन मध्ये खूप गुंतवणूक केली आहे, ते देश चीन मधून पाय काढता घेण्याच्या विचारात आहे, आणि उत्पादन करण्यासाठी ते नवीन देश शोधत आहेत अशा खूप बातम्या धडकत आहेत. भारताला या बाबतीत नक्कीच संधी आहे. आणि का नसावी? जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, शिक्षित तरुणाई उपलब्ध आहे, आपली अकौंटिंग पद्धत जगमान्य आहे आणि बँकिंग पद्धत ही तगडी आहे, आपलं कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हे वर्ल्ड क्लास आहे, लेबर कॉस्ट ही चीनच्या १/३ आहे.

तरीही आपण सध्याच्या परिस्थितीत जगाचा उत्पादक म्हणून चीनला सशक्त पर्याय होऊ शकतो का यावर प्रश्नचिन्ह उभं रहावं अशी परिस्थिती आहे. 

साम्यवादी देश आणि अन एथिकल वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार असली तरी चीनने गेल्या तीन दशकात एक उत्पादक म्हणून प्रचंड मुसंडी मारली आहे. आणि त्याला पर्याय म्हणून भारतच नव्हे तर इतर कुठल्याही देशाला उभं राहणं ही अशक्य नसली तरी प्रचंड अवघड बाब आहे. अगदी भारताचा विचार केला तर तब्बल ८७ बिलियन डॉलर्स चा द्विपक्ष व्यापार आहे, त्यापैकी ७० बिलियन डॉलर्सच्या गोष्टी आपण चीन कडून विकत घेतो जे आपल्या एकूण आयातीच्या १३.७% आहे. भारतात इतर देशातून आयात केलेल्या गोष्टीत काही चायनीज प्रॉडक्टस असतात. एकूण गोळाबेरीज करता वार्षिक १५० बिलियन डॉलर्सच्या आसपास आपण चायनीज प्रॉडक्टस आयात करत असू. आणि यात मोबाईल फोन्स, व्हाईट गुड्स, सॉफ्ट टॉईज, ऑटो पार्ट्स, पॉवर जनरेशन इक्विपमेंट, फार्मा मटेरियल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याला पर्याय उभा करायचा असेल तर ही एखाद दोन वर्षाची बाब नसून पुढचं पूर्ण दशक भारताने अनेक पातळीवर बाब केलं तर ते होण्याची शक्यता असेल. 

जेव्हा कधी म्हणून चीन ने भारताच्या विरुद्ध कुरापत केली की देशभक्तीचा पूर ओसंडून वाहतो. यावेळेस तर भारतच नव्हे तर पूर्ण जगात चीनच्या विरुद्ध वातावरण तयार झालं आहे. पण असं असलं तरी चीनने आपले पाय अनेक देशात भक्कम पणे नसले तरी पसरले आहेत. नुकतं पीपल बँक ऑफ चायना ने एच डी एफ सी मध्ये १. ७५ कोटी शेअर्स घेतल्यावर आरडाओरड झाली. पण जी एम जी हेक्टर गाडी आपण कौतुकाने मिरवतो ती चायनीज कंपनी आहे आणि तिने भारतात रु ५००० कोटी ची इन्व्हेस्टमेंट केली आहे. चीनमधल्या ऑटो कंपनीने, तळेगाव स्थित जी एम प्लांट विकत घेतला आहे. ज्या झूम ची सध्या हवा आहे तिचा फाउंडर जरी अमेरिकन नागरिक असला तरी तो चायनीज आहे.

"जगासाठी उत्पादक देश" ही बिरुदावली मिरवणं हे अभिमान वाटण्याजोगं आहेच पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. देशाच्या तिन्ही घटकांनी स्वतःमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. आणि ते तीन घटक म्हणजे वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि देश/शासनाच्या पातळीवर हे बदल आवश्यक आहेत.

वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर देशातील प्रत्येक माणसाने विचार करण्याच्या पद्धतीत बदल आणणं गरजेचं आहे. "मी" "माझा" या  पलीकडे विचार, गुणवत्तेची पातळी आणि वैयक्तिक उत्पादकता अनेक पटीने वाढवणे ही येणाऱ्या काळाची गरज असणार आहे. आणि या गोष्टींबरोबर मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली अंगीकारली तर ह्या येणाऱ्या संधीचं सोनं करत देशाचा सर्वांगीण विकास होण्यात हातभार लावण्याची संधी प्रत्येक भारतीयाला मिळेल यात काही शंका नाही.

एकेकाळी उद्योजकतेचं माहेर असणाऱ्या या देशाच्या समाजाची आजची संरचना मात्र आज उद्योगपूरक आणि नावीन्यतेचा ध्यास धरणारी नाही आहे. इतिहासाच्या बाष्कळ प्रेमात बुडलेला आणि धार्मिक व जातीयवादात अडकलेला हा समाज नाविन्यपूर्ण कल्पनेचा उदोउदो करत नाही. आणि एखादी कल्पना अपयशी ठरली तर तिच्या निर्मात्याला आपण गुन्हेगार समजतो. धोका पत्करणे, त्याला काउंटर करण्यासाठी प्लॅनिंग करणे आणि सरतेशेवटी धोका घेऊन मारलेल्या उडीतून सही सलामत बाहेर पडणे या प्रोसेस ला समाज शहाणपण म्हणून स्वीकारत नाही. तर दुसऱ्या बाजूला माझ्यासारखे एस एम इ उद्योजक सुद्धा जगाच्या दृष्टीने आपल्या देशाचा ब्रँड हा स्वीकारार्ह नाही हे लक्षात घेत नाही आणि तो करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलत नाही.

आणि सरतेशेवटी एक देश म्हणून उद्योजकतेला प्रमोट करण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. व्यवसाय पूरक देश म्हणून गेल्या काही वर्षात आपण जबरदस्त प्रगती केली आहे. इंडेक्स च्या लिस्ट वर १३० च्या आसपास असणारा आपला देश ६३ वर येऊन पोहोचला आहे. पण चीन सारखी अद्भुत उत्पादकता आणायची असेल तर व्यवसाय पूरकता अजून वाढवायला हवी. छोटे इंडस्ट्रियल पार्क्स, फायनान्स ची उपलब्धता, कस्टम्स आणि इतर टॅक्स स्ट्रक्चर, डिजिटल डिव्हाइड कमी करणे या क्षेत्रात प्रचंड सुधारणा अपेक्षित आहे. या करून व्हायरस प्रकरणात ज्या पद्धतीने व्यावसायिकांना इंस्ट्रक्शन्स देण्यात आल्या त्या अनाकलनीय होत्या. शासनाने उद्योगाला सहकारी म्हणून बरोबर घ्यावं लागणार आहे. मनुष्यबळ विकास आणि शिक्षण या दोन्ही मंत्रालयाला गृह किंवा संरक्षण मिनिस्ट्री इतकं महत्व असणं ही भविष्याची गरज आहे.

थोडक्यात उद्योजकतेच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांनी, म्हणजे वैयक्तिक/सामाजिक/राष्ट्रीय, आपल्या स्किलसेट्स ला धार लावण्याची गरज आहे. मागे सुद्धा मोबाईल फोन उत्पादन करण्याचा मोठा ड्राइव्ह आला होता. पण कार्बन किंवा मायक्रोमॅक्स चं निशाण फार जोमाने फडकताना दिसत नाही. किंवा तो १००० रु चा मोबाईल वाला पण गायब झाला आहे.

