Friday 29 November 2013

दंगल

  २७ फेब्रूवारी २००२. कच्छ एक्सप्रेस चं बुकिंग, गांधीधाम साठी. मी, मोहन चोलकर आणि कराडकर. ट्रेन साधारण संध्याकाळची. तोपर्यंत आम्हाला बातमी येउन पोहोचली, गोध्राला साबरमती एक्सप्रेस चा डबा जाळला आणि वातावरण तणावयुक्त. मी मोहनला विचारलं, cancel करू यात का?. मोहन म्हणाला "काम पण महत्वाचं आहे, जाऊ यात". मी पण विचार केला, काय होणार होऊन, उद्यापर्यंत शांत होईल. मी मान होकारार्थी डोलावली. प्रवास चालू झाला. वेगवेगळ्या बातम्या कानावर येत होत्या. पण फार काही सिरीयस वाटत नव्हतं. व्यवसायाच्या गप्पा चालू होत्या. एक एक गाव मागे चाललं होतं. अहमदाबाद आलं असावं कधीतरी रात्री. ट्रेन पण बर्याच वेळ थांबली होती, नेहमीप्रमाणे. आणि चालू पडली.

 सकाळी गांधीधाम आलं. व्यवहार सुरळीत चालू होते. कंपनीची गाडी आली होती स्टेशनवर. गेस्ट हाऊसला घेउन गेली. फ़्रेश झालो. पहिली मिटींग झाली. आणि ११ वाजता चुलत भावाचा ठाणयाहून फोन आला (त्याला माहित होतं मी गुजरात गेलो आहे ते.) म्हणाला "अरे अहमदाबाद पेटलं आहे, तु बरा आहेस का?" मी म्हणालो "इथे सगळं व्यवस्थित आहे" म्हणाला काळजी घे. दुसरं काम हातात घेतलं. एक तास गेला आणि त्यानंतर मात्र फोनची लाईनच लागली. "कुठे आहेस, कसा आहेस, कशासाठी कडमडलास तिथे, कसला राडा चालू आहे तिथे" मी प्रत्येकालाच उत्तरं देउन थकलो, "अरे इथं काहीच प्राॅब्लेम नाही आहे, काळजी घेईन" अशा वेळेस सर्वांना फारच काळजी वाटते, सहाजिकच आहे म्हणा ते. बंगलोरहून माझ्या बाॅसचा फोन आला "पहिली फ़्लाइट घे आणि मुंबईला ये" माझ्याबरोबर मोहन आणि कराडकर. आमचं संध्याकाळच्या ट्रेन चं परतीचं तिकीट होतं.

एव्हाना दडपण वाढत चाललं होतं. मोहन निवांत होता. म्हणाला "काही नाही, ट्रेननी जाऊ" त्याला आणि कराडकरांना बडोद्याला उतरायचं होतं. PSL कंपनीत सर्व कामे सुरळीत चालू होती, काहीच टेन्शन नव्हतं. सटारली होती ती या फोनमुळे. बोनीचा बंगलोरहून निर्वाणीचा फोन आला "निघालास की नाही" मी म्हणालो "ट्रेननीच येतो़" त्याची सटकली, म्हणाला "are you crazy". त्याला कसंबसं समजावलं. "Take care" म्हणताना त्याच्या शब्दातून काळजी टपकत होती हे मला फोनमधूनही जाणवलं.

घरच्यांचा फोन आला. वैभवी बोलली, "काय ठीक आहे ना" म्हणालो "हो" "ठीक आहे, ये व्यवस्थित" कूल, एकदम शांत,  आक्रस्ताळेपणा नाही, अती काळजी नाही, तिचा तो शांतपणा त्या अवस्थेत मानसिक उभारी देउन गेला. हे नेहमीच होत आलं आहे, त्यावेळेसही झालं, आणि अंतापर्यंत होत राहील. मी काहीतरी राईचा पर्वत ऊभा करायचा आणि वैभवीने त्याच्यावर शांत प्रतिक्रिया देउन, त्याला वितळवून टाकायचं.

