Saturday, 20 December 2025

मी जेव्हा अगदी छोट्या स्वरूपात व्यवसाय चालू केला होता तेव्हा त्याच को ऑपरेटिव्ह बँकेत आम्ही खातं उघडलं होतं. १९९९ साली जेव्हा प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंड ला जायची संधी मिळाली तेव्हा आमच्या कडे पैसे नव्हते तेव्हा याच बँकेने आम्हाला रु ५०००० कर्ज दिलं होतं. इतकंच नव्हे तर ५०० डॉलर्स घेण्यासाठी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी डॉलर्स बरोबर पोतंभरून कौतुक पण दिलं होतं. 

पुढे त्या छोट्या व्यवसायाने बाळसं धरलं आणि जेव्हा कधी पैशाची गरज लागली तेव्हा त्यांनी आम्हाला टर्म लोन दिलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. 

२०१० च्या सुमारास आम्हाला एक चेक आला होता. काही लाखाचा चेक होता. ज्या कंपनीचं पेमेंट होतं ते खूप फॉलो अप करून आम्हाला मिळालं होतं. फक्त एक चूक झाली होती. स्पिंडल मध्ये एन लिहायचं ते विसरले होते. त्यावेळी बँकिंग इतकं कडक नव्हतं. एक लेटर दिलं की चेक पास व्हायचा. असं एकदा आधीच्या मॅनेजर ने क्लिअर पण केला होता. पण यावेळेस मात्र त्याच बँकेचा मॅनेजर अडून बसला की चेक क्लिअर करता येणार नाही. मी खूप मिनतवारी केली की प्लिज चेक क्लिअर करा, खूप कष्टाने पेमेंट मिळालं आहे. अमाउंट मोठी आहे. नवीन पेमेंट करायला वेळ लागेल. मला पैशांची गरज पण होती. पण मॅनेजर साहेब काही बधले नाही. शेवटी मी चेक परत घेऊन आलो आणि महिन्याने नवीन चेक मिळाला. 

बँक मॅनेजर च्या वागण्याने मी खूप हर्ट झालो. डोक्यात तिडीकच गेली म्हणा ना. मी दुसऱ्या एका मोठ्या प्रायव्हेट बँकेत अप्रोच झालो आणि अकौंट उघडलं. हळूहळू माझं बँकिंग पहिल्या बँकेकडून नवीन बँकेत शिफ्ट होऊ लागलं. दोन-तीन वर्षात आमचं बहुतेक बँकिंग या मोठ्या बँकेमार्फत होत गेलं. गेल्या सहा सात वर्षात त्या पहिल्या को ऑप बँकेत व्यवहार शून्य झालं होतं. 

आम्ही अकौंट क्लोजर चा फॉर्म भरल्यावर तिथून तीन अधिकारी आले काल आणि अकौंट बंद करू नका म्हणून रिक्वेस्ट करत होते. पण आता खूप उशीर झाला होता. चांगले रिलेशन्स असून सुद्धा केवळ एका माणसाने अडमुठेपणा दाखवल्यामुळे बँकेने एक चांगला कस्टमर गमावला होता. कदाचित त्यावेळेस आमचं अकौंट मोठं नसावं पण व्यवसायाचं आताचं स्वरूप बघता त्या अधिकाऱ्यांना जाणवलं असावं की आपण एक मोठा ग्राहक गमावला आहे ते. 

असं आमच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचदा होतं. एखाद्या कस्टमरला आम्ही वर्षानुवर्षे सर्व्हिस देत असतो. शेकडो स्पिंडल रिपेअर केले असतात. पण एखाद्या स्पिंडल मध्ये आम्ही दर्जा राखू शकत नाही किंवा काही मोठी चूक होते. आधीच्या कामाची पुण्याई इथं बऱ्याचदा कामाला येत नाही. कस्टमर आम्हाला ब्लॅक लिस्ट करून टाकतो. (दुसरी कडे हात पोळल्यावर परत आले पण आहेत). 

व्यवसायाचा हा एक अवघड मुद्दा आहे. इथं चुकीला माफी नाही. प्रत्येक व्यवहार हा कस्टमर सेन्ट्रीसिटी च्या कसोटीवर खरा ठरावा लागतो तेव्हा कुठं सस्टनेबल व्यवसाय उभा राहतो. 

