Saturday, 21 June 2025

 व्यासपीठावरील मान्यवर डॉ  आनंद देशपांडे, माझे बिझिनेस मेंटॉर श्री मनीष गुप्ता, पुस्तकाचे अनुवादक माझा मित्र सदानंद बेंद्रे, प्रकाशिका प्रतिमा, माझे प्रेरणा स्थान डॉ वैभवी मंडलिक आणि उपस्थित माझे सर्व मित्रगण. 

खरंतर व्यासपीठावर उद्योजकतेच्या विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू बसलेले आहेत, त्यांच्यासमोर उद्योजकता या विषयावर मी काही बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. तसंही मला अनेक जण "डेली वेजेस चा एम डी" असं गंमतीत म्हणतात. त्यामुळे पुस्तक जरी माझ्या उद्योजकीय प्रवासावर लिहिलं असेल तरी उद्योजकता या विषयावर प्रमुख पाहुणे बोलतील. मी थोडी या पुस्तकाची स्टोरी सांगतो. 

२०१७ साली अ......अभियंत्यांचा प्रकाशित झाल्यावर त्याचा इंग्लिश अनुवाद करा असं बऱ्याच जणांनी सुचवलं होतं. सोशल मीडियाची ही गंमत आता सर्वांना माहित आहे. कॉमेंट मध्ये कुणी "पुस्तक लिहा" असं लिहिलं की आपल्याला लगेच लेखक असल्याचा भास होऊ लागतो. मला तसा झाला आणि मी मराठी पुस्तक लिहिलं, पण परत फसणार नव्हतो अशी मनाशी गाठ बांधली होती. पण एका तरुणाने मला मेसेंजर वर अगदी कळकळीची विनंती केली की इंग्लिश अनुवाद करा, तेव्हा मी परत पाघळलो. म्हणजे तरुण असूनही पाघळलो हे कृपया लक्षात घ्यावं. आणि हा इंग्लिश अनुवाद करावा या विचाराने उचल खाल्ली. तेव्हा हे चॅट जीपीटी, ए आय वगैरे प्रकरण नसल्यामुळे तो अनुवाद कुणी करावा हा यक्षप्रश्न उभा राहिला. कारण मला वेळ नव्हता. वेळ नव्हता हे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे. खरं कारण हे आहे की स्पोकन इंग्लिश बरं असलं तरी साहित्यिक इंग्लिश बद्दल आनंदच होता. साहित्यिक मराठी बद्दल पण आनंदच आहे, असं कुणीतरी बोलल्याचं ऐकू आलं मला. पण मग आमचे फेसबुकचे शशी थरूर, सदानंद ची आठवण आली. आजूबाजूला बायकांचा गराडा असणे हे सोडलं तर थरूर साहेब आणि सदानंद यांची इंग्लिश शब्दसंपदा माझ्यालेखी सारखीच आहे. 

त्याने काम हातात घेतलं, पण तब्येतीचा इश्यू झाल्यामुळे काम थोडं रेंगाळलं आणि दोन एक वर्षांनी मला ते बाड मिळालं. ते वाचल्यानंतर सदानंद चं मला खूप कौतुक वाटलं. म्हणजे एक सांगतो तुम्हाला की हे पुस्तक म्हणजे भाषांतर नाही आहे तर भावानुवाद आहे. मराठी मनाचा भाव जसाच्या तसा इंग्लिश मध्ये उतरवणे हे थोडं अवघडच काम पण नंदूने ते काम लीलया केलं आहे. तसं असलं तरी एव्हाना माझा उत्साह पण मावळला होता.

दुसरी एक गंमत अशी होती की या पुस्तकातील बरेच लेख हे मी वयाच्या चाळीशीत लिहिले होते. आता पंचावन्न क्रॉस केल्यावर मलाच ते खूप बालिश वाटू लागले होते. पण या सगळ्या शंका कुशंकांना खारिज करत नंदू, गौरी आणि साकेतच्या प्रतिमा भांड यांनी हा अनुवाद प्रकशित करण्यात प्रोत्साहित केलं. तुमचे धन्यवाद.  

