Monday, 19 May 2025

 हंगेरी चा माझा होस्ट मस्त माणूस होता. एकतर फॅमिली कल्चर अजूनही जिवंत वाटलं तिथं मला. रविवारी मी बुडापेस्टला पोहोचल्यावर संध्याकाळी लोकल साईट सिइंग आणि डिनर साठी तो त्याची बायको आणि दोन मुलांना, वय २८ आणि २५, असं सगळ्यांना घेऊन आला होता. आणि त्या सर्वांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या. 

बुडापेस्ट शहर मला संपन्न वाटलं पण पाश्चिमात्य शहरात सहसा अंगावर येणारी श्रीमंती तिथं दिसली नाही. लोकसंख्या पण कमी असल्यामुळे रस्ते पण रुंदीला लहान आणि आपल्याइतके खड्डे वगैरे नसले तरी बऱ्यापैकी खडबडीत होते. एका कंपनीत गेलो तर तिथं अगदी मातीचा रस्ता होता. अनेक कार पण जुन्या, छोटे मोठे डेंट मार्क्स दिसणाऱ्या होत्या. मुख्य म्हणजे युरोप मध्ये तसंही अमेरिकेसारख्या अगडबंब कार नसतात. मारुती स्विफ्ट खूप पॉप्युलर कार वाटली मला बुडापेस्ट मध्ये.  अनेक बिल्डिंग आणि घरं सुद्धा मला आपल्यासारखी वाटली, बाहेरून मध्यमवर्गीय फील देणारी. 

मी हे जे सगळं लिहितो आहे ती साम्यस्थळं माझ्या होस्ट ला सांगत होतो. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि एकच डायलॉग मला ऐकवला "But we don't have filthy garbage on our roads and public places." 

माझी मान शरमेने खाली झुकली. खरंच सांगतो बुडापेस्ट काय किंवा मला आजकाल तैवान मध्ये नेहमी जिथं जावं लागतं ते तैचुंग काय, तिथंही गरिबी आहे, दाटीवाटीने असलेल्या इमारती आहेत. चाळी पेक्षा भयानक अशी घरं मी चीन मध्ये पण बघितली आहेत. पण आपल्याइतकी रस्त्यावर घाण आणि कचरा मी कुठेही बघितला नाही. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा शहरं स्वच्छ ठेवण्याचा नामी उपाय पण त्याबद्दलची आपल्या समाजाची आणि राजकारण्यांची उदासीनता ही उबग आणि लाज वाटावी अशी आहे.

मला एक प्रश्न नेहमी पडतो. या विषयाशी संबंधित आपले राजकारणी, ज्यात नगरसेवक, मंत्री लोक, आणि नोकरशाहीचे पदाधिकारी परदेशात जातात. कुणी अभ्यास दौरे काढून जातात, कुणी नातेवाईकांना भेटायला जात असतील, कुणी मौज मजा करायला जात असतील. यांच्या कुणाच्याही मनात असं येत नसेल का की माझा वॉर्ड, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश असा स्वच्छ असावा? गणपती मध्ये अष्टविनायक आणि नवरात्री मध्ये देवीच्या दर्शनासाठी फुकट दौरे काढणाऱ्या नगरसेवकाला असं कधी वाटत नसेल का की माझा वॉर्ड चकाचक, अतिक्रमण मुक्त असायला हवा.? आणि खरं सांगतो, हे अनुभवयाला परदेशात पण जायची गरज नाही आहे. मध्य प्रदेश मधील इंदोर, किंवा पंजाब मधील चंदिगढ सुद्धा दृष्ट लागेल इतकं स्वच्छ आहे. 

आणि यापेक्षाही दुर्दैव हे आहे की धार्मिक आणि जातीय राजकारणात विभागल्या गेलेल्या आपल्या समाजाची पण मती कुंठित झाली आहे. आम्हाला रस्त्यावर दिसणारी अस्वच्छता, सार्वजनिक जागेवर नोकरशाहीच्या मदतीने केलेल्या अतिक्रमणामुळे उभे राहिलेले प्रश्न, शहरात असणारे दरिद्री रस्ते यावर मोर्चे काढून प्रश्न विचारावे वाटत नाही. कारण आमचे राजकारणी आम्हाला जातीवरून मोर्चे नेण्यात व्यस्त करतात, आम्हाला जयंत्या, पुण्यतिथीला,  मिरवणुकीसाठी उन्मदित करतात. 

सामाजिक उन्नतीसाठी काम करण्यासाठी खरंतर किती वाव आहे. राजकीय आणि नोकरशाहीने इच्छाशक्ती दाखवली तर चमत्कार करू शकतात याची असंख्य उदाहरणे आपणच पाहिली आहेत. पण याबाबतीत मात्र ती मृतावस्थेत आहे हे आपलं दुर्दैव. 

No comments:

Post a Comment