Thursday, 4 December 2025

पाहुणा


आजकाल प्रवासात लोक मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसतात त्यामुळे सहप्रवाशांबरोबर फार गप्पा होत नाहीत. पण एक काळ होता की प्रवास सुरु झाल्या झाल्या, थोडंफार सेटल झालं की नाव गाव, काम कुठलं अशी जुजबी चौकशी प्रवासी करायचे, आणि नंतर मग गप्पा सुरु व्हायच्या. डब्यातील खाण्याचं देवाणघेवाण सुरु व्हायचं. डेस्टिनेशन आलं की एकमेकांचा निरोप घेतला जायचा. भेट तिथं संपायची. आणि असे सहप्रवासी विस्मरणात जायचे. तो प्रवास संपल्यावर परत त्यांना भेटलो असं फार क्वचित घडायचं. पण घडायचं. 

मला कमीत कमी पाच जण आठवतात ज्यांना मी प्रवासात भेटलो आणि नंतर माझा त्यांच्या बरोबर डायलॉग झाला. नुसताच झाला नाही तर अनेक भेटी पण झाल्या. एक तर खूप मोठी हस्ती होती. एकेकाळी पुणे औद्योगिक क्षेत्रात त्यांचं नाव होतं. त्या भेटीत मी त्यांना व्यवसायाचे अनेक प्रश्न विचारले आणि नंतर पण अनेक वेळा त्यांना भेटलो होतो. एक जर्मन माणूस भेटलेला. शेतकरी होता तो. भेटल्यावर त्याला आठवड्याने मराठी नॉन व्हेज खाण्यासाठी सुर्वे मध्ये घेऊन गेलो होतो. एक जण माझा कस्टमर झाला तर दुसऱ्याबरोबर मी मर्जर चे खाचखळगे समजून घेण्यासाठी भेटलो. एका परदेशातील ट्रिप मध्ये मला एक शेट्टी भेटले होते. मुंबईत बार होता त्यांचा. त्यांनाही जाऊन भेटलो. 

पण हे सगळं अनेक वर्षांपूर्वी घडलेलं जेव्हा मोबाईल होते, पण त्याचा आज इतका कहर वापर नव्हता. काही दिवसांपूर्वी मी अहमदाबाद हुन मुंबईला ट्रेन ने येत होतो. माझ्या शेजारच्या बर्थवर एक पस्तिशीतील तरुण घरी मराठीत सांगत होता कि गाडी मिळाली व्यवस्थित. बाकी दोन लोक गुजराती भाषिक होते. मी त्या मराठी बोलणाऱ्या युवकाशी गप्पा चालू केल्या. रात्री साडे आठ ते साडे दहा आम्ही गप्पा मारल्या. त्या दोन तासात एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल पूर्ण माहिती झाली. सर्वेश त्याचं नाव. 

दुसऱ्या दिवशी सकाळी बाय म्हणताना सर्वेश म्हणाला की मला तुमच्या एकूणच व्यावसायिक प्रवासाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. तुमची कंपनी बघण्यासाठी मी पुण्याच्या पुढील ट्रिप मध्ये आवर्जून येईल. खरं सांगायचं तर मला वाटलं की देखल्या देवा दंडवत या न्यायाने सर्वेश म्हणाला की येईल म्हणून पण नंतर विसरून जाईल. 

पण आश्चर्य म्हणजे तीन दिवसांपूर्वी सर्वेश चा फोन आला की तो पुण्यात येतो आहे आणि त्याला मला भेटायचं आहे. तो कंपनीत येईपर्यंत मला वाटलं नव्हतं की तो खरंच येईल. पण तो आला. मला यायला थोडा उशीर झाला पण तेवढ्या वेळात त्याने आवर्जून कंपनी बघितली. व्यवसायाबद्दल फीडबॅक देताना त्याने आवर्जून सांगितलं की तुमचा स्टाफ फार वेलकमिंग नेचरचा आहे. रिसेप्शनिस्ट रेवती, आमचा ऑफिस सांभाळणारा बाबू आणि त्याला कंपनी ज्याने दाखवली तो श्रीपाद या सगळ्यांचं त्याने खुलून कौतुक केलं. 

