Thursday, 22 May 2025

माझ्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं तेव्हा मी पण विचार केला की मुलीकडच्याकडून काही तरी हापसून घ्यावं. अगदी इनोव्हा नाही तर गेलाबाजार वॅगन आर तरी मागावी. जास्त नाही पण म्हंटलं दोन चार तोळे सोनं पोरीच्या अंगावर घाला अशी आई वडिलांना मागणी करावी आणि हुंड्यात म्हंटलं दोन चार लाख डिमांड करावेत. 

पण मग आम्हाला मुलगी भेटली, मुलीचे आईवडील भेटले. सगळं प्रकरणच इतकं सादगी चं होतं की माझ्या सगळ्या मागण्या मी गिळून टाकल्या. 

अच्छी सूरत को सवरने की जरूरत क्या है

सादगी भी तो कयामत की अदा होती है

असा सगळा माहोल होता. उच्चशिक्षित सून, जिच्या स्वभावात त्याचा मागमूस पण नाही, अतिशय मॉडेस्ट आणि हंबल असे तिचे आईवडील, कुटुंबाच्या सेवेत तत्पर असणारा सुनेचा भाऊ, आणि एकमेकांच्या प्रेमात बुडालेला नातेवाईकांचा गोतावळा. असा सगळा प्रकार. 

सगळा वेगळाच प्रकार झाला. मानपानाच्या बैठकीला आमच्या बाजूने तब्बल एक जण होता, तो म्हणजे मी, आणि त्यांच्याकडून दोघा जणांची गॅंग होती, ते म्हणजे मुलीचे आईवडील आणि पंधरा वीस मिनिटाच्या बैठकीत काय हवं नको ते बघणारा मुलीचा भाऊ. निम्मा वेळ तर आम्हाला काय नको हे बोलण्यातच गेला. लग्नाच्या प्रत्यक्ष खरेदीत "या गोष्टीचे पैसे आमच्याकडून होते, पण ते तुम्ही दिले" म्हणून मी काही पैसे त्यांना जी पे केले तर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी "नाही नाही, ते आम्हीच घ्यायचं होतं" म्हणत परत केले. 

असो. खूप वाईट वाटलं, महाराष्ट्रात जे काही घडलं ते वाचून. पोस्टचा बाज जरा साधा असला तरी दुःख अपार झालं आहे. खरंतर माफक अशी श्रीमंती आणि अमाप नात्यांची संपत्ती यातील गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित सांभाळलं तर आयुष्याचा स्वर्ग होतो. पण असं साधं सरळ सोपं आयुष्य सोडून लोक का विचका करून घेतात हा मोठा प्रश्नच आहे. 

Tuesday, 20 May 2025

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी संजयच्या फॅक्टरीत गेलो होतो. संजयने हे युनिट नुकतंच बनवलं होतं. मी कंपनीत पोहोचलो तेव्हा सीन जरा गरमागरमीचा होता. संजय ने त्यांच्या पॅन्ट्रीच्या इथून टॉयलेट साफ करण्याचा ब्रश, मॉप हातात घेतला होता, आणि तो टॉयलेटच्या दिशेने झपझप चालत होता. त्यांचा एच आर त्याच्या मागे "सर, मी मॅनेज करतो. नका तुम्ही असं करू" असं म्हणत धावत होता. 

मी आपलं काही इश्यू असेल म्हणून संजय च्या केबिन मध्ये बसून राहिलो. अर्ध्या एक तासात संजय तडकलेल्या चेहऱ्याने त्याच्या खुर्चीत येऊन बसला. माझ्या लक्षात आलं, काहीतरी बिनसलेलं आहे. संजय शांत झाल्यावर मी त्याला विचारलं कि काय झालं म्हणून. 

तर स्टोरी अशी होती. संजय ने युनिट नवीन बनवलं होतं. स्वच्छतेच्या बाबतीत संजय फार काटेकोर होता. नवीन युनिट मधील शॉपफ्लोअर वर वर्किंग असोसिएट्स साठी बनवलेले टॉयलेट्स त्याला हवे तसे क्लीन होत नव्हते. क्लिनिंग एजन्सी कडून टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचं काम एच आर मॅनेजर चं होतं. ते क्लीन होत नाही आहेत, हे संजय ने एच आर मॅनेजर ला चार पाच वेळा निदर्शनात आणून दिलं होतं. जेव्हा मी गेलो त्या सकाळी परत संजय ला हवी तशी स्वच्छता दिसली नाही. संजयने सरळ टॉयलेट क्लिनिंग चं सामान उचललं आणि एजन्सी च्या लोकांना घेऊन गेला आणि त्याला तो एरिया जसा क्लीन हवा तसा करून दाखवला. 

मी समोर असताना त्याने एच आर मॅनेजर ला आणि क्लिनिंग एजन्सी च्या लोकांना केबिन मध्ये बोलावलं आणि सांगितलं "मला जसा क्लिनलीनेस हवा आणि तो कसा आणायचा ते मी दाखवून दिलं आहे. आता मला यापुढे जर ते स्वच्छ दिसलं नाही तर मग तुम्हाला माझ्या तोंडून संगीत ऐकावं लागेल आणि ते कानाला फार मधुर वाटणार नाही.  आणि एक सांगतो. इथे माझ्या ऑफिसच्या जवळ पण टॉयलेट बनवलं आहे, पण मी मात्र हे शॉप फ्लोअरचं वॉशरूम वापरणार. त्यामुळे तिथलं ऑडिट सारखं माझ्या नजरेतून होत राहील हे ध्यानात असू द्या."

या गोष्टीला आता जवळपास पाच वर्षे झालीत. आज संजयच्या कंपनीची स्वच्छता ही वेगळ्याच लेव्हलची आहे. आजही संजय त्याच्या ऑफिसजवळ असलेलं टॉयलेट वापरत नाही तर शॉप फ्लोअर वर असोसिएट्स साठी जे वॉशरूम बनवले आहे तेच वापरतो आणि ते मला २०२० मध्ये जसं दिसलं तसंच आजही चकाचक दिसतं. 

स्वच्छता ठेवण्याबाबत एखाद्या आस्थापनेच्या नेत्याने कसं वागायला हवं याचा वस्तुपाठ संजयने मला त्याच्या वागणुकीतून दाखवून दिला. 

Monday, 19 May 2025

 हंगेरी चा माझा होस्ट मस्त माणूस होता. एकतर फॅमिली कल्चर अजूनही जिवंत वाटलं तिथं मला. रविवारी मी बुडापेस्टला पोहोचल्यावर संध्याकाळी लोकल साईट सिइंग आणि डिनर साठी तो त्याची बायको आणि दोन मुलांना, वय २८ आणि २५, असं सगळ्यांना घेऊन आला होता. आणि त्या सर्वांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या. 

बुडापेस्ट शहर मला संपन्न वाटलं पण पाश्चिमात्य शहरात सहसा अंगावर येणारी श्रीमंती तिथं दिसली नाही. लोकसंख्या पण कमी असल्यामुळे रस्ते पण रुंदीला लहान आणि आपल्याइतके खड्डे वगैरे नसले तरी बऱ्यापैकी खडबडीत होते. एका कंपनीत गेलो तर तिथं अगदी मातीचा रस्ता होता. अनेक कार पण जुन्या, छोटे मोठे डेंट मार्क्स दिसणाऱ्या होत्या. मुख्य म्हणजे युरोप मध्ये तसंही अमेरिकेसारख्या अगडबंब कार नसतात. मारुती स्विफ्ट खूप पॉप्युलर कार वाटली मला बुडापेस्ट मध्ये.  अनेक बिल्डिंग आणि घरं सुद्धा मला आपल्यासारखी वाटली, बाहेरून मध्यमवर्गीय फील देणारी. 

मी हे जे सगळं लिहितो आहे ती साम्यस्थळं माझ्या होस्ट ला सांगत होतो. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि एकच डायलॉग मला ऐकवला "But we don't have filthy garbage on our roads and public places." 