संधी दाराशी आली आहे. आणि त्याबद्दल आशावादी असावं अशी जागतिक परिस्थिती पण आहे. तिचं सोनं करण्यासाठी सनातनी काम करण्याच्या पद्धती, रुढात्मक विश्वास आणि तथाकथित शहाणपणा याला तिलांजली देऊन एक नवीन भारताची चळवळ उभारावी लागेल. अन्यथा ही चीन विरोधी लाट एक बुडबुडा म्हणून विरून जाईल आणि दोन वर्षानंतर परत आपले लोक काही पैसे वाचतात म्हणून घरं सजवण्यासाठी चीन वरून फर्निचर कंटेनर भरून आयात करतील.












Wednesday 22 April 2020

Revised

A lot has been discussed about the countries who had invested significantly in China now planning to move out and shift their manufacturing units in other countries.  Among the top contenders, India is a prime choice and rightly so. India is the largest democratic country in the world, the average age being just 26. The youth is definitely talented, our accounting practices are accepted worldwide and we have robust banking system. We have a fairly good communication infrastructure, our labour cost is still less than that  of China and we practice  of frugal work habits..

 Having said all this, we need to analyse , strategies and have a definitive road map  to shoulder this responsibility. China has maintained  the top  position   for close to three decades and practically is the  super power of the world. China has certainly eradicated poverty of major section of society, in spite  of being a Communist country,  not to mention the unethical work practices

It would be a tough task, though not impossible for all countries to replace China as a major supplier to the world. If we consider only India its bilateral trade is close $ 87 Bn. Out of which China exports $70 Bn worth goods to India which is close 13.7% of total imports. Can we simply stop that and develop products indigenous? Other than this the products which are imported from other countries carry some or the other Chinese sub assembly or part. In short directly or indirectly we must be importing more than $150 Bn worth of Chinese goods. And these imports are in varied range of products like soft toys, sports goods, white goods, automobile parts, pharma sector, solar panels, household items, mobile phones etc

Our patriotic emotions surge everytime  China does something against the interest of India, We demand the Chinese products be banned. Remember the incidents of China helping Pakistan few years ago, or their skirmish  with Indian soldiers on North East border? This time emotional quotient against China is very high all across the globe .

It is practically impossible to immediately stop trade with China,  and create supply chain as alternative to it. Most of the Chinese companies have globally set up their establishments .There was an uproar when The People Bank of China bought 1.75 Crores of shares of HDFC. But we should not forget that MG Hector is Chinese company who invested Rs 5000 crores in India. The car is a matter of pride and a status symbol among people who have bought it. Clearly the emotions are misplaced and we are giving out confused signals.  Another Chinese company has already bought the  Talegaon GM plant at an undisclosed amount. Zoom, the app, which , nowadays has become very popular, to hold all our video meetings,  is founded by Eric Yuan, a Chinese, now an American and Chinese nationalilty

I think it is a mammoth task. We need to work on the fundamentals and different verticals as individuals, as a Society and at the national/government level. All this would require radical changes. Given to understand the scale of opportunities it would be worth bringing about the changes.

As individuals, we need to evolve as better citizens and think for the betterment of the society and the Nation, above everything. We need to inculcate the qualities of higher ethics, quality standards, higher productivity and make excellence a necessity. But the fact is that majority of us are far behind the average standard of world on these aspects Along with a strong set of values. we can certainly contribute in accelerating growth and capturing this new envisaged opportunity.

Once known as a very entrepreneurial society, we now rarely encourage innovation or even failures. We discard people, not their ideas leading to a complete dearth of new ideas. We find it difficult leaving our comfort zones.  The ideas which  worth pursuing should be propelled in to scalability. And there would be failures. As a society, are we going to stop looking at failures as crime.? One can list hundred of Chinese companies whose individual production numbers are equivalent to India's national production. We need to have a better social eco system to take risk, mitigate risk and eventually de risk it. Business owners, particularly SME segment, should work on improving brand value of our country .India as a country is not yet very trusted brand for deliverance.

Our government can be more proactive towards  business owners. India has progressed extremely well on ease of doing business from the rank of at 130, today we stand at 63. Is that enough to capture the opportunity? SMEs who contribute 45% of total GDP and 40% of total exports are at dismay of receiving support on various aspects. Small industrial parks, quick availability of finance, easing out customs procedures are few of the areas of improvements. The rules regulations and procedures can be more user friendly. This will encourage a lot of people to become entrepreneurs. The Govt could also guide businessmen to choose the right country as business partners. China, better known as dragon, is already spreading its voracious legs in India. In the process of curbing imports from China, it should not happen that Indian soil is used by Chinese companies and bring their unethical work practices.

As individuals/society/government, we should  sharpen our skills  to grab this opportunity. We have lost quite a few opportunities earlier.A few start -ups did well, however could not sustain,. We need to evaluate where things went wrong and execute  remedial actions. Our H,R  and education ministry should become more proactive and people friendly.

I strongly believe that we as a nation  the country need  to challenge conventional work practices, beliefs and wisdom across pyramid of country. Else our patriotism will be restricted to sporadic events.

As I conclude, I wish to state that I am definitely optimistic and do believe that we are capable of becoming a globally acknowledged country for international business.

Tuesday 21 April 2020

Are we ready to capture opportunity?

A lot has been talked about countries who invested heavily in China are planning to move out of China and they are looking for different lands to set their manufacturing units. Out of few countries, India is certainly top contender. And why not? Finally, India is the largest democratic country in the world, it has got young talent available in ample, our accounting practices are accepted world wide and we have robust banking system, we have fairly good communication infrastructure, our labor cost is still 1/3rd of China and we are habitual of frugal work practices.

Having said all this, are we ready as country to shoulder this responsibility of being manufacturing hub of rest of the world? Indeed, China has carried this tag for close to three decades and practically became super power of the world. Keeping aside China's image being communist country, it has certainly eradicated poverty of major section of society.

At large its really tough task to replace China as a supplier to the world. And this is true not only for India but rest of the countries as well. If we take case of India alone, its bilateral trade is close $ 87 Bn. Out of which China exports $70 Bn worth goods to India which is close 13.7% of total imports. Can we simply stop that and develop products indigenous? Other than this the products which are imported from other countries carry some or the other Chinese sub assembly or part. In short directly or indirectly we must be importing more than $150 Bn worth of Chinese goods. And these imports are in varied range of products like soft toys, sports goods, white goods, automobile parts, pharma sector, solar panels, household items, mobile phones etc

Whenever, China did something wrong against the interest of India, there was wave of patriotism in India of banning Chinese products. It did happen when China helped Pakistan few years back or they fought with Indian soldiers on North East border. This time emotional quotient against China is very high not only in India but across world. But is it really possible stop getting Chinese products and create supply chain as alternative to it. Another fact is that Chinese companies have already set up their establishments not only in India but across world. There was lot of hue and cry when The People Bank of China bought 1.75 Crores of shares of HDFC. But we should not forget that MG Hector is Chinese company who invested Rs 5000 crores in India and many of our friends have bought its car as a matter of pride. Another Chinese company have already bought Talegaon GM plant at undisclosed amount. Zoom on which we are holding our meeting these days is promoted by Chinese, though he is American national today,

As per me, its a mammoth task. And probably as a country we need to work on fundamentals. We need to change working pattern at all three levels. One is of course at individual level, other is at society level and third at national or government level.

If we talk about individual level, every Indian needs to change its thinking pattern. He or she should be obsessed by only thought of eradicating poverty of our country and one should consider him/herself as a soldier on this mission. Thinking above self, passion for deliverance of quality product and exhibiting very high productivity are the essential ingredients of individual personality. And most of the working class is far behind the average standard of world on these aspects. If we inculcate these qualities along with strong value system, we can certainly contribute in accelerating growth and capturing this new envisaged opportunity.