त्याचा निघतानाचा रिमार्क फार महत्वाचा होता. तो म्हणाला "ट्रेन मध्ये बोलल्यावर तुमच्या कंपनीबद्दल, तिथल्या कार्यसंस्कृतीबद्दल एक प्रतिमा तयार झाली होती. ती प्रतिमा प्रत्यक्षात पण तशीच आहे हे छान वाटलं."

कंपनीत अनेक ग्राहक, मित्र, नातेवाईक येतात आणि कौतुक करून जातात पण केवळ दोन तासाच्या ओळखीवर कंपनीत आलेला हा पहिलाच पाहुणा आणि ते परवा एका पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे काही उद्देशाशिवाय. मला ही भेट खूप आनंदी करून गेली. 


 

Wednesday, 19 November 2025

 काही दिवसंपूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबाद वरून बांद्रा टर्मिनस ला ट्रेन ने आलो. प्लॅटफॉर्म वरून चालत असताना अचानक एक माणूस समोरून आला आणि मला हिंदीत प्रश्न विचारला "कहा से आए हो?" मी सांगितलं "अहमदाबाद". मला आय कार्ड मागितलं. मी पहिल्यांदा चपापलो. स्वतःला सावरत मी उलट विचारलं "तुम्ही कोण आहात?" तर डाव्या तळव्यात लपवलेलं त्यांचं आयकार्ड दाखवलं. साध्या वेशातील पोलिसच होते ते. मी आधार कार्ड दाखवलं. एव्हाना माझ्या एक दोन वाक्याने कळलं की मी मराठी आहे. बाकी सांगितलं की दिवसभर काम करून संध्याकाळी पुण्याला जाणार आहे. 

त्यांनी मला जायला सांगितलं. जाताना मी त्यांना प्रश्न विचारला "असं माझं चेकिंग का केलं?". ते जास्त काही बोलले नाही. फक्त रँडम चेकिंग आहे म्हणाले. 

तिथून निघाल्यावर मी माझ्या भावाकडे गेलो. फ्रेश होण्यासाठी. त्याला मी झालेला किस्सा सांगितला आणि रँडम चेकिंग झालेलं सांगितलं. त्यावेळेस हसत भाऊ म्हणाला की तुझं रँडम चेकिंग झालेलं नाही आहे. तर तुला प्रश्न यासाठी विचारले गेले की तुझ्या बॅगचा रंग हिरवा आहे. (तो खरंतर हिरवा नव्हता तर तो त्याकडे झुकणारा पोपटी होता). आणि दिल्ली बॉम्ब स्फोट नंतर दोनच दिवसात मुंबईला आलो होतो. 

म्हणजे माझ्या जागी कुणी अस्लम किंवा मोहसीन असला असता तर त्याला बाजूला घेऊन कसून तपासणी झाली असती. 

मुस्लिम दहशतवाद्यांना हे  कळत नाही आहे की त्यांच्या निषेधार्ह कृत्यामुळे अनेक भारतीय मुस्लिम नागरिकांवर काय आपबिती येते ते. टेररिझम मुळे लॉ अबायडिंग मुस्लिम नागरिकांकडे संशयाने बघण्याचा जो शिफ्ट आला आहे तो योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही आहे, पण तो आला आहे हे अधोगतीचे परिमाण आहे. 

Monday, 10 November 2025

विवादास्पद

या सगळ्या पोस्टच्या धबडग्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते आहे. 

देशाची आर्थिक उन्नती होत असताना बऱ्याच मित्रांचा असा आग्रह असतो की आपलं सोशल फॅब्रिक पण अजिबात उसवलेलं नाही आहे असं मानावं. 

याउलट काहींना वाटतं की आपली सामाजिक वीण उसवलेली आहे तर मग या आर्थिक बाबी सुधारत आहेत तर त्याचं काय कौतुक?

मग परिस्थिती काय आहे? अर्थात हे माझं मत आहे. पण लिहायचा प्रयत्न करतो. 

मी परवाच्या पोस्टवर एक वाक्य लिहिलं की "विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही", त्यात विवादास्पद या शब्दावर एका जवळच्या मित्राने आक्षेप घेतला. त्यावर मी काही मत व्यक्त करतो. 

पहिल्यांदा पॉझिटिव्ह गोष्टी बघू यात. तर आजच्या घडीला भारत हे लोकशाही असलेलं जगातील सगळ्यात मोठं राष्ट्र आहे. तब्बल ९० कोटी मतदार मतदान करत असतात. १९५१ पासून देशात रक्तविहीन निवडणुका पार पडत असतात. सर्व जातीचे, धर्माचे, भाषिक लोक मतदान करत असतात. 