मी तयार झालोच होतो तेव्हा अजून एक गडबड झाली. काही दिवसांपूर्वी मी माझे कस्टमर ग्राईंडमास्तर चा सी इ ओ, समीर केळकर याने लिहिलेल्या गराज टू ग्लोबल या पुस्तकाच्या लॉन्च प्रसंगी त्याची मुलाखत घ्यायला औरंगाबाद ला गेलो होतो. तिथे सिनियर केळकर सरांनी आपल्या भाषणात म्हंटलं "मी समीर ला विचारलं, आपण असा काय तीर मारला की तू पुस्तक लिहितो आहेस" मी विचार केला की जवळपास २०० कोटी टर्नओव्हर     असलेल्या आणि ३० एक देशात हाय क्वालिटी मशिन्स एक्स्पोर्ट कंपनीचे फाउंडर म्हणत असतील की "असा काय आपण तीर मारला आहे" तर त्या न्यायाने मी तर धनुष्याकडे बघितलं पण नव्हतं. पण वैभवी म्हणाली की ऑल रेडी तू खूप चुका केल्या आहेस, ही पण करून टाक. 

थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर की पुस्तक नाही आवडलं तर त्याची जबाबदारी वैभवी, गौरी आणि सदानंद यांच्यावर आहे. पण मराठी पुस्तक जसं आवडलं तसं हे पण आवडेल अशी खात्री आहे. 

अ ..... अभियंत्याचा प्रकाशित होताना तीन समाजसेवी संस्थांच्या प्रेझेन्स मुळे त्या सोहळ्याला चार चांद लागले होते. फळणीकर सरांचं आपलं घर (जिथे मी आता सचिव पण आहे), अशोक देशमाने चं स्नेहवन आणि अंबिका टाकळकरचं आरंभ. या वेळेस मी थोडा वेगळा विचार केला. तीन उद्योजकांना विनंती केली की त्यांनी या कार्यक्रमासाठी येऊन एक वेगळा आयाम द्यावा. तिघांशी पण माझी वैयक्तिक ओळख आहे. मनात विचार आल्या आल्या अनेक लोक मनात आली. कार्यक्रम नेटका व्हावा म्हणून त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या तिघांना आमंत्रित केलं. चिठया टाकल्या म्हणा हवं  तर. 

बाकी दोन प्रमुख पाहुण्यांबद्दल मी काय बोलणार? एक द्रोणाचार्य आहेत, ज्यांचे लेक्चर्स मागे कुठे तरी बसत, काही लिंक्ड इन पोस्ट, यु ट्यूब वरील मुलाखती बघत अनेक गोष्टी शिकतो आणि दुसरे तर खऱ्या अर्थाने बिझिनेस मेंटॉर आहेत. त्यांच्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन आलं आहे. 

एकाच आयुष्यात शून्यापासून दहा हजार कोटी टर्नओव्हर करणाऱ्या लोकांबद्दल फक्त मासिकात वाचून होतो. आज देशपांडे सरांबरोबर बोलायला मिळतं आहे, त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन होत आहे यापेक्षा भाग्य काय मोठं असणार आहे? सरांना कदाचित लक्षात नसेल पण त्यांच्या वक्तशीरपणाचे आणि नवीन उद्योजकांना ते कसे प्रोत्साहित करतात याचे माझ्याकडे चार पाच किस्से आहेत. त्यातील एक कि ज्यात मी इन्व्हॉल्व्ह होतो, तो सांगितल्याशिवाय राहवत नाही आहे. काही वर्षांपूर्वी तेजश्री कांबळे ने माझी आकाशवाणी वर उद्योजकतेवर मुलाखत घेतली होती, ज्याची लिंक्ड इन वर टाकली होती. त्यावर देशपांडे सरांची कॉमेंट होती की "मराठीत उद्योजकतेवर इतक्या सोप्या भाषेत खूप कमी ऐकलं आहे. प्रत्येक मराठी उद्योजकाने ही मुलाखत ऐकावी" थोडी मी तिखट मिरची लावली असेल, पण अशा धरतीची कॉमेंट होती. मी सरांना मेसेज पाठवला की ही कॉमेंट मी बाकी सोशल मीडियावर मुलाखत लोकांनी ऐकावी म्हणून वापरू का? मला वाटलं होतं, सरांचा काही मेसेज येणार नाही. पण त्यांचा होकाराचा मेसेज आला आणि मग ती मुलाखत अनेक लोकांपर्यंत पोहोचली. अजून दोन चार किस्से आहेत, पण वेळेअभावी थांबतो. सर, धन्यवाद तुम्ही हे निमंत्रण स्वीकारलं. खूप प्रिव्हिलेज्ड फील करतो आहे. 

