Friday 23 March 2018

नितीन कारंजकर

नितीन कारंजकर, बंट्या म्हणायचो आम्ही त्याला. नासिकच्या सीडीओ मेरी शाळेचा माझा क्लासमेट. त्याचं  नाव घेतलं की  त्याचा मला कडक ऑन ड्राइव्ह आठवतो आणि रनिंग बिटवीन विकेट. खो खो मध्ये पण सॉलिड होता तो. रादर कुठल्याही मैदानी खेळात बंट्याची लेव्हल वरची असायची.

गणितात पण किडाच तो. त्याच्या बरोबर अभ्यास करायला मिळावं म्हणून मी शाळेत नेहमीच धडपड करायचो.

एकंदरीत रोल मॉडेल होता तो माझा. हेवाच वाटायचा मला त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि त्याच्या फिटनेसचा.

दहावीला आमची मैत्री आणिक घट्ट झाली. वि भा देशपांडेंच्या क्लासला एकत्र जायचो. वेळ मिळेल तसा टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळायचो. सीडीओ च्या ग्राउंडवर अभ्यासाबरोबरच बाकीही भरपूर गप्पा व्हायच्या. दहावीला तो वर्गात तिसरा आणि गणितात पहिला आला. गणितात मला बंट्याइतकेच मार्क मिळाले म्हणून काय ग्रेट वाटलं होतं!

बंट्याचं वाचन अफाट होतं. आम्ही अधाशासारखी पुस्तकं वाचून काढायचो. आयुष्यात मी जर कधी चोरी केली असेल तर ती बंट्याबरोबर लायब्ररीतल्या पुस्तकांची. वाचनाचा झपाटाच तसा  होता. पुस्तकं इमानेइतबारे परत नेवून पण ठेवली. 

दहावीला मी औरंगाबादला गेलो. डिप्लोमा साठी. तो पुण्याला आलं. पॉलिटेक्निक मध्ये त्याचं काय बिनसलं माहित नाही पण एका वर्षात तो नासिकला आला आणि त्याने अकरावीला ऍडमिशन घेतली. बारावीला कचकावून मार्क काढले अन तो सीओईपी ला सिव्हिलला जॉईन झाला. मी सुद्धा पुण्यात भारती विद्यापीठात आलो. आमची मैत्री पुन्हा बहरली. नाशिकहून पुण्यात आलेल्या आमचा एक ग्रुप बनला. नतावाडीला नामदेव शिंपी समाजाचं हॉस्टेल होतं. तिथं राहायचा तो. वेळोवेळी भेटलो, फिरलो, गप्पा मारल्या, टवाळक्या केल्या. 

इंजिनियर झाल्यावर बंट्या नासिकला करिअर घडवायला गेला अन मी पुण्यातच राहिलो.

नंतर काय घडलं ते कळलं नाही पण लौकिकार्थाने आयुष्यात सगळे जसे सेटल होतात तसा बंट्या नाही झाला. का कुणास ठाऊक पण त्याने लग्न केलं नाही. जॉब न करता त्याने कॉन्ट्रॅक्टरशिप चालू केली. धंदा तो करत होता पण ज्याला धंद्याचा मौसम म्हणतात तो त्याने अनुभवला नसावा. थोडा तुटक पण झाला होता तो.

अर्थात आमची मैत्री बरकरार राहिली. म्हणजे नाशिकला मी गेलो अन बंट्याला भेटलो नाही असं क्वचितच व्हायचं. एक तास का होईना, त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिस मध्ये चहा प्यायचो, जिवाभावाच्या गोष्टी करायचो अन मग पुण्याला निघायचो.

आता मात्र मी नासिकला गेलो की बंट्याला नाही भेटणार, म्हणजे भेटू नाही शकणार.

काल, बंट्या उर्फ नितीन कारंजकर गेला. रस्त्यात आडव्या आलेल्या माणसाला वाचवताना तो पडला आणि त्याला हेड इंज्युरी झाली. एका आठवड्याची झुंज संपली. त्याबरोबर एका मित्राला मुकलो. माझा एकेकाळचा आयडॉल अनंतात विलीन झाला.

आय विल मिस यु मित्रा.

आणि खरं सांगू मित्रा, तुला जे आयुष्य लाभलं त्यापेक्षा तुझी पत खूप जास्त होती. तुझं आयुष्य बनवताना त्या विधात्याचं काहीतरी चुकलंच. . . . . . . . . . . . आणि मृत्यू देताना सुद्धा.

ला

No comments:

Post a Comment