Thursday, 22 May 2025

माझ्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं तेव्हा मी पण विचार केला की मुलीकडच्याकडून काही तरी हापसून घ्यावं. अगदी इनोव्हा नाही तर गेलाबाजार वॅगन आर तरी मागावी. जास्त नाही पण म्हंटलं दोन चार तोळे सोनं पोरीच्या अंगावर घाला अशी आई वडिलांना मागणी करावी आणि हुंड्यात म्हंटलं दोन चार लाख डिमांड करावेत. 

पण मग आम्हाला मुलगी भेटली, मुलीचे आईवडील भेटले. सगळं प्रकरणच इतकं सादगी चं होतं की माझ्या सगळ्या मागण्या मी गिळून टाकल्या. 

अच्छी सूरत को सवरने की जरूरत क्या है

सादगी भी तो कयामत की अदा होती है

असा सगळा माहोल होता. उच्चशिक्षित सून, जिच्या स्वभावात त्याचा मागमूस पण नाही, अतिशय मॉडेस्ट आणि हंबल असे तिचे आईवडील, कुटुंबाच्या सेवेत तत्पर असणारा सुनेचा भाऊ, आणि एकमेकांच्या प्रेमात बुडालेला नातेवाईकांचा गोतावळा. असा सगळा प्रकार. 

सगळा वेगळाच प्रकार झाला. मानपानाच्या बैठकीला आमच्या बाजूने तब्बल एक जण होता, तो म्हणजे मी, आणि त्यांच्याकडून दोघा जणांची गॅंग होती, ते म्हणजे मुलीचे आईवडील आणि पंधरा वीस मिनिटाच्या बैठकीत काय हवं नको ते बघणारा मुलीचा भाऊ. निम्मा वेळ तर आम्हाला काय नको हे बोलण्यातच गेला. लग्नाच्या प्रत्यक्ष खरेदीत "या गोष्टीचे पैसे आमच्याकडून होते, पण ते तुम्ही दिले" म्हणून मी काही पैसे त्यांना जी पे केले तर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी "नाही नाही, ते आम्हीच घ्यायचं होतं" म्हणत परत केले. 

असो. खूप वाईट वाटलं, महाराष्ट्रात जे काही घडलं ते वाचून. पोस्टचा बाज जरा साधा असला तरी दुःख अपार झालं आहे. खरंतर माफक अशी श्रीमंती आणि अमाप नात्यांची संपत्ती यातील गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित सांभाळलं तर आयुष्याचा स्वर्ग होतो. पण असं साधं सरळ सोपं आयुष्य सोडून लोक का विचका करून घेतात हा मोठा प्रश्नच आहे. 

Tuesday, 20 May 2025

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी संजयच्या फॅक्टरीत गेलो होतो. संजयने हे युनिट नुकतंच बनवलं होतं. मी कंपनीत पोहोचलो तेव्हा सीन जरा गरमागरमीचा होता. संजय ने त्यांच्या पॅन्ट्रीच्या इथून टॉयलेट साफ करण्याचा ब्रश, मॉप हातात घेतला होता, आणि तो टॉयलेटच्या दिशेने झपझप चालत होता. त्यांचा एच आर त्याच्या मागे "सर, मी मॅनेज करतो. नका तुम्ही असं करू" असं म्हणत धावत होता. 

मी आपलं काही इश्यू असेल म्हणून संजय च्या केबिन मध्ये बसून राहिलो. अर्ध्या एक तासात संजय तडकलेल्या चेहऱ्याने त्याच्या खुर्चीत येऊन बसला. माझ्या लक्षात आलं, काहीतरी बिनसलेलं आहे. संजय शांत झाल्यावर मी त्याला विचारलं कि काय झालं म्हणून. 

तर स्टोरी अशी होती. संजय ने युनिट नवीन बनवलं होतं. स्वच्छतेच्या बाबतीत संजय फार काटेकोर होता. नवीन युनिट मधील शॉपफ्लोअर वर वर्किंग असोसिएट्स साठी बनवलेले टॉयलेट्स त्याला हवे तसे क्लीन होत नव्हते. क्लिनिंग एजन्सी कडून टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचं काम एच आर मॅनेजर चं होतं. ते क्लीन होत नाही आहेत, हे संजय ने एच आर मॅनेजर ला चार पाच वेळा निदर्शनात आणून दिलं होतं. जेव्हा मी गेलो त्या सकाळी परत संजय ला हवी तशी स्वच्छता दिसली नाही. संजयने सरळ टॉयलेट क्लिनिंग चं सामान उचललं आणि एजन्सी च्या लोकांना घेऊन गेला आणि त्याला तो एरिया जसा क्लीन हवा तसा करून दाखवला. 