एम जी सरांचं माझ्या आयुष्यात असलेल्या काँट्रीब्युशन बद्दल मी आतापर्यंत इतक्यांदा बोललो आहे की मला आता एम जी डिव्हीडंड वगैरे मागतील की काय अशी भीती वाटते. अर्थात अभी बोल ही देता हू सर, मी सुद्धा अर्ह समस्ती ला किंवा टीजी ओ बी ला इतके लोक पाठवले की सरांना पण भीती वाटते की मी त्यांच्याकडे कमिशन मागतो की काय? पण जोक्स अपार्ट, दुसऱ्या अँजिओप्लास्टी नंतर मी इतका अगोनी मध्ये गेलो होतो आणि तेव्हाच माझी एमजी सरांशी ओळख करून दिली गेली. आताही आव्हानं आहेतच पण त्याला दोन हाताने सामोरे जाण्याची मानसिकता बाळगून आहे आणि त्याचं श्रेय एम जी सरांना जातं. म्हणून मी पुस्तकात त्यांना डॉ मनीष गुप्ता संबोधलं होतं. काही कारणाने त्यांनी मला ते काढायला लावलं. पण माझ्यासाठी दोन कार्डिओलॉजिस्ट आहेत, एक डॉ हरदास आणि दुसरे एम जी सर. 

बाकी सगळ्यात शेवटी दोन कुटुंबं. एक सेटको आणि दुसरे मंडलिक परिवार. दोन्ही ठिकाणी अत्यंत सशक्त, कष्टाळू, माझं मनस्वीपण सांभाळणारे लोक काम करत आहेत. ते तसे आहेत, म्हणून हे सगळं घडत आहे. त्यामुळे सेटको टीमचे आणि मंडलिक परिवाराचे आभार. आणि सरते शेवटी या टेक्नॉलॉजी चे आभार कारण ती नसली असती तर मी कधी व्यक्त झालो नसतो आणि हे जे काही होतं आहे ते काहीच झालं नसतं. 

तुम्ही आज सगळे इथे आलात, नेहमीच तुम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. 

आता मी थांबतो, दोन उद्योजकतेच्या स्टॉलवर्ट्स ना आपल्याला ऐकायचं आहे. मी ही खूप उत्सुक आहे. धन्यवाद. 

Friday, 20 June 2025

Let me begin with a confession. Before meeting MG Sir, I firmly believed that no one could impress me with their life principles. I was convinced that my own philosophies on living were supreme and irreplaceable. However, that belief was challenged in February 2016 when I attended my first session of the 20th TGOB with MG Sir. Skeptical and ready to find flaws in his words, I was waiting for an opportunity to prove myself right. But alas! Not only in that first session but in every subsequent session, I found no reason to doubt him. Instead, I found myself drawn in, session after session.

By the time TGOB ended, I had become an ardent fan of MG Sir.

Like every Chrysalian, I must have heard him speak hundreds of times, yet his words never feel repetitive or stale. I am constantly amazed by his unwavering passion for sharing knowledge, regardless of the size of the audience—whether 10, 100, or even 1,000+. His energy never falters; he speaks with the same enthusiasm every single time.

