Wednesday, 19 November 2025

 काही दिवसंपूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबाद वरून बांद्रा टर्मिनस ला ट्रेन ने आलो. प्लॅटफॉर्म वरून चालत असताना अचानक एक माणूस समोरून आला आणि मला हिंदीत प्रश्न विचारला "कहा से आए हो?" मी सांगितलं "अहमदाबाद". मला आय कार्ड मागितलं. मी पहिल्यांदा चपापलो. स्वतःला सावरत मी उलट विचारलं "तुम्ही कोण आहात?" तर डाव्या तळव्यात लपवलेलं त्यांचं आयकार्ड दाखवलं. साध्या वेशातील पोलिसच होते ते. मी आधार कार्ड दाखवलं. एव्हाना माझ्या एक दोन वाक्याने कळलं की मी मराठी आहे. बाकी सांगितलं की दिवसभर काम करून संध्याकाळी पुण्याला जाणार आहे. 

त्यांनी मला जायला सांगितलं. जाताना मी त्यांना प्रश्न विचारला "असं माझं चेकिंग का केलं?". ते जास्त काही बोलले नाही. फक्त रँडम चेकिंग आहे म्हणाले. 

तिथून निघाल्यावर मी माझ्या भावाकडे गेलो. फ्रेश होण्यासाठी. त्याला मी झालेला किस्सा सांगितला आणि रँडम चेकिंग झालेलं सांगितलं. त्यावेळेस हसत भाऊ म्हणाला की तुझं रँडम चेकिंग झालेलं नाही आहे. तर तुला प्रश्न यासाठी विचारले गेले की तुझ्या बॅगचा रंग हिरवा आहे. (तो खरंतर हिरवा नव्हता तर तो त्याकडे झुकणारा पोपटी होता). आणि दिल्ली बॉम्ब स्फोट नंतर दोनच दिवसात मुंबईला आलो होतो. 

म्हणजे माझ्या जागी कुणी अस्लम किंवा मोहसीन असला असता तर त्याला बाजूला घेऊन कसून तपासणी झाली असती. 

मुस्लिम दहशतवाद्यांना हे  कळत नाही आहे की त्यांच्या निषेधार्ह कृत्यामुळे अनेक भारतीय मुस्लिम नागरिकांवर काय आपबिती येते ते. टेररिझम मुळे लॉ अबायडिंग मुस्लिम नागरिकांकडे संशयाने बघण्याचा जो शिफ्ट आला आहे तो योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही आहे, पण तो आला आहे हे अधोगतीचे परिमाण आहे. 

Monday, 10 November 2025

विवादास्पद

या सगळ्या पोस्टच्या धबडग्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते आहे. 

देशाची आर्थिक उन्नती होत असताना बऱ्याच मित्रांचा असा आग्रह असतो की आपलं सोशल फॅब्रिक पण अजिबात उसवलेलं नाही आहे असं मानावं. 

याउलट काहींना वाटतं की आपली सामाजिक वीण उसवलेली आहे तर मग या आर्थिक बाबी सुधारत आहेत तर त्याचं काय कौतुक?

मग परिस्थिती काय आहे? अर्थात हे माझं मत आहे. पण लिहायचा प्रयत्न करतो. 

मी परवाच्या पोस्टवर एक वाक्य लिहिलं की "विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही", त्यात विवादास्पद या शब्दावर एका जवळच्या मित्राने आक्षेप घेतला. त्यावर मी काही मत व्यक्त करतो. 

पहिल्यांदा पॉझिटिव्ह गोष्टी बघू यात. तर आजच्या घडीला भारत हे लोकशाही असलेलं जगातील सगळ्यात मोठं राष्ट्र आहे. तब्बल ९० कोटी मतदार मतदान करत असतात. १९५१ पासून देशात रक्तविहीन निवडणुका पार पडत असतात. सर्व जातीचे, धर्माचे, भाषिक लोक मतदान करत असतात. 