Once a very entrepreneurial society, we have very poor social structure today for business with innovative mindset. Neither we encourage innovation at household nor at educational institutes or nor at banking segments. If for some reason an idea does not work, we scrap the person who suggested idea. Under the pretext of frugality, we are confined to make prototypes which has natural death as there is no scalability thinking.  It should  become national movement that ideas which are worth pursuing should be propelled in to scalability. And there would be failures. As a society, are we going to stop looking at failures as crime.? One can list hundred of Chinese companies whose individual production numbers are equivalent to India's national production. Do we have social Eco system to take risk, mitigate risk and eventually de risk it.? Business owners, particularly SME segment, should work on improving brand value of country as such. India as a country is not yet very trusted brand for deliverance. How other countries are perceiving India as a country is to be surveyed and benchmark standards are to be set at national and then down line every individual level.

Our government needs to change its treatment to business owners. India has progressed extremely well on ease of doing business from the rank of at 130, today we stand at 63. Is that enough to capture the opportunity? SMEs who contribute 45% of total GDP and 40% of total exports are at dismay of receiving support on various aspects. Small industrial parks, quick availability of finance, easing out customs procedures are few of the areas of improvements. In recent outbreak of Corona, we have observed ambiguous nature of instructions to start business activity. From getting permission to resume business till starting the unit, instructions and rules were formulated in such a way that business owners gave up resuming business, forget about stimulus package offered by other countries.

All three corners, individual/society/government, should sharpen their skills to grab this opportunity. It is not the case that we did not get opportunity in the past. Few years back, there was a drive to produce mobile phones in India. Where are companies like Karbon, Micromax? Where is a company who came out with Rs 1000 mobile phone? HR Development and education ministry should have equal stature and importance like Home or Defense ministry for next decade.

Just to conclude, the country needs to be shaken only to challenge conventional work practices, beliefs and wisdom across pyramid of country. Otherwise this so called patriotic wave will just create bubbles in the air and two years down the line our friends will run to China to buy furniture for their home decoration just to save few bucks.


Wednesday 15 April 2020

इतिहास

ज्या दैदिप्यमान इतिहासाचे आपण गोडवे गातो त्या इतिहासात असं बऱ्याचदा घडलं आहे की  दोन राजे एकमेकांचे शत्रू असायचे, पण बाहेरचा कुणी दुश्मन आला तर मात्र दोन राजे एकत्र यायचे आणि त्या बाहेरच्या दुष्मनाचा खात्मा करायचे.

तो दुश्मन परत गेला की हे दोन राजे परत एकमेकांवर तलवारी चालवायला तयार व्हायचे.

इतिहासातून या गोष्टी शिकायच्या असतात. नाहीतर आम्ही फक्त, जगाला शून्य दिला, आमच्याकडे पुष्पक विमान होतं असल्या बाता मारण्यात मश्गुल राहतो आणि बाहेरचा अगदी भयानक स्वरूपाचा शत्रू राज्यात येऊन धुमाकूळ घालतोय तरी दोन्ही राजे दररोज रात्री तलवारीला धार लावत असतात अन दुसऱ्या दिवशी वाग्बाण सोडून एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात. या प्रोसेस मध्ये शत्रू आपले अक्राळविक्राळ हातपाय पसरतोय हे या राज्यांच्या ध्यानात पण येत नाही आहे.

राजेहो, तुम्हाला इतिहास नव्याने शिकायची गरज आहे. 

Monday 13 April 2020

चूक

सीन १.

आम्ही नवीन ग्राइंडिंग मशीन घेतली होती. २००६ साली. बिझिनेस मध्ये नवीन, त्यामुळे रिसोर्सेस माहित नाही. आम्हाला ग्राइंडिंग ऑपरेटर ची गरज होती. आम्ही त्यावेळेस ग्राइंडिंग एका टूल रूम मधून करवून घ्यायचो. तिथे एक सतीश नावाचा स्किल्ड ऑपरेटर होता. आणि आमचं सगळं काम तोच करायचा. आम्ही जी मशीन घेतली होती तीच सप्लायर कडे पण होती. आम्हाला रेडिमेड ऑपरेटर नजरेसमोर दिसत होता. आमचा पाय घसरला. आम्ही त्याला आमच्याकडे काम करायला आमंत्रण दिलं.

तो आलाही. पण तीन दिवस काम केल्यावर काय किल्ली फिरली माहित नाही. पण सतीश परत त्या टूल रूम मध्ये गेला. आम्हालाही गिल्ट फिलिंग होतं की आपण आपल्याच सप्लायर चा माणूस फोडला. पण जादू झाली आणि आम्ही त्या गुन्ह्यातून आपसूक मुक्त झालो. त्यानंतर मात्र आम्ही सप्लायर, कस्टमर, स्पर्धक कंपनीतून कुणी माणूस घ्यायचा नाही अशी शपथ खाल्ली. आणि आजतागायत पाळतो आहोत.

सीन २.

मला बंगलोर मध्ये माणूस घ्यायचा होता. खूप शोध घेतला पण बजेटमध्ये बसणारा आणि स्किल सेट असणारा माणूस मिळतच नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर एक सापडला. गिरीश त्याचं नाव. मी त्याला एका संध्याकाळी ऑफर लेटर द्यायला जाणार होतो. त्याच सकाळी माझा अशा कंपनीत कस्टमर कॉल होता जिथे गिरीश ने काम केलं होतं. सहज बोलताना मी तिथे सांगितलं की गिरीश आमच्या कंपनीत बहुतेक पंधरा दिवसात जॉईन होणार आहे.

कस्टमरने मला गिरीश ची सारी स्टोरीच सांगितली. तो कंपनीत कशा चोऱ्या करायचा अन नंतर दारुड्या झाला. मी अजून दोन तीन ठिकाणहून ती कहाणी खरी असल्याचं कन्फर्म केलं. लाँग टर्म मध्ये फसलो असतो, मी जर त्याला घेतलं असतं  तर. पण जादू झाली अन मी त्या प्रॉब्लेम मधून आपसूक मुक्त झालो.

सीन ३.

एक चायनीज स्पिंडल कंपनी आहे. शिरस्त्याप्रमाणे त्यांचे स्पिंडल खूप स्वस्त. आणि त्या प्रकारचे स्पिंडल आमच्या रेंज मध्ये नव्हते. काही भारतातले कस्टमर आमच्या खूप मागे लागले की त्यांची एजन्सी घ्या. आमच्या रेंज मध्ये त्यांचे प्रॉडक्टस नव्हते मग त्यामुळे मी पण विचार केला की असू द्यावी चायनीज कंपनीची रेंज आपल्या बास्केट मध्ये. भरपूर मेलामेली झाली. त्यांनी आमची कंपनी ऑडिट करायचं ठरवलं. २५ डिसेंबर २०१९ ला या चायनीज कंपनीचे लोक आमचं ऑडिट करायला पुण्यात येणार होते. मी पण पूर्ण तयारीत होतो.

२५ डिसेंबर ला सकाळी चायनीज कंपनीचा मला फोन आला. त्यांनी बंगलोर मध्ये कुठल्या दुसऱ्या कंपनीला एजन्सी दिली आणि आता पुण्याला येत नाही म्हणाले. मी त्यांना म्हणालो की तुम्ही हीच गोष्ट पुण्याची माझी कंपनी बघून, ऑडिट करून सांगू शकत होते. भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम मधून मी इथेही आपसूक मुक्त झालो.

असे अनेक किस्से आहेत. मी काही तरी चूक वागायला जातो, पण विधात्याच्या मनात काही वेगळं असतं, आणि ती चूक काही माझ्याकडून घडत नाही.