One of his most admirable qualities is his relentless determination. A perfect example is the Kilimanjaro expedition. He encouraged the Chrysalis fraternity to join him on this journey. While we all initially agreed, almost everyone—including myself—ultimately backed out. Yet, that did not deter him. He, along with Rachna Ma’am and the Borade brothers, went ahead and conquered it.

Another unforgettable moment was how he handled a chaotic situation during our return from the My Life program. With 27 of us at risk of missing our train from Kathgodam to Delhi, he remained remarkably calm, ensuring that every one of us made it just in time. His composure and leadership in that moment were nothing short of inspiring.

Out of all his powerful speeches, two stand out in my memory. The first was on Koh Tao Island, a day before the Guinness World Record attempt. I have never witnessed a speech so fiery, yet so affirming. While many factors contributed to achieving the record, I firmly believe his words played a significant role in our success. The second was at my own book publishing ceremony—a speech filled with warmth, pride, wit, and humor. It was a moment I will always cherish.

MG Sir’s wisdom has transformed my mindset—not only in business but in my personal life as well. On his birthday, I wish him good health and a long, fulfilling life. More importantly, I assure him that I will do everything in my power to contribute to his vision of creating growth-hungry entrepreneurs.

©️ Rajesh Mandlik

Saturday, 14 June 2025

 काल मित्र गप्पा मारायला आला होता. फेसबुकवर मैत्री झाली तरी नंतर त्यापलीकडे अनेक लोकांशी दोस्ती झाली आहे, त्यापैकीच तो एक आहे. 

त्याने परत तोच विषय काढला की तुमच्या लिस्ट मध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक आणि तुमचेही मत न पटणारे लोक मित्र म्हणून कसे सांभाळता? त्याला जे सांगितलं आणि आधीही इथे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो. 

एखाद्याशी मैत्री करण्याचे आणि टिकवण्याचे माझे जे निकष आहेत, त्यामध्ये त्याचा धर्म, जात, राजकीय मत हे कुठेच बसत नाहीत. एकदा लिस्ट मध्ये आले आणि काही कारणाने माझ्या लक्षात आलं की यांची राजकीय मतं माझ्यापेक्षा वेगळी आहेत पण समाजामध्ये काम अतिशय इमानेइतबारे करतो. मग मला त्यांच्या स्वीकारार्ह तेचा टॉलरन्स बँड खूप मोठा होतो. तुम्ही तुमच्या कामावर किती प्रेम करता, आर्थिक स्थैर्य आणायचा प्रयत्न करत असाल, तुम्ही समाजाप्रती सहवेदनेचा, सह अनुभूतीचा भाव ठेवत असाल  तर मला त्यांची राजकीय मतं काहीही असतील तरी फरक पडत नाही. त्यांचं जॉब प्रोफाईल काहीही असेल तरी मला मैत्री त्याज्य नाही आहे. वैयक्तिक असणारं राजकीय मत हे कुणाच्या कार्यकर्तृत्वापेक्षा महत्वाचं असतं असं मला वाटत नाही. त्यामुळेच मित्रत्व स्वीकारताना मी व्यक्ती वजा राजकीय मत असं स्वीकारतो. 

हे असं असलं तरी वर टॉलरन्स बँड चा उल्लेख केला आहे. तो आहेच. तुमची जशी दैवतं आहेत तसे माझेही काही आदर्श आहेतच, दैवत एकही नाही. आणि त्यात इतिहासातली एकही व्यक्ती नाही. त्यांच्याकडून जे काही शिकायचं ते शिकून झालं आहे. माझे आदर्श या जित्या जागत्या व्यक्ती आहेत. त्यात व्यावसायिक आहेत, समाजसेवक आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, कलाकार आहेत. त्या लोकांवर विखारी टोन मध्ये भाषा वापरली की मग मी त्यांना लिस्ट मधून मोकळं करतो. दुसरं अजून एक उडवण्याचं कारण एकदम वियर्ड आहे. मला जेव्हा लक्षात येतं की याच्या प्रतिक्रियेत विरोध नाही आहे तर मत्सर आहे, असूया आहे त्यांना पण अलविदा करतो. मग त्यात फेसबुकवर एकेकाळी जवळची मैत्री झाली आहे असे अनेक लोक आहेत. इतकंच नाही, तर मध्ये माझ्या अगदी जवळच्या वैयक्तिक मित्राला फेसबुक लिस्ट मधून मोकळं केलं. आणि त्या विषयावर  न बोलण्याचं भान आम्ही दोघेही राखून आहोत. 

