Saturday 29 January 2022

सकाळ लेख क्र ५

 व्यवस्थापकीय कौशल्यात एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे निर्णयक्षमता. वेळेत निर्णय घेणे याचं महत्व हे वादातीत आहे. बऱ्याचदा असं लक्षात आलं आहे की लोक "बरोबर निर्णय" घेण्याची वाट बघतात आणि त्या वाट बघण्यात अनेक महत्त्वाच्या संधी हातातून निघून जातात. 

"योग्य निर्णय" घेण्याची सवय मनाला, मेंदूला लावावी लागते. गंमत अशी आहे की त्याची सुरुवात निर्णय घेण्यापासून होते. सुरुवातीला योग्य/अयोग्य अशी त्याची वर्गवारी करण्यात वेळ घालवू नये या मतापर्यंत मी एव्हाना आलो आहे. सुरुवातीला काही निर्णय बरोबर येतील तर काही चुकतील. क्रिकेट मध्ये एखादा फलंदाज नवीन चेंडू समोर जसा चाचपडत खेळतो तसं या निर्णयाच्या बाबतीत होतं. सुरुवातीला परिस्थिती चकवा देते. एखादा निर्णय चुकतो. पण जसं जीवदान मिळाल्यावर फलंदाज हळूहळू खेळपट्टीवर उभा राहतो आणि मग येणारा प्रत्येक बॉल त्याच्या बॅटच्या मधोमध बसू लागतो, त्याप्रमाणे या येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत ठाम पणे उभं राहिलं की हळू हळू निर्णय ठोकताळ्यांच्या आधारावर बरोबर घेऊ लागतात. लौकिकार्थाने अशा लोकांना मग समाज "यशस्वी" हे बिरुद लावतात. इथे आणि "जो जिता वोही सिकंदर" हा न्याय पण लागू होतो. पण त्याने किंवा तिने  सिकंदर बनण्याआधी अनेक चुकीच्या निर्णयाचा सामना केलेला असतो, त्यातून झालेलं नुकसान सहन केलं असतं, मग ते मानसिक असो, आर्थिक असो वा शारीरिक हे लोकांच्या लक्षात येत नाही. पण ते नुकसान झालेलं असतं. मर्त्य मानव जात ते टाळू शकत नाही. फक्त आपल्या हातात तितकंच उरतं की चुकीचा निर्णय जरी घेतला असतील तरी त्यावर काम करून एक नवीन अनुभव घेणे आणि पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली तर दुसरा कुठला तरी मार्ग स्वीकारून आता नव्याने त्या प्रश्नाची उकल करणे. मार्ग थोडा अवघड आहे पण त्याशिवाय दुसरा कुठला सोपा मार्ग नाही आहे. 

ज्याला समाज "अपयश" म्हणतो, त्याकडे जर डोळसतेने बघितलं तर एक लक्षात येईल की नियती एका प्रश्नाची अनेक उत्तरं आपल्यासमोर ठेवत असते. आपण जर सातत्याने चुकीच्या निर्णयाचा मार्ग निवडला की अपयश पदरी पडतं आणि याउलट जर योग्य निर्णयाची निवड केली तर तो मार्ग यशाकडे घेऊन जातो. इथं एक शब्द महत्वाचा आहे आणि तो म्हणजे "सातत्य". एकदा चुकीचा मार्ग निवडला तर काही हरकत नाही. पण ते लक्षात आल्यावर त्या निर्णयाचा नाद सोडून दुसरा मार्ग निवडून त्यावर वाटचाल करणे हे संयुक्तिक असतं. दुर्दैवाने काही लोक सतत निवड चुकीची करतात आणि मग तथाकथित अपयशाचे धनी होतात. 

काही मॅनेजमेंट कोट्स इंटरनेटच्या विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे "मी आधी निर्णय घेतो, आणि मग तो बरोबर ठरेल असं वागतो." माझ्यामते हे ही एक दिशाभूल करणारं वाक्य आहे. त्यातील खरा अर्थ असा आहे की निर्णय चुकीचा असेलही पण तो कशामुळे चुकला आहे यावर सखोल अभ्यास करून पुन्हा नव्याने त्या प्रश्नाकडे बघेल आणि मग नवीन उत्तरं शोधेल. ती एक प्रोसेस आहे. कुणास ठाऊक पण कधी तो प्रश्न सोडवण्याचा अट्टाहास सोडून पण द्यावा लागेल. असं करावं लागलं म्हणजे आभाळ कोसळत नाही. कारण नवनवीन संधी येत असतात, मार्ग दिसत असतात. त्या सर्वावर साकल्याने विचार करत परिस्थितीचा गुंता सोडवण्यात शहाणपण आहे. 


सकाळ लेख क्र ५

Wednesday 19 January 2022

रिले रेस

ऍथलेटिक च्या खेळामध्ये मला सगळ्यात जास्त आकर्षित करणारा खेळ म्हणजे, रिले रेस. कसला भारी प्रकार असतो तो. 

चार जणांची टीम. त्यातल्या प्रत्येक खेळाडूला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स देण्याची गरज. त्यात कुणाचीही सुटका नाहीच. तुम्ही कोणत्याही नंबर वर असा, ढिलं पडून चालतच नाही. तुमच्या एकट्याच्या परफॉर्मरन्स वर चार जणांचं मेडल अवलंबून असतं, वर ते मर्यादित वेळेत. 

त्यातील सगळ्यात आवडणारा क्षण म्हणजे साला तो बॅटन दुसऱ्याला पास व करण्याचा क्षण. काय नसतं त्या वेळात. पहिल्या खेळाडूला माहिती असतं की बॅटन आपल्या हातून आता दुसऱ्याच्या हातात सोपवायचा आहे. थोडक्यात मला ही जबाबदारी दुसऱ्याच्या हातात द्यायची आहे तरी माझं अस्तित्व तो/ती कसं पळणार यावर अवलंबून आहे. मनात तो ही विश्वास ठेवावा लागतो की समोरचा माणूस तितक्याच ताकदीचा आहे, तो ही तितक्याच निष्ठेने आणि आत्मीयतेने पुढच्या खेळाडूला बॅटन द्यायला पळणार आहे. हे सगळं होताना तो बॅटन सुद्धा हातातून पडू द्यायचा नाही आहे, नाहीतर सगळाच गोंधळ. वर परत बॅटन घेणाऱ्याची मानसिकता. तो/ती  ही वाट बघत असतो/ते, कधी ती जबाबदारी आपण आपल्या खांदयावर घेतो आहे ते. कमालीचा उत्सुक असतो. त्याची घालमेल तेव्हा बघण्यासारखी असते. पावलं त्याची थिरकत असतात आणि त्याचं सर्वांग आर्ततेने ते आधीच्या खेळाडूला सांगत असतं की "मित्रा, तू तुझं काम चोख पार केलं आहेस. आता ही माझी जबाबदारी आहे. तू बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेव. मी जीव तोडून पळेल आणि हा बॅटन समोर पास ऑन करेल." 

आणि मग तो मोमेंट ज्यावेळी तो बॅटन एका हातातून दुसऱ्या हातात विसावतो. त्यावेळी बॅटन पास झाल्यावर देणाऱ्याच्या तोंडावर येणारे निश्चिन्ततेचे भाव. त्यात सुटकेची भावना नसते तर एक आनंद असतो त्याच्या तोंडावर की माझं काम जीव तोडून केलं आहे आणि त्याच बरोबर समोरच्या बद्दल दुर्दम्य विश्वास. आय बेट, कुठल्याही अभिनेत्याला ते भाव जसेच्या तसे दाखवता येणार नाही. उफ्फ.... साला मी त्यावेळी माझा राहत नाही. मी तो बॅटन समोरच्याच्या हातात देणारा खेळाडू बनतो. 

सकाळ लेख क्र ४

याआधी लिहिलेल्या लेखामध्ये काही व्यवस्थापकीय कौशल्याचा उल्लेख केला होता. त्याबद्दल थोडं विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करतो. 

वृद्धिधिष्ठीत मानसिकता ठेवायची असेल तर एक कौशल्य अंगात बाणवावं लागतं आणि ते म्हणजे अनलर्निंग. माणूस या आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हे आपण लहानपणी शिकलो असतो. पण नंतर येणाऱ्या काळाच्या ओघात हे आपण विसरून जातो. जसजशी आस्थापनेत आपली पत किंवा लेव्हल वरती जायला सुरुवात होते त्यावेळेस असणारा आपला नॉलेज बेसला आपण घट्ट चिकटून बसलो असतो. ते नैसर्गिक सुद्धा आहे. कारण त्या माहितीच्या आधारावर आपण स्वतःला प्रस्थापित केलं असतं. तिथं आपल्याला खूप सुरक्षित वाटत असतं. त्या कारणामुळे ते नॉलेज, ती माहिती ज्यावर आपलं तथाकथित प्रभुत्व असतं ते सहजासहजी सोडायला तयार नसतो. त्या आणि त्याच कारणामुळे आपण ती माहिती दुसऱ्याला देत पण नाही, विसरणं तर फार लांबची गोष्ट. या मानसिकतेचा तोटा हा असतो की आपल्या मेंदूचा सीपीयू हा फक्त त्या माहितीने, किंवा रूढार्थाने त्याला ज्ञान म्हणतात, व्यापलेला असतो. जगामध्ये चालू असणाऱ्या नवीन गोष्टीचा अंगीकार करण्यासाठी, त्या शिकण्यासाठी आपला मेंदू हा तयारच नसतो. आपल्या प्रचलित म्हणीप्रमाणे बेडकाला ते छोटं डबकं म्हणजे समुद्र वाटायला लागतो आणि आपल्या वृद्धीला आपण स्वतःच एक अडसर तयार करतो. 

अनलर्निंग ही प्रोसेस फार भारी आहे. त्याचा अर्थ असा नाही कि शिकलेलं विसरून जायचं. तर एकदा त्या माहितीवर, किंवा एखाद्या प्रोसेस वर प्रभुत्व मिळवलं कि त्या वेळी ते नॉलेज दुसऱ्याला पास ऑन करायचं. रिले रेस मध्ये कसं आपण बॅटन समोरच्या खेळाडूच्या हातात देतो आणि निश्चिन्त होतो, तसं व्यावसायिक ज्ञान, माहिती, पद्धती या दुसऱ्याच्या खांदयावर टाकता यायला हव्या. अर्थात हे करताना तितके सक्षम खांदे पण तयार करायला हवेत. एकदा ते केलं तर आजकालच्या भाषेमध्ये, मेंदूच्या सीपीयू मधून सगळं काही डाउनलोड होतं आणि तो नवीन काही आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होतो. 

यामध्ये गंमत अशी आहे की वृद्धिधिष्ठित मानसिकता म्हणजे श्रीमंती वाढवणे इतक्यापर्यंतच व्याख्या मर्यादित आहे. इतर लौकिक जगासाठी असेलही ते कदाचित, पण व्यावसायिक आणि उद्योजकतेच्या जगात मात्र ही मानसिकता नवनवीन आव्हानं स्वीकारून, त्यावर काम करत सोल्युशन काढणे आणि दुर्दैवाने काही कारणाने अपयश आलं तर हा मार्गच चुकीचा आहे असा अर्थ न काढता, आपल्या पद्धतीमध्ये काहीतरी चुकलं आहे याचा स्वीकार करणे आणि ते दुरुस्त करत पुन्हा नव्याने त्या किंवा दुसऱ्या आव्हानाला सामोरे जाणे हे आहे. आणि इथं आपल्याला लक्षात येते ती म्हणजे अनलर्निंग ची पुढची पायरी आणि ती म्हणजे रिलर्निंग. जे म्हणून आपण नवीन काम हातामध्ये घेतलं आहे ते तडीला नेण्यासाठी काहीतरी पद्धती ही आपल्याला नव्याने शिकावी लागते, त्यावर पुन्हा शून्यापासून काम करावं लागतं. तेव्हा कुठं ज्याला व्यवस्थापकीय भाषेत "इन्क्लुजिव्ह ग्रोथ", (सर्वांगीण विकास) होण्याची शक्यता तयार होते.   

अगदी शब्दाचे खेळ करत सांगायचं झालं तर लर्निंग (शिक्षण, माहिती, ज्ञान).........अनलर्निंग (मिळालेलं शिक्षण विसरणे नव्हे तर हे दुसऱ्याच्या सक्षम खांद्यावर सोपवणे) .... आणि रिलर्निंग (पुनःशिक्षण) ही अर्निंग (कमाई) ची अत्यंत शाश्वत पद्धत आहे हे एव्हाना अनेक उदाहरणावरून सिद्ध झालं आहे.   


सकाळ लेख क्र ४

Saturday 15 January 2022

सकाळ लेख क्र ३

 पहिल्या लेखात उल्लेख केला होता की उद्योजक आणि व्यावसायिक हे बऱ्याचदा समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातात. त्या दोघात काय फरक आहे ते जाणून घेऊ. 

मुळात Entrepreneur(उद्योजक) हे नाम नाही आहे ते विशेषण आहे. तो एक गुण आहे. त्यामुळे उद्योजकता ही जितकी व्यावसायिकाच्या अंगात असते तितकीच नोकरी करणाऱ्या माणसाच्या अंगात असू शकते.  उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द नसून ते फार तर एकमेकांना पूरक शब्द आहेत. 

काय फरक आहे उद्योजक आणि व्यवसायिक मध्ये. 

तर उद्योजक हा बिझिनेस चा पूर्ण पणे नवीन मार्ग दाखवतो. मग ते प्रोडक्ट च्या संदर्भात असेल नाही तर व्यवसाय करण्याच्या पद्धतीत असेल. व्यावसायिक मात्र मार्केट मध्ये अस्तित्वात असलेला मार्ग चोखाळतो. असे अनेक उद्योग आपल्याला दिसतील की ते येण्यापूर्वी त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करता येतील हे जगाला माहीतच नव्हतं. ओला किंवा उबर सारखी टॅक्सी सर्व्हिस, ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारखं ऑनलाईन स्टोअर, एअर बी एन बी किंवा ओयो सारखी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, बुक माय शो सारखी ऑनलाईन बुकिंग ची सर्व्हिस, एअर डेक्कन ने चालू केलेली नो फ्रिल एअरलाईन्स ही आजकालच्या जगातील काही उदाहरणे. 

उद्योजकाने आणलेली कल्पना ही नाविन्यपूर्ण असते आणि त्यामुळे त्याला स्पर्धा कमी असते. व्यवसायिक मात्र प्रचलित कल्पनेवर व्यवसाय चालू करतो. ते करत असणारे अनेक उद्योग अस्तित्वात असतात. त्यामुळे त्याला स्पर्धा जास्त असते. त्यातही काही हरकत नाही, पण जो पर्यंत तुम्ही व्यवसाय करण्याच्या धोरणामध्ये काही "हटके" करत नाही तोपर्यंत उत्पादन किंवा सेवेच्या किमतीत स्पर्धा होत राहते.  

साधारणपणे व्यावसायिक हा व्यवसायाची आर्थिक गणितं मांडत वाटचाल करतो. तर उद्योजक मात्र अमूर्त अशा मूळ सिद्धांताचा पाठपुरावा करतो. त्याच्या आणि बिझिनेसच्या संदर्भातील गोष्टी मध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो.

व्यावसायिक लोकांना अशी वागणूक देतो की बिझिनेस ची ग्रोथ होईल, तर उद्योजक बिझिनेस ची अशी जडण घडण करतो की लोकांची ग्रोथ होईल. 

कोणताही निर्णय घेताना व्यावसायिक आकडेमोडी मध्ये गढलेला असतो त्यामुळे रिस्क कमी घेतो, तर उद्योजक संख्यात्मक विश्लेषणाबरोबर अंतर्मनाचा पण आधार घेतो, त्यामुळे त्याच्या निर्णय प्रक्रियेत रिस्क असते.

व्यावसायिक मार्केट मध्ये स्वत:साठी जागा बनवतो तर उद्योजक स्वत:साठी नवीन मार्केट शोधतो.

उद्योजक व्यवसायाकडे त्रयस्थ भूमिकेतून बघू शकतो. तो स्वतःला व्यवसायापेक्षा मोठा समजत नाही. 

वरच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उकल केली तर असं सांगता येईल की व्यवसाय म्हणजे धोका घेणे, जो उद्योजकाचा स्थायीभाव आहे,  हे जितकं खरं आहे तितकंच त्या रिस्कला तोंड देता येईल असा बॅक अप प्लॅन बनवणे हेही महत्वाचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं दोन्ही बाजूंचे चांगले गुण उचलून व्यवसायाभिमुख दूरदृष्टी ठेवणं ही कसरत असते खरं, पण ती जर जमली तर समाजाने, राष्ट्राने आणि सरतेशेवटी जगाने दखल घ्यावी असा व्यवसाय उभा राहू शकतो. एव्हाना माझ्या लक्षात आलं आहे की उद्योजक आणि व्यावसायिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्यातल्या उद्योजकतेला जर व्यवसायिकतेचं कोंदण दिलं तर ते नाणं खणखणीत वाजण्याची शक्यता तयार होते.

सकाळ लेख क्र ३

Saturday 8 January 2022

सकाळ, लेख क्र २

 "मूल जन्मल्यावर ते सात वर्षे माझ्या हवाली करा. आणि मी तुम्हाला ते काय म्हणून घडवायचं ते घडवू शकतो" असं कुणीतरी प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून गेलाय. थोडक्यात काय तर वयाच्या सात वर्षापर्यंत माणसाच्या पुढील आयुष्याचा प्रोग्रॅम लिहून पूर्ण होतो. तो बदलायचा असेल तर मग प्रचंड कष्ट आहेत. याचा संदर्भ पुढच्या पॅरा मध्ये आला आहे.

सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे काही लोकांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. अर्थात काही मराठी लोकांनी मात्र व्यावसायिक म्हणून अटकेपार झेंडे रोवले.
नोकरी सोडून व्यवसायात जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी हे थोडं स्वानुभव आणि काही परिचित उद्योजकांचे विचार सांगतो. माझाच अनुभव यासाठी घेतो की मी सुद्धा मूळचा पक्का नोकरदार माणूस. फासे पडत गेले आणि आज लघुउद्योजक म्हणून का होईना पण ओळखला जातो आहे. तर काही मुद्दे:
१. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी भपकेदार प्रकरण आहे असं काहीही नसतं. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" किंवा "दुसऱ्यांची ऑर्डर घ्यायची आपल्याला नाही आवडत" असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू करण्यात काही मतलब नाही. लौकिकार्थाने बहुतेक यशस्वी व्यवसाय हे नाविन्यपूर्ण कल्पनेवर चालू झाले आहेत. यातील मेख अशी आहे की फक्त कल्पना ही नाविन्यपूर्ण असून चालत नाही तर त्यांनंतर व्यवसाय उभा करताना काम करण्याची पद्धती यात नावीन्यता, सातत्याने सुधारणा, व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा आणि वचनबद्धता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृद्धिधिष्ठित मानसिकता या सगळ्यांचा मिलाफ व्हावा लागतो. आणि हा एक प्रवास आहे. सातत्याने अशा पद्धतीचे मूळ सिद्धांत अंगात बाणवत जेव्हा वर्षानुवर्षे व्यवसायिक प्रवास केला जातो तेव्हा कुठे मग टाटा, एल अँड टी, रिलायन्स, इन्फोसिस, विप्रो यासारखे देशावर आणि जगावर सकारात्मक परिणाम करणारे व्यवसाय उभे राहतात.
२. व्यवसायात यशस्वी व्हाल अशी कोणती प्रस्थापित सूत्र, नियम नाही आहेत. बरं एका यशस्वी व्यवसायाचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची सुद्धा खात्री नाही. पण मार्गदर्शक तत्वे नक्की आहेत. त्यांचं जर अनुसरण केलं तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच. उद्योजकता शिकण्याचं सगळ्यात भारी विद्यापीठ म्हणजे, उद्योजक बनणे.
३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा शाळेत वाचलेल्या सुविचाराचा अंगीकार व्यावसायिक म्हणून पदोपदी करावा लागतो. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे.
४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं. निर्णय घेण्याची क्षमता यावर सातत्याने जाणीवपूर्वक काम करत गेलं तर त्या क्षमतेत वाढ होते.
५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही. "Planning without action is just hallucination." हे कुणीतरी म्हणून गेलं आहे.
६. मॅक्डोनाल्ड च्या रे क्रॉक च्या आयुष्यावर आधारित फाउंडर चित्रपटात एक भारी वाक्य आहे. Perseverance beats genius. एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हा गुण अनुभवाने अंगात भिनवावा लागतो.
७. स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवा. अजून एक गंमत सांगतो. एक स्वप्न जगात एकाच वेळी दोन माणसं बघत नाहीत.
वरील सात मुद्द्यात पहिले दोन हे वास्तव आहे आणि नंतर आलेले पाच सूत्र आहेत, व्यावसायिक बनण्याचे. हे मला जाणवलेले. दुसर्यांचे वेगळे असतील. रिकॅप म्हणून खाली लिहितो
1. Unlearning
2. Decisiveness and no procrastination
3. Action
4. Perseverance
5. Dream.


सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे काही लोकांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. अर्थात काही मराठी लोकांनी मात्र व्यावसायिक म्हणून अटकेपार झेंडे रोवले.

एक व्यावसायिक म्हणून जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी हे थोडं स्वानुभव आणि काही परिचित उद्योजकांचे विचार सांगतो.     

स १. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी भपकेदार प्रकरण आहे असं काहीही नसतं. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू करण्यात काही मतलब नाही. लौकिकार्थाने बहुतेक यशस्वी व्यवसाय हे नाविन्यपूर्ण कल्पनेवर चालू झाले आहेत. यातील मेख अशी आहे की फक्त कल्पना ही नाविन्यपूर्ण असून चालत नाही तर त्यांनंतर व्यवसाय उभा करताना काम करण्याची पद्धती यात नावीन्यता, सातत्याने सुधारणा, व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा आणि वचनबद्धता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृद्धिधिष्ठित मानसिकता या सगळ्यांचा मिलाफ व्हावा लागतो. आणि हा एक प्रवास आहे. सातत्याने अशा पद्धतीचे मूळ सिद्धांत अंगात बाणवत जेव्हा वर्षानुवर्षे व्यवसायिक प्रवास केला जातो तेव्हा कुठे देशावर आणि जगावर सकारात्मक परिणाम करणारे व्यवसाय उभे राहतात.     

व्य२. व्यवसायात यशस्वी व्हाल अशी कोणती प्रस्थापित सूत्र, नियम नाही आहेत. बरं एका यशस्वी व्यवसायाचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची सुद्धा खात्री नाही. पण मार्गदर्शक तत्वे नक्की आहेत. त्यांचं जर अनुसरण केलं तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच.      

३. ३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा शाळेत वाचलेल्या सुविचाराचा अंगीकार व्यावसायिक म्हणून पदोपदी करावा लागतो. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे.     

यो ४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं.     

कृ ५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही.

६. एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हा गुण अनुभवाने अंगात भिनवावा लागतो.     

  प ६. स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवावा लागतो.

यातील काही मुद्द्यावर आपण येणाऱ्या आठवड्यात सविस्तर चर्चा करू.


सकाळ, क्र २

Saturday 1 January 2022

सकाळ, लेख क्र १

लौकिकार्थाने अर्थार्जन करण्यासाठी आपल्याकडे किंवा किंबहुना जगात दोन समाजमान्य पद्धती आहेत. एक म्हणजे नोकरी करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे व्यवसाय करणे. नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही प्रकाराबद्दल काही वाद, प्रवाद आहेत, समज, गैरसमज आहेत. नोकरी करणे म्हणजे धोका कमी आणि व्यवसाय करणे म्हणजे धोका पत्करणे हा फरक सार्वत्रिक प्रचलित आहे. त्याचबरोबर नोकरी करणे म्हणजे "निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही" आणि व्यवसाय करणे म्हणजे "निर्णय घेण्याची पूर्णतः: स्वायत्तता आहे" असंही समजलं जातं. अजून एक लोकप्रिय समज म्हणजे नोकरीत अर्थार्जन करण्यावर मर्यादा तर व्यवसायात अफाट श्रीमंती येते. (श्रीमंती आणि संपन्नता यात फरक आहे आणि तो काय आहे, यावर नंतर कधीतरी चर्चा करू यात)

नोकरी आणि व्यवसाय यातील फरक हे थोड्याफार फरकाने कुणासाठी खरे असतीलही तरीही दोन्ही क्षेत्रात काम करताना तुम्हाला व्यवस्थापनाची शिडी वर चढत जायची असेल तर काही व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास होत जाणे ही गरज आहे. व्यवस्थापन पिरॅमिड चे तीन प्रवर्ग आहेत. एक म्हणजे डूअर, म्हणजे जो स्वतःच्या हाताने काम करतो, दुसरा म्हणजे मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक ज्याने दुसऱ्याकडून काम करवून घेणे अपेक्षित असतं आणि तिसरा भाग म्हणजे लीडर, नेता ज्याला लोक आदर्श मानतात आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर चालत, वैयक्तिक आयुष्यात जे इप्सित आहे त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात. 

या सगळ्या मॅनेजमेंट थिअरी मध्ये काही लोक असंही मानतात की लीडरशिप हा एक अंगभूत गुण असतो. म्हणजे कुणी जन्माला येतानाच तो (किंवा ती) हा गुण घेऊन पृथ्वीवर आला असतो. आणि काही जणांकडे हा गुण नसतोच. माझं स्वतःच याबाबतीत मत वेगळं आहे. माझ्या मते पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्यजीवामध्ये लीडर चे गुण असतात. फक्त सामाजिक इको सिस्टम मुळे त्याच्यातील अंगभूत लीडरशिप गुणांना चालना मिळत नाही. तर काही जण हा चॉईस म्हणून स्वीकारतात. माझ्यामते डूअर आणि मॅनेजर असताना झोकून काम केलं आणि त्याबरोबरच स्वतःतील वैगुण्य ओळखत त्यावर जर दिवसागणिक विचारधारेला नवनवीन आयाम देत राहिलं तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर लीडर बनण्याची प्रोसेस चालू होऊ शकते आणि ती झाल्यावर काही काळात तो किंवा ती एक यशस्वी नेता, व्यवसायिक म्हणून मान्यता पावतात हे मी अनेक केस स्टडीज मध्ये आजूबाजूला घडताना  पाहतो. अगदी थोडक्यात सांगायचं तर "मी आज जर कालच्या पेक्षा कौशल्य पातळीत सुधारलो नसेल तर मला उदयाला काही अवघड प्रश्न पडू शकतील अशी शक्यता आहे" ही विचारधारा अंगी बाणवत, स्वतःमधील व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करत जर वृद्धिधिष्ठित माइंडसेट ठेवला तर व्यावसायिकतेच्या निकषावर आपलं नाणं खणखणीत वाजेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. 

नोकरी की व्यवसाय याबाबत जसं आपल्या मनात सातत्याने द्वंद्व चालू असतं आणि त्याबाबत काही ग्रह आपण करून घेतले आहेत, त्याचप्रमाणे अजून दोन शब्दांचा अर्थ समजून घेण्यात आपण जरा गल्लत करतो आणि ते म्हणजे उद्योजक म्हणजे उद्योजक आणि व्यावसायिक. (Businessman and Entrepreneur). रूढार्थाने उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द आहेत असं वाटतं. पण या दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीत खूप फरक असतो हे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल. मी स्वतः उद्योजक या संज्ञेचा पुरस्कार करतो. पण इथं नमूद करू इच्छितो की बिझिनेसमन या संज्ञेला जागून जर कुणी त्यांच्या व्यवसायाची दिशा ठरवणार असेल तर त्यात चूक काहीच नाही आहे. फक्त याबाबतीतला फरक आपण समजून घ्यायला हवा ज्या योगे आपले विचार सुस्पष्ट होतील आणि व्यवसाय करतानाची मार्गदर्शक तत्वे आखण्यात आपल्याला मदत होईल. 

येणाऱ्या काही आठवड्यात या सदरामध्ये याच विषयातील बारकावे आणि कोणती व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करावी याबद्दल माझी काही मतं मांडणार आहे. सदर मतं ही माझ्याच ३२ वर्षाच्या अनुभवावर बेतली आहेत. 

नवीन वर्षाच्या आपल्याला आरोग्यमयी शुभेच्छा. 

सकाळ, लेख क्र १