माझी मान शरमेने खाली झुकली. खरंच सांगतो बुडापेस्ट काय किंवा मला आजकाल तैवान मध्ये नेहमी जिथं जावं लागतं ते तैचुंग काय, तिथंही गरिबी आहे, दाटीवाटीने असलेल्या इमारती आहेत. चाळी पेक्षा भयानक अशी घरं मी चीन मध्ये पण बघितली आहेत. पण आपल्याइतकी रस्त्यावर घाण आणि कचरा मी कुठेही बघितला नाही. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा शहरं स्वच्छ ठेवण्याचा नामी उपाय पण त्याबद्दलची आपल्या समाजाची आणि राजकारण्यांची उदासीनता ही उबग आणि लाज वाटावी अशी आहे.

मला एक प्रश्न नेहमी पडतो. या विषयाशी संबंधित आपले राजकारणी, ज्यात नगरसेवक, मंत्री लोक, आणि नोकरशाहीचे पदाधिकारी परदेशात जातात. कुणी अभ्यास दौरे काढून जातात, कुणी नातेवाईकांना भेटायला जात असतील, कुणी मौज मजा करायला जात असतील. यांच्या कुणाच्याही मनात असं येत नसेल का की माझा वॉर्ड, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश असा स्वच्छ असावा? गणपती मध्ये अष्टविनायक आणि नवरात्री मध्ये देवीच्या दर्शनासाठी फुकट दौरे काढणाऱ्या नगरसेवकाला असं कधी वाटत नसेल का की माझा वॉर्ड चकाचक, अतिक्रमण मुक्त असायला हवा.? आणि खरं सांगतो, हे अनुभवयाला परदेशात पण जायची गरज नाही आहे. मध्य प्रदेश मधील इंदोर, किंवा पंजाब मधील चंदिगढ सुद्धा दृष्ट लागेल इतकं स्वच्छ आहे. 

आणि यापेक्षाही दुर्दैव हे आहे की धार्मिक आणि जातीय राजकारणात विभागल्या गेलेल्या आपल्या समाजाची पण मती कुंठित झाली आहे. आम्हाला रस्त्यावर दिसणारी अस्वच्छता, सार्वजनिक जागेवर नोकरशाहीच्या मदतीने केलेल्या अतिक्रमणामुळे उभे राहिलेले प्रश्न, शहरात असणारे दरिद्री रस्ते यावर मोर्चे काढून प्रश्न विचारावे वाटत नाही. कारण आमचे राजकारणी आम्हाला जातीवरून मोर्चे नेण्यात व्यस्त करतात, आम्हाला जयंत्या, पुण्यतिथीला,  मिरवणुकीसाठी उन्मदित करतात. 

सामाजिक उन्नतीसाठी काम करण्यासाठी खरंतर किती वाव आहे. राजकीय आणि नोकरशाहीने इच्छाशक्ती दाखवली तर चमत्कार करू शकतात याची असंख्य उदाहरणे आपणच पाहिली आहेत. पण याबाबतीत मात्र ती मृतावस्थेत आहे हे आपलं दुर्दैव. 

Monday, 12 May 2025

 मोठं कन्फ्युजन आहे. 

माझा यावेळचा दौरा मुंबई- बुडापेस्ट-फ्रँकफूर्ट-इस्तंबूल-मुंबई असा होता. १० मे रोजी माझं दुपारी अडीच वाजता फ्रँकफूर्ट-इस्तंबूल असं फ्लाईट होतं. त्याचं चेक इन करण्यासाठी मी ९ मे ला बसलो. तितक्यात यु ट्यूब वर एक्स्टर्नल मिनिस्ट्री चं ब्रिफिंग चालू होतं. त्यात  कर्नल कुरेशी सांगत होत्या की पाकिस्तान ने जे भारतावर ड्रोन हल्ले केले, त्या ड्रोन चं विश्लेषण केल्यावर असं लक्षात आलं की हे ड्रोन तुर्कस्थान मध्ये बनवले आहेत. 

मी चेक इन करण्याऐवजी व्हाट्स अप उघडलं. इस्तंबूल मधील माझ्या होस्टला मेसेज पाठवला की मी तिकडे येणं कॅन्सल करतो आहे. त्यामागे कारण होतं. 

- जर मिनिस्ट्री सांगत आहे की पाकिस्तान ने वापरलेले ड्रोन हे टर्की मध्ये बनले आहेत तर ते त्यांच्याबरोबर चे राजनैतिक संबंध थांबवू शकतात. माझं टर्किश एअरलाईन चं रिटर्न तिकीट १७ मे चं होतं. पुढील ९ दिवसात काहीही होऊ शकत होतं. मला रिस्क घ्यायची नव्हती. आणि ज्या देशाचे ड्रोन मिलिटरी ऍक्शन मध्ये आपल्या देशाविरुद्ध वापरले तिथं जाणं काही मला फारसं संयुक्तिक वाटलं नाही. मी ट्रॅव्हल प्लॅन बदलून जर्मनीतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 

इथं मला प्रश्न पडला. टर्की ने ड्रोन बनवले आणि ते पाकिस्तान ने आपल्या विरुद्ध वापरले म्हणून माझी राष्ट्र भक्ती जागृत झाली आणि मी टर्की ला जाणं कॅन्सल केलं. पण पाकिस्तान ने तर आपल्या विरुद्ध एफ १६ वापरलं आणि इथे तर माझी अमेरिकन कंपनी बरोबर पार्टनर शिप आहे. मग हा दुटप्पी पणा आहे का? 

यापुढे जाऊन अजून एक गंमत सांगतो. जर्मनी मध्ये मला एका दुसऱ्या गावाला जायचं होतं. माझ्यासाठी जी कॅब बुक केली होती, तिचा मालक आणि चालक पाकिस्तानी होता. मी ती कॅब मात्र कॅन्सल नाही केली. 

टर्की ची ट्रिप कॅन्सल केल्यामुळे माझं जवळपास रु दीड लाख रुपयाचं नुकसान झालं. मी पाकिस्तानी मालकाची कॅब कॅन्सल करून दुसरी केली असती तर माझं शून्य नुकसान झालं असतं. 

धर्मधिष्ठित राजकारण करून सामान्य माणसांच्या मनात तिरस्काराची भावना तयार करणारी आणि त्यातून कृष्णकृत्य उद्युक्त करणारी राष्ट्रनीती,

आणि भांडवलशाहीचा आधार घेऊन दुसऱ्या देशाला स्वसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्रास्त्र पुरवणारे युद्धखोर देश

धर्माने शिकवलेल्या जीवन प्रणालीचा सर्व्हायवल साठी उपयोग करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात यापैकी विरोध कुणाचा करायचा, का करायचा, कसा करायचा याबद्दल कन्फ्युजन आहे. मला असं कन्फ्युज असणं बरोबर की चूक हे पण माहित नाही. फक्त मला एक कळतं की कुठल्याही राष्ट्राच्या उन्नतीचं आणि विकासाचं अधिष्ठान हा कोणत्याही धार्मिक इझम शी निगडित नसावं तर कार्मिक इझम शी नातं जोडणारं असावं. मीच मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे. 


Friday, 25 April 2025

अख्ख जग डाव्या आणि उजव्या विचारसरणीत विभागलं गेलं आहे, हे सगळ्यांना माहित आहे. फक्त यात अजून सब कॅटेगरी आहेत. एक एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट. तसेच मॉडरेट लेफ्ट आणि मॉडरेट राईट. जगातली, त्यातल्या त्यात भारतातील बहुसंख्य जनता ही सेंटर लाईन ते मॉडरेट लेफ्ट आणि मॉडेरेट राईट या टॉलरन्स झोन मध्ये बसत होती. आठ दहा टक्के लोक एक्स्ट्रीम लेफ्ट आणि आठ दहा टक्के लोक एक्स्ट्रीम राईट या झोनच्या विचारसरणीचे आहेत. 

जो पर्यंत हे प्रमाण आहे की ८०% लोक हे सेंटर लाईन ते मॉडरेट लेफ्ट किंवा मॉडरेट राईट या झोन मध्ये आहेत तो पर्यंत देश हा सलोख्याने नांदेल. 

प्रॉब्लेम हा झाला आहे की गेल्या काही वर्षात मॉडरेट राईट विचारसरणीचे लोक हे एक्स्ट्रीम राईट कडे झुकत आहेत. आणि त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम मॉडरेटली लेफ्ट विचारसरणीचे लोक हे मॉडरेट राईट कडे चालले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. जेव्हा सेंटर लाईन च्या आजूबाजूला कमी आणि एक्स्ट्रीम लेफ्ट किंवा राईट मध्ये जग विभागले जाईल तेव्हा मात्र प्रॉब्लेम होणार आहे. 

कुठलाही दहशतवादी हल्ला हा धर्म प्रेरित असतो असा एक मतप्रवाह होत चालला आहे. (जसा नुकताच झालेला पहलगाम हल्ला इस्लामप्रेरित आहे असा स्ट्रॉंग मतप्रवाह आहे). आपण सर्व जण हे विसरत चाललो आहोत की धार्मिकतेला खतपाणी हे सरकारच घालत चाललं आहे. आपल्या धर्माबद्दल सर्वाना प्रेम असतं, आणि ते यौग्य आहे. शेवटी धर्मच आपल्याला जगण्याची जीवनप्रणाली शिकवतं. पण धर्माबद्दलच्या प्रेमाला पहिले अभिमानात, नंतर दुराभिमानात, मग गर्वात आणि शेवटी अंदाधुंद अधिकारात रूपांतरित काम पाकिस्तानातील सरकार त्यांच्या धर्माबाबत करत आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान करतं आहे. ही धर्मनीती आहे. जी सरकार राबवत आहे. हा धर्म नव्हे. This is Policy of religion and not religion.

या प्रोसेस मध्ये झालं हे आहे की आपण धर्मनितीला विरोध करण्याचं सोडून धर्मालाच विरोध करत चाललो आहोत. आणि या लपेट्यामध्ये भारतीय समाजाचा एक मोठा प्रवर्ग यात ओढला जातो आहे. एक लक्षात घ्यायला हवं की राजनीती ही धर्मनितीला ओव्हरपॉवर करणारी हवी. ना की उलटं. अटलबिहारी वाजपेयींनी कानपिचक्या देताना वापरलेला राजधर्म तेच सांगतो.  दहशतवादी हल्ला हा भारताची विकासनीती हाणून पाडण्यासाठी दुसऱ्या देशाच्या धर्मनितीने केला आहे हा नॅरेटिव्ह जास्त प्रस्थापित करण्याची गरज आहे. ना की एका धर्माने दुसऱ्या धर्मावर. कारण आता भारताच्या विकासनीतीला खीळ जर काही घालू शकणार असेल ते धार्मिक ध्रुवीकरण. आपण तो डाव हाणून पाडण्यात आर्थिक आणि सामाजिक शहाणपण आहे. असं आहे की काश्मीर मध्ये सुद्धा अनेक मुस्लिमांनी हिंदूंना मनापासून मदत केल्याचे अनेक दाखले दिसत आहेत. एका धर्माने दुसऱ्या धर्माला विरोधच करायचा असेल तर ते घडलं नसतं. 

आता कुणी म्हणेल की त्यांना त्यांची पर्यटन व्यवसायाची काळजी होती म्हणून मदत केली. मग मी पण तेच म्हणतोय की धर्मापेक्षा कर्म हे जास्त माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रभावीपणे उद्युक्त करतं. 

धर्म ही प्रणाली आहे, गाईडलाईन्स. तो जर नियम म्हणून थोपवाला की त्याचा अफगाणिस्तान होतो, पाकिस्तान होतो, सीरिया होतो, लिबिया होतो. तो जर प्रणाली म्हणून वापरला तर त्याचा स्वीडन होतो, ऑस्ट्रेलिया होतो, स्वित्झर्लंड,  न्यूझीलंड होतो. नागरिकत्वाचे नियम घटनेत लिहिलं आहे. 

तेव्हा सेंटरलाईन आसपास वावरणाऱ्या माझ्या मित्रांनो, आजही पण बहुसंख्य आहोत. एक्स्ट्रीमिस्ट लोक आजही अल्पसंख्यांक आहेत. तेव्हा सजगतेने जगू यात. मी आता यांच्याकडून मटेरियल घेणार नाही, वेटर म्हणून त्यांच्याकडून सर्व्हिस घेणार नाही, उबर ड्रायव्हर दुसऱ्या धर्माचा असेल तर कॅब करणार नाही ही  एक्स्ट्रीम राईट कडे जाणारी विचारसरणी सोडून देऊ, आणि बिहार निवडणुकांच्या आधी हल्ला घडवून आणला किंवा आपण हिंदुत्ववादी नाही असे सांगितल्यावर अतिरेक्यांनी मारलं नसतं या एक्स्ट्रीम लेफ्ट विचारसरणीला तिलांजली देऊ यात. 


Thursday, 10 April 2025

आमचा एक कस्टमर आहे. हि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो कस्टमर स्पिंडल उत्पादनाचं १००% काम आम्हाला द्यायचा. जवळपास दहा एक वर्ष आम्ही त्याचे सोल सप्लायर होतो. दहा एक वर्षात आम्ही त्याला पाचशे स्पिंडल सप्लाय केले असतील. असेच आमचे अनेक कस्टमर्स आहेत, जिथे आम्ही सॉलिड नाव कमावलं होतं. 

तीन एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या आमच्या ग्राहकाने एका स्पेशल स्पिंडल ची ऑर्डर दिली होती. त्याला बेअरिंग पण वेगळ्याच साईझची लागणार होती. ती बेअरींग सोर्स करण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडलं पण जगात कुठे ती मिळेना. डिलिव्हरी ची कमिटमेंट देऊन बसलो होतो. आणि ज्या मेकच्या बेअरिंग ची गरज होती ती काही मिळत नव्हती. 

इथे एक गडबड झाली. आमच्या पर्चेस ऑफिसर ने त्याची चीन मध्ये विचारणा केली. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्याकडे होती. ज्या उत्पादकाची हवी होती तीच त्याला मिळाली. त्याने सुद्धा फार काही विचार न करता ती ऑर्डर केली. आणि मुख्य म्हणजे त्याने इंजिनीअरिंग डिपार्टमेंट ला विचारलं पण नाही ज्यांची परवानगी घेणं गरजेचं होतं. 

आम्ही बेअरिंग इम्पोर्ट केली. स्पिंडल बनवला आणि ग्राहकाला सप्लाय केला. थोडा उशीर झाला होता, आणि त्याने कस्टमर नाराज पण होता. 

स्पिंडल सप्लाय केला खरा पण ज्या मशीन वर लावला त्यावर पंधरा दिवसातच ट्रायल चालू असताना तो फेल झाला. कस्टमर आमच्यावर बेफाम चिडला. फेल्युअर चं रूट कॉज शोधायला गेल्यावर कस्टमर ला माहित झालं की आम्ही चायना वरून बेअरिंग आणून वापरली आहे. ग्राहकाचा पारा मग तर खूपच चढला. त्याने मला चांगलंच सालटवून काढलं. कारण ओरिजिनल मेकची बेअरिंग असली तरी चीन वरून आणली म्हणजे ती डुप्लिकेट असण्याची जास्त शक्यता होती. (नंतर ती डुप्लिकेट होती हे सिद्ध पण झालं)

मी कस्टमरला सांगत होतो की "सर, चुकून झालं आहे आमच्या पर्चेस ऑफिसर कडून. तुमची डिलिव्हरी डिले होत होती, त्यामुळे त्याने चीन मध्ये ऑर्डर केली आणि तुमचा स्पिंडल वेळेत सप्लाय झाला." पण आता स्पिंडल फेल झाला होता. 

मी कस्टमर ला समजवायचा प्रयत्न करत होतो की दहा वर्षे आम्ही प्रॉडक्ट सप्लाय करतो आहे. एकदाही प्रॉब्लेम आला नाही आहे. पण तो काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हता. तो म्हणाला "मी तुम्हाला सप्लायर म्हणून ब्लॅक लिस्ट करतोय. And I will see to it that you will hear this music in the market"

एक मोठं अकौंट आम्ही लूज केलं होतं परत वर बदनामी वेगळी. मी मिटिंग घेतली आणि आमच्या लोकांना सांगितलं

"हे असं आहे. एक चांगला उत्पादक  म्हणून नाव कमवायला आपल्याला दहा वर्षे गेलीत, पण एका चुकीमुळे आपल्याला किती मोठी किंमत चुकवायला लागत आहे."

"पण अजून एक गोष्ट सांगतो की आपला उद्देश कुणाला फसवायचा नव्हता. आपण त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून निर्णय घेतले ते भले चुकले असतील. तरीही सांगतो की आपले मूळ सिद्धांत हे व्यवसायाच्या नैतिकतेला धरून आहेत. ग्राहकाने दिलेली धमकी नैमित्तिक आहे. मला खात्री आहे, प्रामाणिक नीतिमत्तेच्या रस्त्यावर चालत राहिलो तर हा ग्राहक आपल्याकडे परत येईल"

आज तो ग्राहक आमच्या पहिल्या पाच पैकी एक आहे. 


Monday, 3 March 2025

Believe me, peace is more precious than triumph".

 काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नील तेव्हा चौदा एक वर्षाचा होता. आम्ही दोघेच एक्स्प्रेस वे ने कारने चाललो होतो. मी आपलं बरोबर मधली लेन पकडून गाडी चालवत होतो. अचानक डावीकडच्या लेन मध्ये चालणाऱ्या एका महाकाय ट्रक ने आपला ट्रॅक बदलला आणि आमच्या लेन मध्ये घुसला. माझी कार ८० च्या स्पीड ने असेल. त्या ट्रक पासून वाचवण्यासाठी मला जीवाची धडपड करत, ब्रेक मारत कार कंट्रोल करावी लागली. हे करताना माझी कार पहिल्या लेन मध्ये थोडी टर्न झाली. मागून एक सुसाट वेगाने फोर्ड इंडिव्ह्युअर येत होती. तिलाही ब्रेक मारून स्पीड कमी करावा लागला. 

तो ट्रक बेदरकार पणे पुढे चालला गेला. मी त्याला ओव्हरटेक करत, तिसऱ्या लेनच्या पलीकडे असलेल्या मोकळ्या लेन मध्ये त्याला थांबवला. आणि उतरून त्या ट्रक ड्रायव्हर ला शिव्या देऊ लागलो. तो ट्रक सरळ इन्व्हेड करत माझ्या लेन मध्ये आला होता आणि अपघात होताना थोडक्यात वाचला होता. पहिल्यांदा आवाज चढवलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर नरमाई दाखवतो आहे असं वाटत असतानाच एक विचित्र घटना घडली. 

मागची फोर्ड  पुढे जाऊन थांबली आणि त्यातून एक आलिशान सूट घातलेला माणूस खाली उतरला आणि "तुला गाडी चालवता येत नाही का. मी तुला धडकलो असतो तर तुझ्या कारचा चुराडा झाला असता" वगैरे फर्ड्या इंग्लिश मध्ये मलाच झाडू लागला. मी त्याला आपलं माझ्या मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये "तुला कळतंय का काय बोलतोस. हा भला मोठा ट्रक माझ्या लेन मध्ये आडवा आला, म्हणून....." वगैरे व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होतो. तर अतिश्रीमंत माणूस अजूनच मोठ्या आवाजात माझ्या कार कडे बघत "तुम्हा गरीब लोकांना एक्स्प्रेस वे ला गाडी कशी चालवायची कळत नाही" वगैरे तत्सम काही बोलू लागला. तो ट्रक ड्रायव्हर राहिला बाजूला आणि त्या फोर्ड वाल्याचं आणि माझं भांडण चालू झालं. 

माझाही आवाज चढायला लागला तितक्यात एक हात माझ्या हाताला ओढू लागला. नील कार मधून उतरून माझ्याकडे आला आणि रडवेल्या चेहऱ्याने पाहत म्हणाला "पप्पा, जाऊ द्या ना. चला आपल्या कार मध्ये". ते बघून तो फोर्ड वाला माणूस काहीतरी बडबड करून निघून गेला, ट्रक ड्रायव्हर ने पण "सॉरी भाई" म्हणत ट्रक चालू केला. मी नील चा हात पकडून कार मध्ये येऊन बसलो. 

मी नील ला म्हणालो "का तू मला घेऊन आलास इकडे? चांगला झापला असता ना त्या मोठ्या कार वाल्याला". तर नील मला म्हणाला "त्याने काय झालं असतं? आणि आमच्या मॅम ने सांगितलं आहे No one wins in such argument but you loose your peace of mind."

आणि मग काचेतून बघत एक लाख मोलाचं वाक्य बोलला 

"Believe me, peace is more precious than triumph".