Tuesday 4 March 2014

It happens only in...........

खरं म्हणजे हा किस्सा मी लिहिणारच नव्हतो. पण डोक्यात फारच वळवळ चालू होती. तर विचार केला लिहूनच टाका.

तर झालं असं कि १५ दिवसांपूर्वी अस्मादिक दिल्ली हून पुण्याला येत होते. (कसलं भारदस्त वाटतय ना "अस्मादिक" आणि काय काय). विमान नागपूर ला थांबले. शेजारची तरुणी (पुढं वाचा, लागलीच "बर्या भेटतात शेजारी" असले विचार मनात आणू नका) आपल्या ४ वर्षाच्या कन्यकेला घेऊन उतरती झाली. माझी aisle ची जागा होती. नवीन प्रवासी येऊ लागले. कुतूहलाने मी माझ्या शेजारी कोण येतंय ते बघू लागलो.

तेवढयात आलीच, ती, डोक्यावरून ओढलेला घुंघट, हातभर बांगडया, आ तळहातकोपर्या पर्यंत पसरलेली मेहंदी (आसेतुहिमाचल या धर्तीवर) (आज काल "तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला" असलं गाणं कालबाह्य झालं आहे), गळ्यात दागिने अशी नवपरिणीत वधू. तिला खिडकीजवळच्या सीट वर जायचे होते. मुखदर्शन अपरिहार्य होते. रुपगर्विता जणू. म्हणजे अगदी ऐश्वर्या किंवा प्रियांका नाही पण परिणीती किंवा विद्या बालन पर्यंत. तिच्या मागेच तिचा नवरा होता. पण तिच्या मानाने काहीतरीच होता तो. म्हणजे अगदी उदय चोप्रा पेक्षाही बंडल. असं माझ्या मनात आलं. (आणि मग माझ्या लग्नाच्या वेळेस मला बघितल्यावर सोनईकरांच्या घरी कशी कुजबुज झाली ते जाणवलं. "डॉक्टर नाही तर, थोडा तरी उजळ बघायचा वैभवीने." काहीतरीच आहे हा आपल्या वैभूच्या मानाने" वैगेरे). आता मला वाटलं कि नवरदेव विराजमान होतील मधल्या सीट वर. पण नाही, मला मागे ढकलून, त्याने  त्याच्या वधूला आत जाऊ दिलं आणि त्या पाठोपाठ एक १४-१५ वर्षाचा बंड्या (बहुधा विद्याचा भाऊ असावा) मधल्या सीट वर विसावला.

मग उदय (हेच नाव ठेऊन देऊ) च्या मागे एक पगडी घातलेले वयस्कर गृहस्थ होते, त्यांना उदयनी aisle सोडून जी दुसरी रांग सुरु होते तिथल्या मधल्या सीट वर बसतं केलं आणि स्वतः त्या रांगेच्या aisle सीट वर बसला.

मला काही सुधारलं नाही. आयला हे नुकतंच लग्न झालेलं जोडपं पण असं वेगळं वेगळं का बसतंय. बरं असा विचार केला कि विमान उडल्यावर ताऊ जी झोपल्यावर विमानाचे लाईट बंद झाल्यावर बंड्या व उदय सीट exchange करतील आणि… बास (म्हणजे मी धुमारे उडवणं बंद करा म्हणतोय), तर तशीही काही शक्यता नव्हती. इनमिन १ तासाची फ्लाईट. फक्त उडताना आणि उतरताना लाईट बंद. ३०००० हजार फुटावर पोहोचलं कि विमानाचा ड्रायवर फुल उजेड पाडतो.

मागे एका पोस्ट च्या निमित्ताने विकास गोडगे आणि संतोष शेलार यांनी खूप कानपिचक्या दिल्या होत्या पण भोचक स्वभावाचा मी. एवीतेवी डाराडूर झोपणारा त्यादिवशी जागा राहण्यासाठी कॉफीचे  (रु ६०, तेवढंच daring आपलं) घुटके मारत हळूच उदय कडे बघत होतो. तर तो आपला विद्याकडे बघून स्मित करायचा आणि परत समोर बघायचा. विद्या पण बहुधा लाजून हसत असावी. ताऊ एव्हाना निद्रादेवीच्या आधीन झाले होते. मला राहवलं नाही, मी बंड्याला म्हणालो "तू उदयच्या सीट वर बस आणि त्याला इकडे बसू दे कि" तो म्हणाला "नाही जमणार". त्याचा कोल्ड response पाहून मी बंडयाला म्हणालो "एक काम करू यात, मी ताऊ जिच्या शेजारी बसतो, तू माझ्या जागी बस आणि उदयला ला विद्या शेजारी बसवू. म्हणजे ते काय करतात यावर तुला लक्ष पण ठेवता येईल." हे ऐकल्यावर बंड्याने तोंड वाकडं केलं आणि झोपल्याची pose घेतली.

मी विचार केला कि आता उदय ला च आपण proposal द्यावं. पण तो पठ्ठ्या विदयाकडे बघून मुरकं मुरकं हसण्यात इतका गर्क होता कि माझ्याकडे लक्षच देत नव्हता. एव्हाना ताउजी पण डोळे किलकिले करू लागले. शेवटी ठरवलं कि विदयालाच propose करावं कि…… अरे काही चुकली का वाक्यरचना! ठीक आहे जसा मी विचार सोडून दिला तसंच हे वाक्य पण सोडून देतो.

एव्हाना विमानाच्या ड्रायवर ने, यावेळेला बहुधा cleaner असावा, उद्घोषणा केली कि विमान थोडया वेळातच पुणे विमानतळावर (हवाई अड्डा, कसला भंगार शब्द आहे ना, अड्डा काय!) उतरणार आहे. बंड्याने पण झोपेचं सोंग बंद केलं. मी त्याला विचारलंच "का रे हलला नाहीस लेका" तर म्हणाला "जीजू नही आते थे, ताउजी जो साथ मे है!"

विमानातून खाली उतरलो. अजूनही बंड्या आणि विद्या बरोबरंच चालत होते आणि उदय ताउजीना पुणे विमानतळाची माहिती देताना दिसत होता. (सुखोई squadron बद्दल सांगत असावा)

मी अवाक. शप्पथ, कसले एकएक अनुभव येतात ना. ( माझ्या पोराला तर मी आत्ताच unwanted झालो आहे. ताउजी एवढा झालो  तर बरोबर प्रवास, आणि तेही लग्नानंतर लगेच, तर फार दूरचं, १०० मी च्या त्रिज्येत उभं राहू देणार नाही)


No comments:

Post a Comment