काम आटोपलं, आणि आमची त्रयी स्टेशन वर पोहोचली. बघतो तर काय खचाखच भरली जाणारी ट्रेन रिकामी. मोजकीच माणसं. आमचं २ एसी चं तिकीट होतं, तिथे आनंदच होता. आनंद कुठला, पूर्ण डब्यावर एका अनामिक दडपण होतं. अख्ख्या डब्यात आम्ही तिघंच.  पहिल्यांदाच मी मनातून टरकलो. मोहन आणि कराडकर पण टरकले असावेत. आम्ही तिघंही धैर्य चेहर्यावर अक्षरश: गोळा करत होतो. Be brave, pretend even if you are not. Nobody can tell the difference. हे वाक्य आम्ही जगत होतो.

गाडी हलली, coach attendant आला, त्यानी गुड न्यूज़ दिली, TC नी पण दांडी मारली होती. म्हणजे पूर्ण ट्रेन मधे एकही TC नव्हता. आम्हाला सांगितले "गाडीच्या बाहेर निघून नका, दरवाजे बंद ठेवा" त्यानी पण उसनं अवसान आणलं होतं. जसाजसा अंधार पडत गेला, आमचं बोलणं मंदावत गेलं. (रात्रीच्या जेवणाचं काय केलं आठवत नाही). गाड़ी वेगवेगळ्या स्टेशनवर थांबत होती, पण प्रवाशांची देवाणघेवाण तुरळक. झोपण्याचा प्रयत्न केला. कराडकर आणि मोहन गाढ़ झोपले होते, मला त्यांचा हेवा वाटला.

झोपण्याच्या धडपडीत २;३० वाजले, आणि गाड़ी एका मोठ्या स्टेशनवर थांबली. बराच प्रयत्न करून नाव वाचलं "अहमदाबाद". प्लॅटफाॅर्मवर एक भयाण शांतता होती. अक्षरश: कुत्रसुद्धा नव्हतं. त्या नेहमी गजबजलेल्या स्टेशनवर काळ जणू थबकला होता. भारतातलं हे बिझी स्टेशन मलूल होऊन पडलं होतं. (अहमदाबादला माझी तेव्हा महिन्यात एक चक्कर व्हायची). गाडी तिथून हलली, तेव्हा विषण्णता आणि भितीचं गार्रूड माझ्या मनावर सवार झालं होतं.

सकाळी ५ वाजता बड़ोदरा आलं, मोहनचा भाऊ पोलीसच्या गाडीमधून त्यांना घ्यायला आला होता. माझी खूप इच्छा होती, त्यांनी माझ्याबरोबर मुंबईला यावं, पण तो वडोदर्याला उतरण्यावर ठाम होता. तिथे डब्यात दूसरे २-४ प्रवासी आले पण ते माझ्या बर्थपासून बरेच लांब होते. आता मी एकटाच होतो.

सकाळ झाली, तेव्हा अंकलेश्वर आलं. दोघंजण डब्यात आले. त्यांच्या डोळ्यात भिती दाटून आली होती. पाय छातीशी आवळून दोघं एकमेकासमोर बसले. माझ्याकडे बघून कसंनूसंच हसले. माझी नज़र टाळत होते. दिवस चढ़त होता आणि गाडी सुरत पार करत महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करती झाली. त्याबरोबर त्यतल्या एकाने मोबाईल काढून घरी फोन केला आणि रडतरडत सांगितले की ते सुखरूप आहेत. फोन बंद केल्यावर त्याने हमसाहमशी रडून घेतले. सावरल्यावर मी त्याला विचारले "काय झाले"?

ते दोघं मुस्लिम होते, मुंबईचे. अंकलेश्वरला त्यांचं गोडाऊन होतं.(कसलं ते विसरलो). दंगलखोरांनी भस्मसात केलं होतं, आगीमधे. आणि त्यांच्या मागावर होते, जिवे मारण्यासाठी. दिवसरात्रआसरा शोधत होते, पण कुणीच थारा दिला नाही. लपूनछपून ही गाडी पकडली आणि त्यांचा जीव वाचला होता.

मुंबईला पोहोचलो, माझा हात प्रेमाने दाबून ते निरोप घेऊन गेले. मी दादरला एशियाड स्टॅंडला पेपर घेतला, आणि मला जाणवलं की मी कुठल्या भयाण दिव्यातून सहीसलामत आलो आहे.

त्या विचारातच माझा बसमधे निवांत डोळा लागला माझ्या घरी पोहोचण्यासाठी.














No comments:

Post a Comment