मी समोर असताना त्याने एच आर मॅनेजर ला आणि क्लिनिंग एजन्सी च्या लोकांना केबिन मध्ये बोलावलं आणि सांगितलं "मला जसा क्लिनलीनेस हवा आणि तो कसा आणायचा ते मी दाखवून दिलं आहे. आता मला यापुढे जर ते स्वच्छ दिसलं नाही तर मग तुम्हाला माझ्या तोंडून संगीत ऐकावं लागेल आणि ते कानाला फार मधुर वाटणार नाही.  आणि एक सांगतो. इथे माझ्या ऑफिसच्या जवळ पण टॉयलेट बनवलं आहे, पण मी मात्र हे शॉप फ्लोअरचं वॉशरूम वापरणार. त्यामुळे तिथलं ऑडिट सारखं माझ्या नजरेतून होत राहील हे ध्यानात असू द्या."

या गोष्टीला आता जवळपास पाच वर्षे झालीत. आज संजयच्या कंपनीची स्वच्छता ही वेगळ्याच लेव्हलची आहे. आजही संजय त्याच्या ऑफिसजवळ असलेलं टॉयलेट वापरत नाही तर शॉप फ्लोअर वर असोसिएट्स साठी जे वॉशरूम बनवले आहे तेच वापरतो आणि ते मला २०२० मध्ये जसं दिसलं तसंच आजही चकाचक दिसतं. 

स्वच्छता ठेवण्याबाबत एखाद्या आस्थापनेच्या नेत्याने कसं वागायला हवं याचा वस्तुपाठ संजयने मला त्याच्या वागणुकीतून दाखवून दिला. 

Monday, 19 May 2025

 हंगेरी चा माझा होस्ट मस्त माणूस होता. एकतर फॅमिली कल्चर अजूनही जिवंत वाटलं तिथं मला. रविवारी मी बुडापेस्टला पोहोचल्यावर संध्याकाळी लोकल साईट सिइंग आणि डिनर साठी तो त्याची बायको आणि दोन मुलांना, वय २८ आणि २५, असं सगळ्यांना घेऊन आला होता. आणि त्या सर्वांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या. 

बुडापेस्ट शहर मला संपन्न वाटलं पण पाश्चिमात्य शहरात सहसा अंगावर येणारी श्रीमंती तिथं दिसली नाही. लोकसंख्या पण कमी असल्यामुळे रस्ते पण रुंदीला लहान आणि आपल्याइतके खड्डे वगैरे नसले तरी बऱ्यापैकी खडबडीत होते. एका कंपनीत गेलो तर तिथं अगदी मातीचा रस्ता होता. अनेक कार पण जुन्या, छोटे मोठे डेंट मार्क्स दिसणाऱ्या होत्या. मुख्य म्हणजे युरोप मध्ये तसंही अमेरिकेसारख्या अगडबंब कार नसतात. मारुती स्विफ्ट खूप पॉप्युलर कार वाटली मला बुडापेस्ट मध्ये.  अनेक बिल्डिंग आणि घरं सुद्धा मला आपल्यासारखी वाटली, बाहेरून मध्यमवर्गीय फील देणारी. 

मी हे जे सगळं लिहितो आहे ती साम्यस्थळं माझ्या होस्ट ला सांगत होतो. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि एकच डायलॉग मला ऐकवला "But we don't have filthy garbage on our roads and public places." 

माझी मान शरमेने खाली झुकली. खरंच सांगतो बुडापेस्ट काय किंवा मला आजकाल तैवान मध्ये नेहमी जिथं जावं लागतं ते तैचुंग काय, तिथंही गरिबी आहे, दाटीवाटीने असलेल्या इमारती आहेत. चाळी पेक्षा भयानक अशी घरं मी चीन मध्ये पण बघितली आहेत. पण आपल्याइतकी रस्त्यावर घाण आणि कचरा मी कुठेही बघितला नाही. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा शहरं स्वच्छ ठेवण्याचा नामी उपाय पण त्याबद्दलची आपल्या समाजाची आणि राजकारण्यांची उदासीनता ही उबग आणि लाज वाटावी अशी आहे.

मला एक प्रश्न नेहमी पडतो. या विषयाशी संबंधित आपले राजकारणी, ज्यात नगरसेवक, मंत्री लोक, आणि नोकरशाहीचे पदाधिकारी परदेशात जातात. कुणी अभ्यास दौरे काढून जातात, कुणी नातेवाईकांना भेटायला जात असतील, कुणी मौज मजा करायला जात असतील. यांच्या कुणाच्याही मनात असं येत नसेल का की माझा वॉर्ड, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश असा स्वच्छ असावा? गणपती मध्ये अष्टविनायक आणि नवरात्री मध्ये देवीच्या दर्शनासाठी फुकट दौरे काढणाऱ्या नगरसेवकाला असं कधी वाटत नसेल का की माझा वॉर्ड चकाचक, अतिक्रमण मुक्त असायला हवा.? आणि खरं सांगतो, हे अनुभवयाला परदेशात पण जायची गरज नाही आहे. मध्य प्रदेश मधील इंदोर, किंवा पंजाब मधील चंदिगढ सुद्धा दृष्ट लागेल इतकं स्वच्छ आहे. 

