काल मित्र गप्पा मारायला आला होता. फेसबुकवर मैत्री झाली तरी नंतर त्यापलीकडे अनेक लोकांशी दोस्ती झाली आहे, त्यापैकीच तो एक आहे.
त्याने परत तोच विषय काढला की तुमच्या लिस्ट मध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक आणि तुमचेही मत न पटणारे लोक मित्र म्हणून कसे सांभाळता? त्याला जे सांगितलं आणि आधीही इथे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो.
एखाद्याशी मैत्री करण्याचे आणि टिकवण्याचे माझे जे निकष आहेत, त्यामध्ये त्याचा धर्म, जात, राजकीय मत हे कुठेच बसत नाहीत. एकदा लिस्ट मध्ये आले आणि काही कारणाने माझ्या लक्षात आलं की यांची राजकीय मतं माझ्यापेक्षा वेगळी आहेत पण समाजामध्ये काम अतिशय इमानेइतबारे करतो. मग मला त्यांच्या स्वीकारार्ह तेचा टॉलरन्स बँड खूप मोठा होतो. तुम्ही तुमच्या कामावर किती प्रेम करता, आर्थिक स्थैर्य आणायचा प्रयत्न करत असाल, तुम्ही समाजाप्रती सहवेदनेचा, सह अनुभूतीचा भाव ठेवत असाल तर मला त्यांची राजकीय मतं काहीही असतील तरी फरक पडत नाही. त्यांचं जॉब प्रोफाईल काहीही असेल तरी मला मैत्री त्याज्य नाही आहे. वैयक्तिक असणारं राजकीय मत हे कुणाच्या कार्यकर्तृत्वापेक्षा महत्वाचं असतं असं मला वाटत नाही. त्यामुळेच मित्रत्व स्वीकारताना मी व्यक्ती वजा राजकीय मत असं स्वीकारतो.
हे असं असलं तरी वर टॉलरन्स बँड चा उल्लेख केला आहे. तो आहेच. तुमची जशी दैवतं आहेत तसे माझेही काही आदर्श आहेतच, दैवत एकही नाही. आणि त्यात इतिहासातली एकही व्यक्ती नाही. त्यांच्याकडून जे काही शिकायचं ते शिकून झालं आहे. माझे आदर्श या जित्या जागत्या व्यक्ती आहेत. त्यात व्यावसायिक आहेत, समाजसेवक आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, कलाकार आहेत. त्या लोकांवर विखारी टोन मध्ये भाषा वापरली की मग मी त्यांना लिस्ट मधून मोकळं करतो. दुसरं अजून एक उडवण्याचं कारण एकदम वियर्ड आहे. मला जेव्हा लक्षात येतं की याच्या प्रतिक्रियेत विरोध नाही आहे तर मत्सर आहे, असूया आहे त्यांना पण अलविदा करतो. मग त्यात फेसबुकवर एकेकाळी जवळची मैत्री झाली आहे असे अनेक लोक आहेत. इतकंच नाही, तर मध्ये माझ्या अगदी जवळच्या वैयक्तिक मित्राला फेसबुक लिस्ट मधून मोकळं केलं. आणि त्या विषयावर न बोलण्याचं भान आम्ही दोघेही राखून आहोत.
वर उल्लेख केलेला टोन माझ्या साठी शब्दांपेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यातून व्यक्त होणारे हावभाव, सूर हे जाणवतात. तुम्हाला ती अमूल माचोची ऍड आठवते. त्यातील शब्द व्हल्गर नव्हते, पण हावभाव अचकट विचकट होते. म्हणून त्यावर बंदी आली. फेसबुकच्या पोस्ट मधून, प्रतिक्रियेमधून ते कळतं. तुम्ही शब्दात लिहिलं नसेल तरी त्यामागचा अर्थ कळतो आणि तो बऱ्याचदा असाच विकट असतो. तो तसा नसणं यालाच सोशल मीडिया हायजिन म्हणतात. तो पाळला की मी संवाद साधू शकतो.
अजून एक शेवटची गोष्ट. मी प्रत्यक्ष जीवनात आणि फेसबुकवर कान हलके ठेवले नाही आहेत. माझ्या कंपनीत काही माणसे चोऱ्या करतात असा अनेक जण माझ्यापाशी संशय व्यक्त करायचे. पण पुरावा मिळाल्याशिवाय ऐकीव माहितीवर कुणाला काढलं नाही. इथेही अनेक प्रथितयश लोकांबद्दल इकडून तिकडून काहीबाही ऐकायला मिळतं. माझ्याबद्दलही लोक बोलत असावीत. पण या ऐकीव माहितीवर मी कुणाबद्दलचं मत बदललं नाही. जेव्हा मला स्वतःला अनुभव आला, तेव्हाच मत बनवलं.
एनीवे, मी मानव्य, मैत्री यात पावित्र्य राखण्यात विश्वास ठेवतो. कर्माचरण हे जास्तीत जास्त स्वच्छ कसं असेल यावर मनापासून काम करतो. जे आहे, ते असं आहे.