पण एक म्हणावं वाटतं की प्रगल्भ लोकशाही म्हणजे फक्त दर पाच वर्षांनी काहीही हल्लागुल्ला न होता निवडणुका होणे इथपर्यंत मर्यादित नाही आहे तर त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट सिस्टम मधली पारदर्शकता, कामाप्रती असलेलं उत्तरदायित्व, काही महत्वाच्या संस्थांना असणारी स्वायत्तता या निकषावर आपल्या इथे, त्यातही महाराष्ट्रात आनंदी आनंद आहे. मतदारांना गृहीत धरून आपले विरोधी पक्ष फोडणे, त्यातील न्यायिक प्रक्रियेबद्दल वेळकाढू धोरण ठेवून संस्थापकांकडून नाव, निवडणूक चिन्ह ओरबाडून घेणे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एकेकाळी घणाघाती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकार स्थापन करणे, केवळ पक्षबदल केला म्हणून इ डी च्या चौकशा बंद करणे, रस्ता, वीज, पाणी हे महत्वाचे प्रश्न लोकांनी विचारूच नये म्हणून समाजाला धार्मिक आणि जातीय लढतीत झुंजवत ठेवणे, आर्थिक प्रगती ज्या इंडस्ट्री मुळे होते असे प्रकल्प आपल्या नाकाखालून दुसरे राज्य घेऊन जातात त्याकडे कानाडोळा करणे, शिवराळ भाषेत मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांना घालून पडून बोलणे म्हणजे खूप मोठा पुरुषार्थ ही लोकशाही ची लक्षणं म्हणत असतील तर मग बोलणंच खुंटलं. 

अनेक राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते हे की पोझिशन्स ला आल्यावर करोडो रुपयाच्या संपत्तीचे मालक होतात, ते कसे होतात असा कुठला उद्योग असतो की त्यांच्या इतक्या जमिनी, बंगले, गाड्या होतात याबद्दल ना कुणी प्रश्न विचारायचे नाही आणि विचारले तर त्याला असं कचाट्यात पकडायचं की त्याने परत आवाजच केला नाही पाहिजे. 

मीडियावर पूर्ण कब्जा करून टाकायचा. असे नॅरेटिव्ह पसरवायचे की सरकारच्या धोरणांची फक्त स्तुती आणि स्तुतीच झाली पाहिजे. 

ज्यांनी म्हणून विरोध केला त्यांना वेगवगेळी प्रलोभनं दाखवून सरकारच्या जागांवर बसवून देऊन त्यांचे आवाज बंद करणे हे तर अगदी सर्रास घडतं आहे. 

ही सगळी विवादास्पद लक्षणं नव्हेत काय?

भारतातील लोकशाही रुजलेली आहे पण ती प्रगल्भ झालेली नाही आहे. ती केऑटिक आहे आणि मॅच्युरिटी पासून तर खूप लांब आहे. हे खरं आहे की जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे कारण एक सशक्त संविधान आपल्या हातात आहे. पण तरीही समानता, निवडणूक आयोग/इ डी/सी आय डी सारख्या अनेक संस्थांची स्वायत्तता, आणि नागरी संस्कृती ही अजून शंकास्पद परिस्थितीत आहे हे ही तितकंच खरं आहे. लॉ आणि ऑर्डर चा बोजवारा उडालेला आपल्याला ठायी ठायी दिसतो. अगदी ट्राफिक मॅनेजमेंट पासून ते अगदी घृणास्पद गुन्हे करणारे इकडे तिकडे मोकाट फिरताना दिसतात. 

असो. आणि सोशल मीडियावर ही परिस्थिती आहे. विरोध दर्शवणारा "विवादास्पद" हा इतका माईल्ड शब्दही लोकांना सहन होत नाही, आणि मी जो राजकीय विषय लिहायचं टाळतो त्याला मत देण्याविषयी उद्युक्त करायचं आणि मग बडवत बसायचं हा पण एक नवीन ट्रेंड दिसतो आहे. 

थांबतो. 

