Tuesday, 14 October 2025

कॉलेज ब्रँडिंग

व्यवसाय सुरू करून दहा बारा वर्षे झाली होती. सेटको बरोबर सामंजस्य करार पण झाला होता. त्या काळात कुठल्याही बिझिनेस ओनर्स च्या मिटिंग ला गेलो की आमचं एक आवडतं डिस्कशन असायचं आणि ते म्हणजे माणसं मिळत नाहीत. शिक्षणाचा घसरलेला दर्जा, इंजिनियर्स लोकांना काहीच कसं येत नाही, आय टी इंडस्ट्री ने कसं आपले लोक पळवले वगैरे. तास दीड तास या विषयावर कीस पाडला की आमच्या जीवाला बरं वाटायचं. 

काही काळाने मला त्या चर्चेचा वीट आला आणि मी या प्रश्नाला काही वेगळं उत्तर आहे का यावर विचार करू लागलो. त्याच सुमारास आर सी पी आय टी शिरपूर चे प्राचार्य जयंतराव पाटील यांनी मला त्यांच्या कॉलेज मध्ये भाषणासाठी निमंत्रित केलं. ते आणि पुढची अजून एक दोन भाषणं झाल्यावर मला हे जाणवलं की एकुणात मेकॅनिकल इंडस्ट्री बद्दल मुलामुलींच्या मनात अनेक गैरसमज होते. तिथे करिअर ग्रोथ च्या संधी आहेत की नाही याबद्दल शंका होत्या. त्यातही एम एस एम इ च्या बद्दल अढी च होती म्हणा ना. याला कारण इंडस्ट्री ची संकुचित ध्येय धोरणे पण होती. 

मी माझ्या कंपनी पुरता हा प्रश्न सोडवायचा ठरवलं. कुठल्याही कॉलेज मधून बोलण्यासाठी निमंत्रण आलं तर ते नाकारायचं नाही. त्यामध्ये दोन उद्देश होते. एक सेटको च नाव इंजिनियर्स लोकांना त्यांच्या कॉलेज च्या दिवसापासून माहीत व्हावं आणि दुसरं म्हणजे या फिल्ड मध्ये काय संधी आहेत आणि कसं कोअर ला चिकटून राहिलं तर लॉंग टर्म करिअर ग्रोथ प्लॅन करता येईल. 

२०२० मध्ये कोविड आला. त्यानंतर मात्र हे कॉलेज मध्ये जाऊन बोलण्याचा धडाका लावला. उत्पादन क्षेत्र वेगाने वाढणार याचे संकेत होते. आमचा नवीन एच आर हेड मयूर जॉईन झाला. त्याला मी एकच सांगितलं "I want to change problem of scarcity of manpower to problem of abundance". 

डिजिटल मार्केटिंग, लिंक्ड इन ऍड, मॅन पॉवर एजन्सी, आणि कॉलेजेस मधून केलेलं ब्रँडिंग या सगळ्या फ्रंट वर काम केल्यावर आता परिस्थिती अशी आहे की बिझिनेस मिटिंग मध्ये माणसं मिळत नाही हा मुद्दा चर्चेला आला की मी गप्प होतो. आणि एके काळी अप्रसिद्ध असणाऱ्या कॉलेज मधून लोक घेऊन समाधान मानणाऱ्या सेटको मध्ये आज चांगल्या कॉलेजेस मधली मुलं मुली इंटर्नशिप करतात, जॉब साठी अप्लाय करतात. 

तर सांगायचं हे आहे की कॉलेज मध्ये जाऊन भाषण देणे हे माझं व्यावसायिक धोरण आहे. त्यांनी बोलावणं आणि मला ऐकणं ही त्यांची गरज नाही आहे तर मी तिथं जाणं आणि माझे विचार त्यांना ऐकवणे ही माझी, व्यवसायाची गरज आहे. ज्या असोशीने मी कस्टमर कडे ऑर्डर मागायला जातो त्याच भावनेने मी कॉलेजेस मध्ये पण जातो. त्यातून काल कॉमेंट मध्ये काही मित्रांनी लिहिलं की मी पुढची घडवतो आहे. खरंतर असं जर काही होत असेल तर तो माझ्यासाठी हा स्वार्थ साधून परमार्थ आहे. 

माझ्याकडे दोन चॉइसेस होते. एक, प्रचलित पद्धतीप्रमाणे माणसं मिळत नाही या प्रश्नाबद्दल चर्चेचं दळण दळायचं किंवा काहीतरी वेगळा मार्ग निवडून यावर उपाय शोधायचा. 

मी दुसरा चॉईस निवडला. आहे हे सगळं असं आहे. 

Monday, 6 October 2025

सातत्य

जे एन इ सी मध्ये एका मुलाने प्रश्न विचारला "डिप्लोमा करून इंजिनियरिंग करतो आहे. पण जे विचारांमध्ये सातत्य नाही आहे. काय करू?" प्रश्न साधाच होता पण महत्वाचा होता. 

मला असं वाटतं मुलामुलींपेक्षा, बदललेली परिस्थिती असं होण्याला जास्त कारणीभूत आहे. म्हणजे मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा डोक्यात एकच गोष्ट फिट होती ती म्हणजे कुठल्या तरी इंजिनियरिंग क्षेत्रातील कंपनीत जॉब ला लागणे. या बेसिक गोलपासून दूर करण्यासाठी कुठलेही एलिमेंट्स कार्यरत नव्हते. ना मोबाईल नव्हते, ना मॉल होते, ना ओटीटी प्लॅटफॉर्म होते, ना टीव्ही होते, ना सोशल मीडिया होता. यु ट्यूब नव्हतं, पॉडकास्ट नव्हतं. हे हात जॉब करण्यासाठी नव्हे तर जॉब देण्यासाठी जन्माला आलेले आहेत अशी आवेशपूर्ण भाषणं देणारी विवेक बिंद्रा सारखे लोक नव्हते. इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून वडापाव ची गाडी टाकणारे लोक नव्हते किंवा एमबीए चहावाला नव्हता. 

