Thursday, 21 May 2026

मागील आठवड्यात गोव्यात आमच्या इंडस्त्रीची कॉन्फरन्स अटेंड केली. काही डेटा पॉईंट्स सांगतो. 

उत्पादन क्षेत्राचं जी डी पी काँट्रिब्युशन हे गेली काही वर्षे १५-१७% टक्क्यांवर अडकलं आहे. मॅनेजमेंट मध्ये ग्लास सिलिंग इफेक्ट असतो. तसं उत्पादन क्षेत्र हे ग्लास सिलिंग ला जाऊन धडकलं आहे. भारताला तो सहभाग २५% पर्यंत न्यायचा आहे. पण काही बेसिक गोष्टी करण्यात अजूनही आपण चाचपडत असल्यामुळे ते १७% चं सिलिंग आपण तोडू शकत नाही आहे. ते तोडण्यासाठी त्रिमितीय जबरदस्त थ्रस्ट ची गरज आहे. 

जागतिक पातळीवर भारताकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक क्षेत्रातील बाजारपेठ म्हणून आणि जागतिक उत्पादन केंद्र म्हणून जगातले सगळे व्यावसायिक भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. आमच्याच क्षेत्राचा विचार केला तर जगातील सर्व देशात मशीन टूल या मदर इंडस्ट्री मध्ये घसरण चालू आहे. अपवाद फक्त भारताचा. जगात वर्षागणिक -३% अशी घसरण होत असताना भारतात मात्र पुढील दशकभर १०-११% ची वृद्धी अपेक्षित आहे. उत्पादन क्षेत्राची अनेक वर्षे वाहन उद्योगांच्या खांद्यावर होती. पण त्याबरोबरच आता एरोस्पेस, डिफेन्स, रेल्वेज, वूड इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग अशी अनेक क्षेत्रे उत्पादन क्षेत्र विकसित होण्यात हातभार लावणार आहे. 

या कॉन्फरन्स चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचा लक्षणीय सहभाग. ३००+ सहभागी झालेल्या व्यवसायिकांपैकी ४० एक जण हे २५ ते ३५ वयोगटातील होते. त्यापैकी बरेच जण हे परदेशात शिक्षण घेऊन भारतात व्यवसाय करण्यासाठी परतले होते. (बघता बघता मी ५८ वर्षांचा झालो आणि आतापर्यंत लोक "यंग इन्त्राप्रेन्युअर" उल्लेख करायचे त्या मलाच जाणवतं की आपली सद्दी संपली आहे 😊). फक्त एकच खुपलं की यात मराठी तरुण फार कमी होते. 

मला मराठी तरुणांना हे सांगायचं आहे की सामाजिक संवेदना आणि राजकीय विचारधारा जागृत असणं गरजेचेच आहे, पण त्याबरोबर तुमच्या करिअरला पण तितकंच महत्व द्या. भारतात पुढचं किमान एक दशक हे उत्पादन क्षेत्रात अनेक नवनवीन संधी आणणारं आहे, त्याचा फायदा घ्या. तुम्ही नोकरी करा वा व्यवसाय, उद्योजकीय मानसिकता अंगात बाणवून घ्या. आपल्या भवतालचं सोशल फॅब्रिक उसवण्याचं काम अनेक राजकीय एलिमेंट्स करत राहतील, त्यावर मात करत फक्त आपली भौतिक परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष द्या. राजकीय पक्ष तुमच्याकडे रेवड्या आणि चिंचोके टाकतील पण त्याचा उपयोग फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतील. आपली पत ही त्यापेक्षा जास्त मिळण्याची आहे हे ध्यानात असू द्या. त्यांनी फेकलेल्या ट्रॅप मध्ये न अडकता "कठोर परिश्रमाला पर्याय नाही" या पूर्वसूरींच्या उक्तीचं स्मरण करा. जगाला वेठीला धरणारे राजकीय नेते अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यांनी तयार केली भू राजकीय परिस्थिती आणि ते हे दोघेही बदलेल. पण त्याच बरोबर आता मिळालेल्या या संधीचा फायदा करून घेतला नाही तर ती पण हुकेल. लक्षात घ्या, अशीच संधी १९९५-९६ च्या सुमारास सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये आली आणि भारतातील मोठा प्रवर्ग भौतिकतेबाबत सुदैवी ठरला. पण त्या संधीत आणि उत्पादन क्षेत्राच्या संधीत एक मोठा फरक आहे. उत्पादन क्षेत्रातील संपूर्ण इको सिस्टम ची वाढ ही आपल्याच भूमीवर होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या व्हॅल्यू ऍडिशन चा फायदा हा फक्त आणि फक्त भारतातल्या लोकांना होणार आहे. 

लोहा गरम है, हथौड़ा मार दो!

No comments:

Post a Comment