Saturday 11 April 2020

करोना विरुद्धची लढाई

करोनानंतर बिझिनेसचं स्वरूप काय असेल याबाबत बरेच तर्क वितर्क चालू आहेत. मी स्वतः याबाबतीत खूप आशावादी आहे. अन त्याचं कारण माझा या विषयावर खूप अभ्यास आहे अशातला भाग नाही आहे. मी फक्त इतिहासाचा संदर्भ घेतोय.

माझ्या माहितीत तीन चार अशा घटना आहे की ज्याने एखादा देश किंवा सारं जग ढवळून काढलं. त्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे येणारे काही आरिष्ट आर्थिक स्वरूपाचे होते तर काही अगदीच विध्वंसक नेचरचे होते.

१९१८ साली एक फ्लू आजाराने साऱ्या जगाला वेठीला धरलं होतं. १९३० साली अमेरिकेत ग्रेट डिप्रेशन आलं होतं. १९३८ ते १९४५ साली दुसरं महायुद्ध झालं. २००० साली ११/०९ झालं. आणि २००८ साली सब प्राईम मुळे जगाच्या अर्थ व्यवस्थेला हादरे बसले. जपान मध्ये काही वर्षांपूर्वी त्सुनामी आली.

तुम्ही जर इतिहासातील या घटनांचा धांडोळा घेतला तर प्रत्येक घटनेनंतर जग किंवा देश अधिक जोमाने कामाला लागलं आणि असंख्य चांगल्या गोष्टी घडल्या.

उदाहरणासाठी आपण दुसरं महायुद्ध घेऊ यात. कारण या महायुद्धात आतासारखं सारं जग ओढलं गेलं होतं. अर्थात करोनाविरुद्ध लढाई बऱ्याच देशांनी लढायची आहे. पण १९४५ ला दुसरं महायुद्ध संपलं आणि जगातले बरेच देश हे संपन्नतेच्या मार्गावर लागले. अमेरिका ने ग्रेट डिप्रेशन नंतर कात टाकली आणि दुसऱ्या महायुध्दानंतर साराच युरोप आणि त्यातल्या त्यात जर्मनी आणि एशियातील जपान हे देश प्रगतीच्या घोड्यावर सवार झाले. या दुसऱ्या महायुद्धानंतर जगानेच एकंदरीत युद्ध या प्रकारचा धसका घेतला आणि आज ७५ वर्षे झालीत पण तितकं व्यापक आणि विध्वंसक युद्ध झालं नाही. करोना प्रकार तितका विध्वंसक होईल का तर कदाचित आर्थिक बाबीवर होईल पण मनुष्य हानी तितकी होणार नाही असं वाटतं. नव्वदीत आखाती देशात युद्ध झालं पण त्याचं कारण आणि आवाका हा वर्ल्ड वॉर २ पेक्षा छोटा होता.

२००० साली अमेरिकेत ११/०९ झालं. त्यानंतर गेली २० वर्षे दहशतवादाच्या मायनर घटना सोडता अमेरिकेत दहशतवादामुळे मनुष्य हानी झाली नाही.

यावरून लक्षात येईल माणूस हा तसा खूप हुशार प्राणी आहे. तो जर काही संकट फेस केले तर त्याच्या अस्तित्वाची लढाई जोमाने करतो. अर्थात पृथ्वीची ताकद ही माणसापेक्षा खूप जास्त आहे. तिच्या मनात येईल तेव्हा माणसाचं असणं हे काही क्षणात ते नसणं करू शकते. पण माणूस नावाच्या प्रजातीला आपलं अस्तित्व राखण्याचा हक्क आहेच.

मला असं वाटतं  की करोना विरुद्धची लढाई मनुष्य प्रजाती निकराने लढेल आणि जिंकेल ही. आणि त्यानंतरही काही अशा गोष्टी उदयाला येतील की ज्याने परत असं संकट किमान पुढचे दोन दशकं येणार नाही आणि आलंच तर त्याच्याशी दोन हात करायची तयारी असेल.

(जगाच्या संदर्भाशिवाय आपल्या भारत देशात पण काही संदर्भ आहेत. पण मी ते मुद्दाम दिले नाहीत कारण त्याला लागलीच आपल्या धार्मिक आणि राजकीय अस्मितेशी सांगड घालून आजकाल धुळवड साजरी होते. म्हणून मी त्याचा उल्लेख टाळला) 

Friday 3 April 2020

प्रकाशमान

टाळ्या वाजवायचं अपील केलं, वाजवल्यासुद्धा. पण तेव्हाही लिहायची इच्छा झाली होती, पण नव्हतं लिहिलं. इतक्या मोठया देशाचे प्रीमियर, आपण काय त्यांना सांगणार? कुठे ते राजा भोज अन कुठे मी गंगू तेली. कधी म्हणून त्यांचं भाषण ऐकलं नव्हतं, आज ऐकलं आणि घोर निराशा पदरी पडली. किती गोष्टी होत्या बोलण्याच्या? जेव्हा म्हणून आमच्या सारख्या उद्योजकांच्या लेव्हल ला आम्ही देशाचे प्रवक्ते म्हणून आम्हालाही काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांच्या उत्तराची दिशा या भाषणातून मिळायला हवी अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. कुठलाही प्रश्न आपण सब्जेक्टिव्ह पद्धतीने हाताळतो, त्यात ऑब्जेक्टिव्हिटी अजिबात नसते. संख्याशास्त्र आणि तर्कशास्त्र हे बाकी शास्त्राप्रमाणे खूप प्रगत झाले आहेत. ते वापरून देशाच्या जनतेला दिलासा देणारे कितीतरी अनुमान आपण बांधू शकतो.

१. साधारण पणे इकॉनॉमी चं किती नुकसान होतंय. पण पुन्हा एकदा काम चालू झाल्यावर आपण कसं जोमदार प्रयत्न करून झालेला लॉस भरून काढू यात. याचा सांख्यिकी स्तरावर अभ्यास करून व्यवस्थित विश्लेषण आणि विवेचन.

२. लोकसंख्या इतकी जास्त असूनही आपल्याकडे रुग्णांची संख्या जास्त का वाढली नाही याची लॉजिकल कारणं काय आहेत? आय सी एम आर च्या डायरेक्टर चं काय म्हणणं आहे?

३. आपण पाहिजे तितक्या टेस्ट करत नाही आहोत. एका सरकारचे प्रवक्ता म्हणून आपण या आरोपाचे कसे खंडन करता?

४. एक विशिष्ट वर्ग विचित्रासारखा वागून करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ करतोय, याबद्दल आपण काय इशारा देता?

५. सर्व राज्य सरकारे अत्यंत इमानेइतबारे काम करत आहेत. त्यांचं धैर्य वाढवणारे चार शब्द! अगदी राजकीय विरोधक असले तरी केजरीवाल किंवा ठाकरे साहेब यांच्या सारख्या नेत्यांबद्दल कौतुकाचे शब्द बोलू शकत होते.

६. एस एम ई सेगमेंट जो आज सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून देतो आहे त्यांना दिलासा म्हणून आपण काय प्रयत्न करत आहात. इथे काम करणारे लोक आपापल्या गावी गेले आहेत. लॉक डाऊन काढल्यावर त्यांना परत आणण्यासाठी काही विशेष व्यवस्था करणार आहात का?

७. काही शहरं असतील की जिथे सुरुवातीला पेशंट संख्या जास्त होती, पण नंतर तिथे कंट्रोल आला. अशा शहरांच्या नागरिकांचे अभिनंदन. 

८. या रोगावर लस शोधण्यासाठी देशात काय प्रयत्न चालू आहेत आणि आपण त्यामध्ये कुठल्या टप्प्यावर आहोत.