पण एक म्हणावं वाटतं की प्रगल्भ लोकशाही म्हणजे फक्त दर पाच वर्षांनी काहीही हल्लागुल्ला न होता निवडणुका होणे इथपर्यंत मर्यादित नाही आहे तर त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट सिस्टम मधली पारदर्शकता, कामाप्रती असलेलं उत्तरदायित्व, काही महत्वाच्या संस्थांना असणारी स्वायत्तता या निकषावर आपल्या इथे, त्यातही महाराष्ट्रात आनंदी आनंद आहे. मतदारांना गृहीत धरून आपले विरोधी पक्ष फोडणे, त्यातील न्यायिक प्रक्रियेबद्दल वेळकाढू धोरण ठेवून संस्थापकांकडून नाव, निवडणूक चिन्ह ओरबाडून घेणे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एकेकाळी घणाघाती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकार स्थापन करणे, केवळ पक्षबदल केला म्हणून इ डी च्या चौकशा बंद करणे, रस्ता, वीज, पाणी हे महत्वाचे प्रश्न लोकांनी विचारूच नये म्हणून समाजाला धार्मिक आणि जातीय लढतीत झुंजवत ठेवणे, आर्थिक प्रगती ज्या इंडस्ट्री मुळे होते असे प्रकल्प आपल्या नाकाखालून दुसरे राज्य घेऊन जातात त्याकडे कानाडोळा करणे, शिवराळ भाषेत मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांना घालून पडून बोलणे म्हणजे खूप मोठा पुरुषार्थ ही लोकशाही ची लक्षणं म्हणत असतील तर मग बोलणंच खुंटलं. 

अनेक राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते हे की पोझिशन्स ला आल्यावर करोडो रुपयाच्या संपत्तीचे मालक होतात, ते कसे होतात असा कुठला उद्योग असतो की त्यांच्या इतक्या जमिनी, बंगले, गाड्या होतात याबद्दल ना कुणी प्रश्न विचारायचे नाही आणि विचारले तर त्याला असं कचाट्यात पकडायचं की त्याने परत आवाजच केला नाही पाहिजे. 

मीडियावर पूर्ण कब्जा करून टाकायचा. असे नॅरेटिव्ह पसरवायचे की सरकारच्या धोरणांची फक्त स्तुती आणि स्तुतीच झाली पाहिजे. 

ज्यांनी म्हणून विरोध केला त्यांना वेगवगेळी प्रलोभनं दाखवून सरकारच्या जागांवर बसवून देऊन त्यांचे आवाज बंद करणे हे तर अगदी सर्रास घडतं आहे. 

ही सगळी विवादास्पद लक्षणं नव्हेत काय?

भारतातील लोकशाही रुजलेली आहे पण ती प्रगल्भ झालेली नाही आहे. ती केऑटिक आहे आणि मॅच्युरिटी पासून तर खूप लांब आहे. हे खरं आहे की जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे कारण एक सशक्त संविधान आपल्या हातात आहे. पण तरीही समानता, निवडणूक आयोग/इ डी/सी आय डी सारख्या अनेक संस्थांची स्वायत्तता, आणि नागरी संस्कृती ही अजून शंकास्पद परिस्थितीत आहे हे ही तितकंच खरं आहे. लॉ आणि ऑर्डर चा बोजवारा उडालेला आपल्याला ठायी ठायी दिसतो. अगदी ट्राफिक मॅनेजमेंट पासून ते अगदी घृणास्पद गुन्हे करणारे इकडे तिकडे मोकाट फिरताना दिसतात. 

असो. आणि सोशल मीडियावर ही परिस्थिती आहे. विरोध दर्शवणारा "विवादास्पद" हा इतका माईल्ड शब्दही लोकांना सहन होत नाही, आणि मी जो राजकीय विषय लिहायचं टाळतो त्याला मत देण्याविषयी उद्युक्त करायचं आणि मग बडवत बसायचं हा पण एक नवीन ट्रेंड दिसतो आहे. 

थांबतो. 

Saturday, 8 November 2025

काही वर्षांपूर्वी मीच एक पोस्ट टाकली होती की चीन उत्पादनावर बहिष्कार टाकून काहीच साध्य होणार नाही आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर कंबर कसून कामाला लागण्यात शहाणपण आहे. त्याला अजून एक पार्श्वभूमी अशी होती की भारतातील दोन मोबाईल फोन उत्पादक, कार्बन आणि मायक्रोमॅक्स, हे सपशेल अपयशी ठरले होते. 

त्यांनतर अनेक घडामोडी घडल्या. कोविड आलं. कोविड मुळे चीनने जगाचा उत्पादक ही आपली विश्वासार्हता पूर्ण गमावली. त्यात भरीस भर म्हणून की काय पण अमेरिका आणि चीन मध्ये आता पराकोटीला पोहोचलेलं ट्रेड वॉर तेव्हा सुरू झालं. सेमी कंडक्टर ची सप्लाय चेन रोखून चीनमुळे अभूतपूर्व गोंधळ झाला. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकाच नव्हे तर जगातल्या ज्या देशांनी चीनमध्ये प्लांट उभे केले होते, त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. दक्षिण पूर्व आशियात असलेल्या कमी लेबर कॉस्ट मुळे तिथलेच देश उत्पादक शोधू लागले. 

या सर्व देशांमध्ये सशक्त पर्याय उभा राहिला तो म्हणजे भारत. होलसेल मध्ये उपलब्ध असणारं तरुण टॅलेंट पूल, इंग्रजी भाषेशी जवळीक, सॉफ्टवेअर इंडस्ट्री मुळे तयार झालेला ब्रिज, कितीही विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही यामुळे जगभरातील उत्पादक भारताचे दरवाजे ठोठावु लागले. . आपण सुद्धा प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह देत या हे दरवाजे उघडले. सर्वच क्षेत्रात गुंतवणूक आल्या पण या इंसेंटिव्ह चा सगळ्यात मोठा दावेदार ठरला तो मोबाईल उत्पादक. 

मोबाईल उत्पादनाने भारतातील केलेली नेत्रदीपक प्रगती अचंबित करणारी आहे. दक्षिण भारतातील चेन्नई, होसुर आणि बंगलोर हा पट्टा तर उत्तर भारतात नोएडा मध्ये आज जवळपास ३०० कंपन्या मोबाईल उत्पादन करत आहेत. याचा परिणाम असा झाला की आठ एक वर्षांपूर्वी प्रत्येक मोबाईल फोन आयात करणारा भारतीय ग्राहक आजच्या घडीला प्रत्येक मोबाईल फोन आपल्याच इथे उत्पादित केलेला वापरतो. 

यातील पुढची आकडेवारी तर डोळे दिपावणारी आहे. मोबाईल उत्पादनाची निर्यात गेल्या दहा वर्षात शंभर पट वाढली आहे. आजच्या मितीला भारत रु १.२ लाख करोड किमतीचे मोबाईल निर्यात करतो. अमेरिकेत आयात केले जाणारे स्मार्ट फोन भारतात सगळ्यात जास्त बनतात. इथे आपण चीनला मागे टाकलं आहे. आजवर या क्षेत्राने जवळपास १५ लाख डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट रोजगार निर्मिती केली आहे. 

आता कुणी म्हणेल की या सगळ्या उत्पादक कंपन्या बाहेरच्या देशातील आहेत. हे मान्य केलं तरी हे लक्षात ठेवायला हवं की एकदा तुम्ही इथल्या जमिनीवर उत्पादन चालू केलं की त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो तो त्या देशाच्या अर्थ व्यवस्थेला आणि इथल्या लोकांना. १९८३ मध्ये वसलेल्या मारुती सुझुकी चा सगळ्यात मोठा उत्पादक भारत आहे आणि त्यांचं वाहन क्षेत्रातील काँट्रिब्युशन हे वादातीत आहे.

मोबाईल पाठोपाठ आता सेमी कंडक्टर इंडस्ट्री गुंतवणूक घेऊन उभी आहे. मोबाईल इंडस्ट्री स्थिरस्थावर होईपर्यंत सेमी कंडक्टर इंडस्ट्री भरतीय उत्पादन क्षेत्रात हलचल निर्माण करणार आहे. 

मागील अडीच दशकं सर्व्हिस इंडस्ट्री ने गाजवल्यावर किमान पुढचे दशक उत्पादन क्षेत्र, त्यातही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गाजवणार अशी चिन्ह तरी सध्या दिसत आहेत. 

फरक

तीन अनुभव शेअर करतो. 
दोन महिन्यांपूर्वी वीस तास प्रवास करून त्या हॉटेल मध्ये गेलो. चेक इन करून रूम मध्ये गेलो तर रूम मध्ये पाणीच नव्हतं प्यायला. रिसेप्शन ला फोन करून सांगितलं तर हाऊस किपिंग ची मुलगी आली, जिला इंग्लिश कळत नव्हतं. शेवटी खाणाखुणा करून तिला सांगितलं की प्यायला पाणी नाही आहे. तिने दोन बॉटल आणून दिल्या. 

केस अशी होती की त्या गावातच प्लास्टिक बॅन होतं. म्हणून रूम मध्ये बॉटल न ठेवता त्यांनी एक काचेचा जग ठेवला होता. प्रत्येक फ्लोअर वर वॉटर डिस्पेन्सर होता. प्रत्येकाने जग मध्ये पाणी भरून आणायचा असा नियम होता. हे सगळं मला संध्याकाळी रिसेप्शन एका व्यवस्थित बाईने समजावून सांगितलं, जी बहुधा तिथली मॅनेजर असावी. मी तिला सांगितलं की एखादा प्रवासी वीस बावीस तास प्रवास करून रूम मध्ये पोहोचतो आणि त्याला प्यायला पाणी नसेल तर वाईट दिसतं. आणि तुमची ही सगळी प्रोसेस तुम्ही चेक इन वेळेस समजावून सांगू शकता, जी मला नव्हती सांगितली. तिने एका कागदावर लिहून घेतलं. 

दोन महिन्यांनी मी परत आता तिथे चेक इन केलं. ते करताना मी जो फीडबॅक दिला होता, त्याच पद्धतीने सांगितलं. 

ग्राहकाभिमुख म्हणजे काय आहे ते पहिल्यांदा अनुभवलं. कामाप्रति आस्था असेल की हे सगळे बदल जाणवतात. 

आता दुसरा अनुभव

मुंबई एअरपोर्ट वर फास्ट इमिग्रेशन ची सोय झाली आहे. त्याचं रजिस्ट्रेशन एका वेब साईट वर होतं. पण पहिल्यांदा बायोमेट्रिक्स करावं लागतं, मग तुम्ही ते वापरू शकता. मी वेब साईट चा सोपस्कार पूर्ण केला आणि मुंबई एअरपोर्ट वर बायोमेट्रिक्स करायला गेलो. तिथं टेबल वर कुणीच नव्हतं. इकडे तिकडे बघितल्यावर एका बिव्हीजी च्या बाईला विचारलं तर तिने दहा मीटर वर एक मोबाईल खेळत असलेल्या माणसाकडे बोट दाखवत सांगितलं की तो आहे. मी त्याच्या कडे गेलो तर "काय कटकट आहे" असा भाव चेहऱ्यावर भाव आणत तो माणूस म्हणाला "नही है क्या कोई, चलो देखते है" ते दहा मीटर तो माणूस अक्षरशः पाय खुरडत चालला.  इकडे तिकडे बघत म्हणाला "हा, बोलो क्या है?" 

म्हणजे तोच खुर्चीतला माणूस होता. त्याने फक्त ऍक्ट केला की कुणा दुसऱ्याचं काम आहे ते. चेहऱ्यावर हास्य नाही, पूर्ण अनास्था. इतकी की समोरच्याने म्हणावं "आज मूड नही है क्या साब, मै फिर कभी आता हूं"

एका प्रसिद्ध मोठ्या खाजगी बँकेतील बाई इन्व्हेस्टमेंट साठी मागे लागली. मी जेव्हा नकारात्मक प्रतिसाद देत होतो तेव्हा म्हणाली "सर, प्लिज घ्या ना स्कीम. नाहीतर माझा के आर ए खराब होईल" त्याच बँकेतील एक रिलेशनशिप मॅनेजर सर्व्हिस देत नव्हता म्हणून मी त्याला बदला म्हणून मी मेल पाठवली तर मॅनेजर चा पळत फोन आला "सर, असं नका करू. माझं प्रमोशन ड्यु आहे. तुमचा एक रिमार्क माझं प्रमोशन पुढं ढकलेल. 

अरे, म्हणजे तुम्ही क्लायंट साठी काम करता की तुमचा के आर ए मीट करण्यासाठी. जेव्हा ग्राहकाप्रति अनास्था दाखवता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रमोशन ची काळजी नसते. 


Friday, 31 October 2025


विंदा, पाडगावकर आणि बापट हे पूर्वी एक कवितेचा कार्यक्रम करायचे. कधी बघण्याचा योग आला नाही पण खूप लोकप्रिय होता असं ऐकून आहे. थोडं अवघडच काम आहे, कवितेच्या माध्यमातून तीन तास लोकांना खिळवून ठेवणं. वीस एक वर्षापूर्वी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी आणलेला आयुष्यावर बोलू काही हा आगळावेगळा कार्यक्रम तुफान यशस्वी झाला. सौमित्र आणि अजून काही समकालीन कवीनी या फॉर्म मधे प्रयोग केले आणि रंगत आणली. 

याच पठडीतील पण बहुधा असा प्रयोग पहिल्यांदाच केला असावा की बासरी आणि काव्य यांचं फ्युजन. वैभव जोशी आणि अमर ओक यांचा "ऋतू बरवा". एखादा कार्यक्रम सुरू झाल्यापासून पहिल्या मिनिटाला तुमच्या मनाची पकड घेतो ती तीन तासाने "आता विश्वात्मके देवे" ने शेवट झाला की सैलावते. मधल्या काळात वैभव आणि अमर ओक आपल्याला वेगवेगळ्या प्रवाहातून नेत राहतात. एकही सादरीकरण टाळ्यांच्या कडकडाटाशिवाय संपलं नाही आणि अंगावर काटा यावेत असे अनेक क्षण कार्यक्रमात येतात. 

अमर ओक यांना अनेक वेळा टीव्ही वर बघितलं आहे. प्रत्यक्ष पहिल्यांदाच ऐकलं. आपल्या वाद्याचा आब राखत, आदर ठेवत ज्या वेगवेगळ्या गाण्याच्या धून त्यांनी बासरीद्वारे ऐकवल्या त्या केवळ लाजवाब. सगळ्यात कहर केला जेव्हा त्यांनी "युवती मना" जेव्हा सादर केलं. शब्द तर कळत होतेच पण अनेक ठिकाणी मधल्या जागा सुद्धा त्यांनी अशा नजाकतीने पेश केल्या की क्या बात है. असे विस्मयचकित करणारे अनेक क्षण आपल्या जादुई कलेतून देत राहतात. 

बाकी वैभव जोशींबद्दल मी काय लिहावं? शब्द तर त्यांना वश आहेतच पण त्यामागचा भाव जेव्हा ते उलगडून सांगतात, त्यामागच्या विचारधारे बद्दल सांगतात, तेव्हा ती कविता आपल्यात भिनत जाते. वैभव स्वतःच्या च नव्हे तर इतर कवींच्या कवितेबद्दल फार आत्मियतेने बोलतात हे सुद्धा कार्यक्रमात ओघाने येतं, तेव्हा आपल्याला कळतंच. (कधी वेळ झाला तर त्यांचा स्पृहा जोशी बरोबरचा एक व्हिडिओ आहे, बालकवींची औदुंबर कविता समजावून सांगताना. कमाल आहे). 

या निरुपणाचं महत्व कळतं ते भरतीचा माज नाय आणि ओहटीची लाज नाय हे ऐकताना. या कवितेचा इतका भडिमार झाला आहे की ती ऐकताना आता बोअर होईल की काय अशी शंका येते. पण वैभव त्या मागचा भाव सांगतात आणि ती मग आपल्याला नव्याने कळत जाते. पुरिया धन "श्री" ओक सादर करतात आणि त्याला जोडून वैभव मग सौ रागाची जेव्हा "आज कुठली भाजी आहे" वर गाडी नेतात तेव्हा बहार येते. मनाला उभारी देणारी "उजाडलेला दिवस पहिला, याहून मोठे सुख ते काय" याद्वारे अंतर्मुख करून जातात.  बरं ते सगळं सादर करताना कधी तात्विक वाटतं तर कधी सात्विक वाटतं. 

या दोघांशिवाय चार वादक आहेत. तबला, ढोलकी, ऑक्टपॅड आणि की बोर्ड. 

Saturday, 25 October 2025

स्पार्क

काल जे एन इ सी, छत्रपती संभाजीनगर इथे झालेलं भाषण अनेक अर्थाने लक्षात राहील. 

ज्या हॉल मध्ये भाषण झालं ते रुक्मिणी सभागृह, माझ्या मते मी आतापर्यंत जिथे भाषणं दिली, त्यापैकी सगळ्यात भव्यदिव्य आणि नेत्रदीपक सभागृह होतं. तिथली लाईट आणि साउंड सिस्टम, सीटिंग अरेंजमेंट, व्यासपीठाची साईझ हे एकूणच अव्वल दर्जाचं. 

त्या "स्पार्क" कार्यक्रमाची मॅनेजमेंट सुद्धा वाखाणण्याजोगी. अनेक कॉलेजेस मध्ये अशा कार्यक्रमाला मुलं मुली गोळा करण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ करावी लागते. पण इथं दिसत होतं की कार्यक्रमासाठी आधी रजिस्ट्रेशन प्रोसेस केली होती आणि त्यानुसार मुलं मुली हजर होती. अनेक ठिकाणी कार्यक्रमाला दिलेली वेळ आणि सुरु होण्याची वेळ यात कमालीची तफावत असते. काल मात्र साडेदहा ची दिलेली वेळ बरोबर पाळली गेली. अँकर्स ने पूर्ण तयारी केली होती. त्यांनी बोलायचं कसं, चालायचं कसं यात कमालीची प्रोफिशियंसी दिसत होती. अतिशय थोडक्यात ओळख करून देऊन, इतर नेहमीच्या बोरिंग सोपस्कारांना टाळत मला बसल्यापासून पुढील पाच मिनिटात स्टेज वर बोलावलं सुद्धा. आणि सरते शेवटी कार्यक्रमाची संपण्याची वेळ बारा होती, त्या वेळेला बरोबर कार्यक्रम संपला. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलामुलींनी विचारलेले प्रश्न. अनेक कॉलेजेस मध्ये मुलं मुली प्रश्नच विचारत नाहीत, कारण बहुधा त्यांना जबरदस्तीने तिथे बसवलं असतं. पण इथे मी प्रश्न विचारा असं आवाहन केल्या केल्या दोन हात वर गेले होते. (याची कल्पना मला प्रो पवार यांनी दिली होती). पहिला प्रश्न मला इथे सांगावासा वाटतो 

"तुम्ही कॉलेज मध्ये स्टुडंट म्हणून कसे होता?" कदाचित हा प्रश्न मला याआधी कधीही विचारला गेला नव्हता. यावरून तुम्हाला कल्पना येईल की नंतरच्या आठ दहा प्रश्नाची लेव्हल किती चांगली होती ते. 

सगळ्यात शेवटी सांगावंसं वाटतं की महात्मा गांधी मिशनने उभे केलेल्या या विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कमालीचं सुबक आणि सर्वांगीण विचार केलेलं जाणवतं. त्या परिसरात वावरताना ज्या पॉझिटिव्ह वाईब्ज चा आपण नेहमी उल्लेख करतो, तिचा ठायी ठायी अनुभव येतो. तिथले विद्यार्थी/विधार्थिनी आणि प्रोफेसर्स हे जेव्हा त्यांच्या डिपार्टमेंट ची माहिती सांगतात, तेव्हा त्यांच्या आवाजातील अभिमान आणि चमक ही जाणवत राहते. इंजिनियरिंग डिपार्टमेंट मध्ये त्यांनी मशिन्स, रोबोट्स, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इ व्ही यांच्या मॉडेल्स वर चांगलीच इन्व्हेस्टमेंट केली आहे. लॅब अद्यावत आहेत. आणि याबरोबरच स्विमिंग पूल, स्टेडियम, काही मोठा कर्यक्रम झाला तर डेलिगेट्स च्या राहण्यासाठी सुविधा यावर विचारपूर्वक डेव्हलपमेंट केली आहे. 

ज्या शहरात माझा डिप्लोमा झाला, त्याच शहरात इंजिनियरिंग कॉलेजमधील दुसरं भाषण. पहिलं इन्फॉर्मल पद्धतीने झालं होतं. पण कालच्या जे एन इ सी च्या "स्पार्क" कार्यक्रमामुळे मनात एक वेगळाच वरचा बेंचमार्क तयार केला आहे. यापुढे अशा कारणासाठी जेव्हा कधी बोलावणं येईल तेव्हा त्याची तुलना कालच्या स्पार्क कार्यक्रमाशी केली जाईल हे नक्की. 

ज्यांनी मला या कार्यक्रमात आमंत्रित केलं ते जे एन इ सी चे श्री पवार सर, प्रिन्सिपल डॉ मुसंदे मॅडम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या स्टुडंट असोसिएशन ने हा कार्यक्रम इतक्या नेटक्या पद्धतीने मॅनेज केला  त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. 

Tuesday, 14 October 2025

कॉलेज ब्रँडिंग

व्यवसाय सुरू करून दहा बारा वर्षे झाली होती. सेटको बरोबर सामंजस्य करार पण झाला होता. त्या काळात कुठल्याही बिझिनेस ओनर्स च्या मिटिंग ला गेलो की आमचं एक आवडतं डिस्कशन असायचं आणि ते म्हणजे माणसं मिळत नाहीत. शिक्षणाचा घसरलेला दर्जा, इंजिनियर्स लोकांना काहीच कसं येत नाही, आय टी इंडस्ट्री ने कसं आपले लोक पळवले वगैरे. तास दीड तास या विषयावर कीस पाडला की आमच्या जीवाला बरं वाटायचं. 

काही काळाने मला त्या चर्चेचा वीट आला आणि मी या प्रश्नाला काही वेगळं उत्तर आहे का यावर विचार करू लागलो. त्याच सुमारास आर सी पी आय टी शिरपूर चे प्राचार्य जयंतराव पाटील यांनी मला त्यांच्या कॉलेज मध्ये भाषणासाठी निमंत्रित केलं. ते आणि पुढची अजून एक दोन भाषणं झाल्यावर मला हे जाणवलं की एकुणात मेकॅनिकल इंडस्ट्री बद्दल मुलामुलींच्या मनात अनेक गैरसमज होते. तिथे करिअर ग्रोथ च्या संधी आहेत की नाही याबद्दल शंका होत्या. त्यातही एम एस एम इ च्या बद्दल अढी च होती म्हणा ना. याला कारण इंडस्ट्री ची संकुचित ध्येय धोरणे पण होती. 

मी माझ्या कंपनी पुरता हा प्रश्न सोडवायचा ठरवलं. कुठल्याही कॉलेज मधून बोलण्यासाठी निमंत्रण आलं तर ते नाकारायचं नाही. त्यामध्ये दोन उद्देश होते. एक सेटको च नाव इंजिनियर्स लोकांना त्यांच्या कॉलेज च्या दिवसापासून माहीत व्हावं आणि दुसरं म्हणजे या फिल्ड मध्ये काय संधी आहेत आणि कसं कोअर ला चिकटून राहिलं तर लॉंग टर्म करिअर ग्रोथ प्लॅन करता येईल. 

२०२० मध्ये कोविड आला. त्यानंतर मात्र हे कॉलेज मध्ये जाऊन बोलण्याचा धडाका लावला. उत्पादन क्षेत्र वेगाने वाढणार याचे संकेत होते. आमचा नवीन एच आर हेड मयूर जॉईन झाला. त्याला मी एकच सांगितलं "I want to change problem of scarcity of manpower to problem of abundance". 

डिजिटल मार्केटिंग, लिंक्ड इन ऍड, मॅन पॉवर एजन्सी, आणि कॉलेजेस मधून केलेलं ब्रँडिंग या सगळ्या फ्रंट वर काम केल्यावर आता परिस्थिती अशी आहे की बिझिनेस मिटिंग मध्ये माणसं मिळत नाही हा मुद्दा चर्चेला आला की मी गप्प होतो. आणि एके काळी अप्रसिद्ध असणाऱ्या कॉलेज मधून लोक घेऊन समाधान मानणाऱ्या सेटको मध्ये आज चांगल्या कॉलेजेस मधली मुलं मुली इंटर्नशिप करतात, जॉब साठी अप्लाय करतात. 

तर सांगायचं हे आहे की कॉलेज मध्ये जाऊन भाषण देणे हे माझं व्यावसायिक धोरण आहे. त्यांनी बोलावणं आणि मला ऐकणं ही त्यांची गरज नाही आहे तर मी तिथं जाणं आणि माझे विचार त्यांना ऐकवणे ही माझी, व्यवसायाची गरज आहे. ज्या असोशीने मी कस्टमर कडे ऑर्डर मागायला जातो त्याच भावनेने मी कॉलेजेस मध्ये पण जातो. त्यातून काल कॉमेंट मध्ये काही मित्रांनी लिहिलं की मी पुढची घडवतो आहे. खरंतर असं जर काही होत असेल तर तो माझ्यासाठी हा स्वार्थ साधून परमार्थ आहे. 

माझ्याकडे दोन चॉइसेस होते. एक, प्रचलित पद्धतीप्रमाणे माणसं मिळत नाही या प्रश्नाबद्दल चर्चेचं दळण दळायचं किंवा काहीतरी वेगळा मार्ग निवडून यावर उपाय शोधायचा. 

मी दुसरा चॉईस निवडला. आहे हे सगळं असं आहे.