याउपर क्षेत्र पण फिक्स. मेकॅनिकल इंजिनियर झाला की ऑटो किंवा त्याचे पार्टस बनवणारी कंपनी, मेकॅनिकल पार्टस किंवा प्रोजेक्ट्स करणारी कंपनी आणि तत्सम. बाकी ब्रांचेस पण हीच तऱ्हा. 

मग दिवस बदलत गेले. सगळ्या इंजिनियर्स ला सामावून घेणारे आय टी क्षेत्र आलं, माहितीचा प्रचंड फ्लो चालू झाला. इन्फोडेमिक आलं. अनेक सुविचार, कोट्स यांचा भडिमार युवा तरुणांवर व्हायला लागला. सरधोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळं करायचं अशा संधी आल्या खऱ्या पण त्या युवकाने विचारलं तसं कन्फ्युजन पण वाढलं. 

यावर उपाय काय? आहे सोपा पण इम्प्लिमेंट करायला तितकाच अवघड. 

गोल, फोकस, सिद्धांत, पर्पज हे एकेकाळी फक्त मॅनेजमेंट जार्गन्स होते. कधी नव्हे ते वैयक्तिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं झालं आहे. "मेडिटेशन वगैरे आपल्यासारख्या नॉर्मल लोकांसाठी नाही रे. मोठ्या लोकांचे चोचले आहेत" ही विचारधारा  सोडून द्यायला हवी. व्यायामाचा उद्देश हा  स्वतःला फिजिकली फिट ठेवणे तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त मेंटली फिट हा आहे हे लक्षात ठेवण्याची निकड निर्माण झाली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे २००० च्या आधी रस्ता एकच असायचा. आता अनेक आहेत. कुठला घ्यायचा यावर साधकबाधक विचार करून निर्णय घेणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी आपलं स्वतःबद्दल चं अंडरस्टँडिंग वाढवणं महत्वाचं झालं आहे. तुम्ही कसे आहात आणि काय करायला पाहिजे हे सांगणारे बाहेर अनेक आवाज तुमच्या कानावर आदळत राहतील. कधी नव्हे ते मनाच्या आवाजाला प्रथम प्रायोरिटी देण्याची गरज निर्माण  झाली आहे. उपलब्ध असलेल्या साऱ्या संधींना नॅरो डाऊन करत दोन तीन मार्ग शोधणे, त्या मार्गावर चालण्यासाठी काय स्किल सेट्स लागणार त्याची माहिती घेऊन ते अक्वायर करणे आणि मुख्य म्हणजे आजूबाजूला काय चालू आहे ते बघून विचलित न होता, जे ठरवलं त्याकडे शांतपणे मार्गक्रमण करणे यात शहाणपण आहे, असं माझं मत आहे. जुन्या काळातील छान इंग्लिश वाक्य आहे "A bird in hand is better then two in bush" हे फॉलो करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

म्हणून म्हंटलं सुरुवातीला की प्रश्न साधा आहे पण महत्वाचा आहे. आजूबाजूला कोलाहल खूप आहे. त्यामध्ये राहून स्वतःच अस्तित्व हरवू न देण्याचं अवघड काम तरुणाईच्या खांदयावर आलं आहे. 

त्या युवकाला थोडक्यात उत्तर दिलं होतं, त्याचा विस्तार झाला तो असा. 

दसरा मेळाव्याची थोडी भाषणं ऐकली. डोक्याची मंडई झाली. कारण त्याच दिवशी आपलं घरच्या गाड्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पोहोचल्या होत्या. आणि तिथली विदारक परिस्थितीची जाणीव फोटो आणि व्हिडीओ बघून होत होती. मनात विचार आला आमच्यासारख्या साध्या लोकांना अशा बिकट प्रसंगी काय करायचं ते सुचतं, मित्रपरिवार आवाहन केल्या केल्या भरभरून मदत करत होता, स्वयंसेवक, डॉक्टर्स, परिचारक आणि परिचारिका दसऱ्याच्या दिवशी घर सोडून पूरग्रस्त विभागात जायला तयार झाले होते. आणि राज्याचे शासक अन त्यांचे विरोधक  मात्र मेळावे करण्यात आणि त्याहून वाईट म्हणजे एकमेकांना शिव्या देण्यात मश्गुल होते. 

परवा छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला येत होतो. तेव्हा लक्षात आलं की नेवासा ते अहिल्यानगर एंट्री या ७५ किमी अंतरात रस्ताच उरला नाही आहे. या खड्डेयुक्त रस्त्यावरून गाडी चालवत असताना मनात आलं की तीन महत्वाची औद्योगिक शहरं जोडणारा हा रस्ता. आपण काय इफिशियंसी किंवा प्रॉडक्टिव्हिटी बद्दल बोलणार? संभाजीनगर ते पुणे या २३० किमी च्या प्रवासाला साडे सहा तास लागले. कारचा सरासरी स्पीड झाला ३५ किमी प्रति तास. म्हणजे मालवाहतूक करणारे ट्रक्स तर प्रवास करतील २० किमी प्रति तास. त्याशिवाय ट्रक्सच्या ऍक्सल चा, शॉक ऍब्स चा बल्ल्या वाजणार तो वेगळाच. (कारला थोडी तरी जागा होती, डिव्हायडर ला चिटकून कार चालवली तर ५० किमी बरी चालली. अर्थात २५ किमी ५ किमी प्रति तास अशी चालवल्यावर बाकी पार्ट्सला धोका कमी). 