Saturday, 8 November 2025

काही वर्षांपूर्वी मीच एक पोस्ट टाकली होती की चीन उत्पादनावर बहिष्कार टाकून काहीच साध्य होणार नाही आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर कंबर कसून कामाला लागण्यात शहाणपण आहे. त्याला अजून एक पार्श्वभूमी अशी होती की भारतातील दोन मोबाईल फोन उत्पादक, कार्बन आणि मायक्रोमॅक्स, हे सपशेल अपयशी ठरले होते. 

त्यांनतर अनेक घडामोडी घडल्या. कोविड आलं. कोविड मुळे चीनने जगाचा उत्पादक ही आपली विश्वासार्हता पूर्ण गमावली. त्यात भरीस भर म्हणून की काय पण अमेरिका आणि चीन मध्ये आता पराकोटीला पोहोचलेलं ट्रेड वॉर तेव्हा सुरू झालं. सेमी कंडक्टर ची सप्लाय चेन रोखून चीनमुळे अभूतपूर्व गोंधळ झाला. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकाच नव्हे तर जगातल्या ज्या देशांनी चीनमध्ये प्लांट उभे केले होते, त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. दक्षिण पूर्व आशियात असलेल्या कमी लेबर कॉस्ट मुळे तिथलेच देश उत्पादक शोधू लागले. 

या सर्व देशांमध्ये सशक्त पर्याय उभा राहिला तो म्हणजे भारत. होलसेल मध्ये उपलब्ध असणारं तरुण टॅलेंट पूल, इंग्रजी भाषेशी जवळीक, सॉफ्टवेअर इंडस्ट्री मुळे तयार झालेला ब्रिज, कितीही विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही यामुळे जगभरातील उत्पादक भारताचे दरवाजे ठोठावु लागले. . आपण सुद्धा प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह देत या हे दरवाजे उघडले. सर्वच क्षेत्रात गुंतवणूक आल्या पण या इंसेंटिव्ह चा सगळ्यात मोठा दावेदार ठरला तो मोबाईल उत्पादक. 

मोबाईल उत्पादनाने भारतातील केलेली नेत्रदीपक प्रगती अचंबित करणारी आहे. दक्षिण भारतातील चेन्नई, होसुर आणि बंगलोर हा पट्टा तर उत्तर भारतात नोएडा मध्ये आज जवळपास ३०० कंपन्या मोबाईल उत्पादन करत आहेत. याचा परिणाम असा झाला की आठ एक वर्षांपूर्वी प्रत्येक मोबाईल फोन आयात करणारा भारतीय ग्राहक आजच्या घडीला प्रत्येक मोबाईल फोन आपल्याच इथे उत्पादित केलेला वापरतो. 

यातील पुढची आकडेवारी तर डोळे दिपावणारी आहे. मोबाईल उत्पादनाची निर्यात गेल्या दहा वर्षात शंभर पट वाढली आहे. आजच्या मितीला भारत रु १.२ लाख करोड किमतीचे मोबाईल निर्यात करतो. अमेरिकेत आयात केले जाणारे स्मार्ट फोन भारतात सगळ्यात जास्त बनतात. इथे आपण चीनला मागे टाकलं आहे. आजवर या क्षेत्राने जवळपास १५ लाख डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट रोजगार निर्मिती केली आहे. 

आता कुणी म्हणेल की या सगळ्या उत्पादक कंपन्या बाहेरच्या देशातील आहेत. हे मान्य केलं तरी हे लक्षात ठेवायला हवं की एकदा तुम्ही इथल्या जमिनीवर उत्पादन चालू केलं की त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो तो त्या देशाच्या अर्थ व्यवस्थेला आणि इथल्या लोकांना. १९८३ मध्ये वसलेल्या मारुती सुझुकी चा सगळ्यात मोठा उत्पादक भारत आहे आणि त्यांचं वाहन क्षेत्रातील काँट्रिब्युशन हे वादातीत आहे.

मोबाईल पाठोपाठ आता सेमी कंडक्टर इंडस्ट्री गुंतवणूक घेऊन उभी आहे. मोबाईल इंडस्ट्री स्थिरस्थावर होईपर्यंत सेमी कंडक्टर इंडस्ट्री भरतीय उत्पादन क्षेत्रात हलचल निर्माण करणार आहे. 

मागील अडीच दशकं सर्व्हिस इंडस्ट्री ने गाजवल्यावर किमान पुढचे दशक उत्पादन क्षेत्र, त्यातही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गाजवणार अशी चिन्ह तरी सध्या दिसत आहेत. 

फरक

तीन अनुभव शेअर करतो. 
दोन महिन्यांपूर्वी वीस तास प्रवास करून त्या हॉटेल मध्ये गेलो. चेक इन करून रूम मध्ये गेलो तर रूम मध्ये पाणीच नव्हतं प्यायला. रिसेप्शन ला फोन करून सांगितलं तर हाऊस किपिंग ची मुलगी आली, जिला इंग्लिश कळत नव्हतं. शेवटी खाणाखुणा करून तिला सांगितलं की प्यायला पाणी नाही आहे. तिने दोन बॉटल आणून दिल्या. 

केस अशी होती की त्या गावातच प्लास्टिक बॅन होतं. म्हणून रूम मध्ये बॉटल न ठेवता त्यांनी एक काचेचा जग ठेवला होता. प्रत्येक फ्लोअर वर वॉटर डिस्पेन्सर होता. प्रत्येकाने जग मध्ये पाणी भरून आणायचा असा नियम होता. हे सगळं मला संध्याकाळी रिसेप्शन एका व्यवस्थित बाईने समजावून सांगितलं, जी बहुधा तिथली मॅनेजर असावी. मी तिला सांगितलं की एखादा प्रवासी वीस बावीस तास प्रवास करून रूम मध्ये पोहोचतो आणि त्याला प्यायला पाणी नसेल तर वाईट दिसतं. आणि तुमची ही सगळी प्रोसेस तुम्ही चेक इन वेळेस समजावून सांगू शकता, जी मला नव्हती सांगितली. तिने एका कागदावर लिहून घेतलं. 

दोन महिन्यांनी मी परत आता तिथे चेक इन केलं. ते करताना मी जो फीडबॅक दिला होता, त्याच पद्धतीने सांगितलं. 

ग्राहकाभिमुख म्हणजे काय आहे ते पहिल्यांदा अनुभवलं. कामाप्रति आस्था असेल की हे सगळे बदल जाणवतात. 

आता दुसरा अनुभव

मुंबई एअरपोर्ट वर फास्ट इमिग्रेशन ची सोय झाली आहे. त्याचं रजिस्ट्रेशन एका वेब साईट वर होतं. पण पहिल्यांदा बायोमेट्रिक्स करावं लागतं, मग तुम्ही ते वापरू शकता. मी वेब साईट चा सोपस्कार पूर्ण केला आणि मुंबई एअरपोर्ट वर बायोमेट्रिक्स करायला गेलो. तिथं टेबल वर कुणीच नव्हतं. इकडे तिकडे बघितल्यावर एका बिव्हीजी च्या बाईला विचारलं तर तिने दहा मीटर वर एक मोबाईल खेळत असलेल्या माणसाकडे बोट दाखवत सांगितलं की तो आहे. मी त्याच्या कडे गेलो तर "काय कटकट आहे" असा भाव चेहऱ्यावर भाव आणत तो माणूस म्हणाला "नही है क्या कोई, चलो देखते है" ते दहा मीटर तो माणूस अक्षरशः पाय खुरडत चालला.  इकडे तिकडे बघत म्हणाला "हा, बोलो क्या है?" 

म्हणजे तोच खुर्चीतला माणूस होता. त्याने फक्त ऍक्ट केला की कुणा दुसऱ्याचं काम आहे ते. चेहऱ्यावर हास्य नाही, पूर्ण अनास्था. इतकी की समोरच्याने म्हणावं "आज मूड नही है क्या साब, मै फिर कभी आता हूं"

एका प्रसिद्ध मोठ्या खाजगी बँकेतील बाई इन्व्हेस्टमेंट साठी मागे लागली. मी जेव्हा नकारात्मक प्रतिसाद देत होतो तेव्हा म्हणाली "सर, प्लिज घ्या ना स्कीम. नाहीतर माझा के आर ए खराब होईल" त्याच बँकेतील एक रिलेशनशिप मॅनेजर सर्व्हिस देत नव्हता म्हणून मी त्याला बदला म्हणून मी मेल पाठवली तर मॅनेजर चा पळत फोन आला "सर, असं नका करू. माझं प्रमोशन ड्यु आहे. तुमचा एक रिमार्क माझं प्रमोशन पुढं ढकलेल. 

अरे, म्हणजे तुम्ही क्लायंट साठी काम करता की तुमचा के आर ए मीट करण्यासाठी. जेव्हा ग्राहकाप्रति अनास्था दाखवता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रमोशन ची काळजी नसते. 


Friday, 31 October 2025


विंदा, पाडगावकर आणि बापट हे पूर्वी एक कवितेचा कार्यक्रम करायचे. कधी बघण्याचा योग आला नाही पण खूप लोकप्रिय होता असं ऐकून आहे. थोडं अवघडच काम आहे, कवितेच्या माध्यमातून तीन तास लोकांना खिळवून ठेवणं. वीस एक वर्षापूर्वी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी आणलेला आयुष्यावर बोलू काही हा आगळावेगळा कार्यक्रम तुफान यशस्वी झाला. सौमित्र आणि अजून काही समकालीन कवीनी या फॉर्म मधे प्रयोग केले आणि रंगत आणली. 

याच पठडीतील पण बहुधा असा प्रयोग पहिल्यांदाच केला असावा की बासरी आणि काव्य यांचं फ्युजन. वैभव जोशी आणि अमर ओक यांचा "ऋतू बरवा". एखादा कार्यक्रम सुरू झाल्यापासून पहिल्या मिनिटाला तुमच्या मनाची पकड घेतो ती तीन तासाने "आता विश्वात्मके देवे" ने शेवट झाला की सैलावते. मधल्या काळात वैभव आणि अमर ओक आपल्याला वेगवेगळ्या प्रवाहातून नेत राहतात. एकही सादरीकरण टाळ्यांच्या कडकडाटाशिवाय संपलं नाही आणि अंगावर काटा यावेत असे अनेक क्षण कार्यक्रमात येतात. 

अमर ओक यांना अनेक वेळा टीव्ही वर बघितलं आहे. प्रत्यक्ष पहिल्यांदाच ऐकलं. आपल्या वाद्याचा आब राखत, आदर ठेवत ज्या वेगवेगळ्या गाण्याच्या धून त्यांनी बासरीद्वारे ऐकवल्या त्या केवळ लाजवाब. सगळ्यात कहर केला जेव्हा त्यांनी "युवती मना" जेव्हा सादर केलं. शब्द तर कळत होतेच पण अनेक ठिकाणी मधल्या जागा सुद्धा त्यांनी अशा नजाकतीने पेश केल्या की क्या बात है. असे विस्मयचकित करणारे अनेक क्षण आपल्या जादुई कलेतून देत राहतात. 

बाकी वैभव जोशींबद्दल मी काय लिहावं? शब्द तर त्यांना वश आहेतच पण त्यामागचा भाव जेव्हा ते उलगडून सांगतात, त्यामागच्या विचारधारे बद्दल सांगतात, तेव्हा ती कविता आपल्यात भिनत जाते. वैभव स्वतःच्या च नव्हे तर इतर कवींच्या कवितेबद्दल फार आत्मियतेने बोलतात हे सुद्धा कार्यक्रमात ओघाने येतं, तेव्हा आपल्याला कळतंच. (कधी वेळ झाला तर त्यांचा स्पृहा जोशी बरोबरचा एक व्हिडिओ आहे, बालकवींची औदुंबर कविता समजावून सांगताना. कमाल आहे). 

या निरुपणाचं महत्व कळतं ते भरतीचा माज नाय आणि ओहटीची लाज नाय हे ऐकताना. या कवितेचा इतका भडिमार झाला आहे की ती ऐकताना आता बोअर होईल की काय अशी शंका येते. पण वैभव त्या मागचा भाव सांगतात आणि ती मग आपल्याला नव्याने कळत जाते. पुरिया धन "श्री" ओक सादर करतात आणि त्याला जोडून वैभव मग सौ रागाची जेव्हा "आज कुठली भाजी आहे" वर गाडी नेतात तेव्हा बहार येते. मनाला उभारी देणारी "उजाडलेला दिवस पहिला, याहून मोठे सुख ते काय" याद्वारे अंतर्मुख करून जातात.  बरं ते सगळं सादर करताना कधी तात्विक वाटतं तर कधी सात्विक वाटतं. 

या दोघांशिवाय चार वादक आहेत. तबला, ढोलकी, ऑक्टपॅड आणि की बोर्ड.