Sunday 30 April 2017

असो. चालायचंच.

काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक जण आले होते. सतीश नाव ठेवू. बिझिनेस बद्दल डिस्कस करायला. थोडा वेळ गप्पा झाल्यावर सतीश अचानक म्हणाले "तुम्ही कसे आपल्यातले आहात म्हणून हे सगळं बोलू शकतो." आणि मग मला विचारलं "तुम्ही त्या असोसिएशन चे अजून मेंबर नाहीत का? तिथे सगळी आपली लोकं असतात. बिझिनेस करायचा म्हंटल्यावर आपल्या लोकांकडून गोष्टी विकत घेतल्या की चांगलं वाटतं. आपल्याच माणसाचा फायदा होतो. मला लॅपटॉप घ्यायचा होता. मी तिथूनच घेतला."

लै म्हणजे लैच हसायला आलं राव.

इथे फेबुवर सुद्धा जातिधिष्ठित ग्रुप वर मला ५-६ वेळा ऍड करायचा प्रयत्न झाला. दुसऱ्या कुठल्याही ग्रुप मध्ये कुणी मला ऍड केलं तर मला फारसं काही वाटत नाही. पण इथे नाही म्हणजे नाही. लागलीच बाहेर पडतो मी तिथून.

आताच चार पाच दिवसापूर्वी माझ्या आडनावाचा धोका खाऊन मला एका ग्रुप मध्ये ऍड केलं. खूप भारी भारी लोकं आहेत तिथं. खुदुखुदू हसायला येतं त्या ग्रुप वरचं नोटिफिकेशन आलं की. अजून आहे मी त्या ग्रुप मध्ये. एक दोन दिवसात बाहेर पडेल मी.

माझा एक मित्र आहे. त्याने मला डायरेक्ट सांगितलं. "कसं आहे राजेश, मी स्टाफ मध्ये फक्त माझ्या जातीचे लोकं भरतो."

हे असं वागण्यामागे लॉजिक काय हे काही मला कळत नाही. म्हणजे बिझिनेसमध्ये असलं काही टिकत असेल असं मला वाटत नाही. अर्थात मी त्यांना हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. कुणी पुरोगामित्वाची झूल पांघरतात तर कुणी प्रतिगामित्वाचा झेंडा फडकावतात, पण ही मेन्टॅलिटी काही आपल्या समाजातून हद्दपार होत नाही.

असो. चालायचंच. 

No comments:

Post a Comment