चार वाजता संभाजीनगर हून निघाल्यावर साडेसात ला अहिल्यानगर आणि नंतर रात्री साडे दहाला घरी पोहोचलो.  झोपताना मी हाच विचार करत होतो, की का इतकी वर्षे झाली पण रस्ता या महत्वाच्या विषयावर आपण सगळे इतके निरिच्छ का झालो आहोत? का छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकांनी आंदोलनं करून रस्ते सुधरवले तसे इतर ठिकाणी होत नाही? 

डोक्यात विषयाची गर्दी झाली होती. एक दिवस आधीची राजकारणी लोकांची भाषा आणि दुसऱ्याच दिवशी अनुभवलेली पुणे-छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याची झालेली वाईट हालत. 

तितक्यात आठवलं की छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन गावांच्या मध्ये एक इमामपूर म्हणून खेडं लागलं होतं. विचार केला हा रस्ता व्हायचा तेव्हा होईल. उत्पादकता आणि इफिशियंसी या विषयावर बाकी देशातील लोक माझ्या देशातील लोकांना खिजवतात ते सहनही करू. पण हे इमामपूर गावाचं नाव बदलायला हवं. रस्ता चांगला होण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. आणि अतिशय महत्वाचा विषय माझ्या डोक्यात आला याबद्दल मी मलाच शाबासकी दिली. डोक्यातले विचार शांत झाले. मी निवांत झोपी गेलो. 

Saturday, 4 October 2025

गुणवत्ता

मध्ये मी टाटांच्या कार वर निगेटिव्ह कॉमेंट केली म्हणून मला मेसेज आला की "इतर वेळेस टाटा ग्रुपचं गुणगान गाता, मग कार बद्दल हे मत का?" त्यांना काय उत्तर दिलं ते जाऊ द्या पण एखाद्या प्रॉडक्टची स्वीकारार्हते साठी त्याची गुणवत्ता हा पहिल्या क्रमांकाचा गुण लागतो हे मी अनुभवावरून सांगतो. आणि दुसरा गुण लागतो, उच्च दर्जाची सेल्स आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस.

एक गोष्ट सांगतो. आमच्या फिल्ड मध्ये एक सी एम एम नावाचं हाय एन्ड मेट्रोलॉजी इक्विपमेंट लागतं. कार्ल झाईस किंवा हेक्झॉगोन नावाच्या बाहेरच्या प्रॉडक्ट ने मार्केट कवेत घेतलं आहे. त्यामुळे माझे अमेरिकन पार्टनर्स च नव्हे तर माझा क्वालिटी मॅनेजर सुद्धा इंपोर्टेड मशीन विकत घ्यावी या मताचा होता. पण मी मात्र पुणे स्थित ऍक्युरेट गेजिंग म्हणून विक्रम साळुंखे यांची कंपनी आहे, तिच्या पारड्यात वजन टाकलं. कारण मला खात्री होती की ती मशीन आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची आहे. आज ऍक्युरेट ची मशीन गेली दोन वर्षे उत्कृष्ट काम करत आहे.  मेक इन इंडिया विथ ग्लोबल क्वालिटी. 

टाटा ग्रुप च्या टीसीएस ने आमच्या सारख्या छोट्या कंपनीसाठी इऑन नावाची इ आर पी सिस्टम काढली. आम्ही ती वापरली. चांगली क्वालिटी आणि तितक्याच तोडीची सर्व्हिस. आम्ही काही तिकीट रेझ केलं की पटापट सूत्र हलायची आणि प्रश्न सोडवला जायचा. (काही वेगळ्या कारणांमुळे आम्ही दोन वर्षांपूर्वी इऑन वरून दुसऱ्या इ आर पी वर शिफ्ट झालो आहोत)



तर मत असं आहे की मेक इन इंडिया हा ड्राइव्ह छान आहेच. पण ते प्रॉडक्ट विकण्यासाठी, लोकप्रिय होण्यासाठी फक्त तोच निकष नसून गुणवत्ता आणि विक्रीपश्चात उत्तम सेवा हे दोन महत्वाचे निकष आहेत. 

Friday, 19 September 2025

स्लो लिव्हिंग

समीर ने स्लो लिव्हिंग हा कन्सेप्ट पकडून एक पोस्ट लिहिली पण ते पूर्ण उलगडून सांगितलं नव्हतं. म्हणून मला जे कळलं ते लिहायचा प्रयत्न करतो. 

सगळ्यात पहिले म्हणजे स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही आहे ते सांगतो. स्लो लिव्हिंग म्हणजे आळशी पणा नव्हे. ते म्हणजे विरक्ती येणे नाही. सगळं सोडून निरिच्छता येणे नाही. 

माझ्या मते स्लो लिव्हिंग म्हणजे कॉन्शस पणे जगणं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एखाद्या महत्वाच्या गोष्टीला जास्त वेळ देणे आणि तो ही बिन महत्वाच्या गोष्टीचा वेळ कमी करून. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी ऑफिस ला जाताना वेगाने गाडी दामटणे, हे अनेकांच्या आयुष्याचं रेग्युलर फिचर आहे. मला यासाठी दोन महत्वाची कारणं वाटतात. एक सकाळी उशिरा जाग येणे आणि दुसरं सकाळच्या वेळी मोबाईल चा वापर करणे. 