आणि यापेक्षाही दुर्दैव हे आहे की धार्मिक आणि जातीय राजकारणात विभागल्या गेलेल्या आपल्या समाजाची पण मती कुंठित झाली आहे. आम्हाला रस्त्यावर दिसणारी अस्वच्छता, सार्वजनिक जागेवर नोकरशाहीच्या मदतीने केलेल्या अतिक्रमणामुळे उभे राहिलेले प्रश्न, शहरात असणारे दरिद्री रस्ते यावर मोर्चे काढून प्रश्न विचारावे वाटत नाही. कारण आमचे राजकारणी आम्हाला जातीवरून मोर्चे नेण्यात व्यस्त करतात, आम्हाला जयंत्या, पुण्यतिथीला,  मिरवणुकीसाठी उन्मदित करतात. 

सामाजिक उन्नतीसाठी काम करण्यासाठी खरंतर किती वाव आहे. राजकीय आणि नोकरशाहीने इच्छाशक्ती दाखवली तर चमत्कार करू शकतात याची असंख्य उदाहरणे आपणच पाहिली आहेत. पण याबाबतीत मात्र ती मृतावस्थेत आहे हे आपलं दुर्दैव. 

Monday, 12 May 2025

 मोठं कन्फ्युजन आहे. 

माझा यावेळचा दौरा मुंबई- बुडापेस्ट-फ्रँकफूर्ट-इस्तंबूल-मुंबई असा होता. १० मे रोजी माझं दुपारी अडीच वाजता फ्रँकफूर्ट-इस्तंबूल असं फ्लाईट होतं. त्याचं चेक इन करण्यासाठी मी ९ मे ला बसलो. तितक्यात यु ट्यूब वर एक्स्टर्नल मिनिस्ट्री चं ब्रिफिंग चालू होतं. त्यात  कर्नल कुरेशी सांगत होत्या की पाकिस्तान ने जे भारतावर ड्रोन हल्ले केले, त्या ड्रोन चं विश्लेषण केल्यावर असं लक्षात आलं की हे ड्रोन तुर्कस्थान मध्ये बनवले आहेत. 

मी चेक इन करण्याऐवजी व्हाट्स अप उघडलं. इस्तंबूल मधील माझ्या होस्टला मेसेज पाठवला की मी तिकडे येणं कॅन्सल करतो आहे. त्यामागे कारण होतं. 

- जर मिनिस्ट्री सांगत आहे की पाकिस्तान ने वापरलेले ड्रोन हे टर्की मध्ये बनले आहेत तर ते त्यांच्याबरोबर चे राजनैतिक संबंध थांबवू शकतात. माझं टर्किश एअरलाईन चं रिटर्न तिकीट १७ मे चं होतं. पुढील ९ दिवसात काहीही होऊ शकत होतं. मला रिस्क घ्यायची नव्हती. आणि ज्या देशाचे ड्रोन मिलिटरी ऍक्शन मध्ये आपल्या देशाविरुद्ध वापरले तिथं जाणं काही मला फारसं संयुक्तिक वाटलं नाही. मी ट्रॅव्हल प्लॅन बदलून जर्मनीतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 

इथं मला प्रश्न पडला. टर्की ने ड्रोन बनवले आणि ते पाकिस्तान ने आपल्या विरुद्ध वापरले म्हणून माझी राष्ट्र भक्ती जागृत झाली आणि मी टर्की ला जाणं कॅन्सल केलं. पण पाकिस्तान ने तर आपल्या विरुद्ध एफ १६ वापरलं आणि इथे तर माझी अमेरिकन कंपनी बरोबर पार्टनर शिप आहे. मग हा दुटप्पी पणा आहे का? 

यापुढे जाऊन अजून एक गंमत सांगतो. जर्मनी मध्ये मला एका दुसऱ्या गावाला जायचं होतं. माझ्यासाठी जी कॅब बुक केली होती, तिचा मालक आणि चालक पाकिस्तानी होता. मी ती कॅब मात्र कॅन्सल नाही केली. 

टर्की ची ट्रिप कॅन्सल केल्यामुळे माझं जवळपास रु दीड लाख रुपयाचं नुकसान झालं. मी पाकिस्तानी मालकाची कॅब कॅन्सल करून दुसरी केली असती तर माझं शून्य नुकसान झालं असतं. 

धर्मधिष्ठित राजकारण करून सामान्य माणसांच्या मनात तिरस्काराची भावना तयार करणारी आणि त्यातून कृष्णकृत्य उद्युक्त करणारी राष्ट्रनीती,

आणि भांडवलशाहीचा आधार घेऊन दुसऱ्या देशाला स्वसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्रास्त्र पुरवणारे युद्धखोर देश

धर्माने शिकवलेल्या जीवन प्रणालीचा सर्व्हायवल साठी उपयोग करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात यापैकी विरोध कुणाचा करायचा, का करायचा, कसा करायचा याबद्दल कन्फ्युजन आहे. मला असं कन्फ्युज असणं बरोबर की चूक हे पण माहित नाही. फक्त मला एक कळतं की कुठल्याही राष्ट्राच्या उन्नतीचं आणि विकासाचं अधिष्ठान हा कोणत्याही धार्मिक इझम शी निगडित नसावं तर कार्मिक इझम शी नातं जोडणारं असावं. मीच मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे.