Sunday 13 December 2015

व्यक्तिचित्रण

महेंद्रभाईंनी व्यक्तिचित्रण दिंडी काढली पण काही कारणामुळे ते लांबचा पल्ला गाठू शकली नाही. कारण का ते कळलं नाही. कदाचित वाद होण्याची शक्यता म्हणून लोकांनी टाळलं असेल. प्रविणने मला दोनदा आवाहन केलं पण काही कारणामुळे जमलं नाही. आज ठरवलंच की लिहून काढायचं म्हणून. अन माझा दुसरा प्रॉब्लेम असा होता की मला अनेक लोकांबद्दल लिहायचं होतं. आता त्यातून कुणाबद्दल लिहायचं हा प्रश्न सोडवण्यात बरेच दिवस गेले. मित्रपरिवार मोठा झाला आहे. बरं सगळे एकाहून एक सरस. त्यांचं लिखाण, पोस्टवरच्या कॉमेंटस या अफलातून असतात.  तरीही त्यांच्यापैकी सात निवडले आहेत. तेच का निवडले, तर कारण नाही. चिठ्ठ्या टाकल्या आणि सात उचलल्या असं समजा.

सप्तसुर

१. निर्भयसिंह जाधव: फेबु खेळायला चालू केल्यावर हा गृहस्थ मित्रयादीत आला. याचे चार मित्र आहेत, सध्या त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलंय असं दिसतंय. पण हे पाच जण मिळून फुल दंगा घालायचे. निर्भय एखादा मुद्दा  टाकायचा, म्हणजे पेटवायचा आणि बाकी त्यावर फुंकर मारायचे. नाही, फुंकर विझवायची नाही तर धगधगायची. याची राजकीय समज त्याच्या वयाच्या मानाने खूप चांगली आहे. तो स्वत:च्या मतांवर ठाम असतो. प्रसंगी हेकेखोरही असतो. त्यामुळे त्याने खुप सिनियर मित्र गमावले. आता तो खूप लो प्रोफाईल असतो. मला फेबुची गोडी लावण्याचं पाप निर्भयला लागलं आहे.

२. सौ स्मिता गानू जोगळेकर.: मी फेबुवर फार ताई वैगेरे कुणाला संबोधत नाही. तीन चार जणी असतील. पण त्यांनी ती पदवी त्यांच्या लिखाणातून अन वेळोवेळी माझ्यावर वर्षावलेल्या आशिर्वादातून कमावलेली आहे. स्मिताताई, तिच्या लिखाणाबद्दल, स्वभावाबद्दल मी काय बोलणार? वादातीत आहे ते. फेबुवरून डिअॅक्टिवेट होतो मधे. तेव्हा दोघी जण कायम संपर्कात होत्या, त्यापैकी एक स्मिताताई. फेबुवर  नसताना तिच्याशी जी मेलामेली झाली तो माझ्या संग्रही एक अमूल्य ठेवा आहे. मी जेव्हा कधी तिला भेटेल तेव्हा तिचे पाय धरण्यासाठी हा ताठ पाठीचा कणा एका सेकंदात वाकेल याबाबत शंका नाही.

३. बालाजी सुतार: एक प्रथितयश लेखक, एक भावस्पर्शी कवी अन त्यावर कडी करणारा त्यांचा गुण म्हणजे एक मोठा माणूस. ते ललित लिहीतात तेव्हा त्यांच्या शब्दातून शीतल चांदणे बरसते अन जेव्हा धगधगतात तेव्हा त्याच शब्दातून आग लागते. अत्यंत संतुलित विचारसरणी, ती मांडण्याची विलक्षण वाचनीय हातोटी अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाची गळाभेट घेण्याची इच्छा आहे. ती कधी पूर्ण होईल याची वाट पाहतो आहे.

४. दिलीप लिमये: दोन गुरू लोकं भेटले आहेत. एक विनोदाची पखरण करणारे उदय जोशी अन दुसरे ललित लेखन ताकदीने उतरवणारे दिलीप लिमये. लिमयेंच्या मित्रयादीत फार मंडळी नाहीत बहुधा. ते पण लाईक गेमपासून दूर आहेत. पण त्यांचं लिखाण हे खिळवून टाकणारं असतं. संग्रही प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाला शब्दात गुंफतातही ते छान. भेटण्याचा वादा झाला आहे, बघू कधी योग येतो ते. अंगठा मागणार नाहीत असे वाटते.

५. राहुल बनसोडे.: हा माणूस विद्वान आहे. कमी वयात त्याने कमावलेला आवाका हा स्तिमित करणारा आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राष्ट्रीय अन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. तो जितक्या ताकदीने रूपक लिहीतो तितक्याच जोरकसपणे ललित आणि त्यापेक्षाही इंटेन्सिटीने इकॉनॉमिक आर्टिकल लिहीतो. नाही म्हणायला त्याच्या काही पोस्ट डोक्यावरून जातात, त्यातल्या त्यात तो जेव्हा झाडबुके बनून लिहीतो तेव्हा. पण ठीक आहे. चालतं ते. सुगम संगीताच्या मैफिलीत  ऐकताऩा एखाद दुसरं शास्त्रीय गाणं आपण ऐकतोच की!

६. श्रेणिक नारदे/नरडे/नारडे: नको असलेले आडनाव खोडून टाक रे. हा मुलगा अद्भूत लिहीतो. ग्रामीण बाज त्याने चपखल उचलला आहे. पुढचं वाक्य काय असेल याची कायम उत्कंठा लागलेली असते. ट्विस्ट इतके देतो की सुरूवात कुठून करतो आणि संपते कुठे हे मजेशीर असते. श्रेणिकने लिहीत राहिला तर थोड्याच दिवसात त्याचं पुस्तक अत्रे सभागृहात विकायला दिसेल अशी मला खात्री आहे.

७. मयूर लंकेश्वर: विद्रोही लेखन म्हणजे नामदेव ढसाळ इतकंच माहिती होतं. इथे फेबुवर सतीश वाघमारेंच्या लिखाणाने त्याची खर्या अर्थाने ओळख झाली. आणि आता मयूर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतो आहे. काही सामाजिक विषयांवर माझी तोंडओळख आहे, पण आरक्षण या विषयावर माझं कुठलंही ठाम मत अजून झालं नाही. पण मयूरचा आरक्षण या विषयावरच्या लेखाने काही गोष्टी कळल्या. काही वेळा विरोध करताना त्याचा तोल जातो खरा, पण त्याने मयूरच्या विचारांचं महत्व कमी होत नाही.

ज्यांना भेटलो नाही अशांपैकीच लिहायचं ही अट होती. त्यामुळे काम थोडं सोपं झालं.  या सातही जणांना भेटलो नाही आहे मी. बाकी १०० एक लोकांना भेटलो आहे मी. आमचा परभणीकर ग्रूप आहे, खर्डेघाशी मंडळी आहेत. एका कुणाचं नाव लिहीत नाही पण ज्यांचं लिखाण अन त्यांचे विचार मेंदूला चालना देतात अशी अनेक मंडळी आहेत. काही जण इतक्या भन्नाट कॉमेंट टाकतात की मूळ पोस्ट झाकोळावी.  कधीकधी वैयक्तिकरित्या विसंवादी सूर लागतोही. पण विचारांची सरमिसळ जेव्हा होते तेव्हा या विसंवादी, संवादी सूरांमधून एक सिंफनी तयार होते आणि राजेश मंडलिक च्या मनाचा ऑर्केस्ट्रा सूरमयी तार छेडतो. 

No comments:

Post a Comment