Thursday 20 March 2014

आबा आणि नातू

माझ्या वडिलांचे निधन २००९ साली झाले. नील चा जन्म २००४ चा. पण ५ वर्षात दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. बाबा गेल्यानंतर पुढच्या ६ महिन्यात नीलचे काही विचार पहा ५-६ वर्षाचाच होता तो. ती निरागसता हलवून टाकते, अगदी आतून. 


बाबा गेल्यानंतर साधारण ३/४ महिन्यांनी आई सोसायटीत खाली गप्पा मारत बसली होती. तिच्याबरोबर कवूर काकू आणि शिंदे काकू बसल्या होत्या. दुर्दैवाने कवूर काका २००४ साली तर शिंदे काका फार पूर्वी expire झाले होते. माझा धाकटा मुलगा नील, त्यावेळेस ५ वर्षाचा होता, खाली त्यांच्याच आजू बाजूला खेळत होता. खेळता खेळता तो अचानक आजी जवळ आला आणि म्हणाला "पण हे असं का होतं, देव सगळ्या आबांनाच देवाघरी का घेऊन जातो"
********************************************************************************
माझे लग्न ९१ साली झाले. त्यावेळेस video cassette असायची. मला अचानक सापडली. मी तिला DVD मध्ये convert करून घेतली. मी, वैभवी, यश आणि नील माझ्या laptop वर तो कार्यक्रम बघत होतो. २०१० साली. आणि बाबा आले स्क्रीन वर. नील अचानक उठला आणि "आजी आजी" करत तिला ओढत घेऊन आला, म्हणाला "बघ, आबा बघ, आता खुश, आता रडू नकोस"
********************************************************************************
एकदा रात्री बेडरूमच्या खिडकीशी उभे राहून नील समोरच्या बिल्डींग कडे बघत होता. मी विचारले "काय रे काय बघतोस" म्हणाला "मी समोरच्या मोबाईल tower वर चढणार" म्हंटलं "का" म्हणाला "तिथून आकाश किती जवळ आहे" "मग?" "मग काय, मला आबांना भेटता येईल ना" मी निशब्द

********************************************************************************
मी चेन्नई ला चाललो होतो. नील नी विचारलं "पप्पा, विमानानी जाणार" मी म्हणालो "हो" नील परत "विमान खूप उंच ढगातून जाते का" मी bag भरत त्याच्याकडे लक्ष न देता "हो" थोडा वेळ गेला. माझं लक्ष गेलं तेव्हा नील शून्यात नजर लाऊन बसला होता. मी विचारले "विचार कसला करतो आहेस" माझ्या जवळ आला आणि म्हणाला "तुम्ही एक काम करा. विमान उंच ढगात गेलं कि खिडकी उघडा, बाहेर जा, आबांना घ्या आणि विमानात बसवा आणि त्यांना घेऊन या."!!!!
********************************************************************************


शरद पाटील च्या पोस्ट नि आठवणी जाग्या झाल्या आणि मनभर पसरून राहिल्या.

No comments:

Post a Comment