Tuesday, 22 July 2025

भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही-वैभव जोशी

काल च्या पोस्टवर गानू सरांनी एक कॉमेंट केली की माझ्या स्वभावामुळे मला आयुष्यभरची मैत्री आणि लॉयल्टी मिळत असेल लोकांची. तर नम्रपणे सांगतो की असलं काहीही होत नाही. नंतर त्यांनी लॉयल्टी बद्दल लिहिलं पण मी मनातले विचार लिहून टाकतो. 

तर मी हे सगळं करतो ते माझ्या मनाला आनंद मिळावा म्हणून. यातून आयुष्यभराची मैत्री मिळते का तर माझ्याकडून मैत्रीत शत प्रतिशत देण्याची दानत आहे पण समोरून ती यावी ही अपेक्षा नाही. लॉयल्टी तर फार दूरची गोष्ट. अं हं, मला मोक्ष मिळाला किंवा संतत्व आलं आहे, असं तुमच्या मनात आलं असेल, तर थांबा. असलं काही झालं नाही आहे तर हे इव्हॉल्व्ह झालेलं मन आहे. खूप फटके खाऊन, धक्के पचवून. उदाहरणार्थ काही घटना सांगतो:

अनाथाश्रमातील पोरगा. त्याला जॉब दिला. संस्थापकांनी सांगितलं की मुलासारखा सांभाळा. सांभाळलं. सहा वर्षाने पोराने स्पर्धक कंपनीशी हातमिळवणी केली. (तिथे झेपलं नाही म्हणून मग परत मित्राच्या कंपनीत जॉब मिळावा म्हणून शब्द टाकला. आणि आता तिथेच आहे)

सहा वर्षे करत इंजिनियरिंग केल्यावर कुठंच जॉब मिळत नाही म्हणून एका पोराच्या मामाने जॉब द्या म्हणून रदबदली केली. दिला. त्याचं लग्न आहे म्हंटल्यावर लांब प्रवास करत थंडीत कुडकुडत हजेरी लावली. सात वर्षांनी आर्थिक गैरव्यवहार करत स्पर्धक म्हणून उभा राहिला. कधीही भेटलो की पोरगा पायाला हात लावायचा. मला वाटायचं पाया पडतोय. तो पाय ओढण्याची संधी शोधत होता. 

एका पोराच्या लग्नाला गेलो होतो, खेड्यात. गरिबी पाहून गलबलून आलं. नालीवर मंडप टाकला होता. भातावर मटन रस्सा बरोबर बोटी डालो असं मुलाचा मामा म्हणायचा पण त्यात तुकडे होते कुठं. ती गरिबी पाहून त्या गावात एकटाच लांब गेलो आणि मनसोक्त रडलो. त्या पोरावर तुफान काम केलं. आज तोच पोरगा स्पर्धा करत, तुम्हाला संपवतो अशी भाषा करतो.

एक पोरगा जॉईन झाल्यावर त्याची कहाणी ऐकली. घरात अठरा विश्व दारिद्र्य. पोराने प्रचंड कष्ट करत इंजिनियरिंग केलेलं. म्हणून मनात दया. बिझिनेस पार्टनर चा विरोध असताना पोराला यथाबुद्धी मदत करत राहिलो. काही तरी फालतू कारण सांगत बाहेर पडला आणि परत तेच इर्षात्मक स्पर्धा. 

अशा एक ना अनेक कहाण्या. काही सुखद पण आहेत, पण वर उल्लेखलेल्या जास्त. खूप जास्त.  

अनेक वेदना झाल्यावर. त्यावर फुंकर मारत गेलो. पण ती फुंकर म्हणजे शीळ आहे असे भासवत गेलो. त्यालाच बहुधा संवेदना म्हणत असावेत. 

आता मन निर्ढावलं आहे. स्वार्थी झालं आहे. त्यामुळे आता कुणाची मैत्री मिळावी म्हणून काहीही करत नाही. आता करतो ते फक्त स्वतःसाठी. माझ्या आनंदासाठी. मग त्याला कुणी मनस्वी म्हणत असतील, कुणी येडा म्हणत असतील. गानू सरांसारख्या मित्रांना कौतुक पण वाटत असेल. मित्रत्वाच्या नात्यात मी माझ्या बाजूने १००% देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला तसाच रिस्पॉन्स दिला तर आनंदच आहे. नाही दिला तरी अजिबात वाईट वाटणार नाही. 

मित्र वैभव जोशी म्हणतात तसं "भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही".



No comments:

Post a Comment