Monday 3 October 2022

ब्रेन ड्रेन

 आजकाल बऱ्याच वेळा हे दिसून येतं आहे की अनेक घरातून मुलं मुली हे परदेशात शिकायला जातात आणि तिकडेच नोकरी पकडून सेटल होतात. बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे "आजची तरुणाई पैशाच्या मागे लागली आहे" किंवा "चंगळवाद फोफावला आहे" इतकं बोलून त्या वस्तुस्थितीची बोळवण करून टाकतो.  ही तिकडे गेलेली मुलं मुली भारतात असणाऱ्या लोकांचा चेष्टेचा विषय बनतो. 

माझ्या मते आपण हे सगळ्या गोष्टीकडे फार सुपरफिशियल पद्धतीने बघतो आहोत. म्हणजे अगदी माझीच केस स्टडी घेऊ यात. माझा व्यवसाय हा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. देवकृपेने बऱ्यापैकी नाव वगैरे कमावलं आहे. एका मल्टी नॅशनल कंपनीशी सामंजस्य करार झालेला आहे. बरं सेटको बोर्ड आमच्या मुलांना कंपनीत घ्यायला तयार आहे. तरीही माझा मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनियरिंग करून एम एस करण्यासाठी अमेरिकेत गेला आहे आणि परत येण्याची सुतराम शक्यता नाही आहे. माझ्या पार्टनर ची मुलगी सुद्धा सेटको त काम करून आता अमेरिकेला गेली आहे. आणि तिची पण परतण्याची शक्यता धूसर आहे. यापलीकडे जाऊन माझ्या मोठ्या मुलाने नील ला मेकॅनिकल इंजिनियरिंग न घेता कॉम्पुटर सायन्स घ्यायला लावलं आहे आणि त्यालाही तो तिकडे बोलावतो आहे. 

माझ्या देशप्रेमाच्या मला फार गप्पा मारायला आवडत नाही. पण ज्या पद्धतीने मी कंपनी चालवतो त्यावरून माझ्या कंपनीतल्या लोकांनाच नव्हे तर माझ्या अमेरिकन काउंटर पार्ट ला पण माहिती आहे की माझं भारतावर आणि इथल्या लोकांवर किती प्रेम आहे ते. त्यामुळे ती भावना घरात पण झिरपलेली आहे, असा माझा समज आहे. 

आता प्रश्न हा आहे की इतकं असलं तरी माझी पोरं बाहेर राहण्याचा विचार करत आहेत. मग याचं उत्तरदायित्व आपल्या सोशल इको सिस्टम वर आहे असं माझं हळूहळू मत बनत चाललं आहे. 

आपल्या इथलं असलेलं क्वालिटी ऑफ लाईफ, मग त्यामध्ये रस्त्याची कंडिशन, सार्वजनिक स्वच्छता, आपल्या इथं असणारी जातिव्यवस्था, धार्मिक भावनेचं झालेलं अति उन्मादीकरण या आणि यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात असा माझा दावा नाही तर कयास आहे. घरापासून कॉलेज पर्यंत जाताना फ्लेक्स वर दिसणारे भावी नेते जे गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून असतात, कानावर सातत्याने पडणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या बातम्या, शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात राजकारण्यांचा झालेला शिरकाव या सगळ्यांचा तरुणाईच्या मनावर सबकॉन्शसली फरक पडत नसेल असं जर आपल्याला वाटत असेल तर मोठी गल्लत होत आहे.

वानगीदाखल दोन घटना सांगतो. सहावी सातवीत असताना निलला शाळेतर्फे ट्राफिक कंट्रोल कसा करायचा हे शिकवायला रस्त्यावर नेलं होतं. लाल सिग्नल असल्यामुळे ते बारा वर्षाच्या पोराने एक इनोव्हाला हात दाखवून अडवलं. तर त्या गाडीतल्या पांढरे कपडे आणि सोनसाखळी घातलेल्या सद्गृहस्थाने निलला, बारा वर्षाच्या पोराला "ए ***चोद चल, बाजूला हो" असं सांगून गाडी पुढं दामटली. 

सिंहगडच्या पायथ्याला काही गावकरी आपल्या शेतात कार पार्किंग साठी जागा देतात. यश, नील आणि मी असे तिघेही होतो. सिन असा होता की आमच्या शेजारी एका पोलीस अधिकाऱ्याची एर्तिगा होती. तो अधिकारी आपल्या कुटुंबकबिला घेऊन आला होता. पण बाहेर जाताना त्या गावकऱ्याने त्याला पार्किंग चे ३० रु मागितले तेव्हा "पैसे कसले मागतोस हरामखोर" असं म्हणत निघून ती गाडी निघून गेली. 

अशा घटनांचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत नसेल का? घरातील एक सद्भाव वातावरण आणि घराच्या बाहेर जे १२ एक तास असतात तिथलं विचित्र वातावरण यामुळे ही तरुणाई कन्फ्युज होत नसेल का? 

त्यामुळे हे बिघडलेलं सोशल इंजिनियरिंग जर आपण बदललं नाही तर हे प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत जाणार आहे. आज अनेक शहरात बिल्डिंगमध्ये फक्त म्हातारे लोक राहत आहेत. राष्ट्रप्रथम ही भावना खऱ्या अर्थाने मनात रुजवायची असेल तर शैक्षणिक, मनुष्यबळ विकास, सामाजिक विकास या मूलभूत गोष्टीवर अगदी मुळापासून काम करत प्रगल्भ समाज बनवणं ही काळाची गरज असणार आहे. 


ब्रेन ड्रेन 

No comments:

Post a Comment