९. जागतिकीकरणावर या सगळ्या गोष्टीचे काय परिणाम होणार आहेत.

१०. कोणत्या उद्योगाने येणाऱ्या वर्षात जास्त प्रयत्न करून देश स्वयंपूर्ण करायचा आहे.

सर, आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आणि बाकी अनेक गोष्टीमुळे करोना प्रकरण अजूनही हाताबाहेर गेलं नाही आणि ते जाणारही नाही याची ग्वाही देता आली असती.

असो. यातून बाहेर पडण्याचे आम्ही लोक मार्ग शोधतो आहोतच. त्यात तुमचाही हातभार आहेच पण भविष्य कसं उज्वल आहे हे सांगितल्यावर काही दिवसांनी करोना साथ संपली असं ज्यावेळेस आपण घोषित केलं असतं हा अख्खा भारत "लख लख तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती" म्हणत तुम्ही न सांगता आम्ही प्रकाशमान केला असता.


Tuesday 31 March 2020

जॉर्ज कार्लीन

जॉर्ज कार्लीन नावाचा एक अमेरिकन स्टँड अप कॉमेडियन आहे. अमेरिकन जीवनशैलीचे त्याने आपल्या शैलीत वाभाडे काढले आहेत. त्याचा व्हिडीओ मी इथे पोस्ट करू शकत नाही, पण त्याच्या बोलण्याला आपण रिलेट करू शकतो.

जॉर्ज म्हणतो की अमेरिकन्स लोक आपल्या जीवन शैलीत मश्गुल आहेत. आणि त्यात तुम्ही तुमचं चांगल्या आरोग्याच्या स्वातंत्र्याला हरताळ फासत आहात. तुम्ही ज्या पद्धतीने राहता आहात, त्यात एखादा व्हायरस तुमची वाट लावू शकतो. बहुसंख्य अमेरिकन्स हे सिक्युरिटी, हायजिन, स्वच्छता, आणि विषाणू पासून सुरक्षितता याने झपाटले गेले आहेत.

तो पुढे म्हणतो "मला कळत नाही, या देशात व्हायरस बद्दलची कमालीची भीती कधी आणि कुठे आली? अमेरिकन मीडिया हा सतत वेगवेगळ्या व्हायरस ची भीती अमेरिकन्स लोकांच्या मनात रुजवत असतो. आणि मग तुम्ही लोक हे घास, ते धु या कामात गढलेले राहता. अन्न खूप जास्त शिजवतात आणि सारखे हात धूत राहतात आणि विषाणूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हेच मुळात मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि हा मूर्खपणा इतका वाढीला लागला आहे की जेलमध्ये इंजेक्शन देऊन कॅपिटल पनिशमेंट द्यायचं असेल तरी ते आधी अल्कोहोल ने दंड साफ करतात. इथे प्रत्येक जण अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी विचित्र काळजी घेत असतो. अख्ख्या अमेरिकेत फूड पॉयझनिंग च्या वर्षात फक्त ९००० केसेस होतात."

"ही आमची इम्यून सिस्टम दिली आहे, तिला ताकदवर बनवण्यासाठी काही विषाणू आजूबाजूला असणे गरजेचं आहे. तुम्ही जर तुमचा देह पूर्ण स्टेराइल (निर्जंतुक) बनवला, आणि देव न करो असा कुठला सुपर व्हायरस तुमच्या बॉडीत शिरला तर त्याला दोन हात करण्याची ताकद तुमच्यात नसणार आहे. त्याचा परिणाम एकच. मृत्यू. कारण एकंच. तुमच्या इम्यून सिस्टमची तुम्हीच वाट लावली आहे."

पुढं जॉर्ज म्हणतो "माझ्या स्वतःबद्दल सांगतो. न्यूयॉर्क मध्ये मी लहान असताना हडसन नदीत पोहायचो, तेव्हा ती नदी कुठली तर तो निव्वळ नाला होता. आणि आज जर कुठला विषाणू मला त्रास देत नसेल तर त्याचं कारण एकंच की त्या नाल्यासदृश नदीत मी पोहलो आहे आणि त्यामुळे माझी रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. मी स्वतःला विषाणूपासून अजिबात रोखत नाही इतकं की जर चुकून माझ्याहातून काही अन्नपदार्थ फ्लोअर वर पडलाच तर मला तो उचलून खायला अजिबात लाज वाटत नाही. कुणी माझ्या बाजूला खोकलं किंवा शिंकलं तर मला भीती वाटत नाही, मी माझ्या टॉयलेटचे सीट कव्हर पण झाकत नाही. मला त्यामुळे खोकला, सर्दी, डोकेदुखी, ताप असा कुठलाही आजार होत नाही. याचं कारण माझी इन बिल्ट इम्यून सिस्टम इतकी स्ट्रॉंग आहे की कुठलाही विषाणू माझ्यात शिरला तर माझी सिस्टम त्याचा खातमा करून टाकते."

पुढं तो जे बोलतो ते तुम्हीच ऐका. म्हणजे मी लिहू शकत नाही ते.

करोना चालू झाला तेव्हा मी नीलला म्हणालो "असं वाटतंय, एखाद्या कचरा कुंडीच्या इथं जावं आणि त्यात डुक्कर कस लोळतो तसं मनसोक्त लोळावं. असले खत्रूड विषाणू अंगात आणावेत की सालं करोना त्याला घाबरून पळून जावा."

जॉर्ज कार्लीन चा व्हिडीओ पाहिल्यावर निल म्हणाला "तुमचे आणि त्याचे विचार किती जुळतात ना?"

तो व्हिडीओ आपल्या मुलाबरोबर स्वतःच्या जबाबदारीवर पहावा. त्याची भाषा डेंजर वाईल्ड आहे आणि खतरनाक शिव्या आहेत हा वैधानिक इशारा आहे. 

Monday 30 March 2020

इव्होल्यूशन प्रोसेस

या वर्षामध्ये एका वेगळ्याच गोष्टीचा मी अनुभव घेतो आहे.

माझा स्वभाव तसा खूप टेन्शन घेणारा. आणि ते टेन्शन घ्यायला काही सीमा पण नाही. कुठं म्हणून खुट्ट झालं की माझ्या झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. मग अगदी कंपनीत मी कुणाला झापडून काढलं, किंवा कुणाकडून तरी अगदी छोटी पण मूर्खपणाची चूक झाली अन त्यामुळे नुकसान झालं, झालंच तर कुण्या मित्रानं काही तरी फालतू पासिंग बाय कॉमेंट केली, कुणावर मी विश्वास टाकला अन त्या विश्वासाला तडा देणारं कुणी वागलं की झालं. मी नुसता तळमळत राहतो. बरं इथं गंमत अशी की माझं किंवा कंपनीचं या प्रोसेस मध्ये जे पैशात नुकसान होतं त्याची मला तसूभर चिंता नसते. पण माझी विचारगंगा ही "हे का झालं" यावर सारखी कोसळत राहते.

कंपनी चांगली चालू असेल तर ही अशीच चांगली चालेल की काही प्रॉब्लेम येईल या विचाराने मी कायम अस्वस्थ असतो. कंपनी चांगली चालू नसेल तरी मग मी विचार करत बसतो की काय केल्याने परिस्थितीत सुधारणा होईल. एकंदरीत "मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो" अशी माझी बारा महिने अवस्था असते.

आणि याच स्वभावामुळे माझ्या दोन प्लास्टी झाल्या. कारण माझी लाईफ स्टाईल ही काही फार अंदाधुंद नव्हती. आता तर नाहीच आहे. एक जेवणाची वेळ न पाळणे आणि चमचमीत खाणे हे सोडलं तर वयाच्या ४३ व्या वर्षी प्लास्टी व्हावं असं काही कारण नव्हतं. मला जाणवतं की फक्त आणि फक्त स्ट्रेस मॅनेज करण्याच्या अपयशामुळे मला हा आजार लागला.