आता सकाळी लवकर उठायचं असेल तर त्याचा अर्थ कमी झोप घेणे नाही तर आदल्या रात्री लवकर झोपणे. आणि सकाळी ऑफिसला जाण्याआधी मोबाईल कमीत कमी वापरणे. रात्री विनाकारण जागणे आणि सकाळी मोबाईल वापरणे या दोन्ही कमी महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यातला वेळ काढून महत्वाच्या गोष्टीला म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी लवकर निघणे आणि गाडी हळू चालवणे यासाठी देणे. 

अजून एक उदाहरण देतो. बऱ्याच लोकांना बँक टू बँक कमिटमेंट द्यायची सवय असते. म्हणजे चार ते पाच एक मिटिंग घ्यायची आणि मग एक तास प्रवास करून सहा ते सात दुसरी मिटींग प्लॅन करायची. बरं इथं चार ते पाच मिटिंग लांबण्याची किंवा एक तास प्रवास मध्ये ट्राफिक जॅम ची शक्यता अकौंट केलेली नसते. सहाच्या मिटींगला उशीर झाला की दिलगिरी व्यक्त करणे, काही थापा मारणे असा प्रकार करावा लागतो. इथे तुम्ही सहाची मिटिंग साडेसहा ला ठेवणं किंवा अगदीच जमत नसेल तर ती न करणं  संयुक्तिक राहतं. 

यासाठी अजून एक महत्वाचा गुण बाणवावा लागतो. तो म्हणजे प्रायोरटायझेशन. दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पण त्यापैकी गरजेची कुठली आहे हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एका वेळेस दोन घोडयावर मांड ठोकता येत नाही. 

गरजा कमीत कमी ठेवणे. One can always build ability to get whatever he/she needs, but may not get whatever he/she wants. असं एक इंग्रजी वाक्य खरं आहे. घर, गाडी, सध्या ज्याची क्रेझ आहे तो मोबाईल फोन अशा अनेक गोष्टीबाबत आपण आपल्याला जितकी गरज आहे त्यापेक्षा +१ गोष्टी बाळगायचा अट्टाहास धरतो आणि या गोष्टींमागे पळण्याची सवय लावून घेतो. 

स्लो लिव्हिंग आयुष्याचा जर भाग बनवायचा असेल तर एक साधी गोष्ट सांगतो. आपल्या जगण्याचा मूळ उद्देश शोधणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या मूळ उद्देशच जगण्यामध्ये वर उल्लेखलेल्या भौतिक गोष्टी किंवा पैसे यांचा अगदी थोडा सहभाग असतो. त्यामुळे तो उद्देश एकदा गवसला आणि त्याच्या मागे धावलं तरी त्या धावण्याचा त्रास होत नाही आणि स्लो लिव्हिंग आपसूक जगलं जातं. 

कुणी असं म्हणू शकतं की पैसे कमावता येत नाही म्हणून ही सगळं नाटकं आहेत. पण मी स्वतः अनुभवलं आहे की एक काळ मी फास्ट लाईफ जगायचो, त्याचा स्ट्रेस ही व्हायचा पण आता महिन्यातले पंधरा दिवस बाहेर राहूनही जगाच्या लेखी मी बिझी असेल पण मला स्वतःला स्लो लिव्हिंग जगतो आहे असं वाटतं. 

Tuesday, 9 September 2025

इंद्रा नूयी

"तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुमच्या एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान असतील" असं लहानपणी इंद्रा कृष्णमूर्ती हिला सांगितलं असतं तर तिने हे म्हणणाऱ्याला एकतर वेडं म्हंटलं असतं किंवा ते बोलणं हसण्यावारी नेलं असतं. पण हे घडलं. २००९ साली पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना अमेरिकन उच्च पदस्थांची ओळख करून देताना अध्यक्ष बराक ओबामा एका स्त्री जवळ थांबले आणि मनमोहन सिंग यांना म्हणाले "या इंद्रा नूयी, पेप्सीको च्या सी इ ओ" तेव्हा श्री सिंग म्हणाले "पण या तर आमच्या आहेत". तेव्हा ओबामा हसत म्हणाले "त्या आता आमच्या सुद्धा आहेत." 

हे ऐकत असताना इंद्रा नूयी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंद्रा कृष्णमूर्ती या स्मितहास्य करत जगातल्या दोन नेत्यांशी हस्तांदोलन करत होत्या. त्या हास्यामागे त्यांची अमेरिकेतील ३० वर्षाची कडी मेहनत होती आणि त्याबरोबर त्यांच्या अंगभूत हुशारीची उभरत्या वयात झालेली जडणघडण. 

इंद्राचा जन्म मद्रास मध्ये, आजचे चेन्नई, एका अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरात झाला. एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या या घरात लोकांचा गोतावळा मोठा. अनेक भाऊ बहिणींच्या मांदियाळीत इंद्रा चं बालपण हसत खेळत गेलं. 

तिचे आजोबा श्री नारायण सर्मा हे निवृत्त न्यायाधीश होते. त्यांच्यामुळे घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण होतं. त्यामुळे इंद्रा, चंद्रिका आणि नंदू या तिघांनाही वाचनाची आवड सुरुवातीपासून होती. एकुणात इंद्राच्या आयुष्यावर तिच्या आजोबांचा, ताथा म्हणायचे त्यांना, विलक्षण प्रभाव होता. अत्यंत विचारपूर्वक त्यांनी आपल्या नात नातवांची जडणघडण केली होती. १९७५ साली जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा २० वर्षाची इंद्रा कोलमडून गेली होती. 

इंद्राचे आईवडील हे एकमेकांना पूरक दाम्पत्य होतं. घरातील सर्व काम आई, म्हणजे शांथा, करायच्या तर गणितात पोस्ट ग्रॅज्युएट असणारे वडील, श्री कृष्णमूर्ती, हे बँकेत अधिकारी होते. लौकिकार्थाने कुटुंब श्रीमंत नव्हतं पण संपन्न होतं. या सर्व वडीलकीच्या संस्काराबरोबर जगण्यातील सर्व गोष्टींचा म्हणजे संगीत, नाट्य, नृत्य, खेळ याचा आस्वाद घेत इंद्राचं बालपण फुलत होतं. घरामध्ये आपलं मत व्यक्त करण्याची मुभा होती (जे त्या काळात फारसं प्रचलित नव्हतं). 

इंद्रा ही हुशार आणि आपलं मत निर्भीडपणे व्यक्त करणारी मुलगी होती. लहानपणापासूनच तिचं दिसणं हे टॉम बॉय प्रमाणे असायचं. "तुला नवरा कोण देणार?" असं म्हणत नातेवाईक चिडवायचे सुद्धा. होली एंजल्स या कॉन्व्हेंट शाळेत इंद्रा शिक्षणाबरोबर खेळ आणि वक्तृत्वस्पर्धा यात हिरीरीने सहभागी व्हायची. आठवीत असतानाच इंद्रा दिल्लीला युनायटेड स्कुल्स ऑर्गनायझेशन आयोजित एका कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. दहावीत असताना इंद्रा घरच्यांच्या मनाविरुद्ध गिटार शिकली आणि त्या काळात आपल्या तीन मैत्रिणीसह, मेरी, ज्योती, हेमा, ऑल गर्ल्स बँड काढला, ज्याची त्या काळात मद्रास मध्ये खूप चर्चा झाली होती. त्याचं नाव होतं लॉगरिदम. त्याचे तीन वर्षे प्रयोग पण झाले. 

पुढे इंद्रा मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मध्ये गेली. तिथे रसायनशास्त्र मुख्य विषय घेत पदवी साठी शिक्षण चालू झाले. एम सी सी मध्ये तिने महिला क्रिकेट टीम उभी केली आणि इतकंच नव्हे तर चार कॉलेजेस ला अशी टीम उभी करण्यास प्रवृत्त करून मद्रास मध्ये पहिली महिला क्रिकेट स्पर्धा भरवली. 

मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मधून पास आउट झाल्यावर इंद्रा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत आय आय एम मध्ये दाखल झाल्या. फरक एकच होता, मोठी बहीण आय आय एम अहमदाबाद तर इंद्रा कोलकता मध्ये. त्या एम बी ए प्रोग्रॅम मध्ये इंद्रा आणि इतर ५ मुली होत्या. बाकी १९५ मुलं. साल होतं १९७४. 

एम सी सी आणि आय आय एम कोलकाता मधून इंद्रा अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमात झळकत राहिली. त्यातही चर्चात्मक वक्तृत्व स्पर्धेत इंद्राचा हिरीरीने सहभाग असायचा. कदाचित हेच गुण पुढे जेव्हा त्या द इंद्रा नूयी बनल्या आणि अनेक लीडर शिप रोल त्यांनी निभावले, त्याकामी उपयोगात आले. त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की तरुण वयात इंद्रा पंतप्रधान इंदिरा गांधी किंवा विख्यात अर्थतज्ञ नानी पालखीवला यांच्याशी संवाद साधू शकल्या. बालपणी झालेल्या संस्कारातून आणि नंतरच्या अभ्यासामुळे तरुण इंद्रा राष्ट्रीय प्रश्नावर मतं मांडू शकतील इतक्या प्रगल्भ आणि बुद्धिमान झाल्या होत्या. 

आय आय एम च्या पहिल्या वर्षानंतर मुंबईच्या बी ए आर सी मध्ये इंटर्नशिप केल्यावर इंद्रा ने मार्केटिंग हा मेजर विषय घेत मास्टर्स डिग्री मिळवली आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मधून त्यांची निवड झाली ती मद्रासस्थित मेत्तुर बर्डसेल या कंपनीत. व्यवसाय होता टेक्स्टाईल इंडस्ट्री साठी धागे पुरवणे. आणि इथेच तिची ओळख झाली ब्रिटिश नॉर्मन वेड, जे कंपनीचे सर्वेसर्वा होते. श्री वेड यांनी पहिल्यांदा इंद्रा ला अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याबद्दल सांगितलं.मेत्तुर बर्डसेल मध्ये त्यांना स्वतःच्या स्किल्स ची जाणीव झाली आणि दिलेलं काम त्या यशस्वी पणे पूर्ण करू शकतात हा आत्मविश्वास दिला. 

१९७७ साली दक्षिण भारतात टेक्स्टाईल इंडस्ट्री मध्ये संप झाला. आणि मेत्तुर बर्डसेल मध्ये काही काम उरलं नाही. त्यावेळेस इंद्रा मुंबईत जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये हेल्द केअर प्रॉडक्टस, स्टे फ्री आणि केअर फ्री, च्या सेल्स मध्ये जॉईन झाल्या. इथे त्या पहिल्यांदा अमेरिकन मॅनेजमेंटबरोबर काम करू लागल्या. तिथं त्यांची सेल्स ची करिअर बहरत होती. 

पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. एका सुट्टीसाठी मद्रास मध्ये असताना त्यांच्या नजरेला अमेरिके तील येल विद्यापीठाच्या एम बी ए कोर्स बद्दल लेख आला. त्यांच्या अनेक मित्र मैत्रिणी अमेरिकन ड्रीम बघायला आले पण होते. इंद्राने येल विद्यापीठासाठी अर्ज केला.अनपेक्षित रित्या त्यांना स्कॉलरशिप सकट ऍडमिशन मिळाली. इंद्रा आणि तिचे कुटुंबीय द्विधा मनस्थितीत होते. त्यात भर पडली ती मेत्तुर बर्डसेल परत चालू झाल्यामुळे नॉर्मन वेड, जे इंद्राच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित झाले होते, यांनी इंद्राला पूर्ण व्यवसाय सांभाळण्याची ऑफर केली. 

हा तिढा नॉर्मन वेड यांनीच सोडवला. इंद्राने जेव्हा त्यांना येल युनिव्हर्सिटी च्या ऍडमिशन बद्दल सांगितले तेव्हा त्यांनी इंद्राच नव्हे तर कुटुंबियांना सुद्धा अमेरिकेत जाण्याबद्दल उद्युक्त केलं. 

१९७८ मध्ये इंद्रा कृष्णमूर्ती येल विद्यापीठात स्कुल ऑफ ऑरगनायझेशन अँड मॅनेजमेंट या नवीनच उघडलेल्या शिक्षण दालनात प्रवेश करती झाली. 

असंख्य प्रश्नांना तोंड देत, आव्हानं स्वीकारत, प्रचंड कष्ट करत इंद्रा यांनी  येल विद्यापीठाची मास्टर्स डिग्री मिळवली. लौकिकार्थाने ही त्यांची दुसरी मास्टर्स डिग्री. पण आय आय एम कोलकता आणि येल विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात खूप फरक होता. येल मध्ये प्रॅक्टिकल केस स्टडीज वर जास्त भर होता. भारताच्या मद्रास वरून आलेली तरुणी येल विद्यापीठातून अमेरिकेत आपलं स्वप्न साकारण्यासाठी तावून सुलाखून बाहेर पडत होती. 

इंद्रा कृष्णमूर्ती कॉर्पोरेट जग गाजवण्यासाठी सज्ज होताना त्यांची इंटर्नशिप होती शिकागो येथील कन्सल्टिंग फर्म मध्ये. नाव होतं बूझ अॅलन हॅमिल्टन. त्यांची पहिली असाइनमेंट होती इंडियाना स्टेट मधील एका अन्न प्रक्रिये संबंधित व्यवसायाची नीती धोरण आखणे. हे सगळं घडत असताना इंद्रा यांची  राज नूयी या स्मार्ट तरुणाशी. राज तेव्हा इटन नावाच्या इंजिनियरिंग कंपनीत काम करत होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याची परिणीती प्रेमात झाली. लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि इंद्रा कृष्णमूर्ती या इंद्रा नूयी झाल्या. या समांतर घटना घडल्या १९८० मध्ये. 

पूर्ण मास्टर्स झाल्यावर इंद्रा नूयी जगप्रसिद्ध बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) मध्ये रुजू झाल्या. बीसीजी तील त्यांची सहा वर्षे ही अनेक कडू गोड घटनांची साक्षीदार होती. त्याच काळात इंद्रा यांचे वडील श्री कृष्णमूर्ती यांचं निधन झालं. पण हे दुःख पचवताना इंद्रा आणि राज यांचं पहिलं अपत्य प्रिथा जन्माला आली. १९८६ मध्ये इंद्रा यांचा एक मोठा कार अपघात झाला. पण हे सगळं घडत असताना बीसीजी मध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं ते आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे इंद्रा जेव्हा कामावर असायच्या तेव्हा अमेरिकेत तुफान भ्रमंती करायच्या. कदाचित हेच कारण असावं की वडिलांचं निधन आणि कार अपघात या दोन्ही प्रसंगी बीसीजी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. 

बीसीजी च्या वर्क प्रोफाइल मध्ये तक्रार करायला काहीच जागा नव्हती. पण एक हेड हंटिंग कंपनी इंद्रा यांना एक इंटरव्ह्यू अटेंड करण्यासाठी खूप मागे लागली होती. खूप फॉलो अप झाल्यावर शेवटी इंद्रा तो इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाल्या. कंपनी होती मोटोरोला. तिथे इंटरव्ह्यू दरम्यान ओळख झाली गेरहार्ड ब्ल्यूमेयर यांच्याशी. राज यांच्याबरोबर चर्चा करत इंद्रा यांनी ती जॉब ऑफर स्वीकारली. आणि पुढील आठ वर्षात गेरहार्ड यांच्या मेंटरशिप खाली एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आपलं स्थान बळकट केलं. आव्हानं होतीच. प्रिथा पण मोठी होत होती. राज यांचं करिअर पण जोरात चालू होतं. या सगळ्या दरम्यान मोटोरोला ची नीती ध्येय धोरणे आखण्यामागे इंद्रा यांचा लक्षणीय सहभाग होता. स्ट्रॅटेजिस्ट म्हणून इंद्रा यांचं नाव अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रात दुमदुमायला लागलं होतं. 

सगळं व्यवस्थित चालू होतं. पण बदल तर घडतात. त्या न्यायाने गेरहार्ड यांनी मोटोरोला ला अलविदा करत आपल्या मूळ देशात आसिया ब्राऊन बोव्हरी (एबीबी) नावाची प्रसिद्ध कंपनी जॉईन केली. आठ वर्षाच्या काळात गेरहार्ड इंद्रा यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाले होते. म्हणून त्यांनी इंद्रा यांना एबीबी चा अमेरिकेतील व्यवसाय सेट व्हावा यासाठी पाचारण केलं. एबीबी च्या कार्यकाळात त्यांना दुसरी मुलगी झाली, तारा. इंद्रा आपलं करिअर आणि दोन्ही मुलींना मोठं करणं यामुळे खूप व्यस्त झाल्या. त्यांची आई शांता त्याच्या मदतीला आल्या होत्या. इंद्रा यांचा व्यावसायिक आलेख वर जात होता. पण एबीबी च्या व्यवस्थापनात अनेक बदल झाले आणि इंद्रा यांनी तिला अलविदा करत अशा कंपनीत जॉईन झाल्या ज्याने त्यांना केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगाच्या पटलावर ओळख दिली. 