वर उल्लेख केलेला टोन माझ्या साठी शब्दांपेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यातून व्यक्त होणारे हावभाव, सूर हे जाणवतात. तुम्हाला ती अमूल माचोची ऍड आठवते. त्यातील शब्द व्हल्गर नव्हते, पण हावभाव अचकट विचकट होते. म्हणून त्यावर बंदी आली. फेसबुकच्या पोस्ट मधून, प्रतिक्रियेमधून ते कळतं. तुम्ही शब्दात लिहिलं नसेल तरी त्यामागचा अर्थ कळतो आणि तो बऱ्याचदा असाच विकट असतो. तो तसा नसणं यालाच सोशल मीडिया हायजिन म्हणतात. तो पाळला की मी संवाद साधू शकतो. 

अजून एक शेवटची गोष्ट. मी प्रत्यक्ष जीवनात आणि फेसबुकवर कान हलके ठेवले नाही आहेत. माझ्या कंपनीत काही माणसे चोऱ्या करतात असा अनेक जण माझ्यापाशी संशय व्यक्त करायचे. पण पुरावा मिळाल्याशिवाय ऐकीव माहितीवर कुणाला काढलं नाही. इथेही अनेक प्रथितयश लोकांबद्दल इकडून तिकडून काहीबाही ऐकायला मिळतं. माझ्याबद्दलही लोक बोलत असावीत. पण या ऐकीव माहितीवर मी कुणाबद्दलचं मत बदललं नाही. जेव्हा मला स्वतःला अनुभव आला, तेव्हाच मत बनवलं. 

एनीवे, मी मानव्य, मैत्री यात पावित्र्य राखण्यात विश्वास ठेवतो. कर्माचरण हे जास्तीत जास्त स्वच्छ कसं असेल यावर मनापासून काम करतो. जे आहे, ते असं आहे. 

Friday, 13 June 2025

एअर इंडिया

 व्यवसायासाठी माझा विमानप्रवास १९९५-९६ साली चालू झाला असला तरी ज्याला आपण फ्रिक्वेन्ट एअर ट्रॅव्हलर म्हणतो ते २००६ पासून चालू झालं. अर्थात त्यासाठी एअर डेक्कन, स्पाईस जेट, इंडिगो या नो फ्रील्स एअरलाईन्स ला धन्यवाद द्यायला हवेत. त्या काळात एअर इंडिया, जेट किंवा किंग फिशर या फुल सर्व्हिस कॅरिअर ने प्रवास करणं अवघडच होतं, कारण तिकिटांच्या किंमतीत बराच फरक असायचा. मला आठवत आहे त्या प्रमाणे मी पहिला एअर इंडिया चा प्रवास जवळपास २०१६ साली केला. त्यानंतरही एअर इंडिया ने प्रवास अगदीच क्वचितच केला. तिकीटाची किंमत हा तर इश्यू होताच पण त्याच्या बेकार सर्व्हिस चे किस्से पण खूप कानावर पडायचे. 

२०२२ ला टाटा ने एअर इंडियाला विकत घेतलं. अनेक भारतीयांप्रमाणे मलाही टाटा ब्रँड बद्दल ममत्व होतंच. आणि एव्हाना सर्वच एअरलाईनची प्राइसिंग स्पर्धेमुळे जवळपास आली होती. मग मी माझ्या विमान प्रवासासाठी एअर इंडिया ऑप्शन हिरीरीने घेऊ लागलो. सगळ्यात फायदा झाला मला, अमेरिकेच्या प्रवासात. सॅन फ्रान्सिस्को, न्यू यॉर्क आणि शिकागो ला त्यांची डायरेक्ट सर्व्हिस होती. बऱ्याच लोकांना पंधरा-सोळा तासांचा सलग विमानप्रवास आवडत नाही. मला आवडायचा. कदाचित बसने असे अनेक प्रवास केल्यामुळे सवय असावी. अंतर्देशीय प्रवासात पुणे-दिल्ली-पुणे मी आवर्जून एअर इंडिया घेतो. 

