Monday 12 August 2013

मन

काही गोष्टी आपल्या मनात, आपल्या श्वासात, आपल्या नजरेत अगदी ठसलेल्या असतात़. त्याची अनुभूति परत कितीही दिवसांनी, वर्षांनी झाली तरी आपण हरखून जातो, हरवून जातो.

नासिकची सीडीओ/मेरी शाळा आजही मी बघितली की गलबलून जातो. तीच गत परभणीच्या माझ्या आजोळची-मुक्ताजीनची. औरंगाबाद च्या govt polytechnic वरून गेलो की मान पुन्हा पुन्हा वळतेच आणि ८३-८६ च्या काळात डुबकी मारून येतो़.

बर्याचदा एखाद्या shop floor वरून जाताना कुलंटचा एक तीव्र दर्प येतो़ आणि मला हटकून SKF ची आठवण येते. तो कुलंटचा वास सुद्धा मग मला केवड्याच्या वासाइतकाच मोहक वाटतो.

याउलट काही ठिकाणाहून जाताना ऋणानुबंध असतानाही आपण भावनाशून्य होऊन जातो. माझ्या बाबतीत उदाहरण द्यायचं म्हणजे भारती विद्यापीठ. का कोण जाणे, सातारा रोडहून जाताना मला कधी या माझ्या काॅलेजकडे प्रेमाने बघितलेले आठवत नाही. किंबहुना तीव्र भांडण झालेला मित्र अचानक समोर आला तर आपण कसे तोंड चूकवून पुढे जातो तसा मी भारतीच्या समोरून जातो. 

काही आपल्या हातून झालेल्या अक्षम्य चूका, कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी, केवळ कुणाला माहिती नसते, म्हणून आपण सहीसलामत सुटलेलो असतो. झूरळासारखे ते विचार झटकून द्यावे म्हंटलं तरी वेताळासारखे मानगुटीवर बसलेले असतात़. 

काही गोष्टी/घटना मनावर फुंकर मारतात, तर काही ओरखडे ओढून जातात.............याला जीवन एेसे नाव 

No comments:

Post a Comment