यावर्षीही मी वर उल्लेखलेल्या गोष्टींनी चिंतीत असतो. पण २०१९-२० या आर्थिक वर्षात दोन जबरी धक्के बसले. एक ७ जुलै २०१९ ला एका अपघातात माझे चार सहकारी गमावले. आणि दुसरं या करोना मुळे बिझिनेस तात्पुरता बंद करावा लागला. त्या अपघातावेळी सुद्धा मी ती घटना कळल्यावर, म्हणजे सकाळी अकरा पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत सांत्वनापलीकडे होतो. पण एकदा मी त्या घटनेची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र पूर्ण धैर्याने त्या घटनेला आणि त्यानंतरच्या आलेल्या परिणामाला सामोरे गेलो. अर्थात यामध्ये घरची लोक, लहान भाऊ उन्मेष आणि कंपनीतल्या सहकाऱ्यांची साथ होतीच.

आता सुद्धा करोना मुळे रेव्हेन्यू बंद झालाय, खर्च चालू आहेत, लॉकडाऊन कधी संपणार माहित नाही, त्यांनतर काय आव्हानं उभी राहणार याचा अंदाज नाही, तरीही आश्चर्यकारक रित्या मला त्याचं अजिबात टेन्शन येत नाही आहे. उलट वर सांगितल्याप्रमाणे क्षुल्लक मानवी संबंधातील ताणतणावामुळे रात्र जागवणारा मी आता मात्र व्यवस्थित झोपतो आहे. आता त्या मागे भावना काय आहे, वयोमानानुसार मानसिक स्थिती सुधारली आहे का, की गेले चार वर्षांपासून स्वतःला मेंटली स्टेबल बनवण्याचे जे कॉन्शस प्रयत्न चालू आहेत त्याचा परिणाम आहे का, की जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्यावर आपण डोकेफोड करू नये असं काही झालं आहे का,  याचा काही तपास लागत नाही आहे. पण असं झालं आहे खरं.

माझी बहीण मानसी देशमुख ही मानसोपचार तज्ञ आहे. तिनेही मला एकदा तिच्या क्लिनिकवर लोकांशी संवाद साधायला बोलावलं होतं, स्ट्रेस मॅनेज कसा करावा, हा विषय होता. तेव्हा तिथेही मी हेच सांगितलं की चार वर्षांपूर्वी मी कार्यक्रमाला असतो ते प्रेक्षक म्हणून आणि न की वक्ता म्हणून.

असो. माणसाचं आयुष्य ही  एक इव्होल्यूशन प्रोसेस असते असं म्हणतात, आणि मी त्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतो आहे हे निःसंशय.



  

Friday 27 March 2020

संकल्प

आजच्या मितीला करोना हा विषय निघाला की दुसरा शब्द मनात येतो अन तो म्हणजे चीन. एकेकाळी अत्यंत मागास असलेल्या या देशाने नव्वदीत कात टाकायला सुरुवात केली आणि बघता बघता गेल्या तीस वर्षात तो एक प्रबळ महासत्ता म्हणून नावारूपाला आला. भौतिकतेच्या कसोटीवर त्याने केलेली प्रगती ही नेत्रदीपक आहेच आणि अचंबित करणारी सुद्धा.

पण या सगळ्या प्रगतीला एक दुसरी काळी बाजू आहे. आणि ती म्हणजे तिथलं कम्युनिस्ट शासन, त्यांनी वेगवगेळ्या पद्धतीने अवलंबलेली मानवी मूल्यांना हरताळ फासणारी त्यांची कार्यपद्धती. व्यवसायाच्या निमित्ताने मला दोन वेळा चीनला जाण्याची संधी मिळाली. अमेरिका, युरोप किंवा तैवानच्या मानाने माझ्या चीनला जास्त चकरा नाही झाल्या. पण चायनीज व्यावसायिकांशी संभाषण मात्र खूपदा करावे लागले. आणि खोटं कशाला सांगू, या संपन्न देशातील अनुभव पाहून माझ्या पदरी घोर निराशा पडली. ती का पडली, कशामुळे मी या देशाबद्दल फार आग्रही नाही याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मी काही खूप मोठा उद्योजक नाही आहे, त्यामुळे माझ्या मताला फारशी किंमत नाही हे मला माहित आहे आणि काही शे लोकांना भेटल्यावर पूर्ण देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे हि कळतं. पण या काही शे व्यावसायिकांमध्ये किमान एखादी तरी आदर्श केस निघावी. पण तिथेही निराशाच पदरी आली.

चीन च्या आणि आपल्या उत्पादनाचा जर तौलनिक अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की चीन हा लो कॉस्ट आणि हाय व्हॉल्युम असे प्रॉडक्टस आपल्याकडे पाठवतो. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की याची क्वालिटी जर खराब असेल, आणि ती बहुतेकदा असतेच, तर त्याविरुद्ध दाद मारायला काही यंत्रणा नाही आहे. पण मुळात त्याची किंमत इतकी कमी असते की त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आपली इच्छा होत नाही. मुख्य म्हणजे त्या खराब क्वालिटी चा आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठं नुकसान होत नाही. आणि त्यामुळे आपण बेफिकीर राहतो. २००५ मध्ये मी चीन मध्ये एक लगेज आणि ब्लेझर घेतला होता. लगेज तर इथे येईपर्यंत तुटलं आणि तो स्वस्त ब्लेझर इतक्या भंगार क्वालिटी चा सापडला की मोन्यूमेन्ट म्हणून लटकवून ठेवला आहे.
ह्या उलट आपला भारत देश. लॉ व्हॅल्युम पण हाय कॉस्ट आणि क्वालिटी मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची, अशा प्रॉडक्टस मध्ये जगभर लोकप्रिय आहे. याचं मोठं उदाहरण म्हणजे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री. दशकापूर्वी मोठी बातमी आली होती, चायनीज उत्पादक येणार म्हणून. पण भारतीय उद्योजक लोकांच्या कल्पकते समोर आणि राजकीय इच्छाशक्ती समोर चायनीज भारतात प्रवेश पण करू शकत नाही. इतकंच नाही तर ऑटोमोबाईल मध्ये लागणाऱ्या मेकॅनिकल पार्टस मध्ये सुद्धा भारतातील उत्पादकांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वरचष्मा टिकवून ठेवला आहे.
मी ज्या इंडस्ट्री ला रिप्रेझेन्ट करतो तो मशीन टूल इंडस्ट्री. अतिशय कॅपिटल इंटेनसिव्ह. इथे सुद्धा चायनीज कंपन्या शिरकाव नाही करू शकल्या. त्या देशाचं अंतर्गत कंझमप्शन हा जरी एक इश्यू असला तरी चायनीज प्रॉडक्ट ची खराब क्वालिटी हा एक मोठा मुद्दा आहे. 
सगळ्यात बेकार गोष्ट या चायनीज लोकांची आणि ती म्हणजे अतिशय खालच्या पातळीची विश्वासार्हता. एका पंजाबी उद्योजकाला चायनीज कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर च्या डील मध्ये करोडो रुपयाला कसा गंडा घातला याची सुरस कथा आहे . माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला एका निर्जन गावात बिझिनेस डील फायनल करण्यासाठी नेलं आणि धाकदपटशा करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अक्षरश: जीव वाचवून पळून यावं लागलं होतं. मी सुद्धा तीस एक चायनीज बिझिनेस प्रोफेशनल्स बरोबर संवाद साधला आहे. इतक्या टीचभर लोकांशी बोलून सगळ्या देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे कळतं मला, पण मी ज्यांना भेटलो त्यातले बहुतेक सुमार बुद्धिमत्तेचे आणि आढ्यताखोर असे वाटले. चायनीज लोकांनी कसं गंडवलं याच्या अजून चार पाच कथा माझ्या पोतडीत आहेत. दुसऱ्यांच्या बौद्धिक संपदेचा आदर आणि आर्थिक शिस्त नावाचा प्रकार या चायनीज मंडळींच्या जवळपास ही फिरकत नाही. आपल्याकडे जे प्रॉडक्टस सप्लाय केले जातात ते खूप कमी प्रॉफिट मार्जिन वर बनतात. पण थोडंही काही बिघडलं की ते दिवाळखोरी घोषित करतात. पण ती केल्यावर त्यांना वाळीत टाकलं जात नाही तर तिथलं राजकीय सपोर्ट आणि बँकिंग सिस्टम त्यांना परत दिवाळखोरी करण्यासाठी उभं करते.
आपल्याला जे चांगले चायनीज प्रॉडक्टस मिळतात ते पाश्चात्य आस्थापनेखाली बनले जातात. त्याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे Apple. फॉक्सकोन नावाच्या तैवानीज काँट्रॅक्ट उत्पादकाबरोबर apple चे बिझिनेस मॉडेल बेजोड आहे.
अत्यंत राक्षसी म्हत्वाकांक्षेने झपाटलेल्या चीन ला मानवता विरोधी वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार आहे. त्यांच्या एकुणात वर्क कल्चर पेक्षा आपल्या भारतात उन्नत मान व्हावी अशी वस्तुस्थिती आहे.
थोडक्यात सांगायचं तर चीन जसा आहे तसाच राहिला तर ते त्यांच्यासाठी कबर खणत आहेत. आणि तसं नाही झालं तरी त्यांची तथाकथित डोळे दीपावणारी प्रगती त्यांनाच लखलाभ. 
ही झाली चीनची निगेटिव्ह बाजू. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून काही चांगल्या गोष्टी असाव्यात. अंदाज तर नक्कीच बांधू शकतो. सगळ्यात मुख्य म्हणजे ते एका गोष्टीने झपाटले आहेत. आणि ते म्हणजे जगात अव्वल नंबर होणे. ते ही एका कुठल्या क्षेत्रात नाही. तर जी काही क्षेत्रे आहेत, तिथे सगळीकडे पहिला नंबर. उत्पादन, सर्व्हिस, बांधकाम, अंतराळ, रेल्वे, खेळ, बायोटेक्नॉलॉजी, मिलिटरी तुम्ही नाव घ्या आणि त्यांना जगात अव्वल व्हायचं आहे. मग त्यातून "जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग" किंवा "५० मजली बिल्डिंग अकरा दिवसात" किंवा "जगातली सगळ्यात वेगवान रेल्वे" किंवा "ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त पदके" अशा टाईपच्या सगळ्या बातम्या चीनच्या संदर्भांत आजकाल आपण ऐकतो. ही भावना तिथलं स्वनियुक्त सरकार लोकांच्या गळ्यात अडकवण्यात कमालीचं यशस्वी झालं आहे. त्यामुळे चीनमधील प्रत्येक स्त्री पुरुष हे व्यापार उदीम वाढवण्यासाठी कायम झटत असतात. मग त्यात "वर्क एथिक्स" वगैरे ते पासंगाला पण वापरत नाहीत. येनकेनप्रकारेण, किंवा इंग्रजीत बाय हुक ऑर क्रूक असं म्हणतात, त्यांना जगात वरचष्मा प्रस्थापित करायचा आहे हे जाणवतं. 

हा करोना व्हायरस येण्याच्या अगोदरच अमेरिका आणि चीन यांच्यात ट्रेड वॉर चालू झालं होतं. अन त्यातूनच अमेरिकेनं चीनच्या मालावर २५% इम्पोर्ट ड्युटी लावली. त्याने चीन बिथरलं. तिथला बराचसा बिझिनेस हा इतर साऊथ ईस्ट एशियन देशात गेला. भारतालाही त्याचा फायदा झाला. ह्या अशा व्यापारयुद्धाच्या मधेच ही करोनाची भानगड उत्पन्न झाली. 

करोनाची साथ ओसरल्यानंतर जग हे वेगळं रूप धारण करेल यात शंका नाही. ह्या व्हायरसच्या मागे चीनची भूमिका ही संदिग्ध आहे. ज्या म्हणून आंतरराष्ट्रीय षडयंत्र च्या सुरस कथा ऐकायला येत आहेत, त्यात किती तथ्य आहे, यावर भाष्य करण्याइतका माझा अभ्यास नाही. पण एक मात्र मी ठामपणे म्हणू शकतो की जरी हे जैविक शस्त्र म्हणून बनवलं नसेल तरीही चीन या प्रकरणात हात झटकू शकत नाही. त्या व्हायरसचे परिणाम काय होतील याची कल्पना चीनला नसणे हा तकलादू भाबडा आशावाद जरी ग्राह्य धरला, तरी सारं जग मात्र चीनला आरोपीच्या कटघरात उभं बघतोय. आणि इथे भारताला संधी आहे. 

चीनला पर्याय म्हणून अनेक देश उभे राहणार आहेत. मेक्सिको, इंडोनेशिया, आफ्रिकन प्रदेश, ईस्ट युरोप आणि भारत हे प्रबळ दावेदार असावेत असं मला वाटतं. आणि भारताने त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. ही संधी का आहे याची काही तार्किक करणे आहेत. 

१. भारताची शिक्षणपद्धती ही कितीही विवादास्पद असली तरी मनुष्यबळ उपलब्ध होण्याइतकी नक्कीच चांगली आहे.
२. इंग्रजी भाषेचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो. 
३. मेक्सिको सारखी गुन्हेगारी संस्कृती नाही आहे. 
४. कितीही वाद असले तरी लोकशाही आहे. 
५. चीनच्या मानाने आपण बऱ्यापैकी "एथिकल वर्क प्रॅक्टिसेस" वर विश्वास ठेवतो. 
६. आपल्या अकौंटिंग पद्धती या पाश्चात्य देशांनी मान्य केल्या आहेत. 
७. कामाची आवड आहे. आठवड्याला ४८ तास काम करणारा आपला एकमेव देश असावा. 
८. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण कम्युनिकेशन या क्षेत्रात चांगली मुसंडी मारली आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 
९. लेबर कॉस्ट ही आजही आपली बऱ्यापैकी कमी आहे. सध्या चीनच्या निम्मी आहे. 
१०. फ्रुगल पद्धतीने म्हणजे काटकसरीने काम करायची आपल्याला सवय.   

या गोष्टीमुळे चीनला पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात आपल्या भारत देशाला प्राधान्य मिळेल असा मला विश्वास आहे. अर्थात आपले काही कच्चे दुवे पण आहेत. त्यावर एक राष्ट्र म्हणून, समाज म्हणून आपण जर काम केलं तर आपली विश्वासार्हता अजून वाढेल. ते मुद्दे खालीलप्रमाणे: 

१.  व्यवसाय पूरक प्रणाली अजून आपल्याकडे तयार नाही आहे. या मध्ये बँकिंग सिस्टम आणि कस्टम्स याचा प्रामुख्याने समावेश होतो. कर रचना हा  प्रश्न जीएसटी मुळे बऱ्यापैकी सुटला आहे. 
२. पायाभूत सुविधे मध्ये अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. वीज आणि दळणवळण यात आपण खूप मागे आहोत. रस्ते आणि रेल्वे मार्ग यात प्रचंड काम करण्याची गरज आहे. रस्ते ही शासनाची बाब असली तरी एक समाज म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इमानेइतबारे काम करून चांगल्या प्रतीचे रस्ते बनवण्याचं उत्तरदियत्व आपल्या अंगावर घ्यावं. 
३. स्वच्छतेचा अभाव हा एक खूप मोठा दुर्गुण आहे. स्वच्छ इंडिया ही फक्त घोषणा न राहता आपली जीवन प्रणाली बनावी. 
४. चीनपेक्षा आपली विश्वासार्हता चांगली असली तरी त्यात सुधारणेला वाव आहे. 
५. मूलभूत संशोधन आपण करत नाही. 
६. एक समाज म्हणून आपण व्हॅल्यू सिस्टम डेव्हलप करू शकलो नाही. त्यामुळे एक ब्रँड म्हणून आपला देश खूप मागे आहे.

एकंदरीत वरील आणि अजून काही मुद्दे असतील, तर त्यावर आपण जर काम केलं तर भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून पुढील दशकात वाटचाल करेल असं वाटतं. चीन इतकी राक्षसी महत्वाकांक्षा आपल्याला नको आहे, पण भांडवलवाद आणि समाजवाद याची योग्य सांगड घालून आपल्या देशातील मोठा प्रवर्ग हा गरिबी रेषेच्या वर ओढण्याची संधी आपल्याला आहे या बाबत मला शंका नाही. श्रीमंत लोक हे जास्त श्रीमंत झाले तर देशाची प्रगती झाली असा एक गैरसमज आहे. याउलट एक देश हा प्रगतीपथावर तेव्हाच जातो जेव्हा गरीब प्रवर्ग हा मध्यमवर्गात ओढला जातो. 

करोनाचं संकट नक्कीच टळेल, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना बळ येवो ही सदिच्छा आणि मुख्य म्हणजे त्यानंतर ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यावर काम करून आपला देश सुदृढ बनवू हा संकल्प करू यात. 



Saturday 21 March 2020

कॉपी

आम्ही स्पिंडल रिपेयर चा बिझिनेस २००२ साली चालू केला. २०१५ पर्यंत आम्ही स्वतःला कधीही स्पिंडल उत्पादक म्हणवून घेतलं नाही. असं नाही की आम्ही स्पिंडल बनवायचो नाही. आम्ही त्याचं उत्पादन करायचो पण ते आमच्या प्रॅक्टिकल नॉलेज आणि कस्टमर इनपुट्स वर.

तसं बघायला गेलं तर स्पिंडल रिपेयर करण्यासाठी आमच्या कडे जगातील उत्तमोत्तम कंपनीचे स्पिंडल यायचे. आणि ते रिपेयर करायला आम्हाला अगदी शेवटच्या पार्ट पर्यंत स्ट्रीप डाऊन करावा लागायचा. मनात आणलं असतं तर प्रत्येक पार्टचं रिव्हर्स इंजिनियरिंग करून आम्ही जगातले सर्वोत्कृष्ट स्पिंडल आम्ही कॉपी करून आमचे प्रॉडक्ट म्हणून विकू शकत होतो. पण आम्ही तसं कधी केलं नाही.

त्यामागे एक कारण आहे. नवीन स्पिंडल चं उत्पादन करण्यासाठी चांगलं डिझाईन असणं गरजेचं आहे, असं आम्हाला नेहमीच वाटत आलं. मी किंवा माझा पार्टनर, डिझायनर नसल्यामुळे आम्ही त्या वाटेला गेलोच नाही आणि स्पिंडल उत्पादन हा नेहमीच स्पिंडल रिपेयर ला सहाय्यक बिझिनेस राहिला.

२०१२ ला सेटको बरोबर जॉईंट व्हेंचर झाल्यावर मात्र गोष्टी बदलल्या. आमच्याकडे लेजिटिमेंट स्पिंडल डिझाइन्स आले सेटको कडून. हे कुणाचे कॉपीड किंवा चोरलेले ड्रॉइंग्ज नव्हते. मग आमचाही उत्साह दुणावला. आम्ही डिझाईन अँड डेव्हलपमेंट हे डिपार्टमेंट चालू केलं. आज आमच्या कडे पाच डिझाईन इंजिनियर्स आहेत आणि अजून काही डिझायनर्स घेण्याचा प्लॅन आहे. माझ्या बिझिनेस पार्टनर चं प्रॅक्टिकल नॉलेज आणि डिझायनर्स चं थेअरिटीकल, याच्या जोडीला सेटको चा सपोर्ट, यामुळे नवनवीन स्पिंडल डिझाइन्स करू लागलो. आजमितीला आम्ही वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी, म्हणजे मिलिंग, ग्राइंडिंग किंवा स्पेशल पर्पज साठी, महिन्याला ३० ते ३५ स्पिंडल उत्पादित करतो.

आणि मला हे लिहायला अभिमान वाटतो की हे सर्व डिझाइन्स आमच्या इंजिनियर्स ने बनवले आहेत. कुणास ठाऊक, लवकरच आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चालू करू.

पाय घसरून केवळ पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्यांचे स्पिंडल कॉपी करण्याची आम्हाला नक्कीच संधी होती. पण आम्ही तो मार्ग निवडला नाही.

दुसऱ्यांचे प्रॉडक्टस कॉपी करून कुणी श्रीमंत होईलही कदाचित, पण संपन्न होणार नाही. 

Friday 21 February 2020

राम निष्ठा

दहा बारा वर्षांपूर्वी आमच्या कंपनीत एकजण म्हणाला की आपण गणेशोत्सव चालू करू यात. रीतसर अर्ज वगैरे घेऊन परवानगी मागत होता.

मी  समजावून सांगितलं की तू काही वर्ष आहेस कंपनीत आणि मी ही काही अमरत्व घेऊन आलो नाही. आज मी तुला परवानगी दिली तर तू उपकारार्थ आज आभार मानशील, मला ही फार मोठा तीर मारल्यासारखं वाटेल. पण उद्या काही कारणास्तव बिझिनेस डाऊन झाला किंवा मॅनेजमेन्ट मध्ये खांदेबदल झाला आणि नवीन मॅनेजमेंट ला गणेशोत्सव काही कारणामुळे नको असेल तर तुम्हा लोकांना ते चालणार नाही. आज दिलेली परवानगी आपले लोक हक्क म्हणून गाजवू लागतील अन कंपनीतील वातावरण विनाकारण बिघडेल. कारण आपल्या लोकांना आज दिलेली मुभा ही उद्या हक्क म्हणून गाजवायची वाईट खोड आहे.

तेव्हा आपण धर्माधिष्ठित सणांचं कौतुक फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यापुरतं मर्यादेत ठेवू यात. बाकी जे काय सण बिन साजरे करायचे ते सुट्टी घेऊन आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत साजरे करू यात.

असो. हे झालं कंपनीचं.

वैयक्तिक पातळीवर तर मी आता कुठल्याही सणाबद्दल, जयंतीबद्दल, पुण्यतिथीबद्दल कुठलीही भावना स्वतः व्यक्त करत नाही. माझा धर्म, माझे महापुरुषातले आदर्श हे माझ्यासाठी लखलाभ. त्याबद्दलचा माझा आदरभाव, प्रेम, निष्ठा, भक्ती ही माझ्यापुरती मर्यादित. ती दुसऱ्या कुणाचीही असावी याबाबत अट्टाहास तर सोडाच, पण इच्छा प्रदर्शित करण्याबाबत आता घृणा वाटते.