कंपनीचं नाव होतं, पेप्सिको आणि दिवस होता ३० मार्च १९९४. 

आव्हान तर स्वीकारलं होतं. बदल तर मोठा होता. गेली १४ वर्षे त्या इंजिनियरिंग क्षेत्रात कार्यरत होत्या आणि पेप्सिको होती फूड अँड बेव्हरेज क्षेत्रातील एक धुरंधर कंपनी. पेप्सिको तील कार्यसंस्कृती आणि त्या नोकरीतून त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ही इंद्रा यांच्या व्यक्तिमत्वाला पूरक ठरली. पेप्सिको ही त्या काळात अमेरिकेतील पंधरावी मोठी कंपनी होती आणि जगभरात त्यांचे ४५०००० कर्मचारी काम करत होते. इंद्रा यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर चालू झाला आणि पेप्सिको मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या स्वीकारत गेल्या. अनेक देशातले बिझिनेस प्लॅन्स, महत्वाचे टेक ओव्हर्स, मर्जर्स इंद्रा नूयी यांच्या अभ्यासपूर्ण सल्ल्याने पूर्ण झाले. त्याची परिणीती जी व्हायची तीच झाली. एकविसावं शतक उजाडताना इंद्रा या पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्या. इंद्रा आता अजून जोमाने काम करू लागल्या. कंपनीचं विमान त्यांच्या दिमतीला होतं. अमेरिकेतच नव्हे तर जगभरात त्यांचे झंझावती दौरे चालू असायचे. 

२००६ साली ती अद्भुत घोषणा झाली. इंद्रा नूयी पेप्सिको या जगड्व्याळ कंपनीच्या पहिल्या स्त्री सीईओ म्हणून विराजमान झाल्या. त्याशिवाय त्या पहिल्या इमिग्रंट आणि ब्राऊन कलर सीईओ झाल्या. अनेक अर्थाने इंद्रा यांची कामगिरी ऐतिहासिक होती. आणि भारत सरकारने पुढच्याच वर्षी म्हणजे २००७ साली त्यांना पदमभूषण पुरस्काराने गौरान्वित केलं आणि त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचं यथोचित कौतुक केलं. त्या काळात अजून एक गौरवाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील फॉर्च्युन ५०० कंपनीत फक्त ११ स्त्री सीईओ होत्या, अन त्यापैकी एक होत्या इंद्रा नूयी. 

पुढील १३ वर्षात पेप्सिको ने इंद्रा यांच्या नेतृत्वाखाली आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी केली. सेल्स, प्रॉफिट, मार्केट कॅप, इन्व्हेस्टर रिटर्न्स या प्रत्येक व्यावसायिक मेझर्स मध्ये पेप्सिको ने लक्षणीय वृद्धी केली. पण इंद्रा यांच्या कारकिर्दीचं सगळ्यात आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पी डब्ल्यू पी प्रोग्रॅम. परफॉर्मन्स विथ पर्पज. पेप्सिको ची उत्पादनं ही तब्येतीस हानिकारक आहेत हा आरोप वर्षानुवर्षे होत होता. त्याला उत्तर देण्यासाठी पी डब्ल्यू पी या कार्यक्रमाद्वारे पेप्सीकोने आपल्या उत्पादनाच्या हेल्दी कंटेंट मध्ये खूप सुधारणा केली. या कारकिर्दीत इंद्रा नूयी यांना अनेक पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाले. 

२०१८ साली आपल्या एकूण कारकिर्दीची चाळीस वर्षे, आणि पेप्सिको मध्ये २४ वर्षे पूर्ण केल्यावर इंद्रा नूयी या पेप्सिको च्या सी इ ओ या पदावरून सन्मानाने पायउतार झाल्या. 

इंद्रा नूयी यांच्या झळाळत्या कारकिर्दीबद्दल वाचताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या. घर आणि अत्यंत व्यस्त जबाबदारीची नोकरी करताना त्यांची चांगलीच कसरत झाली. एक किस्सा त्यांनी अनेक ठिकाणी सांगितला की पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्यावर त्या अत्यंत उत्साहात घरी गेल्या तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. आणि त्यांना ही खुशखबरी घरी सांगायची होती. त्यांनी घरात प्रवेश करताना ही बातमी आईला सांगितली. तर त्या बातमीकडे फारसे लक्ष न देता त्यांची आई इंद्रा यांना म्हणाली की घरातील दूध संपलं आहे. ते आधी घेऊन ये. इंद्रा साहजिक आहे, नाराज झाल्या. त्या आईला म्हणाल्या सुद्धा "मी इतकी आनंदाची बातमी घेऊन आले आणि त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तू मला दूध आणायला सांगितले हा  अन्याय नाही का?" त्यावर त्यांची आई म्हणाली "घरात येताना तो तुझा राजमुकुट गॅरेज मध्ये सोडायचा. इथे घरात तू आधी तुझ्या नवऱ्याची बायको, मुलींची आई आणि माझी मुलगी आधी आहेस. मग तुझी पेप्सिको ची पोझिशन". त्यांच्या यशस्वीतेचा विचार करताना त्यांचे पती श्री राज नूयी यांनी जी सपोर्ट सिस्टम उभी केली ती कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे की इंद्रा यांची कारकीर्द बहरावी यासाठी त्यांनी स्वतःच्या घौडदौडीला लगाम घातला असावा. 

पेप्सिको मधून निवृत्ती घेतल्यावर सुद्धा इंद्रा  अमेरिकेत खूप व्यस्त  आयुष्य जगत आहेत. अनेक कंपन्यांच्या बोर्ड वर त्या सल्लागार म्हणून काम करतात. 

अमेरिकन कंपनीची सीईओ म्हणून एकदा इंद्रा यांना इंग्लंड मध्ये आमंत्रित केलं होतं. हाय प्रोफाइल चर्चेत इंग्लंडचे पंतप्रधान पण त्यावेळी सामील होते. त्यांनी नूयी यांना विचारलं की "तुम्ही ३० वर्षांपूर्वी इंग्लंड ला न येता अमेरिकेला का गेल्या?" हजरजबाबी इंद्रा पटकन म्हणाल्या "मी इंग्लंडला आले असते तर आज तुमच्या बरोबर जेवायचं निमंत्रण मिळालं नसतं." अमेरिकेतील संधी आणि त्या काळातील प्रगतीशील इकॉनॉमी चं सार त्या उत्तरात दडलं होतं. 

कर्माने अमेरिकन आणि मनाने अजूनही जिथे जन्म झाला त्या भारताची कास धरून ठेवलेल्या पद्मभूषण इंद्रा नूयी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 





 

Tuesday, 22 July 2025

भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही-वैभव जोशी

काल च्या पोस्टवर गानू सरांनी एक कॉमेंट केली की माझ्या स्वभावामुळे मला आयुष्यभरची मैत्री आणि लॉयल्टी मिळत असेल लोकांची. तर नम्रपणे सांगतो की असलं काहीही होत नाही. नंतर त्यांनी लॉयल्टी बद्दल लिहिलं पण मी मनातले विचार लिहून टाकतो. 

तर मी हे सगळं करतो ते माझ्या मनाला आनंद मिळावा म्हणून. यातून आयुष्यभराची मैत्री मिळते का तर माझ्याकडून मैत्रीत शत प्रतिशत देण्याची दानत आहे पण समोरून ती यावी ही अपेक्षा नाही. लॉयल्टी तर फार दूरची गोष्ट. अं हं, मला मोक्ष मिळाला किंवा संतत्व आलं आहे, असं तुमच्या मनात आलं असेल, तर थांबा. असलं काही झालं नाही आहे तर हे इव्हॉल्व्ह झालेलं मन आहे. खूप फटके खाऊन, धक्के पचवून. उदाहरणार्थ काही घटना सांगतो:

अनाथाश्रमातील पोरगा. त्याला जॉब दिला. संस्थापकांनी सांगितलं की मुलासारखा सांभाळा. सांभाळलं. सहा वर्षाने पोराने स्पर्धक कंपनीशी हातमिळवणी केली. (तिथे झेपलं नाही म्हणून मग परत मित्राच्या कंपनीत जॉब मिळावा म्हणून शब्द टाकला. आणि आता तिथेच आहे)

सहा वर्षे करत इंजिनियरिंग केल्यावर कुठंच जॉब मिळत नाही म्हणून एका पोराच्या मामाने जॉब द्या म्हणून रदबदली केली. दिला. त्याचं लग्न आहे म्हंटल्यावर लांब प्रवास करत थंडीत कुडकुडत हजेरी लावली. सात वर्षांनी आर्थिक गैरव्यवहार करत स्पर्धक म्हणून उभा राहिला. कधीही भेटलो की पोरगा पायाला हात लावायचा. मला वाटायचं पाया पडतोय. तो पाय ओढण्याची संधी शोधत होता. 

एका पोराच्या लग्नाला गेलो होतो, खेड्यात. गरिबी पाहून गलबलून आलं. नालीवर मंडप टाकला होता. भातावर मटन रस्सा बरोबर बोटी डालो असं मुलाचा मामा म्हणायचा पण त्यात तुकडे होते कुठं. ती गरिबी पाहून त्या गावात एकटाच लांब गेलो आणि मनसोक्त रडलो. त्या पोरावर तुफान काम केलं. आज तोच पोरगा स्पर्धा करत, तुम्हाला संपवतो अशी भाषा करतो.

एक पोरगा जॉईन झाल्यावर त्याची कहाणी ऐकली. घरात अठरा विश्व दारिद्र्य. पोराने प्रचंड कष्ट करत इंजिनियरिंग केलेलं. म्हणून मनात दया. बिझिनेस पार्टनर चा विरोध असताना पोराला यथाबुद्धी मदत करत राहिलो. काही तरी फालतू कारण सांगत बाहेर पडला आणि परत तेच इर्षात्मक स्पर्धा. 

अशा एक ना अनेक कहाण्या. काही सुखद पण आहेत, पण वर उल्लेखलेल्या जास्त. खूप जास्त.  

अनेक वेदना झाल्यावर. त्यावर फुंकर मारत गेलो. पण ती फुंकर म्हणजे शीळ आहे असे भासवत गेलो. त्यालाच बहुधा संवेदना म्हणत असावेत. 

आता मन निर्ढावलं आहे. स्वार्थी झालं आहे. त्यामुळे आता कुणाची मैत्री मिळावी म्हणून काहीही करत नाही. आता करतो ते फक्त स्वतःसाठी. माझ्या आनंदासाठी. मग त्याला कुणी मनस्वी म्हणत असतील, कुणी येडा म्हणत असतील. गानू सरांसारख्या मित्रांना कौतुक पण वाटत असेल. मित्रत्वाच्या नात्यात मी माझ्या बाजूने १००% देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला तसाच रिस्पॉन्स दिला तर आनंदच आहे. नाही दिला तरी अजिबात वाईट वाटणार नाही. 

मित्र वैभव जोशी म्हणतात तसं "भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही".