Thursday 26 September 2013

माझे पहिले भाषण

आजच संजय सोनवणी सरांची पहिल्या भाषणाची पोस्ट वाचली आणि मला माझं पहिलं भाषण आठवलं म्हणजे खरं तर फजिती आठवली. मी बहुधा सातवीत असेल. मराठी माध्यमातील नाशिक येथील सी डी ओ मेरी शाळेत  शिकताना एका स्पर्चेमध्ये इंग्रजी मध्ये भाषण ठोकायचे होते. पण त्याबरोबर एक उत्स्फूर्त (extempore) विषयावर ३-४ मिनिटे बोलायचे होते. इंग्रजी भाषणाचा विषय अभिमन्यु ची गोष्ट होती . माझ्याबरोबर आमच्या वर्गातील प्रसाद राजवाडे आणि एक इयत्ता मागे असलेली अश्विनी कुलकर्णी होती. प्रसाद आणि अश्विनीला मराठीतच भाषण करायचे होते.

रट्टा मारण्यात पटाइत असल्यामुळे य दा जोशी सरांनी माझी निवड केली असावी . स्पर्धा नाशिकच्या पेठे हायस्कूल ला होती. झालं मी, प्रसाद, अश्विनी आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणारे माझे वडील असा सगळा लवाजमा पेठे हायस्कूल ला पोहोचला . वेगवेगळ्या शाळांमधले शंभर एक विद्यार्थी जमा झाले होते स्पर्धेसाठी . काही आजूबाजूच्या खेड्यातील हि होते . समोर ५ एक परीक्षक बसले होते. त्यामध्ये एक परांजपे बाई पण होत्या . या बाई नी पाचवीत पेठे हायस्कूल ला शिकत असताना इंग्रजी च्या तासाला काहीतरी चुकीमुळे एक कानाखाली वाजवली होती . उस थप्पड कि गुंज अबतक सुनाई देती है! तेव्हा तर फारच ताजी होती . त्यांना बघून आधीच टरकली होती . असो

पाठ केलेल्या भाषणाची स्पर्धा सुरु झाली. माझा नंबर आला . लटपट त्या पायांनी उभा राहिलो आणि देवाचे नाव घेऊन चालू केले . पाठांतर तगडे होतेच . (लहानपणी नाटकात पण कामं करायचो. एका नाटकात काम केल्यावर आमच्या भिसे बाईंनी comment केली "अभिनयाचे माहित नाही पण मंडलिक चे पाठांतर चांगले आहे" आता बोला) घडाघडा बोलून टाकले . टाळ्या वाजल्या तेव्हाच भानावर आलो . परांजपे बाई सुद्धा खुश वाटल्या.  म्हंटले मैदान मारले . तेव्हा कुठे माहित होते कि खरी गेम पुढे आहे .

पाठ केलेल्या भाषणाचा राउंड संपल्यावर उत्स्फूर्त भाषणाची फेरी चालू झाली . हा म्हणजे अवघडच प्रकार होता . आधीच पहिली स्पर्धा आणि त्यात हा प्रकार . असं वाटत होतं कि काहीतरी व्हावं आणि हे टळाव. थोडी पोट दुखावून बघितले, चक्कर येते का ते चेक केलं. पण त्यातले काहीच झाले नाही. बरे पहिल्या फेरीत तोफ धडाद्ल्यामुळे जोशी सरांची पण कॉलर टाईट होती. माझ्या आधी प्रसाद चा नंबर आला आणि त्याने ठोकले कि भाषण आणि चक्क परीक्षक त्याला शाबासकी देत होते. मी माझ्याच चिंतेत गर्क होतो आणि तेवढ्यात झाला कि पुकारा आणि घ्या म्हंटले चिठ्ठी. चिठ्ठी उघडली तर भाषणाचा विषय होता …………. "माझे पहिले भाषण" आता म्हंटले काय बोलणार कप्पाळ.  (तसा दुसरा कुठलाही विषय असता तरी या ठिकाणी हेच म्हणावे लागले असते "काय बोलणार कप्पाळ") अर्ध्या तासापूर्वी मी आयुष्यातले पहिले भाषण केले होते. आणि त्यावरच पुन्हा बोलायचे . काही नाही, चिठ्ठी घेतली आणि उभा राहिलो शुंभासारखा. जोशी सर खुणा करत होते काही बोल म्हणून.  अहो पण सुचतंय कुठे. थोडं बाबांकडे बघायचा प्रयत्न केला पण ते माझी दशा बघून कुठल्या तरी दुसऱ्या पालकाशी बोलत होते . बहुधा प्रसाद कडे बोट दाखवत होते . मला आता असे वाटते कि ते प्रसाद्चीच ओळख त्यांचा मुलगा म्हणून करत असावेत . ते ३ मिनिटे अक्षरशः ३ युगासारखे वाटले . परांजपे बाईकडे लक्ष गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कानाखाली मारल्यावर जे भाव होते तेच आता झळकत होते. शेवटी एकदाची ३ मिनिटे झाल्याची शिट्टी वाजली तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. कसनुसं हसत (कि रडत) मी जागेवर जाऊन बसलो.