सुदैवाने, या सगळ्या प्रवासात मला तो एअर इंडिया चा कुप्रसिद्ध सर्व्हिस इश्यू कधी आला नाही. फक्त डिले मात्र असायचा, तो ही आंतरराष्ट्रीय प्रवासात. किंबहुना मला प्रत्येक प्रवासागणिक खूप सुधारणा जाणवायच्या. विमानात मिळणारे अन्न, स्वच्छता वगैरे गोष्टींमध्ये सुधारणा दिसत होती. मला आजकाल सारखं वाटत होतं की जे आर डी च्या सत्तरच्या दशकातील एअर इंडिया कि जि जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन पैकी एक होती, परत आता दिसेल.  

या पार्श्वभूमीवर कालचा ए आय १७१ चा अपघात खूपच धक्कादायक होता. प्रचंड दुःख झालं. त्या अपघाताची तीव्रता खूपच भयानक होती. २४१ विमानातले आणि हॉस्टेल मधील २०-२५ जीव आपण गमावले. त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात हा विचारांच्या पलीकडे आहे. मृतकांच्या नातेवाइकांच्या मनाची सहवेदना झाली तरी हृदय पिळवटून जातं. जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आपण फार काही करू शकत नाही ही हतबलता पण त्रास देते. 

मला आशाच नव्हे तर खात्री आहे की या अपघाताच्या धक्क्यातून एअर इंडिया पण सावरेल. यानंतर ते विमानप्रवासाची सुरक्षा यावर काहीतरी ठोस उपाययोजना करतील. या अपघाताचे सुद्धा मूळ कारण ते शोधून काढतील आणि असं काही परत होण्याची शक्यता सुद्धा तयार होणार नाही अशा पद्धतीची कार्यप्रणाली तयार करतील. देश विदेशातील प्रवासी एअर इंडिया च्या विमानात प्रवेश करताना सुरक्षिततेची भावना घेऊन येतील असा विश्वास तयार करावा लागेल. त्यांनी निवडलेला सुधारणेचा मार्ग अजून ताकदीने ते फॉलो करतील आणि येणाऱ्या वर्षात तो सकारात्मक बदल आपल्याला दिसावा अशी मनोमन प्रार्थना करतो . 

पुन्हा एकदा या प्रवासात निधन पावलेले सर्व प्रवासी, हॉस्टेल मधील डॉक्टर यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या नातेवाईकांना हा लॉस सहन करण्याचे धैर्य मिळो ही प्रार्थना. 

Friday, 6 June 2025

 तुम्हाला सगळ्यांना अ.......अभियंत्याचा चा इंग्लिश अनुवाद An Engineer's Journey to Entreprenueship च्या पुस्तक प्रकाशनासाठी निमंत्रित करताना खूप आनंद होतो आहे. 

या पुस्तक प्रकाशनासाठी श्री आनंद देशपांडे सरांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचं मान्य केलं तेव्हा मी अक्षरश: सातव्या आसमान वर होतो. ज्याचं नाव हे पुण्यातच नव्हे तर देशात, आणि देशातच का जगात उद्योजकतेशी समानार्थी शब्द म्हणून घेतलं जातं, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या उद्योजकाच्या पुस्तक विमोचनाला येण्याचं मान्य केलं हा मेल पाहिल्यावर कृतज्ञतेची भावना सरसरत गेली.  

ज्याच्यामुळे उद्योजकता म्हणजे नक्की काय हे मला कळलं ते मनीष गुप्ता यांनी सुद्धा येण्याचं मान्य केलं हे अजून एक भाग्य.  

पुस्तक प्रकाशनाचा आनंद तर आहेच पण त्यापेक्षा या दोघांचे उद्योजकतेवरचे विचार हे जास्त प्रेरक असतील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. 

अ...... अभियंत्याचा प्रकाशित होताना आपलं घर, स्नेहवन आणि आरंभ यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी तीन मला भावलेल्या उद्योजकांचा छोटा सत्कार यावेळेस करणार आहे. त्यामागे भावना ही अवॉर्ड वगैरे अशी नसून एका उद्योजकाने दुसऱ्या उद्योजकांना केलेला सलाम इतकी साधी भावना आहे. 

विक एन्ड ला पुण्यात हॉल उपलब्ध नसतात, त्यामुळे बुधवार २५ जून हा वीक डे कार्यक्रमासाठी ठरवला आहे, मयूर कॉलनी कोथरूड येथील एम इ एस चा हॉल हे ठिकाण आहे, वेळ: संध्याकाळी ६:३० वाजता. 

दोन्ही पाहुणे हे वेळ पाळण्याबाबत प्रचंड दक्ष आहेत, त्यामुळे कार्यक्रम बरोबर ६:३० वाजता सुरू होईल. उद्योजकता, व्यवसाय याबद्दल ऐकायचे असेल तर जरूर कार्यक्रमाला या. काही कारणाने तुम्हाला जमणार नसेल तर तुमच्या तरुण मुलामुलींना पाठवा. तुमची निराशा होणार नाही याची खात्री देतो. 

अ.... अभियंताचा प्रकाशित होताना भरभरून प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही तसाच प्रतिसाद द्यावा ही विनंती. 

भेटू यात. २५ जून २०२५, संध्याकाळी ६ वाजता एम इ एस हॉल, मयूर कॉलनी पुणे ३८. 


Thursday, 22 May 2025

माझ्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं तेव्हा मी पण विचार केला की मुलीकडच्याकडून काही तरी हापसून घ्यावं. अगदी इनोव्हा नाही तर गेलाबाजार वॅगन आर तरी मागावी. जास्त नाही पण म्हंटलं दोन चार तोळे सोनं पोरीच्या अंगावर घाला अशी आई वडिलांना मागणी करावी आणि हुंड्यात म्हंटलं दोन चार लाख डिमांड करावेत. 

पण मग आम्हाला मुलगी भेटली, मुलीचे आईवडील भेटले. सगळं प्रकरणच इतकं सादगी चं होतं की माझ्या सगळ्या मागण्या मी गिळून टाकल्या. 

अच्छी सूरत को सवरने की जरूरत क्या है

सादगी भी तो कयामत की अदा होती है

असा सगळा माहोल होता. उच्चशिक्षित सून, जिच्या स्वभावात त्याचा मागमूस पण नाही, अतिशय मॉडेस्ट आणि हंबल असे तिचे आईवडील, कुटुंबाच्या सेवेत तत्पर असणारा सुनेचा भाऊ, आणि एकमेकांच्या प्रेमात बुडालेला नातेवाईकांचा गोतावळा. असा सगळा प्रकार. 

सगळा वेगळाच प्रकार झाला. मानपानाच्या बैठकीला आमच्या बाजूने तब्बल एक जण होता, तो म्हणजे मी, आणि त्यांच्याकडून दोघा जणांची गॅंग होती, ते म्हणजे मुलीचे आईवडील आणि पंधरा वीस मिनिटाच्या बैठकीत काय हवं नको ते बघणारा मुलीचा भाऊ. निम्मा वेळ तर आम्हाला काय नको हे बोलण्यातच गेला. लग्नाच्या प्रत्यक्ष खरेदीत "या गोष्टीचे पैसे आमच्याकडून होते, पण ते तुम्ही दिले" म्हणून मी काही पैसे त्यांना जी पे केले तर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी "नाही नाही, ते आम्हीच घ्यायचं होतं" म्हणत परत केले. 

असो. खूप वाईट वाटलं, महाराष्ट्रात जे काही घडलं ते वाचून. पोस्टचा बाज जरा साधा असला तरी दुःख अपार झालं आहे. खरंतर माफक अशी श्रीमंती आणि अमाप नात्यांची संपत्ती यातील गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित सांभाळलं तर आयुष्याचा स्वर्ग होतो. पण असं साधं सरळ सोपं आयुष्य सोडून लोक का विचका करून घेतात हा मोठा प्रश्नच आहे. 

Tuesday, 20 May 2025

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी संजयच्या फॅक्टरीत गेलो होतो. संजयने हे युनिट नुकतंच बनवलं होतं. मी कंपनीत पोहोचलो तेव्हा सीन जरा गरमागरमीचा होता. संजय ने त्यांच्या पॅन्ट्रीच्या इथून टॉयलेट साफ करण्याचा ब्रश, मॉप हातात घेतला होता, आणि तो टॉयलेटच्या दिशेने झपझप चालत होता. त्यांचा एच आर त्याच्या मागे "सर, मी मॅनेज करतो. नका तुम्ही असं करू" असं म्हणत धावत होता. 

मी आपलं काही इश्यू असेल म्हणून संजय च्या केबिन मध्ये बसून राहिलो. अर्ध्या एक तासात संजय तडकलेल्या चेहऱ्याने त्याच्या खुर्चीत येऊन बसला. माझ्या लक्षात आलं, काहीतरी बिनसलेलं आहे. संजय शांत झाल्यावर मी त्याला विचारलं कि काय झालं म्हणून. 

तर स्टोरी अशी होती. संजय ने युनिट नवीन बनवलं होतं. स्वच्छतेच्या बाबतीत संजय फार काटेकोर होता. नवीन युनिट मधील शॉपफ्लोअर वर वर्किंग असोसिएट्स साठी बनवलेले टॉयलेट्स त्याला हवे तसे क्लीन होत नव्हते. क्लिनिंग एजन्सी कडून टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचं काम एच आर मॅनेजर चं होतं. ते क्लीन होत नाही आहेत, हे संजय ने एच आर मॅनेजर ला चार पाच वेळा निदर्शनात आणून दिलं होतं. जेव्हा मी गेलो त्या सकाळी परत संजय ला हवी तशी स्वच्छता दिसली नाही. संजयने सरळ टॉयलेट क्लिनिंग चं सामान उचललं आणि एजन्सी च्या लोकांना घेऊन गेला आणि त्याला तो एरिया जसा क्लीन हवा तसा करून दाखवला. 

मी समोर असताना त्याने एच आर मॅनेजर ला आणि क्लिनिंग एजन्सी च्या लोकांना केबिन मध्ये बोलावलं आणि सांगितलं "मला जसा क्लिनलीनेस हवा आणि तो कसा आणायचा ते मी दाखवून दिलं आहे. आता मला यापुढे जर ते स्वच्छ दिसलं नाही तर मग तुम्हाला माझ्या तोंडून संगीत ऐकावं लागेल आणि ते कानाला फार मधुर वाटणार नाही.  आणि एक सांगतो. इथे माझ्या ऑफिसच्या जवळ पण टॉयलेट बनवलं आहे, पण मी मात्र हे शॉप फ्लोअरचं वॉशरूम वापरणार. त्यामुळे तिथलं ऑडिट सारखं माझ्या नजरेतून होत राहील हे ध्यानात असू द्या."

या गोष्टीला आता जवळपास पाच वर्षे झालीत. आज संजयच्या कंपनीची स्वच्छता ही वेगळ्याच लेव्हलची आहे. आजही संजय त्याच्या ऑफिसजवळ असलेलं टॉयलेट वापरत नाही तर शॉप फ्लोअर वर असोसिएट्स साठी जे वॉशरूम बनवले आहे तेच वापरतो आणि ते मला २०२० मध्ये जसं दिसलं तसंच आजही चकाचक दिसतं. 

स्वच्छता ठेवण्याबाबत एखाद्या आस्थापनेच्या नेत्याने कसं वागायला हवं याचा वस्तुपाठ संजयने मला त्याच्या वागणुकीतून दाखवून दिला.