मोठं कन्फ्युजन आहे.
माझा यावेळचा दौरा मुंबई- बुडापेस्ट-फ्रँकफूर्ट-इस्तंबूल-मुंबई असा होता. १० मे रोजी माझं दुपारी अडीच वाजता फ्रँकफूर्ट-इस्तंबूल असं फ्लाईट होतं. त्याचं चेक इन करण्यासाठी मी ९ मे ला बसलो. तितक्यात यु ट्यूब वर एक्स्टर्नल मिनिस्ट्री चं ब्रिफिंग चालू होतं. त्यात कर्नल कुरेशी सांगत होत्या की पाकिस्तान ने जे भारतावर ड्रोन हल्ले केले, त्या ड्रोन चं विश्लेषण केल्यावर असं लक्षात आलं की हे ड्रोन तुर्कस्थान मध्ये बनवले आहेत.
मी चेक इन करण्याऐवजी व्हाट्स अप उघडलं. इस्तंबूल मधील माझ्या होस्टला मेसेज पाठवला की मी तिकडे येणं कॅन्सल करतो आहे. त्यामागे कारण होतं.
- जर मिनिस्ट्री सांगत आहे की पाकिस्तान ने वापरलेले ड्रोन हे टर्की मध्ये बनले आहेत तर ते त्यांच्याबरोबर चे राजनैतिक संबंध थांबवू शकतात. माझं टर्किश एअरलाईन चं रिटर्न तिकीट १७ मे चं होतं. पुढील ९ दिवसात काहीही होऊ शकत होतं. मला रिस्क घ्यायची नव्हती. आणि ज्या देशाचे ड्रोन मिलिटरी ऍक्शन मध्ये आपल्या देशाविरुद्ध वापरले तिथं जाणं काही मला फारसं संयुक्तिक वाटलं नाही. मी ट्रॅव्हल प्लॅन बदलून जर्मनीतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
इथं मला प्रश्न पडला. टर्की ने ड्रोन बनवले आणि ते पाकिस्तान ने आपल्या विरुद्ध वापरले म्हणून माझी राष्ट्र भक्ती जागृत झाली आणि मी टर्की ला जाणं कॅन्सल केलं. पण पाकिस्तान ने तर आपल्या विरुद्ध एफ १६ वापरलं आणि इथे तर माझी अमेरिकन कंपनी बरोबर पार्टनर शिप आहे. मग हा दुटप्पी पणा आहे का?
यापुढे जाऊन अजून एक गंमत सांगतो. जर्मनी मध्ये मला एका दुसऱ्या गावाला जायचं होतं. माझ्यासाठी जी कॅब बुक केली होती, तिचा मालक आणि चालक पाकिस्तानी होता. मी ती कॅब मात्र कॅन्सल नाही केली.
टर्की ची ट्रिप कॅन्सल केल्यामुळे माझं जवळपास रु दीड लाख रुपयाचं नुकसान झालं. मी पाकिस्तानी मालकाची कॅब कॅन्सल करून दुसरी केली असती तर माझं शून्य नुकसान झालं असतं.
धर्मधिष्ठित राजकारण करून सामान्य माणसांच्या मनात तिरस्काराची भावना तयार करणारी आणि त्यातून कृष्णकृत्य उद्युक्त करणारी राष्ट्रनीती,
आणि भांडवलशाहीचा आधार घेऊन दुसऱ्या देशाला स्वसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्रास्त्र पुरवणारे युद्धखोर देश
धर्माने शिकवलेल्या जीवन प्रणालीचा सर्व्हायवल साठी उपयोग करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात यापैकी विरोध कुणाचा करायचा, का करायचा, कसा करायचा याबद्दल कन्फ्युजन आहे. मला असं कन्फ्युज असणं बरोबर की चूक हे पण माहित नाही. फक्त मला एक कळतं की कुठल्याही राष्ट्राच्या उन्नतीचं आणि विकासाचं अधिष्ठान हा कोणत्याही धार्मिक इझम शी निगडित नसावं तर कार्मिक इझम शी नातं जोडणारं असावं. मीच मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे.
No comments:
Post a Comment