Friday 3 April 2020

प्रकाशमान

टाळ्या वाजवायचं अपील केलं, वाजवल्यासुद्धा. पण तेव्हाही लिहायची इच्छा झाली होती, पण नव्हतं लिहिलं. इतक्या मोठया देशाचे प्रीमियर, आपण काय त्यांना सांगणार? कुठे ते राजा भोज अन कुठे मी गंगू तेली. कधी म्हणून त्यांचं भाषण ऐकलं नव्हतं, आज ऐकलं आणि घोर निराशा पदरी पडली. किती गोष्टी होत्या बोलण्याच्या? जेव्हा म्हणून आमच्या सारख्या उद्योजकांच्या लेव्हल ला आम्ही देशाचे प्रवक्ते म्हणून आम्हालाही काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांच्या उत्तराची दिशा या भाषणातून मिळायला हवी अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. कुठलाही प्रश्न आपण सब्जेक्टिव्ह पद्धतीने हाताळतो, त्यात ऑब्जेक्टिव्हिटी अजिबात नसते. संख्याशास्त्र आणि तर्कशास्त्र हे बाकी शास्त्राप्रमाणे खूप प्रगत झाले आहेत. ते वापरून देशाच्या जनतेला दिलासा देणारे कितीतरी अनुमान आपण बांधू शकतो.

१. साधारण पणे इकॉनॉमी चं किती नुकसान होतंय. पण पुन्हा एकदा काम चालू झाल्यावर आपण कसं जोमदार प्रयत्न करून झालेला लॉस भरून काढू यात. याचा सांख्यिकी स्तरावर अभ्यास करून व्यवस्थित विश्लेषण आणि विवेचन.

२. लोकसंख्या इतकी जास्त असूनही आपल्याकडे रुग्णांची संख्या जास्त का वाढली नाही याची लॉजिकल कारणं काय आहेत? आय सी एम आर च्या डायरेक्टर चं काय म्हणणं आहे?

३. आपण पाहिजे तितक्या टेस्ट करत नाही आहोत. एका सरकारचे प्रवक्ता म्हणून आपण या आरोपाचे कसे खंडन करता?

४. एक विशिष्ट वर्ग विचित्रासारखा वागून करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ करतोय, याबद्दल आपण काय इशारा देता?

५. सर्व राज्य सरकारे अत्यंत इमानेइतबारे काम करत आहेत. त्यांचं धैर्य वाढवणारे चार शब्द! अगदी राजकीय विरोधक असले तरी केजरीवाल किंवा ठाकरे साहेब यांच्या सारख्या नेत्यांबद्दल कौतुकाचे शब्द बोलू शकत होते.

६. एस एम ई सेगमेंट जो आज सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून देतो आहे त्यांना दिलासा म्हणून आपण काय प्रयत्न करत आहात. इथे काम करणारे लोक आपापल्या गावी गेले आहेत. लॉक डाऊन काढल्यावर त्यांना परत आणण्यासाठी काही विशेष व्यवस्था करणार आहात का?

७. काही शहरं असतील की जिथे सुरुवातीला पेशंट संख्या जास्त होती, पण नंतर तिथे कंट्रोल आला. अशा शहरांच्या नागरिकांचे अभिनंदन. 

८. या रोगावर लस शोधण्यासाठी देशात काय प्रयत्न चालू आहेत आणि आपण त्यामध्ये कुठल्या टप्प्यावर आहोत.

९. जागतिकीकरणावर या सगळ्या गोष्टीचे काय परिणाम होणार आहेत.

१०. कोणत्या उद्योगाने येणाऱ्या वर्षात जास्त प्रयत्न करून देश स्वयंपूर्ण करायचा आहे.

सर, आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आणि बाकी अनेक गोष्टीमुळे करोना प्रकरण अजूनही हाताबाहेर गेलं नाही आणि ते जाणारही नाही याची ग्वाही देता आली असती.

असो. यातून बाहेर पडण्याचे आम्ही लोक मार्ग शोधतो आहोतच. त्यात तुमचाही हातभार आहेच पण भविष्य कसं उज्वल आहे हे सांगितल्यावर काही दिवसांनी करोना साथ संपली असं ज्यावेळेस आपण घोषित केलं असतं हा अख्खा भारत "लख लख तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती" म्हणत तुम्ही न सांगता आम्ही प्रकाशमान केला असता.


No comments:

Post a Comment