Thursday 14 May 2015

मंथन.

मी राजेश मंडलिक, वय ४६, व्यवसायाने इंजिनियर.

व्यवसायात येणाऱ्या ताण तणावापासून दूर पाळण्यासाठी पहिल्यांदा ब्लॉग चा अन नंतर फेसबुकचा सहारा घेतला. माझं लिहिणं ही माझी गरज आहे. लोकांना ते आवडलं तर ह्याचा अर्थ ते कुठं तरी मनाला भावत असेल. पण म्हणून मी लोकांसाठी लिहितो असं जर कुणाला वाटत असेल तर हे धादांत खोटं आहे. माझ्या मनातल्या भावभावनांचा निचरा व्हावा म्हणून लिहितो.

कुणी मला लेखक वैगेरे म्हंटल की माझ्यातल्या इंजिनियरला धक्का पोहोचतो. कारण अभियंता ही प्रतिमा मला जास्त जवळची आहे. हे ब्लॉग लिहिणं, आय पॅड वर फेसबुकवर कॉमेंट टाकणं, स्मार्ट फोन चं इंटरनेट चं बिल भरणं, झालंच तर घरचा किराणा, कपडे लत्ते, गाडीचं डिझेल हे सगळं मला मी अभियंता असल्यामुळे शक्य होतं. लेखक मंडळी हे सगळं करू नाही शकत असं मी म्हणत नाही. त्यांच्या लेखनातून हे सगळं जमवत ही असतील ते. पण म्हणून त्यांनाच  लेखक म्हणणं जास्त योग्य ठरतं.  मला नाही. मी अ….भि…यं……ता.

एखादया लेखकाला कपडे शिवायची आवड असेल अन कादंबरी लिहिताना त्याने दोन चार टाके मारले तर त्याला तुम्ही शिंपी म्हणाल का?

आज ही माझं मन कंपनीतल्याच घटनांनी उचंबळतं किंवा खट्टू होतं. एखादी चांगली ऑर्डर मिळाली की नाच, कुठे फेल्युअर झालं की बस चिडचिड करत. 

मी कुठल्याही कमाई साठी लिहिलेलं आंतरजालावर टाकत नाही. त्यामुळे ते कुणीही चोरलं तर मला काही फरक पडत नाही. त्यातून त्याला मानधन मिळत असेल तर कदाचित मला थोडा राग येईन. पण मी सुद्धा कमाई साठी लिहिलं अन कुणी ते चोरून जर पैसे कमवायचा प्रयत्न केला तर मात्र मी त्याला योग्य तो न्याय देईन. शाब्दिक, कोर्ट कचेरी…… अगदी काहीही. अन्यथा मी जे लिहितो ते कुणीही, कुठेही टाकू शकतं. स्वत:च्या भिंतीवर (ती पण बोंबलायला खरं तर तुमची नाही), WA वर किंवा कचरा पेटीत.  कुठेही. लिहिल्याचं श्रेय लिहिणाऱ्याला देणं हा सदसदविवेक बुद्धीचा भाग आहे. तो ज्याचा त्याचा प्रश्न. माझी स्वत:ची विवेक बुद्धी जागृत आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. मार्क झुकेरबर्ग ला मार्केंडेय शब्द मीराताई नी वापरला, हे सांगून टाकतो. "लोकांच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतीलही कदाचित, दु:ख मात्र एक समान असतात" हे शरद चं वाक्य हे मी invariably लिहितो. तसंही भासमान जगातल्या दांभिकपणाचं मनावर ओझं असताना उसन्या शब्दांचं अन वाक्याचं ओझं कशाला?

इथल्या लिखाणात अन वाचनात व्यवहार नाही म्हणून गोडी टिकून आहे असं माझं मत आहे.


बरेच जण म्हणतात पुस्तक लिही. माझं मत सांगतो. फेसबुक लिखाण हा एक फॉर्म आहे. त्याला कवितेला असतं तसं एक मीटर आहे. ते जमलं म्हणजे पुस्तक बिस्तक जमेल असं काही नाही. तो वेगळा प्रांत आहे. त्याला समर्पणाची भावना लागते. एकदा deliverables मागे लागले की पळता भुई थोडी होते.      

तसाही माझ्यावर आत्ममग्नतेचा आरोप होतोच. तुम्ही बघितलं असेल तर मी जे लिहितो ते माझ्या भोवती फिरतं. ते खरं तर मी माझ्या ऐवजी मोहन, संजय, प्रदीप असं काही नाव टाकून लिहू शकतो. ते फिक्शन होऊ शकेल. पण ती माझीच फसवणूक असेल. परवा मिथिला सुभाष म्हणाल्या "माणसाने प्रथमपुरुषी एकवचनी लिहिले म्हणजे ती त्याची आत्मकथाच  असते का? फिक्शन असू शकत नाही का?" विचार करावा.

आता माझ्या सत्य अन काल्पनिकता याचं जोड असणार्या लिहिण्याला साहित्यिक मुल्य असते का? मला नाही वाटत.

तुम्ही माझे मित्र आहात, मित्रच रहा. वाचक बनू नका.

असो. काही घटना, काही संवाद, काही वाद, काही प्रतिवाद यावरून झालेलं मंथन.

No comments:

Post a Comment