Monday 30 March 2020

इव्होल्यूशन प्रोसेस

या वर्षामध्ये एका वेगळ्याच गोष्टीचा मी अनुभव घेतो आहे.

माझा स्वभाव तसा खूप टेन्शन घेणारा. आणि ते टेन्शन घ्यायला काही सीमा पण नाही. कुठं म्हणून खुट्ट झालं की माझ्या झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. मग अगदी कंपनीत मी कुणाला झापडून काढलं, किंवा कुणाकडून तरी अगदी छोटी पण मूर्खपणाची चूक झाली अन त्यामुळे नुकसान झालं, झालंच तर कुण्या मित्रानं काही तरी फालतू पासिंग बाय कॉमेंट केली, कुणावर मी विश्वास टाकला अन त्या विश्वासाला तडा देणारं कुणी वागलं की झालं. मी नुसता तळमळत राहतो. बरं इथं गंमत अशी की माझं किंवा कंपनीचं या प्रोसेस मध्ये जे पैशात नुकसान होतं त्याची मला तसूभर चिंता नसते. पण माझी विचारगंगा ही "हे का झालं" यावर सारखी कोसळत राहते.

कंपनी चांगली चालू असेल तर ही अशीच चांगली चालेल की काही प्रॉब्लेम येईल या विचाराने मी कायम अस्वस्थ असतो. कंपनी चांगली चालू नसेल तरी मग मी विचार करत बसतो की काय केल्याने परिस्थितीत सुधारणा होईल. एकंदरीत "मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो" अशी माझी बारा महिने अवस्था असते.

आणि याच स्वभावामुळे माझ्या दोन प्लास्टी झाल्या. कारण माझी लाईफ स्टाईल ही काही फार अंदाधुंद नव्हती. आता तर नाहीच आहे. एक जेवणाची वेळ न पाळणे आणि चमचमीत खाणे हे सोडलं तर वयाच्या ४३ व्या वर्षी प्लास्टी व्हावं असं काही कारण नव्हतं. मला जाणवतं की फक्त आणि फक्त स्ट्रेस मॅनेज करण्याच्या अपयशामुळे मला हा आजार लागला.

यावर्षीही मी वर उल्लेखलेल्या गोष्टींनी चिंतीत असतो. पण २०१९-२० या आर्थिक वर्षात दोन जबरी धक्के बसले. एक ७ जुलै २०१९ ला एका अपघातात माझे चार सहकारी गमावले. आणि दुसरं या करोना मुळे बिझिनेस तात्पुरता बंद करावा लागला. त्या अपघातावेळी सुद्धा मी ती घटना कळल्यावर, म्हणजे सकाळी अकरा पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत सांत्वनापलीकडे होतो. पण एकदा मी त्या घटनेची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र पूर्ण धैर्याने त्या घटनेला आणि त्यानंतरच्या आलेल्या परिणामाला सामोरे गेलो. अर्थात यामध्ये घरची लोक, लहान भाऊ उन्मेष आणि कंपनीतल्या सहकाऱ्यांची साथ होतीच.

आता सुद्धा करोना मुळे रेव्हेन्यू बंद झालाय, खर्च चालू आहेत, लॉकडाऊन कधी संपणार माहित नाही, त्यांनतर काय आव्हानं उभी राहणार याचा अंदाज नाही, तरीही आश्चर्यकारक रित्या मला त्याचं अजिबात टेन्शन येत नाही आहे. उलट वर सांगितल्याप्रमाणे क्षुल्लक मानवी संबंधातील ताणतणावामुळे रात्र जागवणारा मी आता मात्र व्यवस्थित झोपतो आहे. आता त्या मागे भावना काय आहे, वयोमानानुसार मानसिक स्थिती सुधारली आहे का, की गेले चार वर्षांपासून स्वतःला मेंटली स्टेबल बनवण्याचे जे कॉन्शस प्रयत्न चालू आहेत त्याचा परिणाम आहे का, की जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्यावर आपण डोकेफोड करू नये असं काही झालं आहे का,  याचा काही तपास लागत नाही आहे. पण असं झालं आहे खरं.

माझी बहीण मानसी देशमुख ही मानसोपचार तज्ञ आहे. तिनेही मला एकदा तिच्या क्लिनिकवर लोकांशी संवाद साधायला बोलावलं होतं, स्ट्रेस मॅनेज कसा करावा, हा विषय होता. तेव्हा तिथेही मी हेच सांगितलं की चार वर्षांपूर्वी मी कार्यक्रमाला असतो ते प्रेक्षक म्हणून आणि न की वक्ता म्हणून.

असो. माणसाचं आयुष्य ही  एक इव्होल्यूशन प्रोसेस असते असं म्हणतात, आणि मी त्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतो आहे हे निःसंशय.



  

No comments:

Post a Comment