Sunday 28 February 2021

विचाराचं क्षितिज

 

भारतातल्या अनेक मोठ्या व्यवसायाने एव्हाना दाखवून दिलं आहे की त्यांनी व्यवसायाचा आर्थिक उद्देश जरी नफा कमावणे असा ठेवला तरी त्या पलीकडे जाऊन त्यांनी त्यांच्या लोकांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विचार केला. हे केल्यामुळे ते व्यवसाय तर मोठे झालेच पण एका मोठ्या प्रवर्गाचा आर्थिक स्तर त्याने उंचावला. 

मोठ्या व्यावसायिकांची ही विचारधारा छोट्या व्यावसायिकांनी अंगिकरण्याची कधी नव्हे इतकी निकड जाणवते आहे. एम एस एम इ क्षेत्रातल्या लोकांनी आता स्वतःचा आर्थिक स्तर उंचावण्यापेक्षा त्यांच्या लोकांना त्यांची आर्थिक उन्नती तसेच एक जबाबदार नागरिक होण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं हे गरजेचं आहे. अन्यथा लोकांचं भलं करण्याच्या नावाखाली त्यांना वापरून घेणारी जमात म्हणजे भांडवलदार या व्याख्येचे आपण दुर्दैवी वाहक असू. 

जर तुम्हाला व्यावसायिक म्हणून घडवायचं असेल तर स्वतः पलीकडे जाऊन विचार करण्याची मानसिकता ठेवणं अपरिहार्य आहे. तुमच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या व्यवसायाची आर्थिक पत आणि स्तर कसा वाढवता येईल हे लक्षात ठेवून जर व्यवसाय वाढवला तर आणि तरच तुम्ही संपन्न, श्रीमंत नव्हे,  आणि तुम्ही ज्या प्रवर्गाबरोबर काम करता तो सशक्त बनण्याची शक्यता आहे. 

हे करण्यासाठी वृद्धीधिष्ठित मानसिकता ठेवणं हे भविष्यात सगळ्यांना फलदयी ठरणार आहे. थोडक्यात व्यवसायाचं प्रारूप असं ठेवायचं की कधीतरी तुम्हाला तो विकायचा आहे. भले तो तुम्ही विकू नका पण व्यवसायाला एक प्रॉडक्ट समजून असं सजवा की ती विक्रीला आहे. मग जसं आपण एखादा प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवला की त्याचं आयुष्य चांगलं असावं, तो प्रॉडक्ट चांगला दिसावा म्हणून डिझाइन करतो, त्याला मेंटेन करता यावं म्हणून काही सुविधा ठेवतो, त्या मानसिकतेने व्यवसायाकडे बघतो. समाधानी कर्मचारी वर्ग, सिस्टम आणि प्रोसेसेस, काम करण्याची जागा स्वच्छ असणे, इन्कम टॅक्स वा सेल्स टॅक्स न चुकवण्याची आर्थिक शिस्त ठेवणे, तुमच्या पेक्षा हुशार लोक व्यवसायात आणणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या निर्णयक्षमतेचे खुल्या मनाने स्वागत करणे,  या काही गोष्टी व्यवसायाला सशक्त बनवतात.

बऱ्याचदा आणि बऱ्याच जणांना असं वाटण्याची शक्यता आहे की व्यवसाय मोठे असतात म्हणून वर नमूद केलं तसं वागतात. खरंतर ते तसं वागतात म्हणून मोठे झाले आहेत. छोट्या व्यावसायिकांनी आता त्यांच्या आकार उकाराबद्दल जास्त विचार न करता आपल्या विचाराचं क्षितिज विस्तारणं, हे जास्त संयुक्तिक असणार आहे. जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण त्या संधीला सामोरे जाताना आपली सनातनी प्रवृत्ती वापरली तर शॉर्ट टर्म फायदा होईलही कदाचित पण शाश्वत व्यवसाय उभे राहणार नाही आणि आज देशाच्या उन्नतीचे आपण जे दिवास्वप्न पाहतो आहे, ते काही दशकांनंतर सुद्धा वास्तव होण्याची शक्यता नाही. 

No comments:

Post a Comment