Friday 27 March 2020

संकल्प

आजच्या मितीला करोना हा विषय निघाला की दुसरा शब्द मनात येतो अन तो म्हणजे चीन. एकेकाळी अत्यंत मागास असलेल्या या देशाने नव्वदीत कात टाकायला सुरुवात केली आणि बघता बघता गेल्या तीस वर्षात तो एक प्रबळ महासत्ता म्हणून नावारूपाला आला. भौतिकतेच्या कसोटीवर त्याने केलेली प्रगती ही नेत्रदीपक आहेच आणि अचंबित करणारी सुद्धा.

पण या सगळ्या प्रगतीला एक दुसरी काळी बाजू आहे. आणि ती म्हणजे तिथलं कम्युनिस्ट शासन, त्यांनी वेगवगेळ्या पद्धतीने अवलंबलेली मानवी मूल्यांना हरताळ फासणारी त्यांची कार्यपद्धती. व्यवसायाच्या निमित्ताने मला दोन वेळा चीनला जाण्याची संधी मिळाली. अमेरिका, युरोप किंवा तैवानच्या मानाने माझ्या चीनला जास्त चकरा नाही झाल्या. पण चायनीज व्यावसायिकांशी संभाषण मात्र खूपदा करावे लागले. आणि खोटं कशाला सांगू, या संपन्न देशातील अनुभव पाहून माझ्या पदरी घोर निराशा पडली. ती का पडली, कशामुळे मी या देशाबद्दल फार आग्रही नाही याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मी काही खूप मोठा उद्योजक नाही आहे, त्यामुळे माझ्या मताला फारशी किंमत नाही हे मला माहित आहे आणि काही शे लोकांना भेटल्यावर पूर्ण देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे हि कळतं. पण या काही शे व्यावसायिकांमध्ये किमान एखादी तरी आदर्श केस निघावी. पण तिथेही निराशाच पदरी आली.

चीन च्या आणि आपल्या उत्पादनाचा जर तौलनिक अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की चीन हा लो कॉस्ट आणि हाय व्हॉल्युम असे प्रॉडक्टस आपल्याकडे पाठवतो. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की याची क्वालिटी जर खराब असेल, आणि ती बहुतेकदा असतेच, तर त्याविरुद्ध दाद मारायला काही यंत्रणा नाही आहे. पण मुळात त्याची किंमत इतकी कमी असते की त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आपली इच्छा होत नाही. मुख्य म्हणजे त्या खराब क्वालिटी चा आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठं नुकसान होत नाही. आणि त्यामुळे आपण बेफिकीर राहतो. २००५ मध्ये मी चीन मध्ये एक लगेज आणि ब्लेझर घेतला होता. लगेज तर इथे येईपर्यंत तुटलं आणि तो स्वस्त ब्लेझर इतक्या भंगार क्वालिटी चा सापडला की मोन्यूमेन्ट म्हणून लटकवून ठेवला आहे.
ह्या उलट आपला भारत देश. लॉ व्हॅल्युम पण हाय कॉस्ट आणि क्वालिटी मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची, अशा प्रॉडक्टस मध्ये जगभर लोकप्रिय आहे. याचं मोठं उदाहरण म्हणजे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री. दशकापूर्वी मोठी बातमी आली होती, चायनीज उत्पादक येणार म्हणून. पण भारतीय उद्योजक लोकांच्या कल्पकते समोर आणि राजकीय इच्छाशक्ती समोर चायनीज भारतात प्रवेश पण करू शकत नाही. इतकंच नाही तर ऑटोमोबाईल मध्ये लागणाऱ्या मेकॅनिकल पार्टस मध्ये सुद्धा भारतातील उत्पादकांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वरचष्मा टिकवून ठेवला आहे.
मी ज्या इंडस्ट्री ला रिप्रेझेन्ट करतो तो मशीन टूल इंडस्ट्री. अतिशय कॅपिटल इंटेनसिव्ह. इथे सुद्धा चायनीज कंपन्या शिरकाव नाही करू शकल्या. त्या देशाचं अंतर्गत कंझमप्शन हा जरी एक इश्यू असला तरी चायनीज प्रॉडक्ट ची खराब क्वालिटी हा एक मोठा मुद्दा आहे. 
सगळ्यात बेकार गोष्ट या चायनीज लोकांची आणि ती म्हणजे अतिशय खालच्या पातळीची विश्वासार्हता. एका पंजाबी उद्योजकाला चायनीज कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर च्या डील मध्ये करोडो रुपयाला कसा गंडा घातला याची सुरस कथा आहे . माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला एका निर्जन गावात बिझिनेस डील फायनल करण्यासाठी नेलं आणि धाकदपटशा करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अक्षरश: जीव वाचवून पळून यावं लागलं होतं. मी सुद्धा तीस एक चायनीज बिझिनेस प्रोफेशनल्स बरोबर संवाद साधला आहे. इतक्या टीचभर लोकांशी बोलून सगळ्या देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे कळतं मला, पण मी ज्यांना भेटलो त्यातले बहुतेक सुमार बुद्धिमत्तेचे आणि आढ्यताखोर असे वाटले. चायनीज लोकांनी कसं गंडवलं याच्या अजून चार पाच कथा माझ्या पोतडीत आहेत. दुसऱ्यांच्या बौद्धिक संपदेचा आदर आणि आर्थिक शिस्त नावाचा प्रकार या चायनीज मंडळींच्या जवळपास ही फिरकत नाही. आपल्याकडे जे प्रॉडक्टस सप्लाय केले जातात ते खूप कमी प्रॉफिट मार्जिन वर बनतात. पण थोडंही काही बिघडलं की ते दिवाळखोरी घोषित करतात. पण ती केल्यावर त्यांना वाळीत टाकलं जात नाही तर तिथलं राजकीय सपोर्ट आणि बँकिंग सिस्टम त्यांना परत दिवाळखोरी करण्यासाठी उभं करते.
आपल्याला जे चांगले चायनीज प्रॉडक्टस मिळतात ते पाश्चात्य आस्थापनेखाली बनले जातात. त्याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे Apple. फॉक्सकोन नावाच्या तैवानीज काँट्रॅक्ट उत्पादकाबरोबर apple चे बिझिनेस मॉडेल बेजोड आहे.
अत्यंत राक्षसी म्हत्वाकांक्षेने झपाटलेल्या चीन ला मानवता विरोधी वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार आहे. त्यांच्या एकुणात वर्क कल्चर पेक्षा आपल्या भारतात उन्नत मान व्हावी अशी वस्तुस्थिती आहे.
थोडक्यात सांगायचं तर चीन जसा आहे तसाच राहिला तर ते त्यांच्यासाठी कबर खणत आहेत. आणि तसं नाही झालं तरी त्यांची तथाकथित डोळे दीपावणारी प्रगती त्यांनाच लखलाभ. 
ही झाली चीनची निगेटिव्ह बाजू. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून काही चांगल्या गोष्टी असाव्यात. अंदाज तर नक्कीच बांधू शकतो. सगळ्यात मुख्य म्हणजे ते एका गोष्टीने झपाटले आहेत. आणि ते म्हणजे जगात अव्वल नंबर होणे. ते ही एका कुठल्या क्षेत्रात नाही. तर जी काही क्षेत्रे आहेत, तिथे सगळीकडे पहिला नंबर. उत्पादन, सर्व्हिस, बांधकाम, अंतराळ, रेल्वे, खेळ, बायोटेक्नॉलॉजी, मिलिटरी तुम्ही नाव घ्या आणि त्यांना जगात अव्वल व्हायचं आहे. मग त्यातून "जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग" किंवा "५० मजली बिल्डिंग अकरा दिवसात" किंवा "जगातली सगळ्यात वेगवान रेल्वे" किंवा "ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त पदके" अशा टाईपच्या सगळ्या बातम्या चीनच्या संदर्भांत आजकाल आपण ऐकतो. ही भावना तिथलं स्वनियुक्त सरकार लोकांच्या गळ्यात अडकवण्यात कमालीचं यशस्वी झालं आहे. त्यामुळे चीनमधील प्रत्येक स्त्री पुरुष हे व्यापार उदीम वाढवण्यासाठी कायम झटत असतात. मग त्यात "वर्क एथिक्स" वगैरे ते पासंगाला पण वापरत नाहीत. येनकेनप्रकारेण, किंवा इंग्रजीत बाय हुक ऑर क्रूक असं म्हणतात, त्यांना जगात वरचष्मा प्रस्थापित करायचा आहे हे जाणवतं. 

हा करोना व्हायरस येण्याच्या अगोदरच अमेरिका आणि चीन यांच्यात ट्रेड वॉर चालू झालं होतं. अन त्यातूनच अमेरिकेनं चीनच्या मालावर २५% इम्पोर्ट ड्युटी लावली. त्याने चीन बिथरलं. तिथला बराचसा बिझिनेस हा इतर साऊथ ईस्ट एशियन देशात गेला. भारतालाही त्याचा फायदा झाला. ह्या अशा व्यापारयुद्धाच्या मधेच ही करोनाची भानगड उत्पन्न झाली. 

करोनाची साथ ओसरल्यानंतर जग हे वेगळं रूप धारण करेल यात शंका नाही. ह्या व्हायरसच्या मागे चीनची भूमिका ही संदिग्ध आहे. ज्या म्हणून आंतरराष्ट्रीय षडयंत्र च्या सुरस कथा ऐकायला येत आहेत, त्यात किती तथ्य आहे, यावर भाष्य करण्याइतका माझा अभ्यास नाही. पण एक मात्र मी ठामपणे म्हणू शकतो की जरी हे जैविक शस्त्र म्हणून बनवलं नसेल तरीही चीन या प्रकरणात हात झटकू शकत नाही. त्या व्हायरसचे परिणाम काय होतील याची कल्पना चीनला नसणे हा तकलादू भाबडा आशावाद जरी ग्राह्य धरला, तरी सारं जग मात्र चीनला आरोपीच्या कटघरात उभं बघतोय. आणि इथे भारताला संधी आहे. 

चीनला पर्याय म्हणून अनेक देश उभे राहणार आहेत. मेक्सिको, इंडोनेशिया, आफ्रिकन प्रदेश, ईस्ट युरोप आणि भारत हे प्रबळ दावेदार असावेत असं मला वाटतं. आणि भारताने त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. ही संधी का आहे याची काही तार्किक करणे आहेत. 

१. भारताची शिक्षणपद्धती ही कितीही विवादास्पद असली तरी मनुष्यबळ उपलब्ध होण्याइतकी नक्कीच चांगली आहे.
२. इंग्रजी भाषेचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो. 
३. मेक्सिको सारखी गुन्हेगारी संस्कृती नाही आहे. 
४. कितीही वाद असले तरी लोकशाही आहे. 
५. चीनच्या मानाने आपण बऱ्यापैकी "एथिकल वर्क प्रॅक्टिसेस" वर विश्वास ठेवतो. 
६. आपल्या अकौंटिंग पद्धती या पाश्चात्य देशांनी मान्य केल्या आहेत. 
७. कामाची आवड आहे. आठवड्याला ४८ तास काम करणारा आपला एकमेव देश असावा. 
८. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण कम्युनिकेशन या क्षेत्रात चांगली मुसंडी मारली आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 
९. लेबर कॉस्ट ही आजही आपली बऱ्यापैकी कमी आहे. सध्या चीनच्या निम्मी आहे. 
१०. फ्रुगल पद्धतीने म्हणजे काटकसरीने काम करायची आपल्याला सवय.   

या गोष्टीमुळे चीनला पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात आपल्या भारत देशाला प्राधान्य मिळेल असा मला विश्वास आहे. अर्थात आपले काही कच्चे दुवे पण आहेत. त्यावर एक राष्ट्र म्हणून, समाज म्हणून आपण जर काम केलं तर आपली विश्वासार्हता अजून वाढेल. ते मुद्दे खालीलप्रमाणे: 

१.  व्यवसाय पूरक प्रणाली अजून आपल्याकडे तयार नाही आहे. या मध्ये बँकिंग सिस्टम आणि कस्टम्स याचा प्रामुख्याने समावेश होतो. कर रचना हा  प्रश्न जीएसटी मुळे बऱ्यापैकी सुटला आहे. 
२. पायाभूत सुविधे मध्ये अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. वीज आणि दळणवळण यात आपण खूप मागे आहोत. रस्ते आणि रेल्वे मार्ग यात प्रचंड काम करण्याची गरज आहे. रस्ते ही शासनाची बाब असली तरी एक समाज म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इमानेइतबारे काम करून चांगल्या प्रतीचे रस्ते बनवण्याचं उत्तरदियत्व आपल्या अंगावर घ्यावं. 
३. स्वच्छतेचा अभाव हा एक खूप मोठा दुर्गुण आहे. स्वच्छ इंडिया ही फक्त घोषणा न राहता आपली जीवन प्रणाली बनावी. 
४. चीनपेक्षा आपली विश्वासार्हता चांगली असली तरी त्यात सुधारणेला वाव आहे. 
५. मूलभूत संशोधन आपण करत नाही. 
६. एक समाज म्हणून आपण व्हॅल्यू सिस्टम डेव्हलप करू शकलो नाही. त्यामुळे एक ब्रँड म्हणून आपला देश खूप मागे आहे.

एकंदरीत वरील आणि अजून काही मुद्दे असतील, तर त्यावर आपण जर काम केलं तर भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून पुढील दशकात वाटचाल करेल असं वाटतं. चीन इतकी राक्षसी महत्वाकांक्षा आपल्याला नको आहे, पण भांडवलवाद आणि समाजवाद याची योग्य सांगड घालून आपल्या देशातील मोठा प्रवर्ग हा गरिबी रेषेच्या वर ओढण्याची संधी आपल्याला आहे या बाबत मला शंका नाही. श्रीमंत लोक हे जास्त श्रीमंत झाले तर देशाची प्रगती झाली असा एक गैरसमज आहे. याउलट एक देश हा प्रगतीपथावर तेव्हाच जातो जेव्हा गरीब प्रवर्ग हा मध्यमवर्गात ओढला जातो. 

करोनाचं संकट नक्कीच टळेल, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना बळ येवो ही सदिच्छा आणि मुख्य म्हणजे त्यानंतर ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यावर काम करून आपला देश सुदृढ बनवू हा संकल्प करू यात. 



No comments:

Post a Comment