माझ्यासाठी तो दिवस म्हणजे दु:स्वप्न होता. शाळेत रमल्यानंतर अचानक एक दिवशी कळले की आमच्या टीमला त्या स्पर्धेमध्ये तिसरे बक्षीस मिळाले. माझ्यामते प्रसाद जाऊन बक्षीस घेऊन आला. खरं तर तोच ते घेण्यासाठी पात्र होता मी तर फक्त मम म्हणायच्याच लायकीचा होतो.

दिवस सरले, वर्षे गेली. डिप्लोमा ला असताना gathering गाजवले. professional career मध्ये presentations दिली. काही भाषणही दिली अगदी extempore ही. अजूनही लटपट तो पण एखाद दुसरा मिनिट. नंतर सगळे सुरळीत होते . पण त्याचा पाया त्या पेठे हायस्कूलच्या स्पर्धेत रचला गेला याबाबत माझ्या मनात य:किंचित हि शंका नाही .

दोन वर्षापूर्वी सी डी ओ मेरी  शाळेत मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. आणि मला मुलांच्या समोर बोलायचे होते  आणि स्टेज वर य दा जोशी सर. एक जोरकस दहा मिनिटाचे भाषण दिले. बहुधा जोशी सरांनी पेठे हायस्कूल मध्ये धरलेला श्वास त्या दिवशी सुस्कारा म्हणून सोडला असावा . भाषणाचा शेवट शाळेवरच्या एका कवितेने आवंढा गिळत केला

आठवणीच्या कपाटामध्ये एक साफसुथरा
नीटनेटका कप्पा माझ्या सी डी ओ मेरी शाळेचा
अगदी छान सजला आहे तो
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या वर्ग सजावटी सारखा
त्याला मैत्रीची झालर आहे
गुरुजनांच्या धाकाची आणि मायेची मखर आहे
बंदिस्त कुपीमध्ये साठलेले ते स्वप्नील क्षण
ती स्नेह संमेलनाची लगबग
म्हसरूळ marathone  मध्ये पळायची तगमग
लेझीमचा एक्स्ट्रा तास
दरवर्षी साजऱ्या केलेल्या कांदे नवमीच्या भज्यांचा वास
क्रिकेट, हॉकी, badminton टेबल टेनिस हे तर आमचे आवडते खेळ
कबड्डी, खो-खो चाही तेव्हढाच जमायचा मेळ.
मैदानाच्या कोपऱ्यात चालू असलेली लगोरी आणि लंगडी
सी के नायडू, मिहीरसेन, ध्यानचंद, तेनसिंग- रमलेत सगळे सवंगडी
आठवणींच्या क्षणांची ही मालिका
हातात हात घालून खेळलेल्या जोड साखळी सारखी
शिक्षण आणि संस्कार दोघांचेही तेव्हढेच महत्व
नाही शिकवलं अहं, जपावे ते सत्व
माणूस नावाच्या इमारतीचा पाया भरण्याचे ते दिवस
आम्हाला घडवणारे, हसवणारे आणि रडवणारेसुद्धा ते दिवस
आयुष्यभराचे संचित असलेले माझे सी डी ओ मेरी शाळेचे दिवस
माझे सी डी ओ मेरी शाळेचे दिवस

आणि मग जोशी सरांचा शाबासकी साठी थबकलेला पेठे हायस्कूल मधील हात वयाच्या ४ ३ व्या वर्षी पाठीवर पडला तेव्हा कुठे जीवाला हायसे वाटले.

No comments:

Post a Comment