Thursday 17 February 2022

माझे एक ओळखीचे गृहस्थ आहेत. एका बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी मशीन ऑपरेटर म्हणून काम चालू केलं. १९८५ च्या सुमारास. पुण्यात आले तेव्हा खिशात तीस रुपये होते. काम इमानेइतबारे केलं. कष्ट केले. काम करत एक वन बीएचके फ्लॅट घेतला. जिथं घेतला तो त्या काळात पुण्याच्या बाहेर एरिया होता. कालपरत्वे तिथं चांगली डेव्हलपमेंट झाली. 

तीन एक वर्षांपूर्वी त्यांनी रिटायरमेंट घेतली. पुण्यापासून साठ किमीवर त्यांचं गाव आहे. तिथं छोटं टुमदार घर बांधलं. घरामागे तीन साडेतीन एकरचं शिवार आहे. तिथं शेती करतात. कंपनीतून रिटायरमेंट घेताना चांगले पैसे मिळाले. ते व्यवस्थित इन्व्हेस्ट केले. त्याचे आता चांगले रिटर्न्स मिळतात. एस डब्ल्यू पी ने जितके हवे तितके पैसे त्यांना दरमहा मिळतात. 

वन बीएचके फ्लॅट च्या बिल्डिंग मध्ये होता ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये गेली. तिथं टू बीएचके फ्लॅट मिळाला. तिथं मुलगा राहतो. मुलीचं लग्न झालं आहे. 

आयुष्यात सुरुवातीला काय वांदे झाले असतील तितकेच. आता कसली ददात नाही आहे. सगळं निवांत आहे. 

म्हंटलं तर अगदी सरधोपट स्टोरी.  

आणि म्हंटलं तर आयुष्याचा बराच काळ आर्थिक स्थैर्य. मला असं नेहमीच वाटत आलं आहे की असे लोक ज्यांनी आपले खर्च आपल्या कमाईला अनुसरून ठेवले त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ हे एखाद्या श्रीमंत माणसापेक्षा कमी नसतं. आर्थिक साक्षरता म्हणतात ती ही. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी खूप पैसेच कमवावे लागतात असं नाही आहे, पण आपले रिसोर्सेस व्यवस्थित प्लॅन करून मंथली आऊटफ्लो ला बीट करणारा इनफ्लो ठेवला की आर्थिक स्थैर्य येतं. नाहीतर खूप पैसे कमावल्यावर सुद्धा आर्थिकदृष्ट्या अस्थिरता असणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतोच की!